Saturday, July 19, 2008

महाकवी कालिदास

संस्कृत भाषेची साधी तोंडओळख असलेल्या माणसालासुध्दा कवी कालीदासाचे नांव नक्की ठाउक असते. कालिदासाच्या रचनांचे अनुवाद बहुतेक सर्व भारतीय तसेच परकीय भाषांमध्ये प्रसिध्द झालेले आहेत आणि त्यावर आधारलेल्या अगणित साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जगभरातील साहित्यिक जगतात कालिदास हे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्याने लिहिलेली मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके, रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये आणि मेघदूत हे खंडकाव्य एवढे प्रमुख ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्याने केलेल्या इतर रचना कदाचित काळाच्या उदरात लुप्त झाल्या असाव्यात. तसेच त्याच्या नांवाला जोडल्या जात असलेल्या इतर कांही रचनांबद्दल तज्ञांच्या मनात मतभेद आहेत.

कालिदासाने स्वतःबद्दल कांहीच लिहून ठेवलेले नाही. त्यामुळे त्याच्या चरित्राबद्दल विश्वसनीय अशी माहिती कमी आणि कपोलकल्पित आख्यायिकाच जास्त ऐकायला मिळतात. त्याचा जीवनकाल नक्की केंव्हा होता यावर एकमत नाही. तो विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता असे सर्वश्रुत आहे. पण विक्रमादित्य हे नांव धारण करणारे निदान चाळीस राजे भरतखंडात होऊन गेले, कदाचित एकाहून अधिक कालीदासही होऊन गेले असतील. त्यामुळे त्यातला महाकवी कालीदास नेमका कुठे आणि कोणत्या काळात होऊन गेला हे सांगणे कठीण आहे. तो उज्जयनी येथील विक्रमादित्य राजाच्या दरबारात होता असे बहुतेक लोक मानतात, पण काश्मीरपासून बंगालपर्यंत अनेक जागी कालीदास तिथला होता असे मानले जाते. त्याने लिहिलेल्या नाटकांमधील राजा अग्निमित्र हे पात्र इतिहासात प्रत्यक्षात होऊन गेलेल्या राजा अग्निमित्राच्या चरित्रावरून घेतले असेल तर कालिदास हा अग्निमित्रानंतरच्या काळात होऊन गेला असणार. संस्कृत आणि भारतीय भाषांमधील वाङ्मयातील अनेक साहित्यकृतींमध्ये कालिदासाच्या रचनांचा उल्लेख सापडतो. त्याअर्थी कालीदास नक्कीच त्या रचना लिहिल्या जाण्यापूर्वी होऊन गेला असणार. अशा प्रकारे तर्क करून त्याचा कालखंड हा येशू ख्रिस्ताच्या आधीची पांच शतके आणि नंतरची पांच शतके या हजार वर्षांच्या दरम्यान केंव्हा तरी होऊन गेला असावा.

कोणा पूर्णपणे अनोळखी माणसाकडल्या छायाचित्रांचा संग्रह अचानक आपल्या हाती पडला तरी त्या छायाचित्रांमधील माणसांचे वेष, पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या रेडिओ, टेलीव्हिजन, टेलीफोन, घड्याळ यासारख्या घरातल्या गोष्टी किंवा पाठीमागील इमारती, त्यांच्या छपरावरील अँटेने किंवा डिस्क, टॉवर, रस्त्यावरली वाहने अशा अनेक बाबीवरून आपल्याला आपल्या आयुष्यात त्या चित्राचा कालखंड कोणता असेल याचा अंदाज येतो. याचे कारण गेल्या अर्धशतकात समाजजीवनात वेगाने जो बदल होत गेला तो आपण पाहिलेला आहे. सामाजिक कथा कादंबऱ्यातल्या तपशीलवार उल्लेखांवरून त्यातील घटना कोणत्या काळात घडल्या आहेत हे वातावरणनिर्मितीसाठी जाणीवपूर्वक दाखवले जाते, तसेच त्यातील भाषाशैलीवरून ते पुस्तक कोणत्या काळात लिहिले गेले असावे याचा अंदाज आपण करू शकतो.

ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टींबद्दल तो करणे थोडे कठीण जाते. कालिदास स्वतः हजाराहून अधिक वर्षांपूर्वी होऊन गेला आणि त्याच्या सर्व रचना पौराणिक काळातील घटनांवर आधारलेल्या आहेत. त्यामुळे त्याने आपल्या काव्यातून आणि नाटकांतून रंगवलेला काळसुध्दा प्रत्यक्ष त्याच्या जीवनकालातला नाही. अशा परिस्थितीत इतर अनेक साहित्यकृतींच्या तुलनेवरून तज्ञ लोकच कांही आडाखे बांधू शकतात आणि त्याची शहानिशा करणे केवळ अशक्य असते. कालिदास कधी कां होऊन गेला असेना, सर्वसामान्य वाचकाला त्याच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येण्यात कांही फरक पडत नाही. संस्कृत भाषा न शिकलेल्या लोकांनी त्याचे संस्कृतमधील ग्रंथ मुळातून वाचण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या इंग्रजी, मराठी अनुवादांचे सोप्या भाषेत काढलेले सार प्राशन करूनच त्यांना समाधान मिळते.

कालीदासाबद्दल अशी वदंता आहे की तो आधी महामूर्ख समजला जात असे. म्हणजे तो तसा वागत असे. एका राज्याची राजकन्या धर्मशास्त्रांच्या अभ्यासात पारंगत होती, पण तिला तिच्या ज्ञानापेक्षा त्याचा दुरभिमान जास्त वाटत होता. जो कोणी आपल्याला शास्त्रार्थावरील वादविवादात हरवेल त्याच्याशीच आपण विवाह करू असे तिने जाहीर केले होते. पण जो या चर्चेत हरेल त्याचे मुंडण करून त्याला गाढवावर बसवून हाकलून दिले जाईल असा उपनियम त्या पणाला जोडला होता. कांही विवाहोत्सुक युवकांनी प्रयत्न करून पाहिला आणि स्वतःचे हंसे करून घेतले. अपमानित झालेल्या त्या युवकांनी राजकन्येची चांगली खोड मोडायचे ठरवले. कांही करून तिचे लग्न एका मूर्खशिरोमणीबरोबर लावून द्यायचा घाट त्यांनी घातला आणि ते महामूर्खाच्या शोधात निघाले.

एका झाडावर बसलेला कालिदास त्यांना दिसला. तो एका उंच अशा फांदीच्या टोकावर बसून तिच्या मुळावर घाव घालत होता. इतका मूर्ख माणूस दुसरा मिळणार नाही म्हणून त्यांनी कालीदासाची या कामासाठी निवड केली. त्याला चांगली वस्त्रे परिधान करयला लावून, कपाळावर चंदनाचा टिळा, मस्तकावर पगडी वगैरेंनी सजवून राजकन्येपुढे नेले. दिसायला तसा तो गोरागोमटा होताच. हे महान पंडित असून त्यांनी मौनव्रत धारण केले असल्यामुळे ते फक्त मूकविवाद करतात असे कालिदासाचे वर्णन त्यांनी केले आणि कालिदासाला आपले तोंड बंद ठेऊन फक्त हातवारे करायचे असे सांगितले.

राजकन्येने प्रथम एक बोट समोर धरून दाखवले. तिला त्यातून "ब्रह्म एक आहे." असे सांगायचे होते. कालिदासाला त्याचा अर्थ "तुझा एक डोळा फोडीन. " असा वाटला. त्याने रागाने "मी दोन्ही डोळे फोडीन. " अशा अर्थाने दोन बोटे दाखवली. राजकन्येने त्याचा "ब्रह्म आणि माया अशी दोन रूपे आहेत. " असा घेतला. तिने पंजाची पांच बोटे दाखवून "हे विश्व पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. " असे दाखवले. पण ती पंजाने थप्पड मारणार आहे असे कालिदासाला वाटले. त्यानेही आधी पंजा उगारला आणि त्याची मूठ बनवून "आपण गुद्दा मारू." असे दर्शवले. "पंचमहाभूते मिळून एक शरीर किंवा वस्तू निर्माण करतात." असा त्याचा अर्थ राजकुमारीने घेतला. अशा प्रकारे चाललेल्या वादविवादात अखेरीस राजकन्येने आपला पराभव मान्य केला आणि कालिदासाचे श्रेष्ठत्व मान्य करून त्याचेबरोबर विवाह केला.

पण आपली घोर फसवणूक झाली असल्याचे  पहिल्या रात्रीच तिच्या लक्षात आले आणि तिने रागाच्या भरात कालिदासाला आपल्या महालाच्या सज्ज्यातून खाली ढकलून दिले. तो जिथे जमीनीवर पडला तिथे समोर कालीमातेची मूर्ती होती आणि आ वासून खाली पडतांना त्याची जीभ त्याच्याच दातांमध्ये चावली जाऊन तिचा तुकडा थेट कालीमातेच्या पायाशी जाऊन पडला. या बलिदानाने प्रसन्न होऊन कालीमातेने त्याला विद्येचे वरदान दिले आणि तो विद्वान बनला. अशी एक दंतकथा आहे.

या कथेचेही कांही पाठभेद आहेत. त्यातल्या एकात पत्नीने झिडकारल्यानंतर आणि आपल्याला वापरले गेल्याचे लक्षात आल्यावर निराशाग्रस्त झालेला कालीदास जीव देण्यासाठी एका नदीच्या किनाऱ्यावर जातो. त्या ठिकाणी एका जागी गांवातल्या स्त्रिया दगडावर आपटून कपडे धूत असतात. ज्या दगडांवर कपडे आपटले जात असतात ते गुळगुळीत झालेले असतात, तर आजूबाजूचे इतर दगड खडबडीत राहून त्यांचे कंगोरे दिसत असतात. "जर कापडाने ठोकून दगडाचा आकार बदलत असेल तर ज्ञानाचे घांव घालून आपले मठ्ठ डोके कां सुधारणार नाही?" असा विचार त्याच्या डोक्यात चमकतो आणि तो अत्यंत कष्टाने ज्ञानार्जन करून शास्त्रार्थ जाणणारा पंडित होऊन परत घरी येतो. आल्या आल्या त्याची पत्नी त्याला "अस्ति कश्चित वागार्थः।" (" कांही अर्थपूर्ण बोलणार आहेस का?" साध्या भाषेत सांगायचे तर "तुला बोलायला तोंड तरी आहे का?") असे विचारते. यातील अस्ति, कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये रचून तो तिला चोख उत्तर देतो. असे दुसऱ्या एका गोष्टीत सांगतात.

No comments: