Friday, November 28, 2014

सतारीचे बोल . केशवसुत

शालेय जीवनात मराठी भाषा हा माझा आवडता विषय होता. वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुटी लागताच पुढल्या इयत्तेच्या पुस्तकांची जमवाजमव सुरू होत असे. त्यातले मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक मी सर्वात आधी वाचायला घेत असे आणि त्यातले सगळे गद्यपद्य धडे वाचून टाकत असे. पुढल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईपर्यंत हे पुस्तक माझ्या ओळखीचे झालेले असे. आमच्या वर्गातल्या काही मुलांना कदाचित कवितांचा आशय समजत नसल्यामुळे त्या शिकायला कठीण वाटत असत किंवा आवडत नसत. मला मात्र काही कवितांमध्ये शब्दांच्याही पलीकडले, ओळींमधले (बिट्वीन द लाइन्स) बरेच काही असते असे जाणवायचे आणि ते समजून घ्यावे असे ही वाटायचे. लहानपणी नीट न समजलेली अशीच एक शंभर वर्षांपूर्वीची कविता पाच दशकानंतर अलीकडे पुन्हा माझ्या वाचनात आली. १८६६ ते १९०५ या कालखंडात होऊन गेलेल्या कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांची सतारीचे बोल ही कविता आमच्या एका पाठ्यपुस्तकात होती. त्यात बहुधा मूळ कवितेतली ३-४ कडवीच घेतलेली असावीत, कारण इतकी लांबलचक कविता कधीही शिकल्याचे मला आठवत नाही. त्या काळात ती मलाही फारशी समजली नव्हती. सर्वसाधारण मुलांनी या कवितेचा घेतलेला शब्दशः अर्थ आधी पाहू.

काळोखाची रजनी होती ..... यात काय विशेष आहे? नेहमीच रात्री काळोख असतो. त्या काळात आमच्या गावात विजेचा झगझगाटही नसायचा. रात्र पडली की सगळीकडे अंधारगुडुप आणि चिडीचूप होऊन जात असे. "आपली रजनी तर प्रकाशला आवडते ना?" मागच्या बाकावरून एक कॉमेंट. बिचारी रजनी लाजून चूर.
हदयी भरल्या होत्या खंती  ..... त्या कवीच्या मनात खंत वाटण्यासारख्या काही गोष्टी असतील. सगळ्यांनाच कसली ना कसली दुःखे असतात. याला बहुधा जास्त असतील.
अंधारातचि गढले सारे  ....... मनातली खंत उजेडात तरी कशी दिसणार? अंधारात काही दिसत नाही हे सांगायला कशाला पाहिजे? अंधारात काय घडलं सर?  एक वात्रट प्रश्न
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे   ....... नाही तरी रोज रोज त्याच त्याच चांदण्या कोण पहातो?
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,  ..... कशाला? ठेचकाळून पडशील ना.
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१ 
आमच्या गावात कोणीच सतार हे वाद्य वाजवत नसल्याने कोणी ते पाहिलेही नव्हते, पण ते एक तंतुवाद्य आहे असे ऐकले होते. त्यामुळे त्यातून ट्याँव ट्याँव, ट्वंग ट्वंग असे आवाज निघत असावेत असे वाटत होते. दिड दा, दिड दा, दिड दा काही समजत नव्हते.
आपल्या कवितेची अशी चिरफाड झालेली पाहून  "अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख।" असे कोणाही कवीला त्रिवार म्हणावेसे वाटल्यास काही नवल नाही.

आता या कवितेकडे जरा गंभीरपणे पाहू. 
काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१
कवितेची ही फक्त सुरुवात आहे. यात कवीने वातावरणनिर्मिती केली आहे. कोणताही विचार मांडलेला नाही. काही कारणाने त्याच्या हृदयात काठोकाठ खंत भरली आहे, सगळीकडे अंधःकार दाटलेला दिसत आहे. बाहेरच्या जगात जमीनीवर अंधार असला तरी आभाळात तारे चमकत आहेत, याच्या मनात तेवढा अंधुक प्रकाशही नाही. तिथे फक्त विषण्णता आहे. अस्वस्थपणा त्याला एका जागी बसू देत नसल्यामुळे तो उगाचच येरझारा घालतो आहे. अचानक या उदास वातावरणाच्या विपरीत असे काही घडते, एका खिडकीमधून येणारे सतारीचे सुरेल बोल त्याच्या कानावर पडतात. दिड दा. दिड दा, दिड दा यात एक सुंदर अशी लय आहे, एक ठेका आहे.

आपले हृदय जर सुन्न झाले असेल तर सगळे जगच स्तब्ध झाल्यासारखे वाटते. पण हे जड जग तर खोटे आहे, "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या" हे तत्वज्ञान कवीने दुस-या कडव्यात सांगितले आहे. (शाळकरी वयात ते काय समजणार होते?) अत्यंत निराशेमुळे आता आपला जीव द्यावा असे कवीला वाटत होते आणि साहजीकच अशा मनस्थितीत असतांना त्याला सुरेल सतारवादन ऐकावे असे वाटणार नाही.
जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....२

तिस-या कडव्यात याचाच अधिक विस्तार केला आहे. मनात भावनांचे इतके मोठे थैमान चाललेले असतांना बाहेर सोसाट्याचे वादळ झाले तरी या अवस्थेत कवीला ते सुसह्य वाटले असते. मनात उठणा-या भयानक चीत्कारांपुढे भुतांचा आरडाओरडासुद्धा त्याला सौम्य वाटला असता. अशा विषण्ण अवस्थेत भैरवी रागातले सतारीचे मंजुळ आणि प्रेमळ स्वर ऐकावेसे त्याला वाटले नाहीच, उलट त्यांचा तिटकारा आला.
सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....३

रागाने जळफळत तो त्या खिडकीकडे गेला, त्याने तिच्या दिशेने हवेतच एक ठोसा लगावला, आतल्या माणसाला दोन चार शिव्या हासडल्या.  "अवेळी पिर पिर करणारी तुझी सतार फोडून टाक." असेही तो पुटपुटला. आपण दुःखात बुडालेलो असतांना दुस-या कुणी मजेत रहावे हे कवीला सहन होत नव्हते. असे त्याने चौथ्या कडव्यात लिहिले आहे.
ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
म्हटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....४

कवी त्या खिडकीकडे रागारागात जात असतांना एक चमत्कार झाला. कां कोणास ठाऊक? पण तो थबकला. त्या मधुर ध्वनीने काय जादू केली कोण जाणे? आपल्या मनातली अस्वस्थता विसरून ते सूर ऐकत बसावे असे त्याला वाटायला लागले. येरझारा थांबवून तो एका ओट्यावर बसून सतारीचे बोल ऐकत राहिला.
सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत .... दिड दा, दिड दा, दिड दा .....५

मांडीवर कोपरे ठेवून त्याने आपले डोके दोन्ही तळहातात धरले. कानावर पडत असलेले सतारीचे करुण सूर त्याच्या हृदयाला जाऊन भिडले. ते ऐकतांना त्याच्या डोळ्यामधून घळघळा पाणी वाहू लागले.
तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा...
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता .... दिड दा, दिड दा .....६

कोणी तरी आपल्या खांद्यावर हात ठेऊन आपल्याला धीर देत आहे असा भास कवीला झाला. "असा त्रागा करून काय उपयोग आहे? थोडे धीराने घे. हे दिवस जातील, चांगले दिवस येतील." असेच ते सतारीचे बोल आपल्याला सांगत आहेत असे त्याला वाटले.
स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....दिड दा, दिड दा, दिड दा .....७

मनात आशेचे किरण दिसू लागताच त्याची नजर वर आकाशाकडे गेली. आता त्याला "एक अंधेरा, लाख सितारे" याचा अनुभव आला. सतारीच्या बोलांमधून हे सत्य बाहेर पडत आहे असे त्याला वाटले.
आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा .....८

सतार वादक तन्मयतेने सतार वाजवतच होता. ते सूर ऐकणा-या कवीच्या मनात त्याचे निरनिराळे प्रतिसाद उमटत होते. आधी भीषण वाटून नको झालेले सूर हवे हवेसे आणि आश्वासक वाटायला लागलेले होतेच, आता त्याला उदात्ततेची झालर लाभली. या विश्वात आपण एकटे नाही, अनादि काळापासून अनंत काळापर्यंत यात सगळीकडे भरून राहिलेल्या ब्रह्मतत्वाचाच आपण एक भाग आहोत हे त्याला उमगले. त्याच्या मनातला आपपरभाव गळून पडला. 
वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता .... दिड दा, दिड दा .....९

"चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम्" याची जाणीव झाल्यानंतर कवीला आता सगळीकडे प्रेम आणि आनंद दिसू लागला. मनातला अंधार दूर होताच बाह्य जगातले सौंदर्य त्याला दिसायला लागले. ही सगळी किमया सतारीच्या त्या दिव्य स्वरांनी केली.
प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला... मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....१०

वाजत असलेली ती सतारही अखेर शांत झाली. पण आता कवीच्य़ा मनातली वादळे शमली होती, ते शांत झाले होते. त्याचे हृदय शांत होताच धरती, तारे, वारे सगळे काही शांत झाले होते. तो शांतपणे घरी जाऊन झोपी गेला पण त्याच्या अंतर्मनात सतारीचे बोल घुमत राहिले.
शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....११

संपूर्ण नकारात्मकतेपासून सुरू झालेला मनाचा हा अलगद झालेला प्रवास केशवसुतांनी किती नाजुकपणे रंगवला आहे? सतारीचे बोल हे सकारात्मक ऊर्जेचे एक प्रतीक आहे. डोळ्यापुढे अंधार झाला तरी कानाचे दरवाजे उघडे असतात, त्यातून सकारात्मक जाणीवा होऊ शकतात. वैफल्य येऊ देऊ नये, काही तरी चांगले सापडेल याचा विचार करावा, त्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे, मनातली जळमटे आपोआप दूर होतील असा संदेश कवी केशवसुतांच्या या कवितेमधून मिळतो.

2 comments:

DILIP CHAVAN said...

आपल्या लेखामुळे कवितेचा अर्थ उमगला व आस्वाद घेता आला. शतशः धन्यवाद!

Unknown said...

कवितेची शेवटून दुसरी ओळ मला मेडिटेशन करत असताना एकदम आठवली म्हणून मी ही कविता शोधू लागले आणि हा लेख हाती लागला. वाचून खूप आनंद झाला. अर्थ पूर्णपणे समजत नसला तरी ही कविता मला खूप आवडायची. धन्यवाद!