Monday, November 10, 2014

स्व.बाबूजी, स्व.गदिमा आणि संदीप व सलिल

                                         (ही छायाचित्रे आंतर्जालावरून साभार घेतली आहेत.)

मी लहान होतो त्या काळात म्हणजे एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात टेप रेकॉर्डर, सीडी प्लेयर, इंटरनेट, यू ट्यूब असले काही नव्हते. क्वचित कोणाकडे स्प्रिंगचा फोनोग्रॅम असला तरी त्याचे हँडल फिरवून चावी भरणे, सुई बदलत राहणे, रेकॉर्ड्सचे झिजणे, त्यावर चरे पडून ती बाद होणे वगैरे कटकटींमुळे तो फोनो फक्त खास प्रसंगीच आणि जरा जपून वाजवला जात असे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्याला हवे ते गाणे ऐकण्याची सोय त्या काळात नव्हती. व्हॉल्ह्व्जवर चालणारा आणि एकाद्या खोक्यासारखा बोजड दिसणारा रेडिओ काही लोकांच्या घरी असायचा, विजेची कृपा असली आणि वातावरण अनुकूल असले तर कधी कधी त्यातून काही गाणी ऐकायला मिळत असत. काही शौकीन लोक त्यांची आवडती चित्रपटगीते ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा थेटरात जाऊन ते सिनेमे पहात आणि त्यातली गाणी पाठ करून स्वतःशी गुणगुणत असत. काही उत्साही आणि कलाकार मंडळी स्वतः ती गाणी ऐकून आणि शिकून इतर मुलामुलींना शिकवत असत आणि त्यांच्याक़डून ती घरगुती व शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये इतर लोकांना ऐकवली जात. त्या टीव्हीपूर्व जमान्यात असे मनोरंजक कार्यक्रम वरचेवर होत असत. अशा काही प्रकारांनी त्या काळातले सुगमसंगीत लोकांपर्यंत पोचत असे. पुढे सेमिकंडक्टर्सवर आधारित ट्रान्जिस्टर रेडिओ आणि कॅसेट टेपरेकॉर्डर आल्यावर घरबसल्या हवी ती गाणी ऐकण्याची सोय झाली आणि हळूहळू हे चित्र बदलत गेले. त्या जुन्या कालखंडात मी पहिल्यांदा ऐकलेली गोड गाणी थोडे प्रयत्न करून ऐकली होती. कदाचित त्यामुळे ती अंतर्मनात जरा जास्तच रुतून बसली होती आणि मला त्या गाण्यांचे गीतकार, संगीतकार व गायक गायिका यांच्याबद्दल वाटणारा आदर ऐकीव गोष्टींमधून किंवा वाचनातून न येता त्या काळात जगतांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून निर्माण झाला होता.

त्या काळात ओव्या, अभंग, आरत्या, हदग्याची गाणी वगैरे भक्ती किंवा लोकसंगीत आपोआप आमच्या कानावर पडत असे. लहान गावातल्या लोकांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीच मिळत नसल्यामुळे त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो. पुणे, मुंबई किंवा मिरज, धारवाड यासारख्या शहरांमध्ये काही दिवस राहून आलेले काही लोक थोडे फार शास्त्रीय संगीत ऐकून आलेले असत. "केवळ रागदारीतले आ..ऊ... म्हणजेच खरे संगीत, इतर सगळे टाकाऊ" असले काही तरी ठामपणे सांगून लतादीदी आशाताई यासारख्या आमच्या आवडत्या गायिकांबद्दल अनुदार उद्गार काढणारे हे लोकच आम्हाला शिष्ट किंवा चक्रम वाटायचे. यामुळे त्यांच्यापासून आणि शास्त्रीय संगीतापासून मी बरीच वर्षे चार हात दूर राहिलो होतो. मराठी भावगीते, चित्रपटगीते आणि हिंदी सिनेमांमधली गाणीच मी आवडीने ऐकत होतो. त्यासाठी थोडी हालचाल करावी लागली तर ती करत होतो.

एकोणीसशे पन्नाशी, साठीच्या काळात मराठी सुगम संगीताला चांगले दिवस आले होते. त्या काळातले अनेक गुणी आणि प्रतिभासंपन्न गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका ही मंडळी त्यांच्या नवनव्या रचना रसिकांपुढे आणत होती. रेडिओवर लागलेल्या प्रत्येक गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक वा गायिका यांची नावे दर वेळी स्पष्टपणे सांगितली जात असत. संगीतकार किंवा गायक म्हणून स्व. सुधीर फडके म्हणजे बाबूजी आणि गीतकार म्हणून स्व.ग.दि.माडगूळकर (गदिमा) यांची नावे त्यातून नेहमी कानावर पडत असत. या दोघांनी एकत्र येऊन तयार केलेली चित्रपटगीते तेंव्हा खूप लोकप्रिय झाली होती, स्व.राजा परांजपे यांच्या चित्रपटांमधली गाणी तर विशेष गाजली होती. बहुधा या त्रयींचे काही अजब रसायन त्या कालात जमले होते. स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांनी आकाशवाणीसाठी तयार केलेले गीतरामायण हा तर संगीताच्या क्षेत्रातला एक चमत्कार म्हणता येईल. त्या काळातल्या लोकप्रिय गीतकारांमध्ये पी.सावळाराम, राजा बढे, शांताबाई शेळके, वंदना विटणकर, जगदीश खेबुडकर आदि अनेक आदरणीय नावे होती. कवीवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, इंदिरा संत आदीं प्रसिद्ध कवींच्या काही निवडक काव्यांना संगीतबद्ध करून त्यांचे प्रसारण केले गेले होते, या बाबतीत मंगेश पाडगावकरांचे नाव सर्वात पुढे होते. संतवाङ्मयातले अभंग आणि बहिणाबाई चौधरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा.रा.तांबे यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींच्या काही उत्कृष्ट कविता नव्या आकर्षक चालींमधून सादर केल्या गेल्या होत्या. बाबूजींच्या काळातच वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, पु.ल.देशपांडे, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर इत्यादि संगीतकारांनीसुद्धा एकाहून एक सरस गाणी दिली होती. अशा प्रकारे मराठी सुगमसंगीताचे विश्व समृद्ध होत असले तरी त्याच काळातल्या हिंदी सिनेमांमधल्या गाण्यांची मनाला जास्त भुरळ पडत होती. नौशाद, शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी, कल्याणजी आनंदजी, मदनमोहन, ओ पी. नय्यर वगैरे संगीत दिग्दर्शकांनी मराठी भाषिक लोकांच्या मनाचासुद्धा जास्तच ताबा घेतला होता.

ज्याप्रमाणे वस्तूंची लांबी, रुंदी, उंची, खोली, वजन यासारख्या रुक्ष आकडेवारीने मोजमापे काढून त्यांची तुलना करता येते, तसे कलेच्या क्षेत्रात करता येत नाही. ऐकलेले कोणते गाणे कानाला जास्त गोड वाटेल, मनाला अधिक स्पर्श करेल, दीर्घ काळ आठवणीत राहील या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. ज्या ज्या गीतकारांची आणि संगीतकारांची गाणी लोकांना खूप आवडली आणि दीर्घकाळ लक्षात राहिली, ज्यांना सर्वांनी मनापासून दाद दिली गेली, ती सगळीच मंडळी माझ्या दृष्टीने महान आणि आदरणीय राहिली. त्यात स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची नावे ठळकपणे येतात. या लेखाच्या शीर्षकात फक्त तीच घेतली आहेत याला एक तात्कालिक कारण झाले. ते म्हणजे "संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांची सध्याची लोकप्रिय जोडी ही स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांच्या जोडीसारखी आहे." असे विधान अलीकडे कुणीतरी कुठे तरी केले आणि त्यावर एक लहानसे वादळ उठले. आजकाल दोन सख्ख्या भावांना कुणी "रामलक्ष्मणाची जोडी" म्हंटले, किंवा अनुरूप पतीपत्नींना "लक्ष्मीनारायणाचा जोडा" म्हंटले तरीसुद्धा काही लोकांच्या नाजुक भावना दुखवल्या जाण्याची शक्यता आहे.

समकालीन कलाकारांचीसुद्धा तुलना करता येत नाही हे मी वर लिहिले आहेच. निरनिराळ्या कालखंडातल्या लोकांची तुलना करणे तर माझ्या मते अप्रस्तुत आहे. गेल्या चार पाच दशकांहून जास्त काळात सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. सामाजिक परिस्थिती, कुटुंब व्यवस्था, राहणीमान यामधील बदलांचे परिणाम माणसामाणसांमधल्या नात्यांवर झाले आहेत. इतर भाषांमधले साहित्यप्रवाह आता अधिक ओळखीचे झाले आहेत. यामुळे पूर्वीचे ज्वलंत विषय मागे पडले आहेत, नव्या समस्यांमधून नवे विषय समोर उभे ठाकले आहेत. या सर्वांचा प्रभाव साहित्यावर आणि काव्यरचनांवर होणारच. या दरम्यानच्या काळात संगीताच्या क्षेत्रामध्येसुद्धा नवनवे प्रयोग केले गेले, अनेक प्रकारचे नवे वारे इतर भाषांमधल्या किंवा परदेशातल्या संगीतातून इकडे आले. पूर्वीची वाद्ये मागे पडून नवी वाद्ये आली, आधुनिक तंत्रज्ञानातून कृत्रिम ध्वनि निर्माण करणे शक्य झाले. ध्वनिमुद्रणाच्या तंत्रात अचाट प्रगती झाली. नव्या संगीतकारांनी यांचा उपयोग करून घेतला पाहिजेच. ते लोक तसा घेतही आहेत. माझ्या लहानपणी सर्वसामान्य लोकांना गाणे ऐकण्याच्या संधी किती कमी होत्या हे मी सुरुवातीलाच लिहिले आहे. त्यामुळे त्या काळातल्या श्रोत्यांनी सुद्धा फक्त तेंव्हा प्रचलित असलेली गाणीच ऐकलेली असायची. आजकाल आपण सव्वाशे वर्षांपूर्वीच्या "पंचतुंड नररुंडमाळधर" पासून ते अलीकडच्या "टिकटिक वाजते डोक्यात" पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी सहजपणे ऐकू शकतो. यामुळे श्रोत्यांची बहुश्रुतता वाढली आहे. त्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यांच्या आवडी बदलल्या आहेत.

याचा विचार केला तर संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या आजकालच्या गाण्यांची तुलना जुन्या काळातल्या प्रसिद्ध गाण्यांशी करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात येईल. शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. स्व.गदिमा आणि स्व.बाबूजींनी प्रत्येकी हजारावर गाणी रचली असतील, दोघांनी मिळूनही शेकड्यांमध्ये गाणी केली असतील. त्यातली सर्वोत्तम अशी काही मोजकी गाणीच आपल्याला आज ऐकायला मिळतात, पूर्वीच्या काळात सुद्धा फारशी न चाललेली त्यांची बाकीची सगळी गाणी काळाच्या उदरात लुप्त झाली आहेत. याच्या उलट नव्या गीत आणि संगीतकारांची सरसकट सगळी गाणी आपल्यासमोर येत असतात, त्यात बरी वाईट, उत्तम, मध्यम, सुमार वगैरे सगळी असतात. यातली किती गाणी पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे निदान वीस पंचवीस वर्षांनंतर शिल्लक राहतील हे काळच ठरवेल.

जुन्या आणि नव्या गीतसंगीतकारांच्या रचनांची तुलना करता येणार नाही, पण त्या रचना लोकांपर्यंत पोचवण्यात त्यांना किती यश आले आणि त्यांना श्रोत्यांचा किती प्रतिसाद मिळाला किंवा मिळत आहे हे कदाचित पाहता येईल. यातसुद्धा काळानुसार फरक पडला आहेच. आज प्रचार आणि प्रसाराची साधने वाढली आहेत, दळणवळण सोपे झाले आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, या सगळ्यामुळे जास्त लोकांना संगीताचे कार्यक्रम पाहणे शक्य झाले आहे. याच्या उलट टेलिव्हिजन आणि इंटरनेटसारखी घरबसल्या मनोरंजन करून घेण्याची सुलभ साधने उपलब्ध झाल्यामुळे मुद्दाम उठून कार्यक्रमासाठी बाहेर जाण्याची गरजही आता वाटेनाशी झाली आहे. तसेच रोजचे जीवन जास्तच धकाधकीचे झाल्यामुळे कार्यक्रम पहायला वेळ मिळणे कठीण झाले आहे. यामुळे थेटरे रिकामी पडायला लागली आहेत. तरीसुद्धा संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही माझ्या माहितीतली तरी सध्याची एकमेव जोडी आपले कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम मोठ्या सभागृहांमध्ये करण्यात यशस्वी होत आहे.

स्व.ग.दि.माडगूळकर गीतरचनांबरोबर कथा, पटकथा, संवादही लिहीत होते आणि चित्रपटांमध्ये भूमिकाही करत असत आणि स्व.सुधीर फडकेही त्यांच्या कामामध्ये खूप गढलेले असायचे. त्या दोघांनी जोडीने गावोगावच्या सभागृहांमध्ये जाऊन कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम सादर केल्याचे कधी माझ्या ऐकण्यात आलेले मला तरी आठवत नाही. अशा प्रकारचा कार्यक्रम मी कधीही पाहिला नव्हता. या दोघा दिगिगजांनी एकत्र येऊन जितकी गाणी दिली असतील त्याहून किती तरी जास्त गाणी निरनिराळ्या गीतकारांबरोबर किंवा संगीतकारांबरोबर दिली असतील. त्यांना मुख्यतः प्रसारमाध्यमांमधून लोकप्रियता मिळाली होती. आजच्या टेलिव्हिजन या मुख्य प्रसारमाध्यमामध्ये संगीतालाच गौण स्थान दिले जाते. यामुळे निरनिराळ्या काळातल्या या दोन जोड्यांची कसलीच तुलना करता येणार नाही. शिवाय स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची जोडी कालांतराने फुटली, संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी अजून एकत्र आहेत हे ही महत्वाचे आहे.

संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही जोडी जे कार्यक्रम सादर करते त्यातली "दूरदेशी गेला बाबा" यासारखी गाणी ऐकतांना बहुसंख्य श्रोत्यांच्या पापण्या पाणावतात आणि "अग्गोबाई ढग्गोबाई" यासारख्या गाण्यांच्या तालावर सगळी बच्चे कंपनी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणे, त्यांच्या डोळ्यात पाणी किंवा ओठावर एकादी तरी स्मितरेषा आणणे हे सोपे नसते. पण या नव्या गीतकार आणि संगीतकारांना ते जमले आहे. त्यांच्याबद्दल काही तज्ज्ञ लोकांनी तुच्छ मते व्यक्त केली आहेत. पण सभागृहांमध्ये जाऊन त्यांचे कार्यक्रम पाहणारे (आणि ऐकणारे), त्यांच्या ध्वनिमुद्रित सीडी, डीव्हीडी वगैरे विकत घेऊन ऐकणारे किंवा यू ट्यूबवर पाहणारे सर्वसामान्य लोक वेगळा विचार करतात आणि त्यांची संख्या मोठी आहे. ही जोडी आणखी प्रगती करू दे, उत्तमोत्तम गाणी रचून रसिकांना ऐकवू दे अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
    

No comments: