Wednesday, February 18, 2009

दासबोध


आज रामदासनवमी आहे. समर्थ रामदासांनी या दिवशी समाधी घेतली. यानिमित्त त्यांनी लिहिलेल्या दासबोधाची थोडी ओळख करून देत आहे. कांही इतर धार्मिक ग्रंथांप्रमाणे हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नाही. यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. दहा समासांचे एक दशक अशी वीस दशके त्यात आहंत. आत्मा परमात्मा वगैरेबद्दल सांगणा-या अध्यात्माच्या विषयांशिवाय मू्र्खलक्षणे, शिकवण आदि नांवाची दशके आहेत. त्यांत सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असे खूप कांही यात आहे. यात काय काय समाविष्ट आहे ते समर्थांनी स्वतःच ग्रंथारंभलक्षणनाम समासात विस्तृतपणे दिले आहे. त्यामधील कांही ओव्या त्यांच्याच शब्दात खाली देत आहे. समर्थांनी सोपी भाषा वापरलेली आहे. ती समजायला कठीण वाटू नये असे मला वाटते. या ओव्या वाचल्यानेच पुढील ग्रंथात काय दिले असेल यासंबंधी उत्सुकता निर्माण होते. दासबोधातील कांही वेगवेगळे उतारे यापूर्वी वाचनात आले होते. पण पूर्ण ग्रंथ वाचायचा योग अजून आला नाही. समर्थांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टीपैकी जसजशा व जितक्या मला समजतील व आजच्या जीवनात उपयुक्त वाटतील त्या यथावकाश अधून मधून देण्याचा प्रयत्न करीन.


।। श्रीराम।।
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ । श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे ।।१।।
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ।।२।। नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण । बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले ।।३।।
भक्तिचेनयोगे देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ।।४।।
मुख्यभक्तीचा निश्चय । शुद्धज्ञानाचा निश्चय । आत्मस्थितीचा निश्चय । बोलिला असे ।।५।।
नाना किंत संवारले । नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ।।१२।।
नाना ग्रंथांच्या संमती । उपनिषदे वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेसहित ।। १५।।
नाना संमती अन्वये । म्हणोनि मिथ्या म्हणता नये । तथापि हे अनुभवासि ये । प्रत्यक्ष आता ।।१६।।
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणि वेदांत ।।१८।।
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पांडवगीता । गणेशगीता यमगीता । उपनिषदे भागवत ।।१९।।
इत्यादिक नाना ग्रंथ । संमतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये यथार्थ । निश्चयेसी ।।२०।।
भगवद्वचनी अविश्वासे । ऐसा कवण पतित असे । भगवद्वाक्याविरहीत नसे । बोलणे येथीचे ।।२१।।
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी ।।२२।।
अभिमाने उठे मत्सर । मत्सरे ये तिरस्कार । पुढे क्रोधाचा विचार । प्रबळ बळे ।।२३।।
ऐसे अंतरी नासला । कामक्रोधे खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ।।२४।।
आता श्रवण केलियाचे फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचे मूळ । येकसरां।।२८।।
मार्ग सापडे सुगम । नलगे साधन दुर्गम । सायुज्यमुक्तीचे वर्म । ठाई पडे ।।२९।।
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथे ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । इये ग्रंथी ।। ३० ।।
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेचि प्राप्त ।। ३८।।

No comments: