Wednesday, December 03, 2014

मांजरपाट आणि मसराई

आजच्या तरुण किंवा मध्यमवयीन पिढीमधल्या लोकांनी मांजरपाट आणि मसराई ही नावे बहुधा ऐकलीही नसतील. गेल्या पन्नास वर्षात मीदेखील माझ्या बोलण्यात या शब्दांचा कधीच उल्लेख केला नसेल, पण त्यापूर्वीच्या काळात मात्र ही नावे चांगली रूढ होती. रेयॉन, नायलॉन, डेक्रॉन वगैरे कृत्रिम धाग्यांचा शोध कधी लागला आणि त्यांच्यापासून तयार केलेली कापडे कधी बाजारात आली हे काही मला माहीत नाही पण मी लहान असतांना म्हणजे १९५०च्या दशकात ती आमच्या गावापर्यंत तरी येऊन पोचली नव्हती एवढे नक्की. आम्हाला कापडांचे फक्त तीनच प्रकार ठाऊक होते, वनस्पतीजन्य कापसापासून बनवलेले आणि आमच्या नेहमीच्या वापरातले साधेसुधे सुती कापड, कीटकजन्य रेशमाचे मुलायम नाजुक वस्त्र आणि प्राणीजन्य लोकरीचे उबदार कपडे. 

त्या काळातसुद्धा रेशमी कापड भयंकर महाग असायचे, सामान्य माणसांकडे रोकड उत्पन्नाची साधनेही कमी असल्यामुळे रेशमी वस्त्रे विकत घेणे त्यांच्या ऐपतीच्या पलीकडले असायचे. माझ्या जन्माच्याआधी कधीतरी घेऊन ठेवलेले एक दोन रेशमी कद आणि उपरणी आमच्या घरी होती. त्यांचा उपयोग फक्त देवपूजेच्या वेळी अत्यंत काळजीपूर्वकरीत्या केला जात असे. माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे ते नेसण्याची वेळ माझ्यावर फारशी येत नसे किंवा मला ती संधी सहसा मिळत नसे. अर्धा वीत रुंद आणि हातभर लांब अशी एक रेशमी लंगोटी माझ्या मुंजीच्या वेळी मला घातली होती आणि तो विधी आटोपेपर्यंत दोन चार तास मी ती कशीबशी सांभाळली होती. माझ्यासाठी म्हणून आणलेले हे पहिले रेशमी वस्त्र आणि हेच शेवटचेही. माझ्या मिळकतीमधून माझ्या स्वतःसाठी असे कोणतेही रेशमी कापड मी कधीच विकत घेतले नाही.

माझ्या लहानपणी लोकरीचे कपडेसुद्धा महागच असले तरी ते गरजेचे होते. लोकरीच्या गुंड्याचा एक चेंडू आणि दोन लांबलचक सुया घेऊन त्या धाग्यांना एकमेकांमध्ये गुंतवत राहणे हा त्या काळातल्या महिलावर्गाचा आवडता छंद होता. नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कुणाच्या घरी नव्या बाळाचा जन्म झाल्याचे कळले की लगेच त्या बाळासाठी अंगडे, टोपडे, हातमोजे, पायमोजे वगैरे विणायची सुरुवात होत असे. मी तान्हे बाळ असतांना मीसुद्धा असले अनेक लोकरीचे कपडे भिजवले असतीलच, पण ते आता आठवत नाही. मला समजायला लागल्यापासून आणि माझ्या आठवणीतल्या दिवसांमध्ये मी लोकरीचे अनेक स्वेटर मात्र घातले होते. अगदी छोट्या बाळापासून ते मिसरूड फुटलेल्या मुलांपर्यंत निरनिराळ्या वयातल्या मुलांसाठी निरनिराळ्या काळात विणलेले अनेक स्वेटर एका गाठोड्यात बांधून ते ट्रंकेत ठेवलेले असायचे. थंडी पडायला सुरुवात झाली की ते गाठोडे बाहेर काढून त्यातले स्वेटर त्यांना लागलेला डांबराच्या गोळ्यांचा उग्र वास घालवण्यासाठी उन्हात पसरून ठेवले जात. मला फिट बसेल असा त्यातला एकादा स्वेटर निवडून माझ्या कपाटात ठेवला जाई. त्या वेळी कोणीतरी, निदान तो स्वेटरविणणारी व्यक्ती त्या स्वेटरच्या जन्मकथेची आठवण हमखास काढत असे. आमच्या भागात फार कडाक्याची थंडी पडत नसल्यामुळे दिवसभरात स्वेटरची गरज पडत नसे आणि रात्री जेंव्हा तो घातला जात असे तेंव्हा अंधारात घराबाहेर पडायची वेळ येत नसे. यामुळे उबदारपणा हा स्वेटरचा एकमेव गुण समजला जायचा. त्यासाठी घरात अनेक स्वेटर उपलब्ध असल्याने माझ्यासाठी वेगळा नवा स्वेटर विणायची बुद्धी घरातल्या कुणालाच झाली नाही आणि "मला नवा कोराच स्वेटर हवा" असा हट्ट धरायची बुद्धी मलाही झाली नाही. पुढल्या आयुष्यात मात्र गरज नसतांनासुद्धा शोबाजीसाठी काही स्वेटर आणि जॅकेट्स घेतले गेले.

आमचे रोजच्या वापरातले कपडे १०० टक्के सुतीच असायचे. लहानपणचा पोशाख म्हणजे सदरा आणि चड्डी एवढाच असायचा. चड्डीची लांबी कंबरेपासून गुढग्याच्या दोन चार बोटे वर इतकी असायची आणि सद-याची लांबी खांद्यापासून चड्डीच्या मध्यापर्यंत असे, चड्डीत खोचलेला सदरा आपोआप बाहेर निघून येऊ नये आणि नाही खोचला तर त्याने चड्डीला पूर्ण झाकू नये इतपत. मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत 'घरी घालायचे' आणि 'बाहेर जातांना घालायचे' असा भेदभाव नव्हता. यामुळे अंगात घातलेल्या कपड्यानिशी मित्रांसोबत खेळायला केंव्हाही पळणे सोपे होते. खेळून घरी आल्यावर चिखलमातीने मळलेले कपडे काढून धुतलेले कपडे अंगात घालायचे. तसेच बाहेर जातांना काही कारणाने नवे कोरे कपडे अंगावर चढवले असले तर घरी परत आल्यानंतर ते काढून ठेऊन पुन्हा नेहमीच्या वापरातला जोड अंगावर चढवायचा एवढेच नियम होते. मुलांचे वय आणि उंची थोडी वाढल्यानंतर बाहेर जातांना घालायला विजारी आणि घरात घालायला लेंगे शिवले जात. आजची मुलेसुद्धा साधारणपणे अशाच प्रकारचे कपडे घालतात, फक्त सदरा, चड्डी. विजार, लेंगा या शब्दांऐवजी शर्ट, हाफपँट. फुलपँट, जीन्स, पायजमा असे वेगळे शब्द वापरतात. गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये 'टीशर्ट' हा एकच नवा प्रकार आला आहे. माझ्या लहानपणीसुद्धा क्वचित एकादा मुलगा कधी कधी 'नेहरू शर्ट' घालायचा, त्याला आता 'झब्बा' किंवा 'कुर्ता' म्हणतात आणि त्याच्या वापराचे प्रमाण थोडे वाढले आहे.

''वस्त्र ही माणसाची मूलभूत आवश्यकता आहे.'' असे त्या काळात सर्वसाधारणपणे समजले जात होते, कापडे ही तेंव्हा छानछोकीची किंवा चैनीची बाब नव्हती. त्यांची खरेदी गरजेपुरतीच केली जात होती. सहज रस्त्यातून जातांना एका दुकानात एक छान शर्ट दिसला म्हणून लगेच कोणी तो विकत घेतला असे होत नसे. बहुधा याच कारणामुळे आमच्या गावात रेडीमेड कपड्यांचे दुकानच नव्हते. शिंप्यांची दुकाने मात्र गल्लोगल्ली होतीच, काही लोक (बव्हंशी महिला) घरबसल्या शिवणकाम करून देत असत. प्रत्येक वर्षी दिवाळीला आणि वाढदिवसाला सर्व मुलांसाठी नवीन कपडे घेतलेच पाहिजेत असा दंडक त्या काळात नव्हता. कोणी तसे ठरवले तरी शिंपीमहाराज ते कपडे वेळेवर शिवून देतीलच अशी खात्रीही नसायची. कपड्यांची गरज आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून सोयीनुसार कपडे शिवले जायचे आणि मुलांचे कपडे शिवायला टाकतांना 'वाढत्या अंगाचे' म्हणून ते जरा डगळच करायला सांगायचे. शिवून आलेले नवे कपडे व्यवस्थितपणे ट्रंकेत ठेवायचे आणि दसरा, दिवाळी, वाढदिवस, एकादा समारंभ अशा वेळी काढून ते परिधान केले जायचे. ते अंगाला फिट व्हायला लागले किंवा वापरात असलेले कपडे फाटले किंवा तोकडे पडायला लागले की नवे कपडे रोज वापरायला काढले जात अशी पद्धत होती.

आमच्या गावात कापडाची दोन मुख्य दुकाने होती. 'के.टी.लाहोटी अँड सन्स' या नावाचे दुकान एका मारवाडी व्यापा-याने खूप आधीपासून काढले होते आणि बहुधा त्याच्या सन्सनी त्याचा व्याप भरपूर वाढवला होता. विविध प्रकारच्या कापडांनी ते भरलेले असे. त्या दुकानात काम करत असलेल्या शामराव साबडे यांचा स्वाभिमान एकदा दुखावला गेला आणि त्यांनी तिरीमिरीत नोकरीला लाथ मारून स्वतःचे वेगळे दुकान काढले. त्याचा जनसंपर्क चांगला असल्याने त्यांनी लाहोटींचे बरेचसे ग्राहक आपल्या दुकानाकडे वळवले. त्यातच आमचीही गणना होती. कापडखरेदी करायची ती साबड्यांच्याच दुकानात असे ठरून गेले होते. यात त्यांचीही चार पैशांची कमाई व्हायची आणि त्यातल्या एकाद्या पैशाची सूट आम्हाला मिळायची अशी 'विन विन सिच्युएशन' असायची. मुलांसाठी कपडे शिवायचे ठरले की नेहमीच्या शिंप्याला बोलावायचे. तो घरी येऊन सगळ्या मुलांची मापे घ्यायचा आणि त्यासाठी किती कापड लागेल यांचे वारेमाप अंदाज सांगायचा. गि-हाइकांनी दिलेल्या कापडांमधून तो लहान मुलांची झबली, चड्ड्या, दुपटी वगैरे करून विकतो अशी चर्चा होत असे.
"इतकं कापड कशाला? मागच्या वेळी तर तेवढ्यातच भागले होते ना?"
"अहो आता मुलं मोठी झाली आहेत."
"म्हणून काय इतकं जास्त?"
अशा प्रकारची घासाघीस व्हायची आणि अखेरीस "एका कापडाचे तीन लेंगे शिवले तर इतक्या कापडात होतील आणि चार सदरे शिवले तर तितक्यात बसवता येतील." अशा प्रकारची तडजोड होत असे. मग आमचा मोर्चा साबड्यांच्या दुकानाकडे वळत असे. सदरे आणि लेंगे यांच्यासाठी मांजरपाट हेच स्वस्त आणि उपयुक्त कापड असायचे. लोकमान्य टिळकांच्या काळात परदेशी कापडांच्या होळ्या पेटवल्या जात तेंव्हा अशा प्रकारचे कापड मँचेस्टरहून येत असावे. 'मँचेस्टरक्लॉथ' या शब्दाचा 'मांजरपाट' असा अपभ्रंश झाला आणि नंतरच्या काळात ते कापड मुंबईतल्या गिरण्यांमध्ये विणले जाऊ लागले. कोणते कापड कोणत्या गिरणीतले आहे आणि त्याचे कोणते गुण आहेत यावर दुकानदार काही माहिती देत असे. ती ऐकून आणि कापडाचा पोत, रंग, किंमत वगैरे पाहून त्यातून निवड केली जात असे. 'ह-याक' किंवा अशाच विचित्र नावाचे एक कापड जरा जाड आणि टिकाऊ असायचे, पण त्याची किंमतही जास्त असायची. "एवीतेवी हे कपडे चार आठ महिन्यांत लांडेच होणार आहेत, मग ते जास्त टिकून तरी त्याचा काय फायदा?" असा सूज्ञ विचार काही लोक करत, तर "या मुलाला लहान झाले तर तो वापरेल आणि त्यानंतर तिसरा आहेच." अशा प्रकारचा दूरदर्शी विचार मुलाबाळांचे गोकुळ असलेल्या घरात केला जात असे. 'धुवट मांजरपाट' नावाचा एक ब्लीच केलेला प्रकार असायचा. हे पांढरे कापड नवे असतांना जास्त शुभ्र दिसायचे. एक दोन आठवडे वापरून आणि सात आठ वेळा धुवून झाल्यानंतर तो फरक जाणवायचा नाही. एकादा सदरा आणि विशेषतः लेंगा शिवण्यासाठी ते कापड घेतले जात असे. 'मसराई' नावाचे एक उच्चवर्णीय कापड असायचे. 'मर्सराइज्ड' नावाच्या प्रक्रिये (प्रोसेस)मुळे त्या कापडाला काही खास गुणधर्म प्राप्त झालेले असायचे. ते जरा चमकदार दिसायचे आणि धुतल्यानंतर कमी आटत असे. मोठ्या लोकांसाठी, विशेषतः धोतरजोडीसाठी ते घेतले जात असे. 'पॉपलीन' हा कापडाचा प्रकार दिसायला सर्वात छान आणि अर्थातच सर्वात महागडा असायचा. पॉपलीनचे कापड घेणे म्हणजे सुखवस्तूपणाची किंवा उधळपट्टीची हद्द समजायचे. चड्ड्या किंवा विजारीसाठी एकाच प्रकारचे खूप जाड कापड असायचे, त्याचे नाव सांगायची गरज नसे. "मिलिटरीतल्या लोकांचे ड्रेस याचेच शिवतात बघा." असे बेधडक ठोकून दिले जात असे. ती कापडे खरेच दणकट असायची, पण नको त्या वेळी नको त्या ठिकाणी उसवणे किंवा फाटणेसुद्धा चड्डीच्या बाबतीतच जास्त होत असे. हालचाली करतांना त्या वस्त्रावर जास्त ताण पडत असावा आणि खेळतांना होणा-या धडपडीमध्ये त्याचीच जास्त झीज होत असणार. आमच्या घरातल्या मुलांचे लेंगे नेहमी फक्त पांढ-या रंगाचेच असायचे. मुंबईपुण्याकडून आलेले काही पाहुणे चट्ट्यापट्ट्याच्या कापडाचे लेंगे वापरत. यावर "गादीच्या झोळाच्या कापडाचे कसले कपडे शिवायचे?" अशी टीका होत असे. सद-याची कापडे पांढरी किंवा फिकट रंगांची आणि चड्ड्यांची कापडे काळा, निळा, करडा अशा गडद रंगाची मळखाऊ असायची हे ठरलेले होते.

कृत्रिम धाग्यांची कापडे बाजारात आल्यानंतर सगळे चित्र बदलून गेले. अनेक प्रकारचे धागे आणि त्यांची निरनिराळ्या प्रमाणांमधली मिश्रणे यांच्यामुळे कापडांच्या असंख्य व्हराइटीज तयार झाल्या. त्यांची नावे समजून घेऊन ती लक्षात ठेवणे कठीण होत गेले. रेडीमेड गार्मेंट्सच्या प्रसारानंतर तर हे चित्र पार पालटले. कपड्यांच्या खरेदीसाठी आता दुकानात जाणारे ग्राहक कपड्यांचे रंग, त्यांचे आणि त्यावरले डिझाइन, कापडाचा पोत, त्याचा हाताला होणारा स्पर्श आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेबल पाहतात, त्याचा ब्रँड पाहतात पण कापडाच्या जातकुळीची चौकशी करत नाहीत. यामुळे मांजरपाट किंवा मसराई अशी नावे तर त्यांच्या कानावर पडत नाहीतच, पण ही कशाची नावे आहेत? त्यावरून काय अर्थ निघत असेल? कोणती माहिती मिळत असेल हे सुद्धा पुढल्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही.

7 comments:

Anonymous said...

फारच बोरींग लेख झालाय.......

Anand Ghare said...

धन्यवाद. कोणी वंदा कोणी निंदा, ब्लॉगगिरी आमुचा (बिनकमाईचा) धंदा

Vivek Waghmare said...

छान लेख आहे.

Paranjape said...

I am 81 years old. I very much liked your article. Many thanks. I would like to communicate with you. With best regards. Paranjape

Anand Ghare said...

परांजपे सर, मी आपला आभारी आहे. अशा प्रोत्साहनामुळे मला लिहीत रहायला बळ मिळते.

Unknown said...

लेखामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद 🙏🏻

Anonymous said...

दोन काळांचं अंतर तोडणारा आणि शब्दांमध्ये जिवंतपणा आणणारा लेख आहे.अतिउत्तम