Monday, December 29, 2014

जुने वर्ष आणि नवे वर्ष

"नदीच्या त्याच पाण्यात तुम्ही दोन वेळा हात बुडवू शकत नाही." अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. याचे कारण नदीचे पाणी सतत वहात असते. आपला हात पाण्यातून बाहेर काढून पुन्हा पाण्यात घालेपर्यंत त्या ठिकाणी आधी असलेले पाणी वाहून प्रवाहासोबत पुढे गेलेले असते आणि त्या जागी नवीन पाणी आलेले असते. कालौघाचा प्रवाहसुद्धा सारखा पुढेच जात असतो. गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाहीच, काळाबरोबर सगळे जगही सतत बदलत असते. कालचे आपले घरसुद्धा आज अगदी जसेच्या तसे राहिलेले नसते. काही वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात, काही नाहीशा झालेल्या असतात, तर काही नव्या वस्तू घरात आलेल्या असतात. वर्षभराने पाहिले तर घरातल्या खूप वस्तू बदललेल्या असतातच, शिवाय ते घर एक वर्षाने जुने झालेले असते. भिंतींचा रंग थोडा उडालेला असतो, तिच्यावर काही ठिकाणी डाग तर काही जागी भेगा पडलेल्या असतात. कदाचित घराची डागडुजी आणि रंगरंगोटी करून त्याला नवे रूप दिलेले असते. 

निर्जीव वस्तूंमध्येसुद्धा बदल होत असतात, तर माणसांमध्ये ते जास्तच होत असतात. कालच्या दिवसभरात आपल्याला जितकी माणसे दिसली, भेटली, आपल्याशी बोलली ती सगळी आज दिसत नाहीत, त्यातली काही माणसेच आज पुन्हा भेटतात, काही लोक अनेक दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी भेटतात, काही लोक आयुष्यात पुन्हा कधी भेटतही नाहीत. पुन्हा भेटलेली माणसेसुद्धा थोडी किंवा खूप बदललेली असतात. मध्यंतरीच्या काळात इतरांच्या तसेच आपल्याही जीनवात अनेक घटना घडलेल्या असतात, सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आलेले असतात. वयोमानानुसार फरक पडलेले असतातच, शिवाय पूर्वी दणकट वाटणारी काही माणसे व्याधीग्रस्त झालेली असतात, तर आजारी असतांना पाहिलेले लोक ठणठणीत बरे झालेले असतात, अनेक अडचणींमुळे चिंताक्रांत असलेले, निराश झालेले कोणी खूप आनंदी आणि उत्साही झालेले दिसतात, तर कोणाच्या बाबतीत याच्या नेमके उलट झालेले असते. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही असे म्हंटले जात असले तरी आलेल्या अनुभवांमुळे काही लोक शहाणे झालेले असतात, कोणी सावध झालेला असतात तर काही लोकांना माज चढलेला असतो किंवा ते वैतागलेले असतात. काही नाही तरी निदान त्यांचा किंवा आपला मूड वेगळा असतो, त्यामुळे आपला दृष्टीकोन वेगळा झालेला असतो. या सगळ्यांमधून आपले जीवन पुढे चालत असते.

नदीच्या प्रवाहात बंधारे घालून निर्माण केलेल्या जलाशयांमधले पाणी स्थिर झाल्यासारखे दिसते, पण तेही हळूहळू बदलत असते. तळातले थोडे पाणी जमीनीमधून झिरपून जात असते तर पृष्ठभागावरच्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत उडून जात असते. पावसाने आणि नदीच्या प्रवाहामधून आलेल्या पाण्याने त्यात भर पडत जाते, त्यातले जास्तीचे पाणी बंधा-यावरून पुढे वाहून जाते. आठवणींचेसुद्धा असेच असते. त्या साचत जातात, त्यात भर पडत जाते तशाच त्या विस्मरणात जाऊन नष्ट होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, त्यातल्या काहींना पुन्हा उजाळा मिळतो. भूतकाळातल्या क्षणाच्या काही आठवणी जाग्या झाल्याने पुनःप्रत्ययाचा आभास निर्माण होत असला तरी प्रत्यक्ष आणि आभास यात फरक असतोच, जेंव्हा आपण कोणाच्या फोटोला नमस्कार करतो तेंव्हा एका कागदाला नमन करत असतो आणि एकाद्या बाळाच्या तसबिरीचे चुंबन घेतले तर कागदाला ओठ चिकटवत असतो. तरीसुद्धा त्यात आपल्याला थोडे समाधान मिळते. याच प्रमाणे एकादा क्षण जगणे आणि तो आठवणे यात फरक असला तरी त्यातही मजा असते.

बालपण, यौवन, मध्यमवय, उतारवय यासारखे जीवनाचे ठळक टप्पे असतात आणि आपल्या आठवणी त्यातल्या निरनिराळ्या कप्प्यांध्ये साठवलेल्या असतात. याशिवाय आपण वर्षावर्षांचे कप्पे करून जुन्या आठवणींना त्यात ठेवत असतो. वैयक्तिक जीवनात वयाला खूप महत्व असते. वयाच्या अमक्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजात प्रवेश घेतला किंवा नोकरीला लागलो, इतके वय असतांना लग्न झाले, एकादा अपघात झाला किंवा मोठे आजारपण आले असे तपशील आपल्या लक्षात राहतात. यासाठी आपले वर्ष जन्मतारखेला सुरू होते. सरकारी आणि उद्योगव्यवसायांचे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३१ मार्चला संपते. भारतातल्या शाळाकॉलेजांच्या वर्षाची सुरुवात मे जूनच्या सुमाराला होते. जगभरात वापरले जात असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर या सर्वांचा आधार असते. इतर बहुतेक सगळ्या सर्वसाधारण घटनांसाठी आपण कॅलेंडरवरील वर्षाचाच उपयोग करतो. इसवी सन २०१४ हे त्यातले वर्ष आता संपत आले आहे आणि २०१५ लवकरच सुरू होणार आहे.

कुठलेही वर्ष संपत आले असतांना त्या वर्षाचा एक संक्षिप्त आढावा घेतला जात असतो. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विषयामधले किती आत्मसात केले हे समजण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाते, त्याचे निकाल प्रगतीपुस्तकात नोंदवले जातात, संपलेल्या वर्षात उद्योगव्यवसायांमध्ये किती उलाढाल झाली, किती प्राप्ती आणि खर्च झाला, किती नफा मिळाला की तोटा झाला, त्यात किती वाढ किंवा घट झाली वगैरेंचे हिशोब केले जातात. व्यक्तीगत आयुष्यात किती प्रगती झाली, काय काय कमावले किंवा गमावले, कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, त्यांना आपण कसे सामोरे गेलो, आपले किती अंदाज किंवा निर्णय बरोबर ठरले, कोणते चुकले, किती माणसे जवळ आली किंवा नव्याने जोडली गेली आणि किती लोक दुरावले गेले अशा अनेक गोष्टी मनात येऊन जातात. त्यातल्या काही आपल्याला सुखावतात, धीर किंवा हुरूप देतात, तसेच काहीमधून बोध मिळतो. हे सगळे गाठीला बांधून आपल्याला पुढे जायचे असते. इतर बाबतीतही असेच होत असते. सन २०१४ मध्ये आपल्या सभोवतालच्या जगात कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या यांची उजळणी वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स करायला लागलेले आहेतच. ती पाहतांना त्यातल्या कोणत्या आपल्याला जास्त जवळच्या किंवा महत्वाच्या वाटतात याचा विचार मनात येतच असतो.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यानिमित्य आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा पाठवल्या जातात. कुठल्याही वर्षात फक्त चांगल्याच घटना घडल्या असे आजवर कधी घडलेले नाही आणि पुढल्या वर्षी तरी ते कसे घडणार आहे? पण असे घडावे अशा शुभेच्छा द्यायला किंवा असा विचार करायला काय हरकत आहे? मिर्झा गालिबच्या शब्दात सांगायचे झाल्यास "दिल बहलानेके लिये खयाल अच्छा है।" शुभेच्छा, आशीर्वाद वगैरेंचा अगदी किंचितही लाभ मिळत असेल, "दुवाओंका असर" होत असेल तर त्या देण्यात कंजूसी कशाला करायची? मुख्य म्हणजे या निमित्याने आपण इतक्या लोकांच्या संपर्कात येतो, त्यांच्याशी औपचारिक का होईना पण एक संवाद साधला जातो, आपलेही इतके हितचिंतक आपल्या पाठीशी आहेत हे समजते याचेच खूप समाधान मिळते, आधार वाटतो आणि मन उल्हसित होते. काही काही संदेश तर फारच सुरेख असतात. ते वाचूनच छान वाटायला लागते. माझ्या एका मित्राने पाठवलेला हाच संदेश पहा. मला जमेल तेवढा त्याचा अनुवाद मी केला आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
सर्व ऋतूंसाठी, ऊनपाऊस, वादळवारे या सर्वांसाठी शुभेच्छा!
तुम्ही सागरकिना-यावर फिरत असतांना शुभेच्छा!
तुम्ही आपल्या खुर्चीवर बसून कामात गढलेले असतांना शुभेच्छा!
तुमच्या आसपासचे वातावरण कुंद झाले असतांनाही शुभेच्छा!
तुमचा आनंद अनेकपटीने वाढत जावो, तुमचे सगळे कष्ट नष्ट होवोत, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर संधींमध्ये करून घ्याल, तुम्हाला सुदैवाची साथ मिळेल, तुम्ही यशस्वी व्हाल अशी प्रार्थना.
हे वर्ष आणि हे आयुष्यच तुमच्यासाठी महान ठरो. (Have a great year, a great life)

1 comment:

asidwadkar said...

Nice Blog…..
Please Add your Blog in our Indian Blog Directory for more readers.
http://www.blogdhamal.com