Wednesday, September 17, 2008

चीन, चिनी आणि चायनीज


बीजिंग येथे चालू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवाचा अतिभव्य उद्घाटनसोहळा पहात असतांना नकळतच मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे मागे जात होते. आमच्या लहान गांवात पंजाबी किंवा तामिळ माणूससुध्दा पहायला मिळत नव्हता तिथे चिनीजपानी कोठून दिसणार? रात्रीची गस्त घालणारे एक दोन गुरखे होते, त्यांचे चेहेरे पाहून मंगोलियन वंशाच्या लोकांबद्दल थोडी कल्पना येत असे. गोष्टींच्या पुस्तकांमधल्या चिनी लोकांचे बसके चेहेरे, मिचमिचे डोळे, फुगीर गाल, नकटे नाक, डोक्यावरचा अंबाडा, विचित्र दाढीवर लोंबत्या मिशा, पायघोळ लोळणारे कमालीचे ढगळ कपडे वगैरेंनी बनलेले त्यांचे 'ध्यान' पाहून गंमत वाटत असे. त्यांची लिपी पाहून ते चित्र आहे की अक्षर याचा संभ्रम पडे, प्रत्येकी दहा बारा शेंड्या आणि शेपटे असलेले प्रत्येक अक्षर एक वेगळी कलाकृती वाटे आणि अशी किचकट अक्षरे काढून कांहीही लिहायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करवत नसे. कदाचित त्यामुळेच कागदावर कांही लिहिण्यापेक्षा त्याचा पतंग करून तो उडवणे अनेकांना अधिक आवडत असावे. 'च्याओ, म्याव' किंवा 'लिंग, पिंग' असली त्यांची नांवे वाचून ते पुरुषाचे असेल की बाईचे ते समजत नसे, कदाचित ते त्यांच्या गांवाचे किंवा खाद्यपदार्थाचेदेखील असण्याची शक्यता असे. कावळे-चिमण्या, उंदीर-मांजर, साप-विंचू असले कसलेही जीव ते सरसकटपणे जेवणात खातात हे ऐकल्यावरच कसेसे वाटून पोटात ढवळत असे. अशा या मुलखावेगळ्या चिनी लोकांच्याबद्दल मनात नेहमीच एक गूढ वाटत असे.
घरातल्या कपबशा 'चिनी' मातीच्या असत. त्यामुळे या पीतवर्णी लोकांच्या देशातली मातीसुध्दा पांढरी असते की काय असा प्रश्न पडे. पुढे भूगोल शिकतांना तिथेही सुपीक प्रदेश आहेत आणि त्यांवर चांगल्यापैकी भातशेती होते वगैरे वाचले. आपल्या भारताच्या अडीचपट क्षेत्रफळ असलेला हा देश अस्ताव्यस्त पसरलेला आहे, लोकसंख्येच्या बाबतीत तर तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण एवढ्या विस्तीर्ण भूभागावर राहणारी इतकी सारी माणसे एकच भाषा बोलतात याचे प्रचंड आश्चर्य वाटत असे. आपल्याकडे वीसबावीस वेगवेगळ्या भाषा आहेत आणि प्रत्येकीच्या दहाबारा तरी बोली बोलल्या जातात. आज शिक्षणाच्या प्रसारामुळे नागपूर, कोल्हापूर आणि डहाणूकडचे लोक एकच प्रमाण मराठी भाषा वेगवेगळे हेल काढून बोलतात, पण दर पंधरा कोसांवर भाषा बदलते अशी जुन्या काळातली समजूत होती. चिनीमध्येसुध्दा अशा अनेक बोली असतील, पण एकच भाषा देशभरात सगळीकडे पसरवली गेली हे कौतुकाचे आहे.
भारताप्रमाणेच चीनलासुध्दा हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे या साम्यामुळे एक प्रकारची आपुलकी वाटत असे. आपल्या गौतमबुध्दाच्या शिकवणुकीचा चीनच्या लोकांवर प्रभाव पडलेला आहे हे वाचतांना कॉलर ताठ होत असे. पण सर्वभक्षी चिनी लोकांनी अहिंसेचा उपदेश करणा-या गौतमबुध्दाचे कोणते विचार घेतले असतील ते कांही समजत नसे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे युरोपियन लोकांनी चीनच्या किनारपट्ट्यांवरचा थोडा मुलुख आपल्या ताब्यात घेऊन त्यांवर वसाहती बांधल्या होत्या आणि दुस-या महायुध्दाच्या काळात थोड्या दिवसांसाठी जपान्यांनी चीनचा बराच मोठा प्रदेश काबीज केला होता तेवढे अपवाद वगळता चीन हा देश नेहमी स्वतंत्रच राहिला. रेशमाची वस्त्रे, कागद, सुरुंगाची दारू अशा अनेक वस्तू चीनने जगापुढे आणल्या असे सांगतात. चीनबद्दलची सर्वात अधिक प्रसिध्द असलेली गोष्ट म्हणजे चीनची हजारो मैल दूर पसरलेली ऐतिहासिक भिंत. डोंगर द-या पार करत जाणारी एवढी लांबलडक भिंत यांत्रिक साधने नसतांनाच्या काळात माणसांच्या श्रमातून उभी केली गेली आणि ती इतकी मजबूत आहे की अजूनपर्यंत टिकून राहिली आहे. एकंदरीतच चीनबद्दल कुतूहल वाटत असे आणि त्या मानाने फारच थोडी माहिती मिळायची. त्यामुळे " या बांबूच्या पडद्याआड दडलंय काय?" असा प्रश्न मनात रेंगाळत असे.
पंडित नेहरूंच्या परराष्ट्रधोरणात त्यांनी चीन या शेजारी देशाला खूप महत्व दिले होते. भारताला ब्रिटीशांकडून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्यामुळे वसाहतवादी पाश्चिमात्य देशांपासून त्याने अंतर बाळगणे साहजीकच होते. आकारमान, वैविध्य, नैसर्गिक रचना आणि त्यातून येणारी संकटे वगैरे अनेक बाबतीत भारत व चीन या दोन देशात बरेच साम्य असल्यामुळे त्यांना एकमेकांची मदत घेता येईल असा कयास त्यांनी बांधला असणार. या दोन्ही देशांतील लोकांनी इतिहासकाळात सुवर्णयुगे पाहिलेली असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन नव्या युगात चमत्कार घडवावा असे मनातले मांडे ते खात असावेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मिळून 'पंचशील' या नांवाने कांहीतरी केले होते. तो एक करार होता की ती एक विचारसरणी होती ते त्या वेळी मला समजले नव्हते. पंडित नेहरूंना अभिप्रेत असलेला समाजवाद आणि माओचा साम्यवाद यातला फरक कळण्याचे माझे वय त्या काळी नव्हते. एकंदरीत 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा त्या काळात लोकप्रिय होती.
असे सुरळीत चालले असतांना काय झाले कोणास ठाऊक चीनने भारतावर लष्करी आक्रमण केले असल्याची बातमी आली आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: