Tuesday, November 18, 2008

अखेर इंजिनियर

इंजिनियर होण्याची अंतःप्रेरणा मात्र लहानपणी माझ्या मनात कधीच उठली नाही, कारण मी इंजिनियर हा प्राणीच पाहिला नव्हता आणि त्या शब्दाचा अर्थसुद्धा मला कळला नव्हता. आमच्या गांवातली एकूण एक जुनी घरे दगडमातीच्या भिंती उभारून बांधलेली होती. मी शाळेत जायला लागल्यानंतर सिमेंटचे पहिले पोते आमच्या गांवात आले असावे. पिढीजात बांधकाम करत आलेले गांवातले निष्णात गवंडी लोक येऊन बांधकाम करीत आणि सुतार येऊन दारे खिडक्या बसवण्याचे काम करीत असत. घराचे मालक स्वतःच कुठे काय बांधायचे ते त्यांना सांगायचे. गांवातले अनुभवी लोक त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यात सुद्धा शनी, यम, अग्नी, वायू, ऊन, पाऊस वगैरेंच्या दिशा अशा गोष्टींना प्राधान्य असे. घर बांधण्यापूर्वी त्याचा नकाशा काढणे व सरकारकडून त्याची मंजूरी मिळवणे असल्या भानगडी कोणी ऐकल्यासुद्धा नसतील. पिठाची चक्की आणि छापखाना या गांवातल्या दोन प्रकारच्या 'कारखान्यां'त थोडी यंत्रसामुग्री होती. तिथे काम करणारे मजूर त्याची देखभाल करत. मोटारगाड्यांना तेल पाणी पुरवायचे काम 'किन्नर' (क्लीनरचा अपभ्रंश) करायचे. बेभरंवशाची वीजपुरवठा करणारी एक यंत्रणा होती. ती वायरमन (इलेक्ट्रिशियन) चालवत असे. यामुळे सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल यातल्या कोठल्याच शाखेच्या इंजिनियरची गांवाला गरज नव्हती. त्यांच्या सहाय्याशिवाय गांवाचा गाडा सुरळीत चालत होता. तोंपर्यंत आमच्या नात्यागोत्यातसुद्धा कोणी इंजिनियर झालेला नव्हता. आताच्या पुढच्या पिढीतली ऐंशी नव्वद टक्के मुले मात्र कसल्या ना कसल्या प्रकारचे तांत्रिक कामच पाहतात.

खूप पूर्वी एकदा दूर कुठे तरी एकादा पूल कोसळला किंवा कारखान्यात मोठा अपघात झाला होता. त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली तेंव्हा घरातली मोठी माणसे त्या विषयी जी चर्चा करू लागली त्यात 'इंजिनियर' हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला. अर्थातच त्या दुर्घटनेचा सगळा दोष त्याला दिला गेला. त्यातले जेवढे कळले त्याप्रमाणे हा प्राणी बंगल्यात राहतो, जीपगाडीत बसून हिंडत असतो (जीपा उडवतो!) आणि पैसे खातो अशी चमत्कारिक वाटणारी माहिती मिळाली. त्या काळी आमच्या गांवात वाडे होते, घरे होती, झोपड्या होत्या आणि गांवापासून दूर एक राजवाडासुद्धा होता, पण 'बंगला' म्हणता येईल अशा प्रकारची वास्तू नव्हती. 'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी
माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल? ?
जीपगाडीची ओळख देखील अशाच प्रकारची होती. शहरातला कोणी पोलिस इन्स्पेक्टर किंवा तत्सम बडा अधिकारी कधी तरी आमच्या गांवातून जाणा-या रस्त्यावरून इकडून तिकडे गेला तर त्याच्या जीपगाडीचे आम्हाला दर्शन व्हायचे. तिचा भयानक आवाज दुरूनच ऐकू आला की आम्ही मुले घाबरून मिळेल त्या आडोशाला जाऊन उभे रहात असू आणि प्रचंड खडखडाट करीत व धुळीचे लोट उडवीत जाणा-या त्या वाहनाकडे दुरूनच चोरून पहात असू. सगळ्या बाजूने उघडी असलेली ती गाडी कांही मनात घर करीत नसे. असल्या गाडीतून हा इंजिनियर कशाला प्रवास करत असेल? अखेर तो अगदी जंगलात रहात असला आणि तिथे खायला प्यायला कांही मिळत नसले तरी पैसे ही काय खाण्याची गोष्ट आहे? एकदा चुकून मी एक ढब्बू पैशाचे नाणे दातात धरून चावले होते तेंव्हा माझे दोन दांत पडले होते. शिवाय आईने पाठीत धपाटा घातला होता तो वेगळाच. "नरड्यात पैसा अडकला तर जीव जाईल" असे ती म्हणाली होती.
आणि हा इंजिनियर म्हणे सरळ पैसे चावून गिळतो! त्याचे सगळेच काम और दिसत होते.

अशा प्रकारची चित्रे मनात बाळगून कोण इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहील? वाढत्या वयाबरोबर हळू हळू त्यातल्या एक एक गोष्टीचा खुलासा होत गेला. बंगला हे एक प्रकारचे छानसे स्वतंत्र आणि प्रशस्त असे घरच असते, रानावनात आणि खेड्यापाड्यातल्या कच्च्या रस्त्यावरून जाण्यासाठी मजबूत बांधणीची जीप उपयोगाला येते हे समजले. पैसे खाणे काय असते ते कळले. फक्त इंजिनियरच पैसे खातात किंवा सगळेच इंजिनियर पैसे खातात अशातला भाग नाही, हा संपूर्ण समाजात पसरलेला रोग आहे हे देखील समजले. जेंव्हा दुर्घटना घडते त्या वेळी संबंधित लोकांबद्दल अशी शंका घेतली जाते त्यामुळे त्याचा संबंध इंजिनियरशी जोडला गेला हे लक्षात आले. अशा प्रकारे इंजिनियरांच्या पेशाबद्दल मनातला आकस दूर झाला. पण तरीही तो नेमके काय काम करतो हे मात्र समजत नव्हते.

पंडितजींच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक योजना सुरू झाल्या आणि देशात जागोजागी मोठमोठी धरणे व कारखाने उभे करण्याचे प्रकल्प सुरू झाले. त्यानंतर इंजिनियरांचे महात्म्य दिवसेदिवस वाढत गेले. "मुलगा इंजिनियरिंगची परीक्षा पास झाला रे झाला की त्याला बंगला, गाडी यासकट नोकरीची ऑर्डर मिळते." अशा प्रकारच्या वदंता उठल्या आणि आमच्या गांवापर्यंत येऊन पोचल्या. मोठमोठ्या नद्यांचे पाणी धरण बांधून अडवण्याचे काम करणारा भगीरथाचा अवतार असणार आणि रेल्वेगाड्या किंवा जहाजांसारख्या अगडबंब धुडांची निर्मिती करणारा विश्वकर्म्याचा अंश असणार! "असले आव्हानात्मक काम करायला मिळाले तर?" हा विचार मनाला मोहून टाकणारा होता. त्यामुळे शालेय जीवनाच्या अखेरीस मलाही इंजिनियरिंगचे आकर्षण वाटू लागले. शिवाय त्या काळात घरातली नाजुक आर्थिक परिस्थिती पाहता ती सुधारण्यासाठी चांगल्या नोकरीची मला गरज होती. मला बंगला गाडीचे एवढे आकर्षण नव्हतेच आणि प्रत्यक्षात ती मिळाली नाही याचे वैषम्यही वाटले नाही.

कुणाचे भले होत असले तर त्यात खोडा घालणारे लोक भेटतातच. "इंजिनियरच्या कामात जिवाला धोका असतो म्हणे." किंवा "त्या कोर्सचा अभ्यास फारच कठीण असतो, त्यात भयानक शारीरिक कष्ट असतात, ते याला झेपतील काय?" अशा प्रकारच्या माहितीने माझ्या मातापित्यांचे कान भरून झाले. आमच्या लहान गांवात बरोबर व पूर्ण माहिती देणारा कोणीच नव्हता. सगळेच ऐकीव गोष्टी सांगणारे होते. पण होणारा विरोध पाहून माझ्या मनातल्या सुप्त इच्छेचे रूपांतर निर्धारात झाले. प्रवेशासाठी पाहिजे होते तेवढे गुण मिळवण्यात मला कांहीच अडचण नव्हती. ते मिळवून इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश तर मिळवलाच, शिवाय नॅशनल स्कॉलरशिप मिळाल्याने खर्चाचा प्रश्नही आपण होऊन सुटला. तरीही कॉलेजात प्रवेश करेपर्यंत मला एकही इंजिनियर प्रत्यक्षात भेटला नव्हता की त्या कोर्सचे एकही पुस्तक दृष्टीला पडले नव्हते. इंजिनियरिंग म्हणजे काय हा प्रश्न अजून अनुत्तरितच होता.

2 comments:

अनिकेत भानु said...

काका हे आधी कुठे लिहीलं होतं का तुम्ही...
वाचल्यासारखं वाटतंय.

Anand Ghare said...

हो. कदाचित मिसळपाववर किंवा मनोगतावर वाचले असेल.