Friday, December 24, 2010

मन - भाग ६

बहुतेक माणसे एका ठराविक चाकोरीतले जीवन जगत असतात, त्यांचे विश्व एका लहानशा चौकटीत सामावलेले असते. त्यातला उजेड कमी झाला की सगळे जग कायमचे अंधारात बुडाले आहे असे त्यांना वाटायला लागते. अतीव नैराश्य, वैफल्य आदींने ते ग्रस्त होतात. मनातली ही भावना टोकाला गेल्यास आत्महत्येचे विचार त्यात यायला लागतात. पण त्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन पाहिले तर सुख दुःख ह्या गोष्टी अशा सर्वसमावेशक नाहीत, स्थळकाळाप्रमाणे त्या सारख्या बदलत असतात ते त्यांना समजेल. ते पाहिल्यावर त्यांच्या मनाचा दुबळेपणा झटकून टाकू शकतात आणि जीवनाचा आनंद त्यांना दिसू लागतो. कवीवर्य गदिमांनी ही शिकवण या गाण्यात किती चांगल्या शब्दात दिली आहे पहा.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ।
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा ।।

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा ।
अविचार सोड असला कोल्लाळ कल्पनांचा ।
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ।।

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे ।
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे ।
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा ।।

का कालचा उद्याला देसी उगा हवाला ।
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला ।
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ।।

काही महानुभावांचे मन इतके सुदृढ बनलेले असते की दुःखाचे चटके ते हंसत हंसत सोसतात. अंगाला ओरबडणारे कांटे फुलांसारखे कोमल वाटतात. सोबतीला कोणी नसला तरी एकला चलो रे या रवींद्रनाथ टागोरांच्या गीतानुसार आपल्या मार्गावर चालत राहतात. येशू ख्रिस्तासारखे महान लोक आपला क्रूस स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतांनादेखील यत्किंचित कुरकुर करत नाहीत. असे महान लोक म्हणतात,

वाटेवर काटे वेचीत चाललो ।
वाटले जसा फुलाफुलात चाललो ।।

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी ।
आपुलीच साथ कधी करित चाललो ।।

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद ।
नादातच शीळ वाजवीत चाललो ।।

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल ।
ढळलेला तोल सावरीत चाललो ।।

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे ।
फेकुन देऊन अता परत चाललो ।।

मनाने निर्मळ असणे अतीशय महत्वाचे आहे. अनेक दुर्गुणांच्या डागामुळे ते मलीन झाले असेल तर त्या माणसाच्या उन्नतीत त्याची बाधा आल्याशिवाय राहणार नाही. "नाही निर्मळ ते मन तेथे काय करील साबण ?" असे विचारून चित्तशुध्दी करण्याचा उपदेश संतांनी दिला आहे. मनात जर खोटेपणाचा अंश नसेल, त्यात कोणाबद्दल कटुता नसेल, कसला संशय नसेल तर तो माणूस आपले काम करतांना कचरणार नाही, आत्मविश्वासाने प्रगतीपथावर वाटचाल करत राहील आणि जगात यशस्वी होईल. सोप्या ग्रामीण भाषेत हा संदेश असा दिला आहे.

मन सुद्ध तुझं गोस्ट हाये प्रिथिविमोलाची ।
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची ।
पर्वा बी कुनाची ।।

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला ।
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला ।
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ।।

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई ।
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई ।
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची ।

मन हे असेच बहुरंगी असते. कधी नैराश्याच्या गर्तेत खोल बुडेल तर कधी गगनाला गवसणी घालायला जाईल. संयम हे शहाणपणाचे लक्षण मनाला आवर घालण्याचा प्रयत्न नेहमी करत असते, पण कधी कधी त्याचा इलाज चालत नाही. वेडे मन त्याला न जुमानता पिसाट होतेच ! ते त्याच्या अडेलतट्टूपणावर ठाम राहते. त्यावेळी मनासारखे वागण्याखेरीज कोणताही पर्याय त्याला मान्य नसतो.

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !

आजच्या पिढीतल्या गुरू ठाकूर यांनी मनाच्या अनेक रूपांचा सुरेख ठाव घेतला आहे. हळवेपणा, बेधुंद वृत्ती, स्वप्नरंजन, विगहाकुलता, आशा. निराशा अशा त्याच्या विविध त-हा त्यांनी किती छान रंगवल्या आहेत !

मन उधाण वा-याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !

मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !

मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

पण मन या विषयावर मराठी भाषेतली जितकी गीते मी वाचली किंवा ऐकली आहेत त्या सर्वांमध्ये मला स्व.बहिणाबाईंनी लिहिलेल्या ओव्या जास्त आवडतात. मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे असे त्या सांगतात. कल्पनेची ही उंच भरारी आणि तिचे असे सुंदर शब्दांकन "माझी माय सरसोती, मले शिकयते बोली, लेक बहिनाच्या मनी किती रुपीतं पेरली।" असा सार्थ दावा करणा-या बहिणाबाईच करू शकतात. मनाबद्दल त्या सांगतात,

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा ।
जशा वा-यानं चालल्या, पान्याव-हल्या रे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं, जसं वारा वहादनं ।।

मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।
अरे, इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर !

मन चपय चपय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसंचा दाना ।
मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना ।।

देवा, कसं देलं मन, आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत !

देवा आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले, असं सपनं पडलं !

. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: