Friday, April 26, 2013

एप्रिल फुल्ल

नोकरीत असतांना जसजशी वरची पदे मिळत जातात, तसतसा कामाचा व्याप आणि जबाबदा-या वाढत जातात, दिवसातला सगळा वेळ त्यात निघून जातो. सेवानिवृत्तीच्या वेळी आपण आपल्याला मिळालेल्या सर्वात मोठ्या पदावर असल्यामुळे कामांचा बोजाही सर्वात जास्त असतो. "त्यानंतर ही जबाबदारीची कामे एकदम शून्यावर आल्यामुळे जीवनात एक प्रचंड पोकळी निर्माण होते, दिवसातला एक एक क्षण जाता जात नाही." वगैरे वर्णने मीसुध्दा अनेक वेळा वाचली होती, पण मला त्या अवस्थेची कधीच भीती मात्र वाटली नाही. वेळेअभावी केल्या न गेलेल्या कित्येक कामांचा ढीग मनाच्या एका कोप-यात जमा झाला होताच. रिटायरमेंटनंतर एक एक करून ती हाती घ्यायची आणि सावकाशपणे पूर्ण करायची असे ठरवले असल्यामुळे आता मिळणारा रिकामा वेळ ही माझ्या दृष्टीने 'बॅकलॉग' भरून काढण्याची संधी होती.

सेवानिवृत्त झाल्यानंतर मी त्या संधीचा फायदा घ्यायचे ठरवलेलेच होते. जीवनासाठी किंवा कुटुंबासाठी अत्यावश्यक असलेली कामे मी अर्थातच जेंव्हा जेंव्हा त्यांची गरज पडली तेंव्हा काही करून वेळच्या वेळी पूर्ण केलेली होती. ही उरलेली बहुतेक कामे केवळ स्वतःच्या आनंदासाठी करायची असल्यामुळे त्यांना यापूर्वी पुरेशी प्राथमिकता (प्रायॉरिटी) मिळालेली नव्हती. ती न केल्यामुळे माझे किंवा कुणाचेच काही अडलेले नव्हते आणि पुढेही अडणार नव्हते. त्यामुळे आता घाई गडबड न करता त्यात मन रमवून त्याची मजा घेत घेत ती करायची होती. यात अनेक प्रकारची कामे होती. काही सिनेमे, नाटके, संगीताचे कार्यक्रम वगैरे पहायची हौस उरली होती, तर काही सुरम्य किंवा सुप्रसिध्द ठिकाणे पहायची तीव्र इच्छा राहून गेली होती, मनाने जवळच्या पण दूर राहणा-या काही आप्तेष्टांना जाऊन भेटायचे होते, काही गाजलेली पुस्तके वाचायची होती, काही हस्तकौशल्याच्या वस्तू तयार करायच्या होत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक गोष्टी शिकायच्या राहून गेल्या होत्या. या सगळ्यांना 'कामे' म्हणावे की नाही याबद्ल मतभेद होऊ शकतो, पण मला हे सगळे करायचे होते असे म्हणता येईल.

वयोमानाप्रमाणे हात, पाय, कान, डोळे वगैरे इंद्रिये पूर्वीसारखी सक्षम राहिली नव्हती आणि आता त्यांच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नव्हती. त्यांच्याकडून होईल तेवढे काम करवून घेणे एवढेच माझ्या हातात होते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून दृष्टी सुधारून घेतली असे काही उपाय करून त्यांचा थोडा उपयोग झाला, पण त्यानंतर वेगळ्या प्रकारचे निर्बंधही पडले. यापुढे आपली शारीरिक क्षमता पाहून शरीराला सांभाळून जेवढे होईल तेवढे करणे आवश्यक होते. थोडक्यात म्हणजे आता फारशी धावपळ न करता, उन्हापावसात बाहेर न हिंडता, अवजड वस्तू न उचलता वगैरे पथ्ये सांभाळून काय करणे शक्य आहे ते पाहून हातात घेणे भाग होते.

अशासुध्दा अनंत गोष्टी करण्यासारख्या होत्या. त्यातल्या संगणकावर मी आपले लक्ष केंद्रित केले. नोकरीवर असतांना तिथे चालणारे काँप्यूटरवरील काम मी चांगले आत्मसात केले होते, पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी माझ्या हाताखाली सहाय्यकांची फौज होती. आता मात्र कोणाच्याही सहाय्याशिवाय स्वतःच शिकायचे, प्रयोग करून पहायचे आणि पुढे जायचे होते. या क्षेत्रात इतक्या वेगाने बदल होत असतात की हे शिकणे सतत चालत राहते. नवनवे सॉफ्टवेअर येत असते हे ठीक आहे, पण त्याबरोबर जुने अदृष्य होत असते हे त्रासदायक वाटते, शिवाय नव्या सॉफ्टवेअरसाठी जितकी मेमरी आणि स्पीड लागते त्यासाठी आपला जुना काँप्यूटर कमी पडतो, त्याला अपग्रेड करत रहावे लागते. या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो. इंटरनेटवर झालेल्या क्रांतीमुळे एक संपूर्ण वेगळे जग आपल्यासमोर उभे राहिले आणि मुख्य म्हणजे आपणसुध्दा त्यात नवी भर घालू शकतो ही जाणीव झाल्यावर तर दिवसाचा बराच वेळ त्यात मजेत जाऊ लागला. यातूनच एक ब्लॉग सुरू केला, तो वाचणारे मिळाले आणि हुरुप आला, त्यानंतर एक एक करून आणखी दोन ब्लॉग मराठीत सुरू केले आणि या वर्षी इंग्रजी भाषेत माझा पहिला ब्लॉग सुरू केला. या सगळ्यांना चालवत राहणे हे सुध्दा एक 'काम' होऊन बसले. 

वयोमानाप्रमाणे स्मरणशक्ती थोडीशी मंदावते आणि विशेषतः विशिष्ट वार, तारखा वगैरे लक्षात रहात नाहीत. एकादी गोष्ट विसरली जाऊ नये यासाठी जेंव्हा ती लक्षात असते तेंव्हाच मी कॅलेंडरवर त्या तारखेला लिहून ठेवायला सुरुवात केली. दिवसातून एकाद्या वेळी तरी काही कारणाने कॅलेंडर पाहिले जाते आणि तेंव्हा ती खूण दिसल्यामुळे ती गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहते. बहुतेक महिन्यांमध्ये अशा चार पाच खुणा असायच्या, पण आज मी कॅलेंडर पाहिले तर त्यात जिकडे तिकडे खुणाच खुणा भरलेल्या होत्या. या महिन्याची सुरुवातच आधार कार्डाने झाली. हे कार्ड मिळायला सुरुवात झाल्यापासून मला हुलकावण्या देत आले होते. याची नोंदणी कुठे करायची याचा मला पत्ता लागंस्तोवर त्या केंद्रावर प्रचंड गर्दी होत असे आणि गर्दी थोडी कमी झाल्यावर जाऊ म्हंटले तर ते केंद्रच बंद झालेले असे गेली दोन वर्षे चालले होते. या वर्षी मात्र मी नेटाने पाठपुरावा केला, त्यासाठी निदान दहा चकरा मारल्या आणि एका केंद्रावर ३ एप्रिलची तारीख मिळवून घेतली. त्या दिवशी सहकुटुंब तिथे जाऊन हाताचे ठसे, डोळ्यांचे रंग वगैरेंची नोंद करून झाली. त्याच्या आधी सगळी कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या झेरॉक्स प्रती काढणे वगैरे कामे करून घेण्यात वेळ गेला, पण सगळी तयारी व्यवस्थितपणे केलेली असल्यामुळे आमचे काम एकाच खेपेत आटोपले. त्या दिवशी तिथे आलेल्या काही लोकांना अमका तमका कागद घेऊन येण्यासाठी धावपळ करतांना पाहिले आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली.   

एप्रिलच्या दुस-या आठवड्यात माझ्या वडील भावाच्या वर्षश्राध्दासाठी बार्शीला जाऊन पुणेमार्गे परत आलो. या प्रवासासाठी तिकीटांचे आरक्षण करणे, त्यात आयत्या वेळी झालेल्या बदलांमुळे परतीचे तिकीट रद्द करणे वगैरेंमध्ये दोन दिवस गेले आणि चार पाच दिवसांचा प्रवास करून परत येईपर्यंत गुढी पाडवा आला, त्याची तयारी करणे, त्यानिमित्याने हॅप्पी न्यूयीअर विश करणा-या मित्र आणि आप्तेष्टांशी बोलणे, त्यांच्या संदेशांना उत्तरे देणे वगैरे होत राहिले. आमच्या ऑफिसमधून निवृत्त झालेल्या सहका-यांचा आम्ही एक गूगल ग्रुप बनवला आहे. त्यावर रोजच संदेशांची देवाण घेवाण होत असते. अधून मधून प्रत्यक्ष भेटावे या उद्देशाने आम्ही या महिन्यात एक स्नेहसंमेलन भरवले. मी त्यातही पुढाकार घेतल्यामुळे मित्रांना ई मेल पाठवून तसेच टेलीफोनवर बोलून आग्रह करणे, किती जण जमत आहेत याची मोजदाद ठेवणे आणि त्यानुसार त्यासाठी हॉटेल ठरवणे, तिथले रिशर्वेशन करणे, तिथे पोचण्याचे नकाशासह सचित्र मार्गदर्शक पत्रक तयार करणे, वगैरे कामे आठ दहा दिवस पुरली आणि पुढले तीन चार दिवस त्याचे वृत्तांत, छायाचित्रे आणि अनेक मित्रांचे त्यावरील साद प्रतिसाद पाहण्यात आणि वाचण्यात गेले..

या नव्या वर्षात मी 'आगे बढो इंडिया' अशा विचित्र नावाच्या एका संस्थेचा सभासद झालो आणि त्यांच्या सहाय्याने घरबसल्या मराठी नाटकांची तिकीटे मिळण्याची सोय झाली. रिटायरमेंटनंतर माझे नाट्यप्रेम वाढले असले तरी आधी वर्तमानपत्रामध्ये नाटकांच्या जाहिराती बघून त्यातले कोणते नाटक पहायचे हे ठरवणे, नाट्यगृहाच्या वेळेमध्ये तिथे जाऊन तिकीटांचे अॅडव्हान्स बुकिंग करणे वगैरे जास्तीची कामे जमत नसल्यामुळे आमच्याकडून दोन तीन महिन्यांमध्ये एकादे नाटक पाहिले जात असे. या मराठी नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात 'आगे बढो इंडिया'च्या सौजन्यामुळे एकदम तीन नाटके पाहून घेतली.

माझ्या वयाच्या बहुतेक लोकांच्या मुलांची लग्ने होऊन गेली आहेत आणि नातवंडे खूप लहान आहेत, यामुळे लग्नसमारंभांच्या आमंत्रणांचा आकडा आता अगदी कमी झाला होता. पण या वर्षी या महिन्यात कसला योग आहे कुणास ठाऊक, पण एक उत्तर भारतीय, एक मराठी आणि एक शीख अशी तीन लग्ने आली. ते तीघेही जवळचे मित्र असल्यामुळे त्या लग्नांना जायचे हे तर नक्कीच. नोकरीत असेपर्यंत कामामुळे वेळ नाही किंवा मुलांच्या शाळाकॉलेजांना सुटी नाही, त्यांची परीक्षा आहे अशी काही कारणे किंवा सबबी असायच्या. आता तशी कारणे उरली नाहीत आणि उगाच कशाला द्यायची? या निमित्याने अनेक लोक भेटतात, जुन्या आठवणी निघतात, नव्या ओळखी होतात, यामुळे आम्ही अशा संधी सोडत नाही. त्या कार्यक्रमांसाठी क२लेंडरवर तीन दिवसांचे बुकिंग करून टाकले.

याशिवाय निरनिराळे स्पेशॅलिस्ट आणि जनरल डॉक्टर, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज वगैरेंच्या अॅपॉंइंटमेंट्स तीन चार दिवशी होत्या, त्यासाठी वाशीपासून पेडर रोडपर्यंत मुंबईच्या निरनिराळ्या भागांमध्ये जाऊन येण्यात एक संपूर्ण दिवस निघून जात असे. या महिन्यातच सौ.चा वाढदिवस आला, त्यानिमित्य बाहेर खाणेपिणे झाले. तीन चार पाहुणे येऊन, भेटून आणि एकादा दिवस राहून गेले. त्यांची थोडीशी सरबराई केली. हे सगळे करता करता एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या वेळचा एप्रिल महिना अगदी 'फुल्ल' गेला. अजून दोन तीन दिवस शिल्लक असले तरी त्या दिवसांचे कार्यक्रम कॅलेंडरवर लिहिलेले आहेत. त्यामधून वेळ काढून हा लेख लिहिण्याइतका वेळ तरी मिळेल की नाही याची शेका असल्याने तो आजच लिहून टाकला. १ एप्रिलच्या दिवशी 'एप्रिल फूल' म्हणणे आता जुने झाले. मागे एकदा मी 'एप्रिल फुले' यावर लिहिले होते, आता या वर्षी 'एप्रिल फुल्ल' !

Thursday, April 25, 2013

जय बोलो हनुमान की


माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये चैत्र महिन्यात येणारी रामनवमी आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी येणारी हनुमानजयंती यांना एक विशिष्ट स्थान आहे. रामनवमीच्या दिवशी गावातल्या एकुलत्या एक रामाच्या देवळात दुपारी कीर्तन असायचे आणि त्यात रामाच्या जन्माचेच आख्यान दर वर्षी असायचे. कीर्तनकार आपले निरूपण छान रंगवत असत आणि बरोबर दुपारी बाराच्या ठोक्याला त्यांच्या कथेत रामाच्या जन्माची घटना यायची. आमच्या गावात मारुतीची अनेक देवळे होती. रामाच्या देवळात वर्षातून एकदाच जाणे होत असले तरी गावाच्या मधोमध म्हणजे आजच्या भाषेत 'सिटीसेंटर'ला असलेल्या मारुतीच्या देवळासमोरील कट्ट्यावर दररोज संध्याकाळी झाडून सगळ्या मित्रांची हजेरी लागायचीच. आधी निरनिराळ्या मैदानांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये खेळून आणि फेरफटका मारून झाल्यानंतर सगळ्यांनी त्या कट्ट्यावर घोळक्याने जमून थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि नंतर आपापल्या घरांच्या दिशेने प्रयाण करायचे असे ठरलेले होते. निघायच्या आधी त्या देवळामधील हनुमानाच्या पूर्णाकृती प्रतिमेला प्रदक्षिणा घालून त्याच्या पायाला हात लावणे होत असे. त्या भव्य मूर्तीच्या खोल बेंबीत बोट घालणेसुध्दा शक्य होते, पण तसे करायचे कुणालाच कधी सुचले नाही. शिवाय तिथे विंचू दडून बसलेला असण्याची भीतीही होती. इतर देवांच्या देवळातल्या गाभा-यात लहान मुलांना सहज प्रवेश मिळत नसे, काही ठिकाणी तर अत्यंत कडक सोवळे ओवळेही असे, पण मारुतीच्या देवळात मात्र कुणालाही कोणाचीही आडकाठी नसल्यामुळे तो देव जास्तच जवळचा वाटायचा. त्याचा उल्लेखही नेहमी एकवचनामध्येच होतो. हनुमानजयंतीच्या दिवशीसुध्दा तिथे समारंभाचा फारसा फापटपसारा नसायचा. भल्या पहाटे उठून दर्शनाला येणा-यांची संख्या त्या दिवशी थोडी जास्त असायची एवढेच.     

हनुमानजयंतीच्या दिवशी सकाळी काही मित्रमंडळी भल्या पहाटे उठून एकाद्या मित्राच्या घरी जमत असू. त्याच्या आदल्या दिवशीच कोणाकडून पालखी, कोणाची चादर किंवा शाल, कोणाकडे असलेली तसबीर, सजावटीचे सामान वगैरे जमवून तयारी केलेली असायची. सकाळी थोडी ताजी फुले तोडून त्यांना वहायची आणि मग त्या हनुमानाच्या प्रतिमेची गल्लीमध्ये मिरवणूक निघत असे. "राम लक्षुमण जानकी। जय बोलो हनुमानकी।" अशा आरोळ्या देत आमची छोटीशी वानरसेना दोन तीन गल्ल्यांमधून फिरून परतत असे. हा फक्त लहान मुलांचा उत्सव असायचा. मोठ्या लोकांनी वाटले तर दोन हात जोडून नमस्कार करावा यापेक्षा जास्त अपेक्षा नसे.

मारुतीच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. त्याची आई अंजनी आणि वायुदेवता हे एकमेकांना कसे आणि कुठे भेटले आणि त्यांचे लग्न कसे झाले, संसार कसा झाला वगैरे तपशीलात शिरायची गरज मला लहानपणी कधी पडली नाही आणि मोठेपणी त्यात काही स्वारस्य उरले नाही. पण बालक मारुतीने जन्माला येतांनाच उगवत्या सूर्याचे बिंब पाहिले आणि ते एक गोड असे लालबुंद फळ आहे असे वाटल्यामुळे ते खाण्यासाठी त्याने आकाशात उड्डाण केले अशी कथा आहे. हनुमानाच्या अंगात अचाट शक्ती होती, पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नव्हती, त्यामुळे तो आधी सुग्रीवाचा आणि नंतर रामाचा दास राहिला आणि त्यांनी दिलेली कामगिरी करत राहिला असेही म्हणतात. मारुतीची शेपूट त्याला हवी तेवढी वाढवता येत होती. तिच्या लांबीला अंत नव्हता. त्यामुळे अनंत किंवा 'इन्फिनिटी' या शब्दांचा अर्थ 'मारुतीचे शेपूट' या वाक्प्रचारामधून लक्षात ठेवला होता.

समुद्र उल्लंघून मारुती लंकेत गेला, तिथल्या अशोकवाटिकेमध्ये बसलेल्या सीतेला त्याने शोधून काढले, रामाच्या बोटामधील मुद्रिका तिला दाखवून आपली ओळख पटवून दिली, त्यानंतर त्या वनाचा विध्वंस केला. राक्षसांकडून स्वतःला कैद करून घेतले. रावणासमोर गेल्यावर धिटाई आणि उध्दटपणा दाखवून त्याला डिवचले, आपला जीव आपल्या शेपटीत आहे असे सांगून फसवले आणि त्याने शेपटीला लावलेल्या आगीने त्याची सोन्याची लंका जाळून भस्मसात केली वगैरे रामायणामध्ये दिलेला कथाभाग खूपच मजेदार आहे. लहान असतांना तो ऐकतांना आणि रंगवून सांगतांना खूप मजा वाटत असे.  त्यानंतर रामरावणाचे भयंकर युध्द झाले. त्यात लक्ष्मणाला एक शक्ती वर्मी लागली आणि तो मूर्छित झाला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृभ फक्त एकाच पर्वतावर होते आणि  ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला. हा भागसुध्दा चमत्कृतीपूर्ण आहे. मारुती आणि कृष्ण या दोघांनी अशा प्रकारे डोंगर, पर्वत वगैरे उचलले असल्यामुळे हे भूभाग भाताच्या मुदीसारखे जमीनीवर अलगद ठेवलेले असतात असेच मी लहानपणी समजत होतो.

मारुतीसंबंधी लहानपणची दुसरी आठवण थोडी विसंगत पण मजेदार आहे. मोहरमच्या दिवसात अनेक लोक निरनिराळी सोंगे घेऊन रस्त्यामधून फिरत असत. बागवान लोकांची मुले पट्ट्यापट्ट्यांचे वाघ बनत असत, तर काही जण अस्वलासारख्या इतर प्राण्यांची सोंगे घेत. यातले कित्येक लोक गैरमुस्लिम असत. 'भीम्या' की 'शिद्राम्या' अशा नावाचा असाच एक माणूस दरवर्षी मोहरममध्ये चक्क मारुतीचे सोंग घेत असे. अंगापिंडाने धिप्पाड आणि आधीच काळा कभिन्न असलेला तो माणूस त्याच्या केसाळ अंगाला काळा रंग फासून आणि कंबरेला जाड दोरखंडाची एक लांब शेपटी बांधून रस्त्यातून उड्या मारत धावत सुटे आणि पटकन एकाद्या घराच्या छपरावर, विजेच्या खांबावर किंवा झाडाच्या उंच फांदीवर चढून बसे. दोन्ही गाल फुगवून हुप्प करणे, नखांनी अंग खाजवत बसणे, हातानेच आपली शेपूट उचलून इकडे तिकडे आपटणे अशा त्याच्या लीला चाललेल्या असत. पट्टेदार वाघ वाजत गाजत आणि संथगतीने फिरत असायचे आणि मोठ्या रस्त्यांवरून चालतांना सहजपणे दिसायचे, पण या हनुमानाला शोधात मुलेच गाव पिंजून काढत असत. मुलांमध्ये तो अतीशय पॉप्युलर होता एवढे नक्की. यात त्याला कसली कमाई होत असे कोण जाणे. एरवी त्याचा चरितार्थ कसा चालतो हे ही कुणाला माहीत नव्हते. त्याच्या अंगातली चपळाई पाहून लोकांना त्याच्याबद्दल थोडी शंकाच येत असावी. हा 'हिन्दू धर्माचा घोर अपमान' आहे अशी ओरड त्या काळात कोणी करत नव्हते किंवा त्यासाठी कोणीही त्याला त्रास देत नव्हते. कुठल्याशा पीराला कुणीतरी केलेला नवस फेडण्यासाठी तो माणूस असले सोंग घेतो अशी गावात अफवा होती. 'सेक्युलर' हा शब्द त्या वेळी कानावर आला नसला तरी गावातले वातावरण एका प्रकारे सर्वधर्मसहिष्णुतेचे असायचे.

संतांच्या वाङ्मयामध्ये हनुमानाची उपासनाही होती. संत रामदास तर रामाचे आणि त्याच्याबरोबर मारुतीचे परमभक्त होतेच, त्यांनी गावोगावी हनुमंताची देवळे उभारून त्याच्या उपासनेमधून शरीरसौष्ठव कमावण्याची मोहीमच हाती घेतली होती आणि जन्मभर चालवली होती. "हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी।" असा संत तुकारामांचा एक अभंग आहे. त्याची स्तुती करणारा एक श्लोक सगळ्या मुलांना नक्की शिकवला जात असे. तो असा आहे.  
मनोजवम् मारुततुल्यवेगम् । जितेंद्रियम् बुध्दीमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये।।   
या श्लोकानुसार हनुमान हा फक्त शक्तीशाली दांडगोबा नव्हता, तो सामर्थ्यवान तसेच अत्यंत चपळ तर होताच, शिवाय सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला तो उच्च प्रतीचा योगी होता, तसेच अत्यंत बुध्दीमान होता. यामुळेच त्याची गणना देवांमध्ये केली गेली.
आज हनुमानजयंती आहे. त्या निमित्याने या देवाचे स्मरण आणि त्याचे पायाशी प्रणाम.

Sunday, April 14, 2013

ट्यारपी म्हणजे काय गुरूजी?

शिष्य़ः प्रणाम गुरुजी
गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का?
शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत.
गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात.
शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात?
गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू .....
शिष्य़ः गुरूजी.
गुरूः आठवलं, ऐक. एका सुभाषितात असं म्हंटलंय् "घटम् भिन्द्यात् प़टम् छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् "
शिष्य़ः म्हणजे?
गुरूः अरे, घटम् भिन्द्यात् म्हणजे काय असेल?
शिष्य़ः धंद्यात घाटा?
गुरूः नाही रे, घटम् चा अर्थ काय हे तुला माहीत नाही का? अगदी माठ आहेस!
शिष्य़ः अरे हो, माठ किंवा मडकं.
गुरूः भिन्द्यात् म्हणजे त्याला फोडायचं. कृष्ण लहानपणी गोकृळात असतांना गोपिकांचे घट फोडायचा आणि बघ तो किती प्रसिध्द झाला?
शिष्य़ः पण मी लोकांचे माठ फोडले तर ते गप्प बसतील?
गुरूः कदाचित "प़टम् छिन्द्यात्" म्हणजे तुझे कपडे फाटेस्तोवर ते तुझी धुलाई करतील, तसे व्हायला नको असेल तर तू आपलाच एक मोठा माठ पाण्याने भरून चौकात घेऊन जा आणि आपल्याच हाताने धडाम् करून तो फोड किंवा आपल्या अंगावरचे कपडे आपणच टराटरा फाडून टाक.
शिष्य़ः कशासाठी?
गुरूः अरे, द्रौपदीने कृष्णासाठी तिच्या शालूमधून एक चिंधी फाडली आणि ती सुध्दा बघ किती प्रसिध्द झाली, नाही का?
शिष्य़ः पुढे काय?
गुरूः कुर्यात्
शिष्य़ः सदा मंगलम् ...
गुरूः तुला लग्नाची इतकी घाई झालीय् का?
शिष्य़ः मगाशी तुम्हीच "मंगलम् मंगलम्" म्हणत होतात ना?
गुरूः ध्यानधारणासाठी ते देवाचं स्तोत्र मी गुणगुणत होतो. ते जाऊ दे, पण तू म्हणालास त्याच्यातही थोडं तथ्य आहे. लग्नासाठी तयार होऊन आलेला नवरा मुलगा घोड्यावर बसून येतो, त्या ऐवजी तू गाढवावर बसून रस्त्यावर फेरफटका मार.
शिष्य़ः काहीही काय सांगताय्?
गुरूः अरे या श्लोकाचा अर्थ असा आहे की "वाटल्यास माठ फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे (असे काही तरी जगावेगळे विचित्र काम केले की त्या माणसाकडे सगळे लोक कुतूहलाने पहायला लागतात,) त्यातून त्या माणसाला लगेच प्रसिध्दी मिळते." तो कोण आहे याची लोक चौकशी करतात, त्याच्याकडे बोट दाखवून एकमेकांना दाखवतात. गावातले सगळे लोक त्या माणसाला ओळखायला लागतात. तो काय सांगतोय् आणि काय दाखवतोय् तिकडे लोकांचे लक्ष जाते. प्रसिध्द होण्याचा किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा हाही एक मार्ग आहे.
शिष्य़ः म्हणजे सगळे प्रसिध्द लोक असलं काही करतात का?
गुरूः नाही रे, जेंव्हा महान लोक चांगली आणि भरीव कामगिरी करतात तेंव्हा ती लोकांना दिसते, जाणवते आणि आपोआपच लोक त्यांच्याबद्दल आदराने बोलतात. तशा प्रकाराने मिळणारी प्रसिध्दी दीर्घकाळ टिकणारी असते. पण ज्यांना काही चांगली कामे करायचीच नसतात पण प्रसिध्द तर व्हायचं असतं त्यांच्यासाठी मी सांगितलेला शॉर्टकट आहे. अशी प्रसिध्दी तात्पुरतीच असते. या श्लोकात दडलेला दुसरा एक गूढ अर्थ पण आहे.
शिष्य़ः कोणता?
गुरूः समाजात अनेक प्रकारची माणसे असतात, काही अडमुठे नाठाळ 'माठ' मोक्याच्या जागा अडवून बसलेले असतात, त्यांना काठीने हाणायची कामगिरी काही लोक करतात, काही लोक बुरखा पांघरून किंवा पडद्याआड राहून उचापत्या करत असतात, त्यांचा बुरखा किंवा पडदा फाडून त्यांचे खरे चेहेरे आणि त्यांची कृत्ये जगासमोर आणायचे काम काही लोक करतात. काही लोक खूप कष्टाळू असतात, नेहमीच इतरांच्या विवंचनांचा भार स्वतः वाहतात. अशा चांगल्या लोकांच्या कामाचे मोल कळल्यानंतर त्यांचेही नाव होते. या लोकांना प्रसिध्दीची हाव नसते, प्रसिध्दी मिळवण्यासाठी ते लोक ही कामे करत नाहीत, पण तरीही ते सुध्दा प्रसिध्द होतात.
शिष्य़ः पण गुरूजी, या सगळ्याचा 'ट्यारपी'शी काय संबंध आहे?
गुरूः मी त्यावर येणार होतोच. समज तुला एकादी गोष्ट खूप लोकांना सांगायची असेल तर तुला त्यांच्यापर्यंत पोचायला हवं आणि त्यांनी ती ऐकायला हवी असेल तर त्यांनी तुझ्या सांगण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 
शिष्य़ः हो.
गुरूः तू किती लोकांपर्यंत पोचून त्यांना ती गोष्ट ऐकवू शकशील यालाच थोडक्यात 'टीआरपी' म्हणतात. काही करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले तर 'टीआरपी' वाढायला मदत होते.
शिष्य़ः पण हे 'ट्यारपी' म्हणजे काय?
गुरूः 'टीआरपी' हा जाहिरातींच्या क्षेत्रातला शब्द आहे. 'टारगेट रेटिंग पॉइंट्स' हा त्याचा फुल फॉर्म आहे. एकाद्या वस्तूची किंवा कार्यक्रमाची जाहिरात करतांना त्यासाठी असलेले संभाव्य ग्राहक म्हणजे 'टारगेट' असतात. ती जाहिरात त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रसार माध्यमाचा उपयोग केला जातो. ती जाहिरात किती लोकांनी वाचली, पाहिली किंवा ऐकली आणि त्याचा त्यांच्यावर किती परिणाम झाला वगैरेंची पाहणी करून त्याचा 'टीआरपी' ठरवतात. ते थोडेसे किचकट गणित आहे. पण टीव्हीवरला एकादा प्रोग्रॅम खूप लोक पहात असतील तर त्याचा टीआरपी वाढतो, त्यामुळे त्या प्रोग्रॅम्सच्या कमर्शियल ब्रेक्समध्ये जाहिरातींचा भडिमार होतो. तोच कंटाळवाणा आणि नकोसा झाला की त्याचा टीआरपी कमी होतो, त्याला जाहिराती मिळत नाहीत आणि तो बंद पडतो. असे घडत असतांना आपल्यालाही जाणवते ना?
शिष्य़ः हो.
गुरूः म्हणूनच 'लोकप्रिय होणे', 'प्रसिध्द होणे', 'लक्ष वेधून घेणे' अशासारख्या शब्दप्रयोगांना आताच्या भाषेत 'टीआरपी वाढणे' असा एक नवा विकल्प तयार झाला आहे. बरं हे सांग, तू हा शब्द कुठे ऐकलास?
शिष्य़ः मी सायबरलँडमध्ये भटकत असतांना तिथे 'वडापाव', 'घी रवा इडली', 'उपमा', 'शिरापुरी' वगैरेंचे पॅव्हिलियन पाहिले. तिथे 'ट्यारपी'वर्धक चूर्ण, टीआरपीटॉनिक कॅप्सूल्स वगैरे ठेवले होते. मला काही ते कळलं नाही.
गुरूः त्या पॅव्हिलियन्समध्ये तिथले मेंबरलोक आपापल्या डिशेस आणून ठेवतात आणि इतरांच्या पदार्थांच्या बाजूला आपल्याकडून चिरलेला कांदा, खिसलेलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू, चटणी, सॉस, लोणचं, पापड वगैरें ठेऊन त्याची चव वाढवू शकतात. जास्तीत जास्त लोकांनी त्या गोष्टी चाखून पहाव्यात असं हे सगळे मूळ आणि पूरक पदार्थ ठेवणा-यांना वाटणारच ना?
शिष्य़ः पण तिथं तर 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' असा सगळा प्रकार असतो. कोणीही कितीही डिशेस कितीही वेळा घेतल्या तरी त्या काही संपत नाहीत. लोकांनी त्या चाखल्या म्हणून त्यांना त्याचे काही दामही मिळत नाही. मग त्यांचा कसला खप आणि त्यातून कसला फायदा?
गुरूः इतक्या इतक्या लोकांनी आपल्या पदार्थाला स्पर्श केला हे सुध्दा ती डिश तिथे ठेवणा-याला समाधान देते, आपल्या श्रमाचं सार्थक झालं असं त्यांना वाटणार नाही का?
शिष्य़ः पण ते त्यांना कळणार कसं?
गुरूः त्यासाठी गणकयंत्रं बसवलेली असतात. प्रत्येक पदार्थ चाखून पहायला येणा-यांचा आकडा ती यंत्रं मोजत असतात. शिवाय त्यांच्या बाजूला ठेवलेल्या साइड डिशेसचीही नोंद ठेवली जाते. या दोन्हींचे आकडे मिळून त्या डिशच्या किंवा ती आणणा-याच्या टीआरपीचा साधारण अंदाज कुणाला वाटलं तर करता येतो. 
शिष्य़ः त्याचा काय फायदा?
गुरूः काही लोकांना त्यात खूप मजा वाटते. या पॅव्हिलियन्समध्ये आपले पदार्थ आणून ठेवणा-यांमध्ये निरनिराळ्या विचारांचे लोक असतात. त्यातल्या काही लोकांना नवनवे पदार्थ तयार करण्यातच आनंद वाटतो. कोणी तो चाखून पाहिला किंवा नाही याने त्यांना काही फरक पडत नाही. पदार्थ तिथे ठेवल्यावर कुणी कुणी तो चाखून पाहिला आणि त्याच्या बाजूला काय काय ठेऊन त्याची चंव कशी वाढवली हे काही जणांना खूप महत्वाचं वाटतं. काही लोकांचं मात्र किती लोकांनी तो पदार्थ पाहिला आणि किती लोकांनी त्याच्या बाजूला काय काय आणून टाकलं इकडे म्हणजे त्यांच्या टीआरपीकडे सगळं लक्ष असतं. तो कसा जास्तीत जास्त वाढवता येईल याचाच प्रयत्न ते सारखा करत असतात. मग त्या डिशच्या बाजूला जमलेल्या शंभर दोनशे वाट्या, वाडगे वगैरेंच्या ढिगा-यात मूळ पदार्थ दिसेनासा झाला तरी त्याचाही त्यांना अभिमान वाटतो. जगात अशा विविध प्रकारांनी विचार करणारी माणसं आहेत म्हणून तर त्यात गंमत आहे.
शिष्य़ः हे टीआरपीकॉन्शस लोक त्याला वाढवण्यासाठी काय करतात?
गुरूः हे सुध्दा साधारणपणे वर दिलेल्या उदाहरणासारखे असते.
शिष्य़ः म्हणजे?
गुरूः टीव्ही सीरियलवाले त्यांची टीआरपी वाढवण्यासाठी काय काय करतात ते आपण पहातोच ना?  ते पहाणा-या लोकांचं लक्ष 'येनकेन प्रकारेण' वेधून घ्यायचं आणि खिळवून ठेवायचं हा त्यांचा उद्देश असतो. हे कामसुध्दा सोपं नसतं. सगळ्यांना ते जमत नाही. काही लोकांच्याकडे ते कौशल्य असतं त्यामुळे ते टिकून राहतात. सायबरलँडमध्येही तसंच असतं.
शिष्य़ः अस्सं.
गुरूः टीव्हीवरल्या प्रोग्रॅम्समध्ये अजून तरी प्रेक्षक काही सहभाग घेऊ शकत नाहीत. सायबरलँडमध्ये ती जास्तीची सोय असते.
शिष्य़ः ती कशी?
गुरूः एका सदस्याने त्याचा पदार्थ आणून मांडून ठेवला की इतर सदस्य त्याच्या आजूबाजूला शाब्दिक फुलांची सजावट करतात, त्या पदार्थाला पूरक असे चविष्ट पदार्थ त्याच्या सोबतीला ठेवतात. त्यामुळे तो पदार्थ जास्त
लज्जतदार होतो, ती डिश आकर्षक होते, अधिकाधिक लोक ती चाखून पहायला येतात, त्यांच्या मित्रांना सुचवतात. त्यामुळे टीआरपी वाढत जातो.
शिष्य़ः हे नेहमीच होत असतं का?
गुरूः मूळ पदार्थ चांगला असला तर ते आपोआप होतं, पण काही मित्रमंडळी ठरवून एकमेकांचे पदार्थ सजवत असतात, मग ते कसे का असोत? बाहेरच्या जगाप्रमाणे इथेही काही युध्दे चाललेली असतात, त्यात एकमेकांच्या डिशेसवर शाब्दिक कचरा टाकला जात असतो. त्याचासुध्दा परिणाम दोघांचाही टीआरपी वाढण्यातच होतो.
शिष्य़ः गंमत आहे ना?
गुरूः इथे आणखी एक गंमत दिसते. एकाद्यानं शेवयाची खीर आणून ठेवली असली तर त्याच्या बाजूला कुणीतरी मटणाचा रस्सा आणून ठेवायचा असंही करता येतं..
शिष्य़ः हो?
गुरूः काही लोक लगेच त्या रश्श्याच्या जोडीला मिरची, मसाला, कांदा, लिंबू वगैरे ठेवतात. दुसरे काही लोक खिरीसाठी बदाम, काजू, बेदाणे वगैरे आणून टाकत राहतात. हे काय चाललं आहे ते त्रयस्थांना समजत नाही पण आता पुढे काय येणार आहे याची उत्सुकता असल्यामुळे तेही पुन्हा पुन्हा तिथे पहायला येतात. त्यामधून सगळ्यांचाच टीआरपी सटासट वाढत राहतो.
शिष्य़ः 'ट्यारपी'वर्धक चूर्ण, टीआरपीटॉनिक कॅप्सूल्स वगैरेंचा काय उपयोग असतो?
गुरूः ते त्याच्या नावातच दिलं आहे. त्यांचे सेवन केल्यावर टीआरपी वाढवण्याच्या निरनिराळ्या कल्पना सुचतात. पण त्यानं प्रत्येकाची टीआरपी वाढेलच याची काही गॅरंटी देता येणार नाही. सगळ्यांच्या प्रकृतीला ती द्रव्ये मानवतील असंही नाही.
शिष्य़ः असं आहे होय?
गुरूः तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली?
शिष्य़ः हां, थोडा अंदाज आला.

Saturday, April 06, 2013

निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स (उत्तरार्ध)


"बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी. प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो." हा निसर्गाचा नियम दिसतो. असे मी पूर्वार्धात लिहिले होते. आपण ज्याला न्याय- अन्याय, नीती- अनीती, कायदेशीर- बेकायदेशीर वगैरे म्हणतो त्याची निसर्ग कधीच पर्वा करतांना दिसत नाही. वादळ, अतीवृष्टी, महापूर, भूकंप, सुनामी वगैरे निसर्गाचे प्रकोप होतात तेंव्हा त्याच्या चपाट्यात जे कोणी सापडतील त्यांचा विनाश किंवा नुकसान होते. ते लोक धर्मनिष्ठ, परोपकारी, पुण्यवान, निरपराधी असोत किंवा अधर्मी, दुष्ट, दुर्जन, पातकी, अपराधी असोत, निसर्गाच्या विघातक शक्ती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्याच्या शाश्वत नियमांनुसार जे काही व्हायचे ते होते. कुणालाही चांगले फळ देतांनाही निसर्ग त्यात भेदभाव करत नाही. ज्या माणसाने झाड लावले, त्याची निगा राखली, त्याला पाणी दिले तो माळीसुध्दा त्याला लागलेल्या फळांचा मालक नसतो, ती फळे त्या झाडाच्या मालकाची असतात असे माणसांनी केलेला कायदा ठरवतो. पण कोणीही ती फळे काढू लागला तर ते झाड त्याला ती काढू देते. त्याला थांबवण्याची शक्ती निसर्गाने झाडांना दिलेली नाही. माणसांनी केलेल्या कायद्यांना इतर पशू, पक्षी मुळीसुध्दा जुमानत नाहीत. संधी मिळाली की ते येतात आणि त्यांना पाहिजे ते घेऊन जातात. माणसे घर बांधतात, पण किडे, मुंग्या, झुरळे, पाली इत्यादि असंख्य जीव त्यात येऊन आपलेच घर समजून राहतात. उंदीर, मांजर, माकडे या सारखे प्राणी आणि चिमण्या, कावळे, कबूतरे वगैरे पक्षी संधी मिळाली की दरवाजा किंवा खिडकीमधून घरात प्रवेश करतात आणि त्यांना मिळेल त्या अन्नपदार्थावर डल्ला मारतात. निसर्गाच्या शाश्वत अशा नियमांनुसार हे घडत असते. "कोणालाही संधी मिळाली तर त्याने तिचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही." असाही निसर्गाचा नियम असावा.

पण एक माणूस दुस-याच्या घरात शिरून वस्तू उचलून घेऊन गेला तर मात्र कायद्यानुसार ती 'चोरी' ठरते आणि त्या 'गुन्ह्या'साठी त्या चोराला 'शिक्षा' होऊ शकते. पण ती लगेच होत नाही. हे घडण्यामध्ये अनेक स्टेप्स असतात. मी कायद्यांचा अभ्यास केलेला नाही, पण सामान्यज्ञान आणि कॉमनसेन्सच्या आधारे मला असे वाटते की त्या अशा असतात.
१. ज्याच्या वस्तू घरामधून नाहीशा झाल्या तो माणूस पोलिस स्टेशनवर जाऊन तक्रार करतो.
२. पोलिस अधिका-याला पटल्यास त्या तक्रारीची नोंद करण्यात येते.
३. संशयित अपराध्यांची चोकशी केली जाते.
४. पोलिसांना मुद्देमालासह चोर सापडला तर त्याला अटक करून त्याच्यावर खटला भरला जातो.    
५. साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तीवाद न्यायाधीश ऐकून घेतात.
६. आरोपीने गुन्हा केला आहे असे त्यावरून सिध्द होत आहे असे न्यायाधीशाला वाटले तर तो त्याला शिक्षा सुनावतो.
७. त्या गुन्हेगाराला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. 
८. त्या गुन्हेगाराने त्यावर वरच्या कोर्टात दाद मागितली तर वरील काही स्टेप्सची पुनरावृत्ती होते.
चोरी करून बाहेर पडतांनाच त्या माणसाला वॉचमनने पकडले आणि त्याच्या बकोटीला धरून पोलिस स्टेशनवर आणले तरीसुध्दा तो माणूस आधी 'संशयित', मग 'आरोपी' आणि अखेर 'गुन्हेगार' या अवस्थांमधून गेल्यानंतरच त्याला शिक्षा होते. गैरसमज किंवा आकस यामधून कोणाही निरपराध माणसाला नाहक शिक्षा भोगावी लागू नये या विचाराने कायद्याच्या या सगळ्या पाय-या निर्माण केल्या गेल्या आहेत.

एकाद्या उपाशी भुरट्या चोराने कोणाच्या घराच्या खिडकीतून हात घालून फक्त दोन केळी चोरली, तर तो सुध्दा कायद्याच्या चौकटीमध्ये 'दंडनीय अपराध' असतो. पण वर दिलेल्या सगळ्या पाय-यांमधून तो बहुधा कधीच जात नाही. केळ्यांचा मालक तेवढ्यासाठी पोलिस स्टेशनवर जायचे कष्ट सहसा घेत नाही, त्याने केलेली तक्रार नोंदवली जाण्याची शक्यता कमी असते, त्या चोराचा तपास लागण्याची शक्यता त्याहून कमी आणि त्याने केलेला अपराध साक्षीपुराव्यानिशी सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य असते. यामुळे असे गुन्हे कायदेशीर अंमलबजावणीपर्यंत पोचतच नाहीत. चोरी करून बाहेर पडतांनाच त्या माणसाला वॉचमनने पकडले आणि त्याच्या बकोटीला धरून घरमालकाकडे आणले तरीसुध्दा तो त्याला पोलिस स्टेशनवर घेऊन जाणार नाही, कारण पुढील सगळ्या कारवाईमध्ये त्याला आपला वेळ घालवण्याची इच्छा नसते. पण म्हणून त्या चोराला माफही केले जात नाही. त्या ठिकाणी जमलेले सगळे लोक त्या चोराला दोन चार थपडा मारून घेतात. अशा प्रकारे त्याच्या अपराधाची त्याला तडकाफडकी शिक्षा मिळते. खरे तर हे कृत्यसुध्दा कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. त्यासाठी चोराने त्या लोकांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली तर त्या अपराधासाठी त्या लोकाना शिक्षा होऊ शकते, पण तसे सहसा कधी होत नाही, कारण हे कृत्य 'बेकायदेशीर' आहे हेच लोकांना माहीत नसते आणि कायदा काहीही असला तरी चोराला शिक्षा देण्याची पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेली ही पध्दत कॉमनसेन्सला समर्थनीय वाटते. क्वचित या प्रकारात तो चोर प्राणाला मुकला तर मात्र त्याची गंभीरपणे दखल घेतली जाते,  कारण ती शिक्षा त्याच्या अपराधाच्या प्रमाणाने फारच जास्त असते. .

प्रत्यक्ष कायदेशीर व्यवहारात दोन केळ्यांच्या चोरीची दखल सहसा घेतली जात नाही हे पाहिले. केवढ्या मोठ्या चोरीचा गुन्हा कायद्याच्या वरील सात पाय-यांमधून जायला हवा? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या मते वेगवेगळे निघेल. चोरीला गेलेल्या वस्तूच्या मूल्याशिवाय त्याच्या मालकाची सांपत्तिक परिस्थिती, त्याने मुळात ती वस्तू कशा प्रकारे संपादन केली, त्याच्याजवळ त्या वस्तूच्या मालकीचा कोणता पुरावा उपलब्ध आहे, कायदेशीर कारवाईसाठी वारंवार पोलिस स्टेशन आणि कोर्टांमध्ये जाण्याची त्याची किती तयारी आहे, त्याला ते शक्य आहे का वगैरे वगैरे अनंत मुद्दे त्यात उपस्थित होतात. त्यामुळे कायदे झालेले असले तरी त्यांची अंमलबजावणी प्रत्येक बाबतीत होतेच असे नाही.

जेंव्हा जेंव्हा कोठेही मोठे दरोडे पडल्याची बातमी येते, तेंव्हा त्याबरोबरच सगळ्या जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि "सरकार काय झोपा काढत आहे का? नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? असले मोठे गुन्हे घडतातच कसे?" वगैरे प्रश्न विचारले जातात. प्रत्यक्षात कायदे असे आहेत की गुन्हा घडून गेल्यानंतरसुध्दा ते निर्विवादपणे सिध्द करून अपराध्यांना शासन करण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. मग गुन्हे घडायच्या आधीच पोलिस तरी कोणाला आणि कशासाठी पकडणार आणि कोणत्या पुराव्याच्या आधारे डांबून ठेवणार? असा प्रश्न मनात येतो. पोलिसांनी गस्त घालावी, कुठेही काही अनुचित दिसले तर त्याला हटकावे, त्याची चौकशी करावी असे प्रतिबंधक उपाय काही प्रमाणात यशस्वी ठरतात, पण संघटितपणे आणि योजनापूर्वक गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार या सगळ्याचा अभ्यास आणि विचार करून आपला कार्यभाग साधत असतील तर त्यांना अडवणे कठीण असते. चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी दुस-याच्या घरात घुसला आणि त्याला प्रत्यक्षात चोरी करणे शक्य झाले नाही तरीही तो एक गुन्हा असतो, पण ते सिध्द कसे करणार? मग दुस-याच्या हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणे यावर कायदा करण्यात आला. दरोडा घातला गेल्यानंतर त्यामुळे मोठे नुकसान होते आणि लोकांना गंभीर इजा पोचते, प्रसंगी प्राणहानीसुध्दा होते. पण हे टाळायचे असल्यास दरोडा पडण्याच्या आधीच काही तरी करायला हवे. हत्यारबंद दरोडेखोरांनी कुठेतरी दरोडा घालण्याच्या उद्देशाने हल्ला करायचे ठरवले आहे हे आधीपासून कसे समजणार? पोलिसांच्या यंत्रणेमध्ये यासाठी गुप्तहेरांची व्यवस्था असते, त्यामधून काही वेळा त्याची खबर पोलिसांना लागते. त्यामुळे त्या वेळी ठरलेला दरोडा कदाचित टाळता येईल. पण त्या संभाव्य दरोडेखोरांना पकडले तरी त्यांच्या मनातला उद्देश न्यायालयात सिध्द कसा करणार? अशा वेळी दरोडा घालण्याचा गुन्हा त्यांच्या हातून घडला नसला तरी त्यांना शिक्षा करता यावी यासाठी 'घातक शस्त्रे जवळ बाळगणे' हाच गुन्हा ठरवला गेला आणि त्यासाठी शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली.

कुठले शस्त्र 'घातक' समजावे याबद्दल एकमत होणार नाही. स्वयंपाकघरातल्या वरवंट्यापासून अंगणातले गवत कापायच्या कोयत्यापर्यंत अनेक अवजारांनीसुध्दा प्राणघातक हल्ला करता येतो, पण त्या घरातल्या आवश्यक वस्तू आहेत. त्या घरात ठेवायला प्रतिबंध करता येणार नाही. यामुळे यासंबंधी कायदा करतांना कशाला 'शस्त्र' म्हणावे, कुठले शस्त्र किती प्रमाणात 'घातक' आहे वगैरे ठरवून ते बाळगणा-याला कोणती शिक्षा करावी याचा सविस्तर विचार केला गेला. काही लोकांना 'स्वसंरक्षणा'साठी हत्यार जवळ बाळगण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे त्यासाठी सरकारकडून परवाना मिळण्याची व्यवस्थाही केली गेली. हे सगळे सर्वसामान्य माणसांना तपशीलवार माहीत नसते. एकाद्या माणसाने दस-यावर हल्ला करून त्याला ठार मारले किंवा जखमी केले या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा होणे कॉमनसेन्सला पटते, किंबहुना असे व्हायलाच हवे याबद्दल त्याच्या मनात शंका नसते, पण एकाद्याच्या घरात विना परवाना शस्त्र सापडले किंवा त्याच्या घरात असे शस्त्र ठेवलेले होते याचा पुरावा मिळाला एवढ्या कारणावरून त्याला जबर शिक्षा होणे याबद्दल तसे ठामपणे वाटत नाही. त्यातून तो माणूस सराईत गुन्हेगार असला, त्याने यापूर्वी शस्त्र चालवले असले आणि त्याला शिक्षा मिळाली असली किंवा पुराव्याअभावी त्याला संशयाचा फायदा मिळून तो सुटला असला तर त्याला घातक शस्त्रे जवळ बाळगण्याचा काही अधिकार नाही, त्याला शिक्षा व्हायलाच हवी असे कोणीही म्हणेल, पण तसे नसेल तर सर्वसामान्य माणूस त्यावर वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.  

या ठिकाणी उदाहरणादाखल फक्त चोरीसंबंधी लिहिले आहे. हीच गोष्ट इतर असंख्य बाबतीत लागू पडते. निरनिराळ्या बाबतीतले कायदे नेमके काय आहेत? त्यात कोणत्या तरतुदी आहेत? कोणत्या पळवाटा आहेत? यावर विरुध्द पक्षाचे वकीलच परस्परविरोधी विधाने करतांना दिसतात. सर्वसामान्य माणसाला ते त्याच्या आवाक्याबाहेर वाटते. पण प्रत्येक माणसाला जो कॉमनसेन्स असतो त्यावरून कुठल्याही बाबतीत ते 'चांगले की वाईट?', 'खरे की खोटे?', बरोबर की चूक?' याबद्दल त्याला काहीतरी वाटत असते. त्याची मतेसुध्दा अनेक बाबतीत ठाम नसतात, ती बदलत असतात. असे असले तरी आपण वेळोवेळी कसे वागायचे हे तो त्यानुसारच ठरवू शकतो. निसर्गाच्या नियमांनुसार त्याला काही इच्छा होत असतात, नैतिकता आणि कायदा यांचा विचार करून त्या पूर्ण करण्यात काही गैर नसेल तर उत्तम, पण ते चुकीचे किंवा धोकादायक असले तर मनावर संयम पाळणे आवश्यक असते. 

Friday, April 05, 2013

निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स (पूर्वार्ध)

रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा येतात आणि त्यांच्या बरोबर आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये सारखे बदल होत असतात. निसर्गामधील प्रत्येक पदार्थाला विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते सुध्दा परिस्थितीनुसार बदलत असतात. पण हे सारे बदल निसर्गाच्या ज्या नियमांमुळे होत असतात ते नियम मात्र शाश्वत आहेत. त्यात बदल होत नाहीत. प्राणीमात्रांचे गुणधर्म आणि स्वभावधर्म देखील निसर्गाने ठरवून ठेवले आहेत. वाघासारखा शक्तीशाली आणि हिंस्र प्राणी हरणासारख्या निरपराध, दुर्बल आणि गरीब प्राण्याला मारून खातो हे क्रौर्य वाटले तरी नैसर्गिक आहे. "बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी." हा निसर्गाचा नियम दिसतो. तरीसुध्दा जगातले बहुतेक सगळे प्राणी कळप करून राहतात. त्या कळपात बलिष्ठापासून दुर्बलापर्यंत असमान शक्ती असलेल्यांची उतरंड असते. त्यातला प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो. पण सर्वांनाच कळपात रहायचे असल्यामुळे या बाबतीत त्यांच्यात तडजोडही होत असते. बलवान प्राणीसुध्दा काही गोष्टी दुर्बलांना घेऊ देतात. प्राण्यांची नवजात पिल्ले स्वतः अत्यंत अशक्त आणि असमर्थ असतात, पण त्यांची सशक्त माता त्या पिल्लांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी तिची सगळी शक्ती पणाला लावते. कळपातले इतर बलिष्ठ प्राणीसुध्दा सर्वार्थाने त्यांच्याहून दुबळ्या असलेल्या लहान पिलांशी मायेने वागतात. निसर्गाचे हे नियम वर दिलेल्या नियमाशी विसंगत वाटतात, पण ते तसे आहेत. स्वतःचा जीव वाचवणे, अन्न गोळा करणे आणि पुनरुत्पादन एवढेच सगळ्या प्राण्यांचे जीवन मुख्यत्वाने असते. त्यांच्या या तीन मुख्य क्रियांशी संबंधित सगळ्या बाबींसाठी निसर्गाचे वरील नियम लागू पडतांना दिसतात. मुंग्या, माशा, डास यांसारखे कीटक किंवा डोळ्यांनाही न दिसणारे रोगजंतूंसारखे सूक्ष्म जीव पहायला गेल्यास कोठल्याही प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत दुर्बल दिसत असले तरी त्यांचा लहान आकार आणि चपलपणा यामुळे ते स्वतःचा बचाव करून घेतात, त्यांची अन्नाची गरज अतीशय कमी असते आणि पुनरुत्पादनाची क्षमता अचाट असते. हीच त्यांची बलस्थाने असतात आणि त्यांच्यामुळे ते तग धरून राहतात. वनस्पतींवर कोणी हल्ला केला तर त्या कोणाशी लढूही शकत नाहीत किंवा पळूनही जाऊ शकत नाहीत, पण त्यांची वाढ होण्याची आणि नवी झाडे निर्माण करण्याची क्षमता प्रचंड असल्यामुळे त्या शिल्लक राहतात. 'बलिष्ठ' या शब्दाचा असा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर हे निसर्गाच्या नियमानुसारच आहे.

मनुष्य हासुध्दा एक 'प्राणी' आहे आणि निसर्गाचे हे नियम त्यालाही लागू पडतात. माणसेसुध्दा अशीच वागतात याची असंख्य उदाहरणे रोज डोळ्यासमोर येत असतात. 'बळी तो कान पिळी' आणि 'माइट ईज राइट' अशा अर्थाच्या म्हणी सर्व भाषांमध्ये प्रचलित आहेत. 'जिसकी लाठी उसकी भैंस' या हिंदी म्हणीचा अर्थसुध्दा तशाच प्रकारचा आहे. यातला लाठीधारी इसम इतरांपेक्षा आणि म्हशीपेक्षाही जास्त बलवान असल्याने म्हशीवर त्याचा हक्क सांगू आणि गाजवू शकतो. माणसाला इतर प्राण्यांच्या मानाने खूप जास्त बुध्दी मिळालेली असल्यामुळे त्याने बुध्दीच्या जोरावर अनेक प्रकारची आयुधे, अवजारे, उपकरणे आणि यंत्रे तयार केली आणि त्यांच्या जोरावर आपले सामर्थ्य अनंत पटीने वाढवून त्याने आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले. शेती, कारखानदारी आणि उद्योगव्यवसायांमधून तो उत्पन्न घेऊ लागला, घरे, बंगले, इमारती बांधून त्यात राहू लागला, अनेक मार्गाने ज्ञान संपादन करू लागला, कला, क्रीडा, करमणूक वगैरे क्षेत्रांमध्ये भाग घेऊ लागला, वगैरे वगैरे. पण हे करत असतांना त्याने जी असंख्य निरनिराळी क्षेत्रे तयार केली त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची शक्तीस्थाने तयार झाली. बुध्दी, ज्ञान, अनुभव. कौशल्य, चलाखी, कष्टाळूपणा वगैरेंच्या आधाराने त्यातसुध्दा तुलनेने पाहता कोणी बलवान आणि कोणी दुर्बल हे भेद तयार झाले. त्याचप्रमाणे त्यांच्यात तडजोड आणि सहकार्य यांचीही आवश्यकता पडत गेली. त्यांनाही वेगळ्या अर्थाने निसर्गनियम लागत गेले.

इतिहासपूर्व काळात कळपांमध्ये रानावनात हिंडणारा माणूस गावे, नगरे वसवून एका जागी रहायला लागल्यानंतरसुध्दा तो समूहातच रहात आला. एक राजा, म्होरक्या किंवा मुखिया त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या माणसांचे नेतृत्व करत असे आणि इतर सगळे त्याला मान देत असत. त्याने केलेल्या आज्ञा निमूटपणे पाळत असत. हे सगळे होत असतांना माणसांच्या वागणुकीसाठी नियम बनत गेले. काही हुषार, विद्वान, अनुभवी लोकांनी काही नियम बनवून त्याप्रमाणे आचरण करायला इतरांना सांगितले. त्यातले जे नियम लोकांना पटले ते त्यांनी स्वतःच्या आचरणात आणले आणि इतरांना सांगितले, पहिल्या पिढीने पुढच्या पिढीला दिले अशा प्रकारे अनेक प्रथा, रूढी, परंपरा वगैरे तयार होत गेल्या. संत, महंत, विचारवंत लोकांनी आपल्या ग्रंथांमधून चांगल्या आचरणाचा उपदेश केला, देवदेवतांच्या कथांमधून अनेक उदाहरणे मांडली गेली. चांगल्या आचरणाला सगळ्याच धर्मांनी त्यांच्या विचारसरणीमध्ये महत्वाचे स्थान दिले. "दुराचरण करणा-या माणसांना देव शिक्षा करेल" असा धाक दाखवला गेला. अशा निरनिराळ्या मार्गाने निरनिराळे नियम प्रचारात आले. हे मानवनिर्मित नियम स्थलकाळसापेक्ष असतात. निरनिराळ्या ठिकाणची माणसे त्यांच्या गरजेप्रमाणे आणि सोयीनुसार वेगवेगळे नियम करत आले आणि कालांतराने त्यात बदलही होत गेले. या नियमांचे पालन होते की नाही यावर समाजाचे लक्ष असे आणि एकादा माणूस एकादा नियम तोडतांना आढळला तर त्याला काय शिक्षा करायची हे समाजाचे नेते किंवा राज्यकर्ते ठरवत असत. ते लोक अर्थातच इतरेजनांपेक्षा जास्त शक्तीशाली असत. नियमांचा भंग करणा-याचे काय करायचे हे बहुधा परंपरेनुसार किंवा ते ठरवणा-या बलिष्ठाच्या लहरीनुसार ठरत असे. म्हणजे अप्रत्यक्षपणे पुन्हा त्यात निसर्गाच्या नियमांचेच पालन होत असे.

लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी घरात त्यांचे पालक आणि शाळेतले शिक्षक काही नियम करतात आणि वाटल्यास त्यात बदलही करतात. कारखाने, बाजार, ऑफिसे वगैरे जिथे जिथे माणसे एकत्र येतात तिथे औपचारिक किंवा अनौपचारिक अशा आचारसंहिता असतात आणि एकमेकांना पाहून त्या पाळल्या जातात. देशामधील सर्वांना पाळावे लागणारे नियम राज्यकर्ते 'सरकार' करते तेंव्हा त्याला 'कायदा' असे संबोधले जाते. त्याचे पालन करायला लावणारी आणि ते न करणा-यांना शिक्षा करणारी पोलिस, न्यायाधीश, तुरुंग वगैरेंनी युक्त अशी व्यवस्था निर्माण होत गेली. इंग्रजांनी भारतात चालवलेल्या राज्यव्यवस्थेबरोबर त्यांच्या देशातली न्यायव्यवस्थाही इकडे आणली. त्यातून 'कायदा' या शब्दाला आज प्रचलित असलेला विशिष्ट अर्थ मिळाला. मुद्रणाचा प्रसार झाल्यानंतर सरकारने केलेले कायदे छापील रूपात उपलब्ध होऊ लागले. त्यापूर्वी समाजासाठी असलेले बरेचसे नीतीनियम अलिखित स्वरूपात असत आणि आपापल्या समजुतीनुसार त्यांचे पालन होत असे. त्यात वाद किंवा दुमत झाले तर शास्त्री, पंडित, काझी, धर्मगुरू वगैरे लोक आपापल्या पोथ्या पुराणांमधून दाखले देऊन त्यावर निर्णय देत असत. इंग्रजांचे राज्य आल्यानंतर जनतेसाठी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी त्यांनी एक यंत्रणा उभी केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीच्या तत्वानुसार कायदे करणे हे काम जनतेच्या प्रतिनिधींकडे देण्यात आले. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देशाच्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजांनी उभारलेली शासकीय यंत्रणाच स्वीकारली गेली. 

मानवांच्या समाजाने एकत्र रहावे, त्यांच्या जीवनात स्थैर्य असावे, एकमेकांशी सहकार्य करून सर्वांनी उन्नती साधावी हा मुख्य उद्देश कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या या सर्व डोला-याच्या मुळाशी असतो. माणसामाणसांमध्ये किंवा त्यांच्या गटांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे स्पर्धा आणि संघर्ष होणार आणि त्य़ात प्रबलांची सरशी होणार हे निसर्गनियमानुसार असते, पण त्यामुळे अनागोंदी माजू नये, समाज पूर्णपणे विस्कटून जाऊ नये, त्यात स्थैर्य रहावे यासाठी समाजातल्या आततायी, दुष्ट किंवा विघातक प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने कायदे केले जातात. समाजातल्या एका व्यक्तीने फसवणूक, चोरी, मारामारी यासारखे कृत्य केले तर त्यापासून इतरांना त्रास होतो, ते स्वस्थ बसून राहणार नाहीत. त्या पहिल्या व्यक्तीला आवरले नाही तर तशा प्रकारची कृत्ये तो करतच राहील आणि इतर काही लोकांना त्याचे अनुकरण करावेसे वाटेल. अशामुळे समाजामधील अधिकाधिक लोकांना त्रास होत राहील, ते अस्वस्थ होतील आणि त्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊन समाजाचे विघटन होईल. याला आळा घालण्यासाठी समाजामधील प्रत्येकाला बंधनकारक असे काही नियम केले जातात. त्यांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो त्यासाठी शिक्षा होऊ शकते. शिक्षा होण्याच्या भीतीमुळे गुन्हे करण्यापासून बहुतेक लोक परावृत्त होण्याची शक्यता असते. या उद्देशाने अनेक कायदे केले गेले. पण एक तर देशामधले हजारो कायदे आणि त्यातली लक्षावधी कलमे सामान्य जनतेला माहीत असू शकत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांची भाषा अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ स्पष्टपणे कळत नाही. वर्तमानपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांवरून जेवढे समजेल तेवढेच आणि तेसुध्दा फक्त सुशिक्षितांना ठाऊक असते. त्यामुळे इतिहासकाळातले परंपरागत नियम असोत किंवा आताचे जाडजूड पिनल कोड असोत त्या कायद्यांच्या माहितीच्या बाबतीत फार मोठा फरक पडलेला नाही, त्यामुळे त्यांच्या पालनालाही मर्यादा पडतात. याशिवाय हे कायदे राबवणारी सरकारची यंत्रणा किती कार्यक्षम आणि प्रामाणिक असते त्याचाही परिणाम त्यांच्या पालनावर पडत असतो.

परकीय सत्ता, राजेशाही, सरंजामशाही किंवा हुकूमशाही यासारख्या राज्यव्यवस्थेत बलिष्ठ सत्ताधीशांकडूनच दुबळ्या जनतेवर दडपशाही केली जाऊ शकते. अशा वेळी नीतीनियम आणि कायदे असले तरी ते गुंडाळून ठेवले जातात. न्याय अन्याय या शब्दांना अर्थ उरत नाही. असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. "पावसाने झोडपले किंवा राजाने मारले तर कुणाकडे दाद मागायची?" अशी एक म्हण आहे. अशा बहुतेक प्रसंगी बिचारी सामान्य जनता अगतिक असते. क्वचित काही ठिकाणी पीडित जनतेला संघटित करून त्या दडपशाहीचा प्रतिकार केला जातो आणि जुलमी राजवट उलथून पाडली जाते अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्या दुर्मिळ असतात. जेंव्हा सरकारचा कारभार अंतर्गत बेबनावामुळे ढिसाळ झालेला असतो तेंव्हाच हे बंडखोर सरकारच्या सामर्थ्यापेक्षाही अधिक बलवान होऊ शकतात आणि सत्ताधीशाला खाली खेचून त्याची जागा घेतात. पण या राज्यक्रांतीमध्ये न्यायव्यवस्था विस्कटली जाते आणि कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी पुष्कळ परिश्रम आणि वेळ लागतो. अलीकडील काळात बहुतेक सर्व पुढारलेल्या देशांमध्ये चालत असलेल्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी वर्गाकडे अमर्याद सत्ता जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी अनेक तरतुदी केल्या जातात. जनतेमधून निवडून आलेले तिचे प्रतिनिधी फक्त ठराविक कालावधीपुरतेच असतात, त्यानंतर निवडणुका होतात आणि आपले प्रतिनिधी बदलण्याची संधी जनतेकडे असते. सत्तेवर असतांनासुध्दा सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा आदि जागी विरोधकांना तोंड द्यावे लागते. न्यायालये आणि शासनयंत्रणा यांना स्वतंत्र स्थान असते. शासनाने अन्याय केल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. वृत्तपत्रे, टेलिव्हिजन यासारखी माध्यमे जनतेची गा-हाणी प्रभावीपणे मांडू शकतात.

या सगळ्यामुळे समाजात सगळे काही अगदी अलबेल झाले आहे असे म्हणता येणार नाही आणि ते कधीही होण्याची शक्यता नाही, कारण हे सगळे मानवी प्रयत्न आहेत. निसर्गाचे नियम यापेक्षा जास्त बलवान आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या निसर्गाने दिलेल्या भावनांच्या प्रभावाखाली माणसे चुका किंवा गुन्हे करतात आणि करत राहणार. शिक्षेच्या भीतीपोटी त्यावर अंशतः नियंत्रण येईल, पण गुन्हेगाराला पकडणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे, त्याचा न्यायनिवाडा करणे आणि त्याला शिक्षा देणे, तसेच ती अंमलात आणणे ही सगळी कामे माणसांनीच करावयाची असल्यामुळे त्यात मानवी चुका आणि निसर्गनियमामुळे काही बाधा येतात आणि त्या येत राहणार. 

................................................................................... (पुढील भाग उत्तरार्धात)

  

Monday, April 01, 2013

संत एकनाथांच्या रचना (उत्तरार्ध)

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन 'भारुड' या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. 'विंचू चावला' या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी 'अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू' वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.  
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणा-या किंवा सासुरवास करणा-या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणा-या, परमेश्वरापासून दूर ठेवणा-या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि 'असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते' हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
    अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
   अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी 'भूत' या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची 'उलटी खूण' ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना 'जोशी' म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

'बुरा मत सुनो, बुरा मत बोलो' वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी  लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की 'मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो'. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम' हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी 'फकीर' या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.