Thursday, April 28, 2011

तेथे कर माझे जुळती - ७ (उत्तरार्ध) - पं.शिवानंद पाटील



हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले कलाकार आपले उस्ताद, गुरू किंवा एकाद्या बुजुर्ग व्यक्तीच्या नावाचा उच्चार करतांना एका हाताने आपला एक कान पकडतात. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे हा या परंपरागत प्रथेमागील उद्देश असतो. "माझ्या गाण्यात जेवढे चांगले दिसेल ते सारे माझ्या गुरूने मला शिकवले आहे आणि चुकीचे किंवा खराब असे सगळे माझे स्वतःचे आहे." असे बरेचसे कलाकार मंचावरून म्हणतात, पण त्यांच्या एरवीच्या बोलण्यातल्या आत्मप्रौढीवरून त्यांचा मानभावीपणा दिसून येतो. शिवानंद पाटील मात्र जेवढ्या उत्कट भावनेने त्यांच्या गुरूंबद्दल स्टेजवरून बोलत असत, तेवढाच आदरभाव त्यांच्या खाजगीतल्या बोलण्यातसुध्दा प्रकट होत असे.

त्यांचे पूर्वीचे गुरू इचलकरंजीचे पं. दत्तात्रेय विष्णू काणे (काणेबुवा) यांच्या वयाची ७५ वर्षे झाल्याचा महोत्सव त्यानिमित्य एक मोठा संगीताचा कार्यक्रम आयोजित करून शिवानंदांनी दादरला घडवून आणला. सांगली कोल्हापूरकडे रहात असलेल्या काणेबुवांच्या शिष्यपरिवाराचा मेळावा त्या ठिकाणी भरवला आणि त्यांचे गायन मुंबईकरांना ऐकवले. पं.काणेबुवांबद्दल आपल्या मनातला आदर शिवानंदांनी या शब्दात सांगितला, "अधिकार माझा काही न पाहता पायी ठेवले । पायी ठेविले गुरूने मज धन्य केले ।।"

पं.डॉ.बसवराज राजगुरू यांचा स्मृतीदिन शिवराज आणि योजना पाटील १९९२-९३ पासून दरवर्षी साजरा करत आले आहेत. त्या निमित्याने दरवर्षी कर्नाटकातील एकाद्या मोठ्या गायक कलाकाराच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला जात आला आहे. शिवानंद स्वतःसुध्दा आपल्या गुरूला तन्मयतेने आदरांजली वाहत. तनमनधन समर्पण करण्याचा भाव त्यात दिसून येत असे. स्व.गंगूबाई हनगल यांच्या वयाचा विचार करून त्यांना प्रवासाची दगदग होऊ नये या विचाराने एकदा हा कार्यक्रम बेळगावात ठेवला गेला. आपली कन्या कृष्णाबाई यांच्याबरोबर गंगूबाई त्या समारंभाला आल्या आणि गायल्यादेखील. जवळच्या नातेवाइकाच्या आगमनाने जो आनंद वाटेल तसा आनंद आणि आपुलकी या लोकांच्या भेटण्यामध्ये मला दिसली. बाहेरगावाहून बेळगावला गेलेल्या प्रत्यकाची ते स्वतः खूप आपुलकीने विचारपूस करत होते आणि त्यांची कसलीही गैरसोय होणार नाही याची खातरजमा करून घेत होते.

शिवानंदांची आणि माझी ओळख झाली त्या वेळी ते रेल्वेमध्ये नोकरी करत होते. नोकरी सांभाळून संगीताची सेवा करीत त्यांनी त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. संगीतासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून पुढे त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या क्षेत्रात त्यांची प्रगती होत गेली. संगीताच्या क्षेत्रात सर्वाधिक मानाचे स्थान लाभलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह इतरही अनेक मोठ्या संमेलनांमध्ये त्यांचे गायन झाले. संगीत रंगभूमीवरही त्यांनी काही नाटकातून भूमिका केल्या. शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत या दोन्ही क्षेत्रांमधील बक्षिसे आणि मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या गायनाच्या कॅसेट्स, सीडी निघाल्या. पं.दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला.

हे सगळे असले तरी त्यांना अपेक्षित होते किंवा व्हायला हवे होते तेवढे त्यांचे कार्यक्रम प्रत्यक्षात होत नव्हते. महागाईबरोबर वाढत जाणारे सर्वच खर्च आणि पैसे खर्च करून शास्त्रीय संगीत ऐकायला येणा-या श्रोत्यांमध्ये होत असलेली घट यांचे गणित जुळत नव्हते. कमी मानधन घेणे परवडत नाही आणि जास्त उत्पन्न देणारे कार्यक्रम होतच नाहीत असे होऊ लागले. संगीताच्या शिकवण्या करून त्यातून कमाई करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण कलाकार आणि शिक्षक या दोन गोष्टींसाठी वेगळे गुण लागतात. उत्कृष्ट कलाकार आपली कला तितक्याच चांगल्या शिष्यालाच शिकवू शकतो, सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्याकडून त्याच त्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी घटवून घेणे त्याला आवडत नाही. त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षकाला स्वतः मैफिल गाजवता येतेच असे नाही, त्यासाठी प्रतिभेचे देणे अंगात असावे लागते. काही अद्वितीय कलाकारांमध्ये दोन्ही प्रकारचे कौशल्य असते, त्यांचा मोठा शिष्यपरिवार तयार होते. शिवानंदांच्या बाबतीत ते झाले नाही. कदाचित त्यांना होतकरू आणि कष्टाळू असा शिष्य लाभला नसावा. हेसुध्दा एक प्रकारचे नशीबच असते.

मराठी रंगभूमीवर एका काळी संगीत नाटकांनी राज्य गाजवले असले तरी आता त्याचे दिवस राहिले नाहीत. काही चांगल्या नाटकात शिवानंदांनी भूमिका केल्या, पण त्याचे जास्त प्रयोग झाले नाहीत. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबध्द करून अजरामर केलेली बहुतेक नाट्यगीते मी मूळच्या नाट्यकलावंतांकडून ऐकली आहेत, त्यातील काही गीते अभिषेकीबुवांच्या तोंडूनसुध्दा एकली आहेत. त्यातली काही गाणी, विशेषतः कट्यार कालजात घुसली या नाटकातील गाणी शिवानंद गात असे तेंव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असे. काही वर्षांपूर्वी साक्षात लता मंगेशकर आणि पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शतजन्म शोधतांना हे नवे संगीत नाटक रंगभूमीवर आले होते. शिवानंदांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. ते नाटक चांगले असूनसुध्दा दुर्दैवाने व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी ठरले.

संगीतक्षेत्रातील कलाकारांमध्ये अनुकरणक्षमता आणि नवनिर्मितीक्षमता असे दोन निरनिराळे गुण आढळतात. शिवानंदांकडे दोन्ही होते, पण पहिला जरा जास्त प्रभावी असावा. गुरूंकडून शिकलेली गीते आणि बंदिशी ते स्वतःच्या गानकौशल्याने बहारदार फुलवून त्याना खूप उंच पातळीवर नेत असत. अनेक अभंगांना त्यांनी स्वतः चाली लावल्या. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्य ते अभंगवाणी किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करत असत. त्या वेळी ऐकतांना त्यांनी लावलेल्या चालीसुध्दा गोड वाटत असत. पण अजित कडकडे किंवा सुरेश वाडकर यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका जशा घरोघरी दिसतात तशा शिवानंदांच्या दिसत नाहीत.

अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या संवेदनशील मनाला ती लागली असणार. दोन वर्षांपूर्वी गंगूबाई निवर्तल्या त्या वेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवानंद हुबळीला गेले असतांना त्यांना एक अपघात झाला आणि त्यात अंतर्गत इजा झाल्या. कदाचित त्या वेळी त्यांचे गंभीर स्वरूप लक्षात आले नसावे, पण कालांतराने त्यापासून त्रास होऊ लागला. तो जास्त वाढला की त्यावर उपचार आणि विश्रांती घ्यायची आणि कमी झाला की पुन्हा जोमाने कामाला लागायचे असे चालले होते. गेल्या वर्षी बसवराज राजगुरू स्मृतीदिन त्यांनी पुण्याला साजरा केला त्यावेळी त्यात गायनसुध्दा केले. त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो, पण त्यांना झालेल्या अपघाताची आणि त्यातून उद्भवलेल्या आजाराची आम्हाला त्यावेळी माहितीसुध्दा मिळाली नव्हती. पण वर्षअखेर तो आजार बळावला आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवले होते. तिथून ते बरे होऊन परत आले असे ऐकले होते.
एप्रिलमध्ये चेंबूरला होणार असलेल्या अल्लादियाखाँ संगीत महोत्सवात यावर्षी त्यांचे गायनसुध्दा ठेवले होते. पण २१ तारखेला झालेल्या उद्घाटनाच्या दिवशीच ते रहीत झाल्याचे समजले. त्याबद्दल जास्त तपशील कळण्याच्या आधीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी येऊन थडकली. ते मरोळला रहायला गेल्यापासून नेहमी आम्हाला त्यांच्या नव्या घरी येऊन जाण्याचे आमंत्रण देत होते आणि आम्हीसुध्दा जरूर येऊ असे म्हणत आलो होतो, पण ते काही जमले नाही आणि प्रत्यक्षात गेलो तेंव्हा साश्रु नयनांनी त्यांच्या तसबिरीपुढे हात जोडावे लागले.

Tuesday, April 26, 2011

तेथे कर माझे जुळती - ७ (पूर्वार्ध) - पं.शिवानंद पाटील



या लेखमालिकेमधील पहिली दोन पुष्पे मी दोन जगद्वंद्य प्रख्यात व्यक्तींना समर्पित केली होती. त्यांच्या सहवासाचे अगदी मोजके क्षण मला प्राप्त झाले होते पण ते माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेले होते. त्यानंतर फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या पण माझ्या जीवनावर परिणाम करणा-या माझ्या जवळच्या परिचयातल्या तीन व्यक्तींविषयी मी लिहिले होते. जिला बरीच प्रसिध्दीही मिळाली आणि बरीच वर्षे थोडे जवळून पहाण्याची संधी मला मिळाली अशा एका खास व्यक्तीबद्दल मी आज या भागात लिहिणार आहे. त्यांचे नाव पं.शिवानंद पाटील. खरे तर त्यांच्याबद्दल चांगली तयारी करून खूप सविस्तरपणे लिहावे अशी माझी इच्छा होती. त्याच्याही आधी त्यांना खूप मोठे होतांना पहावे असेही मला वाटत होते, पण दैवाला ते मंजूर नव्हते. त्याने अचानक घाला घालून शिवानंदांना आपल्यातून ओढून नेले. त्यामुळे आता सुन्न झालेल्या मनःस्थितीमध्ये मला त्यांच्याबद्दल सुचेल तसे लिहीत आहे.

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी पुणे मुंबई महामार्ग झाला नव्हता. रेल्वेने पुण्याला जाण्यासाठी आम्ही दादर स्टेशनला गेलो. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे पोचायला थोडा उशीरच झाला. डेक्कन एक्सप्रेस सुध्दा तशी उशीरानेच निघाली होती, पण आम्ही तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर पोचेपर्यंत ती चालली गेली. कोयना एक्सप्रेससाठी दोन तास थांबावे लागणार होते आणि पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे तिच्या वेळेबद्दल अनिश्चितताही वाढत होती. थोड्या वेळाने बंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली. पुण्याला जाऊ इच्छिणारे आमच्यासारखे खूप लोक प्लॅटफॉर्मवर उभे होते. ते सगळे गाडीत शिरले म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही सुध्दा समोर आलेल्या डब्यात चढलो. त्या काळातले प्रवासी थ्री टायर स्लीपरच्या डब्यात थेट आतपर्यंत घुसून बसण्याएवढे निर्ढावले नव्हते. आम्ही लोक दोन दरवाज्यांमधल्या जागेत अंग चोरून उभे होतो. रखडत रखडत गाडी कल्याणला आली. त्या स्टेशनावर प्रवाशांचा मोठा लोंढा डब्यात घुसायच्या तयारीत असलेला पाहून आमच्या सहप्रवाशांनीच आम्हाला आतल्या बाजूला ढकलले.

तिथे बसलेल्या प्रवाशांना बाहेरची परिस्थिती दिसत होतीच. त्यातल्या एका सुस्वभावी तरुण जोडप्याने थोडे सरकून आपल्या बाकावर आमच्या मुलांना बसवून घेतले. त्या दोघांनाही आम्ही दूरदर्शनवर पाहिले होते. अलकाने त्यांना लगेच ओळखले, पण उपचार म्हणून "तुम्ही शिवानंदच ना?" असे विचारले. पं.शिवानंद पाटील आणि योजना शिवानंद यांची पहिली ओळख अशी ध्यानीमनी नसतांना निव्वळ योगायोगाने झाली. त्या दिवशी पावसामुळे रेल्वेमार्गात अनेक अडथळे आले होते, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, आमची गाडीसुध्दा अत्यंत कूर्मगतीने हळूहळू सरकत रात्री पुण्याला जाऊन पोचली. शिवानंद आणि योजना यांना बंगळूरूपर्यंत जायचे होते. पुण्यापर्यंत आम्हाला एकमेकांचा सहवास मिळाला आणि वेळ काढण्यासाठी आम्ही अधून मधून बोलत राहिलो.

पं.बसवराज राजगुरू, स्व. गंगूबाई हंगल, स्व.जितेंद्र अभिषेकी, पं.काणेबुवा, पं.यशवंतबुवा जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांकडे शिवानंदांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. आम्ही त्या महान संगीतज्ञांना प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर पाहिले होते, त्यांचे गायन ऐकले होते आणि त्यांच्याबद्दल भरपूर वाचले किंवा ऐकले असल्यामुळे त्यांची नावे सुपरिचित होती. त्यांच्या विषयी शिवानंद आणि योजना जे काही सांगतील त्याचा संदर्भ आम्हाला लागत होता आणि संवाद सुरू ठेवण्यासाठी आम्हीही त्यांच्याबद्दल एकादा शब्द बोलू शकत होतो. अलकाने ज्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतले होते ते फारसे प्रसिध्द नसले तरी संगीताच्या क्षेत्रातले लोक त्यांना ओळखत असावेत. त्यांना आपण ओळखत असल्याचे शिवानंद सांगत होते. कदाचित ते खरोखरच ओळखत असतीलही किंवा कदाचित आम्हाला बरे वाटावे म्हणून ते तसे सांगत असतील. याबद्दल जास्त खोलात जाण्याची आम्हाला गरज नव्हती.

शिवानंदांच्या बोलण्यात कानडी हेल येत असल्याचे माझ्या लगेच लक्षात आले होते. त्यामुळे मी तसाच हेल काढून कानडीमध्येच त्यांचे गाव विचारले. ते माझ्या गावाच्या शेजारच्याच तालुक्यातले निघाले. म्हणजे आम्हा दोघांचे बालपण एकाच प्रदेशात आणि एकाच प्रकारच्या संस्कृतीमध्ये गेले होते. आता आम्हाला बोलायला आणखी बरेच विषय मिळाले. मात्र शिवानंदांचा जन्म होण्यापूर्वीच मी तो भाग सोडून मुंबईला आलो होतो आणि माझ्या लहानपणी मला शास्त्रीय संगीताचा गंधसुध्दा नव्हता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मला माहीत नसलेले काही वेगळे आले की आमच्या काळातली गोष्ट जरा वेगळी होती असे म्हणायला मी मोकळा होतो. आम्हाला कानडीत बोलतांना पाहून आमच्या अर्धांगिनींना आधी थोडे कौतुक वाटले असेल, पण त्यांना काही शंका येऊ नयेत म्हणून आम्ही आपापल्या स्टाईलच्या मराठीवर येऊन सर्वांना समजतील अशा विषयांवर बोलू लागलो. त्या अर्ध्या दिवसात आमचे धागे चांगले जुळले आणि मुंबईला परत आल्यावर एकमेकाना संपर्क करायचा असे ठरवूनच आम्ही त्यांचा निरोप घेतला.

आम्हाला मनातून पुन्हा त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होतीच. पण लवकरच त्यासाठी एक कारण मिळाले. अणुशक्तीनगरच्या वसाहतीमध्ये स्वरमंडल नावाची एक सांस्कृतिक संस्था स्थापन करण्यात आमचाही खारीचा वाटा होता. त्याच्या तत्कालीन कार्यकारी मंडळावर असलेल्या मंडळींशी माझी चांगली मैत्री होती. त्यांनी कर्नाटकातल्या एका सुप्रसिध्द गवयाच्या गायनाचा कार्यक्रम ठरवला होता, पण काही अडचणींमुळे तो येणार नसल्याचे फक्त दोन तीन दिवस आधी समजले. कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने बरीचशी तयारी झालेली असल्यामुळे तो रद्द करणे ही संस्थेच्या दृष्टीने नामुष्कीची आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीची गोष्ट होती. आयत्या वेळी काय करावे या विचारात ती मंडळी आहेत हे समजल्यावर आम्ही पुढाकार घेतला आणि त्या दिवशी पं.शिवानंदांना वेळ आहे का याची विचारणा केली. त्यांना वेळ आहे हे समजल्यावर तडकाफडकी संयोजकांना सांगितले आणि स्वरमंडळात त्यांचा कार्यक्रम ठरूनही गेला. ते जोडपे त्यांच्या साथीदारांसह आधी आमच्या घरी आले आणि ताजेतवाने झाल्यानंतर त्यांना सभागृहाकडे नेण्याची व्यवस्था केली गेली. या भेटीत आमचा परिचय जास्तच दृढ झाला. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात शिवानंद अप्रतिम गायले आणि दुस-या कोणा बड्या गवयाचा कार्यक्रम आधी ठरला होता हे बहुतेक लोकांना कळलेसुध्दा नाही. ज्यांना ही गोष्ट माहीत होती त्यांनाही त्याबद्दल जरासुध्दा रुखरुख वाटायला जागाच उरली नाही. स्वरमंडळातर्फे आजवर जेवढे कार्यक्रम केले गेले आहेत त्यातल्या सर्वोत्कृष्ट परपॉर्मन्सेसमध्ये या मैफिलीची गणना होईल.

यानंतर आमचा परिचय वाढत गेला. शिवानंदांचे गायन कोठेही असो किंवा योजना प्रतिष्ठानचा कोणताही कार्यक्रम असो, त्याचे आग्रहाचे निमंत्रण आम्हाला मिळत असे आणि स्थलकालाच्या मर्यादेत त्यातल्या जितक्या कार्यक्रमाला जाणे आम्हाला शक्य असेल त्या सर्व ठिकाणी आम्ही आवर्जून जातही असू. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी किंवा संपल्यानंतर बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटत असू. त्यांचा चहा, फराळ आणि गप्पागोष्टींमध्ये सहभागसुध्दा घेतला. संगीताच्या तसेच इतर क्षेत्रांमधील कित्येक मोठ्या लोकांची यामुळे प्रत्यक्ष भेट घडली, त्यांचेशी हस्तांदोलन किंवा त्याना चरणस्पर्श करण्याची संधी आम्हाला मिळाली.

अमक्या रागामध्ये नसलेले कोमल गंधारचे स्वर आले किंवा असलेला तीव्र धैवत जरा कमी लागत होता अशा प्रकारचे बारकावे मला अजीबात समजत नसले तरी एकंदरीत ते गायन उत्तम, मध्यम की सुमार होते याचा थोडा अंदाज आता अनुभवावरून येतो. शिवानंदांचे जेवढे गायन मी ऐकले ते सारे उत्तम याच सदरात होते. त्यातही एकादे दिवशी मैफल चांगली रंगल्याने सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले आणि दुस-या एकाद्या दिवशी ती तेवढी रंगली नाही असे होणारच. पण तरी त्या दिवशी सुध्दा त्यांच्या गायनाचा दर्जा उत्तमच वाटला. शिवानंदांना त्यांच्या आईवडिलांकडून संगीताचे बाळकडू मिळाले होते. उपजत गोड गळ्यावर लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले, त्यांना चांगले गुरू लाभले आणि त्यांनी स्वतः भरपूर मेहनत घेऊन गुरूंनी शिकवलेले गायन आपल्यात मुरवले होते. गायनासाठी श्रोत्यांपुढे जाण्यापूर्वी ते तिथे असलेल्या वडीलधारी लोकांचे आशीर्वाद घेत, त्यांच्या आराध्यदैवताचे स्मरण करून प्रार्थना करत असत. या सगळ्यांचा फायदा होतो अशी त्यांची श्रध्दा होती, किंवा त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असावा. शिवाय कलाकाराच्या मनातला प्रामाणिकपणा, चांगुलपणा, निष्ठा वगैरेंचे प्रतिबिंब त्याच्या कलाविष्कारात पडते असे म्हणतात. शिवानंदांच्या गायनात मला हे गुण कुठेतरी डोकावत आहेत असा भास होत असे.

Wednesday, April 13, 2011

अणूऊर्जेचा प्रताप


फुकुशिमा अणुविद्युत केंद्रासंबंधी तीन लेख आणि 'परमाणू ऊर्जेचा शोध' या माझ्या मागील लेखांमध्ये मी माझ्या ओळखीच्या शब्दांचा उपयोग केला होता. 'मोलेक्यूल' आणि 'अॅटम' या इंग्रजी शब्दांना 'अणू' आणि 'परमाणू' हे मराठी प्रतिशब्द मी दिले होते. ते चुकीचे किंवा कालबाह्य असल्याचे या लेखांवर झालेल्या चर्चेमधून समजले. 'मोलेक्यूल' आणि 'अॅटम' या इंग्रजी शब्दांना 'रेणू' आणि 'अणू' हे मराठी प्रतिशब्द आता प्रमाणभाषेत दिले जातात असे समजल्यामुळे यापुढील लेखांमध्ये मी या शब्दांचा उपयोग करणार आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मेरी क्यूरी आणि इतर शास्त्रज्ञांनी रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावल्यानंतर विज्ञानाच्या पुस्तकात नवा अध्याय सुरू झाला होता. इतर अनेक पदार्थ सुध्दा रेडिओअॅक्टिव्ह असल्याचे प्रयोगातून सिध्द होत होते. त्या काळात आढळलेले हे सारे पदार्थ नैसर्गिकच होते. प्रत्येक मूलद्रव्यांमधून बाहेर पडणारे किरण वेगळ्या प्रकारचे असतात. त्या किरणांवरून त्या पदार्थाचे अस्तित्व ओळखण्याचे शास्त्र विकसित होत गेले. उत्खननात सापडलेल्या मानवनिर्मित वस्तूंच्या अवशेषांवरून त्यांचा कालखंड ठरवण्याचे साधन (कार्बन डेटिंग) या शास्त्रामुळे इतिहासकारांना मिळाले आणि खडकांमधून निघणा-या किरणांच्या अभ्यासावरून जिऑलॉजिस्ट्सना त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळू लागली. अशा प्रकारे रेडिओअॅक्टिव्हिटीचा उपयोग संशोधनासाठी होत असला तरी 'ऊर्जेचे साधन' या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकत नव्हता. सूर्यकिरणांपासून आपल्याला प्रकाश आणि ऊष्णता या दोन प्रकारची ऊर्जा मिळते. चंद्राच्या चांदण्यामधून फक्त उजेड मिळतो, जाणवण्याइतपत ऊष्णता मिळत नाही. काळोख्या रात्री आकाशातले तारे आपल्याला दिसतात, पण त्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला स्वतःचा हातसुध्दा दिसत नाही, इतका तो उजेड क्षीण असतो. बहुतेक नैसर्गिक रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून बाहेर पडणारे किरण अदृष्य आणि अत्यंत क्षीण असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचा रोजच्या जीवनात काही उपयोग असत नाही किंवा त्यामुळे विशेष अपायही होत नाही. रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून निघणारे किरण थेट अणूमधून निघाले असणार हे सिध्द झाले. अणूची अंतर्गत रचना कशी असावी याबद्दल केलेले तर्क सर्वमान्य झाले. त्याच्या केंद्रभागी 'प्रोटॉन' नावाचे घनविद्युतभारी कण असावेत आणि 'इलेक्ट्रॉन' नावाचे ऋणविद्युतभारी कण त्यांच्या सभोवती घिरट्या घालत असावेत हे मॉडेल सर्वमान्य झाले. प्रत्येक अणूत जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. पण त्यांचे इलेक्ट्रिकल गुणधर्म आणि वजन यात सुसंगती दिसत नसल्यामुळे प्रोटॉन्सच्या सोबत कोणताही विद्युतभार नसलेले 'न्यूट्रॉन्स' नावाचे कण असावेत अशी कल्पना पुढे आली. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांचा अभ्यास होत गेला. वजन सोडून मूलद्रव्यांचे बाकीचे बहुतेक गुणधर्म या कणांच्यामुळे ठरतात आणि रासायनिक क्रियांमध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो हे समजले, पण न्यूट्रॉन्स हे कण गूढ राहिले. काही काम न करणारे हे कण प्रोटॉन्सना चिकटून आळशी ठोंब्यासारखे स्वस्थ बसलेले असतात अशी सुरुवातीच्या काळातली समजूत होती. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची दुनिया थोडी सुरस आणि चमत्कारिक वाटते. ऋण आणि घन विद्युत भारांमध्ये परस्परांबद्दल आकर्षण (attraction) असते आणि एकाच प्रकारचा भार (charge) असलेले पदार्थ एकमेकांना दूर ढकलत असतात (repulsion) असे सर्वसाधारणपणे दिसते. पण ऋणविद्युतभारी इलेक्ट्रॉन घनविद्युतभारी प्रोटॉन्सपर्यंत जाऊन त्यांना भेटत नाहीत, ते त्यांच्या सभोवती घिरट्या घालत राहतात. एका अणूमध्ये खूप इलेक्टॉन्स असले तर ते आपसांमधील रिपल्शनमुळे एकत्र असणार नाहीत हे कदाचित सहजपणे समजण्यासारखे आहे. ते निरनिराळ्या कक्षांमध्ये गटागटांमध्ये राहून फिरत राहतात. घनविद्युतभारी प्रोटॉन्स एकमेकांपासून दूर का जात नाहीत याचे आश्चर्य वाटेल. कोणताही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स त्यांना एका जागी धरून ठेवत असतात. न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स (यांना संयुक्तपणे न्यूक्लिऑन्स म्हणतात) यांना एकत्र बांधून ठेवणारी एक बाइंडिंग एनर्जी असते. ती त्या अणूच्या वस्तुमानाच्या स्वरूपात त्यात दडलेली असते. दोन किंवा अधिक फक्त प्रोटॉन्स एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, पण त्यांच्यासमवेत न्यूट्रॉन्स असतील तर मात्र त्या सर्वांची मिळून पुरेशी बाइंडिंग एनर्जी होते आणि ते सर्वजण मिळून अणूच्या केंद्रभागी (nucleus) एकत्र राहतात. न्यूट्रॉनला अणूच्या केंद्रामधून बाहेर काढून त्याचे वेगळे अस्तित्व उपकरणांच्या द्वारे ओळखता आल्यानंतर या क्षेत्रातला आणखी एक नवा अध्याय सुरू झाला. त्यात न्यूट्रॉन्सच्या गुणधर्मांचा अभ्यास सुरू झाला. तसेच न्यूट्रॉन्सच्या निर्मितीचे तंत्र विकसित होताच न्यूट्रॉनमुळे इतर मूलद्रव्यांवर काय परिणाम होतात याचे संशोधन सुरू झाले. न्यूट्रॉनकडे कशाच्याही आरपार जाण्याची अद्भुत शक्ती असते. सर्व प्रकारच्या रेडिएशनला शिसे हा जड धातू अडथळा आणतो पण न्यूट्रॉन मात्र शिशाच्या जाड भिंतीमधून सुध्दा अतीशय वेगाने सरळ लीलया आरपार जातो. या उलट पाणी, मेण यासारख्या हलक्या पदार्थामधून जातांना त्याची गती मंद होते आणि दिशा बदलत राहून तो थोडा घुटमळत राहतो. सुटा न्यूट्रॉन फार काळ आपले अस्तित्व टिकवून धरत नाही. तो दुस-या एकाद्या अणूच्या केंद्रात शिरून तिथे असलेल्या न्यूट्रॉन्सच्या मेळाव्यात सामील होतो. तसे झाले नाहीच तर त्याचे विघटन होऊन एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन यांची जोडी जन्माला येते. दुस-या अणूमध्ये सामील झालेल्या या नव्या न्यूट्रॉनमुळे त्या अणूत गरजेपेक्षा अधिक ऊर्जा (बाइंडिंग एनर्जीमुळे) असल्याकारणाने तो अणू अस्थिर होऊन रेडिओअॅक्टिव्ह होतो आणि आपल्याकडील जास्तीच्या ऊर्जेला बाहेर टाकू लागतो. या प्रकारे अनेक मानवनिर्मित नवी मूलद्रव्ये किंवा त्यांचे आयसोटोप्स तयार होऊ लागले. आदिमानवाच्या काळात तो निस्रर्गातील वस्तूंचे तुकडे किंवा चेंदामेंदाच करू शकत होता, त्यात त्यांच्या अणूरेणूंवर काही परिणाम होत नसे. अग्नीला वश केल्यानंतर तो इंधनाच्या रेणूंचे परिवर्तन करू लागला आणि रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे तो नवी संयुगे (कंपाउंड्स) तयार करायला शिकला होता, त्यात नवे मानवनिर्मित रेणू जन्माला आले. आता न्यूट्रॉन्सचा उपयोग करून त्याने निसर्गात अस्तित्वात नसलेले नवे अणू तयार केले. यातल्या काही अणूंचा वैद्यकशास्त्रात आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चांगला उपयोग होत असला तरी किरणोत्सारामुळे तापदायक ठरलेल्या अणूंचे प्रमाण फार मोठे आहे. न्यूट्रॉनच्या झोताचा मारा युरेनियम या धातूवर केला गेला तेंव्हा एक धक्कादायक सत्य जगासमोर आले. अचानक तो पदार्थ तापला आणि त्याच वेळी न्यूट्रॉन्सच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसली. युरेनियम धातूच्या यू२३५ या आयसोटोपच्या अणूच्या केंद्रामध्ये ९२ प्रोटॉन्स आणि १४३ न्यूट्रॉन्स असतात. त्यात आणखी एकाची भर पडली की ती संख्या १४४ होते आणि तयार झालेला यू २३६ हा नवा अणू इतका अस्थिर होतो की लगेच त्याचे भंजन होऊन दोन तुकडे पडतात. युरेनियमच्या केंद्रामधील काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून एक नवा अणू आणि आणखी काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून दुसरा नवा अणू तयार होतो. अशा प्रकारे एका मोठ्या अणूमधून दोन लहान अणू निघतात. तरीही दोन तीन न्यूट्रॉन्सना कशातच जागा मिळत नाही. ते सुटेच राहतात. या दोन नव्या अणूंमधील बाइंडिंग एनर्जीची बेरीज एकट्या यू २३५ मधील बाइंडिंग एनर्जीपेक्षा कमी असल्यामुळे ही जास्तीची ऊर्जा त्या नव्या अणूंना आणि सुट्या न्यूट्रॉन्सना मिळते. ही बाइंडिंग एनर्जी वस्तुमानाच्या रूपात असल्यामुळे दोन नवे अणू आणि दोन किंवा तीन न्यूट्रॉन्स यांच्या वस्तुमानाची बेरीज यू२३५ अणू आणि एक सुटा न्यूट्रॉन यांच्या बेरजेहून कमी असते आणि या फरकाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. हीच ती अणूऊर्जा. या क्रियेमध्ये दोन तीन सुटे न्यूट्रॉन बाहेर पडत असल्यामुळे ते न्यूट्रॉन्स निरनिराळ्या यू २३५ अणूंचे भंजन करत जातात. यामुळे त्यांची संख्या वाढत जाऊन त्याची साखळी (chain reaction) तयार होऊ शकते आणि ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाऊन भयंकर अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. वस्तुमानाचे रूपांतर प्रचंड ऊर्जेमध्ये होऊ शकेल हे न्यूट्रॉन्स आणि भंजन (Fission) यांची माहितीसुध्दा नसतांनाच्या काळात आईन्स्टाईनने केलेले भाकित अशा प्रकारे खरे ठरेल अशी शक्यता दिसू लागताच त्याच्या परिणामांचा विचार करता या विषयावरील सारे संशोधन अत्यंत गुप्त ठेवले जाऊ लागले. पण तेवढ्यात दुसरे महायुध्द भडकले. आपण जर शत्रूचा संहार केला नाही तर तो वरचढ ठरेल आणि त्यानंतर तो आपली गय करणार नाही अशा विचाराने मानवता, अहिंसा, शांती वगैरे सूज्ञपणाला बाजूला ठेवले गेले. भंजनाच्या तत्वाचा उपयोग करून युध्दपातळीवर काम करून एक संहारक अस्त्र तयार केले गेले आणि एका वाळवंटात त्याची चाचणी करून झाल्यावर ते अणूबाँब जपानवरील दोन शहरांवर टाकून त्या शहरांचा विध्वंस करण्यात आला. अशा प्रकारे अणूशक्ती पहिल्यांदा जगापुढे आली ती संहारक या रूपाने. कल्पनातीत एवढी प्रचंड ऊर्जा या वेळी एका स्फोटात क्षणभरात बाहेर पडली. मूलद्रव्यांचा अतीशय काटेकोर आणि सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या प्रत्येक आइसोटोपच्या अणूमधल्या बाइंडिंग एनर्जीचा अभ्यास करण्यात काही गोष्टी लक्षात आल्या. युरेनियमसारख्या जड अणूमध्ये खूप जास्त बाइंडिंग एनर्जी असते आणि त्या अणूचे दोन तुकडे झाले तर त्यातून तयार होणा-या दोन अणूंना मिळूनसुध्दा इतक्या बाइंडिंग एनर्जीची आवश्यकता नसते. त्यामुळे ती बाहेर पडते. लहान अणूंमध्ये याच्या नेमकी उलट परिस्थिती असते. हैड्रोजनच्या अणूमध्ये फक्त एकटा प्रोटॉन असल्यामुळे बाइंडिंग एनर्जीचा प्रश्नच नसतो. त्यात एक न्यूट्रॉन येऊन मिळाला तर ड्यूटेरियम हे हैड्रोजनचे आयसोटोप तयार होते आणि त्याच्या अणूमध्ये बाइंडिंग एनर्जी असते. त्यात आणखी एक न्यूट्रॉन आला तर त्याचे ट्रिशियम आयसोटोप बनते, हे अस्थिर असते. असे दोन अणू एकत्र आले तर त्यातून हीलियम वायूचा अणू तयार होतो, पण त्याची बाइंडिंग एनर्जी कमी असल्यामुळे या संमीलनातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. याला थर्मोन्यूक्लियर रिअॅक्शन म्हणतात आणि या तत्वावरूनच सूर्यामध्ये ऊष्णता तयार होत असते. आपल्याला ठाऊक असलेल्या सूर्य या सर्वात मोठ्या ऊर्जास्त्रोतातली ऊर्जा सर्वात लहान आकाराच्या हैड्रोजन अणूंपासून तयार होत असते एवढा या अणूऊर्जेचा प्रताप आहे.

Friday, April 08, 2011

परमाणु ऊर्जेचा शोध

ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, हालचाल यांच्यासारखी ऊर्जेची रूपे आणि सजीवांच्या शरीरातली शक्ती हे आपल्या रोजच्या पाहण्यातले, अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. एकाच तत्वाची ही वेगवेगळी रूपे आहेत हे कदाचित सगळ्यांना ठाऊक नसेल. ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन जास्त चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव अनादिकालापासून करत आला आहे. मात्र त्यासाठी त्याला या श्रोतांकडे जाणे आवश्यक होते, तसेच त्यांच्यावर त्याचे नियंत्रण नव्हते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपले काम करून घ्यावे लागत असे. अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. साधे भात शिजवणे असो किंवा खनिजापासून धातू तयार करणे आणि त्याला मनासारखा आकार देणे असो, गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून तो अग्नीचा उपयोग करत गेला. त्यासाठी विविध प्रकारचे ज्वलनशील, ज्वालाग्राही आणि स्फोटक पदार्थ त्याने शोधून काढले, तोफा आणि बंदुकांसारखी शस्त्रास्त्रे निर्माण केली, वाफेवर आणि तेलावर चालणारी इंजिने तयार केली. आता अग्निबाणांच्या सहाय्याने अवकाशात याने पाठवत आहे.

ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपांचा आणि निसर्गातल्या ऊर्जाश्रोतांचा बारकाईने सखोल अभ्यास करून, त्यांना जाणून घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचे प्रयत्न मानव सुरुवातीपासून करत आला आहे. नदीच्या खळाळणा-या पाण्याला कशामुळे जोर मिळतो? ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते? याचा विचार करतांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे घडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. वाहत्या पाण्यामधली वाहण्याची शक्ती त्याला पृथ्वीकडून मिळते. पण त्या आधी ते पाणी पर्वतावर कसे जाऊन पोचते? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते आणि ती वातावरणात उंचावर जाते, (या गोष्टीलासुध्दा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कारणीभूत असते) त्यातून ढग तयार होतात आणि डोंगरावर जाऊन ते बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती सुप्त अवस्थेत (पोटेन्शियल एनर्जी) असते, पृथ्वीच्या आकर्षणाने पाणी वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो हलका होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वा-यामधील ऊर्जासुध्दा त्याला सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते? या प्रश्नाची उकल साध्या निरीक्षणांमधून होत नव्हती.

शस्त्रास्त्रे आणि यंत्रे यांच्या बरोबरीने नवनवी उपकरणेसुध्दा मानव बनवत गेला आणि त्यांच्याद्वारे त्याने आपली निरीक्षणशक्ती अमाप वाढवली. ज्यांची जाणीव माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांना होऊ शकत नाही अशी निसर्गातली अनेक रहस्ये त्यातून उलगडली गेली. कानाला ऐकू न येणारे आवाज, डोळ्यांना दिसू न शकणारे प्रकाशकिरण आणि बोटाला न जाणवणारी स्पंदने यांचे अस्तित्व समजले, त्यांची निर्मिती आणि मोजमाप करणे शक्य झाले. ज्ञानसंपादनाच्या अनेक नव्या खिडक्या उघडल्यामुळे नवनवे वैज्ञानिक शोध लागत जाण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

विश्वामधील सर्व पदार्थ अतीसूक्ष्म अशा कणांपासून बनले आहे ही कल्पना मनात रुजल्यानंतर त्याने या कणांचा कसून अभ्यास केला. त्यांना अणू (मॉलेक्यूल) असे नाव दिले. हे अणू साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण दुर्बिणीमधूनसुध्दा प्रत्यक्षात दिसत नसले तरी शास्त्रज्ञांनी त्यांच्या रचनेबद्दल संकल्पना मांडल्या आणि पदार्थांच्या प्रत्यक्ष निरीक्षणांमधून त्यांना अप्रत्यक्षपणे पण निश्चित स्वरूपाचा दुजोरा मिळत गेला. या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून त्यांचे जे गुणधर्म समजले, त्यात असे दिसले की हे सर्व कण चैतन्याने भारलेले असतात. याची अनेक सोपी उदाहरणे दाखवता येतील.

भरलेला फुगा फोडला की त्याच्या आतला वायू क्षणार्धात हवेत विरून जातो, त्याला परत आणता येत नाही. कारण त्यातील सूक्ष्म कण स्वैरपणे इतस्ततः भरकटत असतात. स्वच्छ पाण्याने भरलेल्या पेल्यात कोकाकोलाचा एक थेंब टाकला की तोसुध्दा सगळीकडे पसरतांना दिसतो, कारण द्रवरूप पदार्थांचे सूक्ष्म कण सुध्दा एका जागेवर स्थिर न राहता वायूंपेक्षा कमी वेगाने पण सतत संचार करत असतात. घनरूप पदार्थांचे तपमान वाढले की ते प्रसरण पावतात आणि कमी झाले की आकुंचन पावतात, कारण त्यांचे सूक्ष्म कण सुध्दा जागच्या जागीच हालचाल करत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर जड वस्तूंच्या सूक्ष्म कणांमध्ये सुध्दा एक चैतन्य असते. एक प्रकारची सुप्त ऊर्जा अणुरेणूंमध्ये भरलेली असते. ज्या वेळी ती ऊर्जा ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिमानता यासारख्या रूपामध्ये प्रकट होते तेंव्हा ती आपल्या जाणीवांच्या कक्षेत येते. तिला ओळखणे, तिचे मापन करणे, त्याचा उपयोग करून घेणे अशा गोष्टी आपल्याला अवगत असतील तर आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली असे वाटते.

निरनिराळ्या स्वरूपातील ऊर्जेचे अस्तित्व, एका जागेवरून दुस-या जागेकडे होणारे तिचे वहन, ऊर्जेचे एका रूपामधून दुस-या रूपात रूपांतर होणे वगैरेंसाठी निसर्गाचे निश्चित असे स्थलकालातीत नियम आहेत. ते व्यवस्थित समजून घेऊन त्यांचा उपयोग करून घेण्याचे काम वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ करत असतात. त्यांच्या प्रयत्नांमधून ऊर्जेचे अद्भुत नवे श्रोत मानवाला मिळत गेले. आपली पृथ्वी स्वतःच एक महाकाय लोहचुंबक आहे आणि तिचे चुंबकीय क्षेत्र आपल्या संवेदनांना जाणवत नसले तरी ते आपल्या चहू बाजूंना पसरले आहे हे समजले. आकाशामधून धरतीवर कोसळणा-या विद्युल्लतेकडे पाहून भयभीत होण्यापलीकडे काहीही करू न शकणारा मानव कृत्रिम रीत्या विजेचे उत्पादन करू लागला. यात त्याने इतकी विविधता आणली आणि इतके नैपुण्य संपादन केले की अत्यंत प्रखर अशी ऊष्णता निर्माण करणे, महाकाय यंत्रांची चाके फिरवणे, लक्षावधी गणिते चुटकीसरशी सोडवणे किंवा जगाच्या पाठीवरील दूर असलेल्या ठिकाणी आपले संदेश अतीशय सूक्ष्म अशा विद्युल्लहरींमधून कल्पनातीत वेगाने पाठवणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे तो विजेकडून करून घेऊ लागला आहे.

विश्वातील असंख्य पदार्थाची रचना असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या अणूंपासून झाली असली सुमारे फक्त शंभर एवढ्याच मूलद्रव्यांपासून हे असंख्य पदार्थ निर्माण झाले आहेत. या मूलद्रव्यांच्या सूक्ष्मतम कणांना परमाणु (अॅटम) असे नाव ठेवले. अर्थातच दोन किंवा अधिक परमाणूंच्या संयोगातून अणू बनतात हे ओघाने आले. जेंव्हा कोळशाच्या म्हणजे कार्बन या मूलद्रव्याचा प्राणवायू (ऑक्सीजन)शी संयोग होतो. तेंव्हा कर्बद्विप्राणिल (कार्बन डायॉक्साइड) वायू तयार होतो आणि त्याबरोबर ऊष्णता बाहेर पडते. यामधील ऊर्जा कोठून येते? असा प्रश्न पूर्वी अनुत्तरित होता. त्याचे उत्तर मिळाले ते असे. जेंव्हा दोन कमावत्या व्यक्ती एकत्र राहू लागतात, तेंव्हा त्यांचे काही आवश्यक खर्च समाईकपणे भागवले जातात आणि त्यामुळे पूर्वी त्यावर खर्च होणारे त्यांचे काही पैसे शिल्लक राहतात. त्याप्रमाणे दोन वेगवेगळे परमाणु एकत्र आले की त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली ऊर्जेची एकंदर गरज कमी होते आणि ही जास्तीची ऊर्जा ऊष्णतेच्या स्वरूपात त्या नव्या अणूला मिळते. ही ऊर्जा कार्बन आणि ऑक्सीजन या पदार्थांमध्येच सुप्त रूपाने (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) वास करत असते, ज्वलनाच्या रासायनिक क्रियेमुळे आपल्याला जाणवेल अशा स्वरूपात ती बाहेर पडते.

अग्नीमधून मिळणारी ऊर्जा कोठून आली या प्रश्नाला मिळालेल्या या उत्तराबरोबर ऊष्णता निर्माण करणा-या असंख्य रासायनिक प्रक्रियांचे (एक्झोथर्मिक रिअॅक्शन्सचे) गूढ उलगडले. कृत्रिम रीत्या विजेचे उत्पादन करतांना ती कशी निर्माण होते हे मानवाला समजले होतेच. सूर्य आणि आकाशातल्या ता-यांमधून बाहेर पडत असलेल्या ऊर्जेचा श्रोत कोणता हे अजून गूढ होते. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला मादाम मेरी क्यूरीने रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावला आणि पदार्थविज्ञानात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. रेडियम या मूलद्रव्याचा दुस-या कशाशीही संयोग न होता आणि त्याच्या कोणत्याही गुणधर्मांमध्ये कसलाही बदल न होता विशिष्ट प्रकारचे प्रकाशकिरण त्या धातूमधून सतत कसे बाहेर पडत असतात हे एक नवे गूढ जगापुढे आले. अत्यंत सूक्ष्म प्रमाणातल्या अदृष्य अशा प्रकाशकिरणांचे अस्तित्व दाखवणारी, त्यांच्या तीव्रतेचे मापन करणारी उपकरणे तयार झाल्यानंतर अशा प्रकारचे अनेक पदार्थ निसर्गामध्ये असल्याचे समजले. सर्वात हलक्या हैड्रोजनपासून सर्वात जड युरेनियमपर्यंत ज्ञात असलेल्या बहुतेक मूलद्रव्यांना रेडिओअॅक्टिव्ह भावंडे असल्याचे दिसून आले.

अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्याच्या कामाला लागले. ही ऊर्जा कोणत्याही भौतिक (फिजिकल) किंवा रासायनिक (केमिकल) क्रियेमधून निर्माण होत नव्हती याची खातरजमा करून घेतल्यानंतर ती ऊर्जा त्या परमाणूमध्येच दडलेली असणार हे निश्चित झाले. परमाणूंच्य़ा अंतर्गत रचनेबद्दल तर्क करण्यात येत होते. शंभरावर असलेलेच्या मूलद्रव्यांचे परमाणू प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या फक्त तीनच अतीसूक्ष्म मूलभूत कणांपासून निर्माण झाले असावेत हा सिध्दांत सर्वमान्य झाला आणि अणूंच्या अंतरंगात या अतीसूक्ष्म कणांची रचना कशाप्रकारे केली गेलेली असेल यावर अंदाज बांधले जाऊ लागले. यातली कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता येणे शक्य नव्हतेच. पण ती अशी असेल तर त्या पदार्थांमध्ये असे गुणधर्म येतील असे तर्क करून आणि ते गुणधर्म तपासून पाहून त्या सिध्दांतांची शक्याशक्यता तपासण्यात आली. त्यानुसार प्रत्येक अणूच्या केंद्रभागी प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्या समूहातून निर्माण झालेला न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन्स गटागटाने सदोदित त्याच्या भोवती घिरट्या घालत असतात असे मॉडेल सर्वमान्य झाले. काही परमाणूंची रचना अस्थिर (अनस्टेबल) असते. त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा असते. तिला बाहेर टाकून देऊन तो परमाणू स्थैर्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो. या क्रियेमधून ही ऊर्जा बाहेर पडत असते हे सर्वमान्य झाले. सू्र्य आणि तारकांमध्ये असेच काही तरी घडत असणार असा अंदाज करण्यात आला.

वस्तुमान, अंतर आणि वेळ ही मूलभूत तत्वे आहेत असे धरून त्यांच्या आधाराने इतर सर्व गुणधर्मांचे मोजमाप करता येत असे, अजूनही ते तसेच केले जाते. पण या तीन्ही गोष्टी सापेक्ष आहेत असे प्रतिपादन आल्बर्ट आइन्स्टाइन याने शतकापूर्वी केले. मानवाच्या सर्वसामान्य जाणीवांशी विपरीत असलेला हा विचार कोणाच्याही पचनी पडणे कठीण होते. त्याला शंभर वर्षे उलटून गेली असली तरी सापेक्षतासिध्दांताबद्दल (रिलेटिव्हिटी थिअरीबद्दल) आत्मविश्वासाने बोलणारे लोक आजसुध्दा कमीच आढळतात. पण शुध्द तर्क आणि क्लिष्ट गणित यांच्या सहाय्याने आइन्स्टाइनने आपले विचार तत्कालीन शास्त्रज्ञांना पटवून दिले. त्याच्या सिध्दांताच्या धाग्याने विश्वाचा विचार केल्यानंतर वस्तुमान आणि ऊर्जा ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिध्द होते. तसे असल्यास वस्तूमानाचे परिवर्तन ऊर्जेमध्ये होणे सुध्दा शक्य असावे आणि ते झाल्यास E=mCxC एवढ्या प्रचंड प्रमाणात लहानशा वस्तुमानाच्या बदल्यात अपरिमित ऊर्जा मिळू शकेल असे भाकित त्याने केले. ही क्रिया नक्की कशा प्रकारे होईल हे त्या काळात तो सांगू शकत नव्हता. त्यामुळे ही गोष्ट तो सप्रयोग सिध्द करू शकत नव्हता. पण तो आपल्या भाकितावर ठाम होता. इतर काही शास्त्रज्ञांनी ही किमया घडवून आणली आणि आइन्स्टाइनच्या जीवनकालातच त्याचे प्रत्यक्षप्रमाण जगाला दाखवले.

सू्र्य आणि तारकांमधील ऊर्जेचे रहस्य काही प्रमाणात उलगडले, तसेच अणुशक्ती किंवा परमाणू ऊर्जा ही एक वेगळ्या स्वरूपातली ऊर्जा मानवाच्या हातात आली.

Tuesday, April 05, 2011

मोबाइलने केले एप्रिल फूल

त्या दिवशी दुपारी मस्त जेवण करून मी वामकुक्षीच्या नावाने ताणून दिली होती. कसलीशी चाहूल लागून झोप चाळवली तेंव्हा अलका तयार होऊन बाहेर जायला निघाली असल्याचे दिसले. वाशीमध्येच राहणा-या एका मैत्रिणीला सोबत घेऊन ती मुंबईतल्या मैत्रिणीकडे जायला निघाली होती. त्यांच्या आठदहा मैत्रिणी तिथे जमणार होत्या. मला आता तीन चार तास निवांतपणा मिळणार होता. अलकाला बायबाय करून मी संगणक सुरू केला आणि आंतर्जालावर उड्डाण केले. त्या महासागराच्या लाटांवर सिंदबादप्रमाणे मुशाफिरी करता करता अलीबाबाच्या गुहा शोधत असतांना अमूल्य रत्नांनी भरलेला एक खजिना सापडला. 'तिळा दार उघड'चा मंत्र लिहून त्यावर टिचकी मारणार एवढ्यात फोनची घंटा खणाणली. या अवेळी कोणालाही माझी आठवण आली असण्याची शक्यता मला दिसत नव्हती. अलकाच्याच एकाद्या मैत्रिणीने "निघालीस का? केंव्हा पोचणार आहेस?" अशा चौकशा करण्यासाठी फोन लावला असणार असे वाटले. चार पाच वेळा वाजू दिल्यानंतरसुध्दा घंटा वाजायची थांबली नाही तेंव्हा "काय कटकट आहे?" असे चरफडत उठलो आणि रिसीव्हर उचलला.

अलका स्वतःच फोनवर होती. तिला घरातून निघून दहा मिनिटे सुध्दा झाली नव्हती, म्हणजे ती अजून वाटेतच असणार. तिला अचानक काय झाले असेल या शंकेच्या अनेक पाली मनात चुकचुकल्या. "अहो मी ठीक आहे, पण आपली गाडी .." ती सांगत होती. "वाशीच्या पुलावर बंद पडली. आता मी काय करू?"
त्यावर मी तिला काय सांगणार? गेली दहा वर्षे ती सराईतपणे गाडी चालवत असली तरी कधीही तिने कारचे बॉनेट उघडून त्यात डोकावून पाहिल्याचे मला आठवत नाही. त्यात दिसणा-या कशाला इंजिन म्हणतात हे तिला ठाऊक असेलच याची मला शाश्वती वाटत नव्हती. आतल्या काळ्याकुट्ट यंत्राच्या कुठल्याही भागाला बोट जरी लावले तरी ते काळे होईल आणि त्याला कसलासा घाणेरडा वास येईल या धास्तीने तिने कधीही त्यातल्या कशालाही स्पर्श केलेला मला दिसला नव्हता. त्यामुळे या वेळी ती स्वतः काही करू शकेल याची फारशी शक्यता नव्हती.
मी सांगितले, "घाबरू नकोस, तिथेच थांब, मी येतोय्."
तिला एवढे सांगून मी उघडलेल्या सर्व गुहांचे दरवाजे थडाथड बंद केले, संगणकाला निपचित पाडले आणि कपडे बदलले. पण ते करत असतांना माझ्या मनात विचार आला की मी तरी तिथे जाऊन काय करणार आहे? इंजिन कशाला म्हणतात एवढे मला ठाऊक असले आणि फक्त बोटच काय पण शर्टाची बाहीसुध्दा ग्रीसने माखून घेण्याची माझ्या मनाची तयारी असली तरी त्याचा काय उपयोग होता? बंद पडलेले इंजिन सुरू करण्याचे काडीएवढे ज्ञान किंवा पूर्वानुभव माझ्या गाठी नव्हतेच. त्यामुळे सर्व्हिस सेंटरचा फोन नंबर शोधून काढला आणि मेकॅनिकला बोलावून घेतले. तो तयार झाला हे पाहून झाल्यावर त्याला अलकाच्या मोबाईलचा नंबर आणि अलकाला त्याचा नंबर दिला आणि टॅक्सीने घटनास्थळावर जाऊन पोचलो.

तोपर्यंत मेकॅनिक जसबीर तिथे आला होता आणि त्याने गाडीचे बॉनेट उघडून ते पुन्हा बंद सुध्दा केले होते. बहुधा त्याच्या दिव्य स्पर्शानेच इंजिनाचा घरघराट पुन्हा सुरू झाला असावा.
"आता गाडी चालू झाली आहे, आणखी दहा बारा किलोमीटरपर्यंत तरी ती चालायला हरकत नाही. मुंबईत पोचल्यानंतर तिकडच्या मेकॅनिककडून तपासून घ्या. मी त्याला म्हणजे महेशला फोन करून कळवले आहे. तुम्ही जाणार आहात त्या जागी तो येऊन आणखी दुरुस्ती करून देईल. बहुधा फ्यूएल पंपचा प्रॉब्लेम असावा. तुम्ही गाडी घेऊन चला, मी मागेमागे येतोच आहे." जसबीरने सांगितले. इतके सहकार्य माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते.

त्याचे आभार मानून (आणि अर्थातच त्याची व्हिजिट फी देऊन) आम्ही पुढे निघालो. मुंबईच्या हद्दीत जेमतेम येऊन पोचतो तेवढ्यात अलकाच्या मोबाईलवर एक फोन आला. तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणीने उचलला. "आमची गाडी आता चालू झाली आहे आणि शिवाय एक मेकॅनिक मागे मागे येतो आहे." असे सांगून तिने बंद करून टाकला. तो कॉल कुणाचा होता याची चौकशी करावी असे तिला वाटले नाही की त्या माणसाकडे हा नंबर कसा आला असा प्रश्न तिला पडला नाही. "कुणाचा का असेना, आपल्याला काय करायचे आहे?" अशा गुर्मीत ती होती. मी मागे वळून पाहिले तर जसबीर अदृष्य झाला होता. दुपदरी रस्ता असल्यामुळे आमच्या मागे पुलाच्या दुस-या टोकापर्यंत येणे त्याला भागच होते. तिथपर्यंत आल्यानंतर आमची गाडी ठीक चालली आहे हे पाहून तो परत गेला होता. "तो तर पुढे गेला, मी पाहिले.." असे उत्तर आले. आम्हाला कोठे जायचे आहे हे अंतर्ज्ञानाने ओळखून तो आमच्या आधीच तिथे जाऊन पोचला असता तर मी त्याला भररस्त्यात साष्टांग नमस्कार घातला असता. पण तसे काही झाले नाही. आम्ही गाडी चालवत चालवत मैत्रिणीच्या घरापर्यंत आलो. वाटेत काही त्रास झाला नाही. जसबीर तिथे येईल अशी माझी अपेक्षा नव्हतीच, आता महेश केंव्हा येणार हे पहायचे होते. त्याचा मोबाइल फोन नंबर अलकाच्या मोबाईलमध्ये नमूद केला होता तो लावला.

"पाच मिनिटांपूर्वी सांगितलेत की तुम्हाला दुसरा मेकॅनिक मिळाला आहे आणि तुमची गाडी ठीक झाली आहे. आता मी कशाला येऊ?" महेशने घुश्श्यातच फोन बंद करून टाकला. पुन्हा जसबीरशी बोलून झालेला गोंधळ त्याला सांगितल्यावर त्याने महेशशी बोलून त्याला राजी केले. गाडी आणि मोबाईल माझ्याकडे सोपवून अलका तिच्या मैत्रिणीसह बिल्डिंगमध्ये चालली गेली, रस्त्यावर उभा राहून महेशाची वाट पहात होतो. दहा पंधरा मिनिटे झाली तरी त्याची येण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्याला फोन करून चौकशी करावी असा विचार केला. अलकाच्या फोनमधले केलेले आणि आलेले (कॉल्ड आणि रिसीव्ह्ड नंबर्स) कॉल्स यांच्या याद्या पाहतांना महेशचे नाव दिसले आणि मी कॉलचे बटन दाबले. त्यात नेमका काय गोंधळ झाला होता ते मला अजून समजलेले नाही.
हॅलो, हॅलो करून झाल्यावर मी म्हंटले "महेश, तू कुठे आहेस, केंव्हा येणार आहेस?"
पलीकडून "अं.. अं.. कोण महेश?" वगैरे भांबावलेले उद्गार ऐकल्यानंतर "सॉरी, राँग नंबर" असे म्हणून मी फोन बंद केला. सेव्ह केलेल्या लिस्टमधून महेशचा नंबर शोधून काढला. या वेळी त्यात काही चूक नाही याची खात्री करून घेतल्यावर मी कॉलचे बटन दाबणार एवढ्यात फोनची रिंग वाजली. अजयचा फोन होता. त्याच्या संवयीप्रमाणे आता तासभर तरी तो चालू ठेवणार याची गॅरंटी होती. त्याच्या घरातल्या सर्वांबरोबर आमच्या घरातल्या सर्वांनी बोलायचे आणि चुलत, मावस, आते, मामे भावंडांपासून ते वर्ल्डकप आणि सुनामीपर्यंत जगातल्या सगळ्या घटनांवर खुलासेवार चर्चा करायची तर एवढा वेळ लागणारच. एरवी असे तासतासभर बोलायला आम्हालासुध्दा आवडते, पण या वेळी माझ्यापाशी त्यासाठी वेळही नव्हता आणि गप्पा मारायचा मूडही नव्हता. लवकरात लवकर केंव्हा हा महेश प्रसन्न होऊन दर्शन देईल आणि मला उन्हात उभे राहण्याच्या तपश्चर्येपासून मुक्ती देईल असे मला झाले होते. त्यामुळे मी "अरे, आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर" एवढे सांगून त्याचा फोन कट केला आणि महेशाच्या आराधनेला लागलो.

थोड्या वेळाने तो आला आणि मी त्याला आमच्या गाडीची हकीकत सांगत होतो तेवढ्यात मोबाईल वाजला. यावेळी शिल्पा लाईनवर होती. महेशशी चाललेले बोलणे अर्धे सोडून तिच्याशी बोलणे त्या क्षणी मला शक्य नसल्यामुळे "आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर" असेच तिलाही सांगितले. गाडी रिपेअर झाल्यानंतरही महिलामंडळाची सभा संपायला वेळ होता. त्यांच्यामध्ये जाऊन मला 'बायकात पुरुष लांबोडा' व्हायचे नव्हते, म्हणून जवळ रहात असलेल्या रश्मीच्या घरी गेलो. मला असा अचानक आलेला पाहून तिला आनंद झाला, आश्चर्य वाटले की रिलीफ वाटला अशा संमिश्र भावना आणि अनेक प्रश्न तिच्या चेहे-यावर दिसत होते.
"काका, तुम्ही कसे आहात आणि मावशी कशी आहे, ती कुठे आहे?" तिने आल्या आल्या माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. असे काय झाले होते ते मलाच समजेना.
"अहो आम्ही सगळे केवढ्या काळजीत होतो?" रश्मी म्हणाली
"आम्ही दोघेही मजेत आहोत" मी सांगितले, "पण तुम्हाला आमची काळजी करायला काय झालं?"
आमची गाडी बंद पडल्याची बातमी सुध्दा यांच्यापर्यंत पोचण्याचे काहीच कारण मला दिसत नव्हते. ती पुलावर उभी असल्याचे कोणी जाणा-या येणा-या ओळखीच्या माणसाने पाहिले असले तरी मग तो मदतीला का आला नाही? आणि ती गोष्ट यांना सांगायची काय गरज होती?
"आत्ता मला माझ्या आईचा फोन आला होता, ती तुमची चौकशी करत होती"
"का?"
"कारण तिला शिल्पाचा फोन आला होता आणि ती सांगत होती की तुम्ही तिच्याशी आणि अजयशीसुध्दा नीट बोलला नाहीत म्हणून!"
"बाप रे!"
"त्या सगळ्यांना असे वाटले की तुम्ही दोघे कसल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहात."
"तसे असते तर मग आम्ही तुम्हालाच सांगितले नसते का? तुमच्याशी बोलणे टाळले कशाला असते? या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? आधी अजयने मला कशासाठी फोन केला होता?"
माझ्या मनात प्रश्नच प्रश्न उठत होते.
हळूहळू त्याचा उलगडा झाला. मेकॅनिक महेशला मी केलेला फोन उदयला लागला होता. पण ते यंत्र महेश नावाच्या त्याच्या मित्राने त्याला थोड्या दिवसासाठी दिले होते. "महेश " एवढे नाव उदयने ऐकल्यावर महेशला निरोप देण्यासाठी उदयने फोन नंबर पाहिला तो ओळखीचा म्हणजे अलकाचाच होता. ही गोष्ट त्याने बाजूलाच बसलेल्या अजयला सांगितल्यावर चौकशी करून घेण्यासाठी त्याने अलकाला फोन लावला, तो तिने न उचलता मी उचलला आणि लगेच बंद केला. हे सगळे त्यांना अपेक्षित नसल्यामुळे इतरांना सांगितले आणि त्यांना काही माहिती आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे एका मोबाईलमुळे आम्ही सगळे एप्रिल फूल झालो!

Friday, April 01, 2011

फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (उत्तरार्ध)




११ मार्चपासून फुकुशिमा पॉवर स्टेशनमध्ये घडत गेलेल्या घटनांकडे पाहण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. माणसाच्या शरीरात जठर, यकृत, फुफ्फुसे वगैरे इंद्रिये असतात आणि त्यांचे कार्य कसे चालते वगैरे आपण पुस्तकातून शिकतो, पण केंव्हाही त्या इंद्रियांच्या आतमध्ये नेमके काय चालले आहे किंवा काय होऊन गेले हे आपल्याला बाहेरून समजण्याची कसलीही निसर्गदत्त सोय नाही. त्याचप्रमाणे रिअॅक्टरची रचना आणि कार्यपध्दती माहीत असली तरी त्याच्या अंतर्गत भागात नेमके काय घडत आहे याचे खडान् खडा वृत्त बाहेरून समजत नाही. त्यासाठी प्रेशर, टेंपरेचर यासारखी अनेक प्रकारची मोजमापे घेणारी आणि त्यांची नोंद ठेवणारी उपकरणे असतात, पण तीच बिघडून गेली तर त्यांच्यापासून मिळणारी माहिती मिळत नाही किंवा मिळालेली माहिती विश्वासार्ह रहात नाही. शरीराला आलेला ताप, सूज, मळमळ, जळजळ, खोकल्याची ढास, वेदना वगैरे बाह्य लक्षणांवरून ते व्याधीग्रस्त झाल्याचे समजते आणि नाडीपरीक्षा, रक्तदाब, रक्ताची तपासणी, क्ष किरण, सोनोग्राफी यासारख्या खास परीक्षणांमधून त्याचे निदान केले जाऊन त्यावर उपाययोजना होते. रिअॅक्टरमध्ये मोठा बिघाड झाला तर त्याची चिकित्सासुध्दा दृष्य, आवाज, तपमान यासारख्या बाह्य लक्षणांवरून आणि निरनिराळ्या ठिकाणी मोजलेली वेगवेगळ्या विकीरणांची तीव्रता यासारख्या काही मोजमापांवरून केली जाते आणि त्यावर उपाययोजना केली जाते. ती करतांना रिअॅक्टरच्या स्वास्थ्याची काळजी बाळगण्यापेक्षा त्यापासून माणसांना हानी पोचणार नाही किंवा ती कमीतकमी पोचावी याला प्राधान्य दिले जाते. या प्रयत्नांमध्ये रिअॅक्टरचे नुकसान झाले तर त्याची पर्वा केली जात नाही. रुग्णाला दिलेल्या औषधोपचारातून त्याचे जठर, फुफ्फुस, हृदय यांच्या काम करण्यात नेमका कोणता आणि किती फरक पडला हे शरीराच्या बाह्य लक्षणावरूनच ठरवावे लागते. त्याचप्रमाणे रिअॅक्टरमध्ये काय चालले आहे याचा अंदाजसुध्दा अशा बाह्य निरीक्षणावरूनच घ्यावा लागतो. हे काम करत असलेल्या तंत्रज्ञांना त्यातले जेवढे समजलेले असते त्यातला थोडासा भाग ते जाहीर करतात आणि त्यात स्वतःचे तिखटमीठ मिसळून वार्ताहर त्याला प्रसिध्दी देतात. यामुळे निरनिराळ्या वाहिन्यांवरील बातम्या आणि वर्तमानपत्रांमधले वृत्तांत यात तफावत आढळते. या विषयावरील जेवढी माहिती मला वेगवेगळ्या सूत्रांकडून घरबसल्या मिळाली, त्यातली जेवढी उमगली आणि सुसंगत वाटली त्याच्या आधारावर हा लेख लिहिला आहे. या घटनेची चौकशी करणा-या औपचारिक यंत्रणेशी माझा कसलाही संबंध नाही आणि कोणाचीही बाजू घ्यायचे मला कारण नाही हे आधीच नमूद करतो.

वर दिलेल्या पहिल्या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरवर चालणा-या वीजनिर्मितीकेंद्राचे रेखाचित्र आहे, दुस-या चित्रात रिअॅक्टर व्हेसलची अंतर्गत रचना आहे आणि तिस-या चित्रात रिअॅक्टर बिल्डिंगमधील रचना आहे. ही चित्रे प्रातिनिधिक आहेत. तंतोतंत फुकुशिमाची नाहीत. त्यामुळे तपशीलात थोडा फार फरक असू शकतो. माझ्या पहिल्या लेखात लिहिल्याप्रमाणे जेंव्हा हे केंद्र व्यवस्थित कार्य करत असते त्यावेळी इंधनातील भंजनक्रियेतून रिअॅक्टरमध्ये ऊष्णता निर्माण होते, त्यामधून प्रवाहित होत असलेल्या पाण्यापासून उच्च दाबाची वाफ तयार होते, त्या वाफेवर टर्बाइन चालते आणि त्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये निर्माण झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाते. टर्बाइनमधून बाहेर पडलेल्या वाफेचे कंडेन्सरमध्ये पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पाणी बाष्पीभवनासाठी रिअॅक्टरमध्ये परत जाते.

फुकुशिमा दायची विद्युतकेंद्रात अशा प्रकारचे सहा रिअॅक्टर आहेत. त्यापैकी युनिट क्र, ४, ५ आणि ६ काही दिवसापासून इन्स्पेक्शन, मेंटेनन्स वगैरेंसाठी बंद होते. ११ मार्च रोजी १, २ आणि ३ क्रमांकांची केंद्रे चालत होती. भूकंपाचा जोराचा धक्का बसताच ती आपोआप बंद झाली. त्यामधील फिशन थांबले असले तरी रेडिओअॅक्टिव्ह डिकेमधून मोठ्या प्रमाणावर ऊष्णता बाहेर पडत होती आणि ती वाहून नेणे आवश्यक होते. युनिट बंद होताच टर्बाइनचे फिरणे थांबते. त्यामुळे ही वाफ थेट कंडेन्सरकडे किंवा दुस-या हीट एक्स्चेंजरमध्ये नेऊन थंड करावी लागते. वाफेची निर्मिती थांबल्यानंतर तापत असलेले गरम पाणी या हीट एक्स्चेंजरमध्ये फिरवून निववले जाते. या पाण्याचे तसेच त्याला थंड करण्यासाठी समुद्रातील किंवा कूलिंग टॉवरमधील पाण्याचे अभिसरण करण्यासाठी काही पंप चालवावे लागतात. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमधील वाफ रेडिओअॅक्टिव्ह असल्याकारणाने ती हवेत सोडून देता येत नाही. तिला थंड करून बंदिस्तच ठेवावे लागते. गरजेनुसार रिअॅक्टरचे बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे या नेहमीच्या क्रिया असल्याने रिअॅक्टर बंद केल्यानंतर त्याला थंड करण्याची योजना सर्व ठिकाणी केलेली असते आणि एरवी ती सुरळीतपणे चालते. अशा वेळी पॉवर स्टेशनमधील इतर युनिट्स चालू असल्यास त्यांच्याकडून विजेचा पुरवठा उपलब्ध असतो. तो नसेल तर ग्रिडला जोडलेल्या तारांच्या जाळ्यामधून बाहेरची वीज मिळू शकते. ते सुध्दा शक्य नसेल तर पुरेशी वीजनिर्मिती करण्यासाठी मोठमोठी डिझेल जनरेटर्स तयार ठेवलेली असतात. त्याशिवाय मोठ्या बॅटरी बँक्स असतात. कंट्रोलरूममधील सर्व उपकरणे, त्यांना माहिती पोचवणारी सारी उपकरणे, काँप्यूटर्स, महत्वाच्या व्हॉल्व्ह्जची उघडझाप करणारी यंत्रे, महत्वाचे लहान पंप, यांत्रिक दरवाजे, लिफ्ट्स, उजेडाची व्यवस्था अशा सर्व अत्यावश्यक गोष्टी न थांबता (अनइंटरप्टेड) निदान आठ तास तरी चालत राहतील एवढी क्षमता या बॅटरी बँक्समध्ये असते.

फुकुशिमा येथे भूकंपामुळे तेथील सर्व युनिट्स एका क्षणात बंद झाली आणि विजेचे टॉवर्स व तारांना क्षति पोचल्यामुळे बाहेरील वीजपुरवठासुध्दा थांबला. पण अपेक्षेप्रमाणे डिझेल जनरेटर्स लगेच सुरू झाले आणि रिअॅक्टर्सना थंड करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तासाभरात सुनामीची १४ मीटर उंच अशी प्रचंड लाट आली आणि ७ मीटर उंच असलेल्या संरक्षक भिंतीला ओलांडून ती पॉवर स्टेशनमध्ये घुसली. स्टेशनमधील सर्व डिझेल जनरेटर्स तळमजल्यावर किंवा तळघरात ठेवलेले असल्यामुळे सुनामीच्या दणक्याने त्या सर्वांची मोडतोड होऊन ते निकामी झाले. गरज पडल्यास एका युनिटमधून इतर युनिट्सना मदत करता येण्याची व्यवस्था असते, पण सहा युनिटसाठी केलेली सर्व व्यवस्था अशी एकाच वेळी नष्ट होईल अशी कल्पना मात्र कोणी केली नसेल. तसेच देशभर सगळीकडेच हाहाःकार उडालेला असल्यामुळे बाहेरूनसुध्दा कसलीही मदत मिळणे अशक्य झालेले होते.

रिअॅक्टरची कूलंट सिस्टिम बिल्डिंगच्या अनेक भागात बरीच पसरलेली असते. त्यात पंप, व्हॉल्व्ह, हीट एक्स्चेंजर्स, फिल्टर्स, पाइप्स, फिटिंग्ज वगैरे बरीच इक्विपमेंट्स असतात. कोणत्याही कारणाने त्यातल्या कशामधूनही पाण्याची गळती झाल्यास रिअॅक्टरला होणारा पाण्याचा पुरवठा खंडित होतो आणि त्याचे तपमान वाढायला लागते. अशा आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी खालील व्यवस्था रिअॅक्टरमध्ये केलेल्या आहेत.
हाय प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कूलंट इंजेक्शन
स्टँडबाय लिक्विड कंट्रोल सिस्टिम
ऑटोमॅटिक डिप्रेशरायझेशन
यातील प्रत्येक सिस्टिमसाठी वेगवेगळ्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवले असते. जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे क्रमाक्रमाने त्या सिस्टिम्स कार्यान्वित होतात आणि रिअॅक्टरला थंड करण्याचे काम करतात. या कामासाठी कधीही पाण्याचा तु़टवडा पडणार नाही हे विश्लेषणातून तसेच प्रात्यक्षिकांमधून सिध्द करावे लागते. मात्र हे काम करतांना कुठली ना कुठली वीज उपलब्ध असेल असे गृहीत धरावे लागते आणि त्याचीही भरपूर योजना केलेली असल्यामुळे ती नाही असे यापूर्वी कधी झाले नाही. पण यावेळची परिस्थिती अकल्पनीय अशी होती.

डिझेल जनरेटर्स बंद पडल्यानंतर बॅटरी बँक्सचे नक्की काय झाले हे माहीत नाही, पण एकाच वेळी सर्व रिअॅक्टर्सना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे काम होते याची कल्पना होती. त्यामुळे लगेच आणीबाणीची घोषणा केली गेली आणि २० किलोमीटरच्या परिसरातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तीनही रिअॅक्टरमधील तपमान वाढत गेले, त्यातून हैड्रोजन वायू तयार झाला आणि तो बाहेर पडून त्याचा स्फोट झाला हे माझ्या पहिल्या लेखात लिहिले होते. असा हैड्रोजन वायू कमी प्रमाणात तयार झाला असेल तर त्याला हवेत सोडण्यापूर्वीच एका बंद चेंबरमध्ये जाळून टाकण्याची व्यवस्था असते. इतर सारे सुरळीत चालले असते तर कदाचित हे काम सुनियंत्रित रीतीने करता येऊ शकले असते. पण हैड्रोजन वायूचा दाब इतका वाढला होता की त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्याने रिअॅक्टर व्हेसलला फोडून बाहेर पडण्यापूर्वी त्याला बाहेर पडण्याची वाट मोकळी करून देणे भाग होते. त्यातून झालेल्या स्फोटामुळे बिल्डिंग्जची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या.

रिअॅक्टर्समध्ये हे महाभारत चालले असतांना त्याच्या शेजारी असलेल्या स्पेंट फ्यूएल पूलमधील पाणी थंड करणे तर थांबलेले होतेच, त्या पाण्याची वाफ होऊन त्याची पातळी खाली जातच होती. रिअॅक्टर क्रमांक ४ मध्ये मुख्य रिअॅक्टरपेक्षा या स्पेंट फ्यूएल पूलने जास्त उग्र रूप धारण केले. हा ओपन टँक असल्यामुळे त्यात प्रेशर वाढण्याचा प्रश्न नसला तरी तपमान वाढत जाणे धोकादायक होते. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये आग लागली. नेहमीची अग्निशामक व्यवस्था चालत नसल्यामुळे हॅलिकॉप्टरमधून पाण्याचा वर्षाव करण्यात आला. एका युनिटमध्ये आलेला प्रॉब्लेम इतर ठिकाणीसुध्दा येण्याची शक्यता असल्यामुळे सगळीकडे पाणी टाकण्यात आले.

रिअॅक्टर किंवा स्पेंट फ्यूएल पूल अशा महत्वाच्या जागी अत्यंत शुध्द असे डिमिनरलाइज्ड पाणी वापरले जाते. पण ते तयार करणारी यंत्रणा तसेच त्याला नियोजित जागी नेण्यासाठी लागणारे पंप वगैरे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून तात्पुरते पंप आणि फायर इंजिन्स मागवून चक्क समुद्रातले पाणी उपसून सगळीकडे शिंपडण्यात येत होते. कारण काही केल्या रिअॅक्टरला होईल तितके निववायचे प्रयत्न करत राहणे भाग होते. या घाणेरड्या पाण्यामुळे सारी यंत्रे खराब होतील, त्यात मिठाचे थर साठतील, त्याचे भाग गंजतील, नंतर ती साफ करता येणार नाहीत वगैरेवर विचार करायलासुद्दा वेळ नव्हता इतकी तातडीची गरज होती.

जपानमधील परिस्थिती कोलमडलेली असल्यामुळे अमेरिकेतून मोठाल्या बार्जवरून पाणी आणले गेले आणि समुद्राच्या पाण्याऐवजी आता त्याचा वापर सुरू झाला आहे. तसेच अमेरिकेसह परदेशातून मोठमोठे पोर्टेबल पंप आले आहेत आणि ते पंप पाइपामार्फत जोडण्याचे प्रयत्न चालले आहेत. बेसमेंटमधले डिझेल जनरेटर्स सुरू करणे शक्यच नसल्यामुळे दोन तीन किलोमीटर नव्या केबल्स टाकून बाहेरून वीजपुरवठा करण्यात आला आहे. आता स्टेशनमधील सुस्थितीमध्ये असलेल्या पंपाना ती वीज पुरवण्यासाठी जोडणी करण्यात येत आहे. हे सगळे काम करण्यासाठी कामगारांना रिअॅक्टरच्या जवळ जावे लागते आणि रेडिओअॅक्टिव्हिटीच्या लेव्हल्स पाहून कमीत कमी वेळात होईल तेवढे काम करून परत फिरावे लागते. त्यामुळे त्यात अनपेक्षित असे अडथळे येतात.

रिअॅक्टरला थंड करण्यासाठी ओतलेले पाणी वाहून कुठे जाणार? एरवी संपूर्णपणे बंदिस्त अशा सिस्टिममध्ये त्याचे अभिसरण होत असते. पण आता बाहेरून टाकलेले पाणी खाली साचून त्याची डबकी बनणे अपरिहार्य आहे. आधीच सुनामीमुळे आलेले पाणी साठले होतेच त्यात नवी भर पडत आहे. या पाण्याला थेट समुद्रात नेऊन सोडता येत नाही. वाफ बनून हवेत आणि जमीनीतून झिरपत ते हळूहळू कमी होणार. रिअॅक्टरचे कंटेनमेंट अभेद्य राहिले तरी या मार्गाने काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये पर्यावरणात मिसळत आहेत. जसजसा वेळ जाईल तसतशी रिअॅक्टरमधील ऊष्णता कमी होत जाणार हे पाहता त्यावर पाणी शिंपडणे कमी करून त्याची डबकी साचण्यावर नियंत्रण केले जात आहे. अशा प्रकारचे अनेकविध प्रयत्न चालले आहेत.

देशभर जागोजागी रेडिओअॅक्टिव्हिटीची मोजणी करून तेथील पाणी किंवा अन्नपदार्थ खाण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहेत. हवेमधून रेडिओअॅक्टिव्ह दूषित हवा शरीरात येऊ नये म्हणून तोंडावर मास्क लावणे, शक्य तोवर बंदिस्त घरातून बाहेर न पडणे यासारखे सुरक्षिततेचे उपाय योजले जात आहेत. आयोडीनच्या गोळ्या वाटल्या जात आहेत. या सगळ्यामुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे यात शंकाच नाही. पण सर्व अडचणींवर मात करून यातून बाहेर पडण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)