Saturday, May 03, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ४)

महर्षी चरक, सुश्रुत व पतंजली हे भारतीय शास्त्रज्ञ, आर्यभट, भास्कराचार्यादी इतर भारतीय शास्त्रज्ञ आणि कोपरनिकस, न्यूटन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञ यांत मी भेदभाव करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकाच फूटपट्टीने त्यांची थोरवी मोजता येणार नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत ज्या प्रकारे पोचले आहे त्यात महत्वपूर्ण फरक आहे.

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे चरक, शुश्रुत व पतंजली यांनी ज्या आयुर्वेद व योगशास्त्र या विषयांवर ग्रंथरचना केली आहे ती शास्त्रे गुरुशिष्य किंवा पितापुत्रपरंपरेतून पिढी दर पिढी पुढे येत आजपर्यंत पोचली आहेत. प्रत्येक पिढीत त्याचा रोगनिवारण आणि शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी उपयोग होत आला आहे. त्यातून मिळालेल्या अनुभवाने त्यातील सिध्दांत किंवा उपचार सिध्द झाले आहेत तसेच ही शास्त्रे समृध्द होत गेली आहेत.

आर्यभट, भास्कराचार्यादींचे ज्ञान त्यांच्या शिष्यांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत पोचले असे दिसत नाही. गांवागांवात जसे शास्त्री, पंडित, वैद्य असायचे तसे खगोलशास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात नाही. ज्योतिष सांगणारे विद्वान नवग्रहांच्या कुंडलीमधील भ्रमणावरून आपले जातक सांगत आले आहेत. सूर्यमालेची रचना, तारे, ग्रह आणि उपग्रह वगैरेंची माहिती आपल्याला या ज्योतिषांकडून मिळालेली नाही. ती माहिती
पाश्चात्य देशात झालेल्या संशोधनावरून आपण शिकलो आहोत. आर्यभट, भास्कराचार्यादी शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ वेगळ्याने प्रकाशात आले. भाषा किंवा वाङ्मयाचा अभ्यास करणा-या विद्वानांनी ते वाचले असावेत. खगोलशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्यातले ज्ञान आल्यासारखे दिसत नाही. त्यात नेमके काय काय लिहिले आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेले नाही. त्यावर तज्ञ खगोलशास्त्रज्ञांनी साधक बाधक चर्चा घडवून आणली, कोणी त्यांचे समर्थन केले, कोणी विरोध केला, कोणी शंका व्यक्त केल्या, कोणी त्यांचे निरसन केले वगैरे घडल्याचे निदान माझ्या ऐकिवात नाही. पश्चिमेकडून आलेले खगोलशास्त्र आज इतके पुढे गेले आहे की हजार वर्षांपूर्वी इतर कोणी काय लिहिले आणि त्यातले किती बरोबर आणि किती चुकीचे आहे वगैरे पहाण्यात आता कोणाला रस असणार नाही, कारण त्या शास्त्राच्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने या ग्रंथांची उपयुक्तता राहिलेली नाही.

कोपर्निकस, गॅलीलिओ वगैरेंची गोष्ट त्याहून वेगळी आहे. या लोकांनी जे संशोधनकार्य केले त्याला त्यांच्या हयातीत विरोधच झाला होता. पण कांही उत्साही वैज्ञानिकांना त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळले. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यात ज्या त्रुटी आढळल्या त्या भरून काढल्या, ज्या चुका दिसल्या त्या सुधारल्या आणि त्या ज्ञानात आपली मोलाची भर टाकली. अशा प्रकारे आधुनिक खगोलशास्त्राचा विकास होत गेला. त्यात एक सातत्य असल्यामुळे जुन्या शास्त्रज्ञांनी केलेले बरेचसे कार्य मूळ स्वरूपात जगाला उपलब्ध होत गेले. तसेच त्यावर भरपूर चर्चा झाली, त्याची छाननी, विश्लेषण वगैरे होऊन ते सुसंगत स्वरूपात मांडले गेले आणि सुलभपणे मिळू शकते. त्यामुळे त्याबद्दल जेवढी सखोल आणि सलग माहिती मिळते त्या मानाने प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल कमी आणि तुटक स्वरूपाची माहिती असते. त्या दोघांची तुलना करून जे एकाने सांगितले तेच दुस-याने सांगितले होते की कांही वेगळे मांडले होते ते समजत नाही. तशी तुलना न करणेच माझ्या मते इष्ट आहे.

भारतीय शास्त्रज्ञ अंधारात कां राहिले याच्या मागे एक वेगळेच कारण असावे असा माझा अंदाज आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून चालत आलेला एक समज आहे. त्याप्रमाणे जगातील सर्व ज्ञानाचा उगम ब्रह्म्यापासून झाला. त्याने ते ज्ञान आपल्या पुत्रांना दिले आणि त्यांच्या शिष्यवर्गामार्फत त्याचा प्रसार होत गेला. अशा प्रकारे सर्व ज्ञान अपौरुषेय स्वरूपाचे आहे. त्यात फेरफार करण्याचा अधिकार मर्त्य
मानवाला नाही. त्याला गुरूकडून जे ज्ञान प्राप्त होईल त्याचा त्याने उपयोग आणि प्रसार करावा. त्यात बदल किंवा वाढ करण्याच्या भरास पडू नये. अशा प्रकारच्या ज्ञानसंपादन व संवर्धनाच्या प्रक्रियेत कोणी नवा विचार मांडला तर तो स्वीकारला जाणे दुरापास्त होते कारण कोठल्याही गोष्टीवर निर्णय घेतांना जुना शास्त्राधार पाहिला जात असे. त्यामुळे आर्यभट व भास्कराचार्यासारख्यांनी त्या काळातल्या
समजुतींच्या विपरीत कांही सांगितले असले तरी इतरांनी ते मान्य केले जाण्याची शक्यता कमीच होती. कदाचित त्यांचे विचार त्यांच्या ग्रंथातच पडून राहिले असावेत. गुरूशिष्य किंवा वंशपरंपरेनुसार प्रसारित होणा-या ज्ञानभांडारात ते समाविष्ट झाले नसावेत असा आपला माझा तर्क आहे.

वेगवेगळी स्तोत्रे, पुराणे वगैरेंची रचना करणा-या ऋषींची व आचार्यांची नांवे त्यांच्या रचनांना ....कृत किंवा ...विरचित म्हणून जोडलेली आहेत. पाश्चिमात्य देशात गणित व विज्ञानातील प्रमेये, नियम, समीकरण, सूत्र वगैरेशी त्या त्या संशोधकांची नांवे जोडलेली आहेत. 'पायथॅगोरस थीरम', 'आर्किमिडीज प्रिन्सिपल', 'न्यूटन्स लॉज' वगैरे शेकड्यांनी उदाहरणे देता येतील. गेल्या शतकात ज्या भारतीय
वैज्ञानिकांनी बहुमूल्य संशोधन केले त्यांनासुध्दा 'रामन इफेक्ट', 'चंद्रशेखर नंबर' वगैरे नामकरणातून अमरत्व प्राप्त झाले आहे. प्राचीन भारतात अशी प्रथा नसावी कारण "मी अमूक शोध लावला अशी प्रौढी कोणी मारत नसे" किंवा "त्याने हे सर्वात आधी सांगितले" असे श्रेय त्याला दिले जात नसेल. त्यामुळे विनयामुळे किंवा आकसामुळे पूर्वीच्या शास्त्रज्ञांची नांवे त्यांनी केलेल्या योगदानासह कुठल्या
ताम्रपटावर किंवा शिलालेखावर खोदून ठेवली गेली नसावीत. . . . . . . . . . . . (क्रमशः)

4 comments:

प्रशांत said...

तुमचे विचार पटतात.

पूर्वीच्या भारतीय शास्त्रज्ञांनी कदाचित सखोल अभ्यास केला असेलही. पण पुरावा नसताना व त्या शास्त्रांबद्दल फारसं ज्ञान नसतानाही लोक त्यावर भाष्य करतात हे केवळ भारतात घडते. समर्थ

रामदासस्वामींनी म्हटलंय -
आपली आपण करी स्तुती| स्वदेशी भोगे विपत्ती| सांगे वडिलांची कीर्ती| तो एक मूर्ख||
(संदर्भ - समर्थ रामदास, मूर्खलक्षणे)

एरवी धार्मिक गोष्टींचा ढोल वाजवणारे लोक सत्य तपासण्याची वेळ आल्यावर वरील ओळी सोयीस्करपणे विसरतात. त्यात, प्रत्येकाला राममंदीर बांधायचे किंवा नाही या वादातच रस आहे. रामासाठी मात्र, कुणालाच वेळ नाहीये हे रामाचं दुर्दैव. एकंदरीत काय? स्वाभिमानाच्या नावांखाली अहंकारपूजा करण्याची प्रथा असल्यामुळे एखादी गोष्ट खटकणारी असली, तरी पूर्वीच्या लोकांबद्दल बोलण्याची सोय नाही.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

वराहमिहिर याच्या नावाने सूर्यसिद्धांत ओळखला जातो. त्याने काय सिद्धांत मांडला होता ते मला माहीत नाही. हा एक अपवादच म्हणावा लागेल.

Anonymous said...

श्री. फडणीस लिहितात --- वराहमिहिर याच्या नावाने सूर्यसिद्धांत ओळखला जातो. त्याने काय सिद्धांत मांडला होता ते मला माहीत नाही.
याबद्दल अल्पसे मी पुढील भागात लिहिणार आहे.

हा एक अपवादच म्हणावा लागेल.

या वाक्याचा रोख समजला नाही. भारतीय शास्त्रज्ञांनी सिध्दांत मांडलेच नव्हते अशी माझी भूमिका नाही. त्यांनी मांडलेले सिध्दांत व पाश्चात्य संशोधकांनी नंतरच्या काळात मांडलेले सिध्दांत यांची तुलना किंवा गल्लत करू नये त्यांकडे वेगवेगळ्या दृष्टीने पहावे असे मला वाटते.

श्री मनोहर यांचे आभार.

Madhusudhan said...

सैद्धांतिक काही आपले त्याकाळी न्हवतेच .