Saturday, November 27, 2010

२६ नोव्हेंबर २००८ (भाग १,२)



२६ नोव्हेंबर २००८  (पूर्वार्ध)


त्या दिवशी मी अल्फारेटाला मुलाच्या घरी बसून दुपारचे जेवण घेत होतो. अचानक टेलीफोन वाजला. अजय ऑफीसमधून बोलत होता. मला वाटले तो तिकडे डबा खायला बसला असेल आणि जेवण करता करता त्याला गप्पा मारायच्या असतील. पण तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, "तुम्हाला मुंबईचं कांही कळलं का?"

आम्हाला घराबाहेरच्या जगाचं भानच नव्हतं. सांगितलं, "नाही बाबा. काय झालं?"

"तिथे कसलातरी मोठा घोटाळा झालाय्."

एवढ्या मोठ्या मुंबईत लहान सहान दुर्घटना रोजच घडत असतात. "बडे बडे शहरोंमें छोटी छोटी बाते होती रहती है।" हे माननीय कै.आबा पाटलांनी काढलेले अज्ञानमूलक उद्गार खूप प्रसिद्ध झाले होते आणि त्यांना भारी महागात पडले होते.  अशा घटनांच्याबद्दल वर्तमानपत्रांच्या आतल्या पानांवर बारीक अक्षरात असलेल्या बातम्या न वाचताच ते पान मी अनेक वेळा उलटतो. एकादी इमारत कोसळणे, बस किंवा लोकलचा अपघात, दंगेधोपे, अलीकडल्या काळात होत असलेले बाँबस्फोट यासारख्या मुंबईच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या घटना तिथल्या वृत्तपत्रात मुखपृष्ठावर असतात. पण अल्फारेटाला आल्यापासून रोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा प्रकारच नव्हता आणि कधी न्यूजपेपर आणलाच तर तिथल्या पेपरमध्ये मुंबईतल्या या बातम्या येतही नव्हत्या. अधून मधून इंटरनेटवर मुंबईतली वर्तमानपत्रे वाचून त्याची तहान भागवून घेत होतो पण त्यात एवढे समाधान होत नसे. त्यामुळे मुंबईत घडलेल्या अशा मोठ्या स्थानिक घटनासुध्दा अनेक वेळा आम्हाला अमेरिकेत समजत नसत. मग माझ्या मुलाला एवढे अस्वस्थ करणारा हा मोठा गोंधळ कसला असेल? आम्हाला कांही सुचत नव्हते.

माझी पत्नी पटकन म्हणाली, "मी ललिताला फोन करून विचारते."

"नको, नको." अजय जवळजवळ ओरडला. पुढे त्याने सांगितले, "एवढ्याचसाठी मी फोन केला आहे. दोन चार दिवस कोणीही भारतात कोणाला फोन करायचा नाही आणि तिकडून आला तरी कसली चौकशी करायची नाही. कां ते मी घरी आल्यावर सांगेन. तोपर्यंत टीव्हीवर पहात रहा, पण ते मलासुध्दा फोनवर सांगू नका."

आमच्या मनातले गूढ वाढतच होते. मी लगेच टीव्ही सुरू करून बातम्यांचे चॅनेल लावले. सीएनएन, फॉक्स वगैरे सगळीकडेच मुंबईमधल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याची त्रोटक ब्रेकिंग न्यूज येत होती. पण लगेच पुन्हा अमेरिकेतल्या स्थानिक बातम्या दाखवत होते. आम्हाला त्या नीट समजतही नव्हत्या आणि त्यात स्वारस्यही नव्हते. तरीही मुंबईतली परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिकडच्या बातमीची वाट पहात आम्ही टीव्ही लावून तो पहात बसलो होतो. त्या मानाने बीबीसीवर मुंबईला जास्त वेळ दिला जात होता. आम्ही पहायला सुरुवात केली त्या वेळेपर्यंत बोरीबंदरवरला हल्ला करून आतंकवादी तिथून पसार झाले होते. बातम्यांमध्ये तिथली काही दृष्ये दाखवत होते आणि ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाउस या ठिकाणी ते त्यांच्या निर्घृण कारवाया करत होते. त्याबद्दल फारशी माहिती बाहेर आली नव्हती.

ऑफीसमधून घरी आल्यानंतर अजयने सांगितले की "अशा प्रसंगी टेलीफोन, ईमेल वगैरेंचे स्कॅनिंग चाललेलं असतं आणि भारतातल्या लोकांशी अमेरिकेतून ज्या ज्या कोणी संपर्क साधला असेल ते सगळेच संशयास्पद समजले जातात आणि मग त्यांच्या मागे चौकशीचं झेंगट लागू शकतं." असे त्याला ऑफीसमधल्या कोणीतरी सांगून सावध रहायचा सल्ला दिला होता. त्यामुळे या वेळी केवळ उत्सुकतेपोटी जास्त चौकशा करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे अधिक श्रेयस्कर होते. दक्षिण मुंबईत आमच्या ओळखीचे कोणी रहातच नाही आणि मुंबईच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांनीही या बातम्या टीव्हीवरच पाहिल्या असतील. आम्हाला त्या ठिकाणीचा आँखो देखा हाल कोणाकडून समजण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे आम्हाला भारतामधून कोणाचा फोन आलाही नाही आणि आम्हीही कोणाला फोन करून काही विचारले नाही की सांगितले नाही.

मुंबईतल्या बड्या हॉटेलमध्ये अनेक अमेरिकन नागरिक अडकले असल्याचे जेंव्हा बाहेर यायला लागले तसतसा तिथल्या बातम्यांना देण्यात येणारा वेळ वाढत गेला आणि अमेरिकेतल्या दिवसाअखेरीस (म्हणजे भारतात दुसरा दिवस उजाडला असतांना) सीएनएनवर सतत रनिंग कॉमेंटरी सुरू झाली. आम्हीही त्यानंतर टीव्हीकडे टक लावून ती पहात बसलो. बोरीबंदरवरील हल्ल्यानंतर लगेचच पोलिस मुख्यालयातले तीन बडे अधिकारी त्या जागेच्या जवळपास मारले गेले होते. पण ही बातमी मात्र निदान चार पाच तास जाहीर केली गेली नव्हती. हळू हळू टप्प्याटप्प्याने ती सांगितली गेली तेंव्हा तिच्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या पध्दतीने ती तिकडे सांगितली जात होती त्यावरून अनेक प्रश्न मनात उठत होते. अजूनही त्यांना समर्पक अशी उत्तरे सापडलेली नाहीत.

गेटवे ऑफ इंडियाजवळील मोकळ्या जागेत अनेक वृत्तवाहिन्यांनी तंबू ठोकून ऑब्झर्वेशन पोस्ट बनवलेली दिसत होती. कधी तिथून दिसणारे दृष्य तर कधी त्या वार्ताहरांना दाखवत होते. त्यात अनेक महिला सुध्दा दिसत होत्या. ताजमहाल हॉटेलच्या वेगवेगळ्या भागातून धुराचे प्रचंड लोट उठत होतेच, अनेक वेळा ज्वालांचे लोळसुध्दा स्पष्ट दिसत होते. कुठल्या क्षणी कोणती बातमी आतून बाहेर येईल याचा नेम नव्हता आणि प्रत्येक वार्ताहर ती जाणून घेण्याच्या प्रयत्नात दिसत होता. हे लोक शिफ्ट ड्यूटी करत आहेत की सतत तिथे बसून आहेत हेच कळत नव्हते. जवळजवळ ती अमेरिकेतली संपूर्ण रात्र आम्ही बातम्या पहात जागून काढली. आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकावर रहात असतांनासुद्धा मुंबईत चाललेले हे भयानक थरारनाट्य आम्हाला जागच्या जागी खिळवून ठेवत होते. यावरून प्रत्यक्ष ज्यांच्यासमोर ते उलगडत होते त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करावी.
-----------------

२६ नोव्हेंबर २००८  (उत्तरार्ध)

पुढील जवळजवळ दीड दोन दिवस मुंबईत घडत असलेल्या घटना आम्ही अमेरिकेतल्या अल्फारेटा या गावी घरात बसून श्वास रोखून टीव्हीवर पहात राहिलो. अखेरीस सर्व अतिरेक्यांचा पाडाव झाला, सर्व जागी लागलेल्या आगी विझल्या आणि सर्व जागा व्यवस्थितपणे तपासून त्या पूर्ववत सुरक्षित झाल्याबद्दलची घोषणा करण्यात आल्यानंतर हे खास प्रक्षेपण थांबले. या घटनांमध्ये मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींची, तसेच यातून सहीसलामत सुटलेल्या लोकांची आकडेवारी, त्यातले कोणत्या देशामधले किती होते वगैरेचे तपशील, ते लोक मुंबईला कशासाठी गेले होते वगैरे माहिती देणे, त्यातल्या अमेरिकन नागरिकांबद्दल जास्तच तपशीलवार खुलासे, अनेकांच्या मुलाखती, त्यांच्या भावना, अनेकजणांच्या प्रतिक्रिया आणि इतर अनेकांनी त्यांच्यावर केलेले भाष्य वगैरे आणखी चार पाच दिवस चालले. त्यानंतर भारतातल्या बातम्या येणे कमी कमी होत थांबले, तसे आम्हीही अमेरिकेतल्या टीव्हीवरल्या बातम्या पाहणे बंद केले.

ताजमहाल हॉटेल किंवा ओबेरॉय हॉटेल या जागी त्या वेळी जे लोक मरणाच्या सापळ्यात सापडले होते, त्यांत माझ्या जवळच्या आप्तांपैकी कोणी असण्याची शक्यता नव्हतीच, ओळखीतले कोणी असण्याची शक्यतासुध्दा अगदी कमी होती. प्रत्यक्षातसुद्धा तसे कोणी तिथे नव्हतेच असे नंतर समजले. नोकरीत असेपर्यंत मी काही वेळा या हॉटेलांमध्ये गेलेलो असलो तरी आता भविष्यात कुठल्याच पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे योग दिसत नव्हते. यातल्या कोणत्याही हॉटेलचे शेअर मी विकत घेतलेले नव्हते. नरीमन हाउस किंवा खाबाद हाउस ही नावेदेखील मी कधी ऐकली नव्हती. थोडक्यात सांगायचे तर बोरीबंदर सोडता मुंबईत इतरत्र त्या वेळी घडत असलेल्या घटनांच्या जागांचाही माझ्या व्यक्तीगत आयुष्याशी तेंव्हाही काही प्रत्यक्ष संबंध नव्हता आणि माझ्या जीवनावर त्यांचा काही परिणामही होणार नव्हता. तरीसुध्दा मी त्यात एवढा का गुंतून गेलो होतो?

पण मी पूर्वी पाहिलेल्या असल्यामुळे त्या जागा माझ्या तशा चांगल्या ओळखीच्या होत्या. ताज हॉटेलच्या किबहुना गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात दहा वर्षांहून अधिक काळ माझे ऑफीस होते त्यामुळे त्या भागात माझे रोज जाणे येणे होत होते. मला त्या जागेबद्दल जास्तच आत्मीयता वाटत होती आणि बातम्यांचे मुख्य ठिकाण तेच होते. गेटवेजवळ ज्या ठिकाणी उभे राहून वार्ताहर मंडळी दुरून सारे दृष्य पहात होते तिथे मी स्वतः पूर्वी शेकडो वेळा उभा राहिलो होतो. यामुळे टीव्हीवर दाखवले जाणारे दृष्य मला पटकन समजत होते. या सर्वापेक्षा मोठे कारण म्हणजे दूरदेशी रहात असतांना भारतातल्या, त्यातून मुंबईतल्या व त्यात पुन्हा ओळखीच्या ठिकाणांची दृष्ये पाहण्याची वेगळीच ओढ होती. दुसरे कारण असे होते की यापूर्वी मी होऊन गेलेल्या घटनांची छायाचित्रे बातम्यांमध्ये पाहिली होती, अलीकडच्या काळात काही रेकॉर्डेड व्हीडिओ क्लिप्स पहात होतो, पण क्रिकेट किंवा फूटबॉलसारखे सामने सोडले तर मला त्यापूर्वी कोणतीच महत्वाची घटना प्रत्यक्ष घडत असतांना पहायला मिळाली नव्हती. "युध्दस्य वार्ताः रम्याः" असे म्हणतात. इथे ते प्रत्यक्ष पहायला मिळत होते आणि तेसुध्दा स्वतः मात्र हजारो मैल दूर अगदी सुरक्षित जागी बसून! त्यामुळे ते पहाण्याखेरीज दुसरे काही त्या वेळी सुचत नव्हते अशी परिस्थिती झाली होती. चारपाच दिवसांनी ती पूर्णपणे बदलूनही गेली.

भारतात परत आल्यानंतर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात कुठे ना कुठे २६-११ चा उल्लेख यायचाच. हा क्रम पुढील अनेक वर्षे  चाललेला होता. आधी अनेक दिवस तपास, नंतर खटला भरला जाणे, तो चालतांना रोज न्यायालयात होणारे वादविवाद आणि (हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनसुध्दा) त्यावर राजकारणी आणि इतर प्रसिध्द लोकांच्या टीकाटिप्पण्या वगैरे चाललेले होते, अर्ध्याहून अधिक दिवस ते मुखपृष्ठावर येत होते, क्वचित कधीतरी आतल्या पानांवर यायचे. शिवाय हुतात्म्यांचा होणारा (किंवा काही वेळा न होणारा) गौरव, त्यांच्या नातलगांच्या संबंधातल्या बातम्या, त्यावर त्यांचे अभिप्राय वगैरेंना बरीच प्रसिध्दी मिळत असे. या घटनांमध्ये ज्यांचा बळी गेला त्यातल्या काही जणांनी प्राणपणाने लढत असतांना आधी अतिरेक्यांना मारले होते किंवा त्यांच्यापासून इतर लोकांचे प्राण वाचवले होते. काहीजण लढायला गेले होते, पण प्रत्यक्ष कृती करण्याआधीच स्वतः हताहत झाले होते. इतर बहुसंख्य निरपराध लोक मात्र त्यांना काही समजण्याच्याही आधीच अतिरेक्यांच्या गोळीबाराचे शिकार झाले होते. या सर्वांना सरसकट हुतात्मे म्हणणे कितपत योग्य आहे? पण तसे केले जाते खरे.

जो एक अतिरेकी जीवंतपणे पोलिसांच्या हाती लागला तो जबर जखमी झाला होता. त्याला महत्प्रयासाने बरे कशाला केले? तो अद्याप जीवंत का आहे? त्याला जीवंत ठेवण्यासाठी (किंवा त्याची बडदास्त ठेवण्यासाठी) करदात्यांचा कोट्यावधी रुपये एवढा पैसा का खर्च केला जात आहे? असे प्रश्न विचारून त्या निमित्याने सरकारवर अद्वातद्वा तोंडसुख घेणे हा तथाकथित सुशिक्षित लोकांचा अत्यंत आवडता छंद झाला होता. कोठेही कोणीही चार लोक भेटले की हा विषय निघायचा आणि जो तो यथेच्छ मुक्ताफळे उधळून आपले मन मोकळे करून घ्यायचा. देशाच्या पंतप्रधानापासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सारे प्रवक्ते लोकसभेत किंवा इतरत्र जे सांगत असत ते कोणाही सर्वसामान्य माणसाला मुळी पटायचे नाही. या अतिरेक्यांनी केलेला अतिरेकाचा कहर लोकांच्या मनाला इतका भिडलेला आहे की ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजूनही आलेले नाहीत. मलासुध्दा कोणाचे समर्थन करावेसे वाटत नाही, पण सरकार म्हणजे कोणी एक व्यक्ती नसते आणि ते चालवणारी माणसे अधिकृतपणे गैरकायदेशीर मार्गाने वागू शकत नाहीत. 'अबतक छप्पन' एन्काउंटर्स वगैरे घडत असले तरी ते उघडपणे मान्य करणे किंवा त्यांचे समर्थन करणे कोणालाच शक्य नसते. न्यायालयात ज्या आरोपीला उभे केले जाते, त्यानेच गुन्हा केला आहे हे साक्षीपुराव्याच्या आधारावर सिध्द केले गेल्यानंतर फक्त न्यायमूर्तीच त्याला शिक्षा ठोठावू शकतात आणि पोलिसखात्यातील विशिष्ट हुद्दा धारण करणारी व्यक्तीच त्याची अंमलबजावणी करू शकते.

हा खटला उभा करण्यासाठी जेवढे (कदाचित शेकडो असतील) साक्षीदार आणि (कदाचित हजारो पाने) दस्तऐवज जमवले गेले, त्यात जेवढा वेळ गेला, त्याची गरज होती का? असे सामान्य माणसाला वाटणे साहजीक आहे. एका खुनासाठी एकच फाशी असते आणि अनेक गुन्ह्यासाठीसुध्दा फक्त एकदाच फाशी देता येते. मग इतका मोठा खटाटोप कशाला करायचा? त्यात वेळ आणि पैसा का घालवायचा? मुख्य म्हणजे न्यायनिवाडा करून गुन्हेगाराला शिक्षा करण्यात एवढा उशीर का लावायचा? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पडतात. पण न्यायदानाच्या सध्याच्या व्यवस्थेचा विचार करता कदाचित ते आवश्यक असेल. हे करण्यामागे काही राजकीय उद्दिष्टेदेखील असू शकतात. ती उघड करणे हिताचे नसते.

प्रदीर्घ काळ चाललेला हा खटला अखेर संपला आणि हातात सापडलेल्या एकमेव गुन्हेगाराला अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठावली गेली. तरी त्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी लगेच झाली नाही. तो गुन्हेगार सरकारी खर्चाने बिर्याणी खात जेलमध्येच राहिला होता आणि त्याच्या सुरक्षेसाठी इतका कडक पोलिस बंदोबस्त केला गेला होता की आर्थर रोड जेलचा परिसरच एकाद्या किल्ल्यासारखा दिसत होता. अखेर राजकारणातली सोय पाहून एके दिवशी त्याला अत्यंत गुप्तपणे फांसावर लटकावले गेले आणि या विषयावर पडदा पडला.

तरीसुद्धा सन २००८ मधील २६ नोव्हेंबरच्या घटना आणखी बराच काळ आठवणीत रहाणार आहेत आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल बातम्या येत रहाणार आहेत.
...... संपादन दि. २६-११-२०१८

Tuesday, November 23, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ५ - अंतिम)


माझ्या उजव्या डोळ्यामधला मोतीबिंदू अत्यंत मंद गतीने वाढत होता. सेवानिवृत्त होईपर्यंत त्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडलीच नाही. त्यानंतर मनात एक प्रकारची विरक्तीची भावना निर्माण झाली होती. वर्षभरातच एक मोठे आजारपणही येऊन गेले. त्यात ती भावना वाढीला लागली. "जेवढ्या प्रयत्नसाध्य गोष्टी मला मिळवणे शक्य होते, त्यातल्या बहुतेक सगळ्या मिळून गेल्या आहेत, आता जे काही पदरात पडेल ते गोड मानून आलेला दिवस पुढे ढकलावा, कसला हव्यास धरू नये, आकांक्षा, अभिलाषा वगैरेंना मुरड घालावी" अशा प्रकारच्या विचारांचे ढग मनात जमायला लागले. नियमितपणे डोळ्यांची तपासणी होत होतीच. "उजव्या डोळ्यातला मोतीबिंदू पुरेसा वाढला असल्याने पाहिजे तर आता शस्त्रक्रिया करता येईल, पण ती नाही केली तरी त्यापासून धोका नाही" असे एकदा डॉक्टरांनी सांगितले. डाव्या डोळ्यातला मोतीबिंदू या अवस्थेत येण्यापूर्वीच काढून झाला होता, पण थोडी सावधगिरी, थोडी निश्क्रियता आणि थोडे औदासिन्य यांनी मिळून या वेळी दुसरा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. डोळ्यातला मोतीबिंदू हळू हळू वाढत होता आणि दृष्टीला अंधुक करत होता, तरीही पुढे दरवर्षी याचीच पुनरावृत्ती होत राहिली आणि मी त्या डोळ्याचे ऑपरेशन पुढे ढकलत राहिलो.

दरम्यानच्या काळात मनात विचांरांचे मंथन चाललेले होते. मूळचा चळवळ्या स्वभाव आणि लहानपणापासून त्यावर झालेले प्रयत्नवादाचे संस्कार मला स्वस्थ बसू देत नव्हते. मोकळ्या वेळात काही नवे अवांतर उपद्व्याप सुरू केले आणि त्यांना थोडे फार यश मिळाल्यामुळे आशावादाला फुलोरा येत गेला. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुन्हा किंचित बदलला, त्याला सामोरे जाण्यासाठी वेगळा पवित्रा घेतला गेला. हे सगळे माझ्या कळत नकळत होत होते. क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नवे कोरे पिच असते, ताज्या दमाचा फलंदाज त्यावर खेळतांना धावांचा ढीग जमवण्यासाठी मनसोक्त फटकेबाजी करतो. पण शेवटची पारी खेळण्याची वेळ येईपर्यंत पिच ढेपाळलेले असते, त्यावरून चेंडू अनिश्चित उसळ्या मारतात किंवा वेडेवाकडे वळायला लागतात, खेळाडू थकलेले असतात, कधी कधी थोडे जखमी झालेले असतात. त्यांना कदाचित पहिल्या पारीतल्यासारखा खेळ करता येणार नाही याची जाणीवही असते, पण या वेळी सामना जिंकण्याची जिद्द मनात असते. समोरचे आपले साथीदार एकामागोमाग एक तंबूत परतत असतांनासुध्दा एकादा खेळाडू नेटाने खेळत राहतो. "जीवनातल्या दुस-या इनिंगमध्येसुध्दा असेच खेळायचा प्रयत्न केला, फक्त 'शेवटचा दिस'च नव्हे तर तोपर्यंतचा प्रत्येक दिवस गोड व्हावा यासाठी अट्टाहास धरला तर त्यात काही गैर नाही." असे विचार मनात घर करायला लागले. तसे पूर्वी तिथे जमलेले ढग विरू लागले

या वर्षी डोळ्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टराने पहिल्यासारखा हो किंवा नाही असा मोघम अभिप्राय दिला तेंव्हा मी विचारले, "एक डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला कोणता सल्ला द्याल?"
तो गृहस्थ सकारात्मक विचार करणारा आहे हे मला माहीत होते. त्याने सांगितले, "आता जेंव्हा तुम्हाला सोयिस्कर असेल त्या वेळी ऑपरेशन करून घ्या."
मी याबद्दल विचार केलेला होताच. रक्तदाब आणि मधुमेह हे विकार सध्या आटोक्यात होते, तांत्रिक सल्लागार म्हणून हातात घेतलेली सारी कामे मी मार्गी लावली होती, घरात कोणता कौटुंबिक कार्यक्रम ठरवलेला नव्हता की परदेशगमनाचा बेत आखला होता. थोडक्यात म्हणजे सध्या मी मोकळा होतो आणि परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे दिवाळीची धूमधाम संपल्यावर लगेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायचे ठरवून टाकले आणि ते काम करवून घेतले.

मुंबईतले प्रख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री केकी मेहता यांच्या रुग्णालयात हे ऑपरेशन झाले. फॅकोइमल्सिफिकेशन नावाच्या गुंतागुंतीच्या टेक्निकचा वापर यात केला गेला. त्यांनी सर्वात आधी डोळ्यावरील आवरणाला एक लहानसा छेद घेतला. त्यातून आत भिंगापर्यंत सुई घातली आणि तिच्यातून मोतीबिंदूच्या खड्याला अल्ट्रासॉनिक ध्वनीलहरींचे धक्के देऊन त्याचा चुराडा केला. हा 'मोतीचूर' आणि डोळ्याच्या नैसर्गिक भिंगामधला द्रवपदार्थ पोकळ सुईमधून शोषणाने बाहेर काढला. त्यानंतर एका खास प्रकारच्या इंजेक्शनच्या सुईमधून पारदर्शक कृत्रिम भिंगाची सुरळी डोळ्यात सोडली आणि तिला योग्य जागी फैलावून व्यवस्थित बसवले. हे सारे काम फार फार तर पंधरा मिनिटात झाले असेल.

ऑपरेशन टेबलवर गेल्यानंतर मला शिरेतून एक इंजेक्शन दिले गेले. त्याने मी बोलता बोलता स्वप्नाच्या जगात गेलो. पंधरा वीस मिनिटांनी कोणी तरी मला नावाने हाक मारताच उठून बसलो. तेंव्हा स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले, पण त्या स्वप्नातला कसलाच तपशील मात्र आठवला नाही. अर्धवट गुंगीच्या अवस्थेत असतांना एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे सांगितलेले ऐकत होतो. टेबलावरून उठून खाली उतरलो आणि व्हीलचेअरवर बसलो. मला ढकलत वॉर्डमध्ये नेले. तिथे गेल्यावर व्हीलचेअरवरून उतरून बेडवर जाऊन पडलो. माझी पत्नी तिथे माझी वाट पहात बसली होती. पाच मिनिटात पूर्णपणे जागा झाल्यानंतर कपडे बदलले आणि पत्नीबरोबर टॅक्सीत बसून घरी गेलो. मी नेहमीच बेशुध्द झाल्यासारखा गाढ झोपतो असे घरातले सांगतात. त्यामुळे यावेळी निद्रावस्थेत गेलो होतो की बेशुध्दावस्थेत ते मलाही नक्की सांगता येणार नाही. पण इतक्या झटपट बेशुध्द होणे आणि पुन्हा शुध्दीवर येणे बहुधा कठीण असावे. तेंव्हा ती झोपच असावी.

माझे पहिले ऑपरेशन झाल्यानंतर ज्या गृहस्थांनी मला फोल्डेबल लेन्सबद्दल छेडले होते ते आज कुठे आहेत कोण जाणे. त्यांना शोधून काढून मी आता 'भिंगाचे भेंडोळे (फोल्डेबल लेन्स)' डोळ्यात बसवली असल्याचे सांगावे असे एकदा वाटले. पण आता ती लेन्स 'मल्टीफोकस' आहे का असे ते कदाचित (किंवा नक्कीच) विचारतील.

. . . . . . . . . . (समाप्त)

Saturday, November 20, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ४)

माझ्या ओळखीतल्या एका बहुश्रुत गृहस्थांचे सामान्यज्ञान दांडगे आहे. पण अमेरिकेच्या प्रेसिडेंटपासून कोप-यावरल्या पानवाल्यापर्यंत कोणत्याही माणसाने केलेली कोणतीही कृती चुकीचीच आहे असे सांगून "त्याने असे करण्याऐवजी तसे का केले नाही?" असे विचारायचे आणि त्यांच्याशी वाद घातला तर बारकाव्यात कुठेतरी शब्दात पकडून बोलणा-याला निरुत्तर करायचे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तर न देता टोलवत रहायचे असे मी ठरवले होते. माझ्याशी बोलतांना माझ्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा विषय निघताच त्यांनी विचारले,"तुम्ही आपले ऑपरेशन इथेच कशाला करून घेतलेत?"
त्यांना कारणे सांगण्यात अर्थ नसल्यामुळे मी प्रतिप्रश्न केला, "मग मी ते कुठे करायला हवं होतं?"
"अहो ते मद्रासच्या एका डॉक्टरानं तिथं मोठे नेत्रालय उघडलं आहे ना, ते एकदम बेस्ट आहे म्हणतात."
"आपले राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे लोक तिथंच जातात, तेच ना?"
"हां, तुम्ही तिथंच का नाही गेलात?"
"त्यानं काय झालं असतं?"
"अहो तिथं लेजरनं ऑपरेशन करतात म्हणे."
"म्हणून काय झालं?"
"लेजर म्हणजे एकदम अद्भुत प्रकारचे किरण असतात. तुम्हाला ठाऊक नाही?"
"आहे ना. पण छान सरळ रेषेत कापली जाते म्हणून आता भाजी चिरायलासुध्दा लेजरगन वापरायची का?"
"अहो मी डोळ्याच्या ऑपरेशनबद्दल बोलतोय्."
"मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे त्यात काय काय करतात हो?"
"आधी डोळ्यात वाढलेला मोतीबिंदूचा खडा बाहेर काढतात आणि हल्ली त्या जागी एक कृत्रिम भिंग बसवतात." त्यांनी ऐकीव माहिती सांगितली, पण मला प्रत्यक्ष अनुभव होता.
त्यावर मी विचारले, "बरोबर. यात लेजरचा संबंध कुठे आला?"
ते किंचितसे गोंधळलेले पाहून मी सांगितले, "हे काम करण्यापूर्वी डोळ्यावरल्या आवरणाला एक बारीकशी भेग करायची असते. तेवढ्यापुरता लेजरचा उपयोग होतो."
"तेच तर महत्वाचे आहे ना?" त्यांनी लगेच मोका पाहून विचारले.
"असते ना, पण जुने खराब झालेले भिंग जपून बाहेर काढण्याची पुढची क्रिया जास्त महत्वाची असते आणि नवे भिंग व्यवस्थितपणे बसवणे सर्वात जास्त महत्वाचे असते."
"तुम्ही कसली लेन्स बसवून घेतलीत?" त्यांनी नवा विषय सुरू केला.
"ते सगळं डॉक्टरच ठरवतात."
"म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं सुध्दा नाही का?"
"त्यात काँटॅक्ट लेन्ससारख्या निरनिराळ्या शेड्स, स्टाइल्स किंवा फॅशन्स नसतात. आपल्या डोळ्यात कोणत्या साइझची लेन्स फिट होईल ते डॉक्टरच ठरवतात आणि बसवतात. त्यात ते मला काय विचारणार आणि कसले ऑप्शन्स देणार?"
"म्हणजे तुम्ही साधीच लेन्स बसवलीत की काय?"
"मग फोडणीची बसवायला पाहिजे होती का?" मी वैतागून खवचटपणाने विचारले.
"फोडणीची नाही पण फोल्डेबल का नाही घेतलीत?"
"लेन्ससारखी लेन्स असते, तिला काय होल्डॉलसारखं गुंडाळून ठेवायचंय् की छत्रीसारखं मिटवून ठेवायचंय्? तिची घडी घालायची काय गरज आहे?"
"ते लेटेस्ट टेक्निक आहे. तुझ्या डॉक्टरला माहीत नसेल, नाहीतर तुला परवडणार नाही म्हणून तो बोलला नसेल."
"जाऊ दे. जी फिक्स्ड लेन्स आता माझ्या डोळ्यात बसवली आहे ती कुठे खुपत नाही, तिचा मला कसला त्रास नाही, तिनं मला सगळं काही छान स्पष्ट दिसतंय्. मला एवढं पुरेसं आहे. तुझ्या त्या भिंगाच्या भेंडोळ्यानं आणखी कसला फायदा होणार होता?"
"अहो, लेटेस्ट टेक्निकचा काही तरी लाभ असणारच ना? उगीच कोण कशाला ते डेव्हलप करेल?"
"?"
अखेर त्याने मला निरुत्तर केलेच!


. . . . . . . (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------

Thursday, November 18, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ३)

एकवीसावे शतक आल्यानंतर सेवानिवृत्तीचा दिवस नजरेच्या टप्प्यात आला. पण त्यापूर्वी होत असलेल्या पदोन्नतींच्या सोबतीने कार्यक्षेत्र, अधिकार, जबाबदारी, कामाचा व्याप, त्यातली आव्हाने वगैरेंच्या कक्षा विस्तारत होत्या, आपले कर्तृत्व सिध्द करण्याच्या संधी समोर येत होत्या आणि त्यांचा उपयोग करून घेण्याचे माझे प्रयत्न चालले होते. आयुष्यातल्या अशा महत्वाच्या टप्प्यावरून वाटचाल करतांना सुदृढ शरीराची साथ आवश्यक होती. पण नेमक्या याच वेळी मला डाव्या डोळ्याने अंधुक दिसू लागले. मोतीबिंदूची सुरुवात झाल्यामुळे हा बदल झाल्याचे समजल्यावर त्यावर काही उपाय नाही हे लक्षात आले. डाव्या डोळ्याची दृष्टी हळू हळू मंद होत असली तरी उजव्या डोळ्याने पाहून मी काम करू शकत होतो. दोन अडीच वर्षांनंतर डाव्या डोळ्याची क्षमता निम्म्यावर आली आणि लेखन वाचन वगैरेसाठी ती त्याहूनही कमी झाली. शिवाय मोतीबिंदूने उजव्या डोळ्यातही मूळ धरून विस्ताराला सुरुवात केली. तो डोळाही अधू व्हायला लागला तर मात्र काम करणे कठीण होणार होते.

कृष्णा कामत भेटल्यानंतर दहा वर्षात माझ्या ओळखीतल्या आणखी काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. प्रत्यारोपण केलेल्या नव्या कृत्रिम भिंगाने त्यांना व्यवस्थित दिसत होते. एक दोन लोकांच्या बाबतीत मात्र काही गुंतागुंत झाल्यामुळे नव्या व्याधी उद्भवल्या होत्या. अशा एकाद्या अपवादांमुळे धोक्याची जाणीव होते आणि बहुतेक लोक अजूनही शस्त्रक्रियेमधला धोका न पत्करता मोतीबिंदू परिपक्व होण्याची वाट पहात असत. मला मात्र दोन्ही डोळ्यांमधली दृष्टी एकाच वेळी मंद झाली असती तर कामच करता आले नसते. पूर्वीच्या काळी यावर कसलाही उपायच नसायचा. आपले प्रारब्ध म्हणून ही गोष्ट मान्य करावी लागत असे. पण नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सोयींमुळे परिस्थितीत बदल झाला होता. त्याचा उपयोग करून घेणे आता मला शक्य होते.

यावर मी स्वतः विचार केला, सर्व संबंधितांशी विचारविनिमय केला आणि सर्वतोपरी काळजी घेऊन डाव्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय घेतला. शरीरात इतर कोणती व्याधी नसल्याने फिटनेसचा प्रश्न आला नाही. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेसले आणि अँटीबायॉटिक्सचा कोर्स सुरू करून दिला. दुसरे दिवशी ऑपरेशन टेबलवर गेल्यावर आधी तुलनेने चांगल्या असलेल्या उजव्या डोळ्यावर पट्टी बांधली, डाव्या डोळ्याच्या आजूबाजूचा भाग बधीर केला आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. सर्व वेळ मी संपूर्णपणे भानावर होतो. प्रत्यक्ष सूर्याकडे पहात आहे असे वाटण्यासारखा प्रकाशाचा प्रचंड लोळ डाव्या डोळ्यात उतरला आणि काय दिसते ते मला समजेनासे झाले. कुरकुर, खुळ्ळ असले आवाज कानावर पडत होते. काही मिनिटांनीच माझ्या उजव्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि मला वॉर्डमध्ये पाठवून दिले. डावा डोळा मात्र बंद करून ठेवलेला होता. दर तासातासाने नर्स येऊन तो उघडायची आणि त्यात औषध घालून पुन्हा झाकून ठेवायची असे रात्री झोपेपर्यंत चालले. दुसरे दिवशी सकाळी डॉक्टरांनी तो डोळा तपासला आणि घरी जायची परवानगी दिली. त्याबरोबर वीस दिवस रजा घेण्याची शिफारसही केली.

माझ्या घरातल्यांना ही एक प्रकारची पर्वणीच वाटली असेल, कारण त्यापूर्वी कित्येक वर्षात सलग वीस दिवस मी घरी राहू शकलो नव्हतो. घरी गेल्यावरसुध्दा दोन प्रकारचे टेलीफोन आणि इंटरनेट यांनी मी जगाशी संपर्क साधून होतो, शिवाय घरापासून माझे ऑफीस हाकेच्या अंतरावर असल्यामुळे माझे सहकारी केंव्हाही घरी येऊन मला भेटू शकत होते. त्यामुळे घरी आल्यानंतर दुसरे दिवशीच मी माझ्या अखत्यारीतल्या कामाच्या तांत्रिक बाबतीत लक्ष घालायला सुरुवात केली आणि माझ्याविना कोणताही खोळंबा होणार नाही याची काळजी घेतली. माझ्या गैरहजेरीत घडणा-या घडामोडींची माहिती मला मिळत राहिल्यामुळे त्यात खंड पडला नाही.

आता चोवीस तास मी घरी उपलब्ध असल्याची खात्री असल्यामुळे अनेक आप्तेष्ट मला भेटायला येऊन गेले. त्यांच्याबरोबर निवांतपणे गप्पा मारता आल्या. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नवीन घटना, वेगवेगळे अनुभव कानावर आले, या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या निमित्याने चांगले चुंगले खायची चंगळ झाली, रिकाम्या वेळात माझी आवडती गाणी ऐकायला मिळाली, शरीराला भरपूर विश्रांती मिळाली आणि वीस दिवसांनी नवी दृष्टी घेऊन नव्या जोमाने कामाला लागलो. नको त्या वेळी येऊन दगा देणा-या मोतीबिंदूबद्दल मनात जी घृणा निर्माण झाली होती त्यातला कडवटपणा जरासा कमी झाला.


. . . . . . . (क्रमशः)

Tuesday, November 16, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग २)

एकोणीसशे नव्वदीच्या दशकातला एक प्रसंगः
आमच्या कॉलनीतल्या सरळसोट रस्त्यावरून मी चाललो होतो. रस्त्यात तुरळक रहदारी होती. माझा कॉलेजपासूनचा मित्र कृष्णा कामत समोरून येत असलेला मला दुरूनच दिसला आणि आश्चर्याचा लहानसा धक्का बसला. जन्मजात असलेल्या वैगुण्यामुळे त्याला बालपणीच चष्मा लागला होता आणि त्याचा नंबर वाढत वाढत उणे बारा तेरापर्यंत गेला होता. सोडावॉटरच्या बाटलीच्या तळाशी असते तशा पाच सहा मिलिमिमीटर जाड कांचेच्या भिंगाचा बोजड चष्मा हा त्याच्या चेहे-याचा आवश्यक भाग बनला होता. फारच कमी लोकांनी त्याचा चष्म्याविना चेहेरा पाहिला असेल. पण आज तो चक्क चष्म्याशिवाय अगदी व्यवस्थितपणे रस्त्यावरून चालत येत होता. त्याच्या चालण्यात चाचपडण्याचा किंवा ठेचकाळण्याचा किंचितही भाग दिसत नव्हता. क्षणभर मला ते खरेच वाटले नाही. पण तो माणूस कामतच होता यात जराही शंका नव्हती.

तरुण मुले आणि विशेषतः मुली काँटॅक्ट लेन्स लावून आपले वैगुण्य लपवतात हे मला माहीत होते, पण पन्नाशीकडे झुकण्याच्या वयात कामतला ते करण्याची गरज नव्हती. तसे करण्याची त्य़ाची प्रवृत्तीही नव्हती. शिवाय इतक्या जास्त पॉवरची स्पर्शभिंगे मिळतात की नाहीत याबद्दल मला शंका होती. "होमिओपाथी, आयुर्वेदिक किंवा लेजर तंत्र यांच्या सहाय्याने डोळ्याचा नंबर घालवून देऊ" असा दावा करणा-या जाहिराती मी वाचल्या होत्या, पण त्यावर माझा विश्वास बसला नव्हता की तसे उदाहरण मला प्रत्यक्षात आढळले नव्हते. न जाणो ते कदाचित खरे असेल आणि असा धन्वंतरी या कामताला भेटला असेल असा विचारही एकदा मनात डोकावून गेला.

तोपर्यंत कामत माझ्यापासून चारपाच पावलांच्या अंतरावर येऊन पोचला होता. झपाझप पुढे येऊन त्यानेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अरे, असा काय पाहतो आहेस? मी कामतच आहे."
"पण तुझा चष्मा .... "
"तो गेला, त्याला पार अरबी समुद्रात टाकून दिला." आपल्या शैलीत कामत्याने सांगितले.
"ही जादू कुणी केली?" माझी उत्सुकता वाढत होती
"कुणी नाही. अरे, माझे कॅटॅरॅक्टचे ऑपरेशन झाले ... आणि मला साध्या डोळ्यांनी दिसायला लागले."
माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. बहुतेक लोकांना चाळिशीनंतर चाळशी लागते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तर केवढा जाड भिंगांचा चष्मा लागतो. पण याला आधीपासून असलेली चाळशी चाळिशीमध्ये नाहीशी झाली होती ( वाचण्यासाठी त्यालाही भिंग लागत असणारच) आणि मोतीबिंदू काढल्यानंतरही जाड भिंगांशिवाय याला व्यवस्थित दिसते आहे हा काय प्रकार आहे याचा बोध होत नव्हता. कदाचित त्याच्या पूर्वी असलेल्या चष्म्याचा नंबर उणे बारा अधिक मोतीबिंदूनंतर लागणा-या चष्म्याचे अधिक बारा मिळून शून्य झाले असेल असा गणिती विचार माझ्या मनात आला. अखेर त्यानेच सांगितले, "आता कॅटॅरॅक्ट ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यात रिकाम्या झालेल्या जागी कृत्रिम लेन्स बसवून देतात. त्या लेन्समधून छान दिसायला लागते." हा शोध भारतात येऊन पोचला होता, पण मला माहीत नव्हता.
ऑपरेशननंतर नवे भिंग बसवतांना मूळच्या चष्म्याच्या नंबराला त्यात अॅडजस्ट करत असतील हा विचार मात्र मनात तसाच ठाण मांडून बसला होता तो अनेक वर्षे तसाच राहिला.

. . . . . . . (क्रमशः)

Monday, November 15, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे

एकोणीसाव्या शतकातल्या पन्नाशीत मी नुकताच शाळेला जायला लागलो होतो त्या काळात क्वचित कधी एक म्हाता-या सोवळ्या बाई आमच्याकडे यायच्या. कंबरेमध्ये काटकोनात वाकलेल्या त्या आजींच्या दोन्ही डोळ्यांमधला मोतीबिंदू भरपूर वाढला होता. त्यामुळे पांढुरकी झालेली त्यांची बुबुळे पाहून मुले त्यांना घाबरत असत. त्या काळात गांवोगांवी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांची शिबिरे भरत नव्हती. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निदान मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमध्ये जावे लागत असे, पण तिथे जाण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नव्हती. सर्व्हिस मोटर नावाच्या बेभरोशाच्या खटा-यात बसून पन्नास किलोमीटर अंतरावरले कुडची स्टेशन गाठायचे आणि तिथे दिवसातून एक दोनदाच अवेळी येणा-या एमएसएम रेल्वेच्या मीटरगेज गाडीची वाट पहात तिष्ठत बसायचे. ती आल्य़ानंचर कसेबेसे गर्दीतून घुसायचे आणि मिरजेला जायचे. अत्यंत गरजू लोकच नाइलाजाने असले दिव्य करत असत. त्या आजींच्या घरी आणखी कोण कोण होते ते आता मला आठवत नाही, पण त्यांना ऑपरेशनसाठी मिरजेला घेऊन जाण्याची कोणाची तयारी नसावी किंवा त्यांना हा प्रवास झेपणार नाही असे त्यांना वाटत असावे. आपल्या क्षीण झालेल्या दृष्टीसाठी त्या कधी दैवाला दोष लावत किंवा आणखी भलते सलते दृष्टीला पडू नये म्हणून परमेश्वरानेच दिलेली दृष्टी तो काढून घेतो आहे असे त्या विषण्णपणे म्हणत असत. त्यांचे मोतीबिंदू अखेरपर्यंत त्यांच्या डोळ्यांमध्ये राहिले आणि ते डोळे क्षीण होत होत एकदिवस कायमचे मिटून गेले. मोतीबिंदू या गोंडस वाटणा-या नावामागील हे विदारक सत्य मला त्या वृध्देच्या डोळ्यांध्ये पहिल्यांदा दिसले.

एकोणीसशे ऐंशीच्या घरात असतांनाची गोष्ट. त्या काळात माझी आई आमच्याकडे रहात होती. एकदा तिला चष्मा लावूनसुध्दा पोथी वाचतांना बरेच वेळा अडखळतांना पाहिले. पण तिने त्याचा काहीच उलगडा केला नाही. सहज बोलता बोलता खिडकीतून समोर दिसणा-या इमारतीच्या कठड्यावर बसलेल्या पक्ष्याबद्दल विचारले, पण तिला तो पक्षी तर नाहीच, पण बाल्कनी आणि कठडासुध्दा नीट दिसत नव्हता असे तिच्या उत्तरावरून माझ्या लक्षात आले. मग मात्र मी तिला नेत्रतज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांनी तिचे डोळे तपासले आणि दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाला असल्याचे सांगितले. तो परिपक्व झाल्यावर लगेच काढला नाही तर तिची दृष्टी गमावून बसण्याचा धोका असल्याचे सांगितले आणि जास्त वाट न पाहता आताच ऑपरेशन करून घ्यावे असे सुचवले. काहीशा अनिच्छेनेच आई ऑपरेशन करून घ्यायला तयार झाली.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक असलेली तिच्या शारीरिक आरोग्याची तपासणी सुरू झाली. माझ्या आईला खूप पूर्वीपासून दम्याचा विकार होता. थोडा निसर्गोपचार, थोडे घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक औषधे यांच्या आधारावर ती दम्यावर नियंत्रण ठेवत असे. अगदीच आणीबाणी आली आणि आवश्यकता पडली तरच ती डॉक्टरांकडे जात असे. पण ही वैद्यकीय तपासणी सुरू झाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या औषधांचे प्रयोग तिच्यावर सुरू केले आणि त्यांच्या दृष्टीने तो आटोक्यात आणला असे वाटल्यानंतर दंतवैद्याकडे पाठवून दिले. सत्तरी गांठेपर्यंत आईच्या सर्व दाढा निखळून गेल्या होत्या, समोरचे थोडे दात शिल्लक असले तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. त्यांचा चर्वणासाठी उपयोग होत नव्हता. ऑपरेशन करण्याआधी ते दात काढून टाकावे लागतील असे दंतवैद्याने सांगितले. सगळे दात काढल्यानंतर कवळी बसवून व्यवस्थित जेवण करता येईल हा फायदाही दाखवला. नको नको म्हणत निरुपाय म्हणून अखेर आई त्याला तयार झाली. एका दिवशी फक्त एकच दात काढायचा आणि ती जखम बरी झाल्यानंतर दुसरा दात काढायचा असे धोरण असल्यामुळे त्यात बरेच दिवस गेले. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची संख्या बरीच असल्यामुळे आणि घाई करण्याची गरज नसल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी पुढच्या महिन्यातली तारीख मिळाली.

ऑपरेशन चालले असतांना आणि त्यानंतर त्याची जखम बरी होईपर्यंत शिंक, ठसका, खोकला, उलटी, उचकी अशा कोणत्याही क्रियेने धक्का बसू नये याची काळजी घ्यावी लागणार होती. या दृष्टीने आईला तीन दिवस आधीच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले आणि औषधे, वाफारे, इंजेक्शने, थेंब वगैरेंच्या सहाय्याने तिच्या शरीराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याशिवाय तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरेंची मोजणी रोज सकाळ संध्याकाळ केली जात असे. त्यापूर्वी ती कधीच अशा प्रकारच्या इस्पितळात राहिली नव्हती. त्यामुळे तिथल्या वातावरणानेच ती भांबावून गेली होती. ऑपरेशन होऊन वॉर्डमध्ये परत आल्यानंतर डोके स्थिर ठेऊन उताणे पडून राहण्याची आज्ञा झाली. असे आढ्याकडे पहात तास न् तास निश्चलपणे पडून राहणे तिला अशक्यप्राय वाटत असणार. असामान्य सोशिकपणामुळे ती तक्रार करत नव्हती, पण जे काही चालले आहे ते तिच्या मनाविरुध्द असल्याचे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होत होते.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दहा पंधरा दिवस रोज डोळ्यात मलमे आणि थेंब घालणे चालले होते. त्यानंतर तपासणी होऊन ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगितले गेले. एक नेहमीच्या वापरासाठी आणि दुसरा वाचन करण्यासाठी असे दोन जाड भिंगांचे चष्मे आणले. त्यांच्या सहाय्याने आता आईला नवी स्पष्ट दृष्टी मिळाली होती. पण थोड्या दिवसांनी तिने आपला मुक्काम मोठ्या भावाकडे हलवला. त्यानंतर या नव्या दृष्टीचा किती उपयोग तिने करून घेतला आणि त्यातून तिला किती आनंद प्राप्त झाला याचा जमाखर्च कांही मला मांडता आला नाही. आमच्या दुर्दैवाने वर्षभरातच ती आम्हाला सोडून गेली. आपल्या मंद होत गेलेल्या दृष्टीबद्दल तिची तक्रार नव्हती आणि त्या अवस्थेत हा वर्षभराचा काळ तिने तिच्या मर्जीनुसार वागून कदाचित जास्त आनंदाने काढला असता असेही वाटायचे. पुढे घडणा-या गोष्टींची आधी कल्पना नसते आणि त्यांची चाहूल कधी लागेल याचाही काहीच नेम नसतो. कदाचित आईला ती लागली असल्यामुळे ती सारखा विरोध करत असेल. आपल्याला नक्की काहीच माहीत न झाल्यामुळे या जरतरला काही अर्थ नसतो एवढेच खरे.

. . . . . . . (क्रमशः)

Thursday, November 04, 2010

दिवाळीतला किल्ला


कल्पकता आणि निर्मितीची आवड या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सगळ्या माणसांना जन्मजात मिळतात. बहुतेक लहान मुलांमध्ये त्या दिसून येत असतात, पण "इथे पसारा मांडू नकोस, गोंधळ करू नको" असे आदेश देत आणि "लागेल, इन्फेक्शन होईल, आजारी पडशील" अशी भीती दाखवून बरेचसे आईवडील, विशेषतः माता त्या गुणांना दडपून टाकतांना पाहून मला त्यांची कीव करावीशी वाटते. सुदैवाने माझ्या लहानपणी मला असले काही ऐकावे लागले नाही. तसे आमचे कुटुंब अत्यंत बाळबोध होते आणि धार्मिक परंपरा पाळण्याबद्दल कसलीही तडजोड चालत नसे. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत करण्याच्या कामात एक शिस्त असायची. पण ती करून झाल्यानंतरही भरपूर मोकळा वेळ मिळत असे आणि तो सर्वस्वी आपला असायचा. मुले काय करताहेत यावर घरातल्या मोठ्या माणसांचे लक्ष असले तरी त्यात त्यांची अडकाठी नसायची. त्यात कुठे खरचटले, चटका बसला, बोट कापले, कपडे मळले, अंग घाण झाले असे व्हायचे. तरीही "नसते उपद्व्याप कशाला करायला गेला होतास?" असे विचारून त्यासाठी पाठीत धपाटा घातला जात नसे. असल्या उद्योगातून काही निष्पन्न झाले तर त्याचे कौतुकदेखील होत असे.

दिवाळीमध्ये करायचा किल्ला म्हणजे आमच्या निर्मितीक्षमतेचा परमोच्च बिंदू असे कदाचित म्हणता येईल. त्याची तयारी वर्षभर चालत असे. त्या काळात असल्या हौसेच्या कामाचे शाब्दिक कौतुक होत असले तरी त्यासाठी दिडकीचीसुध्दा आर्थिक मदत मिळत नसे. घरात किंवा आसपास उपलब्ध असलेला कच्चा माल वापरूनच जे काही करायचे ते करावे असा अलिखित नियम होता. रिकाम्या काडेपेट्या, खोके, डबे, बाटल्या, फ्यूज झालेले बल्ब असल्या टाकाऊ वस्तू गोळा करून आम्ही मुले त्यांना अडगळीच्या खोलीत ठेवत असू आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यावर विचारचक्र सुरू होत असे. दिवाळीच्या आठवडाभर आधी त्या बाहेर काढून किल्ल्याच्या रचनेला प्रत्यक्ष सुरुवात होत असे.

आमचे घर पूर्णपणे दगडमातीचे होते. घरातली जमीन, भिंती, माळवद सारे काही मातीपासून बनवलेले होते. घराबाहेर तर जिकडे तिकडे मातीच माती असायची. त्यामुळे या पहिल्या पंचमहाभूताला बराच मान होता. मला तरी कधीच मातीबद्दल घृणा वाटली नाही. किल्ला तयार करण्यासाठी आधी दगड, माती, विटा वगैरे जमवून त्याचा ढीग रचायचा. दगडविटा जोडून मातीच्या चिखलाने त्यांना लिंपून घेऊन त्यातून हवा तसा आकार निर्माण करायचा. डोंगर, गडकोट, सपाट जमीन, पाण्याचे तळे वगैरे भूभाग तयार झाल्यानंतर त्यावर घरे, बंगले, रस्ते, वाहने, माणसे वगैरेंनी त्याला सजवायचे. दिवाळी सुरू होईपर्यंत जेवढा वेळ मिळेल तितका वेळ हे काम चालत असे. आपल्या संग्रहातली सारी चित्रे व खेळणी त्यावर मांडत असू. या किल्ल्याला स्थळकाळाचे बंधन नसायचे. कमळातल्या लक्ष्मीपासून महात्मा गांधींपर्यंत कोणत्याही देवदेवता व ऐतिहासिक व्यक्ती आणि हत्तीघोड्यापासून (न उडणा-या) विमानापर्यंत कोणतेही वाहन त्यात येत असे. त्यांच्या आकारमानात प्रमाणबध्दता किंवा रचनेत सुसंगती असण्याचा प्रश्नच नव्हता.

शाळेत असेपर्यंत आम्ही दरवर्षी दिवाळीला किल्ला बनवत होतो. त्यानंर ही प्रथा खंडित झाली ती झालीच. माझी मुले लहान असतांना ऑफीसला जाण्यायेण्यातच सारा दिवस संपून जात असल्याने मला वेळच नव्हता आणि कॉस्मोपोलिटन वस्तीत रहात असतांना इतरांकडेही किल्ला बनतांना दिसत नसल्यामुळे मुलांनीही त्याची मागणी केली नाही. आता पन्नास वर्षांनंतर यावर्षी पुन्हा एकदा किल्ला बनवायची संधी मला मिळाली. पुण्याला अजूनही मराठी संस्कृतीचा थोडा स्पर्श असल्यामुळे कुठून तरी माझ्या सात वर्षाच्या नातींना किल्ल्याचा सुगावा लागला आणि आपल्याकडे तो हवा असा हट्ट धरला. आजच्या पध्दतीनुसार किल्ला कुठे (तयार) मिळतो, त्याचे प्रदर्शन लागले असेल वगैरे वेगळ्या वळणाने चर्चा चालली असतांना चिमुरडी ईरा ठामपणे म्हणाली, "असा बाजारातून किल्ला विकत आणला तर त्यात आपलं काय आहे?"
लगेच तिची तळी उचलून धरत मी म्हणालो, "बरोबर बोललीस. आपण मिळून घरी किल्ला तयार करूया."

दिवाळीला जेमतेम दोनतीनच दिवस उरले असल्यामुळे त्या कामाची सुरुवात तत्परतेने करणे आवश्यक होते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातल्या फ्लॅटमध्ये दगड, माती, विटा, वाळू असले पदार्थ आणणे म्हणजे अब्रह्मण्यम्. थर्मोकोलपासून पर्यावरणाला असलेल्या धोक्यामुळे तोही नकोच. फक्त कागद, पुठ्ठे वगैरेंपासून जे काही करता येईल तेवढे करायचे ठरवले. लहानपणच्या संवयीनुसार घरातले रिकामे खोके, डबे, बाटल्या वगैरे टाकाऊ वस्तू जमवल्या, चित्रकलेसाठी आणि प्रिंटरसाठी आणलेले कागद घेतले. कात्रीने कापायचे आणि गोंदाने किंवा चिकटपट्टीने त्यांना जोडायचे असे करत किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, कमान, राजवाडा वगैरे सगळे भाग बनवून त्याला किल्ल्याचा आकार दिला. स्केचपेन आणि रंगीत खडूने त्यांना रंगवून टाकले. पाहता पाहता किल्ला तयारही झाला.

वयोमानाप्रमाणे अधू होत चालेली दृष्टी, थरथरणारी बोटे आणि त्यात पूर्ण ताळमेळ नसणे वगैरेंमुळे आमच्या किल्ल्याला सुबकपणा आला नसेल. ईशा इरा तर असली कामे पहिल्यांदाच करत होत्या. त्यांच्याकडून कौशल्याची अपेक्षा नव्हती. पण आजकालच्या एका जाहिरातीत येते त्याप्रमाणे "टेढा है, पर मेरा है।" या भावनेने आम्ही सारे या किल्ल्यावर खूप खूष आहोत.