Thursday, April 24, 2014

अशी ही टोलवाटोलवी

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर टोलवाटोलवीचा एक अद्भुत खेळ खेळला जात असतो. हा खेळ 'डे अँड नाइट मॅच'प्रमाणे एका दिवसातले काही तास आणि रात्रीतले काही तास एवढाच वेळ चालत नाही. मैदानाची साफसफाई आणि डागडुजीसाठी एकाद दुसरा दिवस सोडल्यास तो बारा महिने चोवीस तास सतत चालत असतो. यात भाग घेणा-यात मुलामुलींपेक्षा बाप्ये, बाया आणि म्हातारे-कोतारे यांचीच संख्या जास्त असली तरी त्यांचे निरनिराळे गट नसतात, सगळेजण एकत्रच खेळतात. हा खेळ पहायला येणा-यांची संख्या अर्थातच खेळणा-यांच्या काही पटीने तरी जास्त असते.

रात्रंदिवस चालत असलेल्या या खेळात भाग घेणारे सगळेजण आपापल्या सोयीनुसार जमेल तेंव्हा किंवा इच्छा होईल तेंव्हा मैदानावर येऊन, खेळात भाग घेऊन त्यांना हवे तेंव्हा परतही जाऊ शकतात. दिवसा कामावर जाणारे लोक रात्री तिथे येत असतील आणि रात्रपाळीवर काम करणारे दिवसा येत असतील असेच काही नसते. चेंडूफळीचा एकादा मोठा सामना चाललेला असतांना एका कानाने त्याचा वृत्तांत ऐकत नेहमीचे काम करत राहण्याची जुनी आणि थोर परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे काही लोक कामाच्या वेळेतही इथला खेळ पहायला किंवा त्यात भाग घ्यायला आले तर त्यात नवल किंवा काही चुकीचे वाटायला नको. या मैदानांकडे जाण्यात कुंपण, भिंत यासारखा कसलाही अडथळा नसल्यामुळे कोणीही आणि केंव्हाही तिथे जाऊन तिथे चाललेला खेळ अगदी चकटफू पाहू शकतो. खेळ पाहतांना त्याला त्यात आपणही भाग घ्यावा असे वाटले तर तो सरळ मैदानात उतरूही शकतो. पण पहिल्या वेळेला ते करण्याआधी त्याला त्या मैदानाच्या वहीत एक नाव आणि पत्ता लिहून ठेवावा लागतो एवढेच. 

नाकासमोर सरळ चालणा-या लोकांना आईवडिलांनी ठेवलेले एकच नाव माहीत असते. त्यांच्या जन्मपत्रिकेपासून ते शाळा, कॉलेज, ऑफीस, सोसायटी वगैरे सगळीकडे त्यांचे तेच नाव असते, रेल्वे किंवा विमानाची तिकीटे काढतांना आणि हॉटेलमध्ये खोली घेतांनासुद्धा ते लोक नेहमी तेच नाव देत असतात. पण काही लोकांना मात्र निरनिराळ्या विश्वांमध्ये निरनिराळी नावे धारण करण्याची हौस असते. एकादे आकर्षक असे टोपणनाव घेणे कवि, लेखक, नट, दिग्दर्शक वगैरे कलाकारांमध्ये पूर्वीपासून प्रचलित आहे. सायबरनगरीतल्या खेळात भाग घेणा-या काही मुलांनासुद्धा या मैदानातल्या विश्वातली त्यांची ओळख वेगळी ठेवायची असते. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तशी सोयही करून ठेवलेली आहे. तिथे नाव नोंदवतांना कोणतेही ओळखपत्र (आयडी प्रूफ) द्यायची गरज नसते. फक्त ते नाव आधीच आणखी कोणी घेतलेले नसावे एवढीच साधी अट असते. 'गौतम बुद्ध', 'येशू ख्रिस्त' किंवा 'सम्राट अशोक' यासारख्यांची सुप्रसिद्ध नावे कदाचित तिथे मान्य केली जात नसतील.

या बाबतीतली काही लोकांची कल्पकता अचाट असते. एकादा डेढफुट्या नानू आपले नाव 'ब्रह्मांडाम्लेटभक्षक' असे ठेवतो तर कोणी आपले नाव 'डेव्हिडेशुद्दौलासिंगताथा' असे सर्वधर्मसमभावसूचक ठेवतो. कोणाला फक्त 'भै', 'ठो' असे एक अक्षर पुरेसे वाटते, आपले नाव प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, टिंब वगैरेंमध्ये ठेवावे असे कोणाला वाटते. काही लोकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला जास्त ताण द्यायचा नसतो. आधी दिलेली नावे ते वाचतात आणि त्यावरून त्यांना 'काळ्या खवीस' किंवा 'म्यूमूढमिता' अशी नवीन नावे स्फुरतात. "उगाच किती नावे लक्षात ठेवायची?" आणि "कुठल्या जागी आपले कोणते नाव आहे हे आयत्या वेळी आठवले नाही तर घोटाळा व्हायचा!" असा सूज्ञ विचार साधेसुधे बापडे करतात आणि आपले नेहमीच्या वापरातले नाव लिहून मोकळे होतात. त्या वहीत पत्ता तिहितांना 'अॅड्रेस प्रूफ' देण्याची गरज नसली तरी दिलेल्या पत्त्यावर एक संदेश पाठवला जातो आणि त्यामधून कळीचा शब्द (पासवर्ड) दिला जातो. यामुळे तिथे जो कोणता पत्ता द्यायचा असेल तो सायबरनगरीतल्या पोस्टमनला सापडायला हवा आणि त्याने तिथे टाकलेले पत्र हातात पडायला हवे एवढीशी काळजी मात्र घ्यावी लागते.

कोणत्याही मैदानाचा बिल्ला एवढे काम करून झाल्यावर एकदा मिळाला की त्या नावाचा मुखवटा चेहे-यावर चढवून केंव्हाही तिथे जाऊन खेळायला मिळते. बहुतेक लोक एकाच किंवा निरनिराळ्या नावांनी सगळीकडचे बिल्ले घेऊन ठेवतात आणि आपल्या मर्जीनुसार त्या मैदानावर चाललेला खेळ पहायला किंवा खेळायला जातात. या खेळाची मुख्य गंमत अशी आहे की यात कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. पहायला गेल्यास पत्यांमधल्या 'पेशन्स'प्रमाणे तो खेळ सुद्धा एकट्यानेही खेळता येतो, पण दोन चार भिडू मिळाले तर ते बरे असते, खेळ पहायला येणा-यांना त्याशिवाय त्यात फारशी मजा वाटत नाही. बहुतेक वेळा त्या मैदानावर इतर काही खेळाडू खेळत असतात आणि एकादा नवा डाव सुरू झाला की त्यातले काहीजण त्या डावात भाग घ्यायला आपणहून येतात. या खेळात जास्तीत जास्त किती खेळाडूंनी खेळावे यावर कसलेच बंधन नसते. क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानांसारख्या ठिकाणी एकाच वेळी अनेक ठिकाणी स्टंप्स रोवून खेळाडूंचे निरनिराळे गट आपापसात चेंडूफळीचा खेळ खेळतांना दिसतात. त्याचप्रमाणे सायबरनगरीतल्या या टोलवाटोलवीच्या खेळाचेसुद्धा अनेक डाव प्रत्येक मैदानात एकाच वेळी चाललेले असतात. पण यातली दुसरी गंमत अशी आहे की त्यातला कोणताही खेळाडू त्या मैदानांवर अनेक ठिकाणी चालत असलेल्या निरनिराळ्या डावांमध्येसुद्धा एकाच वेळी खेळू शकतो. एक टोला इकडे तर दुसरा टोला तिकडे, तिसरा तिसरीकडे असे मारू शकतो. इतकेच नव्हे तर यातले काही नामवंत खेळाडू रोजच निरनिराळ्या मैदानांमध्ये जाऊन तिथे चाललेल्या वेगवेगळ्या डावांमध्ये थोडा थोडा वेळ खेळतात. काही खेळाडू विशिष्ट मैदानांवर नेहमी येत असतात. सायबरनगरीतल्या भाषेत सांगायचे झाल्यास ती मंडळी त्या मैदानांमध्ये 'पडिक' असतात.

हा खेळ कशा स्वरूपाचा असतो हे आधी थोडक्यात समजून घेऊ. नवा डाव सुरू करण्यासाठी प्रत्येक खेळाडू एकादा रंगबिरंगी झेंडा, बावटा, चवरी किंवा गुढी यासारखी त्याला जमेल तेवढी सुबक आणि कलात्मक अशी एक वस्तू सोबत घेऊन येतो. ती वस्तू जरा बरी दिसावी यासाठी तिला रंगरंगोटी करून, किनार, गोंडे वगैरे लावून, सजवून धजवून आणलेली असते. पण नेहमी असे होतेच असे नाही. कधीकधी एकादी धुणे वाळत घालायची साधी काठीही आणली जाते. आणलेल्या वस्तूचे वर्गीकरण करता येण्यासाठी तिचे एक दोन शब्दांमध्ये वर्णन करावे लागते. नवा खेळ सुरू करण्यासाठी एक छोटासा अर्ज भरून मैदानाच्या कार्यालयात द्यायचा असतो. त्या अर्जात दिलेल्या काही ठराविक शब्दांमधूनच वर्णनाची निवड करायची असते. त्यातल्या त्यात ज्या शब्दाचा त्या वस्तूशी काही संबंध जोडता येईल असे त्याला वाटले की तो त्यावर टिचकी मारून देतो. हा खेळ कुठे मांडायचा हे त्या शब्दानुसार ठरते. मग मैदानाच्या त्या भागात ती कलाकृती रोवून ठेऊन तो खेळाडू तिच्या शेजारी उभा राहतो.

इतर खेळाडू तिथे येऊन नव्या खेळाडूने ठेवलेल्या वस्तूचे थोडे फार निरीक्षण करतात आणि त्यांना ती आकर्षक वाटली तर तिला बारकाईने पाहतात. कोणाला तिचे कौतुक वाटते, कोणाला आदर वाटतो, कोणाला प्रश्न पडतात, तर कोणाला कींव येते. कोणाला हंसू येते, कोणाला रडू येते आणि कोणाला राग येतो किंवा कोणाला त्याचे काहीच वाटत नाही. पाहणा-याच्या मनात अशा नाना प्रकारच्या भावना येतात. त्यानुसार कोणाला त्या खेळाडूची पाठ थोपटावी असे वाटते, कोणाला त्याच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते, कोणाला साधे तर कोणाला खोचक प्रश्न विचारासे वाटते किंवा त्याला एक ठेऊन द्यावी असेही कोणाला वाटते. इतर खेळाडूंच्या मनात आलेले हे विचार किंवा भावना प्रकट करण्यामधून हा टोलवाटोलवीचा खेळ सुरू होतो आणि चालत राहतो. 

ज्यांना जे वाटते त्यानुसार ते खेळाडू निरनिराळ्या आकारांचे आणि प्रकारचे चेंडू त्या नव्या खेळाडूकडे टोलवतात. एकाद्याला ती वस्तू खूप आवडली तर तो फुलाफुलांची चित्रे काढलेला सुंदर चेंडू अलगदपणे त्याच्याकडे सरकवतो. दुसरा कोणी एकादा मऊ चेंडू मंद वेगाने त्याच्या दिशेने ढकलतो, आणखी कोणी फटकारलेला चेंडू गिरक्या घेत येतो आणि साफ चकवतो, तर कोणाचा एकादा वेगवान आणि कडक चेंडू त्याच्या अंगावर उसळून येतो. कोणी टाकलेल्या क्रेझी बॉलचे काहीच सांगता येत नाही आणि काही मुलांनी त्याच्या दिशेने टोलवलेले चेंडू तर त्याच्या पार डोक्यावरून जातात. तो मुलगाही त्याच्याकडे येणा-या चेंडूंची वाट पहात तयार उभा असतो. तो यातल्या काही चेंडूंना त्याच्या हातातल्या फळीने जमेल तसे टोलवतो. या खेळात सराईत झालेला खेळाडू त्याला वाटल्यास जोरकस टोले हाणून काही प्रतिहल्लेही चढवतो. त्या मुलाच्या दिशेने टोलवलेल्या काही चेंडूंना इतर मुले परस्पर इतरांकडे टोलवतात. यातल्या प्रत्येक कृतीची नोंद ठेवली जाते आणि तितके टोल्यांक त्या खेळाडूच्या नावावर जमा होतात. इतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाडलेल्या चेंडूचे गुण त्याला मिळतात आणि त्याने मारलेल्या टोल्याचेही मिळतात, तसेच इतरांनी परस्पर टोलवलेल्या चेंडूचे टोल्यांकही त्यालाच मिळतात. कधीकधी असेही घडते की हा खेळ मूळात कुठून सुरू झाला किंवा तो कुणी सुरू केला याला नंतर फारसे महत्व उरत नाही. इतर काही खेळाडू त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहतात आणि त्यांचे एकमेकांमध्ये जुंपते. त्या वेळी त्यांच्यात चाललेली टोलवाटोलवी खूप प्रेक्षणीय असते. त्याचाही फायदा त्या मूळ खेळाडूला जास्त अंक मिळण्यात होतो.

या खेळात प्राविण्य संपादन केलेल्या मुलांची टोलवाटोलवी पाहण्यासारखी असते. त्यातल्या एकेकाचे हस्तलाघव, पदलालित्य, मुखावरला आविर्भाव वगैरे नमूनेदार असतात. झपाट्याने चाललेली त्यांची 'अशी ही टोलवाटोलवी' पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कोणत्याही मैदानात एकाच वेळी आजूबाजूला इतर अनेक डाव चाललेले असतात, त्यातले काही चांगले रंगलेले असतात. इतर मुलांनी त्या मजेदार डावांना सोडून नव्याने आलेल्या मुलाकडे आणि त्याच्या झेंड्याकडे लक्ष देणे हेच बहुतेक वेळा कौतुकाचे असते. त्यामुळे त्याच्या टोलवाटोलवीला दहावीस अंक प्राप्त झाले तरी तो खुष होतो. आपला खेळ खेळत असतांनाच इतर मुलांनी सुरू केलेल्या डावात थोडी टोलवाटोलवी करायची मजाही त्याला घेता येते. हा खेळ पहायला येणा-यांची संख्या मोजली जात असते. त्यात कोणता डाव कितीजणांनी पाहिला याची नोंद होत असते. जास्त टोलवाटोलवी न करतासुद्धा आपण ठेवलेली सुंदर वस्तू किंवा आपला थोडासा खेळ चार लोकांना पहावासा वाटला हे पाहिल्यावर त्याचे एक वेगळे समाधान मिळते.

या अद्भुत खेळातला गडी त्याच्या डावामधून कधीच 'बाद' होत नाही. यात कोणाचा त्रिफळा उडत नाही की झेल टिपला जात नाही. क्वचित कधी तो खेळाडू 'जखमी म्हणून निवृत्त' (रिटायर्ड हर्ट) होतो, पण बहुतेक वेळी दुस-या कोणी तरी टोलवलेल्या चेंडूमुळे जखमी (हर्ट) झालेल्या मुलाला जास्तच चेव चढतो आणि तो त्वेषाने चौफेर फटकेबाजी करू लागतो. त्याच्या टोल्यांना प्रत्युत्तर मिळत जाते. त्यातून त्याची गुणसंख्या वाढतच जाते. काही वेळाने इतर सगळी मुले कंटाळून दुसरीकडे खेळायला गेल्यावर मात्र त्यालाही तिथे थांबायचे कारण उरत नाही. त्या डावामधून तोही निवृत्त (रिटायर) होतो आणि इतरांच्या डावात टोलवाटोलवी करायला जातो किंवा नवा डाव मांडायच्या तयारीला लागतो.

या खेळात संघ नसले तरी काही अनुभवी मुलांचे गट झालेले असतात, काही वात्रट लोक त्यांना 'कंपू' म्हणतात. खरे तर त्यांना सुद्धा अशा गटात सामील होण्याची इच्छा असते, पण ते नाही जमले तर मग ते त्यांच्याबद्दल खंवचटपणे बोलतात. अशा गटातली काही मित्रमंडळी मैदानावर जमल्यावर कोंडाळे करून उभी राहतात. त्यातल्या एकाने एखादी कुठलीही वस्तू आणून ठेवली तरी लगेच दुसरा त्याच्याकडे एक चेंडू टोलवतो, पहिल्याने त्या चेंडूला तिस-याकडे टोलवले तर चौथा त्याला मध्येच अडवून पाचव्याकडे पाठवतो. तेवढ्यात तिस-याने टोलवलेल्या चेंडूला दुस-याने 'कट्' (हलकासा स्पर्श) करून चौथ्याकडे धाडलेले असते. अशा प्रकारची अनेक आवर्तने भराभर होत राहतात आणि त्या खेळाडूचे गुण बघता बघता वाढत जाऊन तो शतकवीर होतो. यातली टोलवाटोलवीही सामान्य प्रकारची नसून ती प्रेक्षणीय असते. झपाट्याने चाललेली त्यांची 'अशी ही टोलवाटोलवी' पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कधीकधी या गटातली मुले दुस-या एकाद्या नवख्या मुलाच्या डावात सामील होतात आणि त्याला बाजूला सारून त्या मुलांची आपापसातली टोलवाटोलवी सुरू होते. हे चालले असतांनाही त्या मुलाची टोलेगुणसंख्या वाढायला लागते आणि आता आपलेही अर्धशतक किंवा शतक झळकणार अशी आशा त्याला वाटायला लागते. पण ती जशी अचानक सुरू होते तशीच जागच्या जागी थांबूनही जाते. 

टोलवाटोलवीच्या या अद्भुत खेळाचे काही समान नियम असले तरी प्रत्येक मैदानाचे काही पोटनियम आणि परंपरा असतात. पण त्या खेळावर नियंत्रण ठेवणारे पंच, अंपायर, रेफरी वगैरे कोणी या मैदानावर सदोदित उपस्थित नसतात. जे कोणी असतात ते काही वेळा व्यवस्थापकांच्या कक्षांमध्ये डुलक्या घेत बसलेले असतात. एकाद्या मुलाने कोणताही नियम मोडला असे इतर खेळाडूंना वाटले तर ते आपले मत काळ्या रंगाचा चेंडू फटकारून त्यांच्या टोल्यामधूनच व्यक्त करतात. प्रत्येक मैदानातले काही खेळाडू या विषयातले तज्ज्ञ असतात आणि त्यांचे खेळाकडे बारीक लक्ष असते. ते खेळाडू लाल चेंडू टोलवून इशारा देतात किंवा काळा चेंडू टोलवून निषेध व्यक्त करतात. जरा जास्तच गोंगाट, गलबला वगैरे झाला तर पंच लोकही त्यात लक्ष घालतात. अपवादास्पद परिस्थितीत त्या मुलाला मैदान सोडून जाण्याचा आदेश दिला जाऊ शकतो किंवा त्याने ठेवलेली वस्तू जप्त केली जाऊ शकते. या खेळात कुठल्याही प्रकारचा आणि आकाराचा चेंडू आणला तरी चालत असले तरी कधी कधी एकादा मुलगा सडलेला टोमॅटो किंवा अंडेच चेंडू म्हणून घेऊन आला तर त्यामुळे मैदानाचे वातावरण खराब होते. अशा खेळाडूवर कारवाई केली जाते. पण असे सहसा घडत नाही. कोणाच्या बाबतीत घडलेच तर ते खेळाडू त्या मैदानावर पुन्हा येत नाहीत. पण इतर मैदानांवरचे नियम वेगळे असू शकतात. ते तिथे जाऊन रमतात.

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर अशी ही टोलवाटोलवी दिवसरात्र चाललेली असते. यात खेळणा-यांना एक वेगळी मजा मिळते तशीच हा खेळ पाहणा-यांनाही. 

No comments: