Sunday, April 13, 2025

सत्य, असत्य, आभास आणि कल्पना

 सत्य, असत्य, आभास आणि कल्पना


आपल्या जीवनात रोजच आपण जे काही पहातो, वाचतो किंवा ऐकतो त्याबद्दल काही वेळा आपल्या मनात शंका उठतात. हे खरोखरच असे असेल का असा विचार पडतो, कारण कधीकधी तो आपला भ्रम असतो किंवा दुसऱ्या कुणीतरी मुद्दाम थाप मारलेली असते किंवा कदाचित त्याचाच गैरसमज झालेला असू शकतो. औषधाच्या कडू गोळीवर एक गोड थर दिलेला असतो अशा वेळी ती आपल्या नकळत केलेली फसवणूक चांगल्या हेतूनेही केलेली असते.  कोणती गोष्ट खरी समजावी आणि तिच्यावर विश्वास ठेवावा की तो एक आभास आहे असे समजावे असा प्रश्न काही वेळा मनात येतो.  कधीकधी 'त' वरून ताकभात ओळखण्याच्या नादात मनात उठलेली एक निव्वळ कल्पना असू शकते. मनोरंजनाचे सगळे विश्वच कल्पनारंजनातून उभे राहिलेले असते. नाटक, सिनेमात जे दाखवले जात असते ते काल्पनिक आहे हे माहीत असले तरी ते पहातांना आपण सुखावतो. प्रत्येक बाबतीतले सत्य काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे का असा विचार करून आपण नेहमीच खोलात जातही नाही. पण तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या मार्गावर जाणाऱ्या विद्वानांनी सत्य शोधण्याचे चिकाटीने प्रयत्न केले आणि ते अजूनही करत आहेत यामुळे आतापर्यंत प्रगति होत गेली आणि अजून होत आहे. या विषयाच्या अशा अनेक पैलूंचा विचार करून ते दाखवण्यासाठी मी फेसबुकावर एक स्फुट लेखांची मालिका लिहिली होती ती या पानावर संकलित केली आहे.  


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १

एका बाजूला सत्य आणि दुसऱ्या बाजूला असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया वगैरे यांचे द्वंद्व अनादि काळापासून चालत आलेले आहे आणि अनंतकाळापर्यंत चालत राहणारच आहे असे वाटते. असत्य म्हणजे धडधडीत खोटेपणा कदाचित वेगळा दिसून येऊ शकतो, पण आभास आणि सत्य दोन्ही वरून सारखेच वाटतात. खरे खोटे याबद्दल काही ठोकताळे दिले जातात. ऐकीव गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नये, प्रत्यक्ष पाहून खात्री करून घ्यावी असे सांगितले जाते. "चक्षुर्वै सत्यम् " असे म्हंटले जाते, पण 'दिसते तसे नसते, म्हणून जग फसते' असाही एक वाक्प्रचार आहे.



रोज सकाळी पूर्व दिशेला क्षितिजावर सूर्याचे लालचुटुक बिंब उदयाला येते. हा सूर्य प्रखर होता होता आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हीला माथ्यावर येतो. त्यानंतर पश्चिमेकडे खाली उतरत संध्याकाळी त्याचे फिकट पडत जाणारे बिंब क्षितिजाला टेकून अदृश्य होते. हे दृश्य आपण रोज आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहात असतो. त्याच्या सत्य असण्याबद्दल काही शंका घेण्याचे कारणच नसते. पण संत ज्ञानेश्वरांनी असे लिहून ठेवले आहे, "आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे || जैसे न चालता सूर्याचे चालणे || तैसे नैष्कर्म्यत्व जाणे || कर्मेची असता ||" आणि "उदय-अस्तासाठी ज्याप्रमाणे सूर्य चालत नसतांनाही चालल्यासारखा वाटतो " असा दाखला देऊन "त्याचप्रमाणे कर्मात असूनही नैष्कर्म्य असते." असे तत्वज्ञान त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ आपल्याला दिसतो त्याप्रमाणे सूर्य आकाशातून चालत नसतो हे त्यांना माहीत होते. त्यांच्याही कित्येक शतके आधी होऊन गेलेल्या आर्यभटाने "नावेत बसलेल्या माणसाला काठावरील झाडे मागे गेल्यासारखी दिसतात त्याप्रमाणे स्थिर असलेल्या नक्षत्रांचा उदय-अस्त झाल्याचा आभास होतो "असे सांगितले होते, पण पुढील शेकडो वर्षे सामान्य लोकांना ते समजलेच नाही किंवा मान्य झाले नव्हते. आपल्या डोळ्यांना सपाट आणि स्थिर दिसणारी पृथ्वी चेंडूसारखी गोल असेल, ती अवकाशात अधांतरी तरंगत असेल आणि सतत स्वतःभोवती गिरक्या घेत असेल हे कुणाला खरे वाटेल? पण शेकडो किंवा हजारो शास्त्रज्ञांनी तसे एकमुखांनी अनेक वर्षे सांगितल्यानंतर लोकांना पटायला लागले की आपल्याला जे दिसते तो आभास असतो आणि सत्य वेगळेच आहे. इथे डोळ्यांना दिसते ते खरे नसते, ते आभासी असते, पण शाळेतल्या मास्तरांनी सांगितलेले बरोबर असते असे म्हणावे लागते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २

चांदोबाची गोष्ट तर जास्तच मजेदार आहे. तो महिन्यात एक दिवस अमावास्येला आभाळात दिसतच नाही, त्यानंतर प्रतिपदेला त्याची फिकट कोर काही मिनिटे दिसली नी दिसली तोपर्यंत अदृष्य होते. द्वितीयेला मात्र अत्यंत रेखीव अशी आल्हाददायक चंद्रकोर तासभर दिसते. त्यानंतर रोजच्या रोज तिचा आकार वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार तेजस्वी चंद्र दिसतो. त्याच्या चांदण्याच्या मंद प्रकाशात आपले जग उजळून निघते. त्यानंतर त्याची कोर दिवसेंदिवस खंगत जाऊन अमावास्येला ती दिसेनाशी होते. ही सगळी मजा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पहातो. पुराणात अशी गोष्ट आहे की चंद्राचा सासरा दक्ष प्रजापती याने दिलेल्या शापामुळे त्याचा क्षय होत जातो आणि देवाने दिलेल्या वरदानामुळे त्याचा पुनर्जन्म होऊन तो पुन्हा पूर्णाकृति होतो. हजारो वर्षे लोक हे खरेच मानत आले होते.  महिन्यातले पहिले पंधरा दिवस आपल्याला चंद्र मावळतांना दिसतो, तर दुसरे पंधरा दिवस तो उगवतांना दिसतो. संकष्ट चतुर्थीचे दिवशी तर काही लोक चंद्रोदयाची आतुरतेने वाट पहातात आणि त्याचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. 


पण शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले की चंद्राकडे मुळी स्वतःचे तेजच नसते. सूर्याच्या किरणांनी त्याचा अर्धा भाग उजळून निघतो आणि उरलेला अर्धा भाग अंधारातच राहतो. पृथ्वीभोवती फिरतांना  अमावास्येच्या दिवशी तो दिवसभर आकाशात दिसणाऱ्या सूर्यबिंबाच्या जवळपास असतो त्या वेळी त्याचा अंधारात दडलेला भाग पृथ्वीकडे असतो त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. तो जसा जसा आभाळातल्या सूर्यबिंबापासून दूर जात जातो तसा तसा त्याचा सूर्यकिरणांनी उजळलेला अधिकाधिक भाग आपल्याला दिसत जातो त्यामुळे त्याची कोर अंगाने वाढत जाते. पौर्णिमेच्या संध्याकाळी पश्चिमेकडे सूर्य मावळत असतो तेंव्हा पूर्वेच्या क्षितिजावर चंद्राचा उदय होत असतो. याचाच अर्थ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग आपल्या समोर असतो आणि आपल्याला तो दिसतो.  पण एकाद्या पौर्णिमेला या चंद्राला ग्रहण लागते तेंव्हा पाहता पाहता त्याचा काही भाग अंधारात जातो, खग्रास ग्रहणात तर पूर्ण चंद्रच झाकाळतो आणि काही वेळानंतर तो पुनः  पहिल्यासारखा होतो. हे सगळे आभास चंद्रावर पडणाऱ्या पृथ्वीच्या सावलीमुळे होतात.  


थोडक्यात सांगायचे झाल्यास चंद्राचे हे सगळे दिसणे किंवा न दिसणे हे सत्य नसून भास असतात. प्रत्यक्षात बाराही महिने चोवीस तास चंद्र अवकाशात असतोच. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसतो आणि त्याच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे त्याच्या कला म्हणजे त्याचा उजळलेला भाग आपल्याला दिसतात आणि पृथ्वीच्या हलत्या सावलीमुळे त्याला ग्रहण लागते आणि सुटते.

(क्रमशः)



सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ३

मंगळ. बुध. गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह आपण आकाशात पाहू शकतो. सूर्य आणि चंद्र या आकाशातल्या तेजस्वी गोलांसह या पाचही ग्रहांची नावे वारांना देऊन सात दिवसांचा आठवडा बनवला गेला आणि तो जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये पाळला जातो. आपल्या पूर्वजांनी या सात जणांचा समावेश ग्रह या एकाच सदराखालील देवतांमध्ये केला. याशिवाय राहू आणि केतू या नावाचे दोन ग्रह कल्पिले गेले. ते साध्या डोळ्यांनी तर दिसत नाहीतच, कुठल्याही दुर्बिणीमधूनसुद्धा दिसू शकत नाहीत, तरीही ते काल्पनिक बिंदूंच्या रूपात आकाशात वावरत असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सूर्य पूर्वेकडून ते पश्चिम क्षितिजापर्यंत एका अर्धवर्तुळासारख्या मार्गाने जात असतो तर चंद्र त्याच मार्गाने न जाता जराशा वेगळ्या मार्गाने आकाशातून जात असतो. या दोन मार्गांची वर्तुळे दोन ठिकाणे एकमेकांना छेद देतात त्या बिंदूंना  राहू आणि केतू अशी नावे दिली आहेत.  सूर्य आणि चंद्र या दोघांचेही आकाशातले मार्ग रोज किंचित बदलत असतात. त्यामुळे हे बिंदूही पुढे पुढे सरकत असतात. अमावास्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र आपापल्या मार्गाने जात असतांना एकमेकांच्या जवळ येत असतात. ते जर एकाच वेळी या बिंदूपाशी आले तर त्या वेळी सूर्याला ग्रहण लागते. आपल्या पूर्वजांनी या बिंदूंची कल्पना कशी केली, त्यांचा कसा अभ्यास केला आणि ग्रहणकाळ वगैरेंचे अचूक अंदाज आधीच लावले हे खरोखर आश्चर्य वाटण्यासारखे आणि कौतुक करण्यासारखे आहे. 



या नवग्रहांना देव मानून त्यांची पूजा केली जाते, त्यांचे स्तोत्र आहे आणि पुराणामध्ये त्यांच्या विषयीच्या कथा आहेत. इतकेच नव्हे तर ते आकाशात भ्रमण करत असतांना पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांवर बारीक नजर ठेवून असतात आणि त्यांच्या जीवनामधल्या घटना घडवून आणतात असा समज पसरवला गेला आणि असंख्य लोक आजही तसे मानतात. या नवग्रहांमधला सूर्य हा एक तारा आहे आणि फक्त तोच स्वयंप्रकाशी आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा तिचा उपग्रह आहे आणि मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे सूर्याभोवती फिरणारे ग्रह आहेत. हे सगळे ग्रह सूर्याच्या प्रकाशामुळे उजळून निघतात आणि सूर्यापासून मिळालेले प्रकाशकिरण आकाशात सगळ्या दिशांना पसरवत असतात.  शुक्र हा ग्रह पृथ्वीपासून सगळ्यात जवळ आहे आणि तो सूर्यापासूनही जवळ असल्यामुळे त्याला जास्त प्रकाश मिळतो. यामुळे रात्रीच्या आकाशात दिसणारा तो सर्वात जास्त तेजस्वी ग्रह आहे. गुरु हा ग्रह शुक्राच्या अनेकपटीने मोठा असला तरी तो सूर्यापासूनही आणि पृथ्वीपासूनही दूर असल्यामुळे शुक्राच्या नंतर त्याचा क्रमांक वागतो. शनि हा ग्रह त्याच्यापेक्षाही दूर असल्यामुळे आकाराने मोठा असूनही फिक्कट दिसतो. 

या सगळ्या ग्रहांच्या बाबतीत सत्य, आभास, भ्रम आणि कल्पना या सगळ्यांचे एक अजब मिश्रण आहे. 

------

सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ४

माझ्या लहानपणी आमच्या गावात रात्री आठ साडेआठपर्यंत जेवणे आटोपून सामसूम होत असे आणि आम्ही बहुतेक वेळा गच्चीवर अंथरूण पसरून गप्पा मारत मारत उघड्या आकाशाखाली झोपत होतो. त्या काळात त्या भागात सगळीकडे रात्रीच्या वेळी अंधारगुडुप होत असल्यामुळे आकाश निरभ्र असले तर त्यात लाखो चांदण्या लुकलुकतांना दिसत असत. तेंव्हा झोप लागेपर्यंत आमचे आभाळाचे निरीक्षण चाललेले असे. मृग आणि हस्त नक्षत्रे, वृश्चिक रास, सप्तर्षी आणि ध्रुव तारा ही काही ठळकपणे दिसणारी मंडळी माझ्या ओळखीची झाली होती. माझ्या वडिलांना तर बहुतेक सगळी नक्षत्रे आणि सगळ्या राशी माहीत होत्या. आज चंद्र मकर राशीत आहे किंवा सध्या गुरु सिंह राशीत असतो असे ते मला दाखवतांना सांगत असत. एखादा ग्रह कुठल्या राशीत असतो किंवा त्या राशीमधून निघून पुढच्या राशीत जातो म्हणजे नेमके काय होते याचा अर्थ त्यामधून मला समजला होता. 

   


राशीभविष्य वाचतांना असे वाटते की आकाशाच्या एका मोठ्या कॉफी हाउसमध्ये बारा टेबले मांडून ठेवलेली असावीत आणि त्यातल्या कुठल्या टेबलावर दोघे तिघे तर इतर काही टेबलांवर एकेकटे ग्रह बसलेले असतात आणि ते अधून मधून उठून पुढच्या टेबलावर जाऊन बसतात. त्यातला रवि दर महिन्यात एकदा टेबल बदलतो, त्याचा सवंगडी बुध त्याच्याच टेबलावर किंवा लगतच्या टेबलावर बसतो, शुक्रही कधीही रवीपासून जास्त दूर जात नाही, मस्त कलंदर मंगळ जरा अनियमितपणे टेबले बदलत असतो, गुरु एक पूर्ण वर्ष त्याच टेबलावर बसून राहतो आणि शनि तर अडीच वर्षे टेबल बदलत नाही. प्रेमळ चंद्र मात्र दर दोन अडीच दिवसात टेबल बदलून महिनाभरात सगळ्या ग्रहांना भेटून येतो आणि अमावास्येला मात्र न चुकता रवीच्या टेबलावर हजेरी लावतो.  

जेंव्हा आपल्याला कुंडलीमध्ये  दोन किंवा तीन ग्रह एका घरात (राशीत) दिसतात तेंव्हा आकाशात सुद्धा ते एकमेकांच्या जवळ आल्यासारखेच दिसतात. ते जास्तच जवळजवळ दिसले तर त्याला युति म्हणतात. प्रत्यक्षात मात्र चंद्र आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये असला तर मंगळ कोथरूडला, गुरु कऱ्हाडला आणि शनि कोल्हापूरला इतके ते दूर दूर असतात. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह आपापल्या कक्षांच्या  किंचितही बाहेर जात नाहीत आणि कुठलाही ग्रह किंवा उपग्रह कधीही दुसऱ्या कुठल्याही ग्रहाच्या जवळपाससुद्धा जात नाही आणि  तेच बरे आहे. समजा कधी मंगळ किंवा बुध महाकाय गुरूच्या जवळपास गेला तर तो गुरुत्वाकर्षणाने त्या लहान ग्रहांना गिळून टाकेल आणि कुठलाही ग्रह सूर्याच्या जवळपास गेला तर  क्षणार्धात त्याची वाफ होऊन जाईल.

नक्षत्रे आणि राशी हे चांदण्यांचे समूह आहेत. ज्या तारका मिळून हे समूह बनतात त्या आकाशात एकमेकींच्या जवळ दिसतात. पण त्यासुद्धा प्रत्यक्षात एकमेकींपासून खूप दूर दूर असतात.  मृग नक्षत्रातला व्याध (Sirius) हा तारा सूर्यमालिकेपासून सर्वात जवळ म्हणजे सुमारे आठ प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे, तर या व्याधाने मारलेल्या बाणातले तीन तारे एक हजार ते दोन हजार प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहेत, म्हणजे ते सुद्धा एकमेकांपासून हजार प्रकाशवर्षे इतक्या अंतरांवर आहेत. साध्या डोळ्यांनी मात्र हे सगळे जवळजवळच दिसतात. विज्ञानामध्ये झालेल्या प्रगत संशोधनामुळे ही अंतरे मोजता आली आहेत.

आकाशातले सूर्य, चंद्र. ग्रह आणि तारे यांचे साध्या डोळ्यांनी निरीक्षण करून मिळणारी माहितीसुद्धा एका दृष्टीने बरोबरच असते, पण त्यात काही प्रमाणात आपले अज्ञान असते. त्यात थोडा आभास असतो आणि विज्ञानामधून त्यांच्या बाबतीतले अधिक सखोल ज्ञान प्राप्त झाल्यावर तो भ्रम दूर होतो.

(क्रमशः)  


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ५

आपल्याला आकाशात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी जशा दिसतात तशाच नसतात किंवा तितक्याच नसतात, आपल्याला जे दिसत नाही असेही बरेच काही तिथे असते, पण ते आपल्याला समजत नाही हे आपले अज्ञान आहे. त्यात कुणीही ठरवून केलेली कसली लपवाछपवी नाही. पण अनेक वेळा असेही होते की जे प्रत्यक्षात नसतेच ते  आहे असे कुणाकडून तरी काही उद्देशाने दाखवले जाते. हे सुद्धा प्राचीन काळापासून होत आले आहे.


रामायणात मारीच राक्षस सोन्याच्या हरिणाचे रूप घेऊन सीतेला मोहात पाडतो आणि तो हरिण पकडून आणण्यासाठी राम वनात जातो.  तो राक्षस नंतर रामाच्या आवाजात "लक्ष्मणा धाव धाव" असे ओरडतो आणि तो रामाचाच आवाज आहे असे वाटून लक्ष्मणही रानात धाव घेतो. तेवढ्यात रावण एका याचकाचा वेष घेऊन सीतेकडे जातो आणि तिला पळवून लंकेला घेऊन जातो अशी रचून केलेली बनवाबनवी आहे.

महाभारतात मयासुर राक्षस पांडवांना एक मयसभा बांधून देतो. त्यात जिथे जमीन दिसते तिथे पाणी आणि जिथे पाणी आहे असे वाटते तिथे जमीन असे भास होत असत. याला फसून दुर्योधनाची फजिती होते आणि द्रौपदी त्याला खदखदा हसून "आंधळ्याचा मुलगा आंधळा" असा टोमणा मारते. दुर्योधनाला हा अपमानाचा घाव सहन होत नाही आणि तो जन्मभर त्याचा सूड घेण्यासाठी दुष्ट कारवाया करत राहतो असा कथाभाग आहे.

पुढे कौरवपांडवांच्या युद्धात अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली असते आणि ती पूर्ण नाही केली तर अग्नीत उडी घेईन असे सांगितले असते.  त्या वेळी कौरव जयद्रथाला एका गुप्त जागी लपवून ठेवतात. ती जागा अर्जुनाला सापडत नसते. अर्जुनाला या धर्मसंकटातून वाचवण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या सुदर्शनचक्राने सूर्याला झाकून टाकतात आणि काळोख पडतो. आपली प्रतिज्ञापूर्ति करण्यासाठी अर्जुन तयार होतो आणि ते पहाण्यासाठी जयद्रथ समोर येतो. तेवढ्यात श्रीकृष्ण आपले सुदर्शन चक्र हटवतो आणि अर्जुनाला सांगतो, "हा पहा सूर्य आणि हा जयद्रथ."

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ६

सर्वशक्तिमान देवांना तर काहीही करणे शक्य असते आणि राक्षसांकडे काही मायावी शक्ती असतात त्यामधून ते आपल्याला अशक्य असलेल्या गोष्टी करू शकतात या दोन गृहीतकांवर पुराणातल्या कथा आधारलेल्या असतात.  माणसांच्या जगात होत नसलेल्या घटना त्या कथांमध्ये घडत असतात. त्यामुळे त्या अद्भुत वाटतात.  त्या खऱ्या म्हणायच्या की कल्पित म्हणायच्या यावर वाद घालण्यात अर्थ नसतो.  ते ज्याने त्याने आपापल्या मनाप्रमाणे किंवा बुद्धीने ठरवावे किंवा ठरवले नाही तरी काही फरक पडत नाही. पण या अद्भुतरम्य कथा हजारो वर्षे टिकून राहिल्या आहेत आणि अजूनही सांगितल्या जातात कारण त्या मानवी मनाचे काही पैलू दाखवतात. या रूपक कथांच्या अनुषंगाने 'कांचनमृग', 'लक्ष्मणरेखा' यासारखे शब्द  उदाहरणादाखल वापरले जातात.


आपल्याकडे जे नसेल ते मिळावे अशी इच्छा कुणालाही होणे साहजिक आहे. ते तुम्हालाही सहज मिळू शकेल अशी प्रलोभने दाखवली जात असतात. आजकाल जाहिरातबाजीच्या काळात तर त्यांचा सतत भडिमार होत असतो. त्यामुळे असा सोन्याचा हरिण अस्तित्वात तरी असेल का याचा विचार न करता काही लोक त्या कांचनमृगाच्या मागे वेड्यासारखे धावत सुटतात. प्रलोभन पाहून लगेच तिकडे आकर्षित होऊ नये, चकाकते ते सगळेच सोने नसते, त्या आकर्षक दिसणाऱ्या गोष्टीची आपल्याला काही गरज किंवा उपयोग तरी आहे का? यावर जरा विचार करावा. 


प्रत्येक माणसाला नेहमी स्वातंत्र्य हवे असते, मनात येईल तसे वागायचे असते, पण त्याचे आईवडील, नातेवाइक, शिक्षक, मित्र , समाज, शासन वगैरे सगळे लोक त्यावर काही बंधने घालत असतात.  केंव्हा कुठे कसे वागायचे याचे काही नियम घालून दिले जात असतात. ते पाळण्यात त्याचे हित असते आणि नाही पाळले, या लक्ष्मणरेखा ओलांडल्या तर त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता असते.


असे काही संदेश या कथांमधून मिळतात. या कथा सत्य आहेत की काल्पनिक यापेक्षा ते संदेश महत्वाचे असतात.

(क्रमशः)


---


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ७

दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींनी सविस्तर नाट्यशास्त्र लिहून ठेवले आहे म्हणजे भारतामध्ये त्यांच्याही आधीच्या काळापासून नाटके दाखवली आणि पाहिली जात असणार. कित्येक शतकांपूर्वी भास, कालिदास, शूद्रक वगैरे नाटककारांनी संस्कृत भाषेत नाटके लिहिली. विलियम शेक्स्पीअर या प्रसिद्ध इंग्लीश नाटककाराने अनेक नाटके लिहिली आणि ती रंगमंचावर आणली. मराठी भाषेतही अनेक नाटके लिहिली गेली आणि लिहिली जात आहेत. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सुरु करून दिलेली मराठी रंगभूमीवरीवरील नाटकांची परंपरा  गेली सुमारे दीडशेहून अधिक वर्षे अखंड चालत आली आहे. याचे कारण कोणतेही नाटक प्रेक्षकांना थोड्या वेळासाठी एका वेगळ्या आभासी जगात घेऊन जाते,  नाटक पहातांना त्याला एक वेगळा भावनिक अनुभव येतो आणि प्रेक्षकांना ते आवडते, ते हवे असते म्हणून ते नाटक पहायला येतात. 


"जग ही एक रंगभूमी आहे" असे एक शेक्स्पीअरचे सुप्रसिद्ध वचन असले तरी रंगभूमीवरचे नाटक बाहेरच्या जगापेक्षा वेगळे असतेच. तिथे एक पात्र होऊन थोडा वेळ वावरणारा नट त्याच्या आयुष्यात एक वेगळा माणूस असतो. रंगमंचावर चाललेल्या घडामोडी खऱ्या नसतात, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी त्या मुद्दाम घडवून आणलेल्या असतात हे प्रेक्षकांनाही माहीत असते आणि कलाकारांनाही माहीत असते. तरीही कलाकार जीव ओतून ती कामे करतात आणि प्रेक्षकही समरस होऊन त्याचा आनंद घेतात, ते नाटकातल्या विनोदावर हसतात, खिदळतात, सुखद प्रसंग पाहून खूष होतात आणि दुःखद प्रसंग पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. एखादे नाटक सत्यकथेवर आधारलेले असले तरी त्यातले प्रसंग त्या नाटकातल्या नटनट्यांच्या आयुष्यात आलेले नसतात, पण रंगमंचावर ते तसा आभास निर्माण करतात, त्यातले संवाद तर नाटककाराने त्याच्या प्रतिभेनुसार कल्पनेतूनच लिहिलेले असतात. बहुतेक नाटके तर पूर्णपणे काल्पनिकच असतात. त्यातली पात्रे, त्यांच्यामधले संवाद आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना हे सगळे खोटेच असते, हे सुद्धा माहीत असते, तरीही ते नाटक पहात असतांना ते खरे वाटते.


नाटकातली दृष्ये खरी वाटावीत यासाठी रंगमंच सजवला जातो. पूर्वीच्या काळी निरनिराळी चित्रे रंगवलेले मोठमोठे पडदे गुंडाळी करून वर लटकवून ठेवलेले असत आणि जसा नाटकाचा प्रवेश असेल त्याप्रमाणे केंव्हा बाग, केंव्हा अरण्य, तर केंव्हा देऊळ किंवा घराचा दिवाणखाना दाखवणारा पडदा खाली सोडून त्या दृष्याच्या पार्श्वभूमीवर कलाकार आपले संवाद बोलत असत. नंतरच्या काळात निरनिराळ्या दृष्यांसाठी लगेच हलवता येण्यासारखे सेट मांडले जाऊ लागले. ते काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी फिरते रंगमंच आणि सरकते रंगमंच आले. या सगळ्यांचा उद्देश जे प्रत्यक्ष अस्तित्वात नाही ते आहे असे तात्पुरते दाखवणे हाच असतो.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ८

पूर्वीच्या काळात आतासारखे तयार रंग, ब्रश आणि ड्रॉइंग पेपर वगैरे गोष्टी बाजारात मिळत नसत. निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, मुळे, बिया आणि रंगीत दगड, खनिजे, कोळसे वगैरेंना कुटून त्यांची पूड विशिष्ट प्रकारची तेले, मेण, चरबी वगैरेंमध्ये मिसळून रंग तयार केले जात असत, प्राण्यांचे मऊ केस कापून त्यांचे कुंचले तयार केले आत असत आणि चित्र काढण्यासाठी खास तयार केलेला जाड कागद किंवा दडस विणलेले कापड यावर ती चित्रे काढली जात असत. हे सगळे कष्टाचे आणि खर्चिक काम सामान्य लोकांच्या आवाक्यात नव्हतेच. तत्कालिन राजे रजवाडे, जहागीरदार वगैरे लोक गुणी चित्रकारांना आपल्या आश्रयाला ठेवून घेत असत. माणसाचा चेहेरा पाहून त्याचे हुबेहूब चित्र काढता येणे ही एक अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ कला आहे. त्यात पारंगत असलेले चित्रकार वर्षानुवर्षे परिश्रम करून राजघराण्यातल्या लोकांच्या मोठमोठ्या तसबिरी काढत असत. जगभरातल्या अनेक म्यूजियम्समध्ये अशी भव्य जुनी पोर्ट्रेट्स पहायला मिळतात. हे चित्रकार चित्र काढतांना त्या व्यक्तीमधल्या वैगुण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यातल्या पुरुषांना जास्तीत जास्त रुबाबदार आणि स्त्रियांना जास्तीत जास्त सुंदर असेच दाखवत असत. त्यांच्या अंगाखांद्यावर भरजरी उंची कपडे आणि बहुमोल रत्नांनी भरलेले भरपूर दागदागिने दाखवत असत.  त्या चित्रकारांनी वस्तुनिष्ठ कला म्हणून काही वेडेवाकडे दाखवले असते तर त्यांची धडगत नव्हती. 



गेल्या शतकात फोटोग्राफी करण्याचे तंत्र विकसित झाल्यानंतर हुबेहूब छायाचित्र लगेच तयार व्हायला लागले. त्यामुळे दीर्घ काळ घालवून हुबेहूब चित्र काढणाऱ्या चित्रकारांना तितकेसे महत्व राहिले नाही. पण उत्कृष्ट छायाचित्र घेण्यासाठी एकाहून एक चांगले कॅमेरे तयार होत गेले. विशेष प्रकाशयोजना करता येतील असे स्टूडिओ आले. निरनिराळ्या अँगल्समधून पाहून योग्य त्या अँगलने चेहेऱ्याकडे पाहून त्यावरचे भाव स्पष्ट दिसतील अशा प्रकारे नेमक्या क्षणी कॅमेराला क्लिक करणे ही एक नवी कला जन्माला आली आणि त्यात वाकबगार असे छायाचित्रकार नावारूपाला आले. "प्रत्यक्षाहुनि प्रतिमा सुंदर" कशी येईल याचा प्रयत्न करणे हाच या सर्वांचाही उद्देश होता. मग त्यातही जरा वेगळेपणा येण्यासाठी अत्यंत भेसूर असे चेहेरे दाखवणाऱ्या काही 'रिअॅलिस्टिक' छायाचित्रांनाही प्रसिद्धी मिळायला लागली.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ९

सत्यम् शिवम् सुंदरम् हे शब्द नेमके कुठून आले हे मला माहीत नाही, पण त्या नावाचा सिनेमा येण्याच्या खूप वर्षे आधीपासून ते शब्द प्रचारात आहेत.  कदाचित परमेश्वर हा सत्य आहे, शिव म्हणजे कल्याणकारी मंगलमय असा आहे आणि तो मनमोहक, सुंदर असा आहे अशा अर्थाने ते स्तोत्रांमध्ये म्हंटले गेले असेल. भारतातली प्राचीन काळातली शिल्पकला आणि चित्रकला ही मंदिरांच्या आधारानेच प्रगट होत गेली असावी.  बहुतेक मंदिरांमधल्या मूर्ती पहायला सुंदरच दिसतात, देवीदेवतांची चित्रेसुद्धा सुंदरच असतात असा पायंडाच पूर्वीपासून पडला होता आणि तो आजवर चालत आला आहे. कुठल्या देवाचे खरे रूप कुणी पाहिले आहे? पण परमेश्वर हा निर्गुण निराकार असला तरी त्याची उपासना करण्यासाठी जे सगुण रूप डोळ्यांसमोर आणले जाते ते कलाकारांनी आपल्या कल्पनेमधून ते साकारलेले असते तरी ते नेहमी सुंदरच असते. 

लिओनार्दो दा विंचि आणि मायकेलांजेलो यांच्यासारख्या युरोपातल्या जुन्या काळातल्या कलाकारांनी आपल्या कलाकृतींमध्ये सौंदर्याला महत्व दिले होते आणि त्यात एक उच्च दर्जा स्थापन केला होता. त्यांच्या चित्रकलेचे अनुकरण पुढील काही शतके होत गेले आणि अनेक चित्रकारांनी तशाच प्रकारच्या एकाहून एक सुंदर कलाकृती निर्माण केल्या. पण शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या पाश्चिमात्य कलाकारांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली. जरी वीर सावरकरांनी स्वतंत्रतेला उद्देशून "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते" असे म्हंटले असले तरी या बंडखोर कलाकारांनी मात्र आपल्या कलात्मक स्वातंत्र्यासाठी कलेमध्ये  त्याहून वेगळे असे काही आणणे आवश्यक आहे असे सांगायला सुरुवात केली.  पूर्वीच्या काळात या कलाकांरांचे राजघराण्यातले आश्रयदाते असत त्यांच्या कलाने घेणे आवश्यक होते. पण आर्ट गॅलरीज उघडल्या आणि त्यात सामान्य लोकही  मोठ्या संख्येने येऊन तिथे मांडलेल्या कलाकृती पहायला लागले हे पाहून त्या काळातल्या कलाकारांना नवीन प्रयोग करायचा धीर आला. शिवाय फोटोग्राफी आल्यानंतर हुबेहूब आकृति काढण्याचे महत्व कमी होऊन कल्पनेतून वेगळे काही तरी काढावे असे वाटायला लागले होते. जर प्रत्यक्ष जीवनात गलिच्छपणा आणि ओंगळपणा अस्तित्वात असेल तर तो चित्रांमध्ये का नको? असे म्हणणारे लोक एका दृष्टीने कलेला सत्याच्या जवळच नेत होते. त्यांनी उघडपणे ते दाखवायला सुरुवात केली. पण कला ही मुख्यत्वे कल्पनेची भरारी असते असे म्हणून काही कलाकारांनी त्यांना सुचतील तशा विकृति त्यात घुसवल्या. पुढे पुढे तर मॉडर्न आर्ट किती अनाकलनीय असावी याची चढाओढ सुरु झाली तेंव्हा मात्र ती पूर्णपणे सत्यापासून दूर भरकटत गेली.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १०

कॅमेरा हे एक निर्जीव यंत्र असते, त्याला भावना, बुद्धी वगैरे काही असत नाही. तो खोटे चित्रण करत नाही.  त्याच्या भिंगाच्या समोर जे काही दृष्य असते तेच तो प्रामाणिकपणे फोटोमध्ये उतरवतो. असे असले तरी त्या कॅमेराला हाताळणारे लोक लबाड असू शकतात. जवळच्या गोष्टी मोठ्या दिसतात आणि दूरच्या लहान दिसतात या निसर्गाच्या नियमाचा उपयोग करून घेऊन ते गंमतशीर फोटो काढू शकतात. त्यात कोणी ताजमहालला आपल्या डोक्यावर घेतले आहे, अख्ख्या कुतुबमिनारला तळहातावर तोलून धरले आहे, आ वासून चंद्राला गिळतो आहे किंवा मावळत्या सूर्याला चिमटीत पकडून धरले आहे अशी चित्रे पहायला मिळतात. एक नूर आदमी दस नूर कपडा असे म्हंटले जाते. बहुतेक लोकांना चित्रविचित्र कपडे घासून आपले फोटोकाढून घेण्याची हौस असते.  त्या पोशाखात ते जसे दिसतात तसे ते प्रत्यक्ष आयुष्यात नसतात. जे लोक हिमाचल प्रदेश, गोवा, दार्जिलिंग, स्विट्झर्लंड अशा सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात तिथल्या स्थानिक लोकांचे कपडे घालून आपले फोटो काढून घेतात आणि त्या सहलीची एक वेगळी आठवण आपल्यापाशी ठेवतात. 



कधी कधी आपल्याला दृष्टिभ्रमामुळे जे आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी दिसते. काही हुषार लोक अशा दृष्यांना कॅमेरामध्ये कैद करून किंवा तसे चित्र रंगवून ती दृष्ये लोकांना दाखवतात. या सोबत दिलेल्या एका दृष्यात आपल्याला गणपतीचा भास होत असला तरी ती फक्त नारळाची झाडे आहेत. सतत बदल होत राहणे हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे.  त्यानुसार शहरे, आसमंत आणि माणसांचे चेहेरेही हळूहळू बदलत असतात. फोटोग्राफीची सोय झाल्यामुळे जुन्या आठवणीतली दृष्ये साठवून ठेवून आपण ती कालांतराने पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वीचे पुणे, मुंबईतले रस्ते, इमारती वगैरेंचे फोटो आपल्याला बरेच वेळा पहायला मिळतात आणि आपल्या जन्मापूर्वी ही शहरे कशी होती याचा अंदाज येतो. खाली दिलेल्या फोटोमधले जोडपे आता शंभर वर्षांहून मोठे आहे, ते विशीत असतांना कसे दिसत होते हे त्या फोटोच्या वरच्या भागात दिसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ११

चित्रपटाच्या शोधाने मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाला.  नाटकामधील पात्रे एका वेळी एकाच रंगमंचावर आपला खेळ करू शकत असत आणि फक्त तिथे असलेले प्रेक्षकच ते पाहू शकत असत. रंगमंचावरील पडदे किंवा सेट यामधून एका नाटकात किती वेगवेगळ्या जागा दाखवता येतील आणि एका वेळी किती माणसे स्टेजवर असू शकतील याला मर्यादा असत. तिथे फार कमी घटना प्रत्यक्ष घडतांना दाखवता येत असत. त्यामुळे नाटकाचा सगळा भर संवादावर असायचा. 


चित्रपटांनी या सगळ्या मर्यादा झुगारून दिल्या. त्यांचे शूटिंग निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकाणी करून ती चित्रे नंतर एकत्र आणली जातात. त्यात घोडे दौडतांना, मोटारी पळतांना किंवा विमाने उडतांना दाखवता येतात. माणसांची प्रचंड गर्दी, प्राण्यांचे कळप किंवा पक्ष्यांचे थवे दाखवता येतात. अनेक प्रकारच्या घटना घडत असतांना दाखवता येतात. चेहेऱ्यावर कॅमेरा फोकस करून डोळ्यातून प्रकट होणारे सूक्ष्म हावभावसुद्धा दाखवता येतात. हत्ती, उंट, वाघ, सिंह, सुसरी अशासारख्या ज्या मोठमोठ्या जनावरांना नाटकाच्या रंगमंचावर आणणे शक्य नसते, त्यांना तर सिनेमामध्ये पडद्यावर दाखवता येतेच, बारीक किडामुंग्यांनाही मोठे करून दाखवता येते. इंद्राच्या महालापासून ते शहरातल्या गजबजलेल्या वस्तीपर्यंत कुठल्याही वास्तवातल्या किंवा कल्पनाविलासातल्या जागा आणि तिथे घडणाऱ्या काल्पनिक घटना दाखवता येतात. त्यांना सुमधुर अशा गाण्यांची जोड देता येते.  एकदा तयार केलेल्या फिल्मच्या अनेक प्रती काढून त्या अनेक चित्रपटगृहांमध्ये अनेक वेळा दाखवता येतात. या सगळ्या फायद्यांमुळे नाटके मागे पडत गेली आणि सिनेमांनी त्यांच्यावर मात करून ते अनेकपटीने जास्त पाहिले जाऊ लागले. 


सिनेमाचा दुसरा फायदा असा असतो की  जुन्या झालेल्या फिल्मसुद्धा कित्येक वर्षांनंतरही पुन्हा दाखवता येतात. तोपर्यंत त्यात काम करणारे कलाकार म्हातारे किंवा दिवंगत झाले असले तरी त्यांचे तारुण्यातले सौंदर्य सिनेमाच्या फिल्ममध्ये टिकून राहिलेले असते. सिनेमाच्या पडद्यावर दिसणारे सगळे १००टक्के भासच असतात, तरीही तो पहात असतांना पहाणाऱ्यांना गुंगवून ठेवतात. चित्रपट भास असला तरी तो पहाणाऱ्याच्या मनावर होणारे परिणाम खरे असतात.  काही काही चित्रपट तर जन्मभर लक्षात राहतात. मधुमती हा चित्रपट १९५८ साली प्रकाशित झाला तरी तो पन्नास वर्षांनंतरही मला खडा न खडा आठवत होता आणि अजूनही माझ्या आठवणीत राहिला आहे.

(क्रमशः)

https://anandghan.blogspot.com/2008/04/blog-post_29.html


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १२

पूर्वीच्या काळात प्रवासाची सुलभ साधने कमी होती आणि मध्यमवर्गाकडे ओढाताणीची आर्थिक परिस्थिति होती. अत्यावश्यक काम असेल तरच लोक प्रवास करत असत. अनेक लोकांना पर्यटन हा शब्दच माहीत नसायचा. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे अनुभव विश्व संकुचित असायचे. म्हैसूरची वृंदावन गार्डन किंवा काश्मीरचे सृष्टिसौंदर्य हेसुद्धा प्रत्यक्ष पहायला जाणे अवघड असायचे. परदेशगमन तर फारच कमी लोकांच्या नशीबात  असे. पण वाचनसंस्कृतीचा प्रसार होत असल्यामुळे वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके यामधून जगभरातल्या प्रेक्षणीय स्थळांची रसभरित वर्णने वाचनात येत असत आणि त्यांचेबद्दल कुतुहल वाटत असे. यामुळे हे सगळे अद्भुत वाटणारे वेगळे जग सिनेमाच्या पडद्यावर अगदी स्वस्तात पहायला मिळते याचे अप्रूप वाटत असे. ईव्हनिंग इन पॅरिस, नाइट इन लंडन, लव्ह इन टोकियो अशा नावांमुळेच लोक थेटरांकडे खेचले जात असत.


दूरचित्रवाणी आल्यावर आणखी एक चमत्कार झाला. घरात बसूनच सगळ्या जगाचे दर्शन व्हायला लागले. यात हे सगळे चित्रपट, त्यातली गाणी, निवडक दृष्ये वगैरेही पहायला मिळतातच, तसेच जगभरातल्या बातम्या दाखवल्या जात असतात, त्यांमध्ये तिथला निसर्ग, तिथले रस्ते, घरे, इमारती हे सगळे आपोआप दिसतेच. मुख्य म्हणजे त्यासाठी उठून कुठल्या थेटरात जाण्याची गरज नाही. आता तर अनेक वाहिन्यांवरील टी.व्हीचे प्रक्षेपण चोवीस तास चाललेले असते. त्यात बातम्या, चर्चा, संगीत, नृत्य, खेळांचे सामने अशा अनंत गोष्टी असतात. आपल्याला इच्छा आणि वेळ असेल तेंव्हा टीव्ही सुरु करावा आणि आपल्याला जे आवडते ते पहावे अशी सोय झाली आहे. आपण फक्त एका निर्जीव काचेकडे पहात असतो हे सत्य असले तरी त्यात जे दाखवले जाते ते जीवंत वाटते आणि त्यातला काही भाग खराखुरा आणि काही भाग काल्पनिक असे मिश्रण असते.  

(क्रमशः)  

 

सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १३

मी नोकरीला लागलो तेंव्हा फक्त टी.आय.एफ.आर.सारख्या महत्वाच्या प्रयोगशाळांमध्ये संगणक आला होता. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक रॅक्समध्ये रचून ठेवलेल्या हजारो इलेक्ट्रॉनिक काँपोनंट्समधून तो एक काँप्यूटर होत होता. तेंव्हा मला त्या खोलीत शिरायची परवानगीसुद्धा मिळत नव्हती. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होत आलेल्या प्रगतीमुळे मी रिटायर व्हायच्या आधी चक्क माझ्या घरात एक पर्सनल काँप्यूटर (पीसी) आला आणि मी तो चालवायला लागलो. तसेच त्याच्याबरोबर इंटरनेटही आले. अक्षरे, चित्र आणि ध्वनि या तीन्ही माध्यमांमधून प्रकट होत असलेली माहिती आणि संदेश मला त्यातून मिळायला लागले, इतकेच नव्हे तर मीसुद्धा ते पाठवायला लागलो. सिनेमा किंवा टीव्हीमध्ये इतर काही लोकांनी मिळून तयार केलेले कार्यक्रम मी फक्त प्रेक्षक होऊन पहात होतो. पण  मी स्वतः संगणकावर ब्लॉग लिहून ते इंटरनेटवर पाठवायला लागलो. 


त्याच्या पाठोपाठ स्मार्ट फोन आला आणि या सगळ्या गोष्टी जास्तच सोप्या झाल्या. इतकेच नव्हे तर त्याच्या अंतर्गत एक उत्कृष्ट कॅमेराही आला.  हा तर मी जेथे जातो तेथे माझा सांगाती असल्यामुळे जगभरात कुठेही असलो तरी संपर्कक्षेत्रात रहायला लागलो आहे आणि मला हे संदेश मिळायला लागले आहेत, तसेच मी फोटो काढून तेही पाठवू शकतो.


या आंतर्जालातून एक वेगळेच आभासी जग निर्माण झाले आहे. विशेषतः फेसबुक, वॉट्सॅप आणि यू ट्यूब यांच्यामुळे असंख्य प्रकारच्या निरनिराळ्या मति गुंग करणाऱ्या गोष्टी फारच सहजासहजी उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. लोकांना ते पाहण्याचे वेड किंवा व्यसन लागले आहे. अनेक लोक दिवसातला बराच वेळ खऱ्याखुऱ्या आपल्या माणसांच्या सोबत घालवण्याऐवजी या मायावी विश्वात रमायला लागले आहेत. त्यामुळे नातेसंबंध कमकुवत होत चालले आहेत. खऱ्या जगातले काही लोकसुद्धा अनेक मुखवटे धारण करून वावरत असतातच, या आभासी जगात तर कोण खरी व्यक्ती आहे आणि कोण बनावट किंवा फ्रॉड आहे, कुणावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हेच समजत नाही. ऑन लाइन व्यवहारांमधून कुणाकुणाला कसे आणि किती फसवले याच्या बातम्या रोजच येत असतात.  त्याचबरोबर अनोळखी माणसाशी बोलूसुद्धा नका असे उपदेशही दिले जातात. हे भीतीदायक सगळे वाटते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १४

आपल्या खऱ्या जगामधल्या माणसांचे नाव, गाव, पत्ता यावरून त्यांची ओळख निर्माण होते आणि त्यांची अमोरासमोर भेट होते. आपल्या ओळखीतली अशी अनेक माणसे इंटरनेटच्या आभासी जगातही वावरत असतात, ती आपल्या मित्रांच्या यादीमध्ये असतात आणि आजकाल प्रत्यक्ष भेटींपेक्षा तिथेच त्यांच्या जास्त वेळा भेटी होत असतात. 


पण त्या आभासी जगात त्यांनी कधी कधी यूजर नेम म्हणून स्वेच्छेने वेगळे (खोटे) नाव धारण केले असते किंवा तिथल्या काही नियमांमुळे त्यांना ते करावे लागते. आभासी विश्वाला सायबर स्पेस असे म्हंटले जाते आणि तिथल्या जागांना वेबसाइट म्हणतात, पण त्यांना पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारखे भौगोलिक अस्तित्व नसते किंवा त्या स्पेस म्हणजे अवकाशात नसतात. ज्या मोठमोठ्या कंपन्यांनी हे वैश्विक महाजाल तयार करण्यात पुढाकार घेतला त्यांनी जगभरात ठिकठिकाणी स्थापन केलेल्या अजस्त्र संगणकांमधल्याच कुठल्या तरी सर्व्हरमध्ये त्या वसत असाव्यात असे मला वाटते. या प्रत्येक वेबसाइटला एक पत्ता असतो. ईमेल प्रोव्हाइडर्स किंवा फेसबुकसारख्या संस्था जगातील कोट्यावधी लोकांना त्यांच्या वेबसाइटवरच  अगदी फुकटात एकेक कप्पा देतात, त्या कप्प्यालाही वेगळा पत्ता मिळतो.  या वेब स्पेसमध्ये डोमेन नावाची जागा भाड्याने घेऊन तिथे आपली स्वतःची वेबसाइट बांधता येते आणि तिला एक वेगळा पत्ता मिळतो.  तो कप्पा किंवा ती साइट नेमकी कुठल्या सर्व्हरमध्ये असते ते त्या माणसालाही कधीच समजत नसते, तरीही तो आपल्या घरी बसूनच तिचा उपयोग करून घेऊ शकतो. प्रत्येक संगणकाला आयपी अॅड्रेस नावाचा एक पत्ता असतो त्याची नोंद कुठेतरी केली जात असते आणि त्या माणसाला येणारे संदेश त्या पत्त्यावर जाऊन पोचतात. आज या जगात सुमारे दोन अब्ज वेबसाइट आहेत आणि सुमारे पाच अब्ज लोक त्यांचा वापर करत असतात.


आपल्या खऱ्या जगातल्या कुणी दुसऱ्या कुणाला पत्र लिहून ते पोस्टाच्या पेटीत टाकले तर कितीही सक्षम पोस्ट खाते असले तरी ते पत्र त्या दुसऱ्या माणसाच्या हातात पडायला काही दिवस लागतात, पण आपण पाठवलेली ईमेल या आभासी जगातल्या पाच अब्ज लोकांपैकी नेमक्या आपल्याला हवे असलेल्या माणसांच्या टपाल पेटीत जाऊन पडायला काही सेकंद पुरेसे असतात. असे काही होऊ शकेल असे कुणी २५-३० वर्षांपूर्वी सांगितले असते तर ते कुणालाही खरे वाटले नसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १५

मी लहानपणी अल्लाउद्दिनच्या जादूच्या दिव्याची गोष्ट ऐकली होती तेंव्हा तीसुद्धा मला खरीच वाटली होती. आपल्यालाही असा एखादा दिवा मिळावा  म्हणजे त्याला घासल्यावर त्यातून बाहेर आलेल्या जिन्नला सांगितले की आपल्याला हव्या असतील त्या वस्तू तो आणून देईल असे वाटले होते. पण खऱ्या जगात तसे काही असत नाही, आपल्याला हवे असलेल्या वस्तू स्वतःच परिश्रम करून मिळवाव्या लागतात याची जाणीव झाली. पूर्वी वस्तूच काय, माहितीसुद्धा सहजासहजी मिळत नसे. पुढे निरनिराळी जाडजूड पुस्तके आधी शोधून काढायची, मग  ती वाचून त्यातली माहिती मिळवायची आणि ती आपल्या वहीत लिहून काढायची हे करण्यात माझा सगळा जन्म गेला. अनेक वेळा इतर लोकांनी अशा प्रकारे जमवलेली माहिती त्यांच्या व्याख्यानांमधून किंवा लेखांमधून मिळत असे तीही टिपून ठेवावी लागत असे. आपल्याला हवी असेल ती माहिती लगेच मिळवण्याचे काही सोपे साधन नव्हते आणि कधी तरी ते उपलब्ध होऊ शकेल असेही वाटले नव्हते.


एका संगणकातली माहिती दुसऱ्या संगणकाकडे कशी पोचवायची यावर संशोधन करत असतांनाच नेटवर्किंग करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. पुढे त्याचा जगभर विस्तार करून इंटरनेटचा शोध लावला गेला. या महाजालावर असंख्य प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी ती आपल्याला कोण देणार हा मोठा प्रश्न होताच. मग काही हुषार लोकांनी सर्च इंजिनांचा शोध लावला आणि ती इंजिने सगळ्या पब्लिकला फुकट उपलब्ध करून दिली.  या इंजिनांच्या चढाओढीत गूगलने बाजी मारली आणि ते इतके लोकप्रिय झाले की आंतर्जालावर माहिती शोधणे या अर्थाचे गूगलणे हे क्रियापद तयार झाले आहे.

गूगल नावाचा हा ब्रह्मराक्षस खरोखरच अल्लाउद्दिनच्या जिन्नसारखा महापराक्रमी आहे. त्याला नुसता एक शब्द सांगितला तरी तो शब्द  वेबस्पेसमधल्या कुठकुठल्या लेखात आला असेल त्या सगळ्या लेखांचे पत्ते निमिषार्धातआणून देतो. मग ते लेख वाचून त्यातून आपल्याला हवी असेल ती माहिती मिळवावी आणि आपल्या संगणकावरच साठवून ठेवावी किंवा आणखी कुणाला ती पुरवावी हे आता किती सोपे झाले आहे.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १६

पुराणकाळात एक विश्वामित्र नावाचे महर्षि होऊन गेले.  पुराणातले देव आणि दानव तर अनेक प्रकारचे चमत्कार करू शकत असतच, या ऋषींनीही  घोर तपश्चर्या करून अद्भुत सामर्थ्य प्राप्त करून घेतले होते. त्रिशंकु नावाच्या एका राजाला जिवंतपणीच स्वर्गात जायचे होते. त्याने विश्वामित्र ऋषींना शरण जाऊन आपली मनोकामना सांगितली.  विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी एक विशेष यज्ञ करून असे सामर्थ्य मिळवले त्यातून त्याला रॉकेटसारखे आकाशात उडवून दिले आणि त्याची स्वर्गाकडे रवानगी केली. पण स्वर्गाचा राजा इंद्र त्रिशंकूला स्वर्गात घ्यायला तयार नव्हता. त्याने त्रिशंकूला वरून खाली ढकलून दिले, पण विश्वामित्राने लावलेला जोर त्याला पृथ्वीवर येऊन खाली पडू देत नव्हता. त्यामुळे तो आकाशात अधांतरीच लटकत राहिला. मग विश्वामित्राने त्या त्रिशंकूसाठी त्याच्या आजूबाजूला एक प्रतिश्रृष्टी तयार करून दिली. त्याला लागणारे खाणेपिणे आणि इतर सगळ्या वस्तू त्याला तिथे बसून मिळायला लागल्या.


अल्लाउद्दिनच्या जिन्नसारखा महापराक्रमी गूगल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या सगळ्या कोठारांच्या चाव्या आणून देतो, पण त्यातली कोठारे उघडून तिथे असलेली माहिती आपणच गोळा करायची असते.  त्यातली कुठली माहिती खरी आहे, कुठली भ्रामक आहे, कुठली मार्गदर्शक आहे, कुठली दिशाभूल करणारी आहे हे आपणच ठरवायचे असते आणि त्यानुसार तिचा उपयोग करून घ्यायचा असतो.


त्यानंतर आलेल्या एआयने याच्या पुढची पायरी गाठली आहे. ते वापरून काम करणारे आधुनिक विश्वामित्र फक्त माहिती मिळवून थांबत नाहीत तर तिचा उपयोग करून तुम्हाला हवा असेल तसा लेख, कविता किंवा कथा लिहून देतात, तुम्ही सांगाल तसे चित्र काढून देतात, गाण्याला चाल लावून तशी रील तयार करून देतात. ते  एक प्रकारचे प्रतिविश्व निर्माण करायला लागले आहेत. ते लोकही अजून नवखे असल्यामुळे त्यांच्या कामात कधीकधी चुका होतात, पण लवकरच ते सगळ्या जगाचा विश्वास संपादन करतील असे सांगितले जात आहे.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १७

अलीबाबा आणि चाळीस चोरांच्या गोष्टीतल्या गुहेला जादूचा दरवाजा होता. "खुल जा सिमसिम" असा मंत्र म्हंटल्यावर तो आपोआप उघडत असे आणि दुसरा एक मंत्र म्हंटला की तो आपोआप बंद होत असे. एरवी कुणीही कितीही जोर लावून तो दरवाजा उघडू किंवा बंद करू शकत नसे. लहानपणी ही गोष्ट ऐकतांना त्याची खूप मजा वाटत असे.


संत ज्ञानेश्वरांची एक आख्यायिका सांगितली जाते. त्यात एकदा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका कट्ट्यावर किंवा अर्धवट बांधलेल्या भिंतीवर सकाळचे कोवळे ऊन खात बसले असतांना समोरून महायोगी चांगदेव महाराजांचे आगमन होतांना त्यांना दिसले. हे योगीराज एका वाघावर आरूढ झाले होते आणि त्यांचे हजारो शिष्यगण त्यांचा जयजयकार करत त्यांच्यासोबत चालत येत होते. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला आज्ञा केली की चल, आपण पुढे जाऊन त्यांचे स्वागत करू आणि ती भिंत चालायला लागली. चांगदेवांने पाहिले की आपण सजीव वाघावर ताबा मिळवला असला तर हे महात्मे निर्जीव भिंतीला चालवत घेऊन येत आहेत. त्याचा सगळा ताठा तत्काळ गळून पडला आणि त्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले.


मी अणुशक्ती खात्यात नोकरीला लागल्यानंतर जे पहिलेच काम माझ्यावर सोपवण्यात आले त्यात एक सहा मीटर उंच, चार मीटर रुंद आणि एक मीटर जाड असा अजस्त्र आकाराचा दरवाजा तयार करून घ्यायचा होता. दोनतीन सेंटिमीटर जाड पोलादी पत्र्यांचे तुकडे कापून आणि त्यांना पुन्हा वेल्डिंगने जोडून एक इतका मोठा रिकामा डबा तयार करायचा होता आणि त्याच्या तळाशी चाके आणि काही यंत्रसामुग्री जोडायची होती. ती सगळी त्या डब्याच्या आतच बसवली होती. कोटा इथे बांधल्या जात असलेल्या आमच्या अणुविद्युतकेंद्रात या दरवाजाला उभे केल्यानंतर तो सिमेंट काँक्रीटने भरला गेला. तो दरवाजा म्हणजे एका भिंतीचा भाग होता आणि भिंतीसारखाच दिसत होता. त्याच्यापासून काही अंतरावर एका सुरक्षित जागी ठेवलेल्या पॅनेलवरील एक बटन दाबले की तो दरवाजा किंवा ती भिंत दोन मीटर मागे सरकून एका व्हॉल्टमध्ये जायचा मार्ग मोकळा करून देत असे. एक अजस्त्र आकाराचे यंत्र त्यातून व्हॉल्टच्या आत गेल्यावर पॅनेलवरील दुसरे बटन दाबले की ती भिंत पुढे सरकून ती मोकळी जागा भरून टाकत असे.  सगळी यंत्रसामुग्री अंतर्गत असल्यामुळे बाहेरून पहाणाऱ्याला असेच वाटायचे की ती भिंत स्वतःच चालत असावी.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १८

मी कॉलेजात शिकत असतांनाच ऐकले होते की जर्मनी जपानमध्ये कारखान्यातली काही कामे कामगार न करता रोबो करतात. रोबोसाठी मराठीमध्ये यंत्रमानव हा शब्द वापरला जातो. पण त्याला माणसासारखे हातपाय, नाकतोंड, कान आणि डोळे असायलाच हवेत असे काही नाही हे मला नंतर समजले. त्या काळातच मी जे कारखाने पाहिले त्यात काही ठिकाणी ऑटोमॅटिक यंत्रे होती. त्यांना एक प्रोग्रॅम दिला की ती ते ठराविक काम आपल्याआप करून तंतोतंत एकासारखे एक अनेक पार्ट धडाधड तयार करत असत. नंतरच्या काळात अशी यंत्रे अधिकाधिक प्रमाणात तयार होत गेली आणि आता पारंपरिक साधी यंत्रेच दुर्मिळ झाली आहेत. आमच्या अणुभट्टीमध्ये तीव्र विकिरण (रेडिएशन) होत असल्यामुळे तिथल्या काही भागात मानवी कामगार जाऊच शकत नाही. अशा ठिकाणची यंत्रे दुरूनच म्हणजे कंट्रोल रूममधून चालवावी लागतात.  ती डिझाइन करून तयार करवून घेणे हेच काम माझ्याकडे होते. ते सगळे आपोआप चालणारे रोबोच होते. ते अशा प्रकारच्या हालचाली करायचे की त्यांना पाहून ते सजीव आहेत की काय अशी शंका यावी.


अलीकडच्या काळात हुबेहूब माणसासारखे दिसणारे, चालणारे आणि बोलणारे रोबो तयार होत आहेत. केरळमधल्या शाळेत अशी एक शिक्षिका मुलांना शिकवण्याचे काम करते असा व्हीडिओ प्रसृत झाला होता.  इतर कामे करणारे रोबोही तयार झाले आहेत आणि होत राहतील. कपड्यांच्या दुकानांमध्ये हुबेहूब माणसांसारखे दिसणारे पुतळे तर सर्रास असतात, यापुढे ते ग्राहकांशी बोलायलाही लागतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि यंत्रमानवशास्त्र (रोबोटिक्स) यांच्या संयोगातून पुढे कशा प्रकारची खोटी माणसे तयार होतील आणि ती या जगातल्या खऱ्या लोकांमध्ये बेमालुम मिसळून काय काय गोंधळ घालतील याची चिंता वाटायला लागली आहे.


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १९

माणसाला जी बुद्धिमत्ता मिळाली आहे त्यात आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती हे मुख्य भाग आहेत. माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रियांकडून सतत कोणते ना कोणते संदेश मिळत असतात. डोळ्यांनी पाहिलेली दृष्ये किंवा अक्षरे, कानावर पडलेले स्वर किंवा शब्द, जिभेला मिळालेली चव, नाकाने घेतलेले वास आणि त्वचेला झालेले स्पर्श या सारखे असंख्य संदेश क्षणोक्षणी त्याच्या अफाट स्मरणात साठवले जातात आणि पुन्हा तशा प्रकारचा संदेश आला की पूर्वीच्या अनुभवांची आठवण आपोआप जागी होते. यावरूनच त्याला परिस्थितीचे आणि घटनांचे आकलन होत असते. 


त्याला कुठलीही घटना नेहमीपेक्षा वेगळी वाटली तर तो तिकडे जास्तच लक्ष देऊन पाहतो, कान टवकारून ऐकतो, चौकशी करतो आणि ती घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ती आपले नातेवाईक, शेजारी, मित्र वगैरेंना सांगतो, कधीकधी तर अनोळखी लोकांना सुद्धा सांगतो. ते लोक ती गोष्ट तिखटमीठ लावून आणखी अधिक लोकांना सांगतात. यामधूनच ती बातमी पसरत जाते. त्यातला बराचसा भाग खरा असला तरी  कधी कधी दिसते तसे नसते यातून होणाऱ्या गैरसमजामुळे किंवा सांगण्यातल्या ऐकण्यातल्या चुकीमुळे त्यात फरक पडत जातो आणि काही लोक  जाणून बुजून मुद्दाम खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत असतात.  या सगळ्यांमुळे मौखिक माध्यमातून पसरणाऱ्या ऐकीव माहितीत सत्य आणि असत्य याची सरमिसळ असते.  प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार त्यातले काय समजण्यासारखे आणि किती पटण्यासारखे आहे हे ठरवत असतो. प्रत्येकाने ते करायला हवे. कुणीही काहीही सांगितले तर त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये. पण पूर्णपणे तसे होत नाही असे दिसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २०

पूर्वीच्या काळात जेंव्हा काही महत्वाचे कारण असेल तेंव्हा राजाचा शिपाई गावागावांमध्ये जाऊन दवंडी पिटत असे.  तो चौकात उभारून आपल्याकडच्या वाद्यातून ढण् ढण् असा आवाज काढून लोकांना  गोळा करत असे आणि चार लोक जमले की "ऐका हो ऐका" अशी सुरुवात करून बातमी, संदेश किंवा सूचना जोरात ओरडून सांगत असे. ग्रामपंचायत आणि नगरपालिकासुद्धा दवंड्या पिटत असत. आता पद्धत थोडी बदलली आहे. आमच्या हिंजवडी ग्रामपंचायतीची व्हॅन गावभर फिरते आणि त्यात बसलेला माणूस लाउडस्पीकरवरून अनाउन्समेंट करत असतो.


छापखान्यांचा प्रसार झाल्यानंतर कुठलीही माहिती, विचार आणि कल्पना कागदावर छापून आणि त्याच्या अनेक प्रती काढून त्या अनेक वाचकांपर्यंत पोचवण्याची सोय झाली. काही लोक छापील पत्रके वाटून आपले विचार जनतेपर्यंत पोचवायला आणि त्यांना काही कृति करायचे आवाहन करायला लागले. रोजच्या रोज कुठे काय घडते याची बातमी छापून तिचा प्रसार करण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे निघाली. त्यात स्थानिक बातम्यांशिवाय जिल्ह्यात, राज्यात, देशात, परदेशात आणि अगदी अंतरिक्षात घडणाऱ्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली जायला लागली. जसजसे लोकांचे भूगोलाचे ज्ञान वाढत गेले तसतसे लोकांना आपल्या परिसराच्या बाहेर कुठे काय चालले आहे हे समजून घेण्याची उत्सुकता वाढत गेली. त्यातून वर्तमानपत्रे लोकप्रिय होत गेली.


पण रोज कुठे तरी खूप महत्वाची घटना घडतेच असे नाही. पण जी बातमी असेल तिला आकर्षक मथळा देऊन सनसनाटी करायचे तंत्र निघाले. त्याशिवाय लोकांनी आपले वर्तमानपत्र विकत घेऊन वाचावे यासाठी  बातम्यांबरोबरच अग्रलेख, व्यंगचित्रे, विनोदी चुटकुले, माहितीपूर्ण किंवा मनोरंजक लेख, राशी भविष्य, शब्दकोडे वगैरेंची खोगिरभरती होत गेली. अनेक वस्तूंच्या जाहिराती छापून यायला लागल्या. आम्ही खरे तेच छापतो असे बहुतेक सगळे वर्तमानपत्रवाले पूर्वीपासून सांगत आले आहेत आणि बहुतेक लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण बहुतेक वर्तमानपत्रे चालवणारा एक वर्ग असतो. त्याचे काही राजकीय व सामाजिक विचार आणि हितसंबंध असतात.  त्या वर्तमानपत्रातल्या मजकुरावर त्यांची छाप पडत असते. आजकाल नॅरेटिव्ह या नावाची अर्धसत्ये सांगितली जातात. त्यात काही भाग खरा असला तरी त्यावर वेगळे रंग चढवलेले दिसतात.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २१

ब्रिटिशांच्या काळातच त्यांनी मुंबईसारख्या महानगरांमध्ये रेडिओ स्टेशन्स सुरू केले होते. गुरुदेव टागोरांनी त्याला आकाशवाणी असे नाव दिले. पुराणातल्या कथांमध्ये आकाशवाणीमधून प्रत्यक्ष देवच काहीतरी सांगत असे.  ते १००% सत्य असणार यात काही शंकाच नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुणे, नागपूर, सांगली यासारख्या अनेक शहरांमधून आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. त्यात बातम्यांना खूप महत्व होते. एखादी घटना घडल्यानंतर त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून ते वर्तमानपत्र लहान लहान गावापर्यंत पोचेपर्यंत दोन तीन दिवस उलटून जायचे. रेडिओवरील बातम्या त्याच्या आधी पोचायच्या. या कारणामुळे माझ्यासारखे रोज पेपर वाचणारे लोकसुद्धा रोज आवर्जून रेडिओवरच्या बातम्या ऐकत असत. १९७०च्या दशकात दूरदर्शन आल्यानंतरही काही वर्षे आम्ही रोज रेडिओ ऐकत होतो. हळू हळू ते कमी होऊन बंद झाले. पण अजूनही आकाशवाणी सुरू आहे आणि ती ऐकणारे श्रोते आहेत.


आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बातम्या सांगणाऱ्या व्यक्ती एका काळी स्टार असायच्या. त्यांनी सांगितलेल्या बातम्या विश्वसनीय असायच्या.  हे दोन्ही केंद्रे सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या बातम्यांवर काही बंधने असली, त्यात मोघमपणा असला तरी त्यात ठरवून केलेला खोटेपणा नसायचा. नंतरच्या काळात असंख्य खाजगी चॅनेल्स निघाली, त्यातली काही तर चोवीस तास फक्त बातम्याच प्रसारित करणारी आहेत.  त्यामुळे प्रेक्षकांना बातम्यांचे भरपूर वैविध्य मिळाले आहे. पण प्रत्येक वाहिनी चालवणाऱ्या लोकांचे विचार आणि हितसंबंध यामुळे  यात इतका गोंधळ आणि गोंगाट सुरू झाला आहे की शिरा ताणून तावातावाने भांडणाऱ्या लोकांमधल्या कुणाचे सांगणे खरे आहे आणि कुणाचे नाही हेच समजत नाही. त्यामुळे कंटाळून मी त्यांच्या बातम्या पाहणे सोडून दिले आहे.  

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २२

अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही समांतर मार्गांवरून जाणारे वाटसरू आपण सत्याचा शोध घेत आहोत असेच सांगतात. अध्यात्मामध्ये उच्च पातळीवर जाऊन पोचलेल्या ऋषिमुनींनी  "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या।" असा एका वाक्यात निर्णय देऊन टाकला आहे. पण हे जगच मिथ्या असेल तर त्यातल्या आपल्याला जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त आपल्याला होणारे भास असतात  हा विचार पचनी पडणे फारच कठीण आहे, हे सर्वसामान्य माणसाच्या कुवतीपलीकडचे आहे. 

विज्ञान मात्र आपल्या विश्वातल्याच निरनिराळ्या गोष्टींची अधिकाधिक माहिती मिळवून पुढे पुढे जाते आणि त्या माहितीच्या आधाराने विकसित होत जाणारे तंत्रज्ञान नवी नवी साधने तयार करायला मदत करते. जसजसे नवे शोध लागतात आणि नव्या तंत्रज्ञानाने नव्या गोष्टी समोर येतात तसतसे आपल्या सत्याबद्दलच्या जुन्या कल्पना कशा बदलत जातात याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेख मालिकेत केला आहे.


विज्ञानाच्या जगात काही भिन्न प्रवाह निर्माण होऊन त्यातून तात्विक वाद निर्माण झाले यावर मी "विज्ञानातले द्वैत आणि अद्वैत" ही मालिका लिहिली होती. त्याला पूरक असे मुद्दे घेऊन ही मालिका सुरू केली आणि तिचा विस्तार होत गेला. आधीच्या मालिकेतले लेख एकत्र करून या ब्लॉगवर दिले आहेत.

https://anandghan.blogspot.com/2024/12/blog-post.html


(समाप्त)




No comments: