Tuesday, February 26, 2013

मराठी भाषा

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती। तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

सर्व भाषांमध्ये संस्कृत ही प्रमुख, गोड आणि दिव्य भाषा आहे असे या सुभाषिताच्या पहिल्या चरणात म्हंटले आहे. या भाषेत सुभाषितांसारखे मधुर आणि बोधप्रद श्लोकही आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्येही आहेत, वेद, उपनिषदे, स्तोत्रे वगैरे धार्मिक वाङ्मयही आहे आणि शाकुंतलासारखी उत्कृष्ट नाटकेही आहेत. या प्राचीन भाषेमधील शब्दांचे भांडार अपरिमित आहे आणि अर्थपूर्ण असे नवे शब्द तयार करण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे, मराठी किंवा हिंदीसारख्या तिच्या कन्यांना नवनवीन शब्दांचा पुरवठा संस्कृतमधून आजही होत असतो. उदाहरणार्थ काँप्यूटर आणि इंटरनेट या शब्दांसाठी काढलेले संगणक आणि आंतर्जाल हे प्रतिशब्द संस्कृतजन्यच आहेत. असे सगळे असले तरी किंबहुना त्यामुळेच ही महान भाषा शिकणे सोपे नाही. तिचा अभ्यास करण्यासाठी खूप चिकाटी आणि परिश्रम यांची गरज असते. त्यामुळेच संस्कृत ही शास्त्री, पंडित, विद्वान वगैरेंची भाषा वाटते. ती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. 

ही परिस्थिती आजचीच नाही तर आठशे वर्षांपूर्वीसुध्दा अशीच होती. व्याकरणाच्या नियमांनी बध्द अशी संस्कृत भाषा समाजातल्या मूठभर लोकांची मक्तेदारी झाली होती. संस्कृत भाषेमधल्या शब्दांचे अपभ्रंश होत गेले, त्यातले काही शब्द लुप्त झाले, इतर भाषांमधून काही शब्द घेतले गेले, अशा रीतीने त्यात बदल होत होत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराथी वगैरे अनेक निरनिराळ्या भाषा आणि त्यांची विविध रूपे भारताच्या निरनिराळ्या भागात निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या भाषेला मराठी असे नाव पडले होते.  "संस्कृत भाषा जनांसी कळेना, म्हणून नारायणा दया आली." आणि देवाजीनेच ज्ञानेश्वर अवतार घेऊन भगवद्गीतेचे मराठी भाषेत निरूपण केले. असे एका अभंगात म्हंटले आहे. ते महान कार्य करतांना ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृता पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन।" मराठी भाषेबद्दल ते लिहितात, "जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी, की परिमळामाजी कस्तुरी, तैसी भाषांमाजी साजिरी, मराठीया।" त्या काळात प्रचलित असलेल्या बोलीभाषेतून शब्दांची अचूक निवड करून संत ज्ञानेश्वरांनी उच्च दर्जाचे लेखन केले. त्यानंतरच्या काळात मराठी भाषेत आणखी बदल होतच गेले आणि सामाजिक वातावरणही बदलत गेल्यामुळे त्यांनी सोपी म्हणून लिहिलेली पण साजिरी अशी अलंकारिक मराठी भाषा आज आपल्याला नीट समजत नाही. आताच्या काळात ती समजण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या 'सार्थ' आवृत्या काढाव्या लागल्या. पण ते लेखन वाचण्यासाठी सुध्दा तशा प्रकारच्या वाचनाच्या सरावाची आवश्यकता असते आणि वाचकाने साक्षर आणि सुशिक्षित तर असायलाच हवे.

खेड्यांमधली काही जनता अजून निरक्षर आहे. माझ्या लहानपणी खेड्यांमध्ये शिक्षणाच्या सोयीच नसल्यामुळे बहुतेक सगळेच ग्रामीण लोक निरक्षर असायचे. तरीही ते आपसात भरपूर बोलत असत. त्यांच्या आजूबाजूच्या भागातली जमीन, डोंगर, नद्या, त्यातल्या वनस्पती, पशुपक्षी, माणसे, शेजारी पाजारी, आप्तेष्ट, मित्र, ते स्वतः याबद्दल त्यांना जे वाटत असेल, त्यांचे अनुभव, त्यांना वाटणारा आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, चिंता वगैरे सगळे ते लोकसुध्दा बोलण्यामधून व्यक्त करतच असत, आजही करतात. त्यांच्या वापरातले शब्द, वाक्यरचना वगैरे गोष्टी ते कोठल्याही शाळेत न जाताच आपल्या आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकून त्यातून शिकतात. त्यांच्या बोलीला कुठले नाव आहे किंवा नाही हेसुध्दा ते सांगू शकणार नाहीत आणि त्यातल्या प्रत्येक बोलीला वेगळे नाव असण्याची काही गरजही नाही. संभाषण अर्थपूर्ण होण्यासाठी एकाने सांगितले ते ऐकणा-या इतरांना समजले एवढेच पुरेसे आहे. पण त्या ऐकणा-यांनी ते सांगणे आणखी काही लोकांना सांगितले, त्यांनी आणखी कोणाला अशा प्रकारे ते पसरत गेल्यानंतर त्याचा अर्थ बदलू शकतो किंवा त्यातून चुकीचा अर्थ निघू शकतो. पण एका भागात रहाणारे लोक एकमेकांचे बोलणे ऐकून ते शिकतात आणि तसेच बोलतात यामुळे त्या भागात त्यातल्या शब्दांच्या अर्थाबद्दल सर्वसाधारणपणे सहमती असते. अशा प्रकारे बोली बनतात.

प्रत्यक्ष बोलण्याऐवजी काही लिहून ठेवायचे असेल आणि नंतर कधी तरी ते वाचतांना वाचकाला ते समजायचे असेल तर त्यासाठी काही नियमानुसार ते लिहिणे गरजेचे असते. वाचकाला काही समजलेच नाही तर तो मजकूर लिहून ठेवण्याचा काही उपयोग होणार नाही. यात आणखी एक मेख अशी आहे की लिहिणारे आणि वाचणारे सगळे लोक एकाच भागात आणि एकाच काळात रहाणारे असतीलच असे नाही. त्यामुळे हे नियम स्थळकाळानुसार शक्यतो बदलू नयेत. अशा प्रकारे शाश्वत प्रकारच्या काही नियमांनुसार केल्या गेलेल्या अभिव्यक्तीच्या या माध्यमालाच 'भाषा' असे नाव दिले गेले. त्याचा अभ्यास करणा-या विद्वान मंडळींच्या विचार विनिमयातून ठराविक नियमांचे पालन करून लिहिल्या जाणा-या 'प्रमाणभाषा' ठरवल्या गेल्या आणि मुद्रण, प्रकाशन वगैरे व्यवसाय सुरू झाल्यानंतर प्रकाशित होणारे सर्व वाङ्मय लेखकांनी त्यानुसार लिहावे असे ठरले गेले. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालत असते. मराठी नावाची अशीच एक प्रमाणभाषा शालेय शिक्षण देतांना सर्व विद्यार्थ्यांना शिकवली जाते आणि तिच्या माध्यमातून इतर सारे विषय शिकवले जातात. ही प्रमाणभाषा शिकलेले महाराष्ट्रात किंवा त्याच्या बाहेर, अगदी परदेशात रहात असलेले मराठी भाषिक लोक ते लेखन वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ शकतात.

असे असले तरी प्रत्यक्ष जीवनात संभाषण करतांना कोणालाही काही तरी सांगायचे किंवा विचारायचे असते आणि ते ऐकणा-याला कळावे हा उद्देश असतो. संभाषणामधले बोलणे व्याकरणशुध्द आहे की नाही, ते अलंकारिक आहे का वगैरे विचार करायला वेळ नसतो आणि त्या गोष्टींना महत्व नसते. तेंव्हा ही प्रमाणभाषा बाजूला ठेवून त्या भागात प्रचलित असलेली भाषा सगळे लोक बोलतात. सावंतवाडी, डहाणू, चंद्रपूर आणि सोलापूर या गावांमधले लोक एकमेकांशी निरनिराळ्या स्थानिक बोलींमध्ये बोलतात, शिवाय मुंबईपुण्यासारखी शहरे आणि लातूर किंवा सिंधूदुर्ग जिल्ह्यातले एकादे बुद्रुक किंवा खुर्द अशा ठिकाणी राहणा-या लोकांच्या बोलण्यात येणारे शब्द आणि त्यांचे उच्चार यात बराच फरक असतो. कथा, कादंब-या, नाटके, चित्रपट वगैरेंमध्ये प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब दाखवतांना निरनिराळ्या खेड्यातल्या किंवा शहरातल्या लोकांचे संवाद त्यांच्या बोलीमध्येच लिहिले किंवा बोलले जाऊ लागले. काही लेखकांनी ग्रामीण भाषेतच लिहायची शैली निवडली आणि वाचकांनाही ते आवडले. त्यातल्या बोलीभाषा प्रमाणभाषेपासून मात्र खूपच वेगळ्या असतात.

बोलतांना आपण बहुतेक वेळा कामापुरतेच बोलत असतो, पण लेखन करतांना त्यात लालित्य आणले जाते. ते वाचल्यामुळे वाचकाला आनंद मिळावा, स्फूर्ती मिळावी, त्याचे मनोरंजन व्हावे, त्याने थरार अनुभवावा, त्याच्या ज्ञानात भर पडावी, त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडावीत, त्याला सावध करावे, मार्गदर्शन मिळावे असे अनंत प्रकारचे उद्देश लेखकाच्या मनात असतात, त्याच्या कल्पनेच्या भरा-या त्याच्या लेखनात उतरतात आणि हे साध्य करण्यासाठी भाषा हे माध्यम जितके समृध्द असेल तितके ते लेखन प्रभावी ठरते आणि त्या लेखनातून ती भाषा अधिक समृध्द होते. साहित्यकृतींमधली ही मराठी भाषा रोजच्या बोलण्यापेक्षा किती तरी वेगळी असते.

मराठी भाषेतले असे इतके प्रकार दिसत असतांना यातली कोणतीही एक भाषा मराठी आहे असे म्हणता येणार नाही. आज जी प्रमाणभाषा मानली जाते तीच फक्त मराठी आहे असे म्हंटले तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी कवींनी इतिहासकाळामध्ये केलेल्या महान रचना कोणत्या भाषेत आहेत? आजच्या प्रमाणभाषेत (किंवा हा लेख जसा लिहिला आहे तसे) आपण एकमेकांशी कधी तरी बोलतो का?  "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।।"   असे लिहितांना कवीवर्य स्व.सुरेश भट यांना कोणती मराठी अभिप्रेत होती? ज्या कवीवर्य स्व.कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे दिवशी आपण हा जागतिक मराठी दिवस साजरा करत आहोत त्यांनी मराठी असे भाषेचे नाव न घेता लिहिले आहे, "माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी, जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे।"   मातीतून म्हणजेच या भूमीवरील माणसांच्या बोलण्यातून निघालेले स्वर आकाशातल्या परमेश्वराने लक्षपूर्वक ऐकावेत अशी प्रार्थना त्यांनी या गीतात केली आहे. मातीतून आलेले हे गायन कोणत्या मराठी भाषेतले असेल?

मला तरी असे वाटते की वर दिल्याप्रमाणे सर्व बोलींचा आणि विविध प्रकारच्या लेखनाचा मराठी भाषेमध्ये समावेश होतो. आईला कोणी माय म्हणेल, कोणी अम्मा, कोणी मम्मी, मॉम, तर कोणी आई असेच म्हंटले तरी सर्वांसाठी ती एकच असते. त्याप्रमाणे प्राचीन, आधुनिक, शहरी, ग्रामीण, संस्कृतप्रचुर, इंग्रजाळलेली, हिंदी, गुजराथी, कानडी शब्दांची फोडणी दिलेली अशा अनेक रूपांमध्ये आपली मराठी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. त्यातली एकच शुध्द आणि इतर सगळ्या अशुध्द असा अट्टाहास धरण्यात काही अर्थ नाही. उद्याचा जागतिक मराठी दिवस हा मराठीच्या या सगळ्या रूपांचा आहे. या सगळ्यांनी मराठी भाषेला समृध्द बनवले आहे. असा विचार केला तर मराठी भाषेच्या भविष्याबद्दल चिंता वाटणार नाही. तिचे रूप बदलत गेले तरी निराळे अस्तित्व टिकूनच राहणार आहे.

No comments: