Sunday, December 07, 2014

सोनार, शिंपी आणि परीट - भाग १ ते ३

या लेखाचे तीन भाग एकत्र केले. दि.३०-०७-२०२३

"सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा । यांचा विश्वास नको रे बाप्पा ।।" अशी एक प्राचीन काळातली म्हण आहे. हे सांगून मला कोणाचीही बदनामी करायची नाही. हे माझे स्वतःचे मत नाही. यातल्या कोणावरही एवढा अविश्वास दाखवावा असे वाईट अनुभव मला आलेले नाहीत, खरे तर असे सरसकट मत बनवण्याइतका या लोकांशी माझा संपर्कच आलेला नाही. ही म्हण खूप पूर्वीच्या काळात पडली होती आणि माझ्या लहानपणी मी ऐकली होती. दुसऱ्या लोकांचे सोने, कापड किंवा मालमत्ता यांचा व्यवहार या लोकांकडे असायचा. त्यांच्या निष्काळजीपणाचा किंवा हातचलाखीचा भुर्दंड त्या संपत्तीच्या मालकांना पडायचा आणि असा दुसऱ्याच्या चुकांचा भार कोणालाही सहन होणार नाही. यामुळेच त्यांच्यापासून जरा सांभाळून राहण्याचा इशारा या म्हणीतून दिला जात असावा. त्यांच्याकडे थोडे अविश्वासाने पाहिले जात असावे. असा अविश्वास बाळगणे हा संशयखोर माणूसजातीचा स्वभावधर्मही म्हणता येईल. "जो दुज्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग नासला." ही म्हणसुद्धा हेच दर्शवते. कदाचित काही लोकांच्या बिलंदरपणाचे प्रच्छन्न कौतुक या म्हणीमधून केले जात असेल.

"सोनार लोक सोन्याचे दागिने घडवतात" आणि "शिंपी लोक कपडे शिवतात" एवढे सामान्यज्ञान कोणीही सांगेल. पण मला या दोन्ही आडनावांचे इंजिनियर भेटले आहेत, या नावाचे लोक रेल्वे, पोलिसदल, शेअरबाजार किंवा आयटी इंडस्ट्रीमध्येही सापडतील. हा लेख या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या लोकांविषयी नाही, हे व्यवसाय करणाऱ्यांवर आहे. 'सोन्याचांदीचे अलंकार बनवणारे ते सगळे सोनार' आणि 'कपडे शिवणारे ते सारे शिंपी' अशी व्याख्या या लेखापुरती करून घ्यावी, मग त्याचे आडनाव पेठे, पाटील, प्रधान असे काहीही असो, चित्तमपल्लीवार, चिप्पलकट्टीकर किंवा इस्माईल, फर्नांडिस असेही असू शकेल.

सोनार आणि शिंपी लोक काय करतात हे जसे लगेच समजते तसे कुलकर्णी लोक काय करतात, त्यांची व्याख्या कशी करता येईल? हे मात्र सहसा कोणालाच सांगता येणार नाही. इतिहासकाळात म्हणजे इंग्रजांचे राज्य यायच्या आधी मराठेशाही, बहामनी साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य वगैरेंच्या काळात गांवागांवामधून शेतसारा किंवा महसूल गोळा करणे. त्याचा हिशोब ठेवणे आणि राजा, महाराजा, जहागिरदार, वतनदार वगैरे जो कोणी स्थानिक शासक असेल त्याला तो पोचवणे वगैरे 'रेकॉर्ड कीपिंग' आणि 'बुक कीपिंग'ची कामे करणाऱ्या लोकांना 'कुलकर्णी' हा खिताब असायचा असे समजले जाते. इंग्रजांनी त्यांचा जम बसवल्यानंतर सगळ्या देशाचा सर्व्हे करून जमीनीच्या मालकीचे लेखी दस्तऐवज तयार करून घेतले आणि निरनिराळ्या पातळ्यांवर त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंटची यंत्रणा उभी केली. त्या कामासाठी लहान गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये तलाठी नेमले. त्यानंतर 'कुलकर्णी' हा पेशा किंवा हुद्दा राहिलेला नाही, या कारणाने त्यांचा समावेश या लेखात केला नाही. शिंप्यांनी शिवलेल्या कपड्यांची वेळोवेळी धुलाई करून, त्यांना इस्त्री करून चांगले रूप देण्याचे काम परीट करत असत. शिंपी हा कपड्यांचा निर्माता ब्रह्मदेव असला तर परीट हा त्यांचा विष्णू (आणि कधीकधी विनाश करणारा शिव) आहे असे म्हणता येईल. या नात्याने त्यांचाही परामर्श या लेखात घेतला आहे.

                                                                            भारतीय सोनार

सुवर्णाचे अलंकार परिधान करण्याची प्रथा पुरातन काळापासून जगभरात चालत आली आहे. पौराणिक कथांमध्ये आणि देवदेवतांच्या स्तोत्रांमध्ये त्याचे उल्लेख येतात, पुरातन काळातल्या शिल्पांमधल्या आणि मूर्तींमधल्या व्यक्तींनी किंवा देवतांनी नेहमीच अलंकार घातलेले आढळतात. ग्रीस देशातल्या एका सोनाराने तिथल्या राजाचा मुकुट तयार करतांना त्यात लबाडी केली असावी अशी शंका त्या राजाला आली, त्या मामल्याचा तपास करतांना आर्किमि़डीजला पाण्याच्या उद्धरणशक्तीचा शोध कसा लागला याची सुरस कहाणी सर्वांना माहीत असेलच. मध्ययुगात होऊन गेलेल्या संत नरहरी सोनाराचे नावही सर्वांनी ऐकले असेल. महाराष्ट्रात सोनार. उत्तर भारतात सोनी, युरोपात गोल्डस्मिथ किंवा गोल्डश्मिट ही नावे प्रचलित आहेत. कदाचित त्या लोकांनी परंपरागत उद्योग सोडून आता नवे व्यवसाय सुरू केले असतील. पुरातन काळापासून ते आजपर्यंत सोनारांचे अस्तित्व आहेच हे या उदाहरणांवरून दिसते. सोनारांच्या कामाच्या स्वरूपावरून "सोनाराने कान टोचले ते बरे झाले.", "नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.", "सौ सुनारकी, एक लुहारकी।" यासारखे वाक्प्रचार आणि म्हणीही प़डल्या आहेत.

माझी आई, काकू, आत्या वगैरे आधीच्या पिढीतल्या स्त्रियांच्या हातात, बोटात, गळ्यात आणि कानात नेहमी रोजच्या वापरातले सोन्याचे दागिने घातलेले असायचे. शिवाय त्यांचे जास्तीचे आणि खास दागिने कड्याकुलुपांमध्ये सांभाळून ठेवलेले असायचे. त्यातले बरेचसे दागिने त्यांची आई, आजी, सासू, आजेसासू अशा कुणीतरी त्यांच्या अंगावर घातलेले असायचे. ज्या काळात त्यांनी स्वतःसाठी काही नवे दागिने घडवून घेतले होते त्या भूतकाळात सोन्याचा भाव तोळ्याला पंधरा किंवा वीस रुपये एवढाच होता म्हणे. माझ्या बालपणापर्यंत तो गगनाला भिडला होता म्हणजे शंभर रुपयावर गेला होता. त्या काळात आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जरा ढासळलेली असल्यामुळे नव्या दागिन्यांची खरेदी करणे अशक्य झाले होते. वंशपरंपरागत चालत आलेल्या जुन्या दागिन्यांना प्रचंड भावनिक मूल्य असायचे, ते वितळवून त्यातून नवे दागिने करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ दिला जात नसे. शिवाय हे काम करतांना आपल्या शंभर नंबरी बावनकशी सोन्याचे रूपांतर कशात होईल याची धाकधूक मनात वाटत असे. अशा कारणांमुळे माझ्या शालेय शिक्षणाच्या काळात अगदी क्वचितच सोन्याच्या नव्या दागिन्यांची खरेदी झाली असेल. त्या निमित्याने कोणा मोठ्या माणसांच्या सोबतीने, त्यांचा काही निरोप सांगायसाठी, किंवा विचारणा करायसाठी एकाद्या सोनाराकडे माझे जाणे कधी झालेच नाही.

सुतार, लोहार, कुंभार यासारख्या इतर कारागीरांचे काम नेहमी उघड्यावरच चाललेले असायचे आणि गावातल्या रस्त्यांनी जात येत असतांना ते आपणहून नजरेला पडत असे, पण सोनारांचे काम मात्र कोणाला सहजपणे दिसू नये अशा 'हाय सिक्यूरिटी झोन'मध्ये चालत असावे. प्रखर आच देणारी खास प्रकारची शेगडी, त्यावर ठेवलेली लहानशी मूस, त्यातला वितळलेल्या सोन्याचा चमचमणारा नेत्रदीपक द्रव, सोन्याच्या गोळ्यापासून पत्रा किंवा तार बनवण्याची आणि अलंकारांना निरनिराळे आकार देण्याची नाजुक अवजारे, अत्यंत नाजुक असे दागिने तयार करण्याचे आणि त्यावर सुंदर वेलबुट्ट्या, फुले, पाने वगैरे कोरण्याचे कौशल्य हे सगळे जवळून पाहण्याची मला खूप उत्सुकता असायची, पण तिची पूर्तता होण्याचा योग आजपावेतो आला नाही. त्यासंबंधी सिनेमा आणि डॉक्युमेंटरींमध्ये जेवढे पाहून समजले असेल तेवढेच.

"ऑल दॅट ग्लिटर्स ईज नॉट गोल़्ड" म्हणजे "चमकणारे सगळेच काही सोने नसते." अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. याचाच अर्थ असा होतो की सोन्याशिवाय इतर काही पदार्थदेखील चमकू शकतात, उदाहरणार्थ चांदी. पूर्वीच्या काळातसुद्धा गरीबांना सोने परवडत नसल्यामुळे वेगळ्या प्रकारची चमक असलेल्या चांदीचे दागिने वापरले जात असतच, आजही ते सर्रास वापरले जातात. छुमछुम असा मंजुळ आवाज करणारे काही दागिने तर खास चांदीचेच असावे लागतात. चांदीचे दागिनेसुद्धा सोनारच बनवत आले आहेत. 'चंदार' किंवा 'चांदेर' असा वेगळा व्यावसायिकवर्ग कधीच नव्हता. पितळेचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असला तरी त्याला चमक नसते. चार चौघांमध्ये आपले पितळ उघडे पडू नये असेच प्रतिष्ठित लोकांना वाटत असणार. यामुळे पितळेचे दागिने करून घालायला ते धजत नसत. चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा दिला तर ते मात्र हुबेहूब सोन्यासारखे दिसतात. पण ते जपूनच वापरायला हवेत. सोन्याचा पातळसा थर जरासा झिजला की आतली चांदी दिसू लागते. वाढत्या भावामुळे सोने परवडेनासे झाल्याने त्याच्या पर्यायांचा विचार जास्त गांभिर्याने केला जाऊ लागला. सोन्यासारखे चमकणारे आणि ती चमक अधिक काळ टिकवून धरणारे नवनवे मिश्रधातू तयार केले गेले, चमक आणणाऱ्या नवनव्या प्रक्रियांचे शोध लागले आणि त्यांच्यापासून तयार केलेली आर्टिफिशियल ज्युवेलरी मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागली.

गेल्या काही वर्षांमध्ये माणसांच्या जीवनशैलीतही बदल होत गेले. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय यानिमित्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात किंवा एकएकटीने घराबाहेर पडायला लागला. सोन्याच्या किंमतीमुळे काही प्रमाणात त्याच्या चौर्याचे भय पूर्वीपासून होतेच. मृच्छकटिक या संस्कृत नाटकातही घरफोडी करणारे शर्विलक नावाचे पात्र आहे. पण अलीकडच्या काळात भुरट्या साखळीचोरांची संख्या अतोनात वाढल्यामुळे सोन्याचे दागिने अंगावर लेवून घराबाहेर पडणे धोक्याचे झाले. महिलांना अलंकारांची हौस तर असतेच, यामुळे ती पुरवून घेण्यासाटी आर्टिफिशियल ज्युवेलरीचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. हे कृत्रिम दागिने यंत्रांनी तयार केले जातात. त्यांचे डिझाईन करण्याचा भाग वगळल्यास त्यांच्या निर्मितीत सोनारांचा सहभाग नसतो.

दागिन्यांच्या बाबतीतल्या वाढत्या प्रतिस्पर्ध्यांमुळे सोन्याचे बाजारभाव मात्र कमी झाले नाहीत. सोन्याचे भाव हा अर्थशास्त्राशी संबंधित असलेला वेगळाच विषय आहे. सोनारांच्या व्यवसायावर मात्र याचा विपरीत परिणाम झाला असणार. यांत्रिकीकरणामुळे सर्वच हस्तव्यवसायांवर गदा आली. सुवर्णकार तरी त्यातून कसे वगळले जाणार? एकासारख्या एक अशा अनेक वस्तू तयार करणाऱ्या यंत्रांनी कोणतेही काम चुटकीसरशी होते. त्यांना चालवण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची संख्या कमी असते आणि हे काम करण्साठी त्या कामगारांकडे हस्तकौशल्य असावे लागत नाही. यंत्रे चालवणे हे वेगळे तंत्र त्यांना शिकून घ्यावे लागते. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक दागिन्याची घडण हाताने करतांना त्यातले बारीक डिझाईन गुंफणे किंवा कोरून काढणे हे कौशल्याचे आणि चिकाटीचे काम असते, त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो, त्या प्रमाणात उत्पादन कमी होते आणि खर्च वाढतो. पण या बाबतीत यंत्रांचा वापर करून उत्पादन वाढवता येते. आज तरी जेवढे मला माहीत आहे ते पाहता, शहरातले बहुतेक ग्राहक विश्वासार्ह अशा दागिन्यांच्या दुकानात जातात आणि तिथे ठेवलेले दागिने पाहून त्यातले त्यांना आवडणारे आणि परवडणारे दागिने विकत घेतात. ते हस्तकलेने तयार केलेले असतात की यंत्रांमधून निघालेले असतात याचा विचार किंवा चौकशी करण्याचे काहीच कारण नसते. कोणत्या सोनाराने ते बनवले आहेत याचा त्यांना कधीच पत्ता लागत नाही, ग्राहक आणि सुवर्णकार यांचा थेट संबंध आजकाल येत नाही. सोनार हा कौशल्यपूर्ण व्यवसाय भविष्यकाळात शिल्लक राहिला तरी दुर्मिळ होणार आहे असे मला वाटते. 

.  . . . . .  . . . .

सोनार, शिंपी आणि परीट - भाग २

जनावरांची कातडी माणसांनी पांघरून त्यापासून ऊब आणण्याचे प्रयोग इतिहासपूर्व म्हणजे आदिमानवाच्या काळातच सुरू झाले होते असे म्हणतात. त्या काळातल्या काही लोकांनी त्या कातड्यांच्या तुकड्यांना एकमेकांना जोडून त्यातून वस्त्रेही तयार केली असावील. ते काम करणा-या लोकांना 'शिंपी' म्हणण्यापेक्षा 'चर्मकार' म्हणणे कदाचित जास्त योग्य होईल. प्राचीन काळातल्या भारतातली जी शिल्पे, भित्तीचित्रे वगैरे सापडली आहेत त्यावरून असे दिसते की त्या काळातले भारतीय लोक पितांबर, शेले यासारखी अंगाला गुंडाळण्यासारखी किंवा पांघरण्यासारखी चौकोनी वस्त्रे धारण करत असावीत. त्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी विणकरांची आवश्यकता असली तरी शिंप्यांची गरज नसणार. काही कथांमध्ये कंचुकीचे उल्लेख येतात, पण ती शिवणकाम करून तयार केली जात असे की तशा आकारात विणली जात असे कोणास ठाऊक. ती शिवली जात असली तरी ते काम बहुधा स्त्रीवर्गच करत असावा असा माझा अंदाज आहे. वेगवेगळ्या आकारांचे कापडाचे तुकडे कापून आणि त्यांना एकमेकांना जोडून त्यांचे निरनिराळ्या आकारांचे कपडे शिवण्याची कल्पना बहुधा परदेशातून येणारे व्यापारी, पर्यटक किंवा आक्रमक यांच्याकडून इतिहासकाळात इकडे आली असेल आणि लोकांना ती आवडल्यामुळे इथे स्थिरावली असणार.

हे अवघड आणि किचकट काम करण्याचे कौशल्य काही लोकांनी आत्मसात केल्यानंतर शिंपी हा त्यांचा एक नवा व्यवसाय निर्माण झाला असावा. त्या काळातल्या सुया कशा प्रकारच्या असतील, कोणते लोहार त्या तयार करत असतील वगैरे विषयांची मला फारशी माहिती नाही. इंग्लंडमधल्या लीड्स या शहरातल्या एका पुराणवस्तूसंग्रहात मला प्राचीन काळातल्या सुया, कात्र्या वगैरे शिवणकामाची अवजारे पहायला मिळाली होती. त्यातल्या सगळ्या पुरातनकालिन सुया दाभणासारख्या दणकट दिसत होत्या. काही सुयांना दोरा ओवण्याचे भोकही नव्हते, तर काही सुयांच्या खालच्या टोकावा दोरा अडकवण्यासाठी हूक होते. इंग्लंडमधल्या अत्यंत शीत वातावरणामुळे तिथल्या वस्त्रोद्योगाचा उगम चामड्यापासून झाला असावा आणि तरट, गोणपाट, लोकर यासारख्या जाड्याभरड्या कपड्यांचे टप्पे पार करून अनेक शतकानंतर ते लोक सुती कापडापर्यंत आले असावेत. यंत्रयुगात सुरू झालेल्या इंग्लंडमधल्या कापडगिरण्यांना होणारा कापसाचा पुरवठा मुख्यतः भारत, इजिप्त किंवा अमेरिकेमधून होत असे. या सगळ्या देशांच्या इतिहासावर कापूस आणि कापडाच्या व्यापाराचा महत्वपूर्ण परिणाम झाला होता असे दिसेल. गिरण्यांमधून मोठ्या प्रमाणावर कापडाची निर्मिती होऊ लागल्याने जगभरातल्या वस्त्रोद्योगाला चालना मिळाली आणि शिंपीकामाच्या व्यवसायातही मोठी वाढ झाली.

कपडे शिवण्याची कला आणि कौशल्य यांचा प्रसार इतिहासकाळात भारतात झाला आणि त्यातून शिंपी हा एक वेगळा वर्ग निर्माण झाला. त्या भूतकाळात सगळी शिलाई हातानेच केली जात असणार. एक एक टाका घालून संपूर्ण पोशाख शिवायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करता येईल. यामुळे त्या काळातले शिंपी सगळ्या आम जनतेचे सगळे कपडे शिवत असतील हे मला कठीण वाटते. त्यांच्या सेवेचा लाभ बहुधा सरदार, इनामदार, सावकार आदि धनिक वर्गांनाच मिळत असणार आणि त्याचा चांगला मोबदला शिंप्यांना मिळत असावा. या वर्गाच्या उंची वस्त्रांसाठी उत्तम दर्जाचे कापड आणून पुरवण्याचे कामसुद्धा शिंपीच करत असले तर त्या व्यवहारातूनही त्यांना धनलाभ होत असेल. यामुळे आर्थिक दृष्ट्या त्यांची परिस्थिती चांगली असावी.  तेराव्या शतकात होऊन गेलेले संतश्रेष्ठ नामदेव महाराज शिंपी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट असे होते. संत नामदेवांबद्दल ज्या आख्यायिका सांगितल्या जातात त्यावरून असे दिसते की ते तुपाशिवाय भाकरी खात नसत आणि देवाला खिरीचा नैवेद्य दाखवत असत. त्यांच्या घरी घरकामासाठी दास दासी होत्या. यावरून त्यांच्या घरात सुबत्ता नांदत होती असे दिसते. संत सांवता माळ्याच्या अभंगात "कांदा मुळा भाजी" चा उल्लेख येतो, तर  "आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक" असे संत सेना न्हावी म्हणत. पण संत नामदेवांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये शिवणकामातल्या दाखल्यांचा उल्लेख आला असला मला तरी तो माहीत नाही. यामुळे त्यांनी स्वतः इतर लोकांचे कपडे शिवण्याचे काम केले होते की नाही हे सांगता येणार नाही. बहुधा ते पूर्णवेळ विठ्ठलभक्तीमध्ये लीन झाले होते असेच वाटते.

माझ्या लहानपणच्या काळापर्यंत भारतातल्या लहान लहान गांवांमध्येसुद्धा शिवणयंत्रे येऊन पोचली होती. अगदी घरोघरी नसली तरी शिंप्यांच्या दुकानांमध्ये दोन तीन सिंगर सुइंग मशीन्स असायचीच. दोन तीन सहाय्यक कामगार ऑर्गन वाजवण्याच्या स्टाइलमध्ये त्यांवर खडखडाटाची जुगलबंदी खेळत असत. आणखी दोन तीन मुले जमीनीवर बसून इतर कामे करतांना दिसत. कपडे बेतण्याचे सर्वात महत्वाचे काम दुकानाचा प्रमुख टेलर मास्टर स्वतः करीत असे. त्याच्या वहीत लिहिलेल्या आपल्याला अगम्य वाटणा-या आकड्यांच्या आधाराने तो कापडावर काही खुणा करायचा आणि त्यांना जोडून सरळ किंवा वक्ररेषा मारायचा. यासाठी चपट्या आकाराच्या एका विशिष्ट चॉकचा वापर केला जात असे. शिंप्याचे दुकान सोडल्यास मी अशा प्रकारचा तेलकट खडू कुठेही आणि कधीही पाहिला नाही. दुकानातला इतर कोणीतरी माणूस किंवा मुलगा कापडावरल्या त्या रेषांवरून कात्री फिरवून त्या कापडाचे तुकडे पाडत असे. यात कोणी खिसे कापायचे आणि कोणी गळे कापायचे याचासुद्धा एकादा प्रोटोकॉल ठरला असावा. क्रिएटिव्हिटी हा शब्द मी त्या काळात ऐकला नसला तरी मला शिंप्यांच्या कामात ती भरपूर प्रमाणात दिसायची. ग्राहकाने दिलेल्या कपड्यामधून त्याच्या पोशाखाला लागतील तेवढे तुकडे कापून घेतल्यानंतर उरलेले कापड शक्य तेवढे एकसंध निघावे अशा त-हेने ते तुकडे कापले जातच, उरलेल्या तुकड्यांमधून कोणती वेगळी कलाकृती तयार करून विकता येईल याचेही नियोजन केले जात असे.

त्या काळातल्या बहुतेक सगळ्याच शिंपीलोकांचे एक वैशिष्ट्य होते. आताप्रमाणे डिलीव्हरी डेट वगैरे देण्याची पद्धत तर तेंव्हा नव्हतीच, शिवायला टाकलेल्या कापडांची साधी रिसीटसुद्धा मिळत नसे. सगळा व्यवहार विश्वासावरच चालत असे. "हे कपडे कधीपर्यंत शिवून मिळतील?" असे विचारले की ते हमखास सांगायचे, "आत्ताचं हातातलं काम संपलं की तुमचंच घेणार बघ." त्याच्या दुकानात नव्या कापडांचे दहा बारा गठ्ठे दिसत असले तरी प्रत्येक नव्या ग्राहकाला असेच सांगितले जायचे. "म्हणजे कधी?" हा प्रश्न शिताफीने उडवला जाई. "कशाला उगाच टेन्शन घेतोस? तुमची कापडं घेऊन मी कुठे पळून जाणार आहे का?" अशा प्रकारचे उत्तर येई. आठवडाभराने चौकशी करायला गेलो तर आपल्या कापडांचा गठ्ठा अजून तसाच कपाटात पडलेला दिसे. त्यासाठी अनेक कारणे तयार असतच, "कोणता कामगार आजारी पडला", "कोणता गावाला गेला", "मध्येच जोराचा पाऊस आला", असे काहीही. मात्र त्यानंतर लगेच आमचेच काम हातात घेण्याचे आश्वासन मिळत असे. आणखी आठवडाभराने विचारले तर, "तुमचे कपडे ना? तय्यार व्हायला आलेत, आता नुसती काजंबटनं लावायची राहिलीय्त." असे उत्तर. निदान आता गठ्टा तरी जागेवरून हललेला दिसायचा. याचा अर्थ त्याचे तुकडे कापून झाले असावेत. "आता की नै, फक्त इस्त्री मारायची राहिली आहे." अशी प्रगती पुढच्या खेपेला सांगितली जायची. अशा सात आठ चकरा मारून झाल्यानंतर एकदाचे ते कपडे हातात पडत. तोपर्यंत आपला उत्साह इतका मावळलेला असायचा की ते नवे कपडे घालून बघायची इच्छा शिल्लक राहिलेली नसायची. अंगात घालून पाहिल्यावर ते कपडे नको तिथे तंग आणि नको तिथे डगळ वाटले तरी शिंपी ते कधीच कबूल करत नसे. "अरे आत्ता मुंबईपुण्याकडे हीच लेटेस्ट फॅशन चाललीय्. तुम्ही आहात कुठे?" अशी मखलाशी केली जायची. त्यातून काही बदल करायचा आग्रह धरलाच, तर ते आल्टरेशन करून होईपर्यंत तुमची मापेच बदलली असल्याची दाट शक्यता असायची. आम्ही गावातले दोन तीन शिंपी बदलून पाहिले, पण या अनुभवात फारसा फरक पडला नाही.

खरे सांगायचे झाल्यास त्या काळातले लहान गावातले लोक याबद्दल विशेष चोखंदळ नसायचेच. कपडे हे अंगाला झाकून लाज राखण्यासाठी आणि थंडीवा-यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी असतात असे समजले जात असे. तेवढी उद्दिष्टे पुरी झाली तर इतर बाबींकडे जास्त लक्ष द्यायचे कारण नव्हते. माझ्या वडिलांच्या पिढीतले सगळे पुरुष धोतर नेसत असत. त्यामुळे शिंप्याची गरज अर्धी होत असे. कधीकाळी एकादा कोट शिवला तर तो जवळच्या शहरामधून शिवून आणला जात असे. सदरा, बंडी वगैरेंची गरज ऋतूमानानुसार कमी जास्त पडत असे. त्यांच्या शिलाईसाठी शिंप्याकडे जाणे होत असे. आम्ही लहान मुलेच शिंप्यांचे मुख्य ग्राहक असू. आमचे कपडे झिजणे, फाटणे, आखूड होणे वगैरेंचे प्रमाण मोठे असल्याने नवे कपडे शिवणे अपरिहार्य असायचे. ते वाढत्या अंगाच्या हिशोबाने शिवले जात असल्यामुळे नवे असतांना सगळ्याच बाजूंनी चांगले ढगळ असायचे. धुतल्यानंतर ते कपडे कोणत्या बाजूने किती आटत आणि मुलांच्या शरीराची वाढ होतांना ती उंची वाढण्यात किंवा रुंदी वाढण्यात किती प्रमाणात होई यांचे गणित सहसा जुळत नसे. त्यामुळे शरीराला सर्व बाजूने बरोबर फिट बसणारे कपडे क्वचितच नशीबात येत असत आणि हा योग जुळून आला तरी त्याचेही कोणालाही काही कौतुक वाटत नसे.

शालेय जीवन संपवून पुढील शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर मात्र हे सगळे बदलले, इतर मुलांचे झकपक पोशाख पाहून आपण किती अजागळासारखे गबाळग्रंथी रहात होतो याची पदोपदी जाणीव होऊ लागली. आपले कपडे हे फक्त शरीराला झाकण्यासाठी नसून आपल्या व्यक्तीमत्वाला उठाव देण्यासाठी वापरायचे असतात याचा नवा साक्षात्कार झाला. "एक नूर आदमी और दस नूर कपडा"  असे का म्हणतात हे समजले आणि माझे वडील शहरांमधल्या संस्कृतीला "पोशाखी संस्कृती" असे का म्हणत याचा अर्थ तिथे रहायला गेल्यानंतर समजायला लागला. आता मीसुद्धा त्या संस्कृतीचा भाग झाल्यामुळे मला ती स्वीकारणे आवश्यकच होते. माझ्या जीवनातले कपड्यांचे महत्व वाढले तसा माझ्या मनात शिंपीवर्गाविषयीचा आदर वाढत गेला.

त्या काळात मुंबई शहरातल्या शिंप्यांची दुकानेच खूप आकर्षक असायची. फोर्टसारख्या भागात मापाप्रमाणे (टेलरमेड) कपडे शिवून देणारी पॉश दुकाने होती. तिथले इंटिरियर डेकोरेशन, लाइटिंग वगैरे झकास असायचे. गळ्यात बो बांधून त्यावर टेप टांगलेला टेलर मास्टर रुबाबदार वाटायचा. शर्ट किंवा पँटच्या डिझाइन्सचे आल्बम समोर ठेवून त्यातली कोणती स्टाईल पाहिजे असे इंग्रजीत विचारायचा, तुम्हाला कुठली स्टाईल चांगली दिसेल याचा सल्लाही द्यायचा. त्यांचे चार्जेस आपल्या आवाक्याबाहेर असणार आणि आपण आणलेली स्वस्तातली कापडे तो हातात तरी घेईल की नाही याची शंका वाटत असल्यामुळे त्या दुकानांची पायरी चढण्याचे धाडस मला त्या काळात झाले नाही. 'पॉप्यूलर' किंवा 'फेमस' असे नाव धारण करणा-या उपनगरातल्या एकाद्या टेलरकडे जाणे सेफ वाटत असे. या लोकांचे कामसुद्धा व्यवस्थित असायचे. सर्वांगाची मापे घेऊन झाल्यावर ती त्यांच्या वहीतल्या एका नव्या पानावर लिहीत, त्या पानावर माझे नाव, पत्ता वगैरे लिहिले जात असे, आपण दिलेल्या कापडांचे कोपरे कापून ते त्या वहीतल्या पानाला आणि आपल्या रिसीटला स्टेपल केले जात असे. ट्रायलची तारीख आणि डिलिव्हरीची तारीख लिहून ते पावती देत. मुख्य म्हणजे त्या दिवशी आपले कपडे शिवून तयार असत. ट्रायल घेऊन झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास थोडे फेरफार करून त्यावर आणखी एक पक्की शिलाई मारून एक दोन दिवसांनंतर ते कपडे हातात मिळत. आताचे शिंपी कपड्यांच्या ट्रायलला बोलावत नाहीत. एकदम तयार कपडेच देतात. एवढाच बदल गेल्या चाळीस वर्षांमध्ये झाला आहे.

कृत्रिम धाग्यांपासून तयार केलेल्या कापडांनी वस्त्रव्यवसायावर आक्रमण केल्यानंतर त्यात खूप मोठे बदल होत गेले. सुरुवातीच्या काळात या कापडांची आयात मुख्यतः तस्करीमधूनच होत असावी. ती कापडे मनीश मार्केट किंवा फोर्टमधल्या रस्त्यांवरच मिळत असत किंवा दारावर येणारे फिरस्ते व्यापारी क्वचित आणत असत. कोणत्याही चांगल्या कापडांच्या दुकानात ती अधिकृतपणे मिळत नसत. काही लोक मद्रास (आताचे चेन्नै) किंवा कलकत्ता (कोलकाता) इथल्या अशाच 'ग्रे मार्केट्स'मधून पाच दहा पीसेस घेऊन येत आणि ते मित्रपरिवारामध्येच हातोहात विकले जात. अत्यंत मुलायम, न चुरगळणारी, धुवायला सोपी आणि जबरदस्त टिकाऊ अशी ही सुळसुळित कापडे पाहताच मनात भरत असत. ती कापडे विकायला कदाचित परवानगी नसली तरी त्यांचे कपडे शिवून ते वापरायला कसलीच आडकाठी नव्हती. मुंबईतले सगळेच लोक असे कपडे घालून राजरोसपणे ऐटीत वावरत असत. शिंपी लोक त्या कापडाचे कपडे शिवण्यासाठी वेगळा चार्ज घेत असत. पुढे अशी कापडे भारतात तयार व्हायला लागली. शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवर ग्वालियर, (ओन्ली) विमल, रेमंड वगैरे कंपन्यांची मोठमोठी शोरूम्स उघडली गेली. तिथे एकादा शिंपी किंवा त्याचा प्रतिनिधी बसलेला असायचा, तो फक्त मापे घ्यायचा आणि विकत घेतलेल्या कापडांपासून शिवलेले शर्ट, पँट्स वगैरे कपडे काही दिवसांनी त्या दुकानातच मिळत. प्रत्यक्षात शिवणकाम करणारा शिंपी आणि ग्राहक यांच्यामधला संपर्क राहिला नाही.

मी मुंबईत रहायला आलो तेंव्हा तयार कपडे मिळणे सुरू झाले होते, तरीही आपल्या आवडीचे कापड विकत घेऊन आपल्या मापाचे कपडे शिंप्याकडून शिवून घेणेच पसंत केले जात असे. कपडेच नव्हे तर कोणतीही वस्तू,  यंत्रसामुग्रीसुद्धा आपल्याला हवी तशी मुद्दाम तयार करवून घेतली तर तिला 'टेलर मेड' असे म्हंटले जात असे. ही परिस्थिती हळू हळू बदलत गेली. कापडांमध्ये आली तशीच तयार कपड्यांमध्येही खूप विविधता येत गेली, सर्व प्रसारमाध्यमांमध्ये, विशेषतः टेलिव्हिजनवर त्यांचे जबरदस्त मार्केटिंग होऊ लागले. काही प्रसिद्ध जागतिक कंपन्यांचे कपडे घालणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. याच्या उलट रस्त्यारस्त्यांवर मिळणारे रेडिमेड कपडे खूप स्वस्तात मिळायला लागले. त्यात घासाघीस करून ते विकत घेण्यात बरेच लोकांना मजा वाटू लागली.

ड्रेस डिझाइनिंग या नावाने एक नवे क्षेत्र निर्माण झाले, ते कौशल्य शिकवणा-या मोठमोठ्या संस्था उभ्या राहिल्या आणि समाजाच्या सगळ्या वर्गांमधली मंडळी त्यात सामील झाली. यातले काही लोक तयार कपडे करण्याच्या उद्योगधंद्यात शिरले तर काही लोकांनी धनाढ्य उच्च वर्गासाठी बुटिक्स वगैरे उघडली. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली, पती आणि पत्नी या दोघांनीही नोकरी व्यवसाय करायला सुरू केल्यानंतर ते आणखी वाढले आणि त्यांना मिळणारा रिकामा वेळ व्यस्त प्रमाणात कमी होत गेला. त्यांचा कल तयार कपडे विकत घेण्याकडे झुकत गेला. हे कपडेसुद्धा कोणी तरी शिवत असणारच. पण ते फॅक्टरींमधून मास प्रॉडक्शनने तयार होत असल्यामुळे त्यातली निरनिराळी कामे निरनिराळ्या लोकांकडून होत असतात. ती ठराविक कामे यंत्रवत करणारे 'कामगार' असतात, त्यांना 'शिंपी' म्हणता येणार नाही.

या सगळ्यांचा परिणाम शिंप्यांच्या व्यवसायावर होत गेला. पूर्वी शहरातल्या हमरस्त्यावरच्या मोक्याच्या जागी शिंप्यांची दुकाने दिसत असत. काही शिंपी आपल्या दुकानात निवडक कापडेही विक्रीसाठी ठेवत असत. आजकाल ती दुकाने दिसेनाशी झाली आहेत. तयार कपड्यांच्या किंवा इतर कसल्याशा दुकानाच्या बाहेर एक सुइंग मशीन ठेऊन किरकोळ कामे करणारे काही कारागीर दिसतात, ते बहुधा आल्टरेशन्स करून देतात. पण नवे कपडे बरोबर बेतून ते व्यवस्थित शिवून देण्यासाठी लागणारे कौशल्य आणि अनुभव त्यांच्याकडे असेल असे वाटत नाही. त्यामुळे महागड्या नव्या कापडाची नासाडी होण्याचा धोका कोणी पत्करत नाही. वाशीसारख्या जागीसुद्धा विश्वसनीय शिंप्याचे चांगले दुकान शोधण्यासाठी गल्लीबोळातून फिरावे लागते. शिंपी या व्यावसायिक संकल्पनेचाच हळूहळू -हास होत चालला आहे असे वाटते. कपडे ही मूलभूत गरज असल्यामुळे शिंप्यांची गरज नेहमीच भासत राहील, पण फक्त तेच काम करणारा समाजातला वेगळा वर्ग बहुधा शिल्लक राहणार नाही आणि राहिला तरी त्याचा पूर्वीसारखा दिमाख असणार नाही असे मला तरी वाटते.

.  . . . . . . . . .  . . . . . . . . . 

सोनार, शिंपी आणि परीट - भाग ३

पुराणकाळातल्या कथांमध्ये शिंप्याचा उल्लेख कदाचित नसेल, पण रामायणामध्ये एका रजकाची महत्वाची भूमिका आहे. त्या संशयी स्वभावाच्या माणसाने सीतामाईच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली आणि तिला राज्ञीपदी बसवल्याबद्दल प्रभू श्रीरामांना दोष दिला. आपल्या प्रजेमधील कोणाच्याही मनात राजाविषयी किंतु असू नये या आदर्श भूमिकेमधून श्रीरामांनी सीतामाईला वनात पाठवून दिले अशी कथा आहे. ही कथा कदाचित दुस-या कोणीतरी नंतरच्या काळात रामायणाला जोडली असावी असेही काही विद्वान म्हणतात, पण हा मुद्दा इथे महत्वाचा नाही. रामायणाच्या कुठल्याशा आवृत्त्यांमध्ये ही कथा आहे याचा अर्थ इतर लोकांचे कपडे धुण्याचा व्यवसाय करणारे परीट लोक आपल्या देशात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत.

सुमारे शंभर दीडशे वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात घरोघरी पाण्याचे नळ नव्हते की विहिरींवर पंप लावले गेले नव्हते. पिण्यासाठी आणि स्वैपाकासाठी लागणारे पाणी घागरी भरून घरात आणले जात असे, पण स्नान आणि कपडे धुण्याचे बहुतेक सगळे काम मात्र पाणवठ्यावर जाऊन तिकडेच केले जात असे. इतर लोकांचे कपडे धुण्याचे काम करणारे रजत लोक नेमके कोणते कपडे स्वच्छ करत असत कोण जाणे, पण बहुधा ते लोक फक्त बलाढ्य किंवा धनाढ्य लोकांचे काम करत असावेत. त्यातही रोजच्या वापरातले कपडे घरातले नोकर चाकर स्वच्छ करत असतील आणि जास्तच घाण झालेले किंवा बोजड कपडे धोब्यांकडे देत असतील असा आपला माझा एक अंदाज आहे.

श्रीदत्तगुरुंच्या मध्ययुगात होऊन गेलेल्या अवतारांच्या कथा असलेल्या गुरुचरित्रातसुद्धा त्यांचा एक परमभक्त रजक असल्याचा उल्लेख आहे. एकदा नदीतीरावर कपडे धूत असतांना त्या रजकाने एका बादशहाला आपल्या बेगमांसोबत जलक्रीडा करतांना पाहिले आणि त्याला त्या बादशहाचा मनातून हेवा वाटला. त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुकृपेने त्याला पुढचा जन्म एका बादशहाचा मिळाला अशी ती गोष्ट आहे. म्हणजे पूर्वापारपासून उत्तरेप्रमाणे दक्षिणेतसुद्धा परीटांचा व्यवसाय चालत असे.

जुन्या काळातल्या गोष्टींमधली जी वर्णने मी ऐकली आहेत त्यानुसार हे धोबी लोक गाढवे पाळत असत. ग्राहकांकडून आणून जमा केलेल्या कपड्यांचे गठ्ठे ते गाढवाच्या पाठीवर ठेऊन नदीच्या धोबीघाटावर नेत, तिथे सगळे कपडे धुवून किना-यावरच पसरवून त्यांना वाळवत आणि स्वच्छ कपड्यांचे गठ्ठे पुन्हा गाढवाच्या पाठीवरून गावात परत आणून त्यांच्या धन्यांना नेऊन देत असत. हे काम करवून घेण्यासाठी त्यांना उमदा घोडा किंवा बलिष्ठ बैल यांच्यापेक्षा कामसू आणि गरीब बापुडे गर्दभच जास्त उपयुक्त वाटत असेल. धोब्यांची कुत्रीसुद्धा काही वेळा धन्यासोबत घाटावर जात असत पण तिकडे गेल्य़ावर त्यांच्या खाण्याकडे कोण लक्ष देणार? ती बिचारी उपाशीच रहात. यावरूनच "धोबीका कुत्ता न घरका न घाटका।" अशी कहावत पडली असावी. "दोन घरचा पाहुणा उपाशी" असा काहीसा या म्हणीचा अर्थ होतो.

काश्मीर ते केरळ आणि कच्छपासून मणीपूरपर्यंत पसरलेल्या आपल्या देशात पारंपरिक पोशाखांची जितकी विविधता आहे तितकी आणखी कुठल्याही देशात दिसणार नाही. निरनिराळ्या भागातले बहुतेक सगळेच लोक स्थानिक परंपरांनुसार विशिष्ट प्रकारचा पेहराव धारण करत असत. यावरून "देश तसा वेष" अशी म्हणच पडलेली आहे. पण त्या समान वेषांमध्येही लहान सहान फरक आणि भिन्न रंग असल्यांमुळे या चित्रविचित्र पोशाखांना 'गणवेष' असे म्हणत नाहीत. 'गणवेष' किंवा 'युनिफॉर्म' हा शब्द इंग्रजांनी आपल्यासोबत इकडे आणला. त्यांनी भारतात उभारलेल्या कवायती सैन्यांमधल्या शिपायांना ठराविक गणवेश घालायला लावलाच, त्यांचे राज्य स्थापन झाल्यानंतर वकील, न्यायाधीश, डॉक्टर, नर्स, ड्रायव्हर, पट्टेवाला प्यून यासारख्या सर्वांसाठी युनिफॉर्म ठरवून दिले आणि अंमलात आणले. त्यांनी काढलेल्या शाळांमधल्या मुलांना गणवेशात येण्याची सक्ती केली आणि इतर शाळांनीही त्याचा कित्ता गिरवला.

प्रत्येकाने फक्त आपापले गणवेश अंगावर चढवणे एवढ्याने भागत नाही. त्यांचे ते ड्रेस स्वच्छ असावेत, फाटलेले, उसवलेले किंवा चुरगळलेले नसावेत याकडे मुद्दाम लक्ष देऊन पाहिले जाते आणि तसे दिसले तर त्यासाठी दंड केला जातो. यामुळे गणवेशाचे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून घालणे भाग पडले आणि परीटांच्या कामात भर पडत गेली. इंग्रज लोक युनिफॉर्मचे मोठे भोक्ते होते, ड्यूटीवर असतांना, क्लबात पार्टीसाठी जातांना किंवा क्रिकेट खेळतांना ते वेगवेगळे विशिष्ट 'ड्रेसकोड' सांभाळीत असत. यामधून एक 'पोशाखी संस्कृती' तयार झाली. नीटनेटक्या पोशाखात माणूस कसा रुबाबदार दिसतो हे पाहून इथल्या लोकांनी तिचे अनुकरण केले. जसजसे अधिकाधिक लोक स्वच्छ धुतलेले आणि कडक इस्त्री केलेले कपडे परिधान करू लागले, तसतशी परीटांची मागणी वाढत गेली. त्यांच्या व्यवसायाला बरकत येत गेली.

माझ्या शालेय जीवनातल्या काळात आमच्या कुठल्याच (सरकारी) शाळेतल्या मुलामुलींसाठी गणवेश नव्हता. घरात घातलेल्या कपड्यातच मी शाळेला, बाजारात, फिरायला किंवा खेळायचा जात होतो. घरात पाण्याचे नळ होते आणि दिवसातून तास दोन तास त्यातून पाणी येत असे. धुणीभांडी करणारी बाई येऊन आमचे कपडे धूत असे. त्यांना इस्त्री करण्याची गरज नसायची, पण घरात एक कोळशाची इस्त्री होती. गरज पडली किंवा कोणाला लहर आली तर ती गरम करून कपड्यांवरून फिरवलीही जात असे. यामुळे माझ्या लहानपणातल्या कुठल्याच कपड्यावर कधी 'धोबीमार्क' पडला नाही. पण मोठ्या लोकांचे कपडे किंवा चादरी वगैरेंना पडलेला एकादा डाग काढण्यासाठी किंवा ते नव्यासारखे दिसण्यासाठी परीटाकडे 'भट्टी'ला दिले जात असत.

आमच्या गावात परीटांची तीन चार दुकाने असतील. मात्र त्यातल्या कुठल्याही दुकानासमोर एकही गाढव बांधून ठेवलेले नसायचे, असलीच तर एकादी सायकल उभी केलेली असायची. गावातली गाढवे उकिरड्यातले काहीबाही वेचून खात किंवा तिथेच लोळत पडलेली असायची. गोष्टींमध्ये ऐकलेला गाढवांना पाळणारा परीट मला प्रत्यक्षात कधीच पहायला मिळाला नाही. लाँड्रीवाले त्यांचे गठ्ठे सायकलच्या कॅरीयरवर बांधून नेत आणि आणत. आमच्या गावाला कोणत्या नदीचा किनाराही नव्हता आणि तिथला धोबीघाटही नव्हता. गावातले परीट धुवायचे कपडे नेमके कुठे नेऊन धूत असत कोण जाणे. ते सगळ्या कपड्यांना 'भट्टी'त घालतात असे ऐकले होते पण मला त्यांच्याकडची भट्टीही कधी पहायला मिळाली नाही. उसाच्या गु-हाळात वापरतात तसल्या अवाढव्य चुलखंडावर ठेवलेल्या एका मोठ्या काहिलीत खूप वॉशिंग सोडा आणि पाणी घालून हे कपडे त्यात रटारटा शिजवत असावेत असे एक चित्र मी मनात रंगवले होते. 'परीटघडी' हा शब्द त्या काळात इतका रुळला होता की 'सगळे काही अत्यंत व्यवस्थित' अशा अर्थाने त्याचा उपयोग वाक्प्रचारासारखा होत असे. ही घडी अधिक ताठर होण्यासाठी सुती कपड्यांना खळ (स्टार्च) फासली जात असे. आजही काही खादीधारी मंडळी असे परीटघडी घातलेले कडक इस्त्रीचे कपडे घालतांना दिसतात, माझ्या लहानपणी त्याचे थोडे अप्रूप वाटत असे.




मी मुंबईला रहायला आलो तो बहुधा मुंबईतल्या परीटांच्या व्यवसायाचा सुवर्णकाळ असावा. ऑफिसला जाणारे बहुतेक सगळेच लोक आपले कपडे परीटांकडे धुवायला किंवा निदान इस्त्री करायला देऊ लागले होते. शहरातल्या नाक्यानाक्यावर लहानसहान लाँड्र्या तर होत्याच, गार्मेंट आणि बँडबॉक्स यासारख्या काही मोठ्या कंपन्यांच्या दिमाखदार शाखा अनेक ठिकाणी दिसायच्या. मुंबईत अनेक ठिकाणी खास धोबीघाट बांधलेले होते. शेकडो परीट त्या जागी येऊन तिथल्या ओळीने मांडलेल्या दगडांवर कपडे आपटून धूत असत. कपडा जोराने डोक्यावरून फिरवून दाणकन खाली आपटायच्या परीटांच्या स्टाइलवरून धोबीपछाड या कुस्तीतल्या एका डावाचे नाव पडले होते.  महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळचा धोबीघाट ट्रेनने जातायेतांना दिसायचाच, अनेक हिंदी सिनेमांमध्ये तो दाखवला गेला आहे. सुती कपड्यांची धुलाई आणि साधी इस्त्री किंवा त्यांना स्टार्चमध्ये बुडवून केलेली कडक इस्त्री हे प्रकार होतेच. रेशमाची नाजुक वस्त्रे आणि लोकरीचे कपडे भट्टीत घालून किंवा धोपटून धूता येणार नाहीत म्हणून त्यांचे ड्राय क्लीनिंग करावे लागत असे. त्या काळात पेट्रोलचे दर आतासारखे भडकलेले नव्हते. ड्राय क्लीनिंगमध्ये कपड्यांचा मळ काढण्यासाठी सॉल्व्हंट म्हणून पेट्रोलचा उपयोग केला जात असे. साध्या धुलाईच्या मानाने ड्राय क्लीनिंग काही पटीने महागच होते, पण त्या उंची वस्त्रांच्या किंमतीच्या मानाने स्वस्त होते. अशा सगळ्या प्रकारच्या कपड्यांची धुलाई परीटांकडून केली जात असे.

हे परीट इतर लोकांचे कपडे स्वच्छ धूत असले, त्यावर पडलेले तेलाचे किंवा रंगांचे डाग काढत असले तरी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक शर्टाच्या क़ॉलरखाली आणि पँटच्या पट्ट्याच्या आतल्या बाजूला स्वतःचा असा कधीही धुतला न जाणारा 'धोबीमार्क' करत असत. अनेक ग्राहकांकडून आलेले कपडे धुवून आणि वाळवून झाल्यानंतर ते ओळखून ज्याचे त्याला परत देण्यासाठी हे गरजेचे होतेच. आपल्याला मात्र ती खूण पाहून त्यातून काही बोध होत नसे आणि परीटांना ते कसे समजत असे याचेच कौतुक वाटत असे. त्या काळात येऊन गेलेल्या कित्येक रहस्यकथांमधल्या मृत किंवा बेशुद्ध पडलेल्या व्हिक्ट्म्सची ओळख या धोबीमार्कांवरून पटत असे. काही गोष्टींमध्ये त्यातून खुन्याचा शोधसुद्धा लागत असे.

खरे सांगायचे झाल्यास मी कुणालाच त्याची जात किंवा आडनावही विचारत नाही आणि मला त्याची गरज किंवा महत्व वाटत नाही. तरीही सोनार आणि शिंपी हे आडनाव असलेली किंवा जात सांगणारी काही माणसे मला वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा निमित्याने भेटली आहेत, पण आडनावाचा किंवा जातीवंत परीट मात्र मला कधीच भेटला नाही. हा कदाचित योगायोग असेल. पण यामुळे 'परीट समाज' असा विचारच कधी माझ्या मनात आला नाही. महाराष्ट्रात तसा वेगळा समाज अस्तित्वात तरी आहे की नाही हे ही मला माहीत नाही. विदर्भातले संत गाडगे महाराज यांचे वडील परीट होते एवढे मी ऐकले आहे. तेवढा एक अपवाद वगळता आणि नामू परीट हे पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमधले पात्र सोडल्यास मला तिसरे एकादे प्रसिद्ध नावही आठवत नाही. पण परीटांच्या व्यवसायाचा मात्र माझ्या डोळ्यादेखत -हास होत गेलेला मला जाणवला.

कृत्रिम धाग्यांपासून विणले गेलेले न चुरगळणारे, धुवायला सोपे, न पिळताही लवकर वाळणारे असे कपडे मोठ्या संख्येने बाजारात आले. ते घरच्या घरी धुतले जाऊ लागले. घरोघरी वॉशिंग मशीन्स आली. आधी साधी, मग सेमिऑटोमॅटिक आणि त्यानंतर फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स आल्यावर घरी कपडे धुणे जास्तच सोपे होत गेले. रेशमी किंवा लोकरीच्या कपड्यांचेसुद्धा कृत्रिम पर्याय निघाले. ते कपडे धूण्यासाठी 'ईजी' पॉवडरी मिळायला लागल्या. या सर्व कारणांमुळे परीटाकडे कपडे धुवायला देण्याचे प्रमाण कमी होत होत नगण्य इतके झाले. गार्मेंट आणि बँडबॉक्स यासारख्या मोठ्या कंपन्या तर बंद पडल्याच, लहान सहान लाँड्र्यांचा व्यवसाय मुख्यतः इस्त्री करण्यापुरता शिल्लक उरला. हे काम करण्यासाठी परीट नसलेले अनेक कामगार तयार झाले आणि मोठ्या बिल्डिंग्जच्या जिन्याखाली किंवा गॅरेजमध्ये एक टेबल मांडून कपड्यांना 'प्रेस' करायला लागले. अर्थातच परीटांच्या पुढच्या पिढीमधल्या मुलांना दुसरा उद्योग व्यवसाय किंवा नोकरी शोधणे भाग पडत गेले. गेल्या सुमारे शंभर वर्षांच्या अवधीतच या व्यवसायाचा उत्कर्ष झाला, भरभराट झाली आणि तो आता अस्तंगत होण्याच्या दिशेने चालला आहे असे वाटू लागले आहे.

वस्त्र आणि अलंकार यांची आवड किंवा हौस मानवाला प्राचीनकालापासून होती. सोनार, शिंपी आणि परीट मंडळी हे पुरवण्याचे काम करत आली आहेत. माणसाच्या जीवनाचा स्तर जसा उंचावत गेला त्याप्रमाणे वस्त्रालंकाराला अधिक मागणी होऊ लागली. त्यातून गेल्या सुमारे शंभर वर्षांच्या काळाच्या पहिल्या भागात हे व्यवसाय वृद्धिंगत होत गेले. पण यंत्रांच्या उपयोगाने माणसाचे कष्ट कमी होत गेले त्याप्रमाणे कष्टांचे मोलही कमी होत गेले. मुख्यतः कष्ट आणि हस्तकौशल्य यावर आधारलेले सगळेच उद्योग व्यवसाय मागे पडत गेले. परंपरागत पद्धतीने काम करणा-या सोनार, शिंपी आणि परीट यांनाही त्याचा फटका बसला. हे गेल्या पाच सहा दशकांमधले माझे निरीक्षण आहे. सोनार, शिंपी आणि परीट हे शब्द आणखी पन्नास वर्षांनंतर कदाचित आजवरच्या रूढ अर्थांनी ओळखीचे राहणार नाहीत.

. . . . . . . . . . . . . . . . .  .  (समाप्त) 

3 comments:

Anonymous said...

आनंदजी ऐसी अक्षरे वर तुमचा account आहे काय ? तिथल्या चर्चेत भाग घ्यावा ही नम्र विनंती. aisiakshare.com

Anonymous said...

मी site चा ॲडमिन नाही. पण तिथल्या चर्चेत भाग घेतो बर्याचदा.

Anand Ghare said...

मी काही मराठी संस्थळांचा सदस्य आहे. जमेल तेंव्हा अधून मधून तिकडे डोकावून येतो. कुठेही पडीक रहात नाही.