Wednesday, July 14, 2010

मराठी गाणी भाग १

अभंग, आरत्या, ओव्या, लावण्या, पोवाडे वगैरे विविध पध्दतींची अगणित मराठी गाणी गेली काही शतके गायली जात आहेत. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत मराठी नाटके रंगभूमीवर आळी आणि त्यांनी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. सन १८८० साली रचलेल्या शाकुंतल नाटकातली पंचतुंड नररुंडमालधर ही नांदी आजही गायिली जाते. सौभद्र, मानापमान, स्वयंवर, शारदा वगैरे नाटकांमधली अप्रतिम गीते जेंव्हा पहिल्यांदा रंगमंचावर सादर केली जात होती त्या काळातल्या मूळ गायकांच्या तोंडून माझ्या आजोबांच्या पिढीमधल्या लोकांनी ती ऐकली असतील. त्यानंतर माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि पुढच्या पिढीनेही आपापल्या काळातील सर्वात लोकप्रिय गायक गायिकांकडून ती ऐकली आहेत. आता प्रथमेश, मुग्धा आणि कार्तिकीसारखे लिट्ल् चँप्ससुध्दा ही गाणी गात आहेत आणि माझ्या नातवंडांच्या पिढीमधली मुले ती तल्लीन होऊन ऐकतांना दिसतात. कै.वसंतराव देशपांडे आणि पं.भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांपासून ते लिट्ल् चँपपर्यंत अनेक गायक गायिकांनी ही गाणी गायिलेली मी प्रत्यक्ष तसेच दूरचित्रवाणीवर पाहिली आणि ऐकली आहेत. एकाद्या चांगल्या कलाकाराचे नांव झाले की त्यानंतर तो सहसा दुस-यांनी गायिलेली गाणी गात नाही असा साधारण रिवाज असला तरी जुन्या नाटकामधील पदे त्याला अपवाद आहेत.

यातली सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल वगैरे नाटके पौराणिक कथांवर रचलेली आहेत, तर शाकुंतल आणि मृच्छकटिकासारखी जुन्या संस्कृत नाटकांवरून घेतली आहेत. मानापमान, संशयकल्लोळ यासारखी नाटकेसुध्दा एका जुन्या काल्पनिक काळातल्या समाजातील पात्रांवर रचली आहेत. यातल्या कुठल्याच नाटकात शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळातल्या समाजाचे प्रत्यक्ष चित्रण नाही. त्या नाटकांमध्ये घडतांना दाखवलेल्या घटना त्या जमान्यातसुध्दा वास्तविक वाटत नसतील. तरी जुन्या दाखल्यावरून तत्कालीन समाजावर केलेले अप्रत्यक्ष भाष्य, विनोदातून काढलेले चिमटे, संभाषणातून ओढलेले आसूड वगैरे त्या काळात अपील होत असतील. पण आता तर समाजरचनेत आमूलाग्र बदल झाला आहे आणि बदललेल्या परिस्थितीत त्या गोष्टींना पूर्वी इतके महत्व राहिलेले नाही. त्यामुळे या नाटकांचे प्रयोग क्वचितच होतात, ते झाले तरी संक्षिप्त स्वरूपात असतात आणि मोजके अभ्यासू किंवा दर्दी प्रेक्षकच ते पाहतात. रात्रभर रंगणारे संपूर्ण नाटक पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात काही आला नाही. या नाटकांमधील वेगवेगळ्या प्रसंगांचे तुकडेच मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहिले आहेत. इतर अनेक लोकांनी कदाचित ते सुध्दा पाहिले नसतील. त्या नाटकात कोणकोणती मुख्य पात्रे आहेत, त्यातल्या कोणत्या पात्राने कोणत्या प्रसंगी कोणाला उद्देशून कोणते गाणे का म्हंटले आहे वगैरे पार्श्वभूमी त्यांना ठाऊकच नसते. असे असतांनासुध्दा अशी आपल्याला रिलेव्हंट न वाटणारी ही गाणी शंभर वर्षांइतका काळ टिकून राहिली आहेत. अर्थातच हा त्यातल्या दिव्य संगीताचाच प्रभाव असणार.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस आणि वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला आलेली शाकुंतल (१८८०), सोभद्र (१८८२), मृच्छकटिक(१८८९), शारदा (१८९९), मूकनायक(१९०१), मानापमान(१९११), विद्याहरण(१९१३), स्वयंवर(१९१६) आणि संशकल्लोळ(१९१६) ही सर्व नाटके मी वर दिलेल्या प्रकारातली आहेत. यातल्या घटना रोजच्या पहाण्यातल्या वाटत नाहीत. यातली संस्कृतप्रचुर मराठी भाषा ओळखीची वाटत नाही. पण यातली गाणी मात्र ऐकावीशी वाटतात. त्यातील कांही गाणी सरळ सरळ शास्त्रीय संगीतातील बंदिशींवर आधारलेली आहेत आणि छोटा ख्याल गायनासारख्याच पध्दतीने सादर केली जातात. इतर गाणीसुध्दा ठराविक तालावर आणि रागदारीतील सुरांनुसारच गायिली जातात. शास्त्रीय गायनात अनेक वेळा त्या बंदिशीमधील शब्द समजतच नाहीत किंवा त्यांचा अर्थ लागत नाही. नाट्यसंगीतातले शब्द लक्ष देऊन ऐकल्यास समजतात आणि त्यांचा साधारण अर्थ लागतो, पण संदर्भ न लागल्यामुळे तो पूर्णपणे ध्यानात येत नाही. पण तरीसुध्दा ती श्रवणीयच वाटतात.

या गीतामध्ये अनेक प्रकारचे भाव आहेत. पंचतुंडनररुंडमालधर, नमन नटवरा विस्मयकारा, राधाधरमधुमिलिंद जयजय, भाली चंद्र असे धरिला ही गाणी ईशस्तवनाची आहेत. हृदयी धरा हा बोध खरा, हा नाद सोड सोड वगैरे बोधप्रद आहेत, नभ मेघांनी आक्रमिले, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा, रजनीनाथ हा नभी उगवला, चंद्रिका ही जणू, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला या गाण्यात निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे, प्रेमभावे जीव जगी या नटला, प्रेमसेवाशरण, बाळपणीचा काल सुखाचा या गाण्यात जीवनातली तत्वे मांडली आहेत. या गाण्यांचे विषय कालातीत आहेत. त्यासाठी नाटकाची गोष्ट माहीत नसली तरी चालते. इतर बहुतेक गाणी प्रेमाचे अनेक रंग दाखवणारी आहेत. उत्कट प्रेम, विरह, व्याकुळता, स्तुती, समजूत काढणे, लटका कोप, थट्टा वगैरे त्याची अनेक रूपे त्या गाण्यांच्या शब्दात आहेतच. त्यांना लावलेल्या चालींमध्ये ते भाव उतरले आहेत. यामुळे ते भाव कोणाच्या मनात आणि कोणाविषयी प्रगट झाले आहेत याला फार महत्व नाही. माझ्या माहितीनुसार किंवा मी ऐकलेली आणि माझ्या लक्षात राहिलेली या काळातील कांही गाणी खाली दिली आहेत. त्यावर एक नजर टाकल्यास मला काय सांगायचे आहे ते लक्षात येईल.

१८८० शाकुंतल
पंचतुंडनररुंडमालधर
... लाविली थंड उटी वाळ्याची

१८८२ सौभद्र
अरसिक किती हा शेला
... कोण तुजसम सांग गुरुराया
... नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा
... नभ मेघांनी आक्रमिले
... पांडुनृपती जनक जया
... प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा
... बलसागर तुम्ही वीरशिरोमणी
... बहुत छळियले नाथा
... बहुत दिन नच भेटलो सुंदरीला
... राधाधरमधुमिलिंद जयजय
... लग्नाला जातो मी द्वारकापुरा
... वद जाउ कुणाला शरण

१८८९ मृच्छकटिक
तेचि पुरुष दैवाचे
... माडिवरी चल गं सखी
... रजनीनाथ हा नभी उगवला
... सखे शशिवदने


१८९९ शारदा
घेउन ये पंखा वाळ्याचा
... जठरानल शमवाया नीचा का न भक्षिसी गोमय ताजे
... अजुनि खुळा हा नाद पुरेसा
... कधि करिशी लग्न माझे
... बघुनि त्या भयंकर भूता
... बाळपणीचा काल सुखाचा
... बिंबाधरा मधुरा
... मज गमे ऐसा जनक जो
... मूर्तीमंत भीती उभी मजसमोर राहिली
... म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान
... सुंदर खाशी सुबक ठेंगणी
... श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता

१९०१ मूकनायक
उगीच कां कांता

१९११ मानापमान
करा तो प्रेमा ना धरी लोभ मनी
... चंद्रिका ही जणू
... दे हाता शरणागता
... धनराशी जाता मूढापाशी
... धिःकार मन साहिना
...नमन नटवरा विस्मयकारा
...नयने लाजवीत
... नाही मी बोलत आता
... प्रेमभावे जीव जगी या नटला
... प्रेमसेवाशरण
... भाली चंद्र असे धरिला
... मला मदन भासे हा मोही जना
.. .माता दिसली समरी विहरत
... मी अधना न शिवे भीती मला
... या नवनवलनयनोत्सवा
.. आले युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम ते
... रवि मी चंद्र कसा
... शूरा मी वंदिले
... अरसिक हा शेला, सवतचि भासे मला

१९१३ विद्याहरण
मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला
... मधुमधुरा तव गिरा मोहना
... लोळत कच मुखमधुवरी
... सुरसुखखनि तू विमला


१९१६ स्वयंवर
अनृतचि गोपाला
... एकला नयनाला विषय तो जाहला
... करिन यदुमनी यदना
... नरवर कृष्णासमान
... नाथ हा माझा मोही मना
... नृपकन्या तव जाया
... मम आत्मा गमला
... मम मनी कृष्ण सखा रमला
... रूपबली तो नरशार्दूल साचा
... सुजन कसा मन चोरी
... स्वकुलतारकसुता

१९१६ संशयकल्लोळ
कर हा करी धरिला शुभांगी
... कुटिल हेतु तुझा फसला
... धन्य आनंददिन
... मजवरी तयांचे प्रेम खरे
... मानिली आपुली तुजसी
... मृगनयना रसिकमोहिनी
... सुकांत चंद्रानना पातली
... संशय का मनी आला
... हा नाद सोड सोड
... ही बहु चपल वारांगना
... हृदयी धरा हा बोध खरा

No comments: