Sunday, May 23, 2010

मराठी ब्लॉगर्सचा मेळावा

Saturday, May 22, 2010
मराठी ब्लॉगर्सचा मेळावा (पूर्वार्ध)

९ मे रोजी दादरला झालेल्या या मेळाव्याला मी उपस्थित राहिलो होतो. कदाचित मी लगेच त्याचा सविस्तर वृत्तांत लिहिलाही असता. इतर अनेक ब्लॉगर मित्रांनी तो लिहिला आहेच. पण त्या मेळाव्याहून परततांना बसमध्ये एक अजब व्यक्ती भेटली आणि आधी त्याच्याबद्दल लिहावे असे वाटले. त्यानंतर मी आठवडाभर पुण्याला गेलो होतो. आता दोन आठवडे झाल्यानंतर या विषयावर लिहिणे हे वरातीमागून घोडे आणण्यासारखे असले तरी किरकोळ गोष्टी विस्मृतीच्या आड गेल्यानंतर जे शिल्लक राहते तेवढेच आपल्या दृष्टीने महत्वाचे असते हे ही तितकेच खरे आहे.

''एकाच पिसांचे पक्षी एकत्र येऊन त्यांचा थवा बनतो'' अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. इतर तत्सम म्हणींप्रमाणेच हीसुध्दा बहुतेक वेळा मानवी जीवनाला उद्देशूनच उपयोगात आणली जाते. शाळेच्या गणवेषापासून ते सैनिक, टॅक्सीड्रायव्हर आणि बँडवाले वगैरेपर्यंत अनेक माणसे युनिफॉर्ममध्ये दिसतात आणि घोळक्यात वावरत असतात. आम्ही केसरीच्या टूरवर गेलो होतो तेंव्हा त्यांनी दिलेली कॅप घालून एकत्र फिरत होतो. ही बाह्य पिसे झाली. याखेरीज अनेक वेगवेगळ्या रंगांची अदृष्य पिसे धारण करून आपण त्या त्या पक्ष्यांच्या मेळाव्यामध्ये रमत असतो. गेल्या वर्षभराचाच आढावा घ्यायचा झाला तर अशा विविध प्रकारांच्या मेळाव्यांचे निरनिराळे अनुभव घेतले.

जवळच्या आप्तांच्याकडल्या किंवा घरच्याच कार्यात अंगावर पडेल त्या कामाचा आणि जबाबदारीचा वाटा उचलला, तर दूरच्या नातेवाइकांकडे जमलेल्या 'इतरेजनां'मध्ये सामील होऊन मिष्टान्नांचा मनसोक्त आस्वाद घेतला. कार्यालयीन किंवा व्यावसायिक जीवनात ज्यांच्या ओळखी झाल्या होत्या अशा लोकांकडल्या समारंभांमध्ये आजी माजी सहकारी आणि समव्यवसायी लोकांबरोबर बोलण्यात रमलो. या सगळ्या भेटीगांठींमध्ये एक समान सूत्र असते. जुन्या आणि मजेदार आठवणींना उजाळा देत पूर्वीचे संबंध पक्के करणे, सद्यस्थितीचा अंदाज घेणे आणि भविष्यकाळातल्या योजनांची स्वप्ने रंगवणे हे त्यात यायचेच, शिवाय दोघांनाही परिचित असलेल्या इतरांचा ठावठिकाणा अशा गप्पांमधून मिळतो. आधीपासून ओळख असलेल्या लोकांचे छंद माहीत असतात, त्यांनी कशात प्राविण्य मिळवले आहे हे ठाऊक असते, त्याबद्दल बोलता येते. कांहीच समानसूत्र नसले तरी आणि असले तरी हवापाणी, राजकारण, सिनेमा, नाटके, खेळ, महागाई, ट्रॅफिक जॅम वगैरे विषयांवर तर कोणाशीही बोलावे.

विजेची निर्मिती करण्याशी संबंधित अभियंत्यांची कार्यशाळा, श्रीमती कमलाताई काकोडकर यांनी लिहिलेल्या 'एक धागा सुताचा' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचा वर्धापन दिन आणि परांजप्यांनी केलेले सोळा सोमवारव्रताचे उद्यापन अशा चार टोकाच्या चार प्रातिनिधिक समारंभांना मी गेल्या वर्षभरात हजेरी लावली होती. एकाद दुसरा अपवाद वगळतां या चार ठिकाणी जमलेली माणसे वेगळी होती. असे असले आणि समारंभाचे मुख्य प्रयोजन आणि त्याच्या संबंधाने केले गेलेले कार्यक्रम सर्वथा भिन्न प्रकारचे असले तरी त्या मेळाव्यात जमलेल्या लोकांबरोबर केलेले व्यक्तीगत संभाषण मात्र वर दिलेल्या प्रकारांत मोडणारे होते.

आंतर्जालावरील विश्व अगदी समांतर म्हणण्याइतके विस्तारलेले नसले तरी त्याने आपल्या जीवनात एक महत्वपूर्ण जागा तयार केली आहे. जेंव्हा जेंव्हा वेळ आणि संधी मिळेल तेंव्हा त्या विश्वात जावेसे वाटते आणि जाणे होते. तिथे कांही माणसांची अधून मधून तर कांहीजणांची वारंवार गांठ पडते, त्यातल्या कांहींबरोबर पटते कांहींबरोबर पटत नाही. त्यामुळे कोणाशी संवाद तर कोणाशी वाद होतो. यातून एक प्रकारची आपुलकी निर्माण होते, त्या लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होते. ही उत्कंठा मलाच वाटते असे नाही, इतरांनाही तशी वाटत असते असे दिसते. मागे एकदा अमेरिकेतल्या एका अप्रसिध्द गांवी कांही दिवस माझा मुक्काम होता. त्याचा सुगावा लागताच जवळच राहणा-या मीनलताईंनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष येऊन अगत्याने मला आपल्या घरी घेऊन गेल्या. केवळ आंतर्जालावर झालेल्या ओळखीतून इतके अपूर्व आदरातिथ्य मला मिळाले. मनोगत या संकेतस्थळाच्या ठाणेकट्ट्याला जायची संधी मला मिळाली होती. त्या जागी जमलेल्या मनोगतींची गट्टी पहाण्यासारखी होती.

मराठी ब्लॉग लिहिणा-यांची संख्या आता हजारावर गेली असून वेगाने ती वाढते आहे. ते लोक जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांत आणि भारताच्या अनेक राज्यांत विखुरले असले तरी पुण्यामुंबईमध्ये त्यांची संख्या मोठी असणार हे साहजीक आहे. प्रत्येकजण स्वांतसुखाय लिहीत असला तरी आधी आपल्या ओळखीच्या लोकांनी आणि नंतर इतरांनी काय लिहिले आहे हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना असते. मुळात ब्लॉग लिहिणे हाच अजून तरी अवांतर उद्योग असल्यामुळे ज्यांना लष्करच्या भाकरी भाजायला आवडतात असे लोकच या फंदात पडतात. त्याशिवाय सुरुवातीला फक्त वाचन करणारेही असतात. ते कधीकधी अभिप्राय देण्यापुरते लिहितात. अशा लेखक वाचकांना एकत्र येण्याची इच्छा असते, पण त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक असते. इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहिणा-यांची संख्या अफाट असली तरी पुण्यामुंबईला त्यांचे असे संमेलन भरल्याचे माझ्या ऐकीवात तरी नाही. कांही उत्साही पुणेकर मंडळींनी प्रयत्न करून मराठी ब्लॉगर्सचे पहिले संमेलन पुण्यात भरवले.

------------------------------------------------
मराठी ब्लॉगर्सचा मेळावा (उत्तरार्ध)

पुण्याच्या मराठी ब्लॉगधारकसंमेलनाला मिळालेले यश पाहता मुंबईतसुध्दा असे संमेलन भरवलेच पाहिजे असे अनेकांच्या मनात आले असणार, पण मुंबईतल्या जीवनात रोजच करावी लागणारी धडपड आणि त्यासाठी घालवावा लागणारा वेळ यांचा विचार करता हे जास्तीचे काम करणे जास्तच कठीण आहे. पण योजकस्तत्र दुर्लभः असे असले तरी कांचन, महेंद्र आणि रोहन यांनी मिळून चंग बांधला आणि असा मेळावा भरवायचे ठरवले. एकादा घरगुती कार्यक्रम करायचे ठरवतांनासुध्दा त्यासाठी कोणाकोणाला बोलवायचे यावर भरपूर विचार केला जातो. त्या कार्यक्रमात कोणाकोणाची उपस्थिती अत्यावश्यक आहे यापासून कोणाला बोलवायला हरकत नाही इथपर्यंत निरनिराळी वर्तुळे काढून त्यात येणा-या व्यक्तींची गणना केली जाते. त्यातले कोण कोण येण्याची शक्यता आहे हे अजमावून पाहून त्या प्रत्येक वर्तुळातली किती माणसे या कार्यक्रमाला येऊ शकतील याचा अंदाज घेतला जातो. हा कार्यक्रम घरातल्या किंवा शेजा-याच्या दिवाणखान्यात करायचा की अंगणात अथवा गच्चीवर मांडव घालायचा की कॉलनीमधला हॉल भाड्याने घ्यायचा आणि त्यासाठी काय करावे लागेल, किती खर्च येईल वगैरे पाहून अखेर त्याची रूपरेषा आणि आमंत्रणाची यादी वगैरे बाबत सारे ठरवले जाते.

या ब्लॉगर्सच्या मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी सगळीच सुरुवात शून्यापासून करावी लागणार होती, कारण मुंबईच्या परिसरात किती मराठी ब्लॉगधारक रहात असतील याची निश्चित गणना उपलब्ध नाही. त्यातल्या किती लोकांना मेळाव्यात येण्यासाठी उत्साह असेल, त्यातल्या किती लोकांशी संपर्क साधणे शक्य होईल आणि त्यातल्या किती जणांना येणे जमेल हे सगळेच अनिश्चित होते. पुण्याच्या मेळाव्यातून एक अंधुकसा अंदाज आला होता. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल अशी अपेक्षा होती. पण संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी करावी लागते तसे करायचे होते. या कार्यक्रमाच्या संयोजकांनी अत्यंत सुनियोजितपणे कामाची आखणी केली. मेळावा भरवायचे ठरल्यानंतर त्याची घोषणा आपापल्या ब्लॉग्जवर केलीच, आंतर्जालावरील मराठी भाषिकांच्या पंढरीवर म्हणजेच मिसळपाववरही त्याला प्रसिध्दी दिली. या कार्यक्रमासाठी एक बोधचिन्ह तयार केले आणि विजेटद्वारे ते कोणालाही आपल्या ब्लॉगवर लावण्याची सुविधा प्रदान केली. आंतर्जालावर भ्रमण करणा-या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती या सर्वांमधून पोचवली गेली आणि लगेच त्यासाठी आपले नांव नोंदवण्याची व्यवस्थासुध्दा केलेली असल्यामुळे त्यांच्या आवाहनाला कल्पनेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. याशिवाय प्रत्यक्ष बोलून आणि टेलीफोनवरून अनेक लोकांशी संपर्क साधला असणारच आणि त्यातून अधिक नोंदणी झाली असणार.

हल्लीच्या काळातले कांही लोक लहान मुलाच्या वाढदिवसाचे काँट्रॅक्टसुध्दा एखाद्या इव्हेंट मॅनेजरला देतात आणि स्वतः पाहुण्यांसारखे कोचावर हाःशहुःश करत बसलेले दिसतात. या मेळाव्याचे संयोजक म्हणजे कांचन, महेंद्र आणि रोहन मात्र तो सुरू होण्याच्या आधीपासून तो संपेपर्यंत सतत हे त्यांच्या घरचे कार्य असल्याप्रमाणे वावरतांना दिसत होते. आलेल्या लोकांचे सस्मित स्वागत करणे, त्यांच्या बसण्याची तसेच खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करणे आणि ती झालेली आहे याकडे लक्ष देणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वगैरे सगळे कांही काम हे लोक मनःपूर्वक करत होते. अर्थातच कार्य सुसूत्रपणे पार पडल्याचे समाधानही निरोप घेतांना त्यांच्या चेह-यावर दिसले.

या मेळाव्याला येणा-या पाहुण्यांची नीट व्यवस्था करणे ही त्याच्या यशाची गुरुकिल्ली होती. त्यांच्या आंकड्याचा अंदाज आल्यानंतर तेवढ्या लोकांसाठी पुरेशा आकाराचा, आवश्यक अशा सुखसोयी असलेला आणि अफाट पसरलेल्या मुंबईतल्या सर्वांनाच येण्यासाठी सोयीस्कर अशा जागी असलेला हॉल निवडणे खूप महत्वाचे होते. त्यासाठी पहाणी करून त्यांनी केलेली निवड अचूक अशी होती. मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गांनी जोडलेली आणि नव्या मुंबईहून येण्यासाठी उत्तम बससेवा उपलब्ध असणारी दादर हीच सर्वात सोयीस्कर अशी जागा होती याबद्दल दुमत नव्हते. कार्यक्रमाचे स्थान सांगतांना तो हॉल सुप्रसिध्द श्रीकृष्ण बटाटेवडावाल्याच्या जवळ असल्याचे त्या संदेशात लिहिले होते. म्हणजे तिथे लवकर जाऊन पोचलो तर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आणि उशीर झाला तर तो संपल्यावर गरमागरम बटाटेवडे खायचे असे मनोमनी ठरवले. पण कार्यक्रमाच्या संयोजकांनी सर्व पाहुण्यांना जागेवरच मस्त बटाटेवडे तर पुरवलेच, त्याबरोबर चविष्ट पॅटीसचा बोनसही दिला.

या कार्यक्रमाची एक रूपरेषा (अजेंडा) ठरवण्यात आलेला होता. त्याचा मात्र अंमल करता आला नाही. नेमक्या त्याच दिवशी रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्यामुळे बरेचसे ब्लॉगर वेळेवर हजर होऊ शकले नाहीत आणि त्यांची पुरेशी संख्या होण्यासाठी अर्धा तास तरी थांबावे लागले. सर्वांनी आपापली ओळख करून देण्यासाठी दीड तासांचा वेळ दिला होता. शंभर लोकांसाठी हा वेळ पुरेसा नव्हताच, शिवाय कांही लोकांना हातात माइक आल्यानंतर वेळेचे भान रहात नाही. चर्चेसाठी खास वेगळा वेळ दिलेला असतांना त्यातले मुद्दे ओळख करतांनाच मांडले गेले. सगळेच सन्मान्य अतिथी असल्यामुळे कोणालाही बोलतांना अडवणे संयोजकांना प्रशस्त वाटले नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळा वेळ ओळखपरेड करण्यातच संपून गेला आणि त्यानंतर फारशी चर्चा होऊ शकली नाही.

संगणकावर देवनागरी लिपीत कसे लिहावे आणि आपले शुध्दलेखन कसे सुधारावे याबद्दलच थोडीशी चर्चा झाली. अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांनी केले मार्गदर्शन नवख्यांना चांगले उपयुक्त वाटले असेल. मी हा प्रश्न चार वर्षांपूर्वीच माझ्यापुरता सोडवला असल्यामुळे माझ्या दृष्टीने त्यातून कांही लाभ झाला नाही. आंतर्जालावरून घेतल्या जाणा-या चित्रांबद्दल, म्हणजे त्यांच्या कॉपीराइट्सबद्दल थोडी चर्चा झाली, पण त्यातून मार्ग कसा काढायचा हे कांही समजले नाही. अशी उचलेगिरी न करणे हेच श्रेयस्कर आहे असे दिसले. आपले लेखन कसे सुरक्षित ठेवावे हे ही समजले नाही. गूगल सर्चवर माझे नांव टाकले तर माझाच ब्लॉग, माझ्याच नांवाने पण भलत्याच संकेतस्थळावर दिसतो. त्याला कांही जाहिरातीही जोडलेल्या असतात. त्याचा आर्थिक फायदा मला मिळत नाही, पण या ठिकाणी कोणीतरी तो वाचत असेल असे दिसते. त्यामुळे हा प्रकार चांगला आहे की वाईट यावर माझाच निर्णय झालेला नाही. वेळे अभावी मला हा प्रश्न तज्ज्ञापुढे ठेवता आला नाही.

ब्लॉगर्सच्या ओळखीच्या कार्यक्रमातूनही बरीच नवी माहिती मिळाली. शासनसंस्थेमध्ये ज्येष्ठ पदावर कार्यरत असलेल्या चतुरस्र लेखिका लीनाताई मेहेंदळे तब्बल बत्तीस ब्लॉग्ज चालवतात. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगळा ब्लॉगच सुरू करायचा आणि त्यात भर टाकत रहायचे असे त्यांचे धोरण आहे. आपणच पूर्वी लिहिलेले लिखाण सापडणे सोपे जावे यासाठी त्यांनी ही युक्ती योजली आहे. पुढेमागे ते लेखन पुस्तकरूपाने प्रसिध्द करण्यातही त्याचा फायदा मिळेल. बरहा किंवा गूगलने दिलेली देवनागरीत लिहिण्याची सुविधा वापरतांना मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग करून लिहिले जाते. पण याची संवय झाल्यानंतर मुळाक्षरे, काना मात्रा वगैरे गोष्टी पुढील पिढी विसरून जाईल अशी भीती त्यांना वाटते. त्याऐवजी अआइई, कखगघङ वगैरे अक्षरे ओळीवार लिहिलेला कीबोर्ड तयार करावा असा मार्ग त्यांनी सुचवला आहे. त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. रशियन किंवा जपानी भाषेत असे करणे शक्य असेल तर मराठीत कां नको हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे. पण खुद्द इंग्रजी भाषेतली अक्षरे एबीसीडीई या क्रमाने न येता क्यूडब्ल्यूईआरटी येतात याला कोणाचा विरोध नाही. मराठी लिपी फोनेटिक असल्यामुळे तिची मुळाक्षरे ओळीने आली तर ती शोधणे सोपे जाईल खरे, पण हे कसे होणार हे मला तरी समजत नाही.

ब्लॉगिंगशी थेट संबंध नसलेली पण मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची कांही माहिती मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक महासंकेतस्थळ उभारण्यात येत आहे. आजवर कोणत्याही महापुरुषावर कोणत्याही भाषेत तयार केल्या गेलेल्या साईटपेक्षा हे स्थळ मोठे असणार आहे. गेली कित्येक वर्षे त्यावर काम चालले असून ते आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोचले आहे. ते प्रसिध्द झाल्यानंतर सर्व ब्लॉगर्सनी त्या स्थळाला वारंवार भेट देऊन त्यावरील संदर्भपूर्ण माहितीचा कसून अभ्यास करावा असे कांहीतरी सांगितले जाईल असे मला वाटले होते. पण त्या संकेतस्थळावर वाचकांकडून प्रश्नांचा प्रचंड वर्षाव होणार आहे आणि सखोल अभ्यास करून त्यांची समर्पक उत्तरे देण्याचे मोठे काम आगामी काळात निर्माण होणार आहे वगैरे समजले, पण ब्लॉगलेखकांकडून त्याला कशी मदत होणे शक्य आहे ते कांही समजले नाही. कदाचित ब्लॉगलेखकांना गरज असल्यास लेखनिकाचे काम मिळेल असे त्यांना सुचवायचे असावे.

मराठी भाषा आणि लिपी याबद्दल चर्चा चाललेली असतांनाच वेळ संपत आल्याचे पाहून स्टार माझाच्या प्रसन्न जोशीने माइक हातात घेतला आणि चर्चेचे सांधे बदलून मराठी ब्लॉग्जचे सध्याचे स्वरूप कसे आहे आणि ते कसे असायला हवे यावर आपले सुविचार मांडले. बटाटावडा, गुढीपाडवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक एवढ्यातच मराठीपण संकुचित नसावे, त्याला वैश्विक रूप यायला हवे, जगातल्या इतर भाषांमधले उत्कृष्ट साहित्य मराठीत यावे आणि मराठीतले वाङ्मय जागतिक पातळीवर सगळ्या भाषांमधून वाचले जावे वगैरे बरेचसे स्वप्नरंजन त्यात होते. वेळे अभावी त्यावर फारसे प्रतिसाद येऊ शकले नाहीत. आजमितीला तरी मराठीतला कोणताच प्रतिष्ठित साहित्यिक ब्लॉगवर लिहीत नाही. कोणी ते लिहिले तर त्याला त्याचे मानधन कसे मिळणार हा कळीचा मुद्दा असल्यामुळे व्यावसायिक दृष्टीने ते नजरेच्या टप्प्यात दिसत नाही. हौस म्हणून, मनात येईल तसे, वाट्टेल ते वगैरे लिहिण्याची ऊर्मी शमवण्यासाठी बहुतेक लोक ब्लॉगचा आसरा घेचाच. या प्रकारातून सकस साहित्य निर्माण होण्याची कितपत अपेक्षा बाळगावी याला मर्यादा येणारच. प्रसन्नने उपस्थित केलेले सगळे मुद्दे पटण्यासारखे होते, पण प्रॅक्टिकल वाटले नाहीत.

पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे या मेळाव्यात चार लोकांच्या भेटी होतील एवढीच माझी माफक अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झाली. प्रमोद देव यांची अत्यानंद या नांवाने मनोगतावर पहिली ओळख झाली होती. त्यावेळी माझ्याच अज्ञानामुळे आनंदघन या माझ्या ब्लॉगच्या नांवाने मी स्वतः ओळखला जात होतो. नंतर मिसळपाववर आल्यानंतर दोघांनीही आपापली खरी नांवे धारण केली. आंतरजालावरले हे आद्य काका संयोजकत्रयींच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करत होते. विलेपार्ल्याहून आलेला एक आजोबांचा ( खरे तर पणजोबांचा) ग्रुप होता. एक लहानसे मूल जगाकडे कसे पहात असेल याचा विचार करून ते त्याच्या नांवाने ब्लॉगवर लिहिणारी आईमुलाची जोडी आली होती. कांचन, महेंद्र, हरेकृष्णजी वगैरेंनी मला (ब्लॉगमधल्या फोटोवरून) ओळखून अभिवादन केले. शंतनू आणि आल्हाद यापूर्वी मनोगताच्या कट्ट्यावर भेटले होते. नीरजा आणि सलिल यांची स्टार माझाच्या कार्यक्रमात ओळख झाली होती. याखेरीज केवळ नांवाने किंवा टोपणनांवाने माहीत असलेले अनेक ब्लॉगर प्रत्यक्षात पहायला मिळाले. त्यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यातून कळत नकळत कांही ना कांही ग्रहण केले गेले असेलच आणि कदाचित ते माझ्या लेखणीतून बाहेर पडेलसुध्दा.

4 comments:

HAREKRISHNAJI said...

सुंदर लिहीले आहात, सारे चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले.

Anonymous said...

दुर्दैवाने मला येता आलं नाही पण तुमच्या ब्लॉग वरुन कळ्लं की मेळाव्यात नक्की काय झालं असेल. धन्यवाद आणि अभिनंदन. असे प्रयत्न जास्तित जास्त व्हायला पाहिजे.

Anand Ghare said...

सविस्तर वृत्तांतासाठी मोगरा फुलला हा ब्लॉग अवश्य वाचावाच.

samc said...

Q 5. We publish a lot of original content but there are scrapers who copy our content without giving any credit. The sad part is sometimes these sites, who copy our content, rank higher than the original content creator. How can we tackle this problem? Does Google Search take into account the timestamp when an article was published for search results rankings? Why does Google even index scrapers?

Koteswara Ivaturi: This is a popular question. At the outset, duplicate content due to scraping does not equate to a webmaster violation because we know that it is not the fault of the webmaster to not have control over who is scraping the content from his website.

Google is very good at identifying the original source in such cases and so that takes care of the any potential negative effects that the original source may have. It is very rare that the scraped sites rank better than the original site in the search results; but if that happens you can follow the instructions.

Please check http://www.labnol.org/internet/google-answers-seo-questions/13731/

Hopefully this will answer your problem.