Monday, December 20, 2010

मन (भाग ३)

मनातल्या भावना शब्दात व्यक्त केल्या नाहीत, बोलून दाखवल्या नाहीत तरीसुध्दा त्या काही लपून रहात नाहीत. आपला चेहेरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात. मनातले भाव त्यावर प्रकट होत असतात. शिवाय वागण्यातल्या छोट्या छोट्या बाबीत त्या कशा दिसून येतात हे या कवितेत दाखवले आहे.

लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे ।
नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे ।
रंग गालिचा छ्पेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे ।
उन्हात पाउस, पुढे चांदणे ।
हे प्रणयाचे देणे घेणे ।
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे ।
चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे ।
केली चोरी छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

पण एकादा माणूस मठ्ठ असतो, ही गोष्ट त्याच्या लक्षात येतच नाही. कदाचित त्याला प्रतिसाद द्यायचा नसतो, सगळे समजून उमजून तो आपल्याला काही न कळल्याचे सोंग आणत असतो. त्यामुळे अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणा-या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी ।
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणा-या सुरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती ।
छंद कधी कळणार तुला, नाचणा-या जलातला ।

जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली ।
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला ।।

मनात येईल तसे वागणे आपल्याला बरेच वेळा शक्य नसते. या जगात रहायचे असेल तर कसे वागायचे हे बहुतेक वेळी बुध्दी ठरवत असते. तसेच अपेक्षाभंग झाला तर मन बेचैन होते त्या वेळी बुध्दी त्याची समजूत घालत असते. मन वेडे असते, अशक्य गोष्टींचा हव्यास धरते, पण बुध्दी शहाणी असते. ती मनाला था-यावर आणायचा प्रयत्न करते. खरे तर मन आणि बुध्दी या एकमेकींपासून वेगळ्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत की एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत हे अजून नीटसे समजलेले नाही. वेगवेगळी कार्ये करणा-या भागांना आपणच ही नावे दिली आहेत. ज्ञानेंद्रियांकडून येणा-या संवेदनांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून मिळणा-या माहितीचे संकलन बुध्दी करते. पण मन त्यावर विचार करते, तसेच स्वतंत्रपणेही मनात विचार उठत असतात. पण या विचारांचे मूल्यमापन बुध्दीकडून होत असते आणि आपण त्यानुसार निर्णय घेतो. मन स्वभावतः उच्छृंखल असते, पण त्याच्या मोकाट सुटू पहाणा-या वारूला वेसण घालायचे काम बुध्दी करत असते. कृतीवर बुध्दीचे नियंत्रण कदाचित असेलही, पण विचार करायला मन नेहमी तयार असते. श्रीरामाच्या गुणरूपाचे वर्णन ऐकूनच जानकी त्याच्यावर इतकी मोहित होते की त्याला कधी पाहीन असे तिला वाटू लागते. त्या काळातल्या समाजरचनेनुसार तिला प्रत्यक्ष मिथिलानगरीहून अयोध्येला जाणे शक्य नसते. ती कल्पनेनेच तिकडे जाण्यासाठी मनोरथाला आदेश देते,

मनोरथा, चल त्या नगरीला ।
भूलोकीच्या अमरावतिला ।।

स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी ।
सडे शिंपीले चंद्रकरांनी ।
शीतल वारा सारथि हो‍उनि ।
अयोध्येच्या नेई दशेला ।।

सर्व सुखाचा मेघ सावळा ।
रघुनंदन मी पाहिन डोळा ।
दोन करांची करुन मेखला ।
वाहिन माझ्या देवाला ।।

एकाद्या प्रियकराच्या मनात जेंव्हा त्याच्या सुंदरा प्रियेची श्यामला मूर्ती भरते तेंव्हा ती सतत त्याच्या मनःचक्षूंना दिसायला लागते. तो मनातल्या मनात तिचे चित्र काढून ते रंगवू लागतो.

मानसीचा चित्रकार तो ।
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो ।।

भेट पहिली अपुली घडता ।
निळी मोहिनी नयनी हसता ।
उडे पापणी किंचित ढळता ।
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो ।।

मम स्पर्शाने तुझी मुग्धता ।
होत बोलकी तुला नकळता ।
माझ्याविण ही तुझी चारुता ।
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो ।।

तुझ्यापरि तव प्रीतीसरिता ।
संगम देखून मागे फिरता ।
हसरी संध्या रजनी होता ।
नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो ।।

. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: