Wednesday, December 25, 2013

२०१३ च्या नवलकथा - अॅप्स आणि आप, सचिन, खजिना

१.अॅप्स आणि आप



इसवी सन २०१३ आता शेवटच्या आठवड्यात आले आहे. "नेमेचि येतो बघ पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा" या उक्तीप्रमाणे गेल्या वर्षातसुद्धा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा येऊन गेले आणि आता पुन्हा थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. इतर वर्षांत होऊन जातात त्यासारख्या इतर सर्वसामान्य घटना घडून गेल्याच, त्यातल्या काही सुखद आणि काही दुःखद होत्या. उत्तराखंडामध्ये आलेला प्रलयंकारी महापूर ही नैसर्गिक आपत्ती आणि सिंधूरक्षक  या पाणबुडीवर झालेला भयानक अपघात या अत्यंत दुर्दैवी घटना घडून गेल्या. अशा प्रकारच्या घटना अधून मधून जगात कुठे ना कुठे घडत असतात, पण त्या दूरदेशी घडल्या तर आपल्याला त्यांची तीव्रता जाणवत नाही. विस्तवाचा चटका त्याच्या जवळ असलेल्याला अत्यंत दाहक असतो पण जसजसे दूर जाऊ तसतशी त्याची दाहकता कमी होते. याचप्रमाणे अशा घटना ज्या भागात घडतात किंवा ज्या लोकांचा त्यांच्याशी  निकटचा संबंध असतो त्यांना त्या सुन्न करून सोडतात, त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात. इतरांना काही काळ वेदना, दुःख, हळहळ वगैरे वाटते आणि हळूहळू शांत होते. या वर्षात आपल्या देशाच्या किंवा देशवासीयांच्या दृष्टीने पाहता काही चांगल्या घटनासुद्धा घडल्या, पण त्या घटना सहसा क्षणार्धात घडत नाहीत. कित्येक दिवस, महिने, वर्षे चिकाटीने मेहनत केल्यानंतर एकादा टप्पा गाठल्याचा तो आनंद असतो. एकाद्या पर्वतशिखरावर चढून जाण्यासाठी खूप कष्ट आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मिळाले तर त्याचे फलित मिळते, पण कुठेतरी पाय घसरून कडेलोट झाला तर त्याला एक क्षण पुरेसा असतो. तसेच हे आहे. गेल्या वर्षातल्या सगळ्याच मुख्य  घटनांची खूप चर्चा होऊन गेलेली आहे आणि या आठवड्यात त्यांची उजळणी होईल.

या भागात मला काही नवलकथांबद्दल सांगायचे आहे. निदान मला तरी ज्याची यत्किंचित अपेक्षा किंवा कल्पनासुद्धा नव्हती अशा काही नव्या गोष्टी या वर्षी समोर आल्या आणि त्यांच्या अनपेक्षित आगमनामुळे मला त्यांचे नवल वाटावे असे काही बाबतीत घडले. मराठीत अआइई प्रमाणे किंवा इंग्रजीत एबीसीडी कसेही पाहिले तरी 'अॅप्स' आणि 'आप' यांचाच अव्वल नंबर लागेल म्हणून आधी त्याच घेऊ. त्यातल्या अॅप्सने मोबाईल फोन्सच्या जगात विजयी घोडदौड केली आणि एकाद्या धूमकेतूसारखा आप पक्ष उदयाला आला आणि त्याने राजकीय क्षेत्रात हलकल्लोळ माजवला.

खिशात बाळगण्याजोगा पिटुकला सेलफोन किंवा मोबाइल बाजारात आला आणि त्याने माणसांचे जीवनच बदलून टाकले. तुम्ही घरी, ऑफिसात, बाजारात, प्रवासात कुठेही असला तरी तिथून कोणाशीही बोलणे शक्य झाले आणि नोकियाच्या जुन्या काळातल्या जाहिरातीप्रमाणे दिवसाचे चोवीस तास सतत 'कनेक्टेड' राहिला. साध्या परंपरागत टेलिफोनमधून फक्त बोलणे शक्य होते, त्याच्या पन्नास वर्षांनंतर आलेल्या टेलेक्समधून मजकूर (टेक्स्ट) पाठवणे सुरू झाले. आणखी वीस पंचवीस वर्षांनंतर फॅक्स करून चित्रे पाठवली जाऊ लागली. पण फॅक्सचे आयुष्यमान जास्त नव्हते कारण ते पूर्णपणे रुळायच्या आधी त्याच्या पाठोपाठ आलेल्या ई मेलने त्याला हद्दपार केले. टेलिफोन, टेलेक्स आणि फॅक्स यांचेसाठी वेगवेगळी यंत्रे लागत असत. पण काँप्यूटर आणि इंटरनेट आल्यानंतर ध्वनि, मजकूर आणि चित्रे या सर्वांना ई मेलमधून इकडून तिकडे पाठवण्यासाठी एकच यंत्र पुरेसे झाले आणि तेसुद्धा आपल्या घरी बसून करता येऊ लागले. हे बदल होण्यासाठी जवळजवळ शंभर वर्षांचा काळ लागला होता. पण मोबाईल फोनने मात्र आल्या आल्या काही वर्षांमध्ये हे सगळे आपल्यात सामावून घेतले.

सुरुवातीला आपल्या शहरात, मग देशभर असे करत करत काही वर्षांमध्येच मोबाईल फोनवरून जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही माणसाशी मनात येईल त्या क्षणी बोलणे शक्य झालेच. त्याच्या जोडीला या सेलफोनवरून लिखित मजकूर (टेक्स्ट मेसेज) पाठवता येऊ लागला. त्यातही सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषा असायची, नंतर मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीमध्येसुद्धा लिहिणे वाचणे शक्य झाले. मोबाईलला कॅमेरा जोडला गेला आणि मनात आल्या आल्या त्या क्षणी छायाचित्रे काढून ठेवता आली. त्यानंतर ध्वनि आणि अक्षरे एवढ्यावर न थांबता त्यांनाही इकडून तिकडे पाठवता येऊ लागले. आणखी प्रगती होऊन हालचाली आणि हावभावांसह चालती बोलती चित्रे (व्हीडिओ क्लिप्स) घेऊन पाठवता येऊ लागली. या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे ध्वनि, चित्रे आणि अक्षरे यांचे डिजिटल सिग्नल्समध्ये आणि त्याच्या उलट परिवर्नत करणे याच्या मागे असलेले सायन्स चांगल्या प्रकारे समजले होते आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करून ते काम करून घेण्यात यश आले होते. यामुळे तीन मोठ्या आणि महाग यंत्रांऐवजी एका पिटुकला मोबाईल फोनमधून हे सगळे होऊ लागले होते.

काँप्यूटरमध्ये एक शक्तीशाली आणि वेगवान प्रोसेसर (सीपीयू नावाचा त्याचा मुख्य भाग) असतो तो निरनिराळी असंख्य कामे चुटकीसरशी करू शकतो. ती कामे करण्यासाठी सिस्टम सॉफ्टवेअर असते, पण त्या प्रोसेसरला विशिष्ट काम सांगून त्याचेकडून ते करवून घेण्यासाठी अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले जातात. मोटार कार चालवणा-या माणसाला ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचे ज्ञान असण्याची गरज नसते त्याप्रमाणेच काँप्यूटरचा वापर करणा-या सर्वसामान्य माणसाला या सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती असण्याची गरज नसते इतके ते आता यूजर फ्रेँडली झाले आहे. स्क्रीनवर दिसणा-या सूचना वाचून आपल्या आपण कोणीही माऊस व कीबोर्डद्वारा आपले काम करून घेऊ शकतो.

या काँप्यूटर्सचा एक लहान भाऊ मायक्रोप्रोसेसर त्यातली काही कामे करू शकतो. तो आकाराने लहान अलतो आणि त्याला दिलेल्या कामांना जास्त वीज लागत नाही. अशा मायक्रोप्रोसेसरची चिप मोबाईल फोनमध्ये बसवली जाते. त्याच्या वापरासाठी जे खास अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले जाते त्याला अॅप्स असे म्हणतात. ही अॅप्स तयार व्हायला ३-४ वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती, पण त्यांचा उपयोग करता येण्याजोगे स्मार्ट मोबाईल फोन्स आणि त्यांच्यासाठी संदेशवहन करण्यासाठी आवश्यक असलेली थ्री जी सेवा सामान्य लोकांच्या आटोक्यात यायला वेळ लागला.  मी जरी अद्याप तिचा लाभ घेऊ शकलो नसलो तरी माझ्या परिचयाच्या काही लोकांकडे मला हा मोबाइल पहायला मिळाला तो या वर्षीच.

ध्वनि, चित्रे आणि अक्षरे यांची देवाण घेवाण करणे ही वर दिलेली कामे हा एक भाग झाला. यामध्ये कोणीतरी ही माहिती गोळा करून पाठवणारा असतो आणि दुसरा कोणी ती घेणारा असतो. याखेरीज अनेक कामे या अॅप्समधून करता येणे शक्य आहे. त्यातली मुख्य म्हणजे माहिती मिळवणे. यात ती देणारा कोणी हजर असण्याची आवश्यकता नसते. आधी कोणी ती माहिती जमा करून ठेवलेली असली तर ती शोधून उचलून घेता येते. दुसरे म्हणजे प्रवासासाठी किंवा सिनेमाची तिकीटे काढणे यावरून करता येते. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कवर हवे तेंव्हा जाता येते, यूट्यूबवरील गाणी पाहता आणि ऐकता येतात, मोबाईलवर अंगठा फिरवून एकाद्या ठिकाणचा पत्ता शोधता येतो इतकेच नव्हे तर जीपीएसच्या सहाय्याने तिथे कसे जाऊन पोचायचे हेसुद्धा समजते. बँकेमधल्या आपल्या खात्याचा हिशोब पाहता येतो आणि त्या खात्यामधून बिले भरता येतात. अॅप्सच्या आधारांनी काय काय करता येते याबद्दल ऐकावे तेवढे नवलच वाटते. अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यामधला राक्षस येऊन सांगेल ते काम क्षणार्धात करायचा असे सुरस कथांमध्ये वाचले होते. मोबाईलवरील अॅप्स हे त्याचेच नवे अवतार वाटतात. यातले काही अॅप्स विकत घ्यावे लागतात तर काही फुकट मिळतात. व्हॉट्सअॅप हे आता यात इतके लोकप्रिय झाले आहे की त्यामुळे फेसबुकवर कमी गर्दी होऊ लागली आहे. नव्या पिढीतली मंडळी प्रत्यक्षात कधी भेटतात आणि बोलतात की नाही? त्यांचे सगळे बोलणे व्हॉट्सअॅपवर चॅट करतांनाच संपून तर जात नसेल ना? असे वाटायला लागले आहे.


भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपाल विधेयक आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केले होते तेंव्हा त्यांच्या सभोवती जमा झालेल्या मंडळींमध्ये अरविंद केजरीवाल हे नाव पहिल्यांदा ऐकले. त्यानंतर त्यांच्यासंबंधी उलटसुलट बातम्या येत गेल्या. ते व्यक्तिशः अण्णांपासून आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या मार्गापासून दूर जात असल्याचेही सांगितले जात होते. या वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर ते अचानकपणे प्रकट झाले आणि गेले काही महिने सतत प्रकाशझोतामध्ये राहिले. आम आदमी पार्टी (आप) या नावाचा एक नवा पक्ष त्यांनी स्थापन केला. दिल्लीच्या राज्यावर आळीपाळीने ताबा मिळवलेल्या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पातळीवरील पक्षांवर घणाघाती प्रहार केले, त्यात त्यांनी काही वेळा राणा भीमदेवी वक्तव्ये केली, काही वेळा विनम्रतेची पराकाष्ठा केली, काही अवाच्या सव्वा आश्वासने दिली, दिल्लीमधल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये सभा, मेळावे वगैरे घेतले. या सर्वांमध्ये ते आश्चर्य वाटावे इतक्या आत्मविश्वासाने वावरत होते आणि गर्दी खेचत होते. तरीसुद्धा मनसेप्रमाणे त्यांचीही कामगिरी मतांची विभागणी करण्याइतपतच होईल अशा अटकळी बहुतेक पंडितांनी बांधल्या होत्या. 

त्या सगळ्यांना खोटे पाडत त्यांच्या पक्षाने ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला. दिल्लीमध्ये अत्यंत लोकप्रिय समजल्या जाणा-या भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनासुद्धा आम आदमीकडून पराभूत होण्याची वेळ आली. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलासुद्धा बहुमत मिळाले नाही. त्यामुळे दुस-या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पक्षाला त्याने लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत सत्तेवर येण्याचीसुद्धा संधी मिळणार आहे. आता तिचा लाभ कशा प्रकारे आणि किती घ्यायचा किंवा घेता येईल हे मुख्यतः अरविंद केजरीवाल यांच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. पक्षाची पुढील धोरणे आणि त्यावर होणारी अंमलबजावणी यांच्या आधाराशिवाय मुत्सद्दीपणाची खूप गरज पडणार आहे. पुढे जे होईल ते होईल आम आदमी पक्षाने (आपने) इथवर जी मजल मारली त्याचेच नवल वाटते.    
-------------------------------------------------------------------------------------------

२. सचिनचा संन्यास

तीन चार दशकांपूर्वीचे भारतातले क्रिकेट खूप वेगळे होते. ट्वेंटी ट्वेंटी, फिफ्टी फिफ्टी, ओ़डीआय वगैरेसारखे झटपट प्रकार आलेले नव्हते. पाच पाच दिवस रेंगाळणारे कसोटी सामने बहुधा अनिर्णितच रहायचे आणि जे कोणी महाभाग कंटाळवाणे वाटेल इतक्या चिवटपणे खेळून नाबाद रहात, त्यांना ती मॅच अनिर्णित ठेवण्यात 'यशस्वी' झाल्याचे श्रेय मिळायचे, त्यांचे तोंडभर कौतुकसुद्धा होत असे. गोलंदाज हा जीवघेण्या शस्त्रास्त्रांनी हल्ला करणारा कोणी महाभयंकर राक्षस असतो असे भासवले जात असे आणि त्याच्या तडाख्यापासून स्वतःचा फक्त बचाव करून घेण्यात फलंदाज स्वतःला धन्य मानत असत. यष्टीच्या (स्टंप्सच्या) डाव्याउजव्या बाजूने जाणारे चेंडू ओळखून सोडून देण्याला "वेल् लेफ्ट" असे म्हणत आणि यष्टीवर किंवा त्याच्या आसपास येणारा चेंडू बॅटने नुसता अडवला तरी त्याला "वेल प्लेड" म्हणत. त्यात कसले डोंबलाचे 'चांगले खेळणे' असते हे मला समजत नव्हते. फरुख इंजिनियर, पतौडीचे नवाब आणि काही प्रमाणात सुनील गावस्कर वगैरेंनी यात थोडा बदल घडवून आणायला सुरुवात केली असली तरी दिसभराच्या रटाळ खेळात दोन अडीचशे धांवांच्या पलीकडे सहसा मजल मारली जात नसे. अशा त्या काळात शारदाश्रम नावाच्या शाळेतल्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी नावाच्या दोन मुलांनी एकाच दिवसात धबाधब तीनतीनशे धावा काढून ६६४ धावांचा प्रचंड पहाड रचला ही बातमी वाचून सगळ्यांनी आश्चर्यमिश्रित कौतुकाने तोंडात बोटे घातली होती. मैदानांवरील सचिनच्या अशा प्रकारच्या महापराक्रमांची दखल त्या काळातल्या निवड समित्यांनीसुद्धा लगेच घेतली आणि अवघ्या १५ वर्षाच्या या मुलाची मुंबई संघासाठी आणि १६ वर्षाचा असतांना भारताच्या संघासाठीसुद्धा निवड झाली.

भारताच्या संघात गेल्यानंतरही तो अप्रतिम कामगिरी करत राहिला आणि कायमची जागा पटकावून बसला. फलंदाजीमधले सगळे विक्रम एका पाठोपाठ एक करत मोडीत काढून त्याने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. माझा हा ब्लॉग क्रीडाविश्वापासून नेहमी दूरच राहिला आहे, पण सचिनचे पराक्रम पाहून मलासुध्दा 'विक्रमवीर रेकॉर्डकर' असा लेख लिहिण्याचा मोह झाला. सचिनच्या कामगिरीबद्दल आतापर्यंत अमाप लिहिले गेले आहे आणि मला त्यात आणखी कणभरही भर घालायला जागा उरली आहे असे मला वाटत नाही. खरे तर क्रिकेटमधले मला काहीच कळतही नाही. डॉन ब्रॅडमननंतर जगभरात फक्त सचिन तेंडुलकरच इतका श्रेष्ठ फलंदाज का झाला? इतरांहून वेगळे असे कोणते कौशल्य त्याच्याकडे होते? किंवा इतर कोणीही सचिनसारखे का खेळू शकत नव्हता? गुरुवर्य श्री.आचरेकर आणि वडील बंधू अशा ज्या दोघांनी त्याला घडवले असे सचिन नेहमी मुलाखतींमध्ये सांगत असतो त्यांना स्वतःला तसे चांगले का खेळता आले नाही? सचिन खूप चांगले खेळत होताच, पण आज विराट कोहली आणि शिखर धवन जितके तडाखेबाज खेळतांना दिसतात तसा त्याचा खेळ का होत नव्हता? मनात उठलेल्या अशा प्रकारच्या प्रश्नांना मला स्वतःलाच समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत.

सचिनकडे जी कोणती जादू होती त्याच्या आधाराने तो वर्षानुवर्षे क्रिकेट खेळत राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने स्वतःच स्थापित केलेले सगळे रेकॉर्ड्स मोडून तो नवनवे विक्रम नोंदवत होताच, ट्वेंटी ट्वेंटी, फिफ्टी फिफ्टी, ओ़डीआय यांच्यासारख्या खेळाच्या झटपट प्रकारांमध्येसुद्धा त्याने प्राविण्य मिळवून त्या प्रकारांमध्येसुद्धा तो विक्रम करू लागला. त्याच्याबरोबर किंवा त्याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये आलेल्या इतर अनेक फलंदाजांना संघातून वगळले गेले किंवा ते स्वतःहून निवृत्त झाले तरी सचिन खेळतच होता आणि चांगले खेळत होता. तो फक्त पंधरासोळा वर्षाचा असतांना त्याची निवड करण्याचे धाडस त्या काळातील निवडसमित्यांच्या सदस्यांनी केले होते, पण तो चाळिशीच्या जवळ पोचला तरी त्याला संघामधून वगळण्याचे धैर्य मात्र कोणापाशी नव्हते. कारण आम जनता त्याचे कौतुक करता करता केंव्हा त्याचा उदोउदो आणि जयजयकार करायला लागली होती ते समजलेच नाही. काही लोकांनी तर त्याची एकाद्या देवासारखी पूजा आणि आरतीसुद्धा करायचे बाकी ठेवले नव्हते. वयाने सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याने केलेल्या विक्रमाच्या जोडीला वयाने सर्वात मोठा आणि सलग जास्तीत जास्त वर्षे खेळत राहिलेला खेळाडू असे आणखी काही विक्रम करेपर्यंत तो वाट पाहणार आहे का? असे वाटायला लागले होते. "सचिनलाच आणखी किती वर्षे निवडणार आहात?" असा प्रश्न कोणी निवडसमितीला विचारत नसला तरी "तुम्ही कधी निवृत्त होणार आहात? आणखी कोणते रेकॉर्ड्स मोडायचे शिल्लक राहिले आहेत?" असे काही लोक सचिनला विचारायला लागले होते. सचिनचे त्यावर ठराविक उत्तर असायचे, "मी कधीच विक्रम करण्याच्या उद्देशाने खेळलो नाही. मी फक्त मन लावून चांगले खेळायचा प्रयत्न केला आणि करत असतो. त्यातून आपोआप विक्रम होत असतात. मला संघात घ्यायचे की नाही ते सिलेक्टर्स माझा खेळ पाहून ठरवतात. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार?"

गेली तीन चार वर्षे असेच चालले होते. लोक सचिनला कंटाळलेले होते असे नाही, पण त्याच्या स्वतःच्याच पूर्वीच्या खेळाइतकी उंची तो कदाचित गाठू शकत नव्हता आणि स्वतःच्या प्रतिमेच्या तुलनेत कमी पडायला लागला होता. त्यामुळे आता त्याने स्वतःहून सूज्ञपणे बाजूला होऊन नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी द्यावी असे बरेच लोक कुजबुजायला लागले होते. या वर्षाच्या मध्याच्या सुमाराला नक्की काय झाले कोण जाणे, पण सचिनने निवृत्त होण्याचा मनोदय जाहीर केला. त्याला निरोप देण्याचा जंगी समारंभ करण्याचे ठरवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. जंगी जंगी म्हणजे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आखले गेले असेल किंवा करता येऊ शकेल असे मात्र मला वाटले नव्हते. यामुळे माझ्या दृष्टीने ही एक नवलकथाच ठरते.

तोपर्यंत सचिन १९८ कसोटी सामने खेळला होता, त्याचा अखेरचा सामना २००वा असावा, म्हणजे सामन्यांची डबलसेंच्युरी होईल असे ठरले. त्याच्या आईला जास्त कष्ट न घेता हा खेळ पहायला मिळावा तसेच ज्या मुंबईकरांचा तो अत्यंत लाडका होता त्यांनाही त्याला खेळतांना पहायची अखेरची संधी मिळावी म्हणून हा सामना त्याच्या आवडत्या मुंबईतच व्हावा असेही ठरवले गेले. भारतासकट जगातल्या अनेक देशांच्या क्रिकेटच्या संघांच्या दौ-यांची वेळापत्रके खूप आधीपासून ठरलेली असतात. त्यातून थोडीशी सवड काढून वेस्ट इंडीजच्या संघाला फक्त दोन टेस्ट मॅचेस खेळण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. ते सामने गर्दीसाठी प्रसिद्ध असलेले कोलकाता आणि मुंबई इथेच खेळवले गेले. ते दोन देशांच्या संघामधले चुरशीचे  सामने आहेत आणि ते जिंकणे दोन्ही संघांना महत्वाचे वाटते असे त्या दोन्ही सामन्यांमध्ये एका क्षणासाठीदेखील वाटले नाही. तो  करमणुकीचा एकादा मोठा कार्यक्रम, सचिनच्या चाहत्यांचा मेळावा असावा असेच रूप त्यांना आले होते. "सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, " असा सारखा घोष चालला होता. मैदानावर इतर कोण काय करत आहेत याची कोणाला चिंता किंवा महत्वच वाटत नव्हते. सामना संपताच सचिनला अत्यंत भावपूर्ण निरोप देण्याचा समारंभ झाला. इतर कुठल्याच क्षेत्रातल्या कुठल्याच मोठ्या व्यक्तीला जीवंतपणी इतक्या थाटामाटाने निरोप दिला गेला नसेल.

या प्रसंगी जी भाषणबाजी आणि लिखाण झाले ते तर कल्पनेच्या पलीकडे जात होते. सचिन आता कसोटी सामने खेळायचे थांबवणार आहे की सदेह समाधी घ्यायला निघाला आहे असा संभ्रम तिथली रडारड पाहून पडायला लागला होता. "सचिनशिवाय आता भारताचे कसे होणार?" अशी कोणाला काळजी वाटायला लागली होती आणि "सचिन नाही म्हणजे आता क्रिकेटच उरले नाही." असे सूर लावलेले ऐकून त्यांला हसावे की रडावे ते समजेनासे झाले होते. त्या दिवशीचा एकंदर नूर पाहून मनात असा विचार आला की सर्वसंगपरित्याग करून संन्यास घ्यायला निघालेल्या माणसाची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक निघाली तर ते कसे दिसेल!

सचिनने आता कसोटी सामने किंवा अशा मोठ्या स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व करायचे थांबवले तरी तो काही नाहीसा होणार नाही किंवा दृष्टीआड जाणार नाही. त्याने जीवनामधून संन्यास घेतलेला नाही. क्रिकेटमध्ये खेळून मिळालेल्या पैशांवर तो जगत होता आणि आता ती मिळकत बंद झाल्यामुळे त्याचे हाल होणार असे नाही. त्याने याआधीच कोट्यावधी किंवा कदाचित अब्जावधी एवढी माया जमवून ठेवलेली आहे. खेळामधून भरपूर पैसे मिळवता येतात हेसुद्धा बहुधा सचिननेच पहिल्यांदा दाखवून दिले आणि ते आकडे गुप्त ठेवले असले तरी त्यातही बहुधा त्यानेच विक्रम केले असणार. सचिनला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी क्वचितच आणखी कोणा खेळाडूला मिळाली असेल. कदाचित सिनेस्टार्सनासुद्धा नसेल. त्याचा पूर्णाकृती पुतळासुद्धा लंडनच्या मादाम तुसाद म्यूजियममध्ये उभा आहे आणि प्रेक्षकांना त्याची आठवण देत असतो. कसोटी सामन्यातला शेवटच्या दिवसाचा खेळ खेळून झाल्यानंतर लगेचच त्याला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कारही जाहीर झाला. मानसन्मान, संपत्ती, प्रसिद्धी वगैरे सगळे काही त्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्राप्त झाले आहे.

सचिन तेंडुलकरने केलेल्या भाषणांमध्ये आणि वार्ताहरांशी बोलतांना पुन्हा पुन्हा हेच सांगितले की त्याने क्रिकेट या खेळालाही रामराम म्हंटलेले नाही. या ना त्या स्वरूपात तो हा खेळ खेळत राहील आणि तो जनतेसमोर येत राहणारच आहे. आता ते केंव्हा आणि नेमके कशा प्रकारे हे ही लवकरच समजेल.  सचिनने क्रिकेटविश्वाला आणि जनतेने सचिनला अलविदा करणे याचा हा सोहळा मात्र या वर्षातली एक नवलकथा होती.
-------------------------------------------------------------------------------------

३. भूमिगत खजिना

उत्तर प्रदेशात एक आटपाट नगर होतं, त्याचं नाव दौंडिया खेडा. तिथे एक राजा होता, त्याचं नाव राव रामबक्षसिंग. त्याच्या राज्यात सुखसमृद्धी नांदत असे. त्याचा मोठा राजवाडा होता, त्यात एक खजिना होता. तो सोन्यानाण्याने खच्चून भरला होता. एकदा काय झालं, १८५७ साल आलं, मेरठ आणि कानपूर वगैरे ठिकाणच्या इंग्रजांच्या छावण्यांमधल्या सैनिकांनी उठाव केला, पहिलं स्वातंत्र्ययुद्ध पुकारलं. त्यांना मनुष्यबळ आणि त्यांच्या खर्चासाठी पैसे, रसद वगैरेची गरज ती. ते गोळा करण्यासाठी ते स्वातंत्र्यसैनिक गावोगांवी फिरू लागले. इंग्रजांच्या दृष्टीने ते शिपायांचं बंड होतं, इंग्रजांनी त्या बंडखोर शिपायांना शोधायचं निमित्य केलं, त्यांच्या फौजा गावोगाव हिंडू लागल्या, अनन्वित अत्याचार आणि लुटालूट करायला लागल्या. इतर चोर, लुटारू आणि दरोडेखोरांचंही फावलं, तेही त्या अंदाधुंदीचा फायदा घ्यायला लागले. बिचारा राजा घाबरला, त्यानं काय केलं, खोल खड्डा खणून आपला खजिना जमीनीखाली लपवून ठेवला. पुढे स्वातंत्र्ययुद्ध संपलं. इंग्रजांच्या विजयी फौजा सूडबुद्धीनं सगळीकडे धूळधाण करत सुटल्या. आटपाट नगराचीही त्यांनी वाट लावली. खुद्द राजालाच पकडून सुळावर चढवून दिलं. राजाचा आत्मा त्या खजिन्यापाशी भरकटत राहिला आहे अशी अफवा पसरली.

इथपर्यंतची कहाणी थोडी विश्वास ठेवण्यालायक वाटते. आमच्या जमखंडीतसुद्धा असेच काही तरी घडले होते असे मी माझ्या लहानपणी ऐकले होते. उत्तर भारतात झालेल्या उठावाच्या बातम्या ऐकून तिथला संस्थानिक संभ्रमात पडला होता. हे युद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी जिंकले असते आणि सगळ्या इंग्रजांचा खातमा केला असता तर त्यांची नजर नक्कीच इंग्रजांना साथ देणा-या संस्थानिकांकडे वळली असती आणि त्यांचा बचाव करायला कोणीच वाली उरला नसता. त्यामुळे तिथला तत्कालिन राजा तळ्यात मळ्यात करत राहिला. पण उत्तरेतल्यासारखे दक्षिणेत काही झालेच नाही. राणी कित्तूर चन्नम्मासारखी एकादी ठिणगी पडली पण त्याचा वणवा व्हायच्या आधीच तिला निष्ठुरपणे विझवून टाकले गेले. उत्तर हिंदुस्थान पुन्हा आपल्या ताब्यात येताच इंग्रजांनी दक्षिणेकडेही लक्ष वळवले. त्यांच्या फौजा आता आपल्यावर चाल करून येणार हे तिथल्या सगळ्या हुषार राजांनी ओळखले. जमखंडीच्या राजाने त्याच्या खजिन्यातल्या काही मौल्यवान वस्तू रातोरात एका जुन्या पडक्या विहिरीत टाकल्या आणि तिला बुजवून वरती शंकराच्या पिंडीची स्थापना केली, तिच्यावर लगेच एक घुमटी उभारली आणि सभामंटप, गाभारा वगैरे बांधायला सुरुवात केली. हे कोणाला कळू नये म्हणून ज्यांनी हे काम केले त्या मजूरांनाही गाडून टाकले म्हणे, चेतसिंग नावाच्या एका उत्तर भारतीयाला पकडून बेबनावाचा सगळा आळ त्याच्यावर टाकला, त्याला सरळ गावाबाहेर नेऊन जाहीरपणे फासावर लटकावले आणि अशा प्रकारे इंग्रजांची मर्जी संपादन केली. अशी सगळी दंतकथा मी लहानपणी ऐकली होती. त्या चेतसिंगाची एक समाधी किंवा थडगेही त्या काळात गावाबाहेर होते आणि उमारामेश्वराचे जरी देवाचे देऊळ असले तरी त्याच्या आजूबाजूला रात्री भुते फिरतात अशी अफवा होती.

उत्तर प्रदेशातली ही कहाणी आता यासाठी आठवली कारण त्याचा पुढला भाग दीडशे वर्षांनंतर या वर्षी घडला. त्याचं काय झालं, शोभन सरकार नावाचा एक साधूपुरुष त्या गावाचा उद्धार करायला अवतरला. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमानकाळाचे त्रिकाळ ज्ञान तर आहेच, मनुष्य, देव आणि पिशाच या तीघांमध्ये तो लीलया वावरतो. हा धर्मात्मा स्वतः नेहमी कुठल्यातरी भलत्याच काळात आणि कुठल्यातरी इतर प्रकारच्या योनींमधल्या (देव, पिशाच, आत्मा वगैरें) लोकात वावरत असतो. तो मधूनच कधीतरी भूलोकात येतो आणि त्याच्या शिष्याला काही खुणा करतो. स्वामी ओमजी नावाचा हा पट्टशिष्य त्यातला अर्थ समजून इतरांना सांगतो. तर काय झालं, देशाच्या वाईट परिस्थितीमुळे त्या साधूचा आत्मा फार कष्टात पडला, त्यानं त्याच्या आध्यात्मिक गुरूचा धावा केला. त्या गुरूंनी त्या दिवंगत राजा राव रामबक्षसिंगाच्या आत्म्याला त्या साधूच्या स्वप्नात पाठवून दिलं. त्या आत्म्यानं सांगितलं, "मी गेली दीडशे वर्षं इथे घुटमळत राहिलो आहे, मला आता मुक्ती पाहिजे. मी अमूक जागी पुरून ठेवलेलं हजार टन सोनं बाहेर काढून दिलं तर या गावाचं, या राज्याचं, या देशाचं भलं होईल. त्याच्या माथ्यावर असलेलं सगळं कर्ज फिटून जाईल, सगळीकडे आबादीआबाद होईल. तर मी शांत होईन, मला मोक्ष मिळेल."

शोभन सरकारनं आपलं स्वप्न स्वामी ओमजीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगितलं. त्यात महंत नावाचा एक केंद्रातला मंत्रीही होता. या मंत्र्याचाही शोभन सरकारच्या खरेपणावर आणि अद्भुत दैवी सामर्थ्यावर पूर्ण विश्वास बसला होता. शिवाय त्यानं म्हणे असंही भविष्य सांगितलं होतं की निवडणुकांनंतर महंतला छत्तिसगडचे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. त्यात कसले विघ्न येऊ नये म्हणून त्यानं लगेच हालचालींना सुरुवात केली. पुरातत्व खात्याच्या माणसांची मोठी फौज त्या ठिकाणी उत्खनन करायला पाठवून दिली. या गोष्टीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सगळ्या वाहिन्यांचे वार्ताहर आणि फोटोग्राफर त्या ठिकाणी जाऊन पोचले. तिथल्या कामाचे लाइव्ह टेलिकास्ट होऊन जगभर ते दाखवले जाऊ लागले. आर्किऑलॉजी डिपार्टमेंटच्या लोकांना अवघड प्रश्न विचारायला लागले. "तुम्ही स्वप्नांवर विश्वास ठेवता का?", "याला किती खर्च येणार आहे?", "तो कोण करणार आहे?" तेसुद्धा मुरलेले सरकारी अधिकारी होते. त्यांनी नाना त-हेची यंत्रं बरोबर आणली होती. तिच्यावरून त्यांना समजलं म्हणे की जमीनीखाली अलोह (नॉनफेरस) धातूचे साठे दिसत आहेत. आता ते सोनं आहे की पितळ आहे की आणखी काही कोण जाणे. या जागी रामायण महाभारतकाळच्या पुरातन वस्त्यांचे अवशेषही कदाचित सापडतील असे धागे त्यांना मिळालेले आहेत. थोडक्यात म्हणजे "आम्ही काही अंधश्रद्ध नाही आहोत".

साधूबाबांनी आता आणखी काही कहाण्या रचल्या. हे हजार टन सोने म्हणजे मूळचे सोने मुळी नव्हतेच. त्याच्या गुरूंना चावलेल्या डासांनी त्याच्या शरीरातून जे रक्त बाहेर काढले त्यातल्या एकेका थेंबाचे रूपांतर म्हणे सोन्याच्या कणात झाले. आता किती गुरूंना किती डासांनी चावून हजार टन रक्त बाहेर काढले असले प्रश्न विचारणे म्हणजे त्यात आपल्या महान हिंदू धर्माचा अपमान होणार. त्यामुळे ते विचारायचे नसतात. हे सोने जरी सापडले तरी त्यासाठी शोभन सरकारची उपस्थिती हवीच कारण त्याला डावलले तर मग गुरूंची अवकृपा होणार आणि ते सोने पुन्हा मातीत मिसळून जाणार. शिवाय मिळालेल्या सोन्यातला वीस टक्के भाग गावाच्या विकासासाठी त्यालाच द्यायला हवा अशी अटही घातली होती. ती कोणी मान्य केली होती याबद्दल कोणी काही बोलत नव्हते.

हा सगळा तमाशा महिनाभर चालला आणि हळू हळू थंड झाला. या काळात काही मूर्ख लोकांनी तर तिथे आता खूप श्रीमंती येणार म्हणून दिल्ली आणि मुंबईमधल्या नोक-या सोडून गावाकडे धाव घेतली. काही लोकांनी तिथल्या आसपास जमीनी विकत घेतल्या. सगळ्या वाहिन्यांनी आपापला टीआरपी वाढवून घेतला आणि जाहिरातींमधून कमाई करून घेतली.

अशी ही या वर्षातली एक नवलकथा. असे काही होऊ शकेल यावरसुद्धा विश्वास बसत नाही. पण सत्य हे कल्पिताच्या पलीकडे असते असे म्हणतात त्याची प्रचीती आली.


No comments: