Monday, July 18, 2011

पंढरपूरचा विठोबा - १,२,३,४

पंढरपूरचा विठोबा

माझे आईवडील त्यांच्या पिढीमधील इतर लोकांप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच भाविक प्रवृत्तीचे होते. माझ्या वडिलांच्या मनात पंढरीच्या विठोबाबद्दल अपार श्रद्धा होती. गळ्यात तुळशीची माळ धारण करून ते अधिकृत वारकरी झाले नव्हते, पण दरवर्षी न चुकता ते पंढरीची वारी करायचे. त्या सुमारास येणारे रेल्वेमधील अमाप गर्दीचे लोंढे आणि पंढरपुरामध्ये राहण्याखाण्याच्या सुव्यवस्थेचा अभाव यामुळे होणारे अतोनात हाल सोसण्याची शारीरिक क्षमता आणि मानसिक बळ त्यांच्यापाशी होते. घरातील इतरांना मात्र ते जमणार नाही या विचाराने ते एकटेच पंढरपूरला जाऊन येत असत. पंढरपूर आणि तिथला विठोबा यांचा उल्लेख नेहमी कानावर पडत राहिल्यामुळे माझ्या मनात त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा तयार झाली होती.

पंढरपूरच्या वारीसंबंधात पूर्वी मी एक लेखमालिका लिहिली होती. निरनिराळ्या संतांनी लिहिलेल्या अभंगवाणीचा त्यात प्रामुख्याने उल्लेख केला होता. पारंपरिक अभंगांच्या सहाय्यानेच मी या अजब सोहळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. आधुनिक काळातील गीतकारांच्या रचनांमधून या विषयावर या लेखात लिहिले  आहे.

संतांच्या जीवनावर काढलेल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभंगांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न होत असतोच. शिवाय त्यांना आधुनिक काळातील गीतकारांनी केलेल्या गीतांची जोड दिली जाते. चित्रपटातल्या वातावरणाशी जुळेल अशा भाषेचा उपयोग करून लिहिलेली ही गाणी कित्येक वेळा तीन चारशे वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात. दिवसाची सुरुवात मंगल प्रभातसमयी गायिलेल्या भूपाळीने होत असे. त्या परंपरेला धरून श्रीविठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदीमांनी लिहिलेली ही मधुर भूपाळी पहा.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।

दारी तव नामाचा चालला गजरू।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।। आता जाग बा विठ्ठला ।

दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।। आता जाग बा विठ्ठला ।

विठ्ठलाला जागे करून झाल्यानंतर त्याची मनोभावे पूजाअर्चा करायची, त्याचे गुण गायचे. हे सगळे करतांना मनात कुठेतरी कसले तरी मागणे खदखदत असतेच. सामान्य लोक लगेच ते मागून मोकळे होतात. संत सज्जन त्यांच्या मनावर ताबा ठेवतात. पण कधी हताशपणा आला तर मात्र निरुपायाने त्यांनाही विठ्ठलाचाच धावा करावा असे वाटते. कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांच्याच लेखणीतून उतरलेला हा धावा. भगवंताने पूर्वी कुणाकुणा भक्ताला कशी मदत केली होती यांची उदाहरणे देऊन आपल्या सहाय्यासाठी धावून येण्याची गळ त्यात त्याला घातली आहे.

धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी ।
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी ।।

एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी ।
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसी घडी ।।
जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी ।
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिसि उडी ।।

विठ्ठलाचे गुणगान करतांना त्याच्याशी आपले जवळचे नाते जोडण्याचा प्रयत्न पूर्वीच्या संतांनी केला होता. वैकुंठात राहणारा विष्णू किंवा कैलासातल्या शंकरासारखा विठ्ठल दूरस्थ देव नाही. तो आपल्या कुटुंबातलाच आहे. विठोबाच आपले मायबाप, बंधूभगिनी, गुरू वगैरे सर्व काही असल्याचे सांगणारे अनेक प्रसिदध अभंग आहेत. याच आशयावर जगदीश खेबूडकर यांनी असे लिहिले आहे.

विठुमाऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा ।
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा ।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला मायबापा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला पांडुरंगा ।
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

क्षेत्र पंढरपूर आणि तेथील विठ्ठलरखुमाई ही दैवते यांच्याबद्दलचा भक्तीभाव मधुकर जोशी यांच्या या गीतात दिसतोच, शिवाय आपला हा आवडता देव कसा भावाचा भुकेला आहे आणि भक्तांचिया काजासाठी, त्यांच्या प्रेमासाठी धाव घेऊन जातो हेसुध्दा या गीतात सांगितले आहे.

पंढरिच्या ह्या देवमंदिरी गजर एक होई ।
जय जय विठ्ठल रखुमाई ।।

क्षेत्र असे हे परमार्थाचे ।
पावन जीवन हो पतितांचे ।
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल-पायी ।।१।।

द्वारावतिचे देवकिनंदन ।
गोरोबास्तव भरती रांजण ।
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी ।।२।।

आसक्तीविण येथे भक्ती ।
प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती ।
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई ।।३।।
. . . . . . . . . . . . . . .

ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या काळापासून ते आजपर्यंत विठ्ठलाचे भक्त त्याचे गुणगान आणि प्रार्थना भजने आणि पदे या काव्यमाध्यमातून करत आले आहेत. अलीकडच्या काळातल्या कवींनी रचलेल्या काही रचना पाहू. माझ्या लहानपणी मी ऐकलेले माणिक वर्मा यांचे हे गाणे किती गोड आहे ? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा रूप पाहता लोचनी यासारख्या संतांच्या अभंगातला भाव यात आहेच. हे सांगणारी स्त्री असल्यामुळे जरा जास्त भावुक होऊन त्याच्या स्मरणाने मोहरून गेली आहे.

विठ्ठला रे, तुझ्या नामी रंगले मी, रंगले मी ।
रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।

तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।

तुझी सावळी ही कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।

तुझ्या भजनी रंगता, हृदय काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सख्या कांता, मोहरते मी रोमरोमी ।।

कवी सुधांशु यांनी लिहिलेल्या, दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजाने ऩटलेल्या खालील गीताची गोडी अवीट आहे. विठ्ठलाच्या साजि-या गोजि-या रूपाबरोबरच पंढरपूरला जमलेल्या भक्तांच्या मेळाव्याचे वर्णनही या गाण्यात आले आहे. विठोबा हा भक्तांचा जवळचा सखा त्यांच्या सहवासात रंगतो, त्यांच्याबरोबर डोलतो, नाचतो, बागडतो वगैरे त्याची वैशिष्ट्ये यात आली आहेत.

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा ।।

विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा ।।

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर ।
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा ।।

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ।
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा ।।

कवीवर्य बा.भ.बोरकर यांनी पांडुरंगाचे गुणगान एका वेगळ्या आध्यात्मिक पातळीवर केले आहे. भक्ती, श्रद्धा यांनी ओथंबलेल्या त्यांच्या मनाला विठ्ठल हा एकाच ओळीत चंदनासारखा शीतल आणि इंधनासारखा ऊर्जस्वी व प्रकाशमान भासतो. अखेरच्या ओळीत ते स्वतःचे अस्तित्वच पांडुरंगात विलीन होऊन त्याच्याशी एकरूप झाल्याचे सांगतात.

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता । अंतीचा नियंता पांडुरंग ॥१॥
दयेचा सागर मायेचे आगर । आनंदाचे घर पांडुरंग ॥२॥
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा । श्रद्धेचा विसावा पांडुरंग ॥३॥
तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन । प्रकाश वर्धन पांडुरंग ॥४॥
अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग । देहीचा साष्टांग पांडुरंग ॥५॥

दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातले कवयित्री शांताबाई जोशी यांच्या गीतात विठोबाचे गुणगान वेगळ्या त-हेने केले आहे. इतक्या सुरेख आणि सर्वांना प्रिय असणा-या विठ्ठलाची रखुमाई झाल्याबद्दल त्यात तिचे कौतुक केले आहे. सर्वसाधारण मनोवृत्ती असलेल्या बाईला असा क्षणात इकडे क्षणात तिकडे जाणारा नवरा मिळाला तर कदाचित वेगळे काही वाटेल, पण ती रखुमाई आहे आणि भक्तांसाठी इकडे तिकडे जात असला तरी तो विठ्ठल तिच्या बाजूला अठ्ठावीस युगे एका विटेवर उभा आहे.

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।

मेघासम जो हसरा श्यामल, चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता, रूप दिसे ठायी ठायी ।।

भक्तांचा जो असे आसरा, ह्या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे, हाकेला ग धाव घेई ।।
. . . . . . . . .


पी. सावळाराम आणि वसंत प्रभू या गीतकार संगीतकार जोडीने मराठी रसिकांना अप्रतिम गाण्यांचा जो ठेवा देऊन ठेवला आहे त्याला जोड नाही. भावनांनी ओथंबलेली त्यांची अजरामर गाणी आहेतच, विठ्ठल या मराठी माणसाच्या अत्यंत प्रिय देवाची आळवणी करणारी गीतेसुद्धा त्यांनी दिली आहेत. लता मंगेशकरांचे खाली दिलेले अजरामर गीत संत जनाबाई विठ्ठलाला म्हणते आहे की मीराबाई तिच्या गिरधर गोपालाला असा संभ्रम आधी पडतो आणि तिची ही आर्तता मुक्तीसाठी आहे हे शेवटच्या ओळीत वाचल्यावर आपल्याला प्रेमभावनेतून थेट अध्यात्माकडे नेते.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।
नेत्रकमल तव नित फुललेले, प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी, मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीति, अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची, गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पून कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी झुरते ।।३।।

आशाताईंनी गायिलेल्या खालील लोकप्रिय गीतात पांडुरंगाचे वर्णन विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे तर त्या गाण्यात जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे हे सत्यकथन केले आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धिउघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

वरील गीताच्या शेवटल्या ओळीत बंधुत्वाचा पुरस्कार केला आहे. पी.सावळाराम यांच्या मनातल्या सामाजिक बांधिलकीला खालील गाण्यात बहर आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला आलेले बाजारू रूप पाहून रखुमाई इतकी व्यथित झाली आहे की तिला क्षणभरही तिथे रहावेसे वाटत नाही. ख-या भक्तमंडळींना बाजूला सारून भोंदू लोकांनी देवाचा संपूर्ण ताबा घेतला हे तिला असह्य झाले आहे. आपण आता इथून निघूया, तुम्हाला नसेल यायचे तर मला तरी निरोप द्या असे ती विठोबाला काकुळतीने म्हणते.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला ।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा ।
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।

खालील गाण्यात पी.सावळाराम यांनी पंढरीतील परिस्थितीवर एका वेगळ्या प्रकारे भाष्य केले आहे. देव चराचरात भरलेला असतो, तो सगळीकडेच असतो असे आपण समजतो, तरीही त्याच्या दर्शनासाठी देवळात जातो. पण या गाण्यातली स्त्री असे सांगते की मी असे काही केले नाही, फक्त स्वतः चांगली वागले आणि काय चमत्कार पहा, तोच मला भेटायला माझ्याकडे आला. पुंडलीकाची मातापितासेवा पाहून तर तो स्वर्गातून त्याला भेटायला पंढरपूरला आला होता. त्याचप्रमाणे सद्वर्तनाची कदर करून तोच भक्ताकडे जातो असे या गाण्यात सुचवले आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।
तुळसी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ ।
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती ।
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला ।।२।।

देवळात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा मानवतेचे वर्तन हे अधिक धार्मिकतेचे लक्षण असते या विचाराचा पी.सावळाराम यांनी पुरस्कार केला आहेच. आईबाप हे सर्वात मोठे दैवत माझ्याजवळ असतांना त्यांना सोडून पंढरपुराला जायची मुळी मला गरजच नाही. असे खालील गाण्यातली नायिका ठामपणे सांगते.

विठ्ठल रखुमाई परी ।
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी ।
कशाला जाऊ मी पंढरपुरी ?
कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे ।
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे ।
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे ।
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी ।।१।।
सात समिंदर भरूनी उरली माया आईची ।
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची ।
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची ।
वत्सलमूर्ति माय माउली मानस - देव्हारी ।।२।।
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी ।
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी ।
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी ।
चरणांचे हे तीर्थ घेत्ये चंद्रभागेपरी ।।३।।

-----------------------------------------------------------

आपापल्या काळात तुफान लोकप्रियता पावलेली आणि मलाही आवडलेली निरनिराळ्या प्रकारची चार गाणी या समारोपाच्या भागात देणार आहे. दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि विठ्ठल शिंदे यांनी पारंपारिक अभंगाच्या धाटणीवर गायिलेल्या पाउले चालती या गाण्यात भक्ताच्या मनःस्थितीचे वर्णन केले आहे. रोजच्या आयुष्यात दारिद्र्याने गांजलेल्या भक्ताची पावले वारीची वेळ आली की आपोआप पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतात आणि देवदर्शनाचा प्रसाद घेतल्यानंतर त्याला नवचैतन्य प्राप्त होते, त्याचे उद्विग्न मन शांत होते आणि संसार गोड वाटायला लागतो. असे हे सरळ सोपे भक्तीगीत आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ ।।
   गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने, पडता रिकामे भाकरीचे ताट ।
   आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते, पाहुनिया सारे फिरविती पाठ ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट ।
मन शांत होता पुन्हा लागे ओढ, तैसा आणि गोड संसाराचा थाट ।।

विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्याने ज्या अनेकांना वेड लावले आहे त्यांच्यात माझासुद्धा समावेश होतो. हे गाणे मी पहिल्यांदा ऐकल्यापासून आजतागायत या गाण्याचा नंबर माझ्या टॉप टेनमध्ये लागत आला आहे. सुधीर फडके यांनी लावलेली चाल आणि दिलेल्या स्वराने ते अजरामर झाले आहेच, पण ग दि माडगूळकरांच्या शब्दरचनेला तोड नाही. जसजसे माझे अनुभवविश्व समृद्ध होत गेले तसतसे मला त्यात जास्त सखोल अर्थ सापडत गेले. याचा शब्दशः अर्थ घेतल्यास विठ्ठल नावाच्या अलौकिक कुंभाराला उद्देशून हे गाणे म्हंटले आहे, त्यात आधी त्याची तोंडभर स्तुती करून अखेर त्याच्या वागण्यामधील विसंगतीचा जाब त्याला विचारला आहे असा अर्थ निघतो. पण हे गाणे रूपकात्मक आहे हे उघड आहे. विठ्ठल म्हणजे तो जगाचा नियंता आणि त्याने तयार केलेली मडकी म्हणजे यातले सारे जीव, विशेषतः माणसे असा त्यातला छुपा अर्थ आहे. जगाचा जेवढा अनुभव येत जाईल त्याप्रमाणे त्या माणसांमधली तसेच त्यांच्या नशीबांमधली विविधता याची उदाहरणे मिळत जातात आणि त्या शब्दांमध्ये दडलेल्या अर्थाच्या अधिकाधिक छटा दिसतात. जास्त विचार केल्यानंतर मला वाटले की हा कुंभार कोणत्याही सृजनशील (क्रिएटिव्ह) कलाकाराचे प्रतीक असू शकतो. गदिमांसारखा कवी किंवा एकादा चित्रकार किंवा नटश्रेष्ठ आणि त्यांच्या रचना यांच्या संदर्भात या गाण्यातल्या ओळींचा वेगळा अर्थ काढता येतो. अखेर अंतर्मुख होऊन विचार केला तर विठ्ठल हा आपला अंतरात्मा आहे आणि आपल्याला तो निरनिराळ्या प्रकारे घडवत आला आहे असेही वाटते. गदिमांना हे सर्व अर्थ किंवा एवढेच अर्थ अपेक्षित होते असे माझे म्हणणे नाही. आणखी कोणी यापेक्षा वेगळे इंटरप्रिटेशन करू शकेल. ही या गाण्याची खुबी आहे आणि त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य त्यात दिसते.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा.
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे,
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

झेंडा या मागील वर्षी येऊन गेलेल्या सिनेमातले अरविंद जगताप यांनी लिहिलेले शीर्षकगीत चांगले गाजले होते. टीव्हीवरील मराठी सारेगमप या मालिकेमुळे जगापुढे आलेल्या ज्ञानेश्वर मेश्राम या आळंदीच्या भजनगायकाला त्या स्पर्धेचे परीक्षक अवधूत गुप्ते यांनी पार्श्वगायनाची संधी देऊन प्रकाशझोतात आणले. खरे तर हे गाणे म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. इथल्या अनुभवाने गोंधळलेला माणूस अखेर आपले गा-हाणे विठ्ठलापुढे मांडून त्यालाच मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. त्यामुळे विठ्ठला अशी त्याला घातलेली साद एवढाच या गाण्याचा विठ्ठलाशी संबंध आहे.

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचाऱ्या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी,
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हे जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती,
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

देवकीनंदन गोपाळा या संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटातले विठ्ठलाच्या पायी थरारली वीट हे गाणे सर्वच दृष्टीने मनाला भिडणारे आहे. गदिमांनी केलेली उत्कट शब्दरचना, राम कदम यांचे संगीत आणि भारतरत्न पं.भीमसेनजींनी त्यावर केलेली सुरांची बरसात यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे. भैरवी रागातील या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली तर त्याचे आर्त स्वर खूप वेळ मनात घुमत राहतात. या गाण्यात विठ्ठलाचे नामस्मरण नाही की त्याची प्रार्थना नाही की त्याला केलेली विनंती किंवा मागणेही नाही. संत गाडगेबाबांच्या महानिर्वाणाने सर्व संत व्याकुळ झाले आणि प्रत्यक्ष विठ्ठलावर त्याचा एवढा आघात झाला की त्याच्या पायाखालील विटेपर्यंत त्याची कंपने गेली अशी कल्पना गदिमांनी या गीतामध्ये मांडली आहे.

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट, राउळीची घाट, निनादली ॥१॥
     ज्ञानोबांचे दारी शहारे पिंपळ, इंद्रायणी-जळ, खळाळले ॥२॥
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात, तुका समाधीत, चाळवला ॥३॥
     सज्जनगडात टिटवी बोलली, समाधी हालली, समर्थांची ॥४॥
एका ब्राम्हणाच्या पैठणपुरीत, भिजे मध्यरात्र, आसवांनी ॥५॥
     अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव, निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥६॥
संत-माळेतील मणी शेवटला, आज ओघळला, एकएकी ॥७॥


. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)


No comments: