Sunday, August 31, 2014

गणेशोत्सवानिमित्य


तुझ्या कांतिसम रक्‍तपताका पूर्वदिशी फडकती।
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ।।

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा ।
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा ।
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्‍तवर्ण कमळे ।
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे ।
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ।।

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा ।
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा ।
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती ।।

                    स्व. ग. दि. माडगूळकर

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी  एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी  एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

मी शाळेत शिकत असतांना दरवर्षी गणेशचतुर्थी हा एकमेव सण आमच्या हायस्कूलमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असे. इतर सणवारांसाठी फक्त सुटी असे. त्या दिवशी ते सण घरीच साजरे केले जात असत. गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र आपापल्या घरातले गणपती बसवून झाले की सगळी मुले शाळेकडे धाव ठोकत असत. घरून निघायला उशीर झाला तर गावात जिथे कुठे आमच्या शाळेची मिरवणूक चालत असेल तिथे येऊन त्यात सामील होत असत. ढोल ताशा, झांजा वगैरेंच्या आवाजावर "गणपती बाप्पा मोरया"चा घोष करत आमची वानरसेना गणपतीच्या मूर्तीसह गावात फिरून शाळेत येत असे. तिथल्या सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्या काळात ज्या वस्तू आजूबाजूच्या निसर्गात किंवा स्थानिक बाजारात उपलब्ध असायच्या त्यामधून सजावट केलेली असायची. शाळेचा हॉल तर मुलांनी गच्च भरलेला असायचा त्याच्या पुढच्या बाजूचा कॉरीडॉर मुलांनी आणि मागच्या बाजूचा मुलींनी भरलेला असायचा. पूजा, आरती वगैरे करून चिमूटभर प्रसाद खाऊन घरी गेल्यावर संध्याकाळी पुन्हा सगळे शाळेत येत. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा वाजत गाजत आणि फटाके उडवत गणपतीची मिरवणूक निघे पण ती फक्त शाळेच्या आवारातच असलेल्या विहिरीपर्यंतच जात असे. तिथे पोचल्यावर पट्टीचे पोहणारी चार पाच मुले गणपतीच्या मूर्तीला हातात धरून पाय-यांवरून खाली उतरत आणि पाण्यात बुडी घेऊन विहिरीच्या पार तळापर्यंत पोचत आणि तिला अलगदपणे तळाशी ठेऊन वर येत असत. बाकीची काही मुले पाय-यावर तर काही काठावर उभी राहून ते दृष्य पहात असत. शिक्षकवर्ग फक्त मार्गदर्शन करण्यापुरते काम करत असत, मुख्य हौस मुलांचीच असे. शाळेतल्या गणपतीचे विसर्जन करून झाल्यावर सगळेजण आपापल्या घरातल्या गणपतीच्या संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागत.

असा अर्ध्याच दिवसाचा गणपती मी फक्त आमच्या शाळेतच पाहिला. आमच्या गावात काही लोकांकडे दीड दिवसांचा, कुणाकडे तीन, पाच किंवा सात दिवसांचा असायचा. काही लोकांकडे बाप्पाचा मुक्काम अनंतचतुर्दशीपर्यंत असायचा तर काही लोकांचे गणपती गौरीसोबत जायचे. ते सहा किंवा सात दिवस रहात असत. गणेशोत्सवाच्या बाबतीतले हे वैविध्य मुंबईतसुद्धा दिसते. दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करणा-या एकाला त्याच्या मित्राने विचारले, "तुम्ही लोक इतके कसे रे चिक्कू? गणपती आला ना आला तेवढ्यात त्याला निरोप देऊन मोकळे होता. आम्ही बघा कसे बाप्पाला चांगले दहा दिवस आमच्याकडे ठेवून घेतो."
त्यावर पहिला मित्र म्हणाला, "बरं तू साग, गणपती हा काय देणारा देव आहे?"
"बुद्धी देणारा."
"मग त्यासाठी आम्हाला दीड दिवस पुरेसे आहेत, तुम्हाला लागत असतील बाबा दहा बारा दिवस."

ज्या गणपतींचे विसर्जन दुस-या दिवशी केले जाते त्यांना दीड दिवसाचा असे कदाचित खिजवण्यासाठी म्हणत असतील, पण तिस-या दिवशी विसर्जन होत असलेल्या गणपतींना मात्र अडीच दिवसाचे न म्हणता तीन दिवसाचे असे का म्हणायचे हे गणित मला कधी समजले नाही. दीड, अडीच असे करत हाच क्रम पुढे वाढवत नेला तर मग साडे चार, साडेसहा, साडे नऊ असे आडमोडी आकडे येतील म्हणून कदाचित अडीच दिवसांना राउंड ऑफ करून तीन दिवस म्हंटले जात असेल. आमच्या घरातला गणपती मात्र मोजून पाच दिवसांचाच असायचा. ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली की आजोबांनी की पणजोबांनी ते माहीत नाही. आमच्या लहानपणी असले प्रश्न मनात उठले तरी ते विचारायची कोणाची प्राज्ञा नसायची. मी मात्र माझ्या मुलांना सांगण्यासाठी एक एक्स्प्लेनेशन तयार केले.

गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. आपले कलाकौशल्याचे काम चार लोकांनी येऊन पहावे असे वाटते. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. त्यांना सवडीने येऊन जायला थोडी फुरसत द्यायला पाहिजे. घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र जमून गजाननाची पूजा, आरती वगैरे करण्यात थोडी मजा येऊ लागलेली असते. ती गोडी दीड दोन दिवसात संपवून टाकावी असे वाटत नाही. असे असले तरी या उत्सवाच्या दिवसात रोजच्या भरगच्च कामांमध्ये या कार्यक्रमांची भर पडलेली असते. शाळा, ऑफीस वगैरेंची व्यवधाने सांभाळून ते सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत रीतीने रोज नियमितपणे करणे जास्त दिवस अशक्य नसले तरी कठीण असते. शिवाय घरात गणपती बसलेला असतांना शक्य तोवर कोणी ना कोणी नेहमी घरात हजर राहण्याची गरज असते. त्या काळात मला अनेक वेळा फिरतीवर परगावी जावे लागत असे, ते जास्त दिवस पुढे ढकलता येत नसे. या सगळ्याचा विचार करता घरातल्या गणेशोत्सवासाठी पाच दिवस हा चांगला आणि ऑप्टिमम पीरियड वाटतो. बाप्पासाठी काही करत असल्याचे समाधानही मिळते आणि त्याचा ताणही पडत नाही. हे लॉजिक मुलांना बहुधा पटले असावे.   

3 comments:

Vijay Shendge said...

Likhanat niymitta thewa.

Anand Ghare said...

आपल्या सूचनेचे पालन करायला सुरुवात केली आहे.

mannab said...

दीड दिवसाच्या गणपतीचे समर्थन एवढ्या लहान वयात करणारा विद्यार्थी आवडला ! आपण असेच नियमितपणे लिहा बुवा !
मंगेश नाबर