Wednesday, July 15, 2015

शस्त्रक्रियेची पूर्वतयारी - १

गुडफ्रायडेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मला अपघात झाला त्या दिवशी काढलेल्या एक्सरेवरूनच माझ्या दोन्ही हातांना झालेल्या दुखापतींची कल्पना डॉक्टरांना आली होती आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणारच आहे हेसुद्धा त्यांनी मलाही लगेच सांगितले होते. पण कुणालाच त्याची घाई दिसत नव्हती. हृदय, फुफ्फुस, जठर, यकृत यायारख्या अवयवांची आपल्या शरीराला सारखी नितान्त गरज असते, पण दोन्ही हातांची घड़ी घालून आपण हवा तितका वेळ बसून राहिलो तरी शरीराचे नेहमीचे सर्व व्यवहार व्यवस्थितपणे चालत राहतात. माझ्या बाबतीत नेमके तसेच झाले. वॉर्डमध्ये दाखल करण्याच्या आधीच माझ्या दोन्ही हातांना करकचून गुंडाळून उरापाशी नेऊन ठेवलेले होते, त्यांची कसलीही हालचाल करणे मला शक्यच नव्हते. चोवीस तास माझी सेवा करण्यासाठी दोन प्रायव्हेट अटेंडंट्स नेमले होते, ते मला उठवून बसवत आणि काम झाले की पुन्हा झोपवत असत, मला खाऊपिऊ घालत आणि नैसर्गिक विधींसाठी जे काही आवश्यक असायचे ते सारे ते करत होते. उदय आणि शिल्पा अधून मधून माझ्या आणि अलकाच्या वॉर्डमध्ये येऊन आमच्याशी बोलत बसायचे, वॉर्डमधल्या तसेच ऑफीसांमधल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करायचे आणि एकमेकांची माहिती आम्हा दोघाना येऊन सांगायचे. अर्थातच त्यांची यात खूपच धावपळ होत होती. शिवाय आमच्या काही आवश्यक वस्तू किंवा कागदपत्रे वगैरे आणून देण्यासाठी त्यांना वाशीला घरीही जाऊन यावे लागत होते.

आम्हाला अपघात झाला असल्याची बातमी कानोकानी पसरत गेली आणि शनिवारी दुपारी अनेक लोक आम्हाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले . "ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा ? क्यूँ हुवा ?" वगैरे प्रश्न प्रत्येकाच्या मनात किंवा ओंठांवर असले तरी मी त्यांना उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हतो. उदयकडे बोट दाखवून "हे त्याला विचारा" अशी विनंती करत राहिलो. "पण हे फार वाईट झालं, असं व्हा़यला नको होतं यावरून पुढे अमक्याचं असं झालं आणि तमक्याचं तसं झालं" अशी चर्चा होऊन वातावरण जास्तच दुःखीकष्टी व्हा़यला लागल्यावर मीच बोलायला सुरुवात केली, "हे पहा, मला तुम्ही दिसत आहात, तुमचं बोलणं ऐकू येत आहे, मीही थोडं बोलू शकत आहे, श्वास घेत आहे, माझी नाड़ी चालत आहे, मी खाल्लेलं अन्न पचत आहे, तेंव्हा देवाच्या दयेनं जेवढं काही आज माझ्याकडे आहे ते खूप महत्वाचं आहे, माझ्या या जखमा ठीक होणार आहेत आणि हातांचे ऑपरेशन झाल्यावर तेदेखील बरे होणार आहेत, म्हणजे मी या अपघातात जे गमावले आहे ते मला परत मिळणार आहे. त्याला अवधी लागेल, तोपर्यंत मला खूप वेदना सहन कराव्या लागतील, त्यासाठी मला या वेळी तुम्हां सर्वांकडून  धैर्य आणि मनोबल हवे आहे." त्यानंतर त्यांच्या बोलण्याला सकारात्मक दिशा आली.
मी त्यांना सांगितले, "माझी शारीरिक दशा तुम्ही पहातच आहात, पण मी एक (केविलवाणे का होईना) स्मित माझ्या (फाटलेल्या) ओठांवर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रत्येक माणसाला सहानुभूति हवी असते, पण अनुकंपा नको असते, मदत हवीशी वाटते पण कींव केलेली आवडत नाही असा मनुष्य स्वभाव आहे. पण या दोन्हींमधल्या सीमारेखा पुसट असतात, त्या केंव्हा ओलांडल्या जातात हे कधीकधी समजत नाही.

माझ्या रक्ताचे नमूने तपासण्यांसाठी पाठवलेले होतेच, क्ष किरणांचे फोटोही काढून झालेले होते, ईसीजी काढून पाहिला यात दोन दिवस गेले. सोमवारच्या दिवशी माझी सोनोग्राफी करायचे ठरले. मला बाटलीभर पाणी घेऊन त्या विभागात पाठवले. तिथे वीसपंचवीस पेशंट आधीपासून येऊन बसलेले होते, त्यात बहुसंख्येने गरोदर स्त्रिया होत्या. काही तांत्रिक कारण किंवा तज्ज्ञांची कमतरता या कारणाने तिथले काम सावकाशीने चालले होते. यामुळे आधीच तंग झालेल्या त्या विभागातल्या वातावरणात मी एका व्हीलचेअरवर सुन्नपणे बसून वाट पहात होतो. माझा नंबर त्या मानाने लवकरच लागला. पण डॉक्टरांनी तपासणी सुरुवात करता करताच विचारले, "इनको क्यों यहाँ लाया है? कौन कहता है कि इनको कोई प्रॉब्लेम है?" ते ऐकून मला थोडे बरेही वाटले , पण मीच त्यांना उत्तर दिले, "मेरा अभी ऑपरेशन होनेवाला है और शायद ब्लड टेस्ट देखकर मुझे यहाँ भेजना जरूरी लगा होगा।" "ओके ओके" करत त्यांनी मूत्रपिंडांची तपासणी करून रिपोर्ट दिला.
तिकडून वॉर्डमध्ये परत येतो तेवढ्यात मला पुन्हा व्हीलचेअरवर बसवून अॅनेस्थेशिया विभागात पाठवले गेले. तिथल्या तज्ज्ञाकडून एका प्रकारचे फ़िटनेस सर्टिफिकेट आणायचे होते. त्या डॉक्टरांनी माझी कसून चौकशी केली. यापूर्वी मला कोणकोणते आजार होऊन गेले? सध्या कोणत्या व्याधी आहेत? त्यासाठी कोणकोणती औषधे चालू आहेत वगैरे. मोतीबिंदू सोडल्यास माझे कोणतेही ऑपरेशन झालेले नव्हतेच, कोणत्याही सर्जनच्या हातातल्या शस्त्राचा माझ्या शरीराला स्पर्श झाला नव्हता आणि यापूर्वी मी फक्त लोकल अॅनेस्थेशिया घेतला होता वगैरे सांगितले. त्या डॉक्टरांना माझा रक्तदाब पहायचा होता, पण दोन्ही हातांना बँडेज बांधलेले असल्याने ते करता येत नव्हते. ते मला त्यांच्या लॅबमध्ये घेऊन गेले. तिथे एक पायाला बांधायचे यंत्र होते, पण त्या बद्दल काही शंकाही होत्या. त्यांनी कसाबसा माझा रक्तदाब मोजला, तो ज़रा जास्तच निघाला. कदाचित सकाळपासून चाललेल्या धामधुमीमुळे आणि मनस्तापामुळेही तो वाढला असेल. मला ऑपरेशन साठी परवानगी मिळाली किंवा नाही तेसुद्धा तेंव्हा समजले नाही.

मला गुडफ्रा़डेच्या रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यानंतर अनेक तपासण्या सुरू झाल्या होत्या. सोमवारी अल्ट्रासोनोग्राफी आणि अॅनेस्थेशिया विभागात मला व्हीलचेअरवर बसवून नेऊन आणले असले तरी तेवढ्या श्रमानेही थकवा आला होता. अजूनही काय काय बाकी आहे याचा विचार करत मी निपचित पडलो होतो. चोवीस तासाचे मूत्र जमवून त्याची तपासणी करण्यासाठी एक मोठा कॅन आणून कॉटच्या खाली ठेवलेला होता. रक्ततपासणीसाठी आणखी नमूने घेण्यासाठी एक डॉक्टर आला, पण काय करावे ते त्याला समजेना. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये पाहून त्याने पायात चार पाच ठिकाणी सुया खुपसून पाहिल्या, त्यातल्या कुठूनही त्यालाही रक्त मिळाले नाहीच, माझे सर्वांग आधीच भयानक ठणकत होते त्यात आणखी थोड़ी भर पडली, पायाचा शिल्लक राहिलेला भागही आता दुखायला लागला. आलीया भोगासी मी सादर होत राहिलो.

सोमवारी ६ एप्रिलच्या दुपारी मी वॉर्डमध्ये तळमलत पडलो होतो तेंव्हा ऑॅर्थोपिडिक डेपार्टमेंटमध्ये माझ्या बाबतीत एक वेगळाच विचार चाललेला होता. अलकाचे काही रिपोर्ट आणण्यासााठी उदय वाशीला गेला होता आणि शिल्पा अलकाच्या सोबतीला बसली होती. तिला बोलवून असे सांगितले गेले की बीएआरसी हॉस्पिटलमधले ऑॅपरेशन थिएटर पुढील महिनाभरासाठी बुक्ड आहे, यामुले मला वाशी इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पाठवायचे ठरले आहे. या अचानक निर्णयाने गोंधळून जाऊन ती माझ्याकडे वॉर्डमध्ये आली. मी या हॉस्पिटलचा लौकिक ऐकला असल्याने मी तिकडे जाण्यासाठी तयार होतो, पण अणुशक्तीनगर आणि वाशी अशा दोन ठिकाणी आम्ही दोघे असलो तर दोन ठिकाणी लक्ष देण्यासाठी आमच्याकडचे मनुष्यबळ कमी पडत होते. मी स्वतःच अपंग झालेलो असल्यामुले काहीच करू शकत नव्हतो, मला तर हातात मोबाइल फोन धरणेसुद्धा अशक्य होते. त्यामुळे कुणाशी बोलणार आणि कुणाला बोलावणार? उदयशी चर्चा करून ठरवा़यला पाहिजे, यासाठी थोडा अवधी मागा़यला हवा वगैरे मी शिल्पाला सांगितले. थोड्या वेळाने उदय आला तो ऑॅर्थोपिडिक डॉक्टरला भेटूनच माझ्याकडे आला. मला आजच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचे ठरलेले आहे, तिथल्या सर्जनशी बोलणेही झालेले आहे वगैरे सांगून झाल्यावर आता आपण कसे तरी मॅनेज करू असे तो म्हणाला. बीएआरसी हॉस्पिटलमध्ये असलेले माझे सामान, मुख्यतः विशिष्ट औषधे खणातून काढून घेतली. मी कॅज्युअल्टीमध्ये येऊन दाखल झालो होतो तेंव्हा काढून ठेवलेले म्हणजे अपघात झाला तेंव्हा माझ्या अंगावर असलेले रक्ताने माखलेले कपडे नेमके या वेळी माझ्याकडे पाठवण्यात आले होते, त्यांना असह्य असा दुर्गंध येत होता. ते गाठोडे उलगडूनही न पाहता जसेच्या तसे डिस्पोज ऑफ करायला मी उदयला सांगितले, त्यानुसार तो ते गाठोडे कोणाच्या तरी स्वाधीन करून परत आला. अँब्युलन्स आल्याचे समजताच मी वॉर्डमधून निघालो, जाता जाता अलकाच्या वॉर्डमार्गे व्हीलचेअर वळवून मी तिला भेटलो. आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यापासून तीन दिवस एकमेकांना पाहिलेही नव्हते आणि आता किती दिवसाचा विरह होणार आहे याची कल्पना नव्हती. पण मी सेंटिमेंटल न होता उभ्या उभ्या म्हणजे व्हीलचेअरवर बसल्या बसल्या तिचा निरोप घेतला आणि अँब्युलन्समध्ये जाऊन झोपलो, अणुशक्तीनगरच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या दिमतीला असलेल्या अटेंडंट्सशी उदयने बोलून घेतले आणि त्यांनाही फोर्टिसमध्ये यायला सांगितले. त्यासाठी त्यांचा भत्ता वाढवून दिला. त्या वेळी माझ्यासोबत असलेला दिवसपाळीचा अटेंडंट आणि उदय यांच्या बरोबर मी वाशी इथल्या फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी सेक्शनमध्ये येऊन दाखल झालो तोंपर्यंत सहा एप्रिलची रात्र झाली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, July 14, 2015

गुड फ्रायडे की very bad Friday?

ज्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या हातापा़यात खिळे ठोकून त्याला क्रूसावर चढवले गेले तो दिवस गुड म्हणजे चांगला कसा असेल? हे कोडे मला खूप दिवस पडत असे, पण त्या दिवशी सुटी असल्यामुळे मिळत असलेली तीन दिवस सलग सुटी मात्र चांगली वाटायला लागली. गेली काही वर्षे त्या तीन दिवसांना जोडून चेंबूरला अल्लादियाखाँ संगीत समारोह सुरू झाल़्यानंतर ती एक पर्वणीच वाटायला लागली होती.

या वर्षीसुद्धा आम्ही दोघे या कार्यक्रमासाठी चेंबूरला जायला टॅक्सीत बसून निघालो होतो. जेमतेम वाशीची खाडी पार केली आणि समोरून येत असलेल़्या मोटारीने धडक देऊन आनच्या गाडीचा चेंदानेंदा केला. क्षणार्धात आम्ही दोघेही जबर जखमी झालो. कसला गुड फ्रायडे? It was a very bad Friday,

या अपघातात माझ़्या दोन्ही हातांची हाडे मोडली होती आणि अलकाला ज़बरदस्त मुका मार लागून तिचे सर्वांग सुजले होते. त्या ठिकाणी जमा झालेल़्या लोकांनी आम्हाला गाडीबाहेर काढले आणि त्यांच्यातल्या एका देवमाणसानेच आम्हा दोघांना लगेच म्हणजे १५ २० मिनिटांमध्ये हॉस्पिटलमध़्ये पोचवले. या जगात अजूनही माणुसकी जीवंत आहे असे म्हणायचे की ही फक्त देवाची असीम कृपा होती!

मी हॉस्पिटलमध़्ये पोचलो तेंव्हा अर्धवट ग्लानीमध्ये होतो. डोक़्याला मोठी खोक पडली होती, एक दात पडून गेला होता, कोप-यावर दोन इंच लांब जखम झाली होती आणि सर्वांमधून रक्त वहात होते. डाक्टर आणि नर्सेस यांनी भराभरा माझे कपड़े टराटरा कापून काढले, माझ्या अंगावर आणखी कुठे कुठे जखमा झाल़्या आहेत का हे पाहून एकेक जखम टाके घालून शिवून वहात असलेले सगळे रक्तप्रवाह बंद केले. माझ्या हातांकडे पहायला मी त्यांना सारखे विनवत होतों कारण मला त्यांच्या वेदना सहन होत नव्हत्या, पण डॉक्टरांच्या प्रायारिटीजच बरोबर होत्या हे मला त्या अवस्थेत समजत नव्हते. जखमांना टाके घालून रक्तप्रवाह थांबवल्यानंतर अस्थितज्ज्ञ पुढे आले आणि त्यांनी दोन्ही हातांची हाडे अंदाजाने बसवून तीवर क्रेप बँडेज गच्च आवळून बांधले. त्यानंतर माझे मोजून सतरा एक्सरे फोटो काढले. ते पाहून झाल़्यावर डॉक्टरांनी असे निष्कर्ष काढले की माझ्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करावी लागेल, पण डोक्याची कवटी, छातीचा पिंजरा आणि त्यांच्या आतले महत्वाचे सारे अवयव शाबूत आहेत. याचा अर्थ असा होता ती या भयानक अपघातामंधून मी बचावलो होतो. मी परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानलेच, इतरांनीही निश्वास टाकले.

आम्ही दोघे अपघात झालेल्या जागेपासून निघून हास्पिटलकडे चाललो आहोत एवढे मला उमजत होते पण खिशातला मोबाईल काढून तो वापरणे मला अशक़्य होते. अलकाने कसाबसा तिचा फोन काढून अणुशक्तीनगरमध्ये रहात असलेल्या रश्मीला लावला. सुटीच्या दिवसाची सांज असली तरी रश्मी आणि परितोष हे दोघेही घरीच होते. पहिल़्याच प्रयत्नात फोन लागला आणि रश्मीने तो उचललाही. "अगं, आम्हा दोघांना मोठा एक्सिडेंट झाला आहे आणि आम्ही आता आपल्या हॉस्पिटलमध़्ये येत आहोत ." एवढेच अलका तिला सांगू शकली . ते दोघेही लगेच निघाले आणि आमच्या मागोमाग कॅज्युअल्टी विभागात येऊन पोचले. आमच्या हातातले सामान, खिशातले पाकीट, किल्ल्या, सेलफोन्स, अलकाच्या हातातली आणि अंगावरची इतर आभूषणे, आमची मेडिकलची कार्डे वगैरे सगळ्या वस्तु त्यांनी ताब्यात घेऊन जपून ठेवल्या . डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आणि ते सांगतील ती कामे करीत किंवा आणून देत ते दोघे आमच्या बाजूला उभे राहिले. मधून मधून आमच्याशी बोलत आम्हाला धीर देण्याचे कामही करत राहिले . आमची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती, आमची सगळी काळजी ते दोघे घेत होते.

अलकाने रश्मीला फ़ोन केल्यानंतर लगेच उदयला पुण्याला फोन लावला. त्यावेळी तो ऑफिसात एका मीटिंगमध्ये होता . अशा वेळी तो सहसा कोणाचाही फोन घेत नाही, घेतलाच तरी बिझी असल्याचे सांगतो, पण अलकाचा कातर व रडवेला स्वर ऐकून तो दचकला आणि मीटिंग रूमच्या बाहेर जाऊन तिच्याशी बोलला. एक्सिडेंटचे वर्तमान ऐकून तो पुरता हादरला होता हे त्याच्या साहेबाच्या लगेच लक्षात आले, त्यांनी त्याला ताबडतोब मुम्बईला जाण्याची अनुज्ञा केली, कंपनीच्या ताफ्यातले एक वाहन दिले आणि धीर दिला. उदयने लगेच शिल्पाला फोन लावला आणि ही बातमी देऊन लगेच मुंबईला जायचे असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांच्या मुली  त्यांच्या आजोळी गेल्या होत्या. यामुळे त्यांची विशेष चिंता नव्हती. उदय आणि शिल्पा हे दोघेही नेसत्या कपड्यांनिशी आपापल़्या ऑफिसांमधून निघून दोन तासांत हॉस्पिटलातल्या कॅज्युअल्टी विभागात येऊन दाखल झाले. दुरून त्यांचे चेहेरे पाहून पहिल्यांदा तर मला भास व्हा़यला लागले आहेत की काय अशी शंका आली, पण ते दोघे जवळ येऊन माझ्याशी बोलले तेंव्हा खात्री पटली. लगेच रश्मी आणि परितोष यांच्याशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील कारवाईचा ताबा घेऊन रश्मीला तिच्या मुलांकडे पहायला तिच्या घरी जायला सांगितले. रश्मी, परितोष, उदय आणि शिल्पा हे चौघेही नेहमी आपापल्या उद्योगांमध्ये इतके गुंतलेले असतात किंवा कुठे ना कुठे जात येत असतात की त्यांच्याशीलगेच  सम्पर्क होणे जरा कठीणच असते, पण त्या दिवशी मात्र पाच दहा मिनिटांमध्ये तो होऊ शकला आणि ते धावत येऊ शकले हीच केवढी महत्वाची गोष्ट घडली. पुन्हा एकदा देवाची कृपाच म्हणायची!

आमचा अपघात झाला तिथे समोरच एक ट्रॅफिक सिग्नल होता. त्या ठिकाणी नेहमीच काही पोलिस तैनात असतात. मला लोकांनी गाडीच्या बाहेर काढेपर्यंत एक वर्दीधारी तिथे आला होताच. तो आता पंचनाम्याचा घोळ घालेल आणि विलंब करेल अशी भीती मला वाटली, पण त्याने आम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची परवानगी दिलेली होती. बहुधा याबाबतीतले नियम आता बदलले असावेत. कॅज्युअल्टी मध्ये आमच्यावर उपचार चालू होते तेंव्हा एक किंवा दोन पोलिस तिथे येऊन पोचले. आमचे डॉक्टर आणि नर्सेस माझ्याशी सतत बोलत राहून मला जागे ठेवत होते, त्यातच ते पोलिससुद्धा अधून मधून मला आता कसे वाटते याची विचारणा करत होते. मी त्यांना किती सुसंबद्ध की असंबद्ध उत्तरे देत होतो हे त्या अवस्थेमध्ये मलाच समजत नव्हते. सुमारे तासाभराने मी ज़रा सावरलो असेन. तेंव्हा त्यांनी माझी ज़बानी नोंदवून घेतली, म्हणजे त्यानेच कागदावर लिहिली आणि त्यावर माझी 'निशाणी डावा अंगठा' उमटवली. त्यातला एक मुद्दा माझी कोणाविरुद्ध काही तक्रार आहे का असा होता. मी तसे करायच्या मनस्थितीतच नव्हतो, शिवाय माझे वय आणि प्रकृती पाहता मला तपास, चौकशी, खटले वगैरेंमध्ये भाग घेणे शक्यच नव्हते. पोलिस कारवाई त्यानंतरही बराच काळ चालत राहिली होती. मला वार्डमध्ये दाखल करून झाल्यानंतर माझा मुलगा काही कागदपत्रे घेऊन पोलिसचौकीत जाऊनही आला. एकंदरीत पाहता मला तरी पोलिसांचे त्यावेळचे वर्तन सौजन्यपूर्ण वाटले.

एकाद्या माणसाच्या कपड्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाची फोरँसिक सायंटिस्ट तपासणी करून हल्लेखोराला शोधून काढतात वगैरे आपण रहस्यकथांमध्ये वाचतो. पण ती तपासणी वेगळ्या प्रकारची असते, वैद्यकीय उपचारांसाठी मात्र शरीरात वाहणा-या रक्ताचीच तपासणी करावी लागते. मी इस्पितळात पोचलो त्या वेळी माझे सारे कपड़े रक्ताने माखलेले होतेच, दोन जखमा वहातही होत्या. पण तपासणीसाठी त्यांचा उपयोग नव्हता. त्या जखमा आधी बंद करण्यात आल्या आणि त्यानंतर तपासणी करण्यासाठी कुठून रक्त काढायचे यावर विचार सुरू झाला. माझ्या रक्तातल्या तांबड्या आणि पांढ-या पेशी, लोह, साखर, सोडियम, पोटॅशियम वगैरे घटकांचे प्रमाण जाणून घेणे पुढील उपचारांसाठी आवश्यक होते. नेहमी करतात तसे कोप-याच्या खोबणीतून सँपल काढणे माझ्या बाबतीत शक्यच नव्हते कारण दोन्ही हातांवर बँडेज बांधलेले होते. पायामधून रक्त घेण्यासाठी डॉक्टरांनी चार पाच जागी सुया घुसवून पाहिल्या, पण माझे रक्त त्यांमध्ये यायला तयारच नव्हते. अखेर उजव्या हाताच्या पंजामधली एक नस त्यांना सापडली आणि तिच्यातून नमूने काढून तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्या तपासणीचे निकाल हातात आल्यानंतर पुढील औषधे आणि त्यांची प्रमाणे ठरवण्यात आली.

माझ्या शरीराच्या पायापासून डोक्यापर्यंत नखशिखांत भागांचे निरनिराळ्या बाजूंनी (अँगल्समधून) एकंदरीत सतरा एक्सरे फोटो काढले गेले होते. त्यातल्या दोन्ही हातांच्या छायाचित्रांमध्ये तुटलेली हाडे दिसत होती. शरीराचे बाकीचे सर्व भाग ठीक होते. उजव्या हाताच्या खांद्यापासून निघणारे ह्यूमरस या विनोदी नावाचे दंडाचे हाड खांद्यापाशीच पिचकले होते आणि मनगटापासून कोपरापर्यंत जाणा-या दोन हाडांपैकी एकाचा पार चुरा झाला होता. या दोन्ही ठिकाणी धातूच्या पट्ट्या (प्लेट्स) बसवून त्यांना दुरुस्त करावे लागणार होते, म्हणजे त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अशा प्रकारे माझ्यावर करण्याच्या उपायांची दिशा निश्चित झाली. मला ऑर्थोपीडिक डिपार्टमेंटच्या स्वाधीन करण्यात आले. तोपर्यंत माझा एक मित्र आणि शेजारी पंढरीनाथन तिथे येऊन पोचला होता. तो आणि उदय या दोघांनी हॉस्पिटलमधल्या माणसांच्या साथीने मला अस्थिरुग्णकक्षामध्ये नेऊन दाखल केले. माझ्यासोबत रात्रभर राहून माझी सेवा करण्यासाठी एका अटेंडंटची सोय करण्यात आली. उदयला त्याच्या जखमी आईचीही काळजी घेणे अत्यावश्यक होते . त्यासाठी तो कॅज़्युअल्टी विभागात परत गेला. माझी नीट व्यवस्था लागलेली पाहून पंढरीनाथन त्याच्या घरी परत गेला.

माझ्याप्रमाणेच अलकाच्याही सर्वांगाचे एक्सरे फ़ोटो काढले गेले. सुदैवाने त्यात कोणतेही व्यंग दिसले नाही, सर्व हाडे आणि अवयव शाबूत होते, पण तिला प्रचंड धक्का बसला होता, त्यामुळे ती हादरून गेली होती, अनेक जागी लागलेल्या मुक्या माराने तिचे सर्वांग सुजले होते, गालावर एवढी सूज आली होती की एक डोळा उघडत नव्हता. इतर उपचारांसाठी ती जी औषधे घेत होती त्यातल्या एका औषधाचा असा परिणाम झाला होता की तिच्या शरीरातले रक्त जागोजागी कातडीच्या खाली जमा होऊन ती काळीनिळी झालेली दिसत होती, सर्व अंगामधून होत असलेल्या तीव्र वेदना तिच्याच्याने सहन होत नव्हत्या, अंगात प्रचंड अशक्तपणा आला होता, एक पाऊल उचलावे एवढीसु्द्धा ताकत वाटत नव्हती.

तिला हाडाच्या किंवा कसल्याच शस्त्रक्रियेची गरज नसल्यामुळे सर्जिकल वार्डमध्ये ठेवता येत नव्हते, त्या वेळी तिला ताप, खोकला, रक्तदाब अशा प्रकारची विकोपाला गेलेली कोणतीही गंभीर व्याधी नसल्यामुले मेडिकल वार्डचे लोक तिला घेऊन जायला तयार होत नव्हते. मग तिला हॉस्पिटलमध्ये नेमके कुठे ठेवा़चे यावर कॅज्युअल्टीमध्ये चर्चा चालली होती. उदय आणि शिल्पा हे दोघे नेसत्या वस्त्रांनिशी पुण्याहून आलेले होते, त्या रात्री त्यांनी कुठे मुक्काम करायचा याचाही त्यांनी अजून विचार केला नव्हता. अलकाच्या अशा नाजुक अवस्थेत ते तिला कुठे आणि कसे घेऊन जाणार होते? उदय पोलिस स्टेशन वर जाऊन परत आला तोंवर मध्यरात्र व्हा़यला आली होती. अखेर अलकालाही एका वार्डमध्ये एडमिट केले गेले आणि तिच्या सोबतीला शिल्पा तिथेच राहिली. गुड किंवा bad Friday चा दिवस अशा प्रकारे संपला.