Saturday, October 18, 2008

आजीचे घड्याळ - भाग ५ ग्रहांचे भ्रमण


"माणसाच्या जन्माच्या वेळी आकाशातले ग्रह ज्या राशीत दिसत असतील त्यावरून त्याची रास ठरवतात." असे मी सांगितल्यावर अमोलने उत्सुकतेने विचारले, "ती कशी?"
मी सांगायला सुरुवात केली,"त्याचे वेगवेगळे प्रकार माझ्या पहाण्यात आले आहेत. आपल्याकडे सर्वात अधिक प्रचलित असा पहिला प्रकार आहे तो म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल तीच त्या माणसाची रास. प्रत्येक पंचांगात तारखेसमोरच ती दिलेली असते. ज्या काळात छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांग, कॅलेंडर वगैरे नसायची, तेंव्हा त्या रात्री चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे हे पाहून त्या बाळाची रास ठरवता येत असे. भारताच्या कांही भागात सौर कालगणनेवर आधारलेले पंचांग उपयोगात आणले जाते. १४-१५ एप्रिलच्या सुमारास जेंव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी त्या लोकांचे नवे वर्ष सुरू होते. त्यानंतर जसा सूर्याचा पुढच्या राशीत प्रवेश होईल तसा महिना बदलत जातो. त्यांच्या प्रथेप्रमाणे जन्माच्या वेळेस सूर्य ज्या राशीत असेल ती जन्मरास मानली जाते. आंतरराष्ट्रीय किंवा पाश्चिमात्य पद्धतीतसुद्धा सौर कॅलेंडरमधील तारखेनुसार रास ठरते, पण त्यांच्या तारखा आपल्या पंचांगातील
तारखांबरोबर जुळत नाहीत. उदाहरणार्थ आपली मकर संक्रांत १४-१५ जानेवारीला येते. त्या दिवसापासून महिनाभर सूर्य मकर राशीत राहतो, पण कॅप्रिकॉर्न ही सनसाईन २३ डिसेंबर ते २० जानेवारीपर्यंत असते. हा फरक कशामुळे येतो कोणास ठाऊक! सर्व इंग्रजी मासिकात या पद्धतीप्रमाणे रास ठरवून भविष्य वर्तविले जाते. याशिवाय कांही विद्वान लग्नरास महत्वाची मानतात. म्हणजे मुलाचा जन्म झाला त्या वेळी पू्र्व क्षितिजावर ज्या राशीचा उदय होत असेल, ती त्या मुलाची रास मानली जाते."
"यातली कुठली पद्धत खरी धरायची?" अमोलने विचारले
"राशीचा उपयोग लोक कशासाठी करतात? त्यानुसार सांगण्यात येणारी भाकिते, मुहूर्त पाहणे वगैरे गोष्टींसाठी ना? हा तर्काच्या पलीकडला श्रद्धेचा, विश्वासाचा प्रश्न आहे. तो माझा प्रांत नाही. वाटल्यास मी माझे मत नंतर सांगेन, पण आता आपण ग्रहांच्या अवकाशामधील भ्रमणाबद्दल बोलत आहोत. माझ्या दृष्टीने हा मनोवेधक असा विषय आहे. तेंव्हा त्या संदर्भात आपण राशीचक्राबद्दल बोलू." खगोलविज्ञान आणि ज्योतिष यांत फरक करायचा प्रयत्न करीत मी म्हंटले.
"एका राशीत दोन तीन ग्रहांची युती झाली असं आपण नेहमी ऐकतो. ती कशामुळे होते?"अमोलने शंका काढली.
मी म्हंटले,"खरंच हा चांगला प्रश्न आहे. आपल्या सूर्यमालिकेतल्या नऊ ग्रहांची नांवं तुला माहीत असतीलच."
"हो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लूटो." अमोलने धडाधडा म्हणून दाखवली .
"सर्वात दूर असलेल्या प्लूटोचं नांव त्यामधून काढून टाकावं असा ठराव शास्त्रज्ञांच्या एका मेळाव्यात केला आहे. युरेनस आणि नेपच्यून देखील अतिशय मंद गतीने चालतात आणि आपली सूर्यप्रदक्षिणा अनुक्रमे तब्बल ८४ आणि १६५ वर्षात पुरी करतात. ते साध्या डोळ्याने दिसत नाहीत आणि दिसले तरी एकेका राशीमधून सरपटत जायला त्यांना सात व चौदा वर्षे लागतील. तेंव्हा आपण इतर ग्रहांबद्दल बोलू." "सांगा."
"हे सर्व ग्रह सूर्यापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत. त्यामुळे हे सगळे ग्रह हातात हात घालून फेर धरून सूर्याभोवती रिंगण घालत नाहीत. ते वेगवेगळ्या कक्षांमधून वेगवेगळ्या गतीने फिरतात. जितके अंतर जास्त असेल तितकी त्या ग्रहाच्या भ्रमणाची कक्षा मोठी असणार आणि त्यामुळे एक फेरी मारायला त्याला जास्त वेळ लागणार. तसेच तो पृथ्वीपासून जितका दूर असेल तितका तो हळू चालतो आहे असे आपल्याला वाटणार. एका रस्त्यावरून पायी चालणारे वाटसरू, सायकलस्वार, मोटारी, स्कूटर्स वगैरे जात असतील तर साहजीकपणेच त्यातले वेगवान प्रवासी सावकाशपणे जाणा-यांच्या मागून येऊन पुढे जाणार. आकाशातील ग्रहांचा जो प्रवास आपण पाहतो त्यात हेच घडतांना दिसते. पण त्यात एक फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासात फिरत असल्यामुळे संपूर्ण राशीचक्र एका दिवसात आपल्याभोवती फिरतांना दिसते, पण ग्रहांना आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कित्येक महिने किंवा वर्षे लागतात. दुसरी गंमत अशी आहे की त्यांचा हा प्रवास बरोबर उलट दिशेने चालतो. राशींची रांग मेष, वृषभ, मिथुन अशी लावली तर पहिली मेष रास इंजिनाच्या जागी असेल आणि बुध, शुक्र वगैरे ग्रह मेषमधून वृषभ राशीत, तिथून मिथुन राशीत असे गार्डाच्या डब्याकडे जातांना दिसतील. प्लॅटफॉर्मवर उभे राहून पाहणा-या माणसाला जसे ट्रेनमधले सगळे लोक पुढे जातांना दिसतात तसेच आपल्याला सगळे ग्रह रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे वाटचाल करतांना दिसतात, पण आतला टीसी इंजिनाकडून गार्डाच्या डब्याच्या दिशेला गेला तर तो बसलेल्या प्रवाशांच्या तुलनेत विरुद्ध दिशेला जात असतो. तसेच राशींच्या संदर्भात ग्रहांचे भ्रमण उलट्या दिशेने होते.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह सर्वात जवळचा. तो आपली एक परिक्रमा फक्त सत्तावीस दिवसात पूर्ण करतो. सत्तावीस दिवसात तो सर्व बाराच्या बारा राशींमधून फिरून येतो. अर्थातच तो ज्या राशीतून फिरत असेल त्यांमधून आधीच जात असलेले इतर ग्रह आपल्याला आभाळात त्याच्या जवळपास दिसणार. एका राशीच्या म्हणजे तीस अंशाच्या कोनात दोन किंवा अधिक ग्रह आले तर त्याला युती म्हणतात. या प्रकारे दर महिन्याला चंद्राची प्रत्येक ग्रहाबरोबर युती होते. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आपली परिक्रमा फक्त तीन महिन्यात संपवतो. आपल्या एका वर्षातून तो चार वेळा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे तो नेहमीच सूर्याच्या अंवती भोवती दिसतो. खरं तर तो इतका त्याच्याजवळ असतो की आपल्याला सहसा दिसतच नाही. वर्षातील अनेक महिने त्याची सूर्याबरोबर युती चालू असते. शुक्र हा ग्रह सूर्यापासून थोडा दूर आहे, पण पृथ्वीच्या मानाने त्याच्या जवळ असल्यामुळे तो सुद्धा नेहमी सूर्य ज्या राशीत असेल तिच्या एक दोन घरे मागे पुढे दिसतो. हा सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह सूर्याच्या पुढे असला तर फक्त सूर्योदयापूर्वी कांही काळ आणि मागे असला तर सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात दिसतो. तो माथ्यावर आलेला कधीच पहायला मिळत नाही. सूर्याबरोबर त्याची अनेक वेळा युती होते. अर्थातच आपण ती डोळ्यांनी पाहू शकत नाही. फक्त कुंडलीत पाहू शकतो.
आपली पृथ्वी सूर्याभोवती वर्षात एकदा प्रदक्षिणा घालते. किंबहुना ती घालायला पृथ्वीला जितका वेळ लागतो त्यालाच एक वर्ष असे म्हणतात. सूर्याचा उजेड अत्यंत प्रखर असल्यामुळे आपल्याला तो प्रत्यक्ष कोठल्या राशीमधील ता-यांच्या सोबतीने कधीच दिसत नाही. त्याचा उदय होण्यापूर्वी आणि अस्त झाल्यानंतर ज्या राशी आकाशात क्षितिजांवर दिसतात त्यांवरूनच सूर्य कोणत्या राशीत आहे हे ठरवावे लागते. मंगळ, गुरू व शनी यांना परिभ्रमणासाठी अनुक्रमे सुमारे दोन, बारा व तीस वर्षे लागतात. त्या काळात इतर ग्रह त्यांच्या मागून येऊन पुढे जात असतात. त्यांच्याबरोबर या ग्रहांच्या युत्या होतात. गुरू आणि शनी मात्र एकदा एका राशीत आले की वर्ष दोन वर्षे बरोबर राहतात आणि एकदा दूर गेले की वीस वर्षे भेटत नाहीत
"खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे." अमोल उद्गारला
"यात एक गोष्ट नीट समजून घेणं फार महत्वाचं आहे." मी सांगितले. "आपल्याला जरी आभाळात दोन, तीन, चार ग्रह जवळ जवळ दिसले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांपासून नेहमीसारखेच दूर असतात. चंद्र, शुक्र व शनी यांची सिंह राशीत युती झाली तर आकाशात हे सगळे आपल्याला एकमेकांच्या जवळ दिसतील, पण चंद्र आपल्यापासून जितका दूर आहे त्याच्या दोनशेपटीने शुक्र दूर असतो आणि सात हजार पटीने शनी. सिंह राशीतील तारे तर अब्जावधी पटीने आपल्यापासून दूर असतात. आपली पृथ्वीजवळची जागा सोडून शनी किंवा गुरूला भेटायला चंद्र त्यांच्याकडे जात नाही. तीन चार मुलं एका जागी गोळा होऊन गप्पा मारतात, खातात, पितात, खेळतात, कधी भांडतात तसे हे ग्रह कधीसुद्धा एकमेकाजवळ जात नाहीत. कुंडलीमध्ये राशीला घर म्हणायची पद्धत असली आणि एका राशीत असलेल्या ग्रहांची नांवे चिकटून लिहीत असले तरी आकाशात तसली समाईक जागा नसते आणि प्रत्यक्षात ग्रह तिथे जात नाहीत. ते
आपापल्या कक्षांमधून मार्गक्रमण करीत असतात."
आतापर्यंत माझे सांगणे ऐकतांना अस्वस्थ होत असलेल्या अमोलच्या आई थरथर कांपत म्हणाल्या,"अहो शास्त्रज्ञ, तुमचे ते शोधबीद तुमच्यापाशीच ठेवा. आमच्या मुलाच्या मनात असलं भलतं सलतं कांही भरवू नका हं! सांगून ठेवते. उगाच कुठल्या ग्रहाचा कोप झाला तर?" .
. . . . . .. . . (क्रमशः)

1 comment:

Anonymous said...

अरे वा! छानच माहिती दिलीत आननंद घन .