Thursday, June 07, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ४)

जमीन, पाणी आणि हवा या तीन्हींचा समावेश पर्यावरणात होतो आणि माणसाच्या कृतींचा प्रभाव या तीन्हींवर पडतो. जमीनीवर पडणारा प्रभाव फक्त स्थानिक असतो, वाहत्या पाण्याबरोबर त्यावर पडलेला प्रभावसुध्दा पसरत जातो, वातावरणातील बदल क्षीण होत होत जगभर पसरतात. यामुळे वायुप्रदूषणाचा मुद्दा जागतिक झाला आहे आणि त्यामुळे त्यावरील उपाययोजना आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवल्या जात आहेत. हवेचे पृथक्करण केल्यास नत्रवायू (नायट्रोजन) आणि प्राणवायू (ऑक्सीजन) हे त्याचे मुख्य घटक असतात, त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्बद्विप्राणील वायू (कार्बन डायॉक्साईड) सुध्दा असतो. सर्व वनस्पती दिवसा यातला थोडा थोडा कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन प्राणवायू हवेत सोडतात, सर्वच प्राणी आणि वनस्पतीसुध्दा दिवसाचे चोवीस तास श्वसन करत असतात आणि या क्रियेत प्राणवायू शोषून घेऊन कर्बद्विप्राणील वायू हवेत सोडतात. लक्षावधी वर्षांच्या काळात या दोन्ही क्रियांमध्ये एक समतोल साधला गेला होता आणि त्यामुळे हवेमधील प्राणवायू व कर्बद्विप्राणील वायू यांचे प्रमाण स्थिर राहिले होते. पण गेल्या काही दशकांमध्ये कारखाने आणि स्वयंचलित वाहने यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे कर्बद्विप्राणील वायूची निर्मिती खूप वाढली आहे आणि ती वाढतच आहे. उलट माणसाच्या हावेपोटी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यांची कर्बद्विप्राणील वायूपासून प्राणवायू तयार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रकारे वातावरणामधील संतुलन बिघडत आहे. शिवाय कारखान्यांमधून इतर काही प्रकारचे विषारी वायू बाहेर पडत असल्यामुळे त्यांचाही परिणाम वातावरणावर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग या बिघाडात भूपृष्ठाचे सरासरी तपमान वाढल्यामुळे बर्फांच्या राशी वितळतील, त्यामुळे नद्यांना महापूर येतील, समुद्राची पातळी वाढल्यामुळे तो किना-यावरील जागा व्यापेल आणि मुंबई, न्यूयॉर्कसारखी महानगरे पाण्याखाली बुडून जातील वगैरे भीतीदायक चित्र उभे केले जात आहे आणि हे होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुचवल्या जात आहेत. शक्य तेवढी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सुरू झालेली आहेच.

या योजना चांगल्या आणि आवश्यक आहेत यात शंका नाही, पण त्यांच्या बाबत काही गैरसमजुती पसरवल्या जात आहेत, त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. सगळ्या झाडांची सगळी पाने दिवसभर प्राणवायू तयार करत असतात आणि त्यामुळे घनदाट जंगले हे प्राणवायूचे मोठे कारखाने आहेत असे अनेक लोकांना वाटते, पण ते पूर्ण सत्य नाही. कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन त्यापासून अन्न तयार करण्याचे काम करण्यासाठी झाडांना इतर काही गोष्टींची आवश्यकता असते. पाणी आणि सूर्यकिरणे हवीतच, शिवाय जमीनीतून काही क्षार मिळावे लागतात. हे नसले तर ते झाड उपाशी राहते आणि सुकून जाते. हे सगळे प्राप्त होत असले तरीही त्या झाडाला अन्नाची आवश्यकता असावी लागते. त्याची वाढ होत असतांना हे अन्न मोठ्या प्रमाणावर तयार होते, पण झाड पूर्ण वाढल्यानंतर त्याला अन्न निर्माण करण्याची तितकीशी आवश्यकता वाटत नाही. झाडांच्या सर्व भागांचे आयुष्य समान नसते. त्याचे खोड आयुष्यभर त्याच्यासोबत असते तर फुले एक दोन दिवसांपुरतीच असतात. बहुतेक झाडांची पाने पिकून झडून जात असतात आणि त्यांच्यी जागी नवी पाने येत असतात. त्यातही काही झाडे हिवाळ्यात पूर्णपणे निष्पर्ण होतात काही झाडांची पाने अंशतः गळतात. जंगलामध्ये हा झाडांच्या खाली पडलेला पालपाचोळा कुजून जमीनीत मिसळतो किंवा वणव्यात भस्म होऊन जातो. या दोन्ही क्रियांमध्ये त्यातून कर्बद्विप्राणील वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. अशा प्रकारे वर्षभराच्या अवधीत जेवढा कर्बद्विप्राणील वायू ही झाडे हवेमधून शोषून घेतात तेवढाच तो परत करतात. त्यामुळे जंगलतोड करणे वाईट आहे आणि नवी राने वाढवणे चांगले आहे असे असले तरी हवेमधील कर्बद्विप्राणील वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी ती काही काळापर्यंतच उपयुक्त असतात. एक कारखाना सुरू केला आणि त्याचा चहू बाजूला झाडे लावली की कर्बद्विप्राणील वायूची काळजी मिटली असे होत नाही. कुठल्याही झाडाची पाने तोडली किंवा फांद्या छाटल्या की लगेच पर्यावरणाचा नाश झाला असेही होत नाही. झाडाना नवे कोंब फुटतात, नवी पल्लवी येते, त्याची वाढ सुरू होते आणि त्याचा पर्यावरणाला लाभ सुध्दा होऊ शकतो.

गेल्या काही हजारो किंवा लक्षावधी वर्षांमध्ये पृथ्वीच्या पाठीवरील पशुपक्षी आणि वनस्पती यांचा एक समतोल साधला गेला होता. वनस्पतींच्या तुलनेत प्राणीमात्रांचे आकार आणि संख्या फारच लहान असल्यामुळे पृथ्वीच्या पाठीवरील कर्ब (कार्बन) हे मुख्यतः वनस्पतींमध्येच असते. भूपृष्ठावर उगवणा-या आणि नष्ट होणा-या वनस्पतींमध्ये साठलेले कर्बाचे प्रमाण हजारो वर्षांपासून स्थिर राहिले होते. पण लक्षावधी वर्षांपूर्वी जमीनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेल, नैसर्गिक वायू (पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस) वगैरेंमध्ये होऊन गेलेले आहे. यंत्रयुगात ते जमीनीखालून बाहेर काढले जाऊ लागले आणि त्यांच्या ज्वलनातून निर्माण झालेला कर्बद्विप्राणील वायू हवेत मिसळत असल्यामुळे भूपृष्ठावरील कर्बाचे प्रमाण वाढत चालले आहे. ते शोषून घेऊन नव्या वनस्पतींमध्ये स्थिर करण्यासाठी प्रदीर्घ काळाचा अवधी लागेल. याचा विचार करून जे कारखाने अशा प्रकारे जगावर अधिक कर्बाचा बोजा टाकत आहेत त्यांनी कार्बन टॅक्स भरावा अशा प्रकारचे नियम पाश्चात्य देशात केले जात आहेत आणि इतर देशांनीसुध्दा ते करावे असा आग्रह धरत आहेत. उलट भारत आणि चीन यासारख्या देशांचे असे म्हणणे आहे की दर डोई उत्पादन किंवा विजेचा वापर यात ते पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूप मागे आहेत, त्यामुळे त्यांनी असे कर लावले तर ते विकासाला बाधा आणतील यामुळे ते मागेच पडत जातील. यामुळे ते असल्या तरतुदी मान्य करणार नाहीत. अशा प्रकारे यात राजकारण आले आहे आणि सर्वमान्य धोरणे निश्चित होऊन त्यांची अंमलबजावणी होऊ लागेपर्यंत पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम होत राहतील.

जमीनीवर होणारे परिणाम स्थानिक असल्यामुळे काही प्रमाणात त्या जमीनीच्या मालकालाच ते भोगावे लागतात. रासायनिक कीटकनाशके किंवा खतांमुळे जमीनीचा कस कमी झाला तर मालकाचे नुकसान होते, पण ती रसायने कृषीउत्पादनांमध्ये मिसळून ग्राहकांच्या पोटात जातात आणि त्यांच्या आरोग्याला अपाय करतात. शिवाय ही रासायनिक द्रव्ये तयार करणा-या मोठ्या कारखान्यांमुळे प्रदूषण होते, ऊर्जा खर्च होते वगैरे दोष त्यात आहेत. पण या द्रव्यांमुळे शेतक-याला थेट होणारा तात्कालिक लाभ अधिक आकर्षक असल्यामुळे त्यांच्याविरुध्द केलेली प्रचारमोहीम परिणामकारक ठरत नाही. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरावी यावर पर्यावरणवाद्यांचा भर आहे. याबाबतीत अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

पाण्याचे प्रदूषण ही भारतात अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. गंगेसारख्या एके काळी स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी प्रसिध्द असलेल्या नदीला आता गटाराचे रूप आले आहे. ज्या काळात लोकवस्ती कमी होती आणि नदीत भरपूर पाणी असायचे त्या काळात गावोगावच्या ओढ्यानाल्यामधून नदीत येऊन पडणारा सेंद्रीय कचरा जलचरांकडूनच नैसर्गिक मार्गाने नष्ट केला जात असे. आता कचरा अपरंपार वाढत आहे, त्यात विषारी रसायने टाकली जात आहेत आणि जलचर जीवच नष्ट होत चालले आहेत. जनजागृती तसेच तंत्रज्ञान या दोन्ही आघाड्यांवर नेटाने प्रयत्न केल्यानेच हा प्रश्न आटोक्यात आणणे शक्य आहे. तसे नाही झाले तर त्यापासून होत असलेले दुष्परिणाम वाढतच जातील.

. . . . . . . . .. . . . . . . (क्रमशः)

No comments: