Sunday, August 02, 2009

वो जब याद आये ....... भाग २

चित्रपट बनवण्याचे तंत्र आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पाश्चात्य देशातून आपल्याकडे आली. तिच्या सोबतीने किंवा त्याअगोदरपासून हॉलीवुडमध्ये तयार होत असलेले इंग्रजी सिनेमे भारतात प्रदर्शित होऊ लागले. त्यांची छाप भारतात तयार होणा-या चित्रपटांवर पडणे साहजीक होते. इथल्या प्रेक्षकांना आपला वाटावा यासाठी कथावस्तू आणि वातावरण भारतीय ठेऊन तांत्रिक बाबतीत तिकडच्या कांही कल्पना उचलल्या जात होत्या. चित्रपटसंगीतावर सुध्दा त्याचा प्रभाव पडलेला दिसतो. अभिजात भारतीय संगीत आणि सिनेसंगीत यात एक महत्वाचा फरक मी पहात आलो आहे. आपल्या शास्त्रीय संगीतात पेटी, सारंगी, वीणा, व्हायलिन वगैरे स्वरसाथ देणारी वाद्ये गायनाबरोबर सारखी वाजत असतात आणि गायकाने आळवलेल्या सुरांची पुनरावृत्ती त्यातून होत असते. सिनेमातल्या गाण्यात मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वी आणि दोन कडव्यांच्या मध्ये त्या गाण्याशी सुसंगत पण वेगळ्या चालीवरचे वाद्यसंगीताचे तुकडे असतात. वादकांनी तर ते तुटकपणे वाजवायचे असतातच, गायकाने त्यात मधून मधून गायचे असते. एकाद्या रागाचा पध्दतशीर सलग विस्तार करत जाणे आणि तुटकतुटकपणे एकदम खालचे किंवा वरचे स्वर गळ्यातून काढणे या वेगळ्या कला आहेत. ऐकणा-याला त्यातून वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. कांही कलाकारांना या दोन्ही कला साध्य होतात, पण प्रत्येकाची आपापली आवड असते, मर्यादा असतात, इतर कारणेसुध्दा असतात, त्यामुळे शास्त्रीय संगीत गाणारे गायक आणि चित्रपटांचे पार्श्वगायक असे वेगळे वर्गीकरण झालेले आपल्याला दिसते.
भारतीय संगीतातले सूर, ताल, लय आणि वेस्टर्न क्लासिकल म्यूजिकमधली मेलडी, हार्मनी आणि रिदम यांचा सुरेख मिलाफ करून त्यातून आपल्या प्रतिभेचा आविष्कार शंकर जयकिशन या जोडगोळीने कसा केला होता याचे उदाहरण देणारे एक गाणे यानंतर सादर करण्यात आले. शिवरंजनी रागाची आठवण करून देणारी सुरावली थिरकत्या ठेक्यावर गातांना त्यात भावनांचा ओलावा निर्माण करण्याची अद्भुत किमया मोहम्मद रफी यांनी या गाण्यात करून दाखवली आहे. वादकवृंदाने तर कमालच केली. मोजक्या वाद्यांमधून मोठ्या ऑर्केस्ट्राचा आभास निर्माण करून या गाण्याचे प्रिल्यूड, इंटरल्यू़ड वगैरे बहुतेक सगळे तपशील त्यांनी व्यवस्थितपणे दाखवले. ब्रम्हचारी या चित्रपटातले हे गाणे तेंव्हा तर गाजले होतेच, अजूनही ऐकतांना मजा येते. सभागृहातल्या सगळ्या प्रेक्षकांनी त्या गाण्याचा ठेका धरला होता. ते गाणे होते
दिलके झरोकेमें तुझको बिठाकर । यादोंको तेरी मै दुलहन बनाकर । रक्खूंगा मै दिलके पास । मत हो मेरी जाँ उदास ।।

या गाण्यानंतर एक हाँटिंग मेलडी सादर करण्यात आली. महल चित्रपटातील आयेगा आनेवाला या गाण्यापासून थरारनाट्य असलेल्या चित्रपटात (सस्पेन्स मूव्हीजमध्ये) लतादीदींच्या आवाजात अशा प्रकारचे एक गाणे घालून ते वेगवेगळ्या सीनमध्ये पुन्हा पुन्हा वाजवण्याची रूढीच पडली होती. मधुमती, वो कौन थी, मेरा साया, गुमनाम वगैरे त्याची अनेक उदाहरणे देता येतील. या कार्यक्रमात सादर केलेले गाणे होते, अकेले हैं, चले आओ, चले आओ ।
खूप वर्षांपूर्वी आलेल्या, मी न पाहिलेल्या, रतन नावाच्या सिनेमासाठी नौशाद यांनी स्वरबध्द केलेले आणि जोहराबाई या गायिकेने गायिलेले जुन्या अनुनासिक ढंगाचे गाणे यानंतर आले. अजूनही ते कधीतरी ऐकायला मिळते. ते होते, अँखियाँ मिलाके, जिया भरमाके, चले नही जाना, ओओओ ..... चले नही जाना।
अशी खास वेगळ्या प्रकारची गाणी झाल्यानंतर नौशाद यांनीच संगीतबध्द केलेले कोहिनूर चित्रपटातले हमीर रागातले सुप्रसिध्द गाणे प्रभंजन मराठे यांनी अप्रतिम रीतीने गाऊन दाखवले. त्यातल्या तराण्यावर तबलजीने अशी कांही साथ दिली की मुद्दाम त्याच्या तबलावादनासाठी वन्समोअरचा आग्रह धरण्यात आला.
मधुबनमें राधिका नाची रे, गिरिधरकी मुरलियाँ बाजी रे ।।
नौशाद अलींच्याच संगीतरचनेतला खास उत्तर प्रदेशातल्या लोकसंगीताचा बाज पुढील गाण्यात दिसला. त्यानुसार यावेळी तबल्याऐवजी ढोलक या त्या भागात लोकप्रिय असलेल्या तालवाद्यावर ठेका धरला होता. भांगेच्या तारेत असतांनासुध्दा आपण पू्र्णपणे शुध्दीवर असल्याचा विनोदी आव आणत आपली चाल दाखवण्याचे आव्हान देण्याचा अजब प्रकार या गाण्यात आहे.
मेरे पैरोंमें घुंघरू बँधा दो के फिर मेरी चाल देख लो ।।
त्यानंतर खास शम्मीकपूर स्टाइलचे गाणे आले. मला ते पूर्वीसुध्दा विशेष आवडले नव्हते
ये आँखें उफ् युम्मा ।
शास्त्रीय संगीत, लोकसंगीत वगैरे झाल्यानंतर एक अनोखे देशभक्तीपर गाणे झाले. स्व.मदनमोहन या गजलसम्राटाने हकीकत या चित्रपटासाठी स्वरबध्द केलेले हे आवेशपूर्ण गाणे स्वातंत्र्यदिनासारख्या प्रसंगी हमखास ऐकायला मिळते. युध्दात वीरगती प्राप्त झालेले सैनिक अखेरच्या क्षणी आपल्या देशवासियांचा निरोप घेताघेता त्यांना जे आवाहन करतात त्या प्रसंगातले कारुण्य आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना याचे सुरेख मिश्रण असलेली मनाला भिडणारी शब्दरचना, ते भाव दाखवणारी स्वररचना आणि त्यात रफीसाहेबांनी आपल्या धीरगंभीर आवाजाने भरलेली जादू असे काँबिनेशन क्वचितच ऐकायला मिळते.
कर चले हम फिदा जान ओ तन साथियों । अब तुम्हारे हवाले वतन साथियों ।।
या गाण्यानंतर गाडी पुन्हा एकदा प्रेमगीतांवर आली. एक गजल सादर झाली,
मुझे दर्द ए दिलका पता न था, मुझे आप किसलिये मिल गये ।
मैं अकेला यूँ ही मजेमे था, मुझे आप किसलिये मिल गये ।।
त्यानंतर एकदम वेगळ्या मूडमधले प्यासा चित्रपटातले विनोदी आणि खटकेबाज गाणे आले. नोहम्मद रफी यांनी फक्त कथानायकांनाच आवाज दिला नव्हता, जॉनी वॉकर आदी विनोदवीरांनासुध्दा साजतील अशी अनेक गाणी त्यांनी गायिली आहेत त्यातले सर्वाधिक लोकप्रिय गाणे आहे,
सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए ।।
गायकाची एवढी दमछाक झाल्यानंतर गायिकेच्या आवाजातले एक गाणे घेऊन प्रभंजन मराठे यांना थोडी विश्रांती दिली गेली. तुम कमसिन हो नादाँ हो या रफी यांनी गायिलेल्या नायकाच्या गाण्याच्या चालीवरच हे गीत सिनेमातल्या नायिकेने म्हंटले आहे.
मैं कमसिन हूँ, नादाँ हूँ, नाजुक हूँ । थाम लो मुझे मै तेरी इल्तजाँ करूँ ।।
त्यानंतर एक युगलगीत झाले.
ओ आ जा पंछी अकेला है । ओ सो जा नींदियाकी बेला है ।।
एक गायक आणि दोन गायिका यांनी एकत्र गायिलेले लोकगीताच्या ढंगातले बैजूबावरा या चित्रपटातले आणखी एक गाणे यानंतर आले, दूर कोई गाये, धुन ये सुनाये, तेरे बिन छलिया रे, बाजे ना मुरलिया रे ।।होजीहो ... होहो ... होहो.....
त्यानंतर पंचमदांनी (आर.डी.बर्मन यांनी) संगीतबध्द केलेली नव्या धर्तीच्या संगीताने सजलेली गाणीसुध्दा रफी यांनी कशी गायिली याची झलक दाखवण्यात आली. पुढे अशा प्रकारची गाणी किशोरकुमार यांनी गायिली असली तरी सुरुवातीला त्यातली कांही रफी यांच्या आवाजात स्वरबध्द केली गेली. याची उदाहरणे आहेत,
गुलाबी आँखें, ये जो है तेरी, शराबी ये दिल, हो गया ।।
तसेच हे मादक द्वंद्वगीत,
ओ हसीना जुल्फोंवाली जान ए जहाँ, ढूँढती है शातिर आँखे जिसका नशा । मेहफिल मेहफिल ओ शमा, फिरती हो कहाँ ।।वो अनजाना ढूँढती हूँ, वो परवाना ढूँढती हूँ .........
यानंतर पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांची मेलडी आली,
अजी रूठकर अब कहाँ जाइयेगा, जहाँ जाइयेगा हमें पाइयेगा ।।
आणि रोशन यांचे काळजाला भिडणारे सूर, दिल जो न कह सका, वोही राज ए दिल, कहनेकी रात आयी है।।
मी सुरुवातीपासून ज्या गाण्याची वाट पहात होतो ते काळीज पिळवटून टाकणारे अजरामर गाणे अखेर आलेच. इतकी आर्तता, इतके शांत आणि सावकाशपणे आंदोलन घेत असलेले स्वर, त्यातला ठहराव वगैरे खुबी फार कमी गाण्यात ऐकायला मिळतात. त्यामुळे असे गाणे दीर्घकाळपर्येत स्मरणात राहते. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे । हवाभी रुख बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे ।।
कार्यक्रमाची अखेर रफीसाहेबांनी गायिलेल्या आणि अनेक लोकांच्या टॉपटेनमध्ये असलेल्या अजरामर अशा गाण्याने झाली. बैजूबावरा चित्रपटातले हे गाणे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले माधुर्य या गाण्यातून व्यक्त झाले होते.
तू गंगाकी मौज मैं जमुना की धारा । ये हमारा तुम्हारा मिलन ये हमारा तुम्हारा ।।
श्री.प्रभंजन मराठे यांनी कितीही चांगल्या रीतीने आणि जीव तोडून ही सगळी गाणी गायिली असली तरी मोहम्मद रफी यांच्या गाण्याची पातळी त्यांनी गाठली होती असे त्यांनाही वाटले नसेल. तसे शक्य असते तर त्यांचे स्वतःचेच नांव झाले असते. पण त्यांच्या गाण्यातून रफी यांची जुनी गाणी आठवली आणि पुन-प्रत्ययाचा आनंद मिळाला. नवोदित गायिकांनी चांगला प्रयत्न केला, पण त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे जाणवत होते. यात न घेतलेली आणखी किती तरी मोहम्मद रफी यांची गाणी अजून लोकांच्या ओठावर आहेत. त्यातली कोणती सांगू आणि कोणती वगळू ?

No comments: