Sunday, May 10, 2015

वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स -२ - देशभक्त आणि द्वेषभक्त

वर्ल्डकपच्या सुमाराला मी जे पाहिले आणि वाचले त्यामधून मला जे जाणवले ते शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न मी महिनाभरापूर्वी सुरू केला होता. आपण क्रिकेटचे सामने कसे जिंकले? याबद्दल मी पहिल्या भागात लिहिले होते. या बातम्यांकडे एका वेगळ्या अँगलने पाहतांना मला काय दिसले हे या लेखात लिहीले होते. मध्यंतरी मी एका अपघातात जबर जखमी झाल्यामुळे हा लेख प्रकाशित करू शकलो नव्हतो. मला ती संधी आज मिळत आहे.

वर्ल्डकपाचे सगळे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातल्या दोन देशांमध्ये खेळले गेले होते. तरीसुद्धा हजारो भारतीयांनी यातल्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांच्या कक्षांमध्ये गर्दी केली होती. भारतातले सर्वसामान्य नागरीक तर नाहीच, पण उच्च मध्यमवर्गीय लोकसुद्धा स्वतःच्या खर्चाने तिकडे जाऊन हे सामने पाहू शकतील एवढी सुबत्ता अजून आपल्याकडे आलेली नाही. बडे उद्योगपती, सिनेकलाकार किंवा राजकारणी अशा अतीश्रीमंत वर्गातले लोकच हे करू शकतात. अखेरीस ग्राहक, प्रेक्षक किंवा करदाता या नात्याने त्याचा बोजा आपल्यावरच पडत असला तरी तो लक्षावधी लोकांमध्ये विभागून जात असल्यामुळे आपल्याला वेगळा जाणवत नाही. अर्थातच हे सामने पहायला आलेले बहुतेक सर्व भारतीय वंशाचे प्रेक्षक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वास्तव्य करणारेच असणार. त्यातले काहीजण अमेरिका, सिंगापूर, दुबई वगैरे देशांमधून तिकडे गेलेले असले तरी तेसुद्धा अनिवासी भारतीयच (नॉनरेसिडेंट इंडियन्स) असणार.

यातले काही लोक थोड्या काळासाठी तिकडे जाऊन परत येणार असले तरी बरेचसे लोक तिकडे स्थायिक झाले तरी आहेत किंवा तसा प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा हे सगळे प्रेक्षक भारतीय खेळाडूंना अगदी मनापासून भरभरून दाद आणि खूप प्रोत्साहन देत होते. त्याते काही जण मोठमोठे तिरंगी झेंडे हातात धरून मोठ्या उत्साहाने जोरजोरात फिरवतांना दिसत होते, तर काही लोकांनी आपले चेहेरे तीन रंगांमध्ये रंगवून घेतले होते. हा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे असा सूर काढणारे काही अतीशिष्ट लोक आपल्याकडे आहेत. पण त्यांच्या नकारात्मक दृष्टीकडे दुर्लक्ष केल्यास या सगळ्या लोकांना आपल्या भारत देशाबद्दल मनातून काही तरी आपुलकी वाटते हे जाणवेल. केवळ हौस किंवा गंमत म्हणून त्यांना एकादा झेंडा फिरवायचा असता किंवा आपले तोंड रंगवून घ्यायचे असते तर त्यांनी मलेशिया, ग्वाटेमाला, झुलूलँड असल्या कुठल्याही देशाचा छान दिसणारा झेंडा किंवा चित्रविचित्र रंगांमध्ये रंगवलेले कसलेही फडके आणले असते किंवा आपल्या चेहे-यावर कुठलेही चित्र रंगवून घेतले असते. पण या प्रसंगी त्यांनी यासाठी तिरंग्याचीच निवड का केली? त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी देशभक्तीची एक लहानशी ज्योत अजूनही तेवत आहे याचेच हे लक्षण होते. परदेशी गेलेल्या भारतीयांच्या मनात अशी थोडी देशभक्तीचा झलक दिसलीच, भारतातल्या लोकांचा उत्साह तर अमाप होता. आपल्या संघाच्या फलंदाजांनी मारलेल्या प्रत्येक चौकार किंवा षट्कारावर आणि मिळवलेल्या प्रत्येक विकेटवर सामना पाहणारे लोक जागच्याजागीच उड्या मारत होते, नाचत होते, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर फटाक्यांचे आवाज कानावर पडत होते. यात एका प्रकारे त्यांची देशभक्ती दिसून येत होती.

पण स्वतःच्या अत्यंत जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा नगारा सदैव वाजवत असणा-या काही लोकांना क्रिकेट या शब्दाचेच वावडे आहे असेही दिसले. गो-या रंगाच्या आणि ख्रिश्चन धर्म पाळणा-या परकीय आक्रमक लोकांचा हा खेळ भारतीय लोकांनी खेळावा हाच मुळात त्यांना देशद्रोह वाटतो. इथल्या कोट्यावधी लोकांनी तो विदेशी खेळ पहाण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवावा म्हणजे तर त्यांच्या मते देशद्रोहाची परिसीमा झाली. यामुळे क्रोधाने लालपिवळे होऊन त्यांनी सगळ्या जनतेवरच सैरभैर आगपाखड सुरू केली. आजची परिस्थिती काय आहे? आजच्या काळातले इंग्रज हे आपले शत्रू आहेत का? एका काळात त्यांनी सुरू केलेला खेळ आता त्यांचा राहिला तरी आहे का? खेळ हा द्वेष करण्याचा विषय असू शकतो का? असा कसलाही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही इतके ते द्वेषाने भरून गेलेले आहे. आजच्या काळातल्या भारतातल्या लोकांच्या मनाला त्यांच्या मते कवडीइतके महत्व देण्याचे कारण नाही. देशामधली माणसे वगळून कुठला देश शिल्लक राहतो? देश किंवा राष्ट्र या शब्दाची कसली संकल्पना या लोकांच्या डोक्यात भरलेली आहे हेच मला समजत नाही. 

हे लोक स्वतःला अत्यंत प्रखर राष्ट्रनिष्ठ असे मानतात आणि तसे सांगत असतात. अशा लोकांना देशभक्त म्हणावे की द्वेशभक्त असा प्रश्न पडतो.

Friday, May 08, 2015

देव तारी ....... मला

भाविक लोक मोठ्या श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत असतात. नास्तिक वाटणारे लोकसुद्धा "अरे देवा (ओ माय गॉड)",  "देव जाणे (गॉड नोज)" असे उद्गार काढत असतात तेंव्हा देवाचे नावच घेत असतात. अचानक एकादे मोठे संकट कोसळते तेंव्हा तर बहुतेक सर्वांनाच 'देव आठवतो' असा वाक्प्रचार आहे. ज्या वेळी साक्षात काळ समोर उभा राहिलेला दिसतो आणि त्यामुळे बोबडी वळलेली असते अशा वेळी तर कोणीही दुसरे काही करूच शकत नाही. पण कदाचित अवेळी आलेला काळ कधी कधी मागच्या मागे अदृष्य होतो आणि तो माणूस भानावर येऊन सुखरूपपणे आपले पुढले आयुष्य घालवू लागतो. असे प्रसंग बहुतेक सर्वांच्या आयुष्यात येऊन जातात आणि केवळ देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे तो सांगतो. त्याला तसे मनापासून वाटते सुद्धा. माझ्या आयुष्यात नुकताच असा एक प्रसंग येऊन गेला.

माझी आई सांगत असे की मी लहान म्हणजे दोन तीन वर्षांचा असतांना एकाएकी माझ्या हातापायांमधली शक्ती क्षीण होऊ लागली आणि चांगला दुडूदुडू पळणारा मी लुळ्यापांगळ्यासारखे निपचित पडून रहायला लागलो. त्या काळातले आमच्या लहान गावातले डॉक्टर आणि त्यांना उपलब्ध असलेली औषधे देऊन काही फरक पडत नव्हता. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सगळ्याच कुटुंबांमध्ये आठ दहा मुले जन्माला येत असत, त्यातली दोन तीन किंवा काही घरांमध्ये तर चार पाच दगावत असे घरोघरी चालत असे. मीही त्याच मार्गाने जावे अशी ईश्वरेच्छाच असेल तर त्याला कोण काय करू शकणार होते?

पण माझ्या आईने मला उचलले आणि घरगुती औषधांमधल्या तज्ज्ञ माई फडके आजींच्या समोर नेऊन ठेवले. मला पाहून झाल्यावर त्यांनी त्यांच्या एका गड्याला हाक मारली. गावापासून तीन चार कोसावर असलेल्या त्यांच्या शेतावर तो रहात असे. माईंना काही वस्तू आणून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून घेऊन जाण्यासाठी नेमका त्या दिवशी तो त्यांच्या घरी आला होता. "शेतातल्या अमक्या झाडाखाली तमूक प्रकारचे किडे तू पाहिले आहेस का?" असे त्याला विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. त्या किड्याच्या अळ्या आणून द्यायला माईंनी त्याला सांगितले.

त्यानंतर दर चार पाच दिवसांनी तो माणूस थोड्या अळ्या आणून माझ्या आईला द्यायचा. संपूर्ण शाकाहारी आणि अहिंसक असलेली माझी आई किळस न करता त्या अळ्यांना चिरडून त्यात पिठी साखर मिसळून त्याच्या चपट्या गोळ्या करायची आणि बत्तासा म्हणून मला भरवायची. या उपायाने मात्र मी उठून बसायला, उभे रहायला, चालायला आणि पळायला लागलो. मी जगावे अशी देवाची इच्छा होती म्हणून आईला, माईंना आणि त्या गड्याला त्या वेळी ही बुद्धी सुचली असे म्हणून याचे सगळे श्रेय माझी आई मात्र देवालाच देत असे. माझी ही कहाणी माझ्यासमक्षच आईने कितीतरी लोकांना सांगितली असल्यामुळे आपल्याला आता कसली भीती नाही कारण प्रत्यक्ष देव आपला रक्षणकर्ता आहे ही भावना माझ्या मनात रुजली. माझ्या हातून काही पुण्यकर्म झाले की नाही कोण जाणे, पण माझ्या आईवडिलांची पुण्याई मला नेहमी तारत राहिली. लहानपणी माझी रोगप्रतिकारात्मक शक्ती थोडी कमीच असल्याने गावात आलेल्या बहुतेक साथींनी मला गाठले. त्यातल्या काही घातक होत्या, तरीही मी त्यामधून सुखरूपपणे बरा झालो. आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्याभोवती देवाचे संरक्षणाचे कवच असण्यावरचा माझा विश्वास जास्तच वाढला.

कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंतच्या चार दशकांमध्ये मात्र मला कोणताही मोठा आजार झाला नाही. त्यानंतर एकदा मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यामुळे डोक्याच्या चिंधड्या उडतील असे वाटण्याइतक्या तीव्र वेदना होऊन मला ग्लानी आली होती तर एकदा गॅस्ट्रोएंटरटाईजच्या जबरदस्त दणक्याने क्षणार्धात डोळ्यापुढे निळासार प्रकाश दिसायला लागला होता आणि कानात पूर्णपणे शांतता पसरली होती. या दोन्ही वेळा आपला अवतार संपला असे आत कुठेतरी वाटले होते. पण त्याच्या आतून कोणीतरी उसळून वर आले आणि मी भानावर आलो. त्या वेळी आलेल्या दुखण्यांवर केलेल्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन मी कामालाही लागलो. देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे मलाही मनापासून वाटले आणि मीही सांगायला लागलो.

माझ्या आयुष्यात बसने किंवा कारने रस्त्यावरून, रेल्वेगाडीत बसून आणि विमानांमधून मी एवढा प्रवास केला आहे की त्यांची अंतरे जोडल्यास या प्रत्येकातून निदान तीन चार तरी पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या असत्या. अर्थातच यादरम्यान काही अपघातही झाले. पण ते फार गंभीर स्वरूपाचे नसावेत. थोडे खरचटणे, थोडा मुका मार यापलीकडे मला इजा झाली नाही. अनेक वेळा ड्रायव्हरच्या किंवा पायलटच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि हुषारीमुळे तर काही वेळा निसर्गाने साथ दिल्यामुळे आमचे वाहन अपघात होता होता त्यातून थोडक्यात वाचले. "असे होण्याएवजी तसे झाले असते तर आमची खैर नव्हती, ईश्वरकृपेने आणि नशीबाची दोर बळकट असल्यामुळे आपण वाचलो." असे उद्गार काढले गेलेच. 

महिनाभरापूर्वी झालेल्या मोटार अपघातात आम्ही जिच्यात बसलो होतो त्या टॅक्सीची पार मोडतोड आली होती आणि मला आणि माझ्या पत्नीला जबर इजा झाली होती. रस्त्यावरून जात असलेल्या सात आठ मोटारगाड्या आम्हाला पाहून थांबल्या आणि त्यातून उतरलेली दहापंधरा माणसे गोळा झाली, जवळच उभे असलेले हवालदारही आले. ड्रायव्हरच्या बाजूची दोन्ही दारे मोडून जॅम झाली होती. डाव्या बाजूच्या दरवाजामधून लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. तो ठीक दिसत होता. माझ्या बाजूला बसलेली अलका असह्य वेदनांनी आकांत करत होती, पण शुद्धीवर होती. तिलाही बाहेर पडता आले. माझ्या डोक्याला खोक पडून त्यातून भळाभळा रक्त वहात होते आणि एक दात पडल्यामधून तोंडातूनही रक्त येत होते. दोन्ही हात पूर्णपणे कामातून गेले असल्यामुळे मला कणभरही हलवता येत नव्हते. डोळ्यावर आलेल्या रक्तामधून एक क्षण सगळे लालभडक दृष्य दिसले की दुस-या क्षणी सगळा काळोख आणि तिस-या क्षणी नुसती पांढरी शुभ्र भगभग अशा प्रकारचा विचित्र खेळ डोळ्यांसमोर चालला होता. मी ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या सीटवर अडकून पडलो होतो.

अँब्युलन्सला बोलावून तिथपर्यंत येण्यात अमूल्य वेळ गेला असता. तिथे जमलेल्यातला एक सज्जन गृहस्थ आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला. पोलिसाने कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलचे नाव काढताच अलकाने आम्हाला बीएआऱसीच्या हॉस्पिटलमध्येच जायचे आहे असे निक्षून सांगितले. पोलिस केस असल्यामुळे त्यात वेळ जाईल का अशी शंका तिला वाटत होती, पण तसे काही झाले नाही. आमचा टॅक्सीड्रायव्हर त्या सज्जनाला वाट दाखवण्यासाठी त्याच्या शेजारी गाडीत बसला. अलका त्याच्या मागच्या सीटवर बसली. .मी आमच्या टॅक्सीमधल्या माझ्या जागेवरच अडकून बसलेलो होतो. एका माणसाने त्या टॅक्सीत शिरून मला खेचत पलीकडच्या दारापाशी आणले आणि दोघातीघांनी धरून बाहेर काढून उभे केले, त्यांच्या आधाराने मी त्या दुस-या कारपर्यंत चालत आल्यावर त्यांनीच मला आत बसवले आणि अपघात झाल्यावर पाच मिनिटांच्या आत आम्ही तिथून निघालो.

एक दोन मिनिटांनी थोडा भानावर आल्यानंतर मी अलकाला सांगितले, "या क्षणी मी तर काहीही हालचाल करू शकत नाही, तुला शक्य असले तर कोणाला तरी फोन कर." तिने कसाबसा तिच्या पर्समधसा सेलफोन काढून आमच्या भाचीला लावला. आमच्या नशीबाने तो पहिल्या झटक्यात लागला आणि रश्मीने तो लगेच उचललाही. सुटीचा दिवस असला तरी त्या क्षणी ती आणि परितोष दोघेही बीएआरसी क़लनीमधल्या त्यांच्या घरीच होते. "अगं, आम्हा दोघांनाही मोठा अँक्सिडेंट झाला आहे, आम्ही आपल्या हॉस्पिस्टलमध्ये येत आहोत." एवढेच अलका बोलू शकली पण तिच्या आवाजाचा टोन ऐकूनच रश्मी हादरली आणि आमच्या पाठोपाठ ते दोघेही हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी आमच्याक़डे लक्ष दिले. रश्मीशी बोलल्यानंतर अलकाने लगेच पुण्याला उदयला फोन लावून जेमतेम तेवढेच सांगितले. तोही लगेच हिंजेवाडीहून निघाला, त्याने शिल्पाला ताबडतोब वाकड जंक्शनवर यायला सांगितले त्याप्रमाणे तीही तिथे जाऊन पोचली. ती दोघेही अंगावरल्या कपड्यातच पुण्याहून निघून थेट हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी पुढच्या सगळ्या कांमाचा भार उचलला. रश्मी आणि परितोष होतेच, आमचे एक शेजारीगी वाशीहून तिथे आले. त्या सर्वांनी मिळून माझी आणि अलकाची हॉस्पिटलमधली व्यवस्था पाहिली.
 
हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत मला अर्धवट शुद्ध हरपत असल्यासारखे वाटायला लागले होते. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सतत माझ्याशी बोलत राहून मला जागृतावस्थेत  ठेवले होते आणि सलाईनमधून पोषक द्रव्ये पुरवून अंगातली शक्ती थोडी वाढवली होती. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिझल्ट हातात येईपर्यंत शरीरात कुठे कुठे काय काय झाले असेल याची शाश्वती वाटत नव्हती. सगळ्या तपासण्या होऊन गेल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले की डोक्याला मोठी खोक पडली असली तरी आतला मेंदू शाबूत होता, छाती व पोट या भागात कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत इजा शालेली नव्हती. पायाला झालेल्या जखमा आणि आलेली सूज फक्त वरवरची होती. उजव्या हाताचा खांदा आणि डाव्या हाताचे मनगट यांच्या जवळची हाडे मोडली असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. जखमांमधून खूप रक्तस्राव झालेला असला तरी रक्ततपासणीमध्ये सगळे घटक प्रमाणात आले होते. पत्नीला माझ्यापेक्षा जास्त ठिकाणी मुका मार लागून सगळ्या अंगाला सूज आली होती, त्यातली एक तर डोळ्याला लागून होती, पण डोळा बचावला होता. दोघांच्याही शरीरातले सर्व महत्वाचे अवयव व्यवस्थित कामे करीत होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही जिवाला धोका नव्हता. ज्याची सर्वांना  धास्ती वाटत होती अशा मोठ्या संकटातून आम्ही देवाच्या कृपेने वाचलो होतो. यापुढे काही काळ आम्हा दोघांनाही असह्य अशा वेदना सहन करत राहणे मात्र भाग होते. तेवढा भोग भोगायचाच होता. पण पुन्हा एकदा देवाने मला तारले होते हे जास्त महत्वाचे होते.

Wednesday, April 01, 2015

आपण क्रिकेटचे सामने कसे जिंकले?


या वर्षीच्या वर्ल्डकपसाठी झालेले बहुतेक सगळे सामने टीव्हीवर पाहून मी स्टार स्पोर्ट चॅनेलसाठी भरलेले पैसे वसूल करून घेतले. भारताच्या संघाने पहिले सात सामने ओळीने जिंकले. ते कशामुळे जिंकले असतील? खरे तर कोणालाही असा प्रश्न पडायचे कारण नव्हते. आपला कप्तान महेंद्रसिंह धोनी ऊर्फ आपला लाडका माही याने या खेळाचा तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधली पिचेस, हवामान वगैरेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठेवला होता.

प्रत्येक सामन्यातल्या प्रत्येक क्षणी तिथल्या पिचची अवस्था, त्या वेळचे हवामान, वाहत्या वा-याची गती आणि दिशा, खेळत असलेल्या विरुद्ध बाजूच्या फलंदाजाच्या संवयी आणि त्याचे वीक पॉइंट्स वगैरे पाहून कोणाला गोलंदाजी द्यायचे हे तो ठरवत होता. त्या बॉलरने कशा प्रकारचा चेंडू टाकावा, आखूड पल्ल्याचा (शॉर्टपिच्ड) की यॉर्कर, ऑफ ब्रेक की गुगली वगैरेंच्या सूचना माही त्या गोलंदाजांना देत होता आणि तंतोतंत तसेच बॉल ते गोलंदाज टाकू शकत होते. पिचवरल्या विशिष्ट पॉइंटवर ठरलेल्या वेगाने ते चेंडू पडत होते आणि अपेक्षेइतकेच वळत होते. यामुळे विरोधी फलंदाजांच्या फटकेबाजीवर नियंत्रण येत होते, तसेच ते पटापट बाद (आउट) होऊन जात होते. अशा प्रकारे आपण सातही सामन्यांमधल्या सात विरोधी संघांना सर्वबाद करून एक नवा विक्रम नोंदवला.

आपले फलंदाज मात्र फलंदाजी करतांना प्रत्येक चेंडूकडे निरखून पहात होते, त्यातल्या कुठल्या चेंडूला नुसतेच अडवावे, कुठल्या बॉलला जरासे ढकलून एकादी धांव काढावी, केंव्हा त्याला सीमारेषेच्या बाहेर टोलवून चार किंवा सहा रन्स मिळवाव्यात आणि कुठल्या चेंडूला शांतपणे जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ द्यावे हे ओळखून त्यांनी तुफान फलंदाजी केली आणि प्रत्येक सामन्यात धावांचे पर्वत रचले. यामुळेच आपण हे सातही सामने जिंकू शकलो. असे कोणालाही वाटेल. मला त्यातले फारसे काही समजत नाही, पण या सामन्याचे धावते वर्णन (कॉमेंटरी) करत असलेल्या आणि तज्ज्ञ म्हणून त्या खुर्च्यांवर बसलेल्या आपल्या संघातल्या पूर्वीच्या दिग्गजांनीच हे सांगितल्यामुळे मलाही त्या वेळी ते पूर्णपणे पटले होते.    

पण उपांत्य सामन्यात काय झाले कोण जाणे? या वेळी आपल्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक अगदी सोपे सोपे बॉल्स टाकले आणि त्यांनी त्या चेंडूंना मनसोक्त फटकारून आपल्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आपल्या मुख्य फलंदाजांनी नको त्या चेंडूंना नको त्या वेळी बॅटने निश्कारण स्पर्श करून आपल्या विकेट्स घालवल्या. अशा प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर खेळायला आलेला माहीसुद्धा आपल्या संघाची थोडीबहुत लाज राखण्यापलीकडे काही करू शकला नाही. यामुळे आपण पहिले सात सामने कशामुळे जिंकले असतील? हा प्रश्न पुन्हा मनात डोकावायला लागला. त्याचे उत्तर मला दुसरे दिवशी सकाळच्या टीव्हीवरील बातम्या पहात असतांना मिळाले.

त्या बातम्यांमधल्या हकीकतींबद्दल लिहितांना मी त्यातल्या पात्रांची नावे आणि गावे बदललेली आहेत. तरीही त्याच नावांच्या व्यक्ती त्या गावांमध्ये प्रत्यक्षात रहात असल्यास हा एक योगायोग समजावा आणि या लेखाशी त्यांचा काहीही संबंध असणे अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्यावे. लखनऊच्या लखनसिंग यादव नावाच्या युवकाने आधी त्याच्या मिशा सफाचट केल्या होत्या. त्या मूछमुंड्याने महिनाभरापूर्वीपासून त्याच्या मिशा पुन्हा वाढवल्या आणि त्यांना पीळ भरू शकण्याइतपत त्या वाढल्या. वर्ल्डकपचा प्रत्येक सामना टीव्हीवर पहात असतांना लखन आपल्या मिशांना आलटून पालटून पीळ भरत असे. आपल्या टीमची बॅटिंग चाललेली असतांना इकडे त्याने मिशीला पीळ भरला की तिकडे फलंदाजाला चौका मिळत असे आणि जरा जोरात पीळ भरला की सरळ सिक्सर. विरुद्ध संघाची फलंदाजी चाललेली असतांना याने इकडे पीळ भरला की तिकडे विकेट पडायचीच म्हणे. वाराणशीच्या बनारसीदासने त्याच्या डोक्यावर चांगली जाड आणि लांबलचक शेंडी वाढवून ठेवली होती. तोसुद्धा आपल्या शेंडीला मागेपुढे किंवा डाव्याउजव्या बाजूला झटके देऊन तिकडे चौकार, षट्कार घडवून आणत होता किंवा विकेट्स घेत होता म्हणे. हे दोघे भय्ये इथे टीव्हीसमोर बसल्याबसल्या मिशी आणि शेंडीच्या रिमोट कंट्रोलने तिकडे दूर देशात चाललेले सामने खेळवत होते.

भारताच्या खेळाडूंच्या कपड्यांचा रंग निळा असल्यामुळे प्रेक्षकांमध्येसुद्धा बहुतेक लोक निळ्या रंगाचे टी शर्ट घालून मॅच पहायला येत होतेच, पण इकडे भारतात रहात असलेले बरेचसे प्रेक्षक नीलकमल, नीलकांत, निळूभाऊ किंवा निळे कोल्हे बनून टीव्हीसमोर बसून ते सामने पहात होते. यामुळे निळ्या रंगाच्या लहरी इकडून निघून त्या खेळाडूंपर्यंत पोचत असा त्यांचा दावा होता. पण पुण्यातले कॅप्टन कर्णिक मात्र 'अंग्रेजोंके जमानेके' कर्नल असल्यामुळे क्रिकेटसाठी 'प्रॉपर' असा पांढरा शुभ्र पोशाख घालूनच मॅच पहायला बसत. गांधीनगरचे डाह्याभाईसुद्धा त्या दिवशी सफेद खादीचा कुर्ता, धोती आणि टोपी परिधान करत असत. त्या दोघांच्या मते शुभ्र रंगामध्ये अचाट सामर्थ्य असते आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होत असे. सुरतेचा छगनभाई ड्रेसवाला मात्र मुद्दाम विरोधी संघाच्या गणवेशाच्या रंगाचे कपडे घालून बसत. यामुळे ते कन्फ्यूज होऊन सामने हरत असत असे त्याचे म्हणणे पडले.

क्रिकेटच्या मैदानात स्लिप, गली, कव्हर, मिडऑन, मिडऑफ, लाँग लेग, शॉर्ट लेग वगैरे ठिकाणी क्षेत्ररक्षकांना उभे करून व्यूहरचना केली जाते. आपल्या हैद्राबादच्या तिम्मय्याने त्याच्या घरातल्या हॉलमध्येच टीव्हीच्या समोर अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या आणि सामने पहात असतांना तो घरातल्या मंडळींना या किंवा त्या खुर्चीवर बसायला सांगत असे. त्याने इकडे अशी व्यूहरचना केली की प्रत्यक्षातल्या मॅचमध्ये एकादा कॅच उडून बरोबर त्या ठिकाणच्या फील्डरकडे जात असे आणि तो पकडला जात असे असे त्याचे सांगणे होते. यातल्या एकाद्या ठिकाणच्या खुर्चीवरून तिथे बसलेली व्यक्ती उठली की नेमका तिकडे मॅचमध्ये एक कॅच ड्रॉप होत असे असाही त्याचा अनुभव होता.

याशिवाय कित्येक लोकांनी प्रत्येक मॅचच्या दिवशी कडकडीत उपास पाळले होते आणि मॅचमध्ये विजय मिळाल्यावर पोटभर गोडधोड खाऊन ते सोडले होते. कित्येक लोकांनी आपापल्या देवांना साकडे घातले होते तर कोणी विजयासाठी नवस बोलले होते. अशा प्रकारांचे असंख्य वैयक्तिक प्रयत्न तर होत होतेच, शिवाय गावोगावच्या लोकांच्या समुदायांनी एकत्र येऊन अनेक सांघिक उपाय योजले होते. काही ठिकाणी मंत्रोच्चारासह होमहवन, यज्ञयाग वगैरे चाललेले होते, काही ठिकाणी खूप लोक एकत्र येऊन एकाद्या मंत्राचा हजारो किंवा लाखो वेळा जप करत होते, काही लोक एकाद्या स्तोत्राचे शेकडो किंवा हजारो वेळा पठण करत होते. या सगळ्या लोकांच्या या प्रयत्नामुळेच आपला संघ वर्ल्ड कपमधल्या सामन्यांमध्ये विजयी होत होता अशी त्या सर्वांची श्रद्धा होती.

पण मग उपांत्य सामन्यात काय झाले? याचे समाधानकारक उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते.  बहुधा त्या वेळी या सगळ्याचा अतिरेक झाल्यामुळेच 'अती तेथे माती' असे झाले असेल असे माझे आपले साधे अनुमान आहे. 

Saturday, March 28, 2015

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १ ते ३)

२०१५ साली होऊन गेलेल्या या घटना अजून माझ्या लक्षात राहिल्या आहेत. मी आधी हा लेख तीन भागांमध्ये लिहिला होता. ते तीन्ही भाग एकत्र केले. दि.०४-०४-२०२२ 

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १)


सूर्य आणि विश्वातले सारे तारे नेहमी आपापल्या जागांवरच असतात. पण आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि आपण तिच्यासोबत फिरत असतो यामुळे आपल्याला ते सगळे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पृथ्वीबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतांना आपण त्याला निरनिराळ्या ठिकाणांहून जरा जवळून पहात असतो. यामुळे आपल्याला तो खूप खूप दूर असलेल्या इतर ताऱ्यांच्या तुलनेत हळू हळू सरकत बारा राशींमधून प्रवास करतांना दिसतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तो धनूराशीमधला प्रवास आटोपून मकर राशीत प्रवेश करतो. पण त्या वेळी सूर्याच्या प्रकाशात आपल्याला आकाशातली धनू रासही दिसत नसते आणि मकर रासही. या दोन राशींमध्ये कसली सीमारेषा तर आखलेली नाहीच. त्यामुळे तो इकडून तिकडे गेल्याचे आपल्याला दिसणार तरी कसे? खरे तर त्या दिवशी आपल्याला आकाशात काहीच वेगळे घडतांना दिसत नाही आणि इतर दिवसांपेक्षा वेगळे असे काही त्या दिवशी प्रत्यक्षात घडतही नाही हे सगळे मला चांगले माहीत आहे. संक्रांत नावाची एक विध्वंसक देवी या दिवशी एका दिशेने येते आणि दुसऱ्या दिशेकडे पहात पहात तिसरीकडे चालली जाते असे सांगितले जाते. प्रत्यक्षात तिला कोणीच कधी पाहिलेले नाही कारण ती फक्त एक रंजक कल्पना आहे याबद्दल मला खात्री आहे. तरीही एकाद्यावर कोणते संकट आले किंवा एकाद्याचे नुकसान झाले तर त्याच्यावर 'संक्रांत आली' असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. त्या अर्थाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती.

या वर्षातली मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी एका पहाटे बाहेरून धडाड् धुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्या दिवशी नरकचतुर्दशी किंवा गुढीपाडव्यासारखा पहाटे उठून साजरा करण्याचा कोणताच सण नव्हता, ख्रिसमस, ईद वगैरे नव्हती आणि जैन, बौद्ध, शीख वगैरेंपैकी कोणाचाही सण नव्हता. कोणाची वरात किंवा बारात निघाली असेल म्हणावे तर रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते, भारतपाकिस्तान यांच्यातली क्रिकेट मॅचही कुठे चाललेली नव्हती. मग हे फटाके कोण उडवत असेल? कदाचित शेजारच्या बिल्डिंगमधल्या वात्रट मुलांचे हे काम असावे किंवा दूर कुठे तरी अतिरेक्यांनी केलेले बाँबस्फोट होत असावेत असे काही अंदाज मनात आले.

बाहेरून येत असलेल्या आवाजांपेक्षा घरातल्या पंख्यांमधून येत असलेले घुर्र घुर्ऱ असे आवाज जास्त चिंताजनक वाटल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे होते. आमच्या घरातली वीज गेली होती आणि इन्ह्रर्टरमधून पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्यामुळे पंखे कुरकुरत होते हे लक्षात येतांच आधी पंख्यांची बटने बंद केली. पहाटेच्या वेळी त्यांची फारशी गरजही वाटत नव्हतीच. समोरच्या आणि शेजारच्या बिल्डिंग्जमध्ये उजेड दिसत होता पण आमच्या बिल्डिंगमधल्या जिन्यातले व गेटवरचे दिवे बंद झाले होते. यावरून हा फक्त माझ्या घरातला प्रॉब्लेम नसून आमच्या बिल्डिंगचा आहे एवढे लक्षात आले. कदाचित मुख्य फ्यूज उडला असेल आणि सकाळी कोणीतरी तो लावून देईल असे वाटले.

बाहेर थोडा उजेड झाल्यावर मी नित्याचा मॉर्निंगवॉक घेऊन परत आलो. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आणि टाटापॉवर कंपनीत काम करणारे सद्गृहस्थ खाली भेटले. "वीज आली का?" असे त्यांना विचारताच "बहुतही व्होल्टेज फ्लक्च्युएशन हो रहा है।" असे पुटपुटत ते त्यांच्या गाडीत बसून चालले गेले. मला काहीच समजले नाही. मी आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला फोन लावला. तोही म्हणाला, "अरे साब, ४०० व्होल्ट्सतक व्होल्टेज जा रहा है। आप अपने कॉस्टली इक्विपमेंट्सको बचाइये। कोई केबल फॉल्ट लगता है।" माझ्याघरात तर अजीबातच वीज नव्हती, पण या केबलफॉल्टचे काही सांगता येत नाही. मागे एकदा एका केबलफॉल्टमुळे चक्क न्यूट्रल वायरमधून फेजमधला करंट येत होता आणि त्या गोंधळात आमच्या वॉशिंगमशीनचे कंट्रोल सर्किट जळून गेले होते, त्याचा मला चांगला फटका बसला होता. ते आठवल्याने मी सावध झालो, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरेंची सगळी स्विचे तर फटाफटा ऑफ केलीच, त्यांचे प्लग्जही सॉकेट्समधून काढून ठेवले.  

आमच्या भागातल्या सबस्टेशनमधून आमच्या बिल्डिंगमध्ये येणारा विजेचा प्रवाह वाहून नेणारी भूमीगत (अंडरग्राउंड) केबल होती. जमीनीखाली ती नेमकी कुठून नेलेली होती, त्यात कोणत्या जागी हा फॉल्ट आला असेल, म्हणजे ती केबल तुटली बिटली असेल ते कसे शोधून काढतात आणि त्याची दुरुस्ती कशी केली जाणार होती याची कणभरही कल्पना आम्हा कोणाला नव्हती. त्या कामाला अनिश्चित काळ लागणार होता एवढे मात्र निश्चितपणे वाटत होते. यामुळे माझ्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला.

त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले होते आणि त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण घरी आल्यानंतर तिला प्राणवायूच्या कृत्रिम पुरवठ्याची गरज पडणार होती. त्यासाठी आणलेले यंत्र चालवण्यासाठी विजेची आवश्यकता होती आणि वीज नसेल तर आमची पंचाईत होणार होती. शिवाय वीज नाही म्हणजे पाण्याचे पंप चालणार नाहीत, ओव्हरहेड टँकमध्ये पाणी भरता येणार नाही, त्यात शिल्लक असलेले पाणी संपले की घरात पाण्याचा ठणठणाट होणार, विजेशिवाय अॅक्वागार्ड चालणार नाही, म्हणजे टँकच्या तळातले गाळाने गढूळ झालेले पाणी मिळणार ते आजारी व्यक्तीला कसे द्यायचे आणि मी तरी ते कसे प्यायचे? स्वयंपाक तरी कुठल्या पाण्याने करायचा? अशा वेळी हॉटेलातले जेवण मागवून खाणेही योग्य नव्हते. असा सगळाच घोळ झाला होता. यामुळे त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला तर कोणा नातेवाइकाच्या किंवा मित्राच्या घरी नेऊन ठेवावे का? तसेच ही गोष्ट तिला कशी सांगावी व पटवून द्यावी? याच विचारात मी धडपडत होतो.

पण या वेळी काही तातडीची कामे करणेही आवश्यक होते. आधी स्वयंपाकघरात आणि बाथरूम्समध्ये शक्य तेवढे नळाचे पाणी भरून ठेवले. त्यानंतर इन्व्हर्टरकडे मोर्चा वळवला. महाराष्ट्रात जेंव्हा बारनियमन आणि भारनियमन जोरात चालले होते तेंव्हा घरातली वीज रोजच जायची. यामुळे घरात इन्हर्टर बसवून घेतला होता आणि त्याचा चांगला उपयोग होत होता. पुढे विजेच्या पुरवठ्य़ात सुधारणा होत गेली. तरीही वाशीला अधूनमधून वीज जातच असल्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट अगदीच वाया गेली नाही असे वाटण्याइतपत त्याचा उपयोग होत राहिला. एकदा त्याची बॅटरी आणि एकदा इन्हर्टरही बदलून झाले होते. मात्र गेल्या तीन चार महिन्यात वीजेचा पुरवठा खंडित न झाल्यामुळे कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या त्या यंत्राकडे आमचे दुर्लक्षच झाले होते. पण या अचानक आलेल्या आपत्तीमुळे मात्र आता त्या यंत्राला महत्वाची भूमिका बजावायची होती आणि त्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते.

मी आधी पेट्रोल पंपावर जाऊन डिस्टिल्ड वॉटरचा कॅन आणला, इन्हर्टरच्या वजनदार बॅटरीला कसेबेसे ओढत कोपऱ्यातून बाहेर काढले आणि ते उकळून शुद्ध केलेले पाणी त्यातल्या तहानलेल्या सेल्सना पाजले. त्यांनीही ते गटागटा पीत जवळजवळ अख्खा कॅन संपवून टाकला. आणखी काही काळ लोटला असता तर कदाचित त्यांचे डिहायड्रेशन होऊन त्यांनी मानच टाकली असती. आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीमुळे त्या बॅटऱ्यांना मात्र नवजीवन मिळाले होते.

घरकाम आणि स्वयंपाक करणाऱ्या बायांना मी वीज आणि पाणी जपूनच वापरण्याच्या सूचना दिल्या, पण त्यांनी अनवधानाने काही दिवे आणि पंखे लावले आणि थोडे पाणी वाहून जाऊ दिलेच. त्यामुळे बॅटरीतली थोडी वीज खर्च झाली आणि पाण्याचा साठाही कमी झाला. तोंपर्यंत घरातले सगळे नळ तर कोरडे झालेले होतेच.  माझ्यासमोर असलेला प्रश्न जास्त गंभीर झाला. हा प्रॉब्लेम अलकाला लगेच फोनवर सांगावा की बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला प्रत्यक्ष भेटून सांगावा याचा विचार मी करत असतांना तिचाच फोन आला. मी काही बोलण्याच्या आधीच तिचा हिरमुसलेला स्वर कानावर पडला. हॉस्पिटलमधले डॉक्टर्स त्यांच्या वॉर्डमधल्या रोजच्या राउंडवर येऊन गेले होते, पण तिची केस ज्या मोठ्या डॉक्टरीणबाई पहात होत्या त्या काही कारणाने आल्या नव्हत्या आणि तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेतला जाणार नव्हता. यामुळे तिचा तिथला मुक्काम एका दिवसाने वाढला होता.

खरे तर हे ऐकून मला जरा हायसे वाटले होते, पण माझ्या आवाजातूनसुद्धा तिला तसे कळू न देता मी तिची समजूत काढली. "आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याने तुझी तब्येत आणखी सुधारेल, आज ज्युनियर डॉक्टर्सच्या मनात कदाचित काही शंका असल्या तरी उद्या मोठ्या डॉक्टरांनीच तुला तपासून खात्री करून घेतली तर मग घरी आल्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. एका दृष्टीने ते ही ठीकच आहे. मला आणखी एक दिवस तुझ्यापासून दूर रहावे लागेल, पण त्याला काही इलाज नाही. मी दुपारी तुला भेटायला येईनच, तेंव्हा काय काय आणायचे आहे?" विषय बदलून झाल्यावर कोणाकोणाचे फोन येऊन गेले? ती मंडळी कशी आहेत? काय म्हणताहेत? वगैरेंवर चर्चा करून संभाषण संपवले.

काही वेळाने बाहेरून कोणी तरी मोठ्याने बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. बाल्कनीत जाऊन पाहिले तर एक माणूस आमच्या बिल्डिंगच्या काम्पाउंडजवळ असलेल्या एका झाडावर चढला होता तर त्याचा साथी फूटपाथवर असलेल्या दिव्याच्या खांबापाशी उभा होता. त्याने दिव्याच्या वायरला जोडलेली एक लहान जाडीची केबल झाडावरल्या माणसाकडे फेकली, त्या माणसाने ती ओढून घेतली आणि तिची गुंडाळी करून आमच्या अंगणात फेकली. त्यानंतर त्या दोघांनी आत येऊन ती केबल आमच्या बिल्डिंगच्या मुख्य कनेक्शनला जोडून दिली आणि विजेचा तात्पुरता पुरवठा सुरू करून दिला.

वीज कंपनीच्या लोकांनी केलेल्या या जुगाडू प्रकारच्या उपाययोजनेचे मला कौतुकही वाटले आणि त्यातला धोकाही जाणवला. पण त्या क्षणी तरी आमचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. आम्ही लगेच पाण्याचे पंपिंग सुरू करून दिले. ओव्हरहेड टँकमधून नळाला पाणी येऊ लागताच आंघोळ केली, कपडे धुवून टाकले, इन्हर्टरची बॅटरीही चार्ज करून घेतली. केबल फॉल्टची पक्क्या स्वरूपाची दुरुस्ती होईपर्यंत थोडा मोकळा श्वास घ्यायची सोय झाली होती.

.  . . . . . . . . . . . . .  . . . . . . (क्रमशः) 

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग २)


मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. आणि त्यामुळे आमच्या घरातली वीज अचानक गेली होती. त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले असल्यामुळे माझी चांगलीच तारांबळ उडाली होती वगैरे हकीकत या लेखाच्या पहिल्या भागात दिली आहेच. त्या दिवशी मी हॉस्पिटलला जायला निघालो तेंव्हा आमच्या घराच्या पलीकडच्या इमारतीसमोरच्या फुटपाथवर तीन चार माणसे हातात कुदळ, फावडे, पहार वगैरे घेऊन कुणाची तरी वाट पहात बसली होती. त्या अर्थी आमच्या भूमीगत केबलच्या दुरुस्तीसाठी चक्रे फिरायला सुरुवात झाली होती आणि काही तासांमध्ये ते काम पूर्ण होईल अशी आशा होती. मी जरा खुशीत येऊन पुढे गेलो.

कुठल्याही पतीला पत्नीशी बोलत असतांना हं, हां याच्या पलीकडे जास्त काही उच्चारायची जास्त गरज सहसा पडत नाही किंवा त्याला तशी जास्त संधीही मिळत नाही हे एक वैष्विक सत्य आहे. त्या दिवसभरात हॉस्पिटलमध्ये आलेले अनुभव, घरात करायची साचलेली कामे, बाजारातून आणायचे असलेले सामान यासारख्या अनेक विषयांवर अलका बोलत राहिली आणि मी ते ऐकत राहिलो. घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीचा उल्लेख मी मुद्दामच टाळला. मी हॉस्पिटलमधून घरी परत येत असतांना आमच्या घराजवळच्या रस्त्याच्या कडेला एक खड्डा खणलेला मी चालत्या रिक्शेमधूनच पाहिला. त्या खड्ड्यातून बाहेर काढलेल्या विजेच्या केबलवर जो़डणीसाठी शस्त्रक्रिया सुरू होती. ते लोक नेमके काय करत होते ते पाहण्याची मला उत्सुकता असली तरी सकाळपासून झालेल्या धावपळीनंतर तिथे जाऊन उभे राहण्यासाठी माझ्या अंगात त्राण उरले नव्हते आणि पोटात सडकून भूकही लागली होती. त्यामुळे मी रिक्शा सरळ आमच्या घरापर्यंत नेली, चार घास जेवण पोटात ढकलले आणि बिछान्यावर आडवा झालो. तोपर्यंत वीजही आली. पहाटे तिच्य़ावर आलेली संक्रांत बहुधा रात्री तिच्या निजधामाला परत गेली असे वाटले.

दुसरे दिवशी अलकाला हॉस्पिटलमधून घरी आणले. अजूनही तिला संपूर्ण विश्रांतीची गरज होती. तिच्याकडे लक्ष देऊन मी जमतील तेवढी कामे उरकून घेत होतो. असाच आणखी एक दिवस सुरळितपणे पार पडला. त्या दिवशीच्या रात्री साडेतीनच्या सुमाराला पुन्हा पंख्याचे जोरात घुरघुरणे सुरू झाल्याने मला जाग आली. पंखा बंद करून खिडक्या उघडल्यावर थंड आणि ताजी हवा आत आली. अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद करावे लागले, पण ती गाढ झोपेत होती. दचकून किंवा खडबडून जागी झाली नाही. मीही थोडा वेळ आडवा झालो आणि तिच्याकडे लक्ष ठेवत राहिलो. आजूबाजूच्या इमारतींमध्ये लखलखाट होता पण आमचीच बिल्डिंग अंधारात होती. याचा अर्थ आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांपूर्वी केलेली केबलदुरुस्ती बहुधा कुचकामी ठरली असावी. सकाळ होईपर्यंत मला त्यावर काहीही करणे शक्य नव्हते. पहाटेची वाट पहात राहिलो.

बिल्डिंगमधले इतर लोक उठण्याच्या आधीच मी भल्या पहाटे उठून एक मोठे पातेलेभर पाणी स्वयंपाकघरातल्या नळावर भरून ठेवले आणि त्या दिवशीच्या स्वयंपाकाची सोय केली. कोपऱ्यात रिकामा पडलेला प्लॅस्टिकचा ड्रम बाथरूममध्ये नेऊन भरून ठेवला. पूर्वी कधीकाळी विजेचे भारनियमन चाललेले असतांना घेऊन ठेवलेल्या या वस्तूंचा पुन्हा एकदा उपयोग करण्याची वेळ आता आली होती. पिण्यासाठी गाळलेले भरपूर पाणी चार पाच बाटल्यांमध्ये आदल्या रात्रीच भरून ठेवलेले होते. नळाला पाणी येत होते तोपर्यंत सकाळची सगळी कामे आणि आंघोळ वगैरे आटोपून घेतली. आता केंव्हाही ते गेले तरी काही वांधा नव्हता.

अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद झाले होते हे सकाळी उठल्यानंतर तिच्या लक्षात आले. पण सुदैवाने त्या वेळी तिला काही त्रास होत नव्हता. ऑक्सीमीटर लावून तिच्या रक्तातले प्राणवायूचे प्रमाण तपासून पाहिले, ते थोडे कमी झाले असले तरी मर्यादेतच होते. ही जमेच्या बाजूची गोष्ट होती. ते आणखी कमी झाल्यानंतर तिला जाणवले असते आणि त्याहून कमी झाल्यावर त्याचा त्रास झाला असता. याचा अर्थ आमच्याकडे बरेच मार्जिन होते. आता मला विजेचे नियोजन करणे शक्य होते आणि बराच वेळ वीज आली नाही तरी तिचा फार मोठा प्रोब्लेम होणार नव्हता. बॅटरीवर चालणारे दुसरे ऑक्सीजनचे मशीन थोडा वेळ चालवून रक्तातले प्राणवायूचे प्रमाण वाढवायचे आणि काही वेळ मशीन बंद करून ठेवायचे असे करून ते जास्त वेळ चालवणे शक्य होते. इन्हर्टरच्या विजेवर मशीनची बॅटरी चार्ज करून घेऊन तिचे आयुष्य वाढवता येत होते.

त्या दिवशी इन्व्हर्टरचा उपयोग फक्त या एकाच कामासाठी करायचा असे मात्र आम्ही ठरवले. आमच्या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये थोडा फार सूर्यप्रकाश येत असल्यामुळे दिवसा उजेडी विजेचे दिवे लावायची चैन एक दिवस करायची नाही, जानेवारीचा महिना असल्यामुळे एकादा दिवस पंख्याशिवाय राहणे अशक्य नव्हते. टीव्हीचे जास्त अॅडिक्शन बरे नाही असे म्हणताच माझ्या कॉम्प्यूटरच्या व्यसनावर गाडी घसरली. तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायची घोषणा केली. त्यामुळे मला बराचसा मोकळा वेळही मिळाला.

कपाटांमधले सामान काढून ते आवरायला घेतले. त्यात काही जुने फोटो, पत्रे वगैरे मिळाली. त्यांनी मला भूतकाळाची सफर घडवून आणली. नजरेआड गेलेल्या काही उपयोगाच्या किंवा शोभेच्या वस्तू गवसल्या. त्या नव्याने मिळाल्याचा आनंद झाला. शीतकपाटाचे मुख्य यंत्र (रेफ्रिजरेटरचा कॉम्प्रेसर) थंड पडल्यामुळे त्यातले तपमान वाढायला लागले. त्यातले उरलेसुरले आइसक्रीम वाया जाऊ नये म्हणून खाऊन फस्त केले आणि फळांचे रस (फ्रूट ज्यूस) पिऊन टाकले. ज्यांच्या टिकण्याबद्दल शंका होती अशी काही फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ बाहेर काढले. "आम्ही सारे खवय्ये" आणि "खाना खजाना" या कार्यक्रमांच्या गेल्या दोन तीन आठवड्यातल्या भागात पाहिलेल्या काही रेसिपीजचे प्रयोग त्यांच्यावर करून पाहिले. कुठलाही तिखटमिठाचा पदार्थ चांगला खरपूस भाजला किंवा तळला तर मस्तच लागणार आणि कुठल्याही गोड पदार्थात मुबलक बदाम, काजू, बेदाणे वगैरे घातले तर तो कशाला वाईट लागणार आहे? "शाहंशाही ताश्कंदी टिक्का", आणि "मॅजेस्टिक बव्हेरियन फज्" असली फॅन्सी नावे देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतला. थोडक्यात म्हणजे वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड देऊन जमेल तेवढी  मजा करायची असे मी या वेळी ठरवले होते. 

  .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः) 

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग ३)

मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. केबलची दुरुस्ती झाल्यानंतर ती संक्रांत बहुधा तिच्या निजधामाला परत गेली असे मला वाटले होते. पण ती इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांनी तिने पुन्हा दुसरा फटका दिला, पण संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड द्यायचे असे मी या वेळी ठरवले होते आणि मी त्यासाठी तयार राहिलो होतो. या वेळी मी दिवसभर घरीच होतो आणि तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायचा असल्यामुळे मला बराचसा मोकळा वेळ मिळाला होता. मी दर तासा दोन तासांनी खाली उतरून रस्त्यावर जात होतो आणि आमच्या बिल्डिंगच्या वीजपुरवठ्याला पूर्ववत करण्यासाठी नेमके कोणते उपाय योजले जात होते याचा मागोवा घेत होतो.

वीज कंपनीच्या कामगारांनी येऊन सगळी पाहणी केली आणि पुन्हा एकदा केबलफॉल्टच आला आहे असा निष्कर्ष काढून ते लोक परत गेले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी खणलेला खड्डा अजून भरलेलाही नव्हता. त्यानंतर आलेल्या कामगारांनी त्या खड्ड्यातली माती उकरून आधी मारलेला केबलचा जॉइंट पाहिला. तो ठीकठाकच दिसत होता. त्या लोकांनी तिथून खणायला सुरुवात करून तो खड्डा रस्त्याच्या कडेने वाढवत नेला. दीड दोन मीटर्स लांब खड्डा खणून झाल्यानंतर त्यांना केबलमधला नवा दोष (फॉल्ट) सापडला. या दोन ठिकाणांमधली खराब झालेली केबल बदलायचे ठरवून ते लोक केबलचा एक नवा तुकडा घेऊन आले. त्यांनी हा तुकडा जुन्या केबलच्या जागेवर ठेऊन त्याला दोन्ही बाजूंच्या बाकीच्या केबलशी दोन ठिकाणी नवे जॉइंट्स मारून जोडले.

आमच्या इमारतीला विजेचा पुरवठा करणारी ही केबल चौपदरी होती. मनगटाएवढ्या जाड मुख्य केबलचे जाड आणि कठीण कवच काढल्यावर आत लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या अंगठ्याएवढ्या जाड चार केबल्स होत्या. आर, वाय आणि ब्ल्यू या तीन फेजमधल्या विजेचा पुरवठा तीन रंगांच्या केबल्समधून होत होता आणि काळ्या कॉमन न्यूट्रल केबलमधून ती वीज ग्रिडकडे परत जात होती. या प्रत्येक लहान केबलमध्येसुद्धा दीडदोन मिलिमीटर जाडीच्या पंधरावीस अॅल्युमिनियमच्या तारा दाटीवाटीने बसवलेल्या होत्या. यामुळे यातली एक एक केबल एकेका सळीसारखी दिसत होती. हे लोक त्यांना एकमेकांसोबत कसे जोडणार होते ते मला माहीत नसल्यामुळे ते पाहण्याची मला उत्सुकता होती.

त्या लोकांनी अॅल्युमिनियमच्या जाडसर नळीचे बोटबोटभर लांब असे अनेक तुकडे आणले आणि दोन बाजूच्या तारा एकेका तुकड्यात दोन बाजूंनी घुसवून त्या पोकळ तुकड्याला आतल्या तारांवर हातोडीने मारून चांगले चेचून काढले. अशा त-हेने त्या दोन तारा त्या नळीच्या तुकड्यांमधून एकमेकींशी जोडल्या गेल्या. लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या तारांसाठी दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रत्येकी चार जॉइंट्स करून त्यांनी हे जोडणीचे काम केले. त्यावर इन्सुलेशन टेपचे अनेक थर गुंडाळून झाल्यावर त्यामधून विजेचा पुरवठा सुरू केला गेला. विजेवरल्या संक्रांतीचा हा अध्याय एकदाचा मिटला असे मला एकीकडे वाटत होते, पण या जुन्या केबलमध्ये आणखी कुठे कुठे नवे फॉल्ट्स निर्माण होणार आहेत ही शंकासुद्धा मनात येत होतीच.

या घटनेला दोन तीन दिवसही झाले नसतील तेवढ्यात या वर्षीच्या संक्रांतीने पुन्हा आपला तडाखा आम्हाला दिला. मात्र या वेळी तिने फक्त आमच्या फ्लॅटमधल्या विजेवरच हल्ला चढवला. एका संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला आमच्या घरातले सगळे दिवे अचानक प्रखर आणि मंद व्हायला लागले, टेलिव्हिजनवरील चित्रे थयथयाट करायला लागली, एरवी सुप्तावस्थेत पडून असलेले इन्व्हर्टरवरचे तीन लाल दिवे आलटून पालटून डोळे मिचकावायला लागले. इन्व्हर्टरमधून खस्स्स खस्स्स असे लहानसे स्पार्क पडल्याचे आवाज ऐकायला येऊ लागले. आम्ही लगेच टीव्ही बंद केला. आमच्या इन्व्हर्टरमध्येच काही लोचा झाला असावा असे गृहीत धरून त्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला असलेली सगळी बटने दाबून पाहिली, स्विचे वर खाली करून पाहिली, पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हते. एक तर घरात संपूर्ण अंधार व्हायचा, नाही तर सगळे दिवे प्रखर आणि मंद होण्याची भुताटकी व्हायची. बहुधा या वेळी संक्रांतीने तिच्या एकाद्या गणाला सोबत आणले असावे. आम्हाला क्षणभर काहीच समजेनासे झाले, तेंव्हा आमच्या नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला म्हणजे पठारांना फोन लावला. त्यातल्या त्यात सुदैवाची एक गोष्ट घडली. "इस लाइनकी सभी लाइने व्यस्त है।", "आप जिस फोनसे संपर्क करना चाहते हैं वह इस समय संपर्कक्षेत्रके बाहर है।", "डायल किया हुवा नंबर मौजूद नही है।" अशा प्रकारचा कोणताही संदेश आला नाही. चक्क पठारांनीच फोन उचलून हॅलो म्हंटले. मी लगेच त्यांना विचारले, "पठार, तुम्ही आत्ता कुठे आहेत?"
"सेक्टर १७ मध्ये" त्यांनी सांगितले.
"अहो तुम्हाला काय सांगू? आमच्या घरातले दिवे सारखे सेकंदासेकंदाला जाताय्त आणि येताय्त, इन्व्हर्टरमधून कसले कसले आवाज येताय्त. तुम्ही लगेच येऊन पाहू शकाल का? नाही तर रात्रभर आम्हाला वीजही नाही आणि इन्व्हर्टरही नाही असे झाले तर मोठे प्रॉव्लेम येतील हो."
माझ्या आवाजातली काकुळती पाहून त्यांनी लगेच यायचे कबूल केले. मी एक मेणबत्ती पेटवली आणि विजेचे मेनस्विच आणि इन्व्हर्टर या दोघांनाही बंद ठेऊन अंधारात बसून राहिलो. सांगितल्याप्रमाणे पठार आले. त्यांनी इन्व्हर्टर सुरू केला तर या वेळी तो सुतासारखा सरळ झाला होता. त्यातून येणारे चित्रविचित्र आवाज येणेही बंद झाले होते. मेन स्विच ऑन करून मात्र काही उपयोग झाला नाही. आमच्या घरातला वीजपुरवठा बंद झालेला होताच. शेजारी आणि जिन्यातले दिवे मात्र लागलेले होते.
"अहो, तुम्ही नक्की विजेचं बिल भरलं होतं ना?" या वेळी एक अविश्वासदर्शक विचारणा व्हायला हवीच होती.
"आता या अंधारात तुला रिसीट शोधून काढून आणून दाखवू का?" हर सवाल का सवाल ही जवाब हो या जुन्या गाण्याची मला आठवण झाली.
पठारांनी आमच्या घरातला कंट्रोल बोर्ड उघडून दोन तीन जागी टेस्टर टोचला आणि तिथपर्यंत सप्लाय येत नसल्याची खात्री करून घेतली. मग आम्ही दोघेही खाली उतरलो. बिल्डिंगच्या स्विचबोर्डाच्या जाळीदार कॅबिनेटचे कुलूप उघडले. तिथल्या भिंतीवरल्या बोर्डावर चौदा मीटर्स दाटीवाटीने लावलेली होती आणि त्यांचे चौदा फ्यूज खालच्या जागेत दाटीवाटीनेच बसवले होते. त्यातले आमचे मीटर आणि फ्यूज शोधून काढले. खरे तर त्यासाठी प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. त्यातली फ्यूजवायर नाहीशी झालेली होतीच, तिला जोडलेल्या तारेवरचे इन्सुलेशनही जळून काळे ठिक्कर पडले होते, शिवाय ते अजून धुमसत असल्याने जळक्या रबराचा वास दरवळत होता. त्या वायरला टेस्टरने जरासे हलवताच तिच्यातून भल्या मोठ्या ठिणग्या पडत होत्या. झोपडपट्ट्यांपासून गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांपर्यत अनेक ठिकाणी लागलेल्या आगी इलेक्टिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्या असल्याची शंका घेतल्याच्या अनेक बातम्या मी वाचल्या होत्या, पण आतापर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. या वेळी आमच्या घराकडे येणा-या मुख्य वायरमधून येणा-या मोठ्या ठिणग्या पाहिल्या आणि त्या बातम्या मला ख-या वाटायला लागल्या. जर एकादा ज्वालाग्राही पदार्थ जवळपास असता तर त्याने पेट घेणे या ठिणग्या पाहून शक्य वाटत होते. आमचे नशीब म्हणा किंवा आमचा शहाणपणा म्हणा, अशा कुठल्याही वस्तू त्या जागेच्या आसपास ठेवलेल्या नव्हत्या.

फ्यूजला जोडलेली वायर का जळली असेल? हा प्रश्न मला पडल्याने मी पठारांना विचारला. "वायरिंग जुनं झालंय्." असे एक मोघम उत्तर मिळाले. खरे तर फ्यूजने सर्वात आधी वितळून वीजपुरवठाच बंद करावा आणि इतर उपकरणांना वाचवावे असे अपेक्षित असते, मग या वेळी तसे का झाले नाही? या जागची फ्यूज कधी आणि कुणी लावली होती हेसुद्धा मला माहीत नव्हते किंवा आठवत नव्हते. त्या वेळेलाच त्यात काही तरी घोटाळा झाला असला तर आम्ही किती वर्षे असुरक्षितपणे रहात होतो याचा विचार मनात आला. पठारांनी मात्र शांतपणे जळलेला वायरचा तुकडा काढून त्या जागेवर नवा तुकडा बसवला आणि फ्यूजच्या जागी एमसीबी बसवून वीजप्रवाह सुरू करून दिला.

या घटनेला आठवडाही झाला नसेल तेवढ्यात पुन्हा एका भल्या पहाटे बाहेरून धडाड् धुडुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्याच वेळी आमच्याकडली वीज गेली असल्याचेही लक्षात आले. दोन तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या वेळी जेंव्हा असले आवाज यायला लागले होते तेंव्हा ते फटाक्यांचे आवाज असावेत असे मला वाटले होते आणि त्याच वेळी गेलेल्या विजेकडे सगळे लक्ष द्यावे लागल्यामुळे मी त्या आवाजांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र विजेच्या वारंवार जाण्याची संवय झालेली असल्यामुळे मी त्या विचित्र आवाजांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. हे आवाज जमीनीखालील केबलमध्ये होत असलेल्या भयानक स्पार्किंगमुळे निघत असल्याचे कळल्यामुळे अचानकपणे असे आवाज येणे आणि त्याच वेळी वीज जाणे यात जवळचा संबंध आहे हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले. हे सगळे जसे मला समजले तसेच ते इतरांच्याही लक्षात आले असणार. आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरच राहतात. पहाटेच्या शांत वातावरणात त्यांचे टेलिफोनवरून चालत असलेले संभाषण मला ऐकू येत होते. आमच्या घराजवळ जमीनीखाली मोठमोठे स्फोट होत असल्याचे कुणाला तरी ओरडून सांगून त्यावर ताबडतोब उपाययोजना करायला ते जोराजोरात सांगत होते. पाच मिनिटातच मोटारसायकलवर बसून एक जोडगोळी आली, त्यांनीही ते स्फोटाचे आवाज ऐकले, कदाचित ते त्यांच्या ओळखीचे असतील. त्यांनी लगेच सबस्टेशनमध्ये जाऊन आमच्या सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केला. 

सकाळी मी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडलो तेंव्हा घटनास्थळावर जाऊन पाहिले. आठवडाभरापूर्वी केलेल्या दुरुस्तीनंतर त्या केबल्सना जमीनीखाली गाडून त्यावर माती पसरलेली होती, पण वर काँक्रीटचे कवच केलेले नव्हते. खड्ड्यातली ती माती भिजून ओली किच्च झालेली दिसत होती. त्याच जागी एक टोयोटा गाडी उभी होती आणि तीदेखील भिजलेली दिसत होती. बहुधा रात्री कोणीतरी ती गाडी तिथे उभी केली होती आणि पाण्याने धुतली होती. जमीनीतले पाणी केबलच्या इन्सुलेशनच्या आतपर्यंत झिरपत जाऊन शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामधून ठिणगी पडताच त्या पाण्याची वाफ होऊन तिचा स्फोट झाला असावा. त्या स्फोटाने केबल तुटल्यामुळे आमच्याकडची वीज गेली असली तरी सबस्टेशनपासून त्या जागेपर्यंतचे सर्किट शाबूत होते. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा थोडे पाणी झिरपून इन्सुलेशनच्या आत शिरले की दुसरा स्फोट होत असेल अशा प्रकारे तो प्रकार दहा पंधरा मिनिटे चालला होता. वीजपुरवठाच बंद केल्यानंतर ते थांबले. त्यानंतर वीजकंपनीच्या लोकांनी यथावकाश येऊन पुन्हा एकदा ती केबल जोडून दिली. यावेळी मुद्दाम तिकडे जाऊन त्यांचे काम पहावेसेही मला वाटले नाही.

एकाच ठिकाणी पंधरावीस दिवसांमध्ये तीन वेळा केबव फॉल्ट आल्यामुळे वीजमंडळाच्या उच्चपदस्थांनाही त्यात लक्ष घालावेसे वाटले आणि त्यांनी ती जुनी केबलच बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्यात एक अडचण होती. आमची बिल्डिंग आणि जवळचे सबस्टेशन यांच्या मधून एक रस्ता जातो. त्या रस्त्याखालून जात असलेली केबल बदलायची असल्यास त्या रस्त्यावरील रहदारी बंद ठेऊन त्या रस्त्याच्या आरपार जाणारा खड्डा खणून काढावा लागणार. यासाठी महानगरपालिकेची परवानगी हवी. ती मिळायला खूप वेळ लागणार. यावर त्यांनी एक उपाय काढला. हे काम एका वेळी न करता ते दोन टप्प्यात करायचे असे ठरवले. त्या रस्त्याच्या आमच्या बाजूच्या कडेला एक लाल रंगाचे मोठे कपाट आणून उभे केले. त्यांच्या भाषेत त्याला केबल पिलर असे म्हणतात. या पिलरमध्ये तीन फेजेस आणि न्यूट्रल केबल्सना जोडणारे पॉइंट्स आणि फ्यूज वगैरे असतात. या पिलरपासून ते आमच्या घऱापर्यंत एक नवी केबल टाकली. पण रस्त्याच्या पलीकडल्या बाजुने आलेली केबल पिलरपर्यंत पोचू शकली नाही. यामुळे त्यादरम्यान पुन्हा एक जोड आलाच.

केबलमधला हा जोड टिकाऊ आहे असे त्यावेळी सांगण्यात आले होते, पण तो जेमतेम महिनाभर टिकला. त्यानंतर म्हणजे मागल्या आठवड्यात पुन्हा एकदा रस्त्याखालून स्फोटाचे आवाज येऊ लागले, धूर यायला लागला. वीजकंपनीच्या लोकांनी येऊन रिपेअरीचे काम केले, पण तेही फुसकेच ठरले, तीन चार तासदेखील टिकले नाही. त्यानंतर अधिक खोलवर आणि दूरवर खणून त्यांनी त्याच ठिकाणी दुसरा जोड (जॉइंट) मारला आणि जमीनीतल्या पाण्याने तो भिजू नये म्हणून तो खड्डा न बुजवता अजून तसाच ठेवला आहे. केबलसाठी हे ठीक असले तरी माणसांसाठी ते असुरक्षित आहेच. शिवाय कावळे, चिमण्या, उंदीर, घुशी, कुत्री, मांजरे वगैरे प्राणी केंव्हा त्यात जाऊन कडमडतील आणि कसले घोटाळे करून ठेवतील ते सांगता येत नाही. रस्त्याखालून आरपार जाणारी केबल बदलून हा जोड जेंव्हा नाहीसा होईल तोपर्यंत या धोक्याची टांगती तलवार शिल्लक राहणार आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास या वर्षी आमच्या घराच्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून परत गेलेली नव्हतीच.
आमच्या बिल्डिंगच्या समोरचा रस्ता खणणेही शक्य होत नव्हतेच.  त्यानंतर वीजबोर्डाच्या लोकांनी आणखी एक वेगळी युक्ती योजिली. आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला दुसऱ्या एका मोठ्या कॉलनीतल्या बिल्डिंग्ज होत्या. त्यांच्यासाठी वेगळे सबस्टेशन होते. तिथून एक लांबच लांब केबल जमीनीवरूनच आणून ती कुंपणावरून आमच्या बिल्डिंगमध्ये टाकली आणि तिच्यातून वीजपुरवठा करून दिला.     
 

 . . . . . . . . . .  . . . . . . . . (समाप्त)

Saturday, February 28, 2015

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन

पूर्वार्ध
"हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिल को बहलाने को ‘गालिब' ये खयाल अच्छा है।" असा मिर्झा गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे. या बाबतीतले माझे मतही फारसे वेगळे नाही. सौंदर्य, सुख, आनंद वगैरेची अगदी परिसीमा ज्या ठिकाणी असते ती जागा' म्हणजे 'स्वर्ग' अशी स्वर्गाची व्याख्या किंवा संकल्पना आहे. असा एक अद्भुत स्वर्गलोक आकाशात कुठेतरी असेल असे मला मुळीच वाटत नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागा असोत, आश्चर्यचकित करणारी मानवनिर्मित स्थळे असोत किंवा माणसांनी आपल्या चांगल्या वागणुकीमधून घरातच निर्माण केलेले आनंदी वातावरण असो, या सगळ्या सुंदर आणि आनंददायी जागा आपल्या पृथ्वीवरच असतात, आपल्याला त्या पहायच्या किंवा घडवायच्या असतात अशी माझी स्वर्गाची कल्पना आहे. जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्ती, मोक्ष वगैरेंचे मला कधीच कणभरही आकर्षण वाटले नाही, त्यामुळे मला आध्यात्माची गोडी लागली नाही. पण असे असले तरी मला भजनकीर्तनाचे वावडेही नाही. भक्तीरसात ओथंबलेली मधुर गीते किंवा टाळमृदुंगाच्या तालावर गायिलेले अभंग ऐकणे मला मनापासून आवडते. चांगल्या कीर्तकारांनी केलेले कथानकाचे रसाळ वर्णन हा उत्कृष्ट प्रकारच्या कथाकथनाचा (स्टोरीटेलिंगचा) नमूना आहे आणि ते कानावर पडले तर ऐकत बसावे असे मला वाटते. कीर्तनातली कथा खरी आहे की काल्पनिक वगैरेंचा विचार करून मी त्यातली मजा घालवत नाही. मजेदार कथानक, चटपटीत संवाद, त्यांचे उत्तम सादरीकरण, मध्येच कर्णमधुर संगीत, एकादा मुद्दा पटवून देण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी पारंपरिक कीर्तनात असतात. याच प्रकारच्या गोष्टीसाठी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतोच ना? शिवाय कीर्तनांमध्ये मनोरंजनाबरोबरच ज्ञानामृतही मिळते.

दहा पंधरा वर्षांपूर्वी टीव्हीवर एका विशिष्ट वेळेला ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन लागत असे. त्या वेळी मी घरी असलो तर तो कार्यक्रम पहात आणि ऐकत असे. काही लोकांना हे पाहून त्याचे आश्चर्य वाटायचे. या निमित्याने देवाचे नामस्मरण माझ्या कानावर पडेल आणि त्यातून माझा उद्धार होईल किंवा मी सन्मार्गाला लागेन असेही कदाचित काहीजणांना वाटत असे. तसा मी काही कुठल्याही वाईट मार्गाला लागलो नव्हतो किंवा पापाच्या राशी जोडत नव्हतो, पण उपासतापास, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरे मार्गाने पुण्य जोडायचा प्रयत्नही करत नव्हतो. सरळ मार्गाने चालून आपली नोकरी, कुटुंब, समाज वगैरेंसाठी माझी जी काही कर्तव्ये आणि जबाबदा-या आहेत त्या पार पाडायचा मी प्रयत्न करत असे आणि करत आलो आहे. हे काम करता करता स्वतःसाठी आनंदाचे काही कण मिळवणे आणि इतर लोकांनाही थोडा आनंद वाटणे याचाही जमेल तेवढा प्रयत्न मी करत असतो. त्या काळातली बाबामहाराजांची कीर्तने ऐकतांना त्यांचा खणखणीत आवाज, ओघवत्या भाषेमधून होत असलेले सुश्राव्य निवेदन, नर्मविनोद, रोजच्या जीवनातली उदाहरणे देणे, संतवाणीचा प्रचंड व्यासंग, अधून मधून भजनांचे सुमधुर गायन या सगळ्याचा चांगला प्रभाव पडत असे. यामुळे मला कीर्तनाचा तो कार्यक्रम ऐकायला आवडत असे. त्यातून बाबामहाराजांबद्दल कुतुहल वाटत गेले, कधी तरी त्यांचे कीर्तन प्रत्यक्षात ऐकावे अशी एक अंधुक इच्छाही मनाच्या कोप-यात कुठे तरी उगम पावली. पुढे त्या कार्यक्रमाचे टीव्हीवर प्रक्षेपण होणे थांबले किंवा मला तो पहायला वेळ मिळेनासा झाला आणि ती गोष्ट पार विस्मरणात गेली. गेली दहा बारा वर्षे बाबामहाराजाच्या नावाचा उल्लेखही इतर कोणाच्या बोलण्यातून माझ्या कानावर आला नाही.

आमच्या घराजवळ असलेल्या शंकराच्या देवळात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो. आमच्या पोस्टबॉक्समध्ये येऊन पडलेले या वर्षीच्या कार्यक्रमाचे पत्रक पाहिले, तर त्यात पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याचे वाचले. माझ्या जुन्या आठवणींवर पडलेली विस्मृतीची धूळ थोडी पुसली गेली आणि कधीकाळी मनात उठलेली इच्छा पुन्हा जागी झाली. तिची पूर्ती होण्याची संधी आता आयती माझ्यासमोर चालत आली होती. रात्रीचे जेवण जरा आधीच उरकून घेतले आणि बाबामहाराजांना एकदा प्रत्यक्षात पहावे, त्यांचे चार मधुर शब्द ऐकावे आणि परत यावे असा विचार करून मी घरातून निघालो. शिवमंदिर नजरेच्या टप्प्यात यायच्या आधीच लाउडस्पीकरवरून येणारे सामूहिक भजनाचे सूर कानावर पडायला लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यातले शब्द कळायला लागले. "शिव हालाहले तापला।" हा एकच चरण आळवून आळवून गायिला जात होता. "नामे तोही शीतल झाला।।" हा पुढचा चरणही अधून मधून त्याच्या सोबतीला ऐकू येऊ लागला.

मंदिराच्या फाटकापाशी जाऊन आत पाहिले. उत्सवातल्या कार्यक्रमांसाठी देवळाजवळ एक तात्पुरते व्यासपीठ उभारले होते. त्यावर दहा बारा टाळकरी उभे राहून भजन गात होते. समोरच्या पटांगणात जाजमे अंथरलेली होती,  त्यातल्या निम्म्याहून जास्त भागात दोनतीनशे श्रोते दाटीवाटीने बसले होते. त्यांच्या मागे थोडी जागा सोडून मागच्या बाजूला शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या मात्र पूर्णपणे भरलेल्या दिसत होत्या. शिवमंदिराच्या परिसराच्या दुस-या गेटमधून आत जाऊन पाहिल्यावर कोप-यातली एक खुर्ची रिकामी दिसली. मी तत्परतेने जाऊन तिचा ताबा घेतला. स्टेजवरचे तेच भजन अजून सुरूच होते. तो अभंग संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी या नामाचा घोष सुरू झाला. त्याला श्रोत्यांनीही साथ दिली. दहा बारा मिनिटे हरीनामाचा गजर झाल्यानंतर तो थांबला. बाबामहाराजांचा धीरगंभीर आवाज कानावर पडायला लागला.

सुरुवातीला त्यांनी त्या जागी जमलेल्या श्रोत्यांचे या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल स्वागत केले म्हणण्यापेक्षा त्यांचे अभिनंदन केले. त्यातले बरेचसे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या इतर भागांमधून वाशीला आले होते. डोक्यावर पागोटे किंवा पांढरी टोपी घालून फिरणारे मराठी लोक आमच्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत इतक्या मोठ्या संख्येने रहात असतील असे मला वाटत नव्हतेच. श्रोत्यांमधली त्यांची सोठी संख्या पाहून मला जरा नवलच वाटत होते. बाबामहाराजांच्या सांगण्यातून त्याचा उलगडा झाला. काल, परवा, तेरवा कुठे कुठे त्यांचे कीर्तन होऊन गेले आणि उद्या, परवा, तेरवा ते आणखी कुठे कुठे कीर्तन करणार आहेत याची माहितीही त्यांनी दिली. आजही त्यांचे किती भरगच्च कार्यक्रम असतात याची कल्पना त्यावरून आली. त्यांच्याकडे गडगंज वडिलोपार्जित मालमत्ता आहे, आपल्या कीर्तनासाठी ते कुणाकडेही बिदागी मागत नाहीत, हेसुद्धा त्यांनी सांगितले, ऐंशीचे वय झाले असल्यामुळे आता त्यांच्या पायात शक्ती उरली नाही, चालण्यासाठी आधाराची गरज पडते, पण त्यांना व्यासपीठावर नेऊन बसवले की मग तासन् तास अस्खलितपणे अव्याहत बोलायला मात्र काही अडचण येत नाही. त्यांना मिळालेले तल्लख बुद्धी आणि अस्खलित वाणी यांचे वरदान त्यांनी हे धार्मिक कार्य पुढे चालू ठेवावे यासाठीच देवाने अद्याप शाबूत ठेवले आहे. त्याचा उपयोग देवाच्या कामासाठी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे या भावनेने ते हा ज्ञानयज्ञ करत आहेत असेही त्यांनी सांगितले. देवाविषयी असलेल्या भक्तीभावानेच सारे श्रोते जमलेले असल्यामुळे त्यांनीही शांत राहून मनोभावे या कीर्तनाचे श्रवण करावे, गडबड गोंधळ किंवा हालचाली करून त्यात व्यत्यय आणू नये, मध्येच उठून जागा बदलू नयेत किंवा बाहेर जाऊ नये वगैरे सूचना केल्या. शिवाय असे केल्यास तो बाबामहाराजांचा नव्हे तर प्रत्यक्ष देवाचा अपमान केल्यासारखे होईल अशी भीतीही घातली. लहान मुलांना हे समजण्यासारखे नसल्यामुळे त्यांची चुळबुळ चालली होती. त्यांनी यापेक्षा घरी जाऊन टीव्ही पहावा, भारत पाकिस्तानची मॅच पुन्हा दाखवत आहेत ती पहावी असेही त्यांनी गंमतीने सांगितले.

 . . . . . .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . 

उत्तरार्ध

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे हे सुश्राव्य कीर्तन एका शिवमंदिरात चाललेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये चालले होते. विठ्ठलभक्त वारकरी सांप्रदायातले बाबामहाराज आज शिवलीलेच्या कोणत्या कथेचे आख्यान लावणार आहेत याची मला उत्सुकता वाटत होती. पण कीर्तन सुरू झाल्यानंतर काही वेळाने लक्षात आले की हरिनाम हाच त्यांच्या या कीर्तनाचा विषय होता. "शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।" अशा प्रकारे त्यात शंकराचा नावापुरता उल्लेख आला होता. कुठल्याही देवाचे किंवा परमेश्वराचे नाव घेणे का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी वळणावळणाचा मार्ग निवडला होता.

आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही म्हणून काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी डोळ्यांना दिसतातच असे नाही या सत्याचा आधार घेऊन त्यातून देवाचे अस्तित्व पटवून देण्याचे अनंत तर्क सांगितले जातात. आपल्या आजूबाजूच्या हवेपासून ते प्राध्यापकाच्या मेंदूपर्यंत याची अनेक उदाहरणे मी आजवर ऐकली आहेत. "आपल्याला हवा दिसते का? पण ती असते हे आपल्याला माहीत आहे. याचप्रमाणे देव डोळ्यांना दिसत नसला तरी तो असतो.", "आपल्या या (नास्तिक) प्रोफेसराचा मेंदू कुणी पाहिला आहे का? नाही ना? मग कशावरून त्याच्या डोक्यात मेंदू आहे?" वगैरे वगैरे. बाबामहाराजांनी त्यांच्या कीर्तनात एक वेगळे उदाहरण दिले. ते म्हणाले, "मी आज तुम्हा सगळ्यांना पाहतो आहे, तुमच्यातल्या कुणाच्याच बापाला मी कधी पाहिले नसेल, पण त्यांच्या असण्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, त्याबद्दल मला जरासुद्धा शंका नाही. मग ज्या देवाने सर्व जगाला जन्माला घातले त्याच्याबद्दल कोणाला का शंका असावी?"

बापावरून सांगतांना बापाचे नाव न घेतल्याने एकदा काय घोटाळा झाला याची एक गोष्ट त्यांनी सांगितली. एका माणसाचे त्याच्या म्हाता-या बापाशी पटत नव्हते. एकदा त्या दोघांमध्ये खडाजंगी वाद झाला आणि "आता मी तुमचे नावदेखील लावणार नाही बघा." असे तणतणत ते माणूस घराबाहेर पडला आणि ऑफीसला गेला. तो नेमका पगाराचा दिवस होता. पगार घेण्यासाठी तो माणूस कॅशियरकडे गेला. कॅशरने त्याला सही करायला सांगितले. त्याने त्याच्या सहीमघले बापाचे नाव गाळून सही केली. कॅशियरने त्याला पैसे दिले नाहीत. त्याची सही रेकॉर्डशी मॅच होत नाही असे म्हणाला. तो माणूस तणतणला, कॅशियरशी भांडला, "इथे माझा बाप काम करतो का? मी केलेल्या सामाचे पैसे मला मिळायला नकोत का?" वगैरे वगैरे. कॅशियरने नियमांवर बोट ठेवले आणि आपण त्यात बदल करू शकत नसल्याचे सांगितले.

तो माणूस चिडून मोठ्या बॉसकडे गेला, त्याच्याकडे कॅशियरची तक्रार केली. बॉसने त्याला त्याचे नाव विचारताच त्याने पुन्हा बापाचे नाव वगळून फक्त आपले नाव व आडनाव सांगितले. त्यावर साहेबाने त्याला समजावले, "हे पहा, तू नोकरीला लागलास त्या वेळी आपले पूर्ण नाव दिले होतेस आणि तशी सही केली होतीस. तुझ्या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये (सर्टिफिकेट्समध्ये) तुझे तेच पूर्ण नाव लिहिलेले आहे. यामुळे तुझी हीच अधिकृत ओळख (आयडेंटिटी) आहे. तुझ्या आयडेंटिटी कार्डवर हेच नाव आणि सही आहे. तुझे नातेवाईक, जुने शेजारी, गावातले लोक तुला अमक्या माणसाचा मुलगा म्हणून ओळखतात. तू बापाचे नाव टाकलेस तरी तुमचे नाते नाहीसे होणार नाही. तुझी आतापर्यंतची ओळखच शिल्लक राहील. ती नको असेल तर तुला ही नोकरी, हे गाव वगैरे सोडून दूर कुठे तरी जावे लागेल. त्यापेक्षा हा हट्ट सोड आणि नीट सही करून तुझा पगार घेऊन जा."

हे सांगून बाबामहाराज म्हणाले, "पाहिलेत? आपल्या बापाचे नाव सोडले तर त्या माणसाचा पगार थांबला, नोकरीवर गदा आली. त्यातून त्यालाच राग आला, दुःख झाले, मनस्ताप झाला. त्याने ते घेतले आणि त्याला पुन्हा सगळे मिळाले, त्याचे मन शांत झाले. तुम्ही देवाचे नाव घेतले नाही म्हणून तो नाहीसा होणार नाही, तरीसुद्धा तो तुमची काळजी वहातच राहणार आहे, पण त्याचे नाव घेतलेत तर तुम्हालाच अपूर्व मनःशांती मिळणार आहे.."

हा धागा धरून त्यांनी आपली कथा मूळपदावर आणली आणि पुढले निरूपण चालू ठेवले. "शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।" या अभंगाचा संदर्भ एका पौराणिक कथेशी आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मेरू पर्वताची रवी करून तिला वासुकी नागाची दोरी गुंडाळली. एका बाजूला देव आणि दुस-या बाजूला दानव यांनी तिला धरून क्षीरसमुद्रात चांगले घुसळले. या मंथनात समुद्रामधून चौदा रत्ने बाहेर निघाली. हलाहल विष हे त्यातले एक होते. देव आणि दानव यांच्यापैकी कोणीच ते घ्यायला तयार नव्हते. त्या जालिम विषाने सगळी सृष्टी नष्ट होण्याचा धोका होता. त्या वेळी सर्वांनी भगवान शंकराची आराधना केली. ते प्रगट झाले आणि त्यांनी ते विष प्राशन केले. त्या विषाच्या प्रभावामुळे त्यांचा गळा निळा पडला म्हणून शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. ही सगळी कथा थोडक्यात सांगून कीर्तनकारांनी पुढे सांगितले की या वेळी नीलकंठ शंकराच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो कसा थांबवावा यावर त्यांना नामसंकीर्तनाचा उपाय सापडला. श्रीराम श्रीराम श्रीराम असा जप केल्याने त्यांना शीतलता प्राप्त झाली म्हणे. इतक्या भयंकर प्रसंगावर जर जप करण्याने मात करता येत असेल तर आपल्या जीवनात आपल्याला डिस्टर्ब करणा-या लहान सहान कारणांवर ही मात्रा खचित लागू पडणार नाही का? असा युक्तीवाद त्यांनी केला.

शंकराने हा मंत्र सुरुवातीला कोणालाही न सांगता आपल्याजवळच ठेवला होता, पण जगाच्या कल्याणासाठी तो सर्वांना कळणे आवश्यक होते. हे कसे झाले याची एक कथा बाबामहाराजांनी सांगितली. शंकरभगवान कैलास शिखरावर एकांतात बसून हा जप करायचे आणि त्यातून त्यांना अपूर्व आनंद मिळायचा हे एकदा नारदमुनींनी पाहिले आणि त्यांच्या संवयीप्रमाणे कळ लावायचे ठरवले. त्यांनी पार्वतीकडे जाऊन तिला विचारले, "तुमचा नवरा तुमच्यावर खरेच प्रेम करतो का हो?"
पार्वती म्हणाली, "अर्थातच. तुम्हाला अशी शंका का आली?"
"तसे नाही, पण तुम्ही एकदा त्याची परीक्षा करून पहाल का?"
"त्यासाठी मला काय करायला हवे?"
"त्यांना विचारा की त्यांना कशामधून सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. ते ही गोष्ट सांगतात का? हे पहा."
शंकर भगवान परत आल्यानंतर पार्वतीने त्यांना हा प्रश्न विचारला. शंकराला नामस्मरणाचे गूढ गुप्तच ठेवायचे होते. त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून त्या दोघांची जुंपली. अखेर शंकराने हार मानली आणि हा मंत्र पार्वतीला सांगितला. तिथून तो सर्वांमुखी झाला.

ही गोष्ट सांगतांना बाबामहाराजांनी पदोपदी काँटेंपररी (आजच्या काळातली) उदाहरणे देऊन त्यात रंजकता आणली. समुद्रमंथनाची गोष्ट सांगतांना ते म्हणाले, कुठल्याही (विचार) मंथनामधून जो (यशाचा) लोण्याचा गोळा निघतो तो ह़डपण्यासाठी सगळे हपापलेले असतात, पण त्यातून अपयशाचे कडवट द्रव निघाले तर ते एकमेकांवर ढकलत असतात. ते पिऊन पचवण्यासाठी एकादा खंबीर नीळकंठच पुढे येतो आणि तो पुढे सर्वांच्या आदराचा धनी होतो. शंकराला भोळासांब म्हणतात, पण तो भोळा बिळा नव्हता, कुठलाच नवरा नसतो, पण घरात शांतता रहावी म्हणून बावळटपणा दाखवतो. कुठलेही गुपित एकदा बायकोला कळले की ते गुपित रहाणार आहे का? ही काही उदाहरणे झाली.

श्रीराम हा अवतार फारच आदर्श होता, त्याच्यासारखे असामान्य आचरण करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. त्या नंतरचा कृष्ण अवतार लोकांना थोडा जवळचा वाटण्यासारखा होता. विशेषतः त्याचे गोकुळातले बालपण, त्यातला निरागस खोडकरपणा, गोपिकांशी रचलेल्या रासलीला वगैरे गोष्टी मनमोहक होत्या. या दोन्ही अवतारातले मुख्य कार्य दुष्टांचे निर्दाळन हे होते. विठ्ठलावतारातला देव फक्त भक्तांच्या कल्याणासाठी कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा राहिला. रामाच्या हातात धनुष्यबाण तर कृष्णाच्या तर्जनीवर सुदर्शन चक्र असायचे. विठ्ठलाच्या किंवा हरीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. या तीघांची सांगड घालून तयार झालेला रामकृष्णहरी हा मंत्र संत तुकारामांना मिळाला आणि त्यांनी तो वारकरी पंथाला दिला. गेली चारपाचशे वर्षे तो पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीतल्या माळकरी वारक-यांना दिला जात आला आहे आणि त्या पंथातले लोक या मंत्राचा नियमितपणे जप करीत आले आहेत. वगैरे माहिती त्यांनी दिली.

बाबामहाराजांनी केलेल्या कीर्तनाचे माझ्या लक्षात आलेले आणि आठ दिवसानंतर टिकून राहिलेले सार देण्याचा एक तोकडा प्रयत्न मी या लेखात केला आहे. कीर्तन संपल्यावर त्यांनी असे आवाहन केले की ज्या लोकांना वारकरी होण्याची इच्छा असेल, किंवा निर्माण झाली असेल त्यांनी लगेच पुढे येऊन त्यांच्यापाशी यावे. त्यांच्या हस्ते त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यात येईल. त्यानंतर त्यांनी काही नियम पाळायचे आहेत. रोज सकाळी गुरुमंत्राचा उच्चार करायचा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, वर्षातून एकदा पंढरीची आणि आळंदीची वारी करायची आणि एकदा दुधिवरे गावी बाबामहाराजांनी उभारलेल्या देवस्थानाचे दर्शन घ्यायचे वगैरे सोपे नियम पाळायचे.

मी आपला मागच्या पावलांनी परत फिरलो आणि घरी गेलो.  .

Wednesday, February 18, 2015

जुगाड पुराण (भाग ३)





कसलाही एक जुना सांगाडा घ्यायचा किंवा जोडतोड करून तयार करायचा, त्याला चाके लावायची आणि एक इंजिन बसवायचे अशा प्रकारे बनवलेली खतरनाक जुगाडे गाड्या म्हणून रस्त्यावरून जातांना कधी कधी दिसतात. पण काही वेळा याच्या विरुद्ध प्रकारदेखील पहायला मिळतात. एका ठिकाणी गायीम्हशींच्या गोठ्यासमोर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनाच्या शक्तीचे दोहन वेगळ्याच कामासाठी होत असलेले पहायला मिळाले. त्या काळात त्या लहानशा आडगावी पराकाष्ठेचे भारनियमन (लोडशेडिंग) चाललेले होते. दिवसातून कधी तरी अचानक वीज यायची आणि काही वेळाने आली तशीच एकदम गुल व्हायची. इमर्जन्सीसाठी लोकांनी घरोघरी इन्हर्टर लावलेले होते, पण वीज आलेली असतांना त्यांची बॅटरी जेवढी चार्ज होत असे तेवढी संपून जायलाही जास्त वेळ लागायचा नाही. त्यानंतर मेणबत्त्या आणि कंदिलांच्या मिममिणत्या उजेडात विजेची आराधना करत वाट पहात बसावे लागायचे. आमच्या यजमानांनी यावर तात्पुरता उपाय म्हणून कुठून तरी एक जनरेटर आणून गोठ्याजवळच्या एका कट्ट्यावर ठेवला होता आणि समोर उभ्या केलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनाला बेल्टने जोडला होता. दिवसातून दोन तीन वेळा त्या जनरेटरचा उपयोग करून इन्वर्टरची बॅटरी चार्ज केली जात होती आणि तिच्यामधूनन मिळणा-या विजेवर घरातले काही दिवे लावले जात होते आणि पंखे चालवले जात होते. मुंबईपुण्याकडून आलेल्या आमच्यासारख्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही खास व्यवस्था केली गेली होती. शेतातल्या विहिरीवरील पंप, कापलेल्या पिकाची मळणी करणारे यंत्र किंवा उन्हाळ्यात घराला थंड हवा पुरवण्यासाठी खिडकीत बसवलेल्या जंगी कूलरचा अवाढव्य पंखा यांना चालवण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टरच्या इंजिनाचा उपयोग केला जात असतांना मला पहायला मिळाला आहे.

खेडेगावांमध्ये यथायोग्य साधनांचा अभाव आणि कल्पकतेने त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न यातून अशा प्रकारच्या जुगाडांचा जन्म होतो. वर दिलेल्या पहिल्या चित्रात एका मोटारसायकलीच्या चाकाला पाण्याच्या पंपाला जोडलेले आहे, तर दुस-या चित्रात सायकलीचे पॅडल मारून पिठाची चक्की फिरवली जात आहे. मध्यंतरी एक मजेदार बातमी वाचली. हातापायांचा व्यायाम करण्याची जिममधली यंत्रे एका हॉटेलात बसवली होती म्हणे आणि त्या यंत्रांना जनरेटर्स जोडून त्यातून निर्माण होणारी वीज त्या हॉटेलमध्ये वापरली जात असे. पैसे भरून महागड्या जिममध्ये जाण्याऐवजी लोकांनी एक दमडी खर्च न करता या हॉटेलात जावे, हवा तेवढा वर्कआउट करून घ्यावा आणि वर फुकट नाश्तापाणी करून घ्यावा अशी योजना तिथे होती. ती किती काळ चालली ते काही समजले नाही, पण या जुगाडाची कल्पना मजेदार होती.

भारतात इंग्रजांचे राज्य असतांना इथल्या देशी लोकांपेक्षा ते लोक किती वेगळे आहेत हे दाखवण्याची त्यांना खूप हौस असायची, त्यांच्या वागण्यामधून ते नेहमी दिसत असे. क्रिकेट नावाचा खास साहेबी खेळ त्यांनी इकडे आणला. त्यातले सगळे खेळाडू परीटघडीचा पांढरा शुभ्र पोशाख नखशिखांत परिधान करून मैदानावर उतरायचे आणि त्यावर जास्त डाग पडू नयेत याची काळजी घेत ते लोक हा खेळ बहुतकरून उभ्या उभ्या खेळत असावेत. खास डगले आणि टोपी घातलेले दोन अंपायर मैदानावरल्या त्यांच्या विशिष्ट जागी येऊन तिथे खांबासारखे उभे रहायचे आणि तिथूनच विशिष्ट प्रकारचे हातवारे करत रहायचे. बॅट्समनने कुठे उभे रहायचे, बॉलरने कसे बॉल टाकायचे, फील्डरने त्या चेंडूंना कसे झेलायचे वगैरे क्रिया आणि बॅट, बॉल, स्टंप्स, पिच, क्रीज वगैरे गोष्टींची लांबी, रुंदी नेमकी किती असायला हवी या सगळ्यांसाठी त्यांचे सतराशे साठ नियम असायचे. नेहमी इंग्रजांच्या संपर्कात असणारे किंवा त्यांचे अनुकरण करणारे राजेरजवाडे, नबाब, इंग्रजांचे मुलकी किंवा लष्करी अधिकारी वगैरे बडी मंडळी हे सगळे नियम पाळून हा इंग्रजांचा खेळ खेळतही असत. त्यातून त्यांना किती थरार किंवा आनंद मिळत असे हे सुद्धा त्यांच्या परीटघडी केलेल्या चेहे-यावर दिसले तरी ते जंटलमनपणाच्या मर्यादेत असावे यासाठी त्यांना ते जरा जपूनच व्यक्त करावे लागत असावे.

देशातल्या आपल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः लहान मुलांनी मात्र या खेळाला जुगाडू वृत्तीची नवी परिमाणे देऊन त्याला आपलेसे करून टाकले. इंग्रजांच्या मूळ क्रिकेटचे पाच दहा ढोबळ नियम घेऊन आणि बाकीचे सगळे धाब्यावर बसवून किंवा आपापसात वेगळे कायदे ठरवून हा खेळ गल्लीबोळातून, चाळीमधल्या मोकळ्या जागेत, इतकेच काय भररस्त्यांवरसुद्धा खेळला जाऊ लागला, हुतूतू, खोखो, कुस्ती यासारख्या अस्सल भारतीय खेळांपेक्षासुद्धा हे जुगाड क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले जाऊ लागले आणि त्यातून सर्वांनी अमाप आनंद लुटला. आजही तो अशाच उत्साहाने जिकडे तिकडे बेधडक खेळला जातो. या खेळाच्या सध्याच्या जुगाडांमध्ये कसलाही चेंडू, कुठलीही फळी, पुठ्ठा, बांबूचे तुकडे आणि विटांचा ढीगदेखील कसा उपयोगाला आणला जातो हे वरील चित्रातच पहावे.

गेली कित्येक शतके पाहता इंग्लंड आणि अमेरिकेतल्या दोन दोन राजकीय पक्षांमध्ये दरवेळी चुरशीच्या निवडणुका होऊन त्यातल्या विजयी पक्षाचा राज्यकारभार त्या देशांमध्ये चालत आला आहे. स्वतंत्र झालेल्या भारतात सुरुवातीच्या काळातली बरीच वर्षे काँग्रेस पक्षाचे एकछत्री राज्य होते. त्या पक्षाची शकले झाल्यानंतर गेली अनेक वर्षे अनेक पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन या देशाचा राज्यकारभार चालवला आहे. किंबहुना असे म्हणण्यापेक्षा कदाचित असे म्हणता येईल की काँग्रेस किंवा भाजप या मुख्य पक्षांनी परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या भिन्न पक्षांचा टेकू (आधार) घेऊन आपला गाडा कसाबसा रेटला आहे. या राजकीय जुगाडांमधला कधी एक टेकू निसटायचा तर कधी दुसरा निखळून पडायचा, मग त्यावेळी तिसरा किंवा चौथा शोधून त्या जागी बसवायचा, काही वेळा पुन्हा पहिल्याला घासून पुसून जागेवर ठेवायचे असे सगळे गेली अनेक वर्षे चालत आले आहे. नावे घेऊ नयेत, पण ज्या नेत्यांना हे कौशल्य जमेल असे पक्षातल्या लोकांना वाटले त्यांना पंतप्रधानपदी बसवले गेले, ज्यांनी ते जुगाड यशस्वीपणे सांभाळले ते टिकले आणि ज्यांना हे काम जमले नाही ते स्वतःच कोसळले. या जुगाडू राजकारणाचे अनेक तोटे झाले असतील, पण देशात संपूर्ण अनागोंदी माजली नाही, बरीचशी काम होत राहिली, देशाची प्रगती होत राहिली हे देखील कमी महत्वाचे नाही.    

जुगाडांबद्दल लिहायचे झाल्यास आमीरखानच्या थ्री ईडियट्स या सिनेमाचा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. त्यातल्या रँचो या मुख्य पात्राचा या सिनेमाच्या सुरुवातीच्या भागात प्रवेश होताहोताच तो एक झटपट जुगाड रचून त्याच्या हॉस्टेलमधल्या रॅगिंग करायला आलेल्या एका गुंड सीनीयरला विजेचा जोराचा झटका देतो. त्यानंतरचे दोन तास तिथला डीन असलेल्या व्हायरसला तो आपल्या निरनिराळ्या जुगाडू प्रयोगांनी सळो की पळो करून सोडतो आणि पाऊसपाणी व वादळवा-यामुळे घरात अडकून पडलेल्या एका अडलेल्या गर्भवती महिलेचे बाळंतपण जुगाडांच्या पराकाष्ठेने करून अखेर सगळे ऑल ईज वेल् करून देतो. या अद्भुत कामगिरीसाठी त्या रँचोला जुगाडसम्राट, जुगाडशिरोमणी, जुगाडविभूषण किंवा जुगाडरत्न असा एकादा खिताब द्यायला हवा.

तर असे आहे हे जुगाडपुराण! जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्या माणसाकडे अडचणींशी झगडून त्यांच्यावर मात करण्याची झुंजार वृत्ती आहे, ते करण्यासाठी लागणारी कल्पकता आहे, धारिष्ट्य आहे, तोपर्यंत निरनिराळ्या स्वरूपांची जुगाडे होतच राहणार आहेत. जय जुगाड ! 

.  . . . . . . . . . . .. (समाप्त)


Friday, February 13, 2015

जुगाड पुराण (भाग २)


आमच्या विद्युत्केंद्रांच्या उभारणीसाठी लागणारी यंत्रे आणि साधने (इक्विपमेंट) यांच्या भागांना (पार्ट्सना) आकार देण्याचे काम कारखान्यांमधल्या विविध यंत्रांकडूनच केले जात असते. त्या पार्ट्सना लेथ, मिलिंग, प्लेनिंग, बोअरिंग आदि मशीन्स, प्रेस वगैरें यंत्रांवर विशिष्ट आकार देऊन झाल्यावर ग्राइंडिंग, होनिंग, लॅपिंग यासारख्या काही प्रक्रियांनी त्यांचेवर अखेरचा हात फिरवून त्यांना टॉलरन्स लिमिट्समध्ये आणले जाते आणि अधिक गुळगुळितपणा व झळाळी दिली जाते. ही कामे सुकर करणे, त्यांचेसाठी लागणारा वेळ वाचवणे आणि कारखान्यांमधील यंत्रांची रेंज (आवाका) व अॅक्युरसी (अचूकता) यात वाढ करणे इत्यादि कामांसाठी निरनिराळी जुगाडे (फिक्स्चर्स) डेव्हलप केली जातात. अर्थातच या प्रकारच्या जुगाडांचा रोल उपयुक्त असला तरी तसे पाहता तो दुय्यम किंवा पूरक असतो.

पॉवर प्रॉजेक्ट्सच्या बहुतेक सर्व इक्विपमेंटना साईटवरील त्याच्या विवक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्याचे काम मात्र मुख्यतः मॅन्युअली म्हणजे मजूरांकडूनच करून घ्यावे लागते आणि त्यात जुगाडांचा उपयोग भरपूर प्रमाणात होत असतो. त्या सगळ्या सामुग्रीला ट्रेलरमधून उतरवून घेण्यापासून त्यांना त्यांच्या जागेवर नेऊन ठेऊन त्यांची एकमेकांशी जोडणी करण्याचे काम करतांना क्रेन्स वगैरे यंत्रांची थोडी फार मदत मिळते, पण काही भागात क्रेन उपलब्ध नसते किंवा असली तरी ती पुरेशा क्षमतेची नसते. क्रेन्स या यंत्रांची उभारणी करण्यापूर्वी तर त्या जागी काहीच सोय नसते. ही इक्विपमेंट निरनिराळ्या आकारांची असतात. त्यानुसार त्यांना ओढून नेण्यासाठी तात्पुरत्या गाड्या (ट्रॉल्या) तयार करतात, जमीनीवर तात्पुरते रूळ बसवतात किंवा पोलादी प्लेट्स अंथरतात, त्या इक्विपमेंटना ओढण्यासाठी किंवा उचलण्यासाठी चेन पुली ब्लॉक्सचा किंवा हॉइस्ट्सचा उपयोग करतात, त्यांना जाडजूड दोरखंड किंवा साखळदंडांनी जकडतात, या साधनांना अडकवण्यासाठी इमारतीच्या खांबांवर (कॉलम्सवर) आणि छताखाली तात्पुरते ब्रॅकेट्स जोडतात आणि ते काम करण्यासाठी मोठमोठी स्कॅफोल्ड्स उभारतात. या इक्विपमेंट्सची आधी बांधून ठेवलेली फाउंडेशन्स आणि प्रत्यक्षात येऊन पोचलेली सामुग्री यात कधीकधी फरक असतो, त्यासाठी आयत्या वेळी काही बदल करावे लागतात. या यंत्रांना विजेचे कनेक्शन, पाइपांची जोडणी वगैरे करायची असते. अशा प्रकारची कामे करणा-या मजूरांना रिगर असे नाव आहे. जुगाड या शब्दाला जसा फारसा मान दिला जात नाही तसेच रिगरच्या बाबतीत होत असते. 'रिग' म्हणताच आपल्या डोळ्यासमोर 'बोगस मतदान' येते. 'इंजिनियर्ड' या शब्दाचा उपयोग पूर्वनियोजित घातपात किंवा दंगल यासारख्या घटनांसाठी केला जातो आणि 'डॉक्टर्ड रिपोर्ट' हा नेहमी फेरफार केलेला असतो. तसाच हा प्रकार आहे.     

या रिगर्सचे बहुतेक काम 'जुगाड' याच सदरात मोडते. तात्पुरत्या ट्रॉल्या, ब्रॅकेट्स, स्कॅफोल्डिंग वगैरे सगळे काही त्यांचे काम संपल्यावर उचकटून टाकण्यात येते, काही काळानंतर त्यांचे नामोनिशाण शिल्लक रहात नाही. यामुळे त्या गोष्टी तयार करतांना कुठले रॉ मटीरियल (कच्चा माल) वापरले, ते कुठून आणले वगैरेंची जन्मकुंडली मांडली जात नाही. बहुतेक वेळा स्टोअर यार्डमध्ये मिळतील ते अँगल्स, चॅनेल्स, बीम्स, प्लेट्स, पाइप, ट्यूब वगैरेंना कापून आणि त्या तुकड्यांना जोडून ही जुगाडे तयार केली जातात आणि उपलब्ध असतील ते नटबोल्ट वापरून ते जोडले जातात. त्यांचे स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रेस अॅनॅलिसिस वगैरे केले जात नाही, अंदाजानेच त्यांना भरपूर मजबूत केलेले असते. त्यांचे आकार अनुभव आणि अंदाजाने ठरवले जातात. मिळतील ते पाइप, बांबू, काथ्या, दोरखंड वगैरेंचा उपयोग करून स्कॅफोल्डिंग बांधले जाते. या सगळ्या गोष्टींची तपासणीही जुजबीच होते, यातल्या कशाचाच कायमस्वरूपाचा रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसते, त्यांची काही रफ स्केचेस असली तर असतील, पण त्यांची रीतसर डीटेल ड्रॉइंग्ज सहसा तयार केली जात नाहीत. या सगळ्या बाबतीत रिगर्सच्या गँगचे अनुभवी फोरमन जागच्या जागी निर्णय घेऊन लगेच त्याची अंमलबजावणी करत असतात.

यातही काही लोक प्रचंड प्राविण्य संपादन करतात. आमच्या पॉवर प्रॉजेक्ट्सवर काम करणारा डिंगी नावाचा एक कुशल माणूस होता. त्याची शैक्षणिक पातळी किती होती कोण जाणे, पण त्याची आकलनशक्ती आणि निरीक्षणशक्ती जबरदस्त होती, तसेच कल्पकता वाखाणण्याजोगी होती, त्याच्या कामाचा उरक दांडगा होता. मोठमोठी अवजड यंत्रसामुग्री इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी काय करावे लागेल, काय केल्यावर त्याचे काय परिणाम होतील वगैरेचे अचूक अंदाज तो करत असे. त्या मौल्यवान यंत्रसामुग्रीला किंचितही धक्का न लागू देता तिला सुरक्षितपणे विवक्षित जागेवर नेऊन ठेवणे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन तो झपाटल्यासारखा कामाला लागे, एकामागोमाग एक जुगाडे तयार करून ते अवघड किंवा काही वेळा अशक्य वाटणारे काम पाहता पाहता उरकून टाकत असे. त्याच्या कौशल्याची ख्याती पसरत गेली आणि एका पाठोपाठ एक निरनिराळ्या प्रॉजिक्ट्सवरील महत्वाच्या इक्विपमेंटच्या उभारणीसाठी त्याला आवर्जून बोलावून घेण्यात येऊ लागले. त्याच्यासारखा दुसरा जुगाडू मला तरी कुठेच दिसला नाही. त्याला श्रमवीर वगैरे कोणता पुरस्कार मिळाला होता की नाही ते मला माहीत नाही, पण तो मिळण्याची पात्रता त्याच्यात नक्कीच होती.






रस्त्यावरून धावणारी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा त्याहून अधिक चाकांवर चालणारी बहुतेक सगळी म्हणजे स्कूटर्स, बाइक्स, मोटारी, ट्रक्स, ट्रेलर्स वगैरे वाहने मोठमोठ्या अधिकृत कारखान्यांमध्ये तयार केली जातात, त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतरच त्यांची निर्मिती करण्यात येते. त्यांना बाजारात आणण्यासाठी परवानगी मिळते. त्या वाहनांना रस्त्यावर धावण्यासाठी आरटीओसारख्या ऑफिसमधून लायसेन्सेस घ्यावी लागतात. असे सगळे असले तरी काही लोक एकाद्या रस्त्याकडेच्या वर्कशॉपमध्ये काही कामचलाऊ जुगाडू वाहने तयार करतात. कुठले तरी इंजिन, दुसराच कसला तरी सांगाडा, तिसरीच चाके यांना एकमेकांना जोडून येन केन प्रकारणे तयार केलेल्या काही खटारगाड्यासुद्धा ग्रामीण भागातल्या रस्त्यावरून धांवतांना आपल्याला काही वेळा दिसतात. मात्र त्यांना अशा प्रकारे तयार करणा-या जुगाडू लोकांच्या कल्पकतेचे कौतुक करावे की रस्त्यावरून जाणा-या इतर वाहनांना किंवा पादचा-यांना त्यातून धोका निर्माण करण्यासाठी त्यांचा धिक्कार करावा असा अवघड प्रश्न मनात पडतो.

 . . . . . . .  . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

Tuesday, February 10, 2015

जुगाड पुराण (भाग १)



आपल्या ओळखीतले काही लोक केंव्हा ना केंव्हा उत्तर भारतात राहिले असतात किंवा अधून मधून तिकडे जात येत असतात, तर काही लोक इथेच रहात असले तरी काही ना काही कारणाने उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कात आलेले असतात. त्यांच्याशी होत असलेल्या संभाषणामध्ये 'जुगाड' या शब्दाचा उपयोग इतक्या वेळा होत असतो की हा शब्द या सगळ्यांच्या चांगल्या ओळखीचा वाटतो. या सर्वसमावेशक शब्दाला चपखल असा प्रतिशब्द मला तरी मराठीत किंवा इंग्रजीत सापडत नाही. माझ्याशी नेहमी मराठी किंवा इंग्रजी भाषेत बोलणा-या कित्येक लोकांच्या बोलण्यातसुद्धा जुगाड या शब्दाचा एवढ्या वेळा उल्लेख येतो की कधी कधी मला हा शब्द त्या त्या भाषांमधलाच वाटतो. तसा तो सध्या कदाचित नसला तरी माझ्या मते या भाषांमध्ये त्या शब्दाचा समावेश करायला हरकत नसावी. त्यामुळे या भाषा समृद्धच होतील. या जुगाडांची व्याप्ती एकादे साधेसुधे औजार किंवा पैशाची तात्पुरती व्यवस्था इतक्या क्षुल्लक बाबींपासून ते थेट केंद्रातल्या मंत्रीमंडळाच्या जोडणीपर्यंत झालेली दिसते. ज्यांनी हा शब्द अजून ऐकला नसेल अशा लोकांना मात्र "हे जुगाड म्हणजे असते तरी काय?" असा प्रश्न कदाचित पडेल.

'जुगाड' या शब्दाचा अनेक प्रकारे उपयोग केला जात असतो. त्याचा अगदी सर्वसामान्य अर्थ म्हणजे 'कामचलाऊ उपाय किंवा उपाययोजना'. पण तो उपाय किंवा ती योजना त्यांच्या सर्वसामान्य रूढ उपयोगापेक्षा वेगळ्या असायला मात्र हव्यात. जुगाडाला एक पर्यायी व्यवस्था म्हंटले तर ती 'व्यवस्थित' असण्यापेक्षा तशी नसण्याचीच जास्त शक्यता असते. त्याच्या वैधतेत आणि विश्वासार्हतेत संदिग्धपणाची छटा असते. सुव्यवस्थित चाकोरीबद्ध पद्धतीने काम करण्याऐवजी त्यासाठी एकादे 'जुगाड' वापरणे काही लोकांना कमीपणाचे किंवा काही वेळा धोकादायक वाटते. ही जुगाडाची एक बाजू झाली. तिच्यातसुद्धा जुगाडाच्या नावाने नाकाने कांदे सोलत नुसतेच स्वस्थ बसून राहण्यापेक्षा कसे का होईना पण त्याने आपले काम पुढे सरकत आहे का हे पाहणे काही वेळा अधिक श्रेयस्कर किंवा महत्वाचे असते. काही वेळा तर 'जुगाड' या शब्दाचा उपयोग अशा जागीही होतो जिथे दुसरा उपायच अस्तित्वात नसतो. सहजपणे उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून निर्माण केलेल्या औजारांना अनेक वेळा 'जुगाड' म्हणतात. त्याच प्रमाणे कोणालाही सहजपणे करता येईल अशा सोप्या कृतींमधून एकादी गोष्ट करण्याच्या विधीलाही 'जुगाड करना' असे म्हणतात. बहुतेक वेळा जुगाडांच्या या प्रकारांमध्ये त्या वस्तूच्या किंवा विधीच्या गुणवत्तेत काही फरक येत नाही. काही वेळा तर आपल्याला हवी असलेली चांगली क्वालिटी मिळवण्यासाठी खास 'जुगाड' तयार करून वापरावे लागते.

'जुगाड' हा शब्द मुख्यतः कामचलाऊ गोष्टींबाबत वापरला जात असला तरी तो आणखी काही प्रकारांनीसुद्धा कानावर येतो. एटीएम, एसटीडी, तत्काल रिझर्वेशन वगैरे सोयी होण्याच्या पूर्वीच्या काळात कधीकधी असे घडत असे की एकाद्या उत्तर भारतीय सहका-याला दुपारच्या वेळी त्याच्या घरातून एक तार यायची, त्यात त्याला तातडीने गावी बोलावलेले असायचे. चिंताक्रांत मुद्रेने तो ती बातमी त्याच्या सहका-यांना सांगायचा.
"अब तुम क्या करोगे? कैसे घर जाओगे?"
"देखते हैं, कुछ जुगाड कर लेंगे।" म्हणजे हमालाला किंवा टीसीला पैसे चारून वगैरे.
"जानेके वास्ते तुम्हारे पास पैसे तो हैं?"
"कहाँ भाई? उसकाभी कुछ जुगाड करनाही पडेगा।" म्हणजे उधार, उसनवार वगैरे, वगैरे...

आता तांत्रिक जुगाडाची काही उदाहरणे पाहू.  एकदा मला प्रेशर कूकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजवायचे होते, त्यांची भांडी कूकरमध्ये ठेवून झाकण लावतांना मला असे दिसले की त्याच्या बॅकेलाइटच्या मुठीच्या दोन भागांना जोडणारे स्क्र्यू खूप ढिले झाले आहेत. ते जर गळून पडले तर कुकरची मूठ जागेवर राहणार नाही आणि गरम झालेल्या कूकरचे झाकण मला उघडता येणार नाही. मी अशा वेळी त्या स्क्र्यूच्या मापाचा स्क्र्यूड्रायव्हर शोधत बसलो नाही, कारण माझ्या घरात तो असलाच तरी त्या वेळी तो नेमका कुठे ठेवला गेला होता याची मला सुतराम कल्पना नव्हती. अशा वेळी मी स्वयंपाकघरातल्या सेल्फमधले दोन तीन चमचे काढले आणि ज्या चमच्याच्या मागच्या बाजूचे टोक त्या स्क्र्यूच्या खाचेमध्ये फिट्ट बसले त्याने त्या स्क्र्यूंना पिरगाळले. खरे तर स्क्र्यूला फिरवणे हा काही त्या चमच्याचा अधिकृत उपयोग नाही, पण आयत्या वेळी सुचलेल्या या 'जुगाडा'ने माझे काम तर पटकन झाले. जुगाड या संकल्पनेचे हे एक सोपे उदाहरण झाले.

आता एकादे कठीण उदाहरण पाहू. अणुविद्युत केंद्रांसाठी लागणा-या विशिष्ट यंत्रसामुग्रीची निर्मिती करणे किंवा करवून घेणे हे सर्व संबंधितांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यातल्या एका अवाढव्य यंत्रासाठी सुमारे पंधरा मीटर लांब एवढ्या अगडबंब आकाराचे पण सगळ्या बाजूंनी अर्धा मिलिमीटरमध्ये सरळ व सपाट अशा आकाराचे कॉलम तयार करून हवे होते. पोलादाच्या जाड प्लेट्सचे तुकडे कापून, त्यांना वेल्डिंगने जोडून आणि मोठमोठ्या मशीन्सवर त्या स्ट्रक्चर्सचे मशीनिंग करून ते खांब तयार करायचे असतात. इतकी मोठी मशीनरी सहसा कुणाकडेच नसते आणि तिला परदेशातून मुद्दाम तयार करवून घेऊन मागवणे कोणालाही परवडणारे नसते. शिवाय प्रत्येक मशीनची रेंज आणि अॅक्युरसी ठरलेली असते. त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम करायचे असले तर शंभरातले नव्याण्णऊ कामगार आणि दहापैकी नऊ इंजिनियरसुद्धा ते अशक्य आहे असेच सांगतात, पण एकादा कल्पक, धाडशी आणि उत्साही (जुगाडू) माणूस ते आव्हान स्वीकारतो. ते काम उपलब्ध साधनसामुग्रीमधूनच कसे करता येईल यावर सकारात्मक दृष्टीकोनातून स्वतः विचार करतो आणि इतरांशी विचारविनमय करतो, त्यासाठी अनेक प्रकारची निरनिराळी फिक्स्चर्स तयार करतो, त्यावर वारंवार छोटे छोटे प्रयोग करून त्यात सुधारणा करत राहतो आणि अखेरीस हे अशक्य वाटणारे काम तो यशस्वी रीत्या करून दाखवतो. दुस-या एकाद्या यंत्राचा एकादा विशिष्ट भाग मुठीत धरण्याइतका छोटा पण खूप कॉम्प्लिकेटेड आकाराचा असतो, आणि त्याची अॅक्युरसी एक दोन मायक्रॉन्स म्हणजे एक दोन हजारांश मिलिमीटरमध्ये इतकी सूक्ष्म असावी लागते. कुठल्या मशीनने ती मिळवायची आणि ती कशी मोजून खात्री करून घ्यायची हे सर्वसामान्य पद्धतींमधून समजत नाही. यासाठी वेगळ्या प्रकारची खास फिक्स्चर्स बनवावी लागतात.

या दोन्ही प्रकारची फिक्स्चर्स तयार करता करता आणि त्यांचा उपयोग करता करता त्यात वेळोवेळी बदल करावे लागत असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थित ड्रॉइंग्ज, स्पेसिफिकेशन्स, इन्स्पेक्शन रिपोर्ट्स वगैरे डॉक्युमेंटेशन करायला वेळच नसतो आणि त्या फिक्स्चर्सचे काम संपल्यानंतर त्यांची काही गरजही नसते. यामुळे आयएसओच्या नियमानुसार त्याचे डॉक्युमेंटेशन किंवा रेकॉर्ड्स बनत नाहीत किंवा ठेवले जात नाहीत. तशाच प्रकारची मूळ यंत्रसामुग्री पुन्हा पुन्हा बनवून घ्यायची असली तर तेच फिक्स्चर उपयोगी पडते आणि तशी गरजच नसली तर तो एक तात्पुरता कामचलाऊ उपाय असतो. या अर्थाने ही फिक्स्चर्स म्हणजे उच्च दर्जाची असली तरी जुगाडेच असतात. अशा कित्येक जुगाडांच्या डेव्हलपमेंटमध्ये मी सहभागी झालो होतो. त्यांचा उपयोग करून आपले काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर होणारा आनंद अनुपमेय असायचा. यामुळे मला तरी जुगाड या शब्दाबद्दल प्रेम किंवा आदर वाटत आला आहे.

जुगाड हा शब्द माझ्या कानावरसुद्धा पडला नव्हता त्या काळापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मी काही नसते उद्योग करत होतो. आमच्या घराच्या अर्ध्या भागावर माडी होती. मी बहुतेक वेळ तिथे बसून अभ्यास करत असे किंवा पुस्तके वाचणे, चित्रे काढणे वगैरेंमध्ये वेळ घालवत असे. माडीला लागूनच उरलेल्या भागात गच्ची होती आणि तिच्या भिंतींवर तीन चार ठिकाणी दहा बारा सेंटीमीटर लांब मोळे (मोठे खिळे) ठोकून ठेवले होते. कधी उन्हात कपडे वाळवायचे असले तर या मोळ्यांना जाड दो-या बांधून ते त्यावर वाळत टाकायचे आणि संध्याकाळी कपडे काढल्यानंतर पुन्हा त्या दो-या सोडवून ठेवून द्यायचा असा क्रम असायचा. एकदा हे काम करत असतांना माझे लक्ष त्या मोळ्याच्या सावलीकडे गेले. सकाळी पश्चिमेकडे पसरलेली सावली हळूहळू संध्याकाळी पूर्वेकडे सरकली होती. या गोष्टीचे दोन तीन दिवस निरीक्षण केल्यावर मी त्या भिंतीवर जागोजागी शिसपेन्सिलीने खुणा केल्या आणि मोळ्याच्या सावलीकडे पाहून त्या खुणांच्या आधाराने मला वेळ समजायला लागली. सकाळी अकरा किंवा बारा वाजता नाही तर दुपारी चार किंवा पाच वाजता जेंव्हा केंव्हा खाली यायला मला माझ्या आईने सांगितलेले असेल बरोबर त्या वेळी तिने हाक मारायच्या आधीच मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो तर तिला नवल वाटायचे. त्या काळात माझ्याकडे स्वतःचे घड्याळ असण्याचा प्रश्नच नव्हता आणि सोप्यातल्या घड्याळातली वेळ मला माडीवर बसून कशी कळते हे तिने विचारलेच. पण मलाही माझे सीक्रेट उघड करायचे नव्हते. माझ्याकडे एक जादू आहे असे म्हणून टोलवाटोलवी केली. पुढे नात्यातल्या एका लग्नाच्या निमित्याने मुंबई पहायला मिळाली तेंव्हा मलबार हिलवरच्या कमला नेहरू पार्कमध्येही गेलो.  तिथली प्रचंड आकाराची सनडायल पाहून मला कळले की हा शोध तर पूर्वीच कुणीतरी लावून ठेवला होता. तो माणूससुद्धा एक प्रकारचा जुगाडूच असणार! 

.  . . . . . . . . . .  . . . . . . .  (क्रमशः)

Wednesday, February 04, 2015

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा (पूर्वार्ध)

माझ्या आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर मला भेटलेली आणि माझ्या आठवणींच्या पानांवर आपले कायमचे ठसे उमटवून गेलेली अशी अनेक माणसे आहेत. या लेखमालेत मी त्यांच्यातल्या एकेकाबद्दल चार शब्द लिहीत आलो आहे. आतापर्यंतच्या दहा भागातल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव, त्यांचा माझ्याशी जुळलेला संबंध यांच्यासंबंधी मी सविस्तर लिहिले आहे. या लेखाच्या नायकाला मात्र मी फक्त 'अप्पा' एवढेच म्हणणार आहे. लेख वाचल्यानंतर कदाचित त्याचे कारणही समजेल.

हा अप्पा साधारणपणे माझ्याच वयाचा होता, तो कदाचित माझ्याहून थोडा लहान असेल, पण अपटुडेट पोशाख, आकर्षक हेअरस्टाइल आणि एकंदरीतच आरशाचा चांगला उपयोग करून घेण्याच्या त्याच्या संवयीमुळे तो माझ्याहून जरा जास्तच तरुण दिसत असे. त्याच्या देखण्या चेहे-यावरील तरतरीतपणा आणि बेदरकारीची छटा वगैरे मिळून तो राजबिंडा दिसत असे. बोलण्यातली चतुराई, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा वगैरेंमधून ते ऐकणा-यावर त्याचा चांगला प्रभाव पडत असे. तो मला पहिल्यांदा भेटला त्या वेळी आम्ही दोघेही विशीत होतो. त्या मेळाव्यातल्या सर्व लोकांबरोबर तो मिळून मिसळून वागत होता, वडीलधारी मंडळींचा आदर, समवयस्कांची मनमुराद थट्टामस्करी आणि लहान मुलांशी गोड बोलून त्यांना आपलेसे करणे हे सगळे त्याला सहज जमत होते. यामुळे तो सुद्धा तिथल्या सर्वांच्या गळ्यातला ताईत झालेला दिसत होता. त्याचे दिसणे, बोलणे, वागणे या सगळ्यांमुळे मलाही तो पहिल्याच भेटीत थोडा जवळचा वाटला होता. 

पहिला ठसा (फर्स्ट इम्प्रेशन) हा कायम स्वरूपाचा असतो असे म्हणतात, पण ते पूर्णपणे खरे नसावे. आपल्याला कोणताही माणूस पहिल्यांदा भेटतो त्या वेळची एकंदर परिस्थिती, आपली मनस्थिती आणि त्या माणसाचे त्या वेळचे दिसणे, बोलणे वागणे वगैरेंवरून आपण त्याला जोखत असतो. त्याचा ठसा आपल्या मनावर उमटत असतो. तो गडद असला तर दीर्घकाळ टिकून राहतो. पुसट असला तर काळाबरोबर विरून जातो. ती व्यक्ती त्यानंतर पुन्हा पुन्हा भेटली आणि त्या वेळीही आपल्यावर तिचे तसेच इम्प्रेशन पडले तर तो ठसा अधिक गडद होत जातो. पण दरम्यानच्या काळात आपल्याला अनेक अनुभव येऊन गेले असतात, त्यामधून प्रगल्भता आलेली असते, आपला दृष्टीकोन बदललेला असतो, मूड वेगळा असू शकतो आणि त्या माणसातही बदल झालेला असतो, त्याचे दुसरे काही पैलू आपल्या समोर येतात. त्यातून वेगळे इम्प्रेशन तयार झाले तर तो आधीच्या ठशावर पडून वेगळे आकार दिसायला लागतात. अशा प्रकारे त्याच्याबद्दलच्या आपल्या धारणा बदलत असतात. अप्पाच्या बाबतीत असेच काहीसे होत गेले.

अप्पाबद्दल लिहितांना मला पु.लंचा नंदा प्रधान आठवतो. अप्पासुद्धा त्याच्यासारखा देखणा होता आणि श्रीमंत घराण्यात जन्मला होता. इतर लोकांवर छाप पाडण्यासाठी नव्हे तर स्वतःची आवड म्हणूनच तो नेहमी स्टाइलिश कपडे घालायचा. मी त्याला एकदा विचारले, "तुमचा हा नवा शर्ट खरंच मस्त आहे, कुठून आणलात?"
त्याने किंचित बेदरकारपणे उत्तर दिले, "कुणास ठाऊक? माझ्याकडे असे पंच्याहत्तर शर्ट आणि अशा पंचेचाळीस पँट्स आहेत."
ते उत्तर ऐकून मी क्षणभर अवाक् झालो. मला समजायला लागल्यापासून मी घातलेल्या सगळ्या कपड्यांची बेरीज एवढी झाली नसती आणि त्यातला एकही कपडा अप्पाच्या अंगातल्या कपड्यांच्या तोडीचा नव्हता. त्या वेळी अप्पा जर खरे बोलत असला तर माझ्या मते ती निव्वळ उधळपट्टी होती आणि जर त्याने थाप मारली असेल तर असला बडेजाव दाखवण्याचा मला तितकाच तिटकारा होता. त्यामुळे त्या वक्तव्याचे खरे खोटे करण्यात मला काही स्वारस्य नव्हते. आम्हा दोघांच्या विचारांमध्ये केवढी मोठी दरी आहे याची जाणीव मात्र मला झाली.

तो श्रीमंत घराण्यात जन्मला होताच. मराठेशाहीच्या काळातल्या त्याच्या पूर्वजांनी मुलुखगिरी करून काही ठिकाणच्या जहागिरी मिळवल्या होत्या. सात पिढ्यांनी बसून खाल्ले तरी कमी होणार नाही इतकी मालमत्ता त्यांनी त्या ऐतिहासिक काळात जमवली होती. त्यानंतर आलेल्या सव्वादीडशे वर्षांच्या इंग्रजी अंमलात होऊन गेलेल्या पाचसहा पिढ्यांनी बहुधा तेच काम केले असावे. त्या काळातही त्यांच्या घरात जितके अन्न शिजवले जात असेल त्याच्या अनेकपटीने जास्त अन्नधान्य त्यांच्या शेतात पिकत असे आणि गोठ्यातल्या गाय़ीम्हशींपासून त्यांना मुबलक दूधदुभते मिळत असे. त्यामुळे तसे पाहता (अक्षरशः) खाण्यावर त्यांचा फारसा खर्च होतच नसावा. नोकरचाकरांना त्यांच्या सेवेचा मोबदला शेतात पिकलेल्या धान्याच्या स्वरूपात देण्याची पद्धत त्या काळात रूढ होती. जो काही रोख खर्च होत असे तो देवधर्म, दानधर्म, पोशाख, दागदागिने, मौजमजा, शौक वगैरेंसारख्या बाबींवर होत असेल. काही जण कदाचित जास्तच शौकीन असावेत. त्यांचे खर्च भागवल्यानंतर आणि पिढी दर पिढी वाटण्या होत गेल्यानंतरही अप्पाच्या वडिलांच्या कुटुंबाकडे बरीच मालमत्ता आली होती. त्यांच्या अवाढव्य वाड्यातले फक्त स्वयंपाकघर किंवा न्हाणीघरसुद्धा माझ्या संपूर्ण वन रूम किचन घरापेक्षा मोठे होते. दिवाणखाना तर प्रेक्षणीय होता. त्यात दोन्ही बाजूला नक्षीदार आकाराचे कोरीव खांब रांगेने उभे केलेले होते आणि त्यांना जोडणा-या कलाकुसर केलेल्या सुंदर कमानी होत्या. छताला टांगलेल्या मोठमोठ्या हंड्या आणि झुंबरे त्याची शोभा वाढवत होती. पुरातन काळामधली सुबत्ता त्यातून दिसत होती.

त्या काळात त्यांच्या शेतातल्या सगळ्या कामांची व्यवस्था पाहणारे जिराती ठेवलेले असायचे, शेतीविषयक नांगरणी, पेरणी, राखण, मळणी वगैरे सगळी कामे ते कुळांकडून किंवा शेतमजूरांकडून करवून घेत असत. घरातली सगळी कामे गडीमाणसे करत, बाजारातल्या वस्तू घरी बसून मागवल्या जात असत आणि दुकानदारांकडून त्या घरपोच मिळत, या सगळ्या बाबी सांभाळणे आणि पैशाअडक्यांचा हिशोब ठेवणे यासाठी दिवाणजी असत. मालक मंडळींना स्वतः इकडची काडीसुद्धा उचलून तिकडे ठेवायची कधी गरज पडत नसे. अप्पाच्या जन्माच्या काळात असा सगळा थाट होता. घराण्याचा वारस म्हणून त्याचे भरपूर लाड केले जात असत, तो मागेल ते त्याला मिळत असे

नंदा प्रधान या वल्लीबद्दल पु.लंनी लिहिले आहे की (त्याच्यासारख्या) यक्षांना काही शाप असतात असे म्हणतात, अप्पाच्या बाबतीतही काहीसे तसेच म्हणता येईल. त्याने स्वतः याबाबत कधी खंत व्यक्त केली नाही की तक्रारीचा रडका सूर काढला नाही. इतर कुणाला आपल्याबद्दल कणव वाटावी, कुणी आपल्याला सहानुभूती दाखवावी हेच त्याला बहुधा मान्य नसावे. पण आयुष्यात त्याला खूप काही सहन करावे लागले होते हे मला इतरांकडून कळत गेले.  तो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मला होता (बॉर्न विथ सिल्हर स्पून). त्याच्या आईने त्याला रोज चांदीच्या वाटीत केशरमिश्रित दूध प्यायला दिले असेल. पण दुर्दैवाने त्याला हे सुख जास्त दिवस लाभले नाही. त्याच्या लहानपणीच ती माउली अचानक देवाघरी गेली. अप्पाच्या वडिलांनी दुसरा विवाह केला, त्या भार्येपासून त्यांना आणखी दोन मुलगे झाले आणि त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. अप्पाची सावत्र आई चांगली होती, पण ती पुण्यासारख्या शहरातल्या आधुनिक वातावरणात वाढली होती आणि डबलग्रॅज्युएट होती. पतिनिधनानंतर काही काळाने आपल्या दोन मुलांना घेऊन ती पुण्याला रहायला गेली. अप्पा काही काळ त्या आईसोबत, काही काळ काकाकडे, काही काळ मामाकडे रहात मोठा झाला.

कॉलेज शिक्षणासाठी तो त्याच्या मामांकडे पुण्याला राहिला होता. मामाही गडगंज श्रीमंत होते, त्यांनीही आईबापाविना पोरक्या झालेल्या आपल्या भाच्याचे सगळे लाड पुरवले. अप्पाने कॉलेजात कुठल्या विषयात प्राविण्य मिळवले ते माहीत नाही, पण तो शहरातला छानछोकीपणा मात्र शिकला, त्याला सिगरेटचे व्यसनही बहुधा त्या काळातच लागले असावे. शिक्षण संपल्यावर तो आपली इस्टेट सांभाळण्यासाठी गावी परत गेला. माझी आणि त्याची भेट होण्यापूर्वीच हे सगळे होऊन गेले होते. त्याचे लग्न होऊन तो संसाराला लागला. आपण त्याच्या पत्नीला माई म्हणू. ती ही त्याच्यासारखी उत्साही आणि हंसतमुख होती, पण अधिक विचारी आणि व्यवहारी होती. म्हणजे काही प्रमाणात त्याला अनुरूप आणि काही प्रमाणात पूरक होती. म्हणजे ती काही प्रमाणात त्याला अनुरूप आणि काही प्रमाणात पूरक होती. त्यांची जोडी चांगली जमेल आणि त्यांचा संसार सुखाचा होईल असेच सर्वांना वाटले होते.  

----

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा (उत्तरार्ध)

अप्पाच्या जन्माच्या नंतरच्या काळात भारतातली सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वीची सगळी संस्थाने भारतात विलीन करण्यात आली त्याप्रमाणे जहागिरी सुद्धा खालसा केल्या गेल्या. लोकशाहीमध्ये सरसकट माणशी एक मत असल्यामुळे जमीनमालकाला फक्त एकच मत आणि त्यावर काम करणा-या अनेक मजूरांनाही प्रत्येकी एक मत असा हिशोब झाला. अर्थातच जास्त मतदारांचा फायदा होऊ शकेल अशी लोकाभिमुख धोरणे सरकारकडून आखली गेली, समाजवादी समाजरचनेच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आणि त्याला अनुसरून "कसेल त्याची जमीन" आणि "वसेल त्याचे घर" अशी बोधवाक्ये तयार झाली. कमाल जमीनधारण कायदा, कूळकायदा वगैरेसारखी बिले विधानसभांमध्ये पास करून घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. आजच्या काळातल्या वंशजांनी आपल्या वाडवडिलांनी जुन्या काळात केलेली कमाई स्वस्थ बसून खाण्याचे दिवस राहिले नाहीत. सरकारच्या या धोरणांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप देणारी बरीचशी राजकारणी मंडळी आणि सरकारी अधिकारी हे सुद्धा जमीनदार किंवा सुखवस्तू वर्गांमधून आलेले असल्यामुळे ते काम जरा संथ गतीने केले गेले आणि त्यात काही पळवाटा सोडण्यात आल्या. 

दरम्यानच्या काळात काही हुषार लोकांनी त्या पळवाटांचा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. काही जमीनमालकांनी आपण स्वतःच शेतकरी असल्याचे जाहीर केले, त्यासाठी त्यांनी रोज भर दुपारच्या उन्हातान्हात किंवा रात्रीच्या अंधारातसुद्धा शेतावर जाऊन शेतात चाललेली कामे पहायला सुरुवात केली आणि शक्य तेवढ्या जमीनीची मालकी वाचवून घेतली. त्यातल्या काही लोकांनी कालांतराने त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून शेतमालाच्या उत्पन्नात घसघशीत वाढही करून घेतली. काही जणांना कृषीतज्ज्ञ, कृषीपंडित वगैरे उपाधीसुद्धा मिळाल्या. पण हे करण्यासाठी त्यांना मानसिक तयारी आणि बरेच शारीरिक श्रम करावे लागले. ज्यांना हे शक्य नव्हते किंवा ज्यांचा शेतीकडे अजीबात ओढा नव्हता अशा लोकांचा त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीवरला ताबा सैल होत सुटत गेला. अप्पाच्या बाबतीत बहुधा तसेच झाले असावे. अंगात सफारी सूट परिधान केलेला अप्पा कपाळावर आलेली जुल्फे एका हाताने मागे सारीत दुस-या हातातल्या काठीने शेतातल्या पिकात शिरलेल्या ढोरांना पळवतो आहे किंवा टाइट जीन्स आणि चितकबरे टी शर्ट घालून चिखलात उभा राहिलेला अप्पा पाटाचे पाणी एका बाजूच्या पिकाकडून दुसरीकडे वळवत आहे अशी चित्रे माझ्या डोळ्यासमोर काही केल्या येत नाहीत. त्याने स्वतः शेती करण्याचा मार्ग चोखाळला नाही. यामुळे त्याला शेतीमधून मिळणारे उत्पन्न आटत गेले असणार आणि कदाचित त्याला त्याच्या मालकीच्या जमीनी मिळेल त्या भावाने विकून टाकाव्या लागल्या असतील.

अप्पाने त्याच्या अवाढव्य वाड्याच्या काही भागात भाडेकरू ठेवले होते, पण घरभाडेनियंत्रण कायद्याने घरांची भाडी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आकड्यांवर गोठवली गेली होती. त्यानंतर महागाई भडकत गेली, सगळ्या वस्तूंचे भाव कित्येक पटींमध्ये वाढत गेले, पण घराची भाडी मात्र स्थिर राहिली. घराच्या दुरुस्तीचा खर्चच त्याच्या भाड्याच्य़ा तुलनेत फार जास्त व्हायला लागला. यामुळे अप्पाच्या उत्पन्नाचे हे साधनही कमी कमी होत गेले. त्याच्या मालकीची एवढी मोठी टोलेजंग वास्तू असली तरी त्यामधून त्याला जास्त उत्पन्न मिळत नव्हते, उलट तिच्या दुरुस्तीचा खर्च मात्र वाढत चालला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्याची खर्चिक वृत्ती आणि कमी होत चाललेले उत्पन्न यांचा मेळ जमेनासा झाला. त्याला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही उपाय करणे भाग पडायला लागले होते.

यासाठी त्याने नेमके काय केले हे मला कधीच नीटसे समजले नाही. कोणाकडे नोकरी करायची असल्यास त्यातून परावलंबित्व येते, वेळेची शिस्त पाळावी लागते, वरिष्ठांनी सांगितलेले नेहमी ऐकावे लागते तसेच काही वेळा त्यांची बोलणीही ऐकावी लागतात. कलंदर वृत्तीच्या अप्पाला हे नक्कीच जड गेले असते. प्रत्यक्षात त्याला हवी तशी नोकरी मिळाली की नाही, त्याने ती टिकवून धरली की नाही वगैरेबद्दल मला नेमके काही समजले नाही, पण त्याने कुठे नोकरी धरली असल्याचे मी कधी ऐकलेही नाही. अप्पाच्या मालकीचे एक सिनेमा थिएटर होते. त्यातून त्याला नियमित उत्पन्न मिळत असे. कदाचित त्याने इतरही काही उद्योग व्यवसाय केले असतील, काही पैसे त्या व्यवसायांमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील. कमाईचे आणखीही काही मार्ग चोखाळले असतील.

माझी नोकरी आणि संसाराचा व्याप वाढत गेल्यावर मला कुठेही जाण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. मी अगदीच आवश्यक अशा समारंभांना जाऊन उभ्या उभ्या उपस्थिती लावून येत असे. तेवढ्या वेळात जे कोणी ओळखीचे लोक भेटत त्यांची तोंडदेखली विचारपूस करत असे. "तुम्ही कसे आहात?", "सध्या कुठे असता?" आणि वाटल्यास "तुमची तब्येत आता कशी आहे?" एवढेच प्रश्न विचारत असे. "तुम्ही काय करता?" हा प्रश्न मला नेहमीच जरा  आगाऊपणाचा वाटत असल्यामुळे मी तो कुणालाही कधीच विचारला नाही. आपणहून कोणी ती माहिती दिली तर ती लक्षात रहात असे. काही लोक इतरांच्या बाबतीतली माहिती देत असतात. काही समारंभांमध्ये माझी आणि अप्पाचीही अशी ओझरती गाठ पडत असे. त्याने आपणहून मुद्दाम माझ्याकडे यावे किंवा मी त्याच्याकडे जावे असे कोणते कारणच नव्हते आणि आम्ही बिनाकारणाचे एकमेकांकडे जावे इतकी जवळीक आमच्यात झाली नव्हती. तो कसलासा बिझिनेस करतो एवढेच मला दुस-या कोणाकोणांकडून अधून मधून कळत असे. 

"अजगर करे न चाकरी पंछी करे न काम । दास मलूका कह गये सबके दाता राम ।" असा एक दोहा आहे. सुस्त अजगर किंवा स्वैर पक्षी यांनासुद्धा त्यांचे खाणे भगवान श्रीराम मिळवून देतो (मग तो आपल्याला का नाही देणार?) अशा अर्थाच्या या वचनावर बरेच दैववादी लोक विसंबून असतात. अजगर आणि पक्षी यांनासुद्धा आपली शिकार किंवा भक्ष्य स्वतःच शोधावे लागते आणि झटापट करून मिळवावे लागते याचा विचार कदाचित त्यांच्या मनात येत नसेल. आमचा अप्पा रामाचा परमभक्त नव्हता, देवी हे त्याचे श्रद्धास्थान होते. नवरात्राच्या उत्सवात तो काहीही न खाता पिता तीन तीन तास साग्रसंगीत पूजा करायचा. देवीची अनेक स्तोत्रे त्याला तोंडपाठ होती आणि त्यांच्या सामूहिक पठणाच्या कार्यक्रमात अप्पाचा खडा आवाज ठसठशीतपणे वेगळा ऐकू येत असे. त्या कार्यक्रमातला तो लीड सिंगर असायचा. इतर लोक त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळत असत.

आपले ठीक चालले आहे असेच तो वर वर सांगत असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे इतरांकडून कानावर येत होते. शेतजमीनींनंतर थिएटरही त्याच्या हातातून गेले होते. पूर्वजांकडून वंशपरंपरेने त्याच्याकडे आलेल्या मौल्यवान वस्तू एक एक करून विकल्या जात होत्या. मोठमोठी पुरातन भांडी, वाड्यातली झुंबरे, हंड्या वगैरे अनावश्यक वस्तू तर नाहीशा झाल्याच, दिवाणखान्यातले नक्षीदार खांब, कमानी आणि दरवाजेसुद्धा विकले गेले असे समजले. या सगळ्या काळात आमच्या गाठीभेटी क्वचितच झाल्या होत्या. कधी अचानक त्याच्याशी गाठ पडली तरी ती औपचारिकतेच्या पलीकडे जात नव्हती. 

मी एका कार्यक्रमामध्ये माईला पाहिले आणि माझ्या पोटात धस्स झाले. तिचा मूळचा प्रफुल्लित चेहरा पार कोमेजून गेला होता, तिची सडसडीत अंगकाठी खंगून अगदी अस्थिपंजर झाली होती, ती अकालीच थकल्यासारखी दिसत होती. गेले बरेच दिवस तिला बरे वाटत नव्हते आणि तिच्या उपचारासाठी अप्पाने पुण्यात घर केले असल्याचे समजले. ते एक कारण होतेच, शिवाय माई आणि अप्पा या दोघांचेही काही जवळचे आप्त आधीपासून पुण्यात रहात होते आणि काहीजण सेवानिवृत्तीनंतर पुण्याला स्थाईक झाले होते. कदाचित त्यांच्या आधाराची आवश्यकता वाटल्यामुळेही त्या दोघांनी लहान गावातला आपला प्रशस्त वडिलोपार्जित वाडा सोडून मोठ्या शहरातल्या लहानशा घरात येऊन रहाण्याचा निर्णय घेतला असावा. या उपचारांनी माईला गुण आलाच नाही. तिने कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी एक दिवस समजली. त्याबरोबर हे ही कानावर आले की अप्पाची तब्येतसुद्धा खालावत चालली होती. त्याला नेमका कोणता आजार झाला होता याची कोणी वाच्यता करत नव्हते.

त्या काळात माझ्या मुलाचे लग्न ठरले. झाडून सगळ्या आप्तस्वकीयांना या कार्यासाठी आमंत्रण द्यायचे होते. त्यांची यादी करून प्रत्येकाचा अद्ययावत पत्ता, फोन नंबर वगैरे माहिती आम्ही गोळा केली आणि कामाला लागलो. या यादीत अप्पाचा नंबर बराच वर होता. त्याने माझ्या मुलाला एके काळी अंगाखांद्यावर खेळवले होते. शिवाय पूर्वीच्या आठवणी काढल्या तर कोठल्याही मेळाव्यात त्याच्या असण्यामुळे चैतन्य सळसळत असे. लग्नकार्यांमध्ये तर त्याच्या उत्साहाला उधाण येत असे. वरातीत नाचण्यापासून ते पंक्तीत आग्रह करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत तो हौशीने सर्वात पुढे असायचा. वाजंत्रीवाल्यांपासून मांडव सजवणारे आणि आचारी वाढप्यांपर्यंत सगळ्यांना तो धाकात ठेवत असे. नव-या मुलाला झोकदार फेटा बांधावा तर तो अप्पानेच असे ठरलेले होते. त्याच्याकडे असलेले खास खानदानी जरतारी पागोटे कडक इस्त्री करून तो त्यासाठी घेऊन यायचा. आमच्या अशा किती तरी मजेदार जुन्या आठवणी अप्पाशी जोडलेल्या होत्या. तो आला नाही तर त्याची उणीव सर्वांना भासणार हे उघड होते.

पण या वेळी त्याला बोलवावे की नाही यावर निर्णय करणे कठीण जात होते. हे लग्न ऐन हिवाळ्यात आणि उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीत होणार होते. अप्पाच्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दल जे ऐकले होते, त्यावरून त्याला तिथे येणे कितपत झेपेल याची शंका वाटत होती. तरीही त्याचा बिनधास्त स्वभाव माहीत असल्यामुळे तो कशालाही न जुमानता तिथे येईल अशीही शक्यता होती. पण तिथे आल्यावर त्याची तब्येत जास्तच बिघडली तर त्या अनोळखी गावात किती धावपळ करावी लागेल आणि ती कोण करेल हा मोठाच प्रश्न होता. दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला जडलेल्या अवघड आणि संसर्गजन्य व्याधीसंबंधी थोडी कुजबुज व्हायला लागली होती. लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे शक्यच नसल्यामुळे मंगल कार्यालयात सगळे एकत्रच राहणार हे उघड होते. कोणासाठी खास वेगळी व्यवस्था करायचीच झाली तर मुलीकडच्या मंडळींना तसे करण्यासाठी काय कारण सांगावे? ते तशी व्यवस्था करू शकतील का? असे प्रश्न मनात येत होते. लग्नकार्याला आलेल्या प्रत्येक पाहुण्यावर सारखे लक्ष ठेवता येत नाही. त्यातला कोणी तरी अप्पाला त्याच्या आजाराबद्दल काही अनुचित बोलला तर पंचाईत होईल आणि त्याच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी कोणी स्वतःच ते कार्य सोडून चालला गेला तर? सगळेच अशुध्द आणि अवघड होऊन बसले असते. 

तो आला असता तर त्याला सगळ्यांमध्ये मिसळू देणेही अवघड आणि तो बाजूला वेगळा बसून राहिला तरी तेही जास्तच खटकणार. काय करावे ते आम्हाला सुचेना. हे कार्य निर्विघ्न पार पडावे, त्यात गडबड गोंधळ होऊ नये असे आम्हाला वाटले. आपण व्यक्तिशः अप्पाच्या मनाचा कितीही विचार केला आणि त्याला सन्मानाने वागणूक दिली तरी इतर सर्व लोकांबद्दल तशी खात्री देता येणार नाही असेच वाटले. हो नाही करत त्याला बोलावणे करण्याचे टाळले गेले. वाटल्यास नंतर त्याचा दोष टपालखात्यावर टाकू असे मनोमन ठरवले. अर्थातच हे काही लोकांना खटकले आणि त्यावरून थोडे गैरसमज, रागावणे, रुसणे वगैरेही झाले, पण त्याला काही इलाज नव्हता.

त्या घटनेनंतर बराच काळपर्यंत आमचा अप्पाशी थेट संपर्क झालाच नव्हता. त्याच्या अगदी जवळच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. ते लग्न गावातलेच असल्यामुळे तो येणार अशी आमची अपेक्षा होती आणि तो आलाही. तो आला म्हणण्यापेक्षा त्याला स्ट्रेचरवरून आणले गेले असे म्हणावे लागेल. त्याला मी पहिल्यांदा पाहिले तेंव्हा तो अत्यंत देखणा, तल्लख, चपळ तसाच मस्तीखोर आणि खट्याळ होता. निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या योजून तो इतरांना हसवत, चिडवत आणि क्वचित थोडेसे रडवत असे. अशा चैतन्यमूर्ती अप्पाला निश्चेष्ट पडलेल्या अवस्थेत पहावे लागेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. त्याच्या अंगात हिंडण्याफिरण्याचे त्राण नव्हतेच. त्याला एका खोलीत झोपवून ठेवले होते, तिथूनच तो सगळा सोहळा पहात होता आणि ऐकत होता. आम्ही त्याला भेटायला गेलो तेंव्हा आम्हाला पाहून त्याने एक मंद स्मित केले, क्षीण आवाजात एक दोन शब्द बोलला. तेवढ्यानेही त्याला त्रास होत असल्याचे जाणवत होते. पूर्वीच्या अप्पाच्या सावलीपेक्षाही तो फिका पडला होता. त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देऊन आम्ही तिथून हळूच काढता पाय घेतला. यानंतर पुन्हा त्याची भेट घडेल की नाही याची शाश्वती वाटत नव्हतीच. तसा चमत्कार घडलाही नाही. त्याच्या आठवणीच तेवढ्या शिल्लक राहिल्या.