Friday, November 28, 2014

सतारीचे बोल . केशवसुत

शालेय जीवनात मराठी भाषा हा माझा आवडता विषय होता. वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुटी लागताच पुढल्या इयत्तेच्या पुस्तकांची जमवाजमव सुरू होत असे. त्यातले मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक मी सर्वात आधी वाचायला घेत असे आणि त्यातले सगळे गद्यपद्य धडे वाचून टाकत असे. पुढल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईपर्यंत हे पुस्तक माझ्या ओळखीचे झालेले असे. आमच्या वर्गातल्या काही मुलांना कदाचित कवितांचा आशय समजत नसल्यामुळे त्या शिकायला कठीण वाटत असत किंवा आवडत नसत. मला मात्र काही कवितांमध्ये शब्दांच्याही पलीकडले, ओळींमधले (बिट्वीन द लाइन्स) बरेच काही असते असे जाणवायचे आणि ते समजून घ्यावे असे ही वाटायचे. लहानपणी नीट न समजलेली अशीच एक शंभर वर्षांपूर्वीची कविता पाच दशकानंतर अलीकडे पुन्हा माझ्या वाचनात आली. १८६६ ते १९०५ या कालखंडात होऊन गेलेल्या कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांची सतारीचे बोल ही कविता आमच्या एका पाठ्यपुस्तकात होती. त्यात बहुधा मूळ कवितेतली ३-४ कडवीच घेतलेली असावीत, कारण इतकी लांबलचक कविता कधीही शिकल्याचे मला आठवत नाही. त्या काळात ती मलाही फारशी समजली नव्हती. सर्वसाधारण मुलांनी या कवितेचा घेतलेला शब्दशः अर्थ आधी पाहू.

काळोखाची रजनी होती ..... यात काय विशेष आहे? नेहमीच रात्री काळोख असतो. त्या काळात आमच्या गावात विजेचा झगझगाटही नसायचा. रात्र पडली की सगळीकडे अंधारगुडुप आणि चिडीचूप होऊन जात असे. "आपली रजनी तर प्रकाशला आवडते ना?" मागच्या बाकावरून एक कॉमेंट. बिचारी रजनी लाजून चूर.
हदयी भरल्या होत्या खंती  ..... त्या कवीच्या मनात खंत वाटण्यासारख्या काही गोष्टी असतील. सगळ्यांनाच कसली ना कसली दुःखे असतात. याला बहुधा जास्त असतील.
अंधारातचि गढले सारे  ....... मनातली खंत उजेडात तरी कशी दिसणार? अंधारात काही दिसत नाही हे सांगायला कशाला पाहिजे? अंधारात काय घडलं सर?  एक वात्रट प्रश्न
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे   ....... नाही तरी रोज रोज त्याच त्याच चांदण्या कोण पहातो?
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,  ..... कशाला? ठेचकाळून पडशील ना.
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१ 
आमच्या गावात कोणीच सतार हे वाद्य वाजवत नसल्याने कोणी ते पाहिलेही नव्हते, पण ते एक तंतुवाद्य आहे असे ऐकले होते. त्यामुळे त्यातून ट्याँव ट्याँव, ट्वंग ट्वंग असे आवाज निघत असावेत असे वाटत होते. दिड दा, दिड दा, दिड दा काही समजत नव्हते.
आपल्या कवितेची अशी चिरफाड झालेली पाहून  "अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख।" असे कोणाही कवीला त्रिवार म्हणावेसे वाटल्यास काही नवल नाही.

आता या कवितेकडे जरा गंभीरपणे पाहू. 
काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१
कवितेची ही फक्त सुरुवात आहे. यात कवीने वातावरणनिर्मिती केली आहे. कोणताही विचार मांडलेला नाही. काही कारणाने त्याच्या हृदयात काठोकाठ खंत भरली आहे, सगळीकडे अंधःकार दाटलेला दिसत आहे. बाहेरच्या जगात जमीनीवर अंधार असला तरी आभाळात तारे चमकत आहेत, याच्या मनात तेवढा अंधुक प्रकाशही नाही. तिथे फक्त विषण्णता आहे. अस्वस्थपणा त्याला एका जागी बसू देत नसल्यामुळे तो उगाचच येरझारा घालतो आहे. अचानक या उदास वातावरणाच्या विपरीत असे काही घडते, एका खिडकीमधून येणारे सतारीचे सुरेल बोल त्याच्या कानावर पडतात. दिड दा. दिड दा, दिड दा यात एक सुंदर अशी लय आहे, एक ठेका आहे.

आपले हृदय जर सुन्न झाले असेल तर सगळे जगच स्तब्ध झाल्यासारखे वाटते. पण हे जड जग तर खोटे आहे, "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या" हे तत्वज्ञान कवीने दुस-या कडव्यात सांगितले आहे. (शाळकरी वयात ते काय समजणार होते?) अत्यंत निराशेमुळे आता आपला जीव द्यावा असे कवीला वाटत होते आणि साहजीकच अशा मनस्थितीत असतांना त्याला सुरेल सतारवादन ऐकावे असे वाटणार नाही.
जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....२

तिस-या कडव्यात याचाच अधिक विस्तार केला आहे. मनात भावनांचे इतके मोठे थैमान चाललेले असतांना बाहेर सोसाट्याचे वादळ झाले तरी या अवस्थेत कवीला ते सुसह्य वाटले असते. मनात उठणा-या भयानक चीत्कारांपुढे भुतांचा आरडाओरडासुद्धा त्याला सौम्य वाटला असता. अशा विषण्ण अवस्थेत भैरवी रागातले सतारीचे मंजुळ आणि प्रेमळ स्वर ऐकावेसे त्याला वाटले नाहीच, उलट त्यांचा तिटकारा आला.
सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....३

रागाने जळफळत तो त्या खिडकीकडे गेला, त्याने तिच्या दिशेने हवेतच एक ठोसा लगावला, आतल्या माणसाला दोन चार शिव्या हासडल्या.  "अवेळी पिर पिर करणारी तुझी सतार फोडून टाक." असेही तो पुटपुटला. आपण दुःखात बुडालेलो असतांना दुस-या कुणी मजेत रहावे हे कवीला सहन होत नव्हते. असे त्याने चौथ्या कडव्यात लिहिले आहे.
ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
म्हटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....४

कवी त्या खिडकीकडे रागारागात जात असतांना एक चमत्कार झाला. कां कोणास ठाऊक? पण तो थबकला. त्या मधुर ध्वनीने काय जादू केली कोण जाणे? आपल्या मनातली अस्वस्थता विसरून ते सूर ऐकत बसावे असे त्याला वाटायला लागले. येरझारा थांबवून तो एका ओट्यावर बसून सतारीचे बोल ऐकत राहिला.
सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत .... दिड दा, दिड दा, दिड दा .....५

मांडीवर कोपरे ठेवून त्याने आपले डोके दोन्ही तळहातात धरले. कानावर पडत असलेले सतारीचे करुण सूर त्याच्या हृदयाला जाऊन भिडले. ते ऐकतांना त्याच्या डोळ्यामधून घळघळा पाणी वाहू लागले.
तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा...
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता .... दिड दा, दिड दा .....६

कोणी तरी आपल्या खांद्यावर हात ठेऊन आपल्याला धीर देत आहे असा भास कवीला झाला. "असा त्रागा करून काय उपयोग आहे? थोडे धीराने घे. हे दिवस जातील, चांगले दिवस येतील." असेच ते सतारीचे बोल आपल्याला सांगत आहेत असे त्याला वाटले.
स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....दिड दा, दिड दा, दिड दा .....७

मनात आशेचे किरण दिसू लागताच त्याची नजर वर आकाशाकडे गेली. आता त्याला "एक अंधेरा, लाख सितारे" याचा अनुभव आला. सतारीच्या बोलांमधून हे सत्य बाहेर पडत आहे असे त्याला वाटले.
आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा .....८

सतार वादक तन्मयतेने सतार वाजवतच होता. ते सूर ऐकणा-या कवीच्या मनात त्याचे निरनिराळे प्रतिसाद उमटत होते. आधी भीषण वाटून नको झालेले सूर हवे हवेसे आणि आश्वासक वाटायला लागलेले होतेच, आता त्याला उदात्ततेची झालर लाभली. या विश्वात आपण एकटे नाही, अनादि काळापासून अनंत काळापर्यंत यात सगळीकडे भरून राहिलेल्या ब्रह्मतत्वाचाच आपण एक भाग आहोत हे त्याला उमगले. त्याच्या मनातला आपपरभाव गळून पडला. 
वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता .... दिड दा, दिड दा .....९

"चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम्" याची जाणीव झाल्यानंतर कवीला आता सगळीकडे प्रेम आणि आनंद दिसू लागला. मनातला अंधार दूर होताच बाह्य जगातले सौंदर्य त्याला दिसायला लागले. ही सगळी किमया सतारीच्या त्या दिव्य स्वरांनी केली.
प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला... मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....१०

वाजत असलेली ती सतारही अखेर शांत झाली. पण आता कवीच्य़ा मनातली वादळे शमली होती, ते शांत झाले होते. त्याचे हृदय शांत होताच धरती, तारे, वारे सगळे काही शांत झाले होते. तो शांतपणे घरी जाऊन झोपी गेला पण त्याच्या अंतर्मनात सतारीचे बोल घुमत राहिले.
शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....११

संपूर्ण नकारात्मकतेपासून सुरू झालेला मनाचा हा अलगद झालेला प्रवास केशवसुतांनी किती नाजुकपणे रंगवला आहे? सतारीचे बोल हे सकारात्मक ऊर्जेचे एक प्रतीक आहे. डोळ्यापुढे अंधार झाला तरी कानाचे दरवाजे उघडे असतात, त्यातून सकारात्मक जाणीवा होऊ शकतात. वैफल्य येऊ देऊ नये, काही तरी चांगले सापडेल याचा विचार करावा, त्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे, मनातली जळमटे आपोआप दूर होतील असा संदेश कवी केशवसुतांच्या या कवितेमधून मिळतो.

Sunday, November 23, 2014

आकाशातला वक्र प्रवास - विमान ते मंगळयान



दोन बिंदूंना जोडणा-या असंख्य वक्ररेषा असू शकतात पण तशी फक्त एकच सरळरेषा काढता येते, या सरळ रेषेची लांबी सर्वात कमी असते, वगैरे सिद्धांत आपण प्राथमिक भूमितीमध्ये शिकलो होतो. यांचे प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे दोन गावांना जोडणारा सरळसोट रस्ता असला तर एका गावाहून दुस-या गावाला जाणारा तो सर्वात जवळचा मार्ग असतो. त्यावरून प्रवास केल्यास कमी वेळ लागतो आणि कमी श्रम पडतात. दादर ते परळ यासारख्या लहानशा आणि सपाट भूभागात तसा सरळ रस्ता बांधणे शक्य असते, पण मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता बांधणे शक्यच नसते. डोंगर- द-या, नदी- नाले यांच्यासारखे वाटेतले अनेक अडथळे ओलांडून पुढे जाण्यासाठी वळणावळणाने जाणारे रस्ते बांधावे लागतात.

आकाशात असले अडथळे नसतातच आणि रस्ताही बांधावा लागत नाही. कमीत कमी वेळ आणि खर्च यावा या दृष्टीने आकाशमार्गातले सगळे प्रवास अगदी सरळ मार्गाने केले जात असतील किंवा करता येत असतील ना? पण मूंबई ते न्यूयॉर्कचा विमानप्रवास असो किंवा चंद्रयान वा मंगलयान असोत, त्यांचे मार्ग वक्राकारच असतात. मुंबई आणि न्यूयॉर्क ही शहरे पृथ्वीच्या विरुद्ध बाजूंना वसलेली असल्यामुळे त्यांना जोडणारी सरळरेषा पृथ्वीच्या पोटातून जाते. विमानांचे उड्डाण आकाशातून, किंबहुना पृथ्वीच्या सभोवती पसरलेल्या हवेमधून होते. विमानात बसलेल्या माणसांना आपण अगदी नाकासमोर सरळ रेषेत पुढे जात आहोत असा भास होत असला तरी त्या मार्गाचा प्रत्यक्ष आकार एका प्रचंड आकाराच्या कमानीसारखा गोलाकार असतो. या दोन शहरांना जोडणा-या अशा अनेक कमानी काढता येतात. मी अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा जातांना आमचे विमान मुंबईहून निघाल्यानंतर उत्तरेच्या दिशेने प्रवास करत कझाकस्तान, रशिया यासारख्या देशांवरून उडत उत्तर ध्रुवापाशी पोचले आणि तिकडून कॅनडा मार्गे अमेरिकेत (य़ूएसएमध्ये) दाखल झाले. परतीच्या प्रवासात मात्र आमच्या विमानाने पूर्व दिशा धरली आणि अॅटलांटिक महासागर ओलांडून ते युरोपमार्गे भारतात आले. दोन्ही मार्ग वक्रच, पण निराळे होते.  

मुंबई आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान पृथ्वी असते, पण चंद्र तर आपल्याला आभाळात दिसतो तेंव्हा आपल्या दोघांमध्ये कसलाच अडथळा नसतो. चंद्राचा प्रकाश सरळ रेषेत आपल्याकडे येत असतो.  झाडाच्या फांदीवर लागलेल्या फळावर नेम धरून दगड मारला तर तो त्या फळाला लागतो त्याचप्रमाणे चंद्रावर नेम धरून बंदूक झाडली तर तिची गोळी सरळ रेषेत पुढे पुढे जाऊन चंद्राला लागायला हवी, पण तसे होत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती गोळी पुन्हा जमीनीवरच येऊन पडते. एकादी वस्तू दर सेकंदाला सुमारे अकरा किलोमीटर इतक्या वेगाने आकाशात भिरकावली तर ती पुन्हा पृथ्वीवर परत येत नाही असे दोनतीनशे वर्षांपूर्वी सर आयझॅक न्यूटन यांनी प्रतिपादन केले होते. पण कोणत्याही वस्तूला एकदम इतका जास्त वेग कसा देता येऊ शकेल हे त्यालाही ठाऊक नव्हते आणि हे अजूनही शक्य झालेले नाही.

बंदुकीतून सुटणारी गोळी ही आपल्या माहितीतली सर्वात वेगवान वस्तू असते. ती प्रचंड वेगाने हवेमधून पुढे जात असतांना आपल्या डोळ्यांना दिसतसुद्धा नाही. डोक्याची कवटी किंवा छातीचा पिंजरा तोडून आत घुसण्याइतकी शक्ती (कायनेटिक एनर्जी) त्या गोळीत असते, पण असे असले तरीही तिचा वेग दर सेकंदाला सुमारे दीड किलोमीटर एवढाच असतो. यामुळे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकत नाही. शिवाय हवेबरोबर होत असलेल्या घर्षणामुळेही तिचा वेग कमी होत जातो आणि काही किलोमीटर अंतरावर जाऊन ती जमीनीवर येऊन पडते. तोफेच्या गोळ्याची अवस्थाही फारशी वेगळी नसते.

अंतराळात पाठवल्या जाणा-या अग्निबाणांच्या रचनेत त्यात अनेक कप्पे ठेवलेले असतात. या रॉकेटच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा धमाका होऊन त्याला जेवढा वेग मिळेल तितक्या वेगाने ते आकाशात झेपावते. हा वेग एस्केप व्हेलॉसिटीइतका नसला तरी त्या रॉकेटला वातावरणाच्या पलीकडे नेतो. त्यानंतर काही सेकंदांतच दुस-या टप्प्याचा स्फोट होऊन त्याला अधिक वेग देतो, त्यानंतर आवश्यक असल्यास तिसरा, चौथा वगैरे टप्पे त्याचा वेग वाढवत नेतात. पण हे होत असतांना ते रॉकेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त झालेले नसते, ते चंद्राच्या दिशेने न जाता पृथ्वीला प्रदक्षिणा करू लागते. या भ्रमणामध्ये कोणतेही इंधन खर्च करावे लागत नाही. अशा प्रदक्षिणा करत असतांना त्या यानावरले योग्य ते रॉकेट इंजिन नेमक्या क्षणी काही क्षणांसाठी चालवून त्याचा वेग वाढवला जातो. यामुळे त्याची कक्षा अधिकाधिक लंबगोलाकार (एलिप्टिकल) होत जाते. ज्या वेळी ते चंद्राच्या दिशेने पृथ्वीपासून दूर जाते आणि चंद्राच्या जवळपास जाते तेंव्हा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाहून जास्त होते. त्या यानाला एका बाजूने पृथ्यी आणि दुस-या बाजूने चंद्र आपल्याकडे खेचत असतांना त्यात चंद्राचा जोर जास्त होताच ते यान चंद्राचा उपग्रह बनून त्याला प्रदक्षिणा घालायला लागते. त्या वेळी ते चंद्रावर पोचले असे म्हंटले जाते. एक लहानसे यान तिथून काळजीपूर्वक रीतीने चंद्रावर पाठवून उतरवले जाते. अशाच एका लहान यानात बसून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास प़थ्वीवरून चंद्रापर्यंतचा प्रवास हा सरळ रेषेत होत नाही. त्या प्रवासात पृथ्वीभोवती आणि चंद्राभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा मुख्य समावेश असतो.

मंगळयानाच्या प्रवासाचा पहिला भाग चंद्रयानासारखाच होता. त्या यानानेसुद्धा जमीनीवरून उड्डाण केल्यानंतर अनेक दिवस पृथ्वीप्रदक्षिणा घातल्या. पण पुढच्या टप्प्यात मात्र त्याला लगेच मंगळ ग्रह गाठायचा नव्हता. खरे तर मंगळग्रह त्याच्या आसपास कुठेही नव्हता. स्वतःच्या सूर्यप्रदक्षिणेत तो पृथ्वीच्या खूप पुढे होता. मंगळयानाने पृथ्वीपासून दूर जाणारी अशी अधिक लंबगोलाकृती कक्षा निवडून ते सूर्याभोवती फिरू लागले. पुढल्या सुमारे एक वर्षाच्या कालावधीत पृथ्वी तिच्य़ा सूर्यभ्रमणात मंगळाच्या आणि त्या यानाच्या पुढे निघून गेली, यानाने हळूहळू पुढे जात अखेर मंगळाला गाठले आणि ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्रात येताच त्या ग्रहाभोवती फिरायला लागले. मंगळयानाच्या प्रवासात त्याने पृथ्वीभोवती आणि मंगळाभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा समावेश होत असला तरी त्याने सूर्याभोवती घातलेली अर्धप्रदक्षिणा हा या यात्रेचा मुख्य भाग असतो.

चंद्र हा उपग्रह पृथ्वीभोवती एका लंबगोलाकृती कक्षेत फिरत असल्यामुळे तो पृथ्वीपासून सुमारे ३८४,००० किलोमीटर अंतरावर असतो. या दोघांमधील जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात सुमारे ४२५०० किमी एवढाच  फरक असतो. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर सुमारे ४००,००० किलोमीटर्स असे धरले तरी यानाचा प्रत्यक्ष प्रवास याच्या कित्येक पटीने जास्त झाला आणि त्यासाठी त्याला तब्बल वीस दिवस लागले.

 मंगळ ग्रह स्वतःच एका निराळ्या कक्षेमधून निराळ्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असल्यामुळे पृथ्वी व मंगळ या दोन ग्रहांमधले अंतर रोज बदलत असते आणि दोघांमधले जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात फार मोठा फरक असतो. मंगळयानाच्या प्रवासात या दोन ग्रहांमधल्या अंतराला काहीच महत्व नसते. या यानाच्या उड्डाणाच्या वेळीही पृथ्वी मंगळापासून खूप दूर आणि मंगळाच्या मागे होती आणि ते यान मंगळावर पोचले तेंव्हाही ती खूप दूर पुढे निघून गेली होती. जेंव्हा हे दोन ग्रह एकमेकांपासून कमीतकमी अंतरावर आले होते त्या वेळी मंगळयान या दोघांपासून खूप दूरच होते.  या यानाने कोट्यवधी किलोमीटर्सचा प्रवास करून मंगळाला गाठले आणि त्यासाठी त्याला एक वर्षाचा काळ लागला. तो सारा प्रवास त्याने सूर्याभोवती फिरण्याचा होता.

Friday, November 14, 2014

स्मृती ठेवुनी जाती १२ - नाना बिवलकर

आम्ही अणुशक्तीनगरातल्या सरकारी वसाहतीत रहायला गेलो तेंव्हा आमच्या इमारतीतले साठपैकी साठ रहिवासी सायंटिस्ट किंवा इंजिनियर होते. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या तीन चार बिल्डिंगमध्येसुद्धा तीच परिस्थिती होती. आमच्यासाठी हा नवा अनुभव होता. लहान गावातल्या संमिश्र वस्तीत सोनार, शिंपी, गवंडी, गवळी, डॉक्टर, वकील, पुजारी, भटजी वगैरे सगळ्या प्रकारचे लोक रहात असायचे आणि ते कुठे राहतात हे सगळ्या गावाला ठाऊक असायचे. ज्या माणसाकडे आपले काही काम असेल तो माणूस तिथे सहजपणे भेटत असे. पण इथे कोणाचाच पत्ता कोणालाही माहीत नव्हता. आमच्या नव्या घरासाठी सामान आणून आणि लावून झाल्यानंतर मुंबईतल्या नातेवाइकांना काही निमित्याने बोलावून आमचे घर दाखवायचे होते. त्यासाठी आणि नव्या घरात रहायची सुरुवात मंगलमय वातावरणात व्हावी म्हणून एक सत्यनारायणाची पूजा करावी असा विचार आमच्या मनात आला. पण त्यासाठी कोणकोणते सामान लागते, ते कुठे मिळते आणि ती पूजा कोण सांगणार वगैरे समजत नव्हते. आमच्या हिंदी भाषिक शेजा-यांनी एका देवळातल्या गुजराथी पूजा-याला बोलावून पूजा, होमहवन वगैरे करवून घेतले, पण ते काही आम्हाला पसंत पडले नाही. अशाच दुस-या एका देवळातल्या एका मराठी पूजा-याला बोलावून आम्ही पूजा करवून घेतली, पण आम्ही मुंबईत नवखे असल्यामुळे लुबाडायला चांगले गि-हाईक आहोत असे त्याला वाटले असावे आणि देवाधर्माच्या कामात घासाघीस करणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. पण तो अनुभव काही मनाला फारसा भावला नाही. नंतरच्या काळात ओळखी पाळखीमधून आणखी कोणाकोणाला बोलावून पूजा करायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला सोयिस्कर अशा दिवशी त्यांना वेळ नसायचा आणि ते येऊ शकत असतील त्या दिवशी आम्हाला काही अडचण असायची असे दोन चार वेळा झाले. त्या काळात आमच्याकडेही फोन नव्हता आणि सेलफोनचा शोधही लागला नव्हता. त्यामुळे त्या पुरोहितांशी संपर्क साधणेही बरेच कठीण असायचे.

अशा प्रकारची आमची शोधाशोध चालली असतांनाच "एकदा आपल्या नाना बिवलकरांना विचारून पहा ना." असे कुणीतरी सांगितले. मी लगेच त्यांचा पत्ता मिळवला आणि वहीत लिहून ठेवला. त्यानंतर जेंव्हा आम्हाला पूजा करायची होती त्या वेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. मी स्वतःची ओळख करून दिली, "मी घारे, आम्ही नंदादेवीमध्ये राहतो. मी पीपीईडीत नोकरीला आहे."
"हां, तुम्हाला कॉलनीत पाहिल्यासारखे वाटते आहे. मी काकोडकरांबरोबर काम करतो." नाना.
ते ऐकून मी चपापलोच. त्या काळातही श्री.अनिल काकोडकर बीएआरसीमध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्याबरोबर काम करणारे कोणी सामान्य असणार नाहीत. बिवलकर रहात होते त्या बिल्डिंगमध्येही माझ्या ओळखीतले काही इंजिनियर रहात असत, म्हणजे हे सुद्धा बहुधा ऑफीसर असणार, वयाने माझ्याहून दहा बारा वर्षे मोठे होते, म्हणजे ते चांगल्या पोस्टवर असले तर आमच्या घरी पूजा सांगायला कशाला येतील? पुढे बोलण्याला कुठून सुरुवात करावी ते मला सुचत नव्हते. नाना बिवलकरांनीच विचारले, "तुमचं माझ्याकडे काही काम होतं कां?"
"त्याचं असं आहे की आम्हाला एकदा सत्यनारायणाची पूजा करायची आहे." मी चाचपडत म्हंटले
"छान, या रविवारीच करा ना, चांगला दिवस आहे."  नानांना यातले समजत होते आणि इंटरेस्ट होता हे तर समजले.
"पूजा सांगायला येणारे कोणी तुमच्या ओळखीत आहेत का?" मी हळूच विचारणा केली.
"मी ही रविवारी मोकळाच असतो, मीच येऊ शकेन." नानांनी सांगताच माझी काळजी मिटली.
"सत्यनारायणाच्या पूजेला काय काय लागतं ते तुम्हाला माहीत आहे ना?" नानांनी विचारले.
"साधारण कल्पना आहे. तबक, कलश, ताम्हन, विड्याची पानं, सुपा-या, झालंच तर प्रसादासाठी रवा, साजुक तूप, साखर .... "  आवश्यक पदार्थांची मला आठवतील तेवढी नावे मी सांगितली.
"तुमच्याकडे चौरंग असेलच, त्याला बांधायला केळीचे खुंट, आंब्याची पानं ....बुक्का, अष्टगंध ..." नानांनी आणखी काही नावे सांगितली आणि "पूजेचं सगळं सामान चेंबुरच्या पाटलांच्या दुकानात मिळतं." ही माहितीही दिली.
"हो, आम्ही दर वर्षी त्यांच्याकडूनच गणपतीही आणतो आणि त्या उत्सवाला लागणा-या वस्तूही." मी त्यांना दुजोरा दिल्यावर ते बोलले. "जमेल तेवढं सामान तुम्ही आणालच, त्यातून एकादी गोष्ट राहिली तरी देव काही लगेच रागावत नाही."  थोडक्यात सांगायचे तर "या गोष्टींचे टेन्शन घेऊ नका." असे त्यांनी सांगितले.
ते एवढे प्रॅक्टिकल दिसत आहेत हे पाहून मला थोडा धीटपणा आला. मी त्यांना विचारले, "यातलं कोणकोणतं सामान तुम्ही आणता आणि साधारणपणे दक्षिणा वगैरे ....."
"छे छे, अहो भिक्षुकी हा काही माझा व्यवसाय नाहीय्, या निमित्यानं माझ्याकडून पुण्यकार्य घडतं, देवाची नावं जिभेवर येतात आणि आपल्या लोकांचं काम होतं म्हणून मी एकाद दुसरी पूजा घेतो." त्यांनी पहिल्या भेटीतच मला "आपलेसे" केले होते.  "दक्षिणेचं म्हणाल तर तुमची इच्छा असेल तेवढी हवी तर द्या." 
त्यानंतर पुढील वीस पंचवीस वर्षे दर वर्षी नानाच आमच्या घरी येऊन सत्यनारायणाची पूजा सांगत होते. "एवढेच कां?" असे त्यांनी कधीही बोलण्यातून किंवा देहबोलीमधून दाखवले नाही आणि "इतके कशाला?" असेही नाही. वाढती महागाई आणि माझा वाढता पगार यांचा विचार करून मी आपणहून त्यांना जेवढी दक्षिणा देत होतो तिचा ते हंसून स्वीकार करत होते आणि तोंडभर आशीर्वाद देत होते.

आमच्या घरी पुढच्या रविवारी पूजा करायची हे ठरवताच नानांनी लगेच भिंतीवरल्या कॅलेंडरमध्ये त्याची नोंद करून टाकली. त्यांचे काम किती व्यवस्थित असायचे हे त्यातून दिसत होते, पण त्या वेळी ती गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. सकाळी आठ वाजता पूजा सुरू करायची असे मोघम बोलणे झाले होते. पण तो काही मुहूर्त नव्हता. त्यामुळे आठ म्हणजे साडेआठ नऊ होणार अशी माझी कल्पना होती. पण रविवारी सकाळी आठ वाजायलाही अजून पंधरा वीस मिनिटे शिल्लक असतांनाच नाना आमच्या घरी येऊन हजर झाले.
"पूजेची तयारी कुठपर्यंत आली?" त्यांनी हंसत हंसत विचारले. आमची तयारी सुरूही झालेली नव्हती हे दिसतच होते. पण त्यांनी तसे दाखवून दिले नाही.
"पूजा कुठे मांडायची ठरवली आहे?" नानांनी पुढला प्रश्न केला. आम्ही हॉलमधला एक भाग रिकामा करून ठेवला होता. तो त्यांना दाखवून त्यांनाच विचारले, "इथे केली तर ठीक राहील ना?"
त्यांनी पूर्व पश्चिम दिशा पाहून घेतल्या आणि देवाचे तोंड कोणत्या दिशेला होईल? त्याच्या समोर आम्ही बसणार आणि बाजूला बसतांना त्यांचे तोंड कोणत्या दिशेला होईल? वगैरे विचार करून सगळ्यांच्या जागा ठरवल्या आणि सांगितले, "सगळे सामान इथे आणून ठेवा आणि तुम्ही दोघे तयार होऊन या."

आम्ही बाजारातून आणलेल्या सगळ्या सामानाच्या पिशव्या तिथेच ठेवलेल्या होत्या, घरातली भांडीही आणून त्यांना दिली. त्यांनी चौरंगाला भिंतीशी समांतर ठेवले, त्याच्या चारी खांबांना केळीचे खुंट बांधले, लाल कापडाची व्यवस्थित चौकोनी घडी करून ती चौरंगावर पसरवून चौरंगाला झाकले. त्या कापडावर मूठभर तांदूळ ठेऊन ते वर्तुळाकारात पसरवले. त्याच्या मधोमध कलशाला ठेऊन त्यावर एक ताम्हन ठेवले आणि त्यात तांदूळ भरले. बाळकृष्णाला ठेवण्यासाठी मधोमध थोडी मोकळी जागा सोडून आठ दिशांना अष्टवसू आणि नवग्रह यांच्या नावाने सुपा-या मांडून ठेवल्या. चौरंगावर ओळीने विड्याची पाने मांडून त्यावर नारळ, सुपारी, बदाम, खारीक, गूळखोबरे वगैरे पदार्थ अनुक्रमाने ठेवले. एका बाजूला समई उभी केली.  फुले, दुर्वा, तुळशीची पाने वगैरे एका तबकात आणि गंध, अक्षता, हळद, कुंकू, नाना परिमलद्रव्ये, कापूर, ऊदबत्त्या, निरांजने वगैरे दुस-या तबकात व्यवस्थितपणे मांडून ठेवली. आम्ही तयार होऊन येईपर्यंत नानांनी सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती.

पूजेची सगळी तयारी करून देऊन ते आतल्या खोलीत गेले आणि शर्ट पँट उतरवून मुकटा नेसून बाहेर आले आणि आम्ही पूजेला बसलो. सुरुवातीपासूनच यातल्या निरनिराल्या विधीमधली एक एक क्रिया करतांना नाना त्या क्रियेचे महत्व आम्हाला थोडक्यात सांगत होते. देवाची पूजा सुरू करायच्या आधी समईची पूजा करून तिच्या वाती पेटवून उजेड करायचा, भूमीला वंदन करायचे, कलशाची पूजा करून त्यात पाणी भरायचे, शंख, घंटा वगैरेंची पूजा करायची वगैरे वगैरे करण्यामागे हा हेतू असतो की या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या सुस्थितीत आहेत हे निश्चित करून घेतले जाते. एकादा प्रयोग सुरू करायच्या आधी त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री आणि उपकरणे उपलब्ध आहेत हे पाहून ती तपासून घेतली जातात तसेच हे असते हे माझ्या लक्षात आले. पूजेच्या सुरुवातीला एक संकल्प सोडायचा असतो. त्यावेळी या पूजेचे प्रयोजन काय आहे हे सांगायचे असते. प्रयोगासाठीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह असावे लागतेच. पूजा करणा-या व्यक्तीचे नाव, त्याच्या वडिलांचे आणि कुळाचे नाव आणि गोत्र सांगून हा कार्यक्रम अमूक वारी आणि तिथीला, तमूक नक्षत्रात चंद्र असतांना, अमक्या तमक्या राशींमध्ये सूर्य, मंगळ, गुरू वगैरे इतर ग्रह असतांना आणि भारतातल्या अमक्या स्थळी केला जात आहे याचा उच्चार केला जातो. हे म्हणजे एकादे लीगल अॅग्रीमेंट करतांना सुरुवातीलाच ते करणा-या पार्टींची नावे, हुद्दे, अॅग्रीमेंटची तारीख, ते करण्याचे ठिकाण वगैरे लिहितात तसे असते. यापूर्वी मी कधी याबद्दल विचार केला नव्हता किंवा मला त्यासंबंधीच्या मंत्रांमधले शब्दच समजले नसल्यामुळे गुरूजींनी सांगितले की "मम" म्हणायचे एवढेच माहीत होते. नाना बिवलकर मात्र सर्व मंत्रामधल्या प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते सावकाशपणे म्हणत असल्यामुळे ऐकू येत होते आणि अधून मधून त्यातला सारांश सांगतही मला असल्यामुळे ते समजत होते आणि त्यात मजा येत होती.

त्यानंतर आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची असली तर नानांना आधी विचारून ती ठरवत होतो आणि पूजा सांगायला नाना नेहमी येतच होते. त्याशिवायही इतर कारणांनीही आमच्या भेटी होत होत्या, माझे एक हरहुन्नरी मित्र आल्हाद आपटे यांच्या पुढाकारातून एक लहानसा संगीतप्रेमी ग्रुप जमला होता. बहुतेक वेळी आपट्यांच्या घरी किंवा काही वेळा आणखी कोणाच्या घरी जमून आम्ही गाण्याचे कार्यक्रम करत होतो. नानांचा मुलगा विवेक सर्वांना तबल्यावर साथ करायचा. बहुतेक वेळा नानाही गाणी ऐकायला येऊन बसत असत. ते आमच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते, पण सर्वांमध्ये सहजपणे मिसळत असत. अभंग, भजन वगैरें गाण्यांवर झांजा वाजवून ताल धरत असत. एकदा आम्ही त्यांनाही गायचा आग्रह केला. त्यांनी इतके छान गाणे म्हंटले की मग सगळ्याच बैठकांमध्ये तेही भाग घ्यायला लागले. त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला होता का ते माहीत नाही, पण "घनघनमाला कधी दाटल्या" यासारखे रागदारीवर आधारलेले गाणे ते दणक्यात गायचे, "पाउले चालती पंढरीची वाट" आणि त्याच चालीवरचे "कानाने बहिरा मुका परी नाही" अशी अनेक गाणी त्यांनी व्यवस्थित सादर केली. हळूहळू आमचे आपसातले संबंध वाढत गेले, एकमेकांच्या घरी जाणेयेणे सुरू झाले.

बीएआरसीच्या नोकरीत असतांना ते अॅडमिनमध्ये होते. एलडीसी, यूडीसी, एसजीसी, पीए वगैरे टप्प्यांमधून ते हळूहळू वर सरकत होते. ऑफिसमधला त्यांचा नेमका हुद्दा मी त्यांना कधी विचारलाही नाही आणि त्यांनीहून तो सांगितलाही नाही. माझ्या ऑफीसच्या कामामध्येही मला कधी त्यांना भेटायला जावे लागले नाही किंवा ते माझ्याकडे आले नाहीत. आमचे संबंध पूर्णपणे पर्सनलच राहिले. पण घरी किंवा कॉलनीमध्ये त्यांना भेटणारे सगळे लोक त्यांना चांगला मान देत होते हे मी पहात होतो. तो त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांशी करत असलेल्या चांगल्या वागणुकीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाला मिळत असावा.

नाना रिटायर व्हायच्या आधीच विवेक बीएआरसीत नोकरीला लागला होता. त्यालाही कॉलनीमध्ये जागा मिळाली आणि नानांचे कुटुंब कॉलनीतच राहिले. त्यांनी तळेगावला एक घर घेऊन ठेवले होते, पण ते तिथे जास्त दिवस रहात नसत, अधून मधून तिकडे रहायला गेले तरी काही ना काही कारणाकारणाने ते अणुशक्तीनगरला येत असत आणि बरेच दिवस रहात असत. यामुळे आम्हाला ते भेटतच राहिले आणि पूजेलाही येत राहिले. पुढे माझ्या सेवानिवृत्तीनंतर मीच कॉलनी सोडली. त्यानंतरसुद्धा एक दोन वेळा ते पूजा सांगायला वाशीलासुद्धा आले होते, पण सत्तरी उलटून गेल्यानंतर त्यांना इतक्या दूर यायला सांगणे बरे वाटत नव्हते. वयोमानानुसार अंगातली शक्ती कमी झाल्याने त्यांना ते जमलेही नसते. एक दोन वेळा आम्ही अणुशक्तीनगरला गेलो असतांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो. पुढे आम्हालाही अधिक फिरणे जमेनासे झाले. त्यामुळे आमच्यातला संपर्क संपुष्टात आला.

दोन महिन्यांपूर्वी माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेली होती. मला तिथे कोचावर बसलेले पाहून विवेक माझ्याजवळ आला. त्याच्याशी बोलतांना कळले की नाना खूप आजारी आहेत आणि त्यांना पुरुषांच्या वॉर्डात ठेवले आहे. व्हिजिटर्सची वेळ पाहून मी त्यांना पहायला त्या वॉर्डमध्ये गेलो. त्या वेळी मात्र नानांकडे पहावले जात नव्हते. त्यांना स्वतःहून उठता बसताही येत नव्हते, दोन माणसे त्यांना धरून त्यांची कुशी वळवत होते. अर्धवट मिटलेल्या त्यांच्या डोळ्यांत कसलीच चमक दिसत नव्हती. मी तिथे आलेलो त्यांना दिसले तरी की नाही, दिसले असले तरी त्यांनी मला ओळखले की नाही हेच समजत नव्हते. ते एक अक्षरही बोलत नव्हते की त्यांच्या चेहे-यावर कोणते भाव उमटत होते. ते कितपत शुद्धीवर होते याबद्दल शंका वाटत होती. माझ्या आठवणीतला त्यांचा ओळखीचा हसरा उत्साही चेहेरा डोळ्यासमोर आला आणि सगळेच अंधुक होत गेले. त्यानंतरही मला दोन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते पण नानांना पहायला पुन्हा त्यांच्या वॉर्डात जायचा मला धीर झाला नाही. काही दिवसांनी कळले की ते आता राहिले नाहीत. मी ज्यांना अनेक वेळा वाकून नमस्कार केला होता आणि ज्यांनी मला आशीर्वाद दिले होते अशा माणसांमध्ये नानांची गणती होत होती. आता राहिल्या आहेत त्या त्यांच्या अनेक स्मृती.

Monday, November 10, 2014

स्व.बाबूजी, स्व.गदिमा आणि संदीप व सलिल

                                         (ही छायाचित्रे आंतर्जालावरून साभार घेतली आहेत.)

मी लहान होतो त्या काळात म्हणजे एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात टेप रेकॉर्डर, सीडी प्लेयर, इंटरनेट, यू ट्यूब असले काही नव्हते. क्वचित कोणाकडे स्प्रिंगचा फोनोग्रॅम असला तरी त्याचे हँडल फिरवून चावी भरणे, सुई बदलत राहणे, रेकॉर्ड्सचे झिजणे, त्यावर चरे पडून ती बाद होणे वगैरे कटकटींमुळे तो फोनो फक्त खास प्रसंगीच आणि जरा जपून वाजवला जात असे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्याला हवे ते गाणे ऐकण्याची सोय त्या काळात नव्हती. व्हॉल्ह्व्जवर चालणारा आणि एकाद्या खोक्यासारखा बोजड दिसणारा रेडिओ काही लोकांच्या घरी असायचा, विजेची कृपा असली आणि वातावरण अनुकूल असले तर कधी कधी त्यातून काही गाणी ऐकायला मिळत असत. काही शौकीन लोक त्यांची आवडती चित्रपटगीते ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा थेटरात जाऊन ते सिनेमे पहात आणि त्यातली गाणी पाठ करून स्वतःशी गुणगुणत असत. काही उत्साही आणि कलाकार मंडळी स्वतः ती गाणी ऐकून आणि शिकून इतर मुलामुलींना शिकवत असत आणि त्यांच्याक़डून ती घरगुती व शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये इतर लोकांना ऐकवली जात. त्या टीव्हीपूर्व जमान्यात असे मनोरंजक कार्यक्रम वरचेवर होत असत. अशा काही प्रकारांनी त्या काळातले सुगमसंगीत लोकांपर्यंत पोचत असे. पुढे सेमिकंडक्टर्सवर आधारित ट्रान्जिस्टर रेडिओ आणि कॅसेट टेपरेकॉर्डर आल्यावर घरबसल्या हवी ती गाणी ऐकण्याची सोय झाली आणि हळूहळू हे चित्र बदलत गेले. त्या जुन्या कालखंडात मी पहिल्यांदा ऐकलेली गोड गाणी थोडे प्रयत्न करून ऐकली होती. कदाचित त्यामुळे ती अंतर्मनात जरा जास्तच रुतून बसली होती आणि मला त्या गाण्यांचे गीतकार, संगीतकार व गायक गायिका यांच्याबद्दल वाटणारा आदर ऐकीव गोष्टींमधून किंवा वाचनातून न येता त्या काळात जगतांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून निर्माण झाला होता.

त्या काळात ओव्या, अभंग, आरत्या, हदग्याची गाणी वगैरे भक्ती किंवा लोकसंगीत आपोआप आमच्या कानावर पडत असे. लहान गावातल्या लोकांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीच मिळत नसल्यामुळे त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो. पुणे, मुंबई किंवा मिरज, धारवाड यासारख्या शहरांमध्ये काही दिवस राहून आलेले काही लोक थोडे फार शास्त्रीय संगीत ऐकून आलेले असत. "केवळ रागदारीतले आ..ऊ... म्हणजेच खरे संगीत, इतर सगळे टाकाऊ" असले काही तरी ठामपणे सांगून लतादीदी आशाताई यासारख्या आमच्या आवडत्या गायिकांबद्दल अनुदार उद्गार काढणारे हे लोकच आम्हाला शिष्ट किंवा चक्रम वाटायचे. यामुळे त्यांच्यापासून आणि शास्त्रीय संगीतापासून मी बरीच वर्षे चार हात दूर राहिलो होतो. मराठी भावगीते, चित्रपटगीते आणि हिंदी सिनेमांमधली गाणीच मी आवडीने ऐकत होतो. त्यासाठी थोडी हालचाल करावी लागली तर ती करत होतो.

एकोणीसशे पन्नाशी, साठीच्या काळात मराठी सुगम संगीताला चांगले दिवस आले होते. त्या काळातले अनेक गुणी आणि प्रतिभासंपन्न गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका ही मंडळी त्यांच्या नवनव्या रचना रसिकांपुढे आणत होती. रेडिओवर लागलेल्या प्रत्येक गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक वा गायिका यांची नावे दर वेळी स्पष्टपणे सांगितली जात असत. संगीतकार किंवा गायक म्हणून स्व. सुधीर फडके म्हणजे बाबूजी आणि गीतकार म्हणून स्व.ग.दि.माडगूळकर (गदिमा) यांची नावे त्यातून नेहमी कानावर पडत असत. या दोघांनी एकत्र येऊन तयार केलेली चित्रपटगीते तेंव्हा खूप लोकप्रिय झाली होती, स्व.राजा परांजपे यांच्या चित्रपटांमधली गाणी तर विशेष गाजली होती. बहुधा या त्रयींचे काही अजब रसायन त्या कालात जमले होते. स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांनी आकाशवाणीसाठी तयार केलेले गीतरामायण हा तर संगीताच्या क्षेत्रातला एक चमत्कार म्हणता येईल. त्या काळातल्या लोकप्रिय गीतकारांमध्ये पी.सावळाराम, राजा बढे, शांताबाई शेळके, वंदना विटणकर, जगदीश खेबुडकर आदि अनेक आदरणीय नावे होती. कवीवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, इंदिरा संत आदीं प्रसिद्ध कवींच्या काही निवडक काव्यांना संगीतबद्ध करून त्यांचे प्रसारण केले गेले होते, या बाबतीत मंगेश पाडगावकरांचे नाव सर्वात पुढे होते. संतवाङ्मयातले अभंग आणि बहिणाबाई चौधरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा.रा.तांबे यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींच्या काही उत्कृष्ट कविता नव्या आकर्षक चालींमधून सादर केल्या गेल्या होत्या. बाबूजींच्या काळातच वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, पु.ल.देशपांडे, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर इत्यादि संगीतकारांनीसुद्धा एकाहून एक सरस गाणी दिली होती. अशा प्रकारे मराठी सुगमसंगीताचे विश्व समृद्ध होत असले तरी त्याच काळातल्या हिंदी सिनेमांमधल्या गाण्यांची मनाला जास्त भुरळ पडत होती. नौशाद, शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी, कल्याणजी आनंदजी, मदनमोहन, ओ पी. नय्यर वगैरे संगीत दिग्दर्शकांनी मराठी भाषिक लोकांच्या मनाचासुद्धा जास्तच ताबा घेतला होता.

ज्याप्रमाणे वस्तूंची लांबी, रुंदी, उंची, खोली, वजन यासारख्या रुक्ष आकडेवारीने मोजमापे काढून त्यांची तुलना करता येते, तसे कलेच्या क्षेत्रात करता येत नाही. ऐकलेले कोणते गाणे कानाला जास्त गोड वाटेल, मनाला अधिक स्पर्श करेल, दीर्घ काळ आठवणीत राहील या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. ज्या ज्या गीतकारांची आणि संगीतकारांची गाणी लोकांना खूप आवडली आणि दीर्घकाळ लक्षात राहिली, ज्यांना सर्वांनी मनापासून दाद दिली गेली, ती सगळीच मंडळी माझ्या दृष्टीने महान आणि आदरणीय राहिली. त्यात स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची नावे ठळकपणे येतात. या लेखाच्या शीर्षकात फक्त तीच घेतली आहेत याला एक तात्कालिक कारण झाले. ते म्हणजे "संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांची सध्याची लोकप्रिय जोडी ही स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांच्या जोडीसारखी आहे." असे विधान अलीकडे कुणीतरी कुठे तरी केले आणि त्यावर एक लहानसे वादळ उठले. आजकाल दोन सख्ख्या भावांना कुणी "रामलक्ष्मणाची जोडी" म्हंटले, किंवा अनुरूप पतीपत्नींना "लक्ष्मीनारायणाचा जोडा" म्हंटले तरीसुद्धा काही लोकांच्या नाजुक भावना दुखवल्या जाण्याची शक्यता आहे.

समकालीन कलाकारांचीसुद्धा तुलना करता येत नाही हे मी वर लिहिले आहेच. निरनिराळ्या कालखंडातल्या लोकांची तुलना करणे तर माझ्या मते अप्रस्तुत आहे. गेल्या चार पाच दशकांहून जास्त काळात सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. सामाजिक परिस्थिती, कुटुंब व्यवस्था, राहणीमान यामधील बदलांचे परिणाम माणसामाणसांमधल्या नात्यांवर झाले आहेत. इतर भाषांमधले साहित्यप्रवाह आता अधिक ओळखीचे झाले आहेत. यामुळे पूर्वीचे ज्वलंत विषय मागे पडले आहेत, नव्या समस्यांमधून नवे विषय समोर उभे ठाकले आहेत. या सर्वांचा प्रभाव साहित्यावर आणि काव्यरचनांवर होणारच. या दरम्यानच्या काळात संगीताच्या क्षेत्रामध्येसुद्धा नवनवे प्रयोग केले गेले, अनेक प्रकारचे नवे वारे इतर भाषांमधल्या किंवा परदेशातल्या संगीतातून इकडे आले. पूर्वीची वाद्ये मागे पडून नवी वाद्ये आली, आधुनिक तंत्रज्ञानातून कृत्रिम ध्वनि निर्माण करणे शक्य झाले. ध्वनिमुद्रणाच्या तंत्रात अचाट प्रगती झाली. नव्या संगीतकारांनी यांचा उपयोग करून घेतला पाहिजेच. ते लोक तसा घेतही आहेत. माझ्या लहानपणी सर्वसामान्य लोकांना गाणे ऐकण्याच्या संधी किती कमी होत्या हे मी सुरुवातीलाच लिहिले आहे. त्यामुळे त्या काळातल्या श्रोत्यांनी सुद्धा फक्त तेंव्हा प्रचलित असलेली गाणीच ऐकलेली असायची. आजकाल आपण सव्वाशे वर्षांपूर्वीच्या "पंचतुंड नररुंडमाळधर" पासून ते अलीकडच्या "टिकटिक वाजते डोक्यात" पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी सहजपणे ऐकू शकतो. यामुळे श्रोत्यांची बहुश्रुतता वाढली आहे. त्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यांच्या आवडी बदलल्या आहेत.

याचा विचार केला तर संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या आजकालच्या गाण्यांची तुलना जुन्या काळातल्या प्रसिद्ध गाण्यांशी करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात येईल. शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. स्व.गदिमा आणि स्व.बाबूजींनी प्रत्येकी हजारावर गाणी रचली असतील, दोघांनी मिळूनही शेकड्यांमध्ये गाणी केली असतील. त्यातली सर्वोत्तम अशी काही मोजकी गाणीच आपल्याला आज ऐकायला मिळतात, पूर्वीच्या काळात सुद्धा फारशी न चाललेली त्यांची बाकीची सगळी गाणी काळाच्या उदरात लुप्त झाली आहेत. याच्या उलट नव्या गीत आणि संगीतकारांची सरसकट सगळी गाणी आपल्यासमोर येत असतात, त्यात बरी वाईट, उत्तम, मध्यम, सुमार वगैरे सगळी असतात. यातली किती गाणी पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे निदान वीस पंचवीस वर्षांनंतर शिल्लक राहतील हे काळच ठरवेल.

जुन्या आणि नव्या गीतसंगीतकारांच्या रचनांची तुलना करता येणार नाही, पण त्या रचना लोकांपर्यंत पोचवण्यात त्यांना किती यश आले आणि त्यांना श्रोत्यांचा किती प्रतिसाद मिळाला किंवा मिळत आहे हे कदाचित पाहता येईल. यातसुद्धा काळानुसार फरक पडला आहेच. आज प्रचार आणि प्रसाराची साधने वाढली आहेत, दळणवळण सोपे झाले आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, या सगळ्यामुळे जास्त लोकांना संगीताचे कार्यक्रम पाहणे शक्य झाले आहे. याच्या उलट टेलिव्हिजन आणि इंटरनेटसारखी घरबसल्या मनोरंजन करून घेण्याची सुलभ साधने उपलब्ध झाल्यामुळे मुद्दाम उठून कार्यक्रमासाठी बाहेर जाण्याची गरजही आता वाटेनाशी झाली आहे. तसेच रोजचे जीवन जास्तच धकाधकीचे झाल्यामुळे कार्यक्रम पहायला वेळ मिळणे कठीण झाले आहे. यामुळे थेटरे रिकामी पडायला लागली आहेत. तरीसुद्धा संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही माझ्या माहितीतली तरी सध्याची एकमेव जोडी आपले कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम मोठ्या सभागृहांमध्ये करण्यात यशस्वी होत आहे.

स्व.ग.दि.माडगूळकर गीतरचनांबरोबर कथा, पटकथा, संवादही लिहीत होते आणि चित्रपटांमध्ये भूमिकाही करत असत आणि स्व.सुधीर फडकेही त्यांच्या कामामध्ये खूप गढलेले असायचे. त्या दोघांनी जोडीने गावोगावच्या सभागृहांमध्ये जाऊन कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम सादर केल्याचे कधी माझ्या ऐकण्यात आलेले मला तरी आठवत नाही. अशा प्रकारचा कार्यक्रम मी कधीही पाहिला नव्हता. या दोघा दिगिगजांनी एकत्र येऊन जितकी गाणी दिली असतील त्याहून किती तरी जास्त गाणी निरनिराळ्या गीतकारांबरोबर किंवा संगीतकारांबरोबर दिली असतील. त्यांना मुख्यतः प्रसारमाध्यमांमधून लोकप्रियता मिळाली होती. आजच्या टेलिव्हिजन या मुख्य प्रसारमाध्यमामध्ये संगीतालाच गौण स्थान दिले जाते. यामुळे निरनिराळ्या काळातल्या या दोन जोड्यांची कसलीच तुलना करता येणार नाही. शिवाय स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची जोडी कालांतराने फुटली, संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी अजून एकत्र आहेत हे ही महत्वाचे आहे.

संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही जोडी जे कार्यक्रम सादर करते त्यातली "दूरदेशी गेला बाबा" यासारखी गाणी ऐकतांना बहुसंख्य श्रोत्यांच्या पापण्या पाणावतात आणि "अग्गोबाई ढग्गोबाई" यासारख्या गाण्यांच्या तालावर सगळी बच्चे कंपनी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणे, त्यांच्या डोळ्यात पाणी किंवा ओठावर एकादी तरी स्मितरेषा आणणे हे सोपे नसते. पण या नव्या गीतकार आणि संगीतकारांना ते जमले आहे. त्यांच्याबद्दल काही तज्ज्ञ लोकांनी तुच्छ मते व्यक्त केली आहेत. पण सभागृहांमध्ये जाऊन त्यांचे कार्यक्रम पाहणारे (आणि ऐकणारे), त्यांच्या ध्वनिमुद्रित सीडी, डीव्हीडी वगैरे विकत घेऊन ऐकणारे किंवा यू ट्यूबवर पाहणारे सर्वसामान्य लोक वेगळा विचार करतात आणि त्यांची संख्या मोठी आहे. ही जोडी आणखी प्रगती करू दे, उत्तमोत्तम गाणी रचून रसिकांना ऐकवू दे अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?