Saturday, February 22, 2014

मारुती 800 (उत्तरार्ध)


पुराणकाळातल्या रथी महारथींकडे सारथी असत, नंतरच्या काळातही गाडीवानदादा, टांगेवाला, नावाडी वगैरे लोकांनी चालवलेल्या वाहनात बसूनच इतर लोक प्रवास करत आले आहेत. मध्यमवर्गीयांनी मोटारी घ्यायला सुरुवात केल्यानंतर बहुतेक मालक लोक स्वतःच गाडी चालवायला लागले. पण अजूनही खानदानी बडे लोक मात्र त्या कामासाठी वेगळा ड्रायव्हर किंवा शोफर ठेवतात. काही श्रीमंत लोकांना, विशेषतः युवकांना कार ड्राइव्हिंगचा शौक असतो. त्यातला आनंद किवा थरार अनुभवण्यासाठी ते मोटारीचे स्टीअरिंग व्हील हातात घेतात.

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची मुलेही प्रकाशझोतात आली. त्यातला धाकटा मुलगा संजय याला चांगल्या चांगल्या मोटारगाड्या चालवण्याची विशेष आवड आहे इथपासून ते ऑटोमोबाइल्सच्या क्षेत्रातला तो मोठा तज्ज्ञ आहे इथपर्यंत त्याची प्रतिमा तयार होत गेली. त्याने स्वतः एक मोटारकार तयार केली होती असेही सांगितले जात होते. इलस्ट्रेटेड वीकली या त्या काळातल्या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे संपादक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ लेखक खुशवंत सिंह यांनी त्या खास मोटारगाडीवर लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला असल्याचे आठवते. ही संजयनिर्मित नवी कार आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाची असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी या लेखात दिले होते. सर्वसामान्य (म्हणजे मध्यमवर्गीय) लोकांना परवडू शकेल इतक्या स्वस्त आणि भारतातल्या तत्कालीन इतर गाड्यांच्या मानाने मस्त अशा या स्वदेशी मोटारगाड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी संजय गांधी यांच्याच आधिपत्याखाली एका खाजगी कंपनीची स्थापना करण्यात आली.  

संजय गांधींच्या त्या गाडीचे आणि त्यांच्या कंपनीचे नाव 'मारुती' असे ठेवण्यात आल्याचे वाचले तेंव्हा माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. संजय गांधी हे त्यांचे आजोबा पं.जवाहरलाल नेहरू आणि आई श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झाले होते. या दोन्ही महान व्यक्ती संपूर्ण देशाच्या, किंबहुना सा-या जगाच्या राजकारणाचा व्याप सांभाळण्यात गुंतलेल्या असतांना त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला कितपत वेळ मिळत असेल हा एक प्रश्न होताच, त्यातून या दोघांचीही धार्मिकपणाबद्दल कधीच ख्याती नव्हती. त्यांच्यावर असलेला पाश्चात्य जगातल्या आधुनिक विचारांचाच प्रभाव त्यांच्या वक्तव्यांमधून दिसून येत होता. संजय गांधींचे पिता फिरोज गांधी तर पारशी होते आणि संजय यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातल्या पब्लिक स्कूल्समध्ये व परदेशात झाले होते. त्यांनी अशा वातावरणात केलेल्या या सगळ्या प्रवासात त्यांना हिंदू धर्मातल्या पौराणिक कथांमधल्या पात्रांबद्दल आस्था वाटावी किंवा हिंदू देवतांबद्दल त्याच्या मनात भक्तीभाव उत्पन्न व्हावा अशी अपेक्षा नव्हती. त्यातही मारुती हे नावही जरा वेगळे आहे. या देवाने राम, कृष्ण, महादेव वगैरे देवतांसारखे सुंदर, मनोहर आणि आकर्षक असे मानवरूप धारण केलेले नाही. उत्तर भारतात हनुमानजींची मंदिरे आहेत, हनुमंतसिंग, हनुमानप्रसाद अशा नावाच्या प्रसिद्ध व्यक्ती मिळतात, पण मी तरी एकादा मारुतीप्रसाद किंवा मारोतकुमार अजूनपर्यंत पाहिलेला नाही. दक्षिणेमध्ये आंजनेयस्वामींची देवळे पाहिली आहेत आणि एक आंजनेयुलू पण भेटला होता. मारुती माने, मारुती कांबळे, मारोतराव वगैरे मराठी नावे मात्र कानावर येत असतात. यामुळे मारुती हे बहुधा मराठी नाव संजय गांधींनी मोटारकारसाठी का निवडले हे मला आजतागायत समजलेले नाही. मारुती या नावाखेरीज हनुमानाचे चित्र किंवा त्याचा कसलाही उल्लेखसुद्धा मारुती कारच्या संदर्भातल्या कोणत्याही पँफ्लेट किंवा जाहिरातीमध्ये कधी आढळला नाही.

ज्या काळात संजय गांधींच्या खास मारुती कारची थोडीफार जाहीर चर्चा होत होती त्याच काळात राजकारणाच्या क्षेत्रात मात्र त्यांची तुफानी घोडदौड चालली होती. त्यांचे महत्व आणि दरारा दिवसेदिवस वाढतच होता आणि आणीबाणीच्या काळात तो शिगेला पोचला होता. पण त्यानंतर आलेल्या जनतापक्षाच्या सरकारने इंदिरा गांधी आणि संजय गांधीं यांच्या यांचेविरुद्ध आघाडी उघडली आणि त्या अनुषंगाने मारुती कंपनी वादाच्या भोव-यात सापडली, ती बंद पडली आणि तिच्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली. पण जनता पक्षाचे सरकार जास्त काळ टिकले नाही. अंतर्गत दुफळीमधूनच त्या पक्षाचे विघटन झाले आणि श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर या चौकशा थांबल्या. यावेळी संजय गांधीही राजकारणात त्यांच्या मातोश्रींच्याबरोबर आघाडीवरच होते. व्यक्तीगत आयुष्यात मोटारगाडी चालवणे हा त्यांचा आधीचा छंद होता, पण राजकारणामध्ये ते उंच भरारी घेत असतांना त्यांना खरे खुरे विमान आकाशात उंच उडवण्याची आवड निर्माण झाली, पण त्यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यांचे अकाली निधन झाले.

मारुती कंपनी बंद झालेली होती आणि संकल्पित मारुती कारचा मुख्य निर्माता किंवा सूत्रधारच अकस्मात असा काळाआड गेल्यावर हे सगळे विस्मरणात गेले असते, पण भारत सरकारने पुढाकार घेऊन तो प्रकल्प तडीला न्यायचे ठरवले. सरकारच्या बळावर मारुती कंपनीचे पुनरुज्जीवन केले आणि निरनिराळ्या परदेशी कंपन्यांशी वाटाघाटी करून अखेर सुझुकी या जपानी कंपनीबरोबर कोलॅबोरेशन केले गेले. मारुती कंपनीचे नाव मारुतीसुझुकी असे झाले आणि त्याची अंशतः मालकी जपानी कंपनीकडे गेली. त्यानंतर लवकरच या कंपनीने आपली नवी गाडी बाजारात आणली. फियाट आणि अँबॅसेडरपेक्षा कमी किंमतीत आणि त्याच्यापेक्षा खूप चांगले माइलेज देणारी जपानी बनावटीची नवी गाडी मिळणे म्हणजे ग्राहकांना पर्वणीच होती. त्या काळात भारतीय बनावटीच्या चलतीका नाम गाडी म्हणता येण्यासारख्या गाड्याच प्रामुख्याने रस्त्यावर दिसायच्या. काही मोठे उद्योगपती, नावाजलेले नटनट्या आणि प्रसिद्ध पुढारी इंपाला किंवा मर्सिडीज यांच्यासारख्या इम्पोर्टेड मोटारगाड्या वापरत असत. एकाद्या भागात अशी आलीशान गाडी आली तर तिच्यातून कोणती अतिमहत्वपूर्ण व्यक्ती (व्हीआयपी) उतरते हे पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी जमत असे आणि त्या गाडीकडे व व्यक्तीकडे आळीपाळीने पहात उभी रहात असे. या पार्श्वभूमीवर पाहता स्वस्त आणि मस्त जपानी गाडी विकत मिळते आहे हे पाहताच ज्याला ज्याला शक्य असेल ते सगळे लोक ही संधी साधायला सरसावले. जितक्या गाड्यांचे बुकिंग जाहीर केले होते तेवढे सगळे पहिल्याच दिवशी झाले असावे. माझ्या काही मित्रांनीसुद्धा कर्ज काढून आणि ऑफीसातून रजा घेऊन त्या दिवशी अर्जदारांच्या रांगेत नंबर लावला होता. नंतरच्या काळात हे बुकिंग अधूनमधून केले जाऊ लागले आणि तिकडे लक्ष ठेवून इच्छुक लोक ते करू लागले.

काही दिवसांनी मारुती कारचे अॅलॉटमेंट सुरू झाले. सोडत काढून निवडलेल्या पहिल्या ग्रहकाला मारुती गाडी सुपूर्द करण्यासाठी खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. पुढेही अॅलॉटमेंटमध्ये ज्याचा ज्याचा नंबर येत असे त्याला लॉटरी लागल्यासारखा आनंद होत असे. तो सेलिब्रेट केला जात असे. पहिल्या लॉटमधल्या कित्येक हजार मारुती मोटरगाड्या तर पूर्णपणे आयात करून विकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्यांना त्या मिळाल्या ते लोक तर जास्तच खूष झाले होते. नंतर हळूहळू काही भाग भारतातल्या कारखान्यामध्ये तयार होऊ लागले, पण गुणवत्तेच्या बाबतीत ते सुद्धा तोडीस तोड असल्यामुळे सगळ्या गाड्या तांत्रिक दृष्ट्या एक सारख्याच होत्या असे म्हणायला हरकत नव्हती.  

मारुती 800 ही मुख्यतः शहरात चालवण्याच्या उपयोगासाठी तयार केलेली मोटार आहे. अर्थातच शहरात रस्ते चांगले असतात अशी अपेक्षा असते, शहराच्या अंतर्गत भागात घाटासारखे खूप चढउतार नसतात. भारतातल्या शहरात तर इतकी जास्त रहदारी असते आणि जागोजागी ट्रॅफिक सिग्नल्स असतात की जास्त वेगाने गाडी चालवणे शक्यही नसते. यामुळे इंजिनाला फार जास्त अतिरिक्त शक्तीची आवश्यकता नसते. मारुती 800या मोटारीच्या इंजिनाच्या सिलिंडर्सचा अंतर्गत आकार (स्वेप्ट व्हॉल्यूम) सुमारे ८०० घनसेंटिमीटर इतका आहे म्हणून या मॉडेलचे नाव मारुती 800 असे पडले. सुरुवातीला फक्त हीच गाडी होती आणि ती खूप लोकप्रिय झाली यामुळे फक्त मारुती गाडी एवढेच म्हंटले तर सहसा मारुती 800 असाच त्याचा अर्थ घेतला जातो. नंतरच्या काळात व्हॅन, आल्टो, झेन, एस्टीम, वॅगनार, स्विफ्ट, ओम्नी, डिझायर वगैरे इतर अनेक प्रकारच्या मोटारी मारुती सुझुकी कंपनीने बाजारात आणल्या .त्या गाड्या मात्र त्या त्या विशिष्ट मॉडेलच्या नावाने ओळखल्या जातात.

मारुती 800 गाडी आकाराने लहानच असते. पुढच्या बाजूला चालकाची आणि दुसरी एक वेगळी सीट असते, त्यावर दोन माणसेच बसू शकतात. मागची सीट दोन व्यक्तींना व्यवस्थितपणे पुरेशी असते. दाटीवाटी करून आणखी एकादा मुलगा, मुलगी किंवा सडपातळ व्यक्ती सामावून घेता येईल. 'हम दो हमारे दो' हा नियम पाळणा-या चौकोनी कुटुंबासाठी ही गाडी उत्तम आहे. शहरातल्या रहदारीमधून वाट काढण्यासाठी किंवा रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यासाठी हिचा लहान आकार सोयिस्कर आहे. या गाडीचे इंजिन लहान असले तरी कार्यक्षम असते, त्यामुळे गाडी लवकर वेग घेते आणि मोकळा हमरस्ता मिळाला तर ताशी सव्वाशे किलोमीटरपर्यंत वेग घेऊ शकते.

अशी ही सद्गुणी मोटर कार बाजारात आल्या आल्या लगेच लोकांच्या पसंतीला उतरली आणि जवळ जवळ वीस वर्षे भारतात सर्वाधिक खपाच्या अग्रक्रमावर टिकून राहिली होती. शहरात राहणा-या नोकरदार वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यावर जेंव्हा त्यांचा मोटार घेण्याचा विचार होई तेंव्हा बहुतेकांचे पाय मारुतीच्या शोरूमकडेच वळत असत. त्यासाठी ऑफिसकडून कर्जही सुलभपणे मिळायला लागले आणि त्याच्या परतफेडीचा हप्ता परवडण्याइतपत असायचा. माझे बहुतेक सहकारी आणि शेजारी त्याच वाटेने गेले आणि दहा बारा वर्षांमध्ये त्यातल्या बहुतेकांनी मारुती 800 घरी आणली.

माझ्या प्रायॉरिटीज थोड्या वेगळ्या असल्यामुळे मी मोटारगा़डी विकत घेण्याची घाई केली नाही. मला स्वतःला चालायला आवडते, चालत जातांना रमतगमत, वाटल्यास वाटेत थांबून कोणाशी चार शब्द बोलून, पुढे जाता येते.  बसमधले आसन उंचावर असते, खिडकीमधून बाहेरचे दृष्य पाहता येते यामुळे मला बसचा प्रवासही आवडतो. कारच्या खिडक्यांमधून मला तरी मुख्यतः रस्ता आणि त्यावरून चालणा-या चालणा-या लोकांचे पायच दिसतात,   माणसाचा चेहरा आणि इमारतीचा तळमजला जेमतेम दिसला तर दिसला, त्याच्यावर कितीही उंच आणि भव्य इमारत असली तरी ते समजत नाही. गाडी चालवणा-याला समोरचे बरेचसे दिसत असले तरी रस्ता, इतर वाहने आणि ट्रॅफिक सिग्नल्स यांच्यावरच आपले लक्ष केंद्रित करावे लागते. बरेच वेळा सोय म्हणून आणि कधी नाइलाज म्हणून मी कारमधून प्रवास करत असे पण ती माझी पहिली पसंती नसायची.

माझ्या पातळीवर असलेल्या सगळ्यांकडे मोटारी आल्या होत्या, पण मी घेतली नव्हती हे माझ्यापेक्षा इतरांनाच खटकायला लागले होते. माझ्याही इतर सगळ्या जीवनावश्यक वस्तू घेऊन झाल्या, सगळ्या कौटुंबिक जबाबदा-या पार पाडून झाल्या, त्यानंतर मग मलाही मोटर कार घेणे भागच होते किंवा ती न घेण्यासाठी कारण सांगता येईनासे झाले. तोपर्यंत मारुती 800 बाजारात येऊन पंधरा वर्षे होऊन गेली असली तरी अजून ती टॉपवर होती आणि अजूनही ती मिळण्यासाठी थोडे दिवस थांबावे लागत असे. मीही आपला नंबर लावला आणि दीडदोन महिन्यात माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या पसंतीच्या लाल रंगाची मारुती आमच्या बिल्डिंगच्या तळघरातल्या पार्किंग लॉटमध्ये येऊन पोचली.

आता मात्र मारुती 800 हे मॉडेल कायमचे बंद केल्याचे जाहीर केले गेले आहे. मागच्या महिन्यात या मॉडेलची शेवटची कार कारखान्यामधून बाहेर पडली तिला समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. ही बातमी वाचून मागचा सगळा इतिहास आठवला.

1 comment:

AJ said...

Namaskaar,

Maruti 800 mazya atyant jiwhalyacha wishay aslyane link baghtach click kela. surekh lihilayt. 800 chya prawasacha warnan wachun mast watla.

Chhan! :)

Apurva Oka
www.apurvaoka.com