Monday, March 23, 2009

थोडी गंमत, थोडा विरंगुळा

कांही सुप्रसिध्द वाक्ये
जेंव्हा एक निर्णय घेण्याचा क्षण योतो त्या वेळी सर्वोत्कृष्ट निर्णय घेणे हे अर्थातच सर्वोत्तम, चुकीचा निर्णय घेणे हे दुस-या क्रमांकावर आणि कोणताही निर्णयच न घेणे हे सर्वात वाईट. सर्वोत्कृष्ट गोष्ट करणं जमत नसेल तरी हरकत नाही. कारण चुका झाल्या तरी आपण दुस-या क्रमांकावर तर आहोतच.

विशीत तुम्ही समाजवादाने भारावून गेला नाहीत तर तुम्हाला काळीज नाही आणि चाळीशीतही तुमचे विचार बदलले नाहीत तर त्याचा अर्थ तुम्हाला डोके नाही.

तुम्हाला बर्‍याच गोष्टींबद्दल काहीतरी माहित असते, पुढे काही थोडक्या गोष्टींबद्दल आणखी जास्तीची माहिती होते, अखेर तुम्हाला कशातलेही काहीही कळत नाही हे तुमच्या लक्षात येते.
जेव्हा तुम्ही विशीत असता, तेव्हा लोक काय म्हणतील याची तुम्हाला सतत भीती असते. चाळीशीत गेल्यानंतर लोक काय म्हणतील याबद्दल तुम्ही काळजी करणे सोडून दिलेले असते.
 साठीत गेल्यावर तुम्हाला कळते की लोक कधीच तुमच्याबद्दल विचारच करत नव्हते.

जेंव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्व समजले, युनिव्हर्सिटी तुम्हाला बॅचलर्सची पदवी देते, जेंव्हा तुम्हाला कळते की आपल्याला काहीच माहीत नाही तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला मास्टर्सची पदवी देते आणि जेंव्हा तुम्हाला समजते की कुणालाचा काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते
आणि म्हणते गप बसा - तेरी भी चूप और मेरी भी चूप!

एकाद्या कुशल आणि मेहनती कामगाराची कार्यक्षमता जेंव्हा कमी कमी होऊ लागते तेंव्हा त्याला पदोन्नती देऊन पर्यावेक्षकपदी नेमले जाते, जेंव्हा त्याला पर्यावेक्षकाच्या कामासाठी उभे राहण्याचा ताण सोसवेनासा होतो तेंव्हा त्याला कार्यालयात बसून करायचे व्यवस्थापकाचे काम दिले जाते आणि जेंव्हा त्याला तेसुध्दा नकोसे वाटू लागते तोपर्यंत तो मालक झालेला असतो आणि कारखान्याकडे फिरकेनासा होतो.. . . . अर्थातच इतर जागा त्या त्या पदानुरूप अकार्यक्षम माणसांनी भरल्या जातात.
-----------------------------------------------------------------

थोडी गंमत

************************************************
१.ओळखा पाहू : जे रोज वर चढते आणि खाली सुद्धा उतरते पण जागचे हलत नाही! .२.'तो' आणि 'ती' यातील फरक सांगा . .उत्तरे या लेखाच्या तळाशी पहा.
******************************************
शिळ्या कढीला ऊत
एका गांवात मोठा धरणीकंप येऊन गेला. पुढील कांही दिवसात आणखी कांही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे त्या गांवातील एका माणसाने आपल्या मुलाला सुरक्षिततेसाठी आपल्या भावाकडे रहायला पाठवले. दुस-याच दिवशी भावाची तार आली "मुलाला ताबडतोब घेऊन जा. वाटल्यास भूकंपाला इकडे पाठवले तरी चालेल."
************************************

मर्फीचा एक नियम
तुम्ही बसस्टॉपकडे जात असतांना एक बस येत असतांना दिसते. धांवत जाऊन त्यात उडी मारून चढू शकलात.
..
ती बस नक्कीच चुकीच्या नंबरची असते.
.
नंबर बरोबर असेल तर ती उलट दिशेला जाणारी असते.
.
नंबर बरोबर असेल, दिशासुद्धा बरोबर असेल ती तुम्हाला हवा असलेल्या थांब्यापर्यंत जाणारी नसते. तिचा प्रवास मध्येच कुठे तरी संपतो.
.
पुढे जाण्यासाठी दुसरी बस पकडणे ज्या थांब्यावर अशक्य असते अशाच नेमक्या जागी तो संपतो .
******************************************
कोड्यांची उत्तरे:
१. तपमान
२. तो लग्नानंतर बदलेल असे तिला वाटत असते ......... पण तसे होत नाही. ती लग्नानंतरसुद्धा पूर्वीसारखीच राहील असे तो समजत असतो..... तसेही होत नाही.
******************************************
एक चुटका
एका मोठ्या संस्थेमध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. एका होतकरू उमेदवाराला अध्यक्षाने सांगितले, "जातांजातां जरा शिपायाला चहा पाठवायला सांगून जा." त्याने लगेच समोरच्या टेबलावरील घंटा वाजवली. त्यासरशी बाहेरचा शिपाई आंत आला. त्याला लगेच सर्वांसाठी गरम गरम चहा आणायला सांगितले, दूध व साखर वेगवेगळे आणण्याची सूचना दिली तसेच त्याबरोबर बिस्किटे, वेफर्स असे कांही खाद्यपदार्थ फर्मावले. अर्थातच त्याची निवड झाली. कामावर आल्यावर पहिल्याच दिवशी तासाभराने त्याला चहा पिण्याची तलफ आली. पण त्याच्या केबिनमध्ये घंटा ठेवलेलीच नव्हती. त्याने फोन उचलून अंदाजाने कॅंटीनचा समजून एक नंबर फिरवून ताबडतोब चहा पाठवून देण्याची आज्ञा केली. पलीकडून आवाज आला, "कोण बोलतंय्? मी या संस्थेचा प्रमुख बोलतोय्."
त्यानेही ऐटीत विचारले, "मी कोण बोलतोय् ते ठाऊक आहे?"
"नाही." उत्तर आले.
"ते एक बरं झालं." असे म्हणत त्याने फोन ठेऊन दिला.
--------------------------------------------------------------------------------------

पटकन उत्तर द्या

समजा तुम्ही एका शर्यतीमध्ये धावत आहात. नेहमीप्रमाणे आठ स्पर्धक यात भाग घेत आहेत. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला मागे टाकले तर तुमचा कितवा नंबर येईल?

.

.

काय म्हणालात, पहिला?

.

.

उत्तर चुकले

.

.

बरोबर उत्तर

.

.

.

तुम्ही तिसऱ्या नंबरवरून दुसऱ्यावर गेलात.


आता असं बघा.
.

समजा तो तुमचा दिवस नव्हताच. सुवर्ण, रौप्य, कांस्य यांतले कुठलेही पदक हाती लागण्याची शक्यताच नव्हती. तरीही शेवटच्या क्षणाला आपला सारा जोर पणाला लावून तुम्ही सर्वात शेवटी असलेल्या खेळाडूच्या पाठीमागून पुढे गेलात तर तुमचा कितवा नंबर येईल?

.

शेवटून दुसरा, म्हणजे सातवा असंच ना?

.

.

नाही. हे उत्तर सुद्धा बरोबर नाही.

.

अहो,  तुम्ही एक तर  स्वतःच शेवटच्या स्थानावर होता किंवा आधीच त्याच्या पुढे होता. तेंव्हा त्याच्या पाठीमागून पुढे कसे जाणार? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठल्या अकलेच्या कांद्यानं विचारला? त्याला बरोबर उत्तर कसे मिळणार?

...

हे ही जाऊ द्या राव.  आपण आणखी थोडं बोलू. ही शर्यत आंतरराष्ट्रीय होती बरं कां. त्यात चिनी, जपानी, आफ़्रिकी वगैरे सगळ्या वंशाची माणसं होती. त्यांची नांवे खालीलप्रमाणे होती

कखा,  खागि,  गिघी,  घीङु ,  ङुचू ,  चूछे, छेजै

आठव्या खेळाडूचे नांव काय बरे असेल?

.

.

कोण म्हणालं  जैझो ?

.

.

.

तुमचं नांव जैझो आहे कां?

---------------------------------------------
तळटीप.. हे जुनेच विनोद आहेत हे मुद्दाम सांगायची तसदी घेतली नाही तरी चालेल.
---------

No comments: