Saturday, July 27, 2013

ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा ?



ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा ? हा एक अतीशय प्रसिध्द प्रश्न आहे आणि नेहमी तोंडावर फेकला जातो. त्याचे उत्तर 'अर्धा रिकामा' असे दिले की त्यावर मोठे लेक्चर सुरू होते, तक्रारखोर वृत्ती सोडायचा आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगायचा सल्ला दिला जातो आणि 'अर्धा भरलेला' असे उत्तर दिले की त्या सकारात्मक दृष्टीकोनाचे कौतुक केले जाते, यामुळे तुम्ही आयुष्यात सुखी समाधानी रहाल असा भरोसा दिला जातो. सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या 'सांगा कसं जगायचं?' या कवितेमधूनसुध्दा हाच संदेश दिला आहे.
पेला अर्धा सरला आहे  असं सुद्धा म्हणता येतं।
पेला अर्धा भरला आहे  असं सुद्धा म्हणता येतं।
सरला आहे म्हणायचं  की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा ।।
सांगा कसं जगायचं? तुम्हीच ठरवा ।।

ढोबळ मानाने पाहिलं तर हा उपदेश हितकारक आणि ठीकच आहे. पण गंमत म्हणजे हा पेला कशाने अर्धा भरला आहे याचा यात काही उल्लेखच नाही. पेल्यात काय आहे ते समजल्यावाचून जे काही आहे ते चांगल्यासाठी की वाईटासाठी हे कसे ठरवणार? स्व.कवी केशवसुत एका प्रसिध्द कवितेत म्हणतात, "अमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटुनी प्यायाचा।।"  तसे असले तर अर्धा ग्लास भरलेला आहे ही चांगली गोष्ट आहे की अर्धा रिकामा आहे हे समाधानकारक आहे? तेच केशवसुत दुस-या प्रसिध्द कवितेत लिहितात, "काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या ।" इथे अर्ध्या पेल्यावर त्यांचे समाधान होणार नाही.

दोन भाऊ एका नातेवाईकाकडे गेले. त्यांचे आदरातिथ्य त्याने सरबताने केले. एका भावाला डायबेटीस होता. तो म्हणाला, "मला अर्धा ग्लासच सरबत द्या बरं का." त्या नातेवाईकाने सरबताने अर्धे भरलेले दोन ग्लास आणले. त्यावर दुसरा भाऊ म्हणाला, "मला अर्धाच ग्लास सरबत का देता आहात?" एकजण त्याच्य मनाविरुध्द अर्धा ग्लास सरबत प्यायला तयार होतो आहे आणि दुसरा (फक्त) अर्धाच ग्लास मिळाला म्हणून नाराज आहे.

एका माणसाने "अर्धा ग्लास भरलेला की अर्धा रिकामा?" हा प्रश्न त्याच्या मित्राला विचारला. त्यावर त्याने सांगितले, "बाटलीमधून ग्लास भरतांना तू हा प्रश्न करत असलास, तर मी म्हणेन तो (अजून) अर्धाच भरला आहे, आणखी भर. थोड्या वेळाने आपण पीत असतांना हाच प्रश्न तू केलास तर मी म्हणेन आतापर्यंत अर्धाच ग्लास रिकामा केला आहे. थोडा वेळ थांब." म्हणजे हा प्रश्न केंव्हा विचारला जाणार आहे त्यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे.

एका ठिकाणी टेबलावर खूप ग्लास ठेवलेले आहेत. त्यातल्या एका ग्लासकडे बोट दाखवून कोणी विचारले, "हा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा?" त्यावर तुम्ही काय कराल?  टेबलावरल्या इतर पेल्यांकडे पहाल. बाकीचे सगळे ग्लास रिकामे असतील तर "हा ग्लास अर्धा भरलेला आहे" असे म्हणाल आणि बाकीचे सगळे पेले पूर्ण भरलेले असले तर "हा ग्लास अर्धा रिकामा आहे." असेच म्हणाल. इथे तुम्ही वस्तुस्थिती सांगत आहात. ते करतांना या ग्लासचे जे वेगळेपण आहे तेच दाखवत आहात. त्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता कुठे आली ?

जीवनामध्येसुध्दा काही लोकांच्या बाबतीत त्यांना असेच वाटत नसेल कशावरून?

1 comment:

Marathi Blog KattaOnline said...

Different and interesting way of looking at this old question!