Sunday, June 03, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग १ ते ५)

सन २०१२मध्ये वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन एकत्र आले होते. त्यावेळी मी एका लेखमालिकेत या दोघांचा एकमेकांशी असलेला घनिष्ठ संबंध सांगून त्यावर विस्ताराने लिहिले होते. आज या वर्षीच्या वटपौर्णिमेच्या निमित्याने मी सर्व भाग एकत्र करून त्यांचे थोडे संपादन केले आहे. दि.१०-०६-२०२५
. . . . .

भाग १.

वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. फक्त वनस्पतींना ते सामर्थ्य मिळाले आहे.


प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे रोजमर्राचे जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तेही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशी आपली संस्कृती आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा हा या व्रतातला महत्वाचा भाग आहे. पुराणकाळामधील सावित्री या महान पतिव्रतेने प्रत्यक्ष यमाशी नम्रतापूर्वक पण सखोल तात्विक वाद घातला, अनेक प्रकारे त्याची मनधरणी केली, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून विभक्त न होण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण चातुर्याने परत मिळवले अशी कथा आहे. या गोष्टीत सावित्रीचा निग्रह, तिचे पांडित्य आणि चतुराई दिसून येते. हे नाट्य एका वडाच्या झाडाखाली घडले असावे आणि एवढाच त्याचा संबंध या कथेशी असावा. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपले सौभाग्य अखंड रहावे अशी मनोकामना या व्रताच्या निमित्याने व्यक्त करून व़टवृक्षाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवावे अशा विचाराने ही परंपरा सुरू झाली असावी.

उद्या वटपौर्णिमा आहे. या निमित्याने स्त्रिया वडाची पूजा करतील, त्या झाडाला दोरा गुंडाळण्यासाठी त्याला प्रदक्षिणा घालतांना त्याचा बुंधा किती रुंद आणि मजबूत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. विशाल वृक्षाचा भार पेलण्यासाठी त्याचा बुंधा बळकट असणे किती आवश्यक आहे हे त्यांना कळेल. जीवनातील कर्तव्यांचा बोजा पेलण्यासाठी खंबीरपणा कसा आवश्यक आहे याचा वस्तुपाठ त्यांना मिळेल. वडाची एक लहानशी फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करणा-यांना यातले काहीच मिळणार, कळणार किंवा वळणार नाही. जी फांदी स्वतःच दोन चार दिवसात सुकून नष्ट होणार आहे किंवा त्याच्याही आधी म्हणजे दुस-या दिवशीच कच-याच्या ढिगा-यात टाकून दिली जाणार आहे ती कोणाला कसला संदेश, स्फूर्ती किंवा आशीर्वाद देणार?

शहरांमध्ये वडाच्या फांदीची पूजा करणे असे विकृत रूप या व्रताला मिळाले आहे. त्यासाठी आधीच वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जायबंदी केले जात आहे. ज्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ज्याची पूजा करायची, त्याच झाडाची या कारणासाठी मोडतोड करणे हा मूळ उद्देशाचा केवढा विपर्यास आहे? सावित्रीची कथा तर आता हरवून गेली आहे. तिने यमधर्माशी कसली चर्चा केली हे क्वचितच कोणाला माहीत असेल. पतीनिधनाच्या दुर्धर प्रसंगी तिने आपला तोल सांभाळून इतका सखोल तात्विक संवाद केला ही गोष्ट कोणाला माहीतसुध्दा नसेल.

या वर्षी वटपौर्णिमेच्या पाठोपाठ जागतिक पर्यावरण दिवस येतो आहे. तो नक्की कसा साजरा होणार आहे हे मला माहीत नाही. कदाचित त्या दिवशी पोपटपंची करून वृक्षांचे तोंडभर कौतुक केले जाईल. लेख लिहिले आणि वाचले जातील. वनस्पतीविश्वाशी ज्यांची ओळख पुस्तकी ज्ञानामधून झाली आहे असे लोक यात पुढाकात घेतांना दिसले तर मला यात आश्चर्य वाटणार नाही. पण पूर्वीच्या काळात अशा व्रतांच्या निमित्याने माणसांच्या मनात वृक्षवल्लींबद्दल आत्मीयता निर्माण केली जात होती तसे काही केले गेले तर ते पर्यावरणासाठी खरोखर उपयुक्त ठरेल.

. . . . . . . . . . . . .  


वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग २)

माझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा माणूस पुराणातल्या भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यामुळे माझी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात भविष्यकाळात घडणाऱ्या घटना आधीपासून ठरलेल्या नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक भाकित करता येणे अशक्य आहे. हातावरील रेषा किंवा आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो असे माझे ठाम मत आहे. सावित्रीच्या कथेमधल्या सत्यवानाचे आयुष्य अल्प असते असे भाकित त्या काळातील निष्णात ज्योतिष्यांनी केलेले असले तरीही त्याला अखेर चारशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभते हा विरोधाभास आहे आणि पुढे असे होणार हे जर आधीच ठरलेले असले तर मग सावित्रीच्या कथेतील हवाच निघून जाईल, तिच्या गुणांना किंवा प्रयत्नांना काही मोलच उरणार नाही.

रेड्यावर आरूढ होऊन साक्षात यमराज तिथे येतात, सत्यवानाच्या शरीरामधून अंगठ्याएवढ्या आकाराचा त्याचा प्राण काढून घेऊन ते परत जायला निघतात, हे सगळे सावित्रीच्या डोळ्यांना दिसते. त्यांच्या मागोमाग तीही तीन दिवस तीन रात्री चालत राहते, यमाशी वाद विवाद संवाद वगैरे करून त्याला शब्दात पकडते आणि सत्यवानाचे प्राण त्याच्या ताब्यातून मिळवून घेते वगैरे कथाभाग विज्ञानाच्या कसोटीवर सत्य घटना ठरू शकत नाही. लहान मुलांना गोष्टी सांगतांना काऊ, चिऊ, वाघोबा, ससुला वगैरे प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात असे आपण सांगतो तेंव्हा ते खरे नसते हे त्यांनाही माहीत असते, पण मनोरंजक असल्यामुळे मुले त्या गोष्टी आवडीने ऐकून घेतात. नाटक, सिनेमा पाहतांना, कादंबऱ्या वाचतांना त्यातल्या गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला ठाऊक असते तरीही आपण त्यात गुंगून जातो. पुराणातल्या कथासुध्दा अशाच प्रकारे लोकांना आवडाव्यात यासाठी रंजक केलेल्या असतात. ही गोष्ट सुध्दा बहुतेक लोक जाणतात. आजकाल तर यमराज आणि त्याचे वाहन असलेला रेडा हे दोघेही विनोदाचे विषय झाले आहेत आणि त्यांची यथेच्छ कुचेष्टा केली जात असते. कोणालाच त्यांचे भय वाटत नाही. तेंव्हा पुराणामधील कथांमधले अक्षर न् अक्षर सत्य आहे असा अट्टाहास न धरता त्यांचे तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध घेणे महत्वाचे आहे. ज्या कथांमधून असा बोध व मार्गदर्शन मिळते अशाच निवडक कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जात आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्यांमध्ये असलेल्या मौलिक तत्वांमुळे त्या चिरकाल टिकून राहणार आहेत.

सावित्रीच्या कथेमधला अवास्तव भाग काढून टाकला तरीसुध्दा बरेच काही अद्भूत असे शिल्लक उरते. लाडात वाढत असलेली एक बुध्दीमान राजकन्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरते आणि शिक्षण घेऊन शास्त्रनिपुण बनते, त्या काळात उपलब्ध असलेल्या अनेक विद्या ती संपादन करते. तिचे आईवडील या बाबतीत आडकाठी न आणता तिला प्रोत्साहन देतात. शिक्षणाद्वारे ती इतके उच्च स्थान गाठते की तिला योग्य असा पती शोधणे तिच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होऊन गेल्यामुळे तिने आपला वर स्वतः शोधावा असे सुचवले जाते. या उद्देशाने देशोदेश धुंडाळल्यानंतर आंधळ्या आईवडिलांसोबत एका पर्णकुटीत राहणाऱ्या रूपगुणसंपन्न आणि सुशिक्षित, सुसंस्कृत अशा सत्यवानाची निवड ती करते. हे स्थळ आईवडिलांना पसंत नसते. इतर काही लोकांनासुध्दा हे आवडत नाही किंवा सत्यवानाचा हेवा वाटला असेल. तो अल्पायुषी असल्याचे भाकित पसरवले जाते, पण सावित्रीचा निर्णय बदलत नाही. राजवाड्यामधील ऐशोआरामाचे जीवन सोडून ती पतीगृही जाते. त्याच्या नित्याच्या कामात त्याला मदत करते. जळणासाठी लाकडे गोळा करायला त्याच्यासोबत अरण्यात जाते. अपघातामुळे तो उंचावरून खाली पडून निष्चेष्ट होतो. गोंधळून न जाता धैर्याने तीन दिवस सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्याचे प्राण वाचवते. घोर निराशेच्या अंधारात सापडलेल्या सासूसासऱ्यांना नवी दृष्टी देऊन त्यांचे वैभव मिळवून देते. हे सगळे अलौकिक आणि दिव्य आहे. ते सगळे खरोखर असेच घडले होते की नव्हते याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. सावित्रीच्या कथेमध्ये भेटणारी ही नायिका मला अद्वितीय भासते. वर्षातून एकदा तिची कहाणी ऐकूनसुध्दा अनेकांना त्यातून नवा प्रकाश मिळण्याची शक्यता आहे.

आता आपण वटसावित्रीव्रताकडे पाहू. पहिल्या भागात मी लिहिल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी खुबीने या निमित्य सर्व महिलांना वटवृक्षाकडे आकृष्ट केले आहे. वटवृक्षाचे वेगळेपण मी मागील भागात दाखवले आहेच. माझ्या कल्पनेनुसार पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा हा वृक्ष एकंदरीतच वनस्पतीविश्वाचे प्रतीक मानायला हरकत नाही. मध्ययुगामध्ये अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती की स्त्रियांना घराबाहेर पडणेच कठीण झाले होते. मंगळागौर, हरतालिका, व़टसावित्री यासारख्या व्रतांच्या निमित्याने त्यांना आपापल्या घराबाहेत पडून एकत्र जमायची संधी दिली गेली. त्यावेळी इतर महिलांवर छाप पाडण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी नटणे, उंची वस्त्रे आभूषणे धारण करणे ओघानेच आले. सौंदर्यप्रदर्शनाचा हा महिलांचा आवडता भाग आज सुध्दा सर्वत्र उत्साहाने पाळला जातो असे मी काल पाहिले. घराबाहेर पडण्यासाठी नवरोबाची संमती मिळावी म्हणून हे सगळे त्याच्याच भल्यासाठी करत असल्याचा आव आणला गेला. म्हणजे त्याचा विरोध राहणार नाही. पुढील सात जन्म दर वेळी हाच पती मिळावा असे सांगण्यामुळे त्याचा अहंभाव जास्तच सुखावला जाईल अशी अपेक्षा होती. (अलीकडे मात्र हा आपल्यावर अन्याय असल्याची ओरड विनोदी नाटकांमध्ये होऊ लागली आहे.) सावित्री आणि सत्यवान दोघेही इतके पुण्यवान होते की एक तर त्यांच्यासाठी स्वर्गात जागा राखून ठेवल्या असतील किंवा त्यांना मोक्षप्राप्ती झाली असेल. त्यांच्या बाबतीत पुढील सात जन्मांचा प्रश्नच नसणार. सगळ्या बाजूंनी मोर्चेबांधणी करून झाल्यावर स्त्रियांना कोंदट माजघरातून बाहेर काढून मोकळ्या जागेत वडाच्या विशालकाय झाडाखाली जमवण्याचे योजले गेले. ज्येष्ठ महिना तसा कडक उन्हाचाच असतो. त्यात डेरेदार वटवृक्षाची शीतल सावली जास्तच आनंददायी वाटते. या निमित्याने त्या भव्य वृक्षाशी जवळीक निर्माण होते, आपुलकी वाटू लागते. कळत नकळत निसर्गाशी एक नाते जोडले जाते.

पूर्वीच्या काळात वडाची पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जात असे. त्यात सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथानक आहेच, सावित्री आणि यमधर्म यांचा संवादसुध्दा असे. हिंदू धर्मशास्त्रांमधील अनेक मुद्दे यातून श्रोत्यांच्या कानावर आपसूक प़डत. पुराणातली सावित्री सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होती, पण मधल्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले गेले होते. व्रताचा भाग म्हणून अशा पोथ्यांचे श्रवण केल्यामुळे त्यांना धर्माचे थोडे ज्ञान मिळण्याची संधी मिळायची.

. . . . . . . . . . . . 

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ३)

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात 'पर्यावरण' हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता. त्याचा उद्भव किंवा उद्गम नक्की कधी झाला हे मला माहीत नाही, पण त्याचा प्रसार मात्र नक्कीच अलीकडच्या काळात झाला आहे. मला कळायला लागल्यापासून निसर्ग, सृष्टी वगैरे शब्द ओळखीचे झाले होते. ग्रामीण भागात रहात असल्यामुळे घराबाहेर पडून कोणत्याही दिशेने दहा पंधरा मिनिटे चालत गेल्यावर पुढे नजर पोचेपर्यंत निसर्गाचेच साम्राज्य असे. किंबहुना चहूकडे वाढलेल्या वनस्पतींनी झाकलेल्या नैसर्गिक भूमीवर अधूनमधून तुरळक अशी मानवनिर्मित वस्ती दिसत असे. निसर्गाकडून मिळत असलेल्या ऊन, पाऊस, थंडी, वारा वगैरे गोष्टी जशा प्रकारे मिळतील त्यांच्याशी सलोखा करून त्यानुसार आपली राहणी ठेवली जात असे. अचानक उद्बवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून आपला बचाव करणे हे सर्वात मोठे दिव्य असायचे. आपल्यासारख्या यःकश्चित प्राण्याकडून एवढ्या भव्य आणि बलवान निसर्गाला कसलाही धोका पोचू शकतो असे तिथे कोणी सुचवले असते तर इतरांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. त्या काळात परदेशातलीच काय पण भारतातील शहरांमधील परिस्थिती कशी आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती. मानव प्राणी हा 'अनंत हस्ते' आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवणाऱ्या 'विपुला च पृथ्वी' वर सर्वस्वी अवलंबून असलेला एक क्षुद्र जीव आहे अशी माझी पक्की धारणा झाली होती.

इंग्रजी भाषेतला 'एन्व्हायरनमेंट' हा शब्द त्या काळात निराळ्या अर्थाने ओळखीचा झाला होता. 'घर, शाळा वगैरे ज्या ठिकाणी आपण काही वेळ घालवत असू त्याच्या सभोवतालचे वातावरण' हा त्याचा अर्थ आजसुध्दा प्रचलित आहे. आजूबाजूची माणसे, त्यांचे आचार, विचार वगैरेंचा देखील यात समावेश होतो. 'एन्व्हायरनमेंट' या शब्दाचा 'आसपासची जमीन, हवा, पाणी' असा दुसरा संकुचित अर्थ आणि या अर्थाने 'पर्यावरण' हा या शब्दाचा नवा प्रतिशब्द आजकाल रूढ झाला आहे. निदान एकदा तरी हा शब्द वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एकही दिवस जात नाही इतका तो वापरून गुळगुळीत झाला आहे. पण त्या बरोबरच काही विपर्यस्त कल्पना किंवा माहिती पसरवली जात आहे.

'मानवाने निसर्गावर विजय मिळवला आहे' अशा प्रकारच्या वल्गना जितक्या पोकळ आहेत तितकीच माणसाने केलेली 'पर्यावरणाची चिंता' निरर्थक आहे. आजच्या जगामधील सात अब्ज माणसे आणि दोन तीनशे देश या सर्वांनी त्यांची सारी ताकत एकवटली तरीही निसर्गाची रूपे असलेल्या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याच्या पुढे ती नगण्य ठरेल. सागराच्या लाटा किंवा सूर्यप्रकाश यातून क्षणाक्षणाला प्रकट होत असलेली किंवा धरणीकंपामध्ये काही सेकंदात बाहेर टाकलेली प्रचंड ऊर्जा पाहता हे लक्षात येईल. तेंव्हा आपल्यापेक्षा अनंतपटीने सामर्थ्यवान असलेल्या निसर्गाची आपण काळजी करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. पर्यावरणप्रेमी खरे तर त्यांच्या स्वतःच्या किंवा फार तर त्यांच्या वंशजांच्या चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे म्हणता येईल.

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यात सारखे बदल होत असतात. सकाळ, दुपार, संध्याळ, रात्र असे रोज होणारे बदल, उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा असे ऋतूंमधले बदल आणि भूपृष्ठात हळू हळू होत असलेले दीर्घकालीन बदल हे सारे निसर्गच घडवून आणतो. एका काळी ज्या ठिकाणी समुद्र होता तिथे हिमालयाची शिखरे झाली आहेत आणि एका काळी गर्द वनराई असलेला भूभाग आज वाळवंट झालेला किंवा समुद्राच्या तळाशी गेला आहे. डायनोसॉरसासारखे महाकाय प्राणी निर्माण झाले तसेच नामशेष होऊन गेले. इतर किती प्रकारचे जीव पृथ्वीवर राहून नष्ट झाले याची गणतीच करता येणार नाही. या सगळ्यांच्या तुलनेत पाहता मानवाच्या मूर्खपणामुळे किंवा हावरटपणामुळे आज पर्यावरणात पडत असलेला बदल अगदी मामूली म्हणता येईल.

निसर्ग हा नेहमी रम्यच असतो असे नाही. तो विध्वंसक रूपसुध्दा धारण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो न्याय अन्यायाचा विचार करत नाही. एकाने त्याच्यावर आक्रमण केले तर तो त्याची शिक्षा त्यालाच करेल असे नाही. अगदी साधी गोष्ट पहायची झाली तर एका ठिकाणी समुद्रात भर टाकली तर दुसरीकडे कोठे तरी त्याचा परिणाम दिसेल. नदीच्या वाहत्या पात्रात घाण मिसळणारा वेगळाच असतो पण त्याचे वाईट परिणाम खालच्या अंगाला राहणाऱ्या लोकांना भोगावे लागतात. हवेचे प्रदूषण करणारे एक असतात आणि त्याचा त्रास इतरांनाही झाल्याशिवाय रहात नाही. 'कराल तसे भराल' हा न्याय निसर्गाच्या बाबतीत नीटसा लागू होत नाही. यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी ठरते.

यंत्रयुगाच्या आधी माणसाची विध्वंस करण्याची क्षमता अगदी कमी होती. त्याने दोन हाताने केलेल्या लहान सहान नुकसानाची भरपाई निसर्ग आपल्या अनंत हस्तांनी सहजपणे करत होता. त्यामुळे निसर्गात होणारे बदल हे त्याच्याच नियमानुसार घडत असत आणि त्यात एक नियमितता होती. मानवांची उत्पत्ती आणि विनाश यातसुध्दा नैसर्गिक समतोल पाळला जात असल्यामुळे जगाची लोकसंख्यासुध्दा जवळजवळ स्थिर होती. गेल्या शतकात यात मोठा फरक पडला. लोकसंख्या वाढतच गेली, तसेच प्रत्येक माणसाच्या गरजा वाढत गेल्या. यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या भागवल्या जाऊ लागल्या, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या नवनव्या वस्तूंचे उत्पादन होऊ लागले आणि त्यांचा उपभोग घेण्याचा हव्यास वाढत गेला. यासाठी लागणारा कच्चा माल जमीन, पाणी आणि हवा यातून काढून घेतला जाऊ लागल्यामुळे त्यांचे साठे कमी होत चालले आणि यांत्रिक क्रियांमधून निर्माण होणारा कचरा निसर्गाच्या स्वाधीन केला जात असल्यामुळे त्यांचा उपसर्ग होणे सुरू झाले. यातून होणाऱ्या समस्यांवर निसर्ग आपल्या परीने मार्ग काढत असतो, पण तो माणसांच्या फायद्याचा नसल्यामुळे किंवा आपल्याला त्रासदायक वा धोकादायक असल्यामुळे आपण हैराण होतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास मिठी नदीच्या किनारी राहणाऱ्या लोकांनी तिच्या पात्रात टाकलेल्या कचऱ्यामुळे ते अरुंद झाले म्हणून पावसाचे पाणी मुंबईच्या अन्य भागात पसरले आणि यापूर्वी कधीही जिथे पाणी तुंबत नव्हते तेथील लोकांना जलप्रलयाचा अनुभव घ्यावा लागला.

. . . . . . . . . . . . 

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ४)

जमीन, पाणी आणि हवा या तीन्हींचा समावेश पर्यावरणात होतो आणि माणसाच्या कृतींचा प्रभाव या तीन्हींवर पडतो. जमीनीवर पडणारा प्रभाव फक्त स्थानिक असतो, वाहत्या पाण्याबरोबर त्यावर पडलेला प्रभावसुध्दा पसरत जातो, वातावरणातील बदल क्षीण होत होत जगभर पसरतात. यामुळे वायुप्रदूषणाचा मुद्दा जागतिक झाला आहे आणि त्यामुळे त्यावरील उपाययोजना आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवल्या जात आहेत. हवेचे पृथक्करण केल्यास नत्रवायू (नायट्रोजन) आणि प्राणवायू (ऑक्सीजन) हे त्याचे मुख्य घटक असतात, त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्बद्विप्राणील वायू (कार्बन डायॉक्साईड) सुध्दा असतो. सर्व वनस्पती दिवसा यातला थोडा थोडा कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन प्राणवायू हवेत सोडतात, सर्वच प्राणी आणि वनस्पतीसुध्दा दिवसाचे चोवीस तास श्वसन करत असतात आणि या क्रियेत प्राणवायू शोषून घेऊन कर्बद्विप्राणील वायू हवेत सोडतात. लक्षावधी वर्षांच्या काळात या दोन्ही क्रियांमध्ये एक समतोल साधला गेला होता आणि त्यामुळे हवेमधील प्राणवायू व कर्बद्विप्राणील वायू यांचे प्रमाण स्थिर राहिले होते. पण गेल्या काही दशकांमध्ये कारखाने आणि स्वयंचलित वाहने यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे कर्बद्विप्राणील वायूची निर्मिती खूप वाढली आहे आणि ती वाढतच आहे. उलट माणसाच्या हावेपोटी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यांची कर्बद्विप्राणील वायूपासून प्राणवायू तयार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रकारे वातावरणामधील संतुलन बिघडत आहे. शिवाय कारखान्यांमधून इतर काही प्रकारचे विषारी वायू बाहेर पडत असल्यामुळे त्यांचाही परिणाम वातावरणावर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग या बिघाडात भूपृष्ठाचे सरासरी तपमान वाढल्यामुळे बर्फांच्या राशी वितळतील, त्यामुळे नद्यांना महापूर येतील, समुद्राची पातळी वाढल्यामुळे तो किनाऱ्ंयावरील जागा व्यापेल आणि मुंबई, न्यूयॉर्कसारखी महानगरे पाण्याखाली बुडून जातील वगैरे भीतीदायक चित्र उभे केले जात आहे आणि हे होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुचवल्या जात आहेत. शक्य तेवढी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सुरू झालेली आहेच.

या योजना चांगल्या आणि आवश्यक आहेत यात शंका नाही, पण त्यांच्या बाबत काही गैरसमजुती पसरवल्या जात आहेत, त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. सगळ्या झाडांची सगळी पाने दिवसभर प्राणवायू तयार करत असतात आणि त्यामुळे घनदाट जंगले हे प्राणवायूचे मोठे कारखाने आहेत असे अनेक लोकांना वाटते, पण ते पूर्ण सत्य नाही. कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन त्यापासून अन्न तयार करण्याचे काम करण्यासाठी झाडांना इतर काही गोष्टींची आवश्यकता असते. पाणी आणि सूर्यकिरणे हवीतच, शिवाय जमीनीतून काही क्षार मिळावे लागतात. हे नसले तर ते झाड उपाशी राहते आणि सुकून जाते. हे सगळे प्राप्त होत असले तरीही त्या झाडाला अन्नाची आवश्यकता असावी लागते. त्याची वाढ होत असतांना हे अन्न मोठ्या प्रमाणावर तयार होते, पण झाड पूर्ण वाढल्यानंतर त्याला अन्न निर्माण करण्याची तितकीशी आवश्यकता वाटत नाही. झाडांच्या सर्व भागांचे आयुष्य समान नसते. त्याचे खोड आयुष्यभर त्याच्यासोबत असते तर फुले एक दोन दिवसांपुरतीच असतात. बहुतेक झाडांची पाने पिकून झडून जात असतात आणि त्यांच्यी जागी नवी पाने येत असतात. त्यातही काही झाडे हिवाळ्यात पूर्णपणे निष्पर्ण होतात काही झाडांची पाने अंशतः गळतात. जंगलामध्ये हा झाडांच्या खाली पडलेला पालपाचोळा कुजून जमीनीत मिसळतो किंवा वणव्यात भस्म होऊन जातो. या दोन्ही क्रियांमध्ये त्यातून कर्बद्विप्राणील वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. अशा प्रकारे वर्षभराच्या अवधीत जेवढा कर्बद्विप्राणील वायू ही झाडे हवेमधून शोषून घेतात तेवढाच तो परत करतात. त्यामुळे जंगलतोड करणे वाईट आहे आणि नवी राने वाढवणे चांगले आहे असे असले तरी हवेमधील कर्बद्विप्राणील वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी ती काही काळापर्यंतच उपयुक्त असतात. एक कारखाना सुरू केला आणि त्याचा चहू बाजूला झाडे लावली की कर्बद्विप्राणील वायूची काळजी मिटली असे होत नाही. कुठल्याही झाडाची पाने तोडली किंवा फांद्या छाटल्या की लगेच पर्यावरणाचा नाश झाला असेही होत नाही. झाडांना नवे कोंब फुटतात, नवी पल्लवी येते, त्याची वाढ सुरू होते आणि त्याचा पर्यावरणाला लाभ सुध्दा होऊ शकतो.

गेल्या काही हजारो किंवा लक्षावधी वर्षांमध्ये पृथ्वीच्या पाठीवरील पशुपक्षी आणि वनस्पती यांचा एक समतोल साधला गेला होता. वनस्पतींच्या तुलनेत प्राणीमात्रांचे आकार आणि संख्या फारच लहान असल्यामुळे पृथ्वीच्या पाठीवरील कर्ब (कार्बन) हे मुख्यतः वनस्पतींमध्येच असते. भूपृष्ठावर उगवणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या वनस्पतींमध्ये साठलेले कर्बाचे प्रमाण हजारो वर्षांपासून स्थिर राहिले होते. पण लक्षावधी वर्षांपूर्वी जमीनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेल, नैसर्गिक वायू (पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस) वगैरेंमध्ये होऊन गेलेले आहे. यंत्रयुगात ते जमीनीखालून बाहेर काढले जाऊ लागले आणि त्यांच्या ज्वलनातून निर्माण झालेला कर्बद्विप्राणील वायू हवेत मिसळत असल्यामुळे भूपृष्ठावरील कर्बाचे प्रमाण वाढत चालले आहे. ते शोषून घेऊन नव्या वनस्पतींमध्ये स्थिर करण्यासाठी प्रदीर्घ काळाचा अवधी लागेल. याचा विचार करून जे कारखाने अशा प्रकारे जगावर अधिक कर्बाचा बोजा टाकत आहेत त्यांनी कार्बन टॅक्स भरावा अशा प्रकारचे नियम पाश्चात्य देशात केले जात आहेत आणि इतर देशांनीसुध्दा ते करावे असा आग्रह धरत आहेत. उलट भारत आणि चीन यासारख्या देशांचे असे म्हणणे आहे की दर डोई उत्पादन किंवा विजेचा वापर यात ते पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूप मागे आहेत, त्यामुळे त्यांनी असे कर लावले तर ते विकासाला बाधा आणतील यामुळे ते मागेच पडत जातील. यामुळे ते असल्या तरतुदी मान्य करणार नाहीत. अशा प्रकारे यात राजकारण आले आहे आणि सर्वमान्य धोरणे निश्चित होऊन त्यांची अंमलबजावणी होऊ लागेपर्यंत पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम होत राहतील.

जमीनीवर होणारे परिणाम स्थानिक असल्यामुळे काही प्रमाणात त्या जमीनीच्या मालकालाच ते भोगावे लागतात. रासायनिक कीटकनाशके किंवा खतांमुळे जमीनीचा कस कमी झाला तर मालकाचे नुकसान होते, पण ती रसायने कृषीउत्पादनांमध्ये मिसळून ग्राहकांच्या पोटात जातात आणि त्यांच्या आरोग्याला अपाय करतात. शिवाय ही रासायनिक द्रव्ये तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यांमुळे प्रदूषण होते, ऊर्जा खर्च होते वगैरे दोष त्यात आहेत. पण या द्रव्यांमुळे शेतकऱ्याला थेट होणारा तात्कालिक लाभ अधिक आकर्षक असल्यामुळे त्यांच्याविरुध्द केलेली प्रचारमोहीम परिणामकारक ठरत नाही. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरावी यावर पर्यावरणवाद्यांचा भर आहे. याबाबतीत अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

पाण्याचे प्रदूषण ही भारतात अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. गंगेसारख्या एके काळी स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी प्रसिध्द असलेल्या नदीला आता गटाराचे रूप आले आहे. ज्या काळात लोकवस्ती कमी होती आणि नदीत भरपूर पाणी असायचे त्या काळात गावोगावच्या ओढ्यानाल्यामधून नदीत येऊन पडणारा सेंद्रीय कचरा जलचरांकडूनच नैसर्गिक मार्गाने नष्ट केला जात असे. आता कचरा अपरंपार वाढत आहे, त्यात विषारी रसायने टाकली जात आहेत आणि जलचर जीवच नष्ट होत चालले आहेत. जनजागृती तसेच तंत्रज्ञान या दोन्ही आघाड्यांवर नेटाने प्रयत्न केल्यानेच हा प्रश्न आटोक्यात आणणे शक्य आहे. तसे नाही झाले तर त्यापासून होत असलेले दुष्परिणाम वाढतच जातील.

. . . . . . . . .. . . . . . .

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ५, अंतिम)

"हरित अर्थकारण, तुम्ही त्त्यात आहात का ?" (Green Economy: Does it include you?) हा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिवसाचा मुख्य विषय आहे. 'हरित आर्थिक व्यवस्था' म्हणजे काय आणि तुम्ही त्यासाठी काय करायचे आहे याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनोच्या) कार्यक्रमानुसार पर्यावरणाला कमीत कमी हानी व धोका पोचवत समस्त मानवजातीचा उध्दार करणे आणि त्यांच्यामधील सामाजिक सामंजस्य वाढवणे असा काहीसा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास पर्यावरणाच्या प्रदूषणाला आळा घालायचा, निसर्गातली जैवविविधता राखायची, ऊर्जेची बचत करायची आणि हे सांभाळून अधिकाधिक जनतेसाठी उत्पन्नाची साधने निर्माण करायची. यासाठी अनुकूल अशी सरकारी धोरणे असायला हवीत आणि त्यासाठी सरकारच्या खजिन्यामधून निधी उपलब्ध करायचा हे आहेच, पण पुरेसे नाही. तुम्ही आम्ही सर्वांनी या कार्याला सक्रिय पाठिंबा द्यायला हवा. हे काम निरनिराळ्या आघाड्यांवर करू शकतो आणि करायला पाहिजे. त्यांची वर्गवारी खाली दिल्याप्रमाणे केली आहे.

१. इमारतींचे बांधकाम -
२. मासेमारी
३. वनसंरक्षण
४. वाहतूक
५. जलव्यवस्थापन
६. कृषि
७. ऊर्जा
८. पर्यटन
९. कचऱ्याची विल्हेवाट
१०. कारखानदारी

प्रत्येक आघाडीवर काय काय करावे याबद्दल मार्गदर्शन केलेले असले तरी त्यात काही समान सूत्रे आहेत. कोठलेही काम करण्यासाठी संसाधनांची तसेच ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच ती ऊर्जा मिळवण्यासाठी संसाधनांची गरज असते. कमीत कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त लाभ मिळवावा (कार्यक्षमता वाढवावी), संसाधने आणि ऊर्जा यांच्या वापरात बचत करावी, काहीही वाया जाऊ देऊ नये, कचऱ्याचा शक्यतोवर पुनर्वापर (रिसायकलिंग) करावा. वगैरे वगैरे गोष्टी वरील प्रत्येक क्षेत्रात निरनिराळ्या उदाहरणाने दिल्या आहेत. मी लहान असतांना माझी आई नेमक्या याच गोष्टी आमच्या कानीकपाळी ओरडून सांगत होती. याशिवाय ऊन, पाऊस, वारा वगैरे जी नैसर्गिक संसाधने आपल्याला मिळत राहतात, त्यांच्या उपयोगावर भर द्यावा. भूमिगत खनिज पदार्थांचा साठा संपून जाऊ नये, तसेच आज पृथ्वीवर वावरणारे पशुपक्षी व वनस्पती नामशेष होऊ नयेत यासाठी त्यांच्याकडे मुद्दाम लक्ष पुरवायला हवे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास काटकसर करा आणि निसर्गाकडे वळा.



. . . . . . . . . . . . (समाप्त)

No comments: