Thursday, March 07, 2013

कोण अससि तू न कळे मजला


स्त्रीत्वाची विविध रूपे पाहून थक्क झालेले आणि तिला काय म्हणावे या कोड्यात पडलेले नाटककार स्व.विद्याधर गोखले म्हणतात,
कोण अससि तू न कळे मजला ।
तू गंगेची अथांग शुचिता ?
की जननीची मायाममता ?
भाविकतेची मंगलगाथा ?
उदार चरिता अमर देवता ?
नवा जन्म तू मजला दिधला
काय वदू मी नकळे तुजला ?

त्याही आधी कवीवर्य स्व.ग. दि. माडगूळकर यांनी एका चित्रपटगीतात तिचे असे वर्णन केले आहे,
स्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी।
हृदयी अमृत नयनीं पाणी ।।

तुझिया पोटी अवतरती नर ।
अन्यायच ते करिती तुझ्यावर ।
दासी म्हणुनि नमविति चरणी ।।

कुशीत तुझिया पुरुष धुरंधर ।
अबला परि तू ठरिसि जगावर ।
दशा तुझी ही केविलवाणी ।।

सुंदरता तुज दिधली देवे ।
तुझी तुला ती परि न पेलवे ।
क्षणांत ठरली तूच पापिणी ।।
बाळा जो जो रे या चित्रपटात नायिकेला अतीशय हालअपेष्टा भोगाव्या लागतात. तिच्याबद्दल सहानुभूती मिळवून (स्त्री)प्रेक्षकांना हमखास रडवणारे असे हे गीत होते. त्या काळात टीयरजर्कर सिनेमे हमखास चालत असत.


गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या रचनेच्या ध्रुवपादात हृदयीं पान्हा नयनीं पाणी हे सांगितल्यानंतर कडव्यांमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत. ते गीत असे आहे,
बंदिनी स्‍त्री ही बंदिनी ।
हृदयीं पान्हा नयनीं पाणी ।
जन्मोजन्मींची कहाणी ।.

रूप बहिणीचे माया देई ।
वात्सल्य मूर्त आई होई ।
माहेरा सोडून येई ।
सासरी सर्वस्व देई ।।

कधी सीता कधी होई कुंती ।
सावित्रीची दिव्य शक्‍ति ।
शकुंतला तूच होसी ।
मीरा ही प्रीत दिवाणी ।।

युगेयुगे भावनांचे धागे ।
जपावया मन तुझे जागे ।
बंधनें ही रेशमाची ।
सांभाळी स्‍त्रीच मानिनी ।।

एकादी स्त्री स्वतःबद्दलच काय सांगते ते कवी भालचंद्र खांडेकर यांच्या या गाण्यात पहा,
मी निरांजनातील वात ।
माझ्या देवापाशी जळते, हासत देवघरात ।।

माझ्या प्रभूस माझी पारख ।
माझ्या देवाचे मज कौतुक ।
प्रभा प्रभूच्या सहवासाची, फुलली या हृदयात ।।

प्रशांत नीरव या एकांती ।
शुचिर्भूतता सारी भवती ।
पवित्र दर्शन सदा लोचना, लाभतसे दिन रात ।।

कणाकणातून प्रभा उधळिता ।
पटे जिण्याची मज सार्थकता ।
उषा फुलविता भयाण रात्री, भासे रवि तेजात ।।

आस एकली अंत:करणी ।
वास मिळावा नित तव चरणी ।
नको मना या अन्य विलोभन, गुंताया मोहात ।।

तुमची करण्यासाठी सेवा ।
प्राणाहुती ही माझी देवा ।
प्रकाशपूजन माझे घ्या हो, जे प्राणा प्राणांत ।।

वरील सगळी गीते पुरुषांनी लिहिलेली आहेत. स्त्रियांच्या नावावर काहीतरी लिहून ही समर्पणाची भावना त्यांच्यावर लादून दिली आहे असे जर कोणाला वाटत असेल तर स्व.शांताबाई शेळके या विख्यात कवयित्रीने लिहिलेले हे काव्य पहा.
माझी न मी राहिले ।
तुजला नाथा, सर्व वाहिले ।।

पहिली ती भेट होती ।
हसले मी गाली, ओठी ।
कळले ना मला वेडीला ।
वेड लावून गेली प्रीती ।
कशि फुलापरी उमलले ।।

चांदण्याचे सूर झाले ।
गाइली मी धुंद गाणी ।
धुंद होती रातराणी ।
धुंद होते जीव दोन्ही ।
रंग रंगांतुनी मिसळले ।।

सुख माझे ठेवु कोठे ?
मज माझा हेवा वाटे ।
नच काही उणे संसारी ।
किति आनंद हृदयी दाटे ।
जन्मजन्मी तुझी जाहले ।।

संत मीराबाईची मधुरा भक्ती सर्वांना ठाऊक आहे. एरी मै तो प्रेमदिवानी मेरा दरद न जाने कोय या तिच्या एका सुप्रसिध्द कवनाचा कवीवर्य स्व.ग. दि. माडगूळकर यांनी केलेला अनुवादच पहा.
मी तर प्रेम दिवाणी ।
माझे दु:ख न जाणे कोणी ।।

आर्ताची गत आर्ता ठावी ।
कळ ज्या अंत:करणी ।
स्थिती सतीची सतीच जाणे ।
जिती चढे जी सरणी ।।

स्त्रीला तिच्या स्वतःच्या अपत्याबद्दल वाटणा-यी मायेची थोरवी आपण मातृदिनाच्या दिवशी आठवतोच, पण परक्या घरातून आलेल्या सुनेला धीर देतांना ती काय म्हणते हे स्व. कवी पी.सावळाराम यांनी किती अचूकपणे टिपले आहे पहा,
लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी ।
मुली तू आलीस अपुल्या घरी ।।

हळदीचे तव पाउल पडता ।
घरची लक्ष्मी हरखुन आता ।
सोन्याहुनी ग झाली पिवळी ।।
मांडवाला कवळुन चढली चैत्रवेल ही वरी ।।

भयशंकित का अजुनी डोळे ?
नको लाजवू सारे कळले ।
लेकीची मी आहे आई ।
सासुरवाशिण होऊन मीही आले याच घरी ।।

याच घरावरी छाया धरुनी ।
लोभ दाविती माय पक्षिणी ।
हसते घर हे तुझ्या दर्शनी ।
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुनि माझ्या उरी ।।

पुरुषांना एकादी गोष्ट कमीपणा आणणारी असली तर लाज वाटते, पण स्त्रीसुलभ लज्जा हा तिचा अलंकार आहे. हे देणे फक्त त्यांनाच मिळाले आहे. ही आगळी वेगळी भावना व्यक्त करणारे हे गीत मात्र स्व.कवी मनमोहन नातू यांनी लिहिले आहे.
मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ।।
नका विचारू स्वारी कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा ।।

नका विचारू गमतीजमती ।
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्‍न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ?

अर्थ उलगडे समरसतेचा ।
सुटे उखाणा संसाराचा ।
छंद लागला मजला त्यांचा ।
धुंद बने बुल्बूल जीवाचा ।
घरी यायची झाली वेळा ।।

पण स्त्रीत्व म्हणजे सगळेच काही सुंदर, मंजुळ, नाजुक वगैरे असायलाच पाहिजे असे नाही. या जगात काही वेळा विसंवाद होतो, समर्पणाचा काही उपयोग होत नाही हे पाहून एकादी स्त्री चवताळून उठते, तिच्या मनातही कोणाबद्दल आसक्ती वाटणे तिला नैसर्गिक वाटते आणि कवी ना.धों.महानोरा यांच्या गीतात ती बिनधास्तपणे सांगते,
मी रात टाकली, मी कात टाकली ।
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली ।।

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत,
चावंळ चावंळ चालती ।
भर ज्वानीतली नार,
अंग मोडीत चालती ।।

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती ।
मी मुक्‍त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती ।।

अंगात माझिया भिनलाय ढोलिया ।
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली ।
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली ।।

उत्तर कोकणातल्या ठाकर महिलेत जसा तिचा स्वाभिमान दिसतो, तसाच ठसका स्व.जगदीश खेबूडकर यांनी चितारलेल्या कोल्हापुरच्या या लवंगी मिरचीमध्ये आहे.
नाव-गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापुरची ।
मला हो म्हणतात लवंगि मिरची ।।

हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग ।
वार्‍यावर लवते जशी चवळीची शेंग ।
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा, झाकुनी फेकिन नजरेची बरची ।।

हा लाल डाळिंबी शालु पदर जरतारी ।
ही हिरवी-हिरवी चोळी तंग भरदारी ।
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी, जणु मी नागीन झाडावरची ।।

या तिखटपणावर जाउ नका हुळहुळून ।
घायाळ शिकारी हरिणी जाइल पळुन ।
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेउ खुडुन, अहो मी पाव्हणी बारा घरची ।।

वरील काही उदाहरणे विशिष्ट परिस्थितीत सापडलेल्या स्त्रियांची आहेत. ती प्रातिनिधिक नाहीत, पण हा कॅनव्हास किती पसरलेला आहे हे दाखवतात.
नारीचे रूप कसे बदलत आहे हे स्व.जगदीश खेबूडकर यांनीच लिहिलेल्या खालील गीतात दाखवले आहे.
नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली ।
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली ।
कोण होतीस तू, काय झालीस तू ।
अग वेडे कशी वाया गेलीस तू ।।

सुंदर रूप तुझे निर्मळ भारी ।
होतीस अशी तू पवित्र नारी ।
डोईवर पदर, पदरात चेहरा,
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा ।
होती यशोदा तू, होतीस तारा तू,
होतीस राधा तू, होतीस मीरा तू ।।
पार्वती ती महान झाली ।
राज्य वैभव टाकून आली ।
काळ बदलला तूही बदलली ।
सा-यांना भुलवीत रस्त्याने चालली ।
पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही ।
सडक लैला अशी बदनाम झालीस तू ।।
तू अशी नारी होती, लाखात भारी होती ।
मर्दानी झाशीवाली हो‍उन लढलीस तू ।।

कोण होतीस तू, काय झालीस तू ।।

लाजवंती कालची तू चंचल छछोर होई ।
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही ।
कोण होतीस तू, काय झालीस तू ।।
अग वेडे कशी वाया गेलीस तू ।।

आखुड केस हे आखुड कपडे ।
पाठ ही उघडी, पोट हे उघडे ।
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली ।
साडी बिचारी खाली घसरली ।
नवा तुझा ढंग हा, बघण्याजोगा ।
पुढून मुलगी मागून मुलगा ।
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू ।।
तू अशी नारी होती लाखात भारी होती ।
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू ।.


तिच्यावर होत असलेल्या या टीकेला तीही चोख उत्तर देते,

पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली ।
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली ।।

कोण होतास तू काय झालास तू ।
अरे वेड्या कसा वाया गेलास तू ।।

तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा ।
होतास असा तू मर्दाचा राणा ।
सिंव्हाची छाती होती, उरात आग होती ।
वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती ।
होतास राम तू, होतास बुद्ध तू ।
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू ।।
भगतसिंग तो महान झाला ।
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला ।
काळ बदलला, तूही बदलला ।
करीत इशारे तू रस्त्याने चालला ।
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी ।
सडक मजनू असा बदनाम झालास तू ।।
तू असा शूर होता, लाखात वीर होता ।
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू ।।

काल तुझ्या हाती तलवार होती ।
लढवय्याचा तू वारसा ।
आज तुझ्या हाती कंगवा ।
घडीघडी बघसी तू आरसा ।
कोण होतास तू काय झालास तू ।
अरे वेड्या कसा वाया गेलास तू ।।

काय तुझी वेषभुषा आता कहर झाला ।
कालचा हिरो हा आज झिरो झाला ।
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका ।
लांबलांब केस हे मिशिला चटका ।
तर्‍हा तुझी बायकी, बघण्याजोगी ।
पुढून मुलगा हा मागून मुलगी ।
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू ।
तू असा शूर होता लाखात वीर होता ।
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू ।।
कोण होतास तू काय झालास तू ।
अरे वेड्या कसा वाया गेलास तू ।।

आता कुणी कुणाला बोलायचे?





No comments: