Tuesday, April 28, 2009

मराठी दिवस

लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे। या निमित्याने मी मराठी दिवस या विषयावर लिहिलेला लेख देत आहे. दर वर्षी मराठी दिवस पाळला जातो. पण कोणते लोक आणि कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही. मातृभाषेच्या अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. पण या बाबतीतले एकंदरीत औदासिन्य पाहता कांही लोक सातत्याने मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.

सन १९२२ मध्ये कवीराज माधव ज्यूलियन यांनी लिहिलेल्या "मराठी असे आमुची मायबोली" या सुप्रसिध्द कवितेत "जरी आज ही राजभाषा नसे"अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त केली होती, त्यासोबतच "नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे" अशी आशा व्यक्त केली होती. तसेच आम्ही ते करून दाखवू असा आत्मविश्वास प्रकट केला होता. त्या काळच्या मानाने आज मराठीला खूपच चांगले दिवस आले आहेत, तरीही त्याबद्दल असंतुष्ट असलेल्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे गार्‍हाणे गाणे चालले आहे. एका पत्रलेखकाने माधव ज्यूलियनांची क्षमा मागून "मराठी असो आमुची मायबोली, तरीही खरी राजभाषा नसे। नसे आज ऐश्वर्य या माउलीला, भविष्यात ना शष्प आशा दिसे।।" अशा शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

नेहमीप्रमाणेच मी अशा टोकाच्या विचारांबरोबर सहमत होऊ शकत नाही. माझ्या मते साक्षरतेचे प्रमाण वाढल्यामुळे शुध्द मराठी लिहिण्या वाचण्याच्या बाबतीत प्रचंड वाढ झालेली आहे. जीवनशैलीत होत असलेल्या बदलांमुळे कांही परभाषी शब्द रोजच्या वापरात आले तर त्यामुळे आपली भाषा अधिक समृध्द होते, ती भ्रष्ट किंवा नष्ट होत नाही. ज्या इंग्रजीच्या नांवाने सारखे खडे फोडले जातात तिच्यात रोज असंख्य नवनव्या शब्दांची भर पडते आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी बोलीभाषा संत तुकारामाच्या काळात नव्हती आणि संत तुकारामांनी वापरलेली भाषा आजकाल प्रचलित असलेल्या व्याकरणाला धरून नाही. काळाबरोबर असे बदल होत जातातच. आजकाल जीवनचर्येतला बदल फार झपाट्याने होत आहे, त्यामुळे भाषेत होणारा बदल लगेच जाणवतो एवढेच. मला तर त्याबद्दल फारशी काळजी वाटत नाही.

'आठवणीतली गाणी'च्या सौजन्याने माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे. निदान कांही अंशाने त्यातल्या आकांक्षा पूर्ण होतील अशी मला आशा वाटते.
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

माधव ज्यूलियन

2 comments:

Anand Ghare said...
This comment has been removed by the author.
Anand Ghare said...

या विषयावरील माझा नवा आणि विस्तारपूर्वक लेख या पत्त्यावर जरूर वाचावा.
जागतिक मराठी दिवस