Thursday, February 26, 2015

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन (पूर्वार्ध)

"हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिल को बहलाने को ‘गालिब' ये खयाल अच्छा है।" असा मिर्झा गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे. या बाबतीतले माझे मतही फारसे वेगळे नाही. सौंदर्य, सुख, आनंद वगैरेची अगदी परिसीमा ज्या ठिकाणी असते ती जागा' म्हणजे 'स्वर्ग' अशी स्वर्गाची व्याख्या किंवा संकल्पना आहे. असा एक अद्भुत स्वर्गलोक आकाशात कुठेतरी असेल असे मला मुळीच वाटत नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागा असोत, आश्चर्यचकित करणारी मानवनिर्मित स्थळे असोत किंवा माणसांनी आपल्या चांगल्या वागणुकीमधून घरातच निर्माण केलेले आनंदी वातावरण असो, या सगळ्या सुंदर आणि आनंददायी जागा आपल्या पृथ्वीवरच असतात, आपल्याला त्या पहायच्या किंवा घडवायच्या असतात अशी माझी स्वर्गाची कल्पना आहे. जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्ती, मोक्ष वगैरेंचे मला कधीच कणभरही आकर्षण वाटले नाही, त्यामुळे मला आध्यात्माची गोडी लागली नाही. पण असे असले तरी मला भजनकीर्तनाचे वावडेही नाही. भक्तीरसात ओथंबलेली मधुर गीते किंवा टाळमृदुंगाच्या तालावर गायिलेले अभंग ऐकणे मला मनापासून आवडते. चांगल्या कीर्तकारांनी केलेले कथानकाचे रसाळ वर्णन हा उत्कृष्ट प्रकारच्या कथाकथनाचा (स्टोरीटेलिंगचा) नमूना आहे आणि ते कानावर पडले तर ऐकत बसावे असे मला वाटते. कीर्तनातली कथा खरी आहे की काल्पनिक वगैरेंचा विचार करून मी त्यातली मजा घालवत नाही. मजेदार कथानक, चटपटीत संवाद, त्यांचे उत्तम सादरीकरण, मध्येच कर्णमधुर संगीत, एकादा मुद्दा पटवून देण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी पारंपरिक कीर्तनात असतात. याच प्रकारच्या गोष्टीसाठी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतोच ना? शिवाय कीर्तनांमध्ये मनोरंजनाबरोबरच ज्ञानामृतही मिळते.

दहा पंधरा वर्षांपूर्वी टीव्हीवर एका विशिष्ट वेळेला ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन लागत असे. त्या वेळी मी घरी असलो तर तो कार्यक्रम पहात आणि ऐकत असे. काही लोकांना हे पाहून त्याचे आश्चर्य वाटायचे. या निमित्याने देवाचे नामस्मरण माझ्या कानावर पडेल आणि त्यातून माझा उद्धार होईल किंवा मी सन्मार्गाला लागेन असेही कदाचित काहीजणांना वाटत असे. तसा मी काही कुठल्याही वाईट मार्गाला लागलो नव्हतो किंवा पापाच्या राशी जोडत नव्हतो, पण उपासतापास, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरे मार्गाने पुण्य जोडायचा प्रयत्नही करत नव्हतो. सरळ मार्गाने चालून आपली नोकरी, कुटुंब, समाज वगैरेंसाठी माझी जी काही कर्तव्ये आणि जबाबदा-या आहेत त्या पार पाडायचा मी प्रयत्न करत असे आणि करत आलो आहे. हे काम करता करता स्वतःसाठी आनंदाचे काही कण मिळवणे आणि इतर लोकांनाही थोडा आनंद वाटणे याचाही जमेल तेवढा प्रयत्न मी करत असतो. त्या काळातली बाबामहाराजांची कीर्तने ऐकतांना त्यांचा खणखणीत आवाज, ओघवत्या भाषेमधून होत असलेले सुश्राव्य निवेदन, नर्मविनोद, रोजच्या जीवनातली उदाहरणे देणे, संतवाणीचा प्रचंड व्यासंग, अधून मधून भजनांचे सुमधुर गायन या सगळ्याचा चांगला प्रभाव पडत असे. यामुळे मला कीर्तनाचा तो कार्यक्रम ऐकायला आवडत असे. त्यातून बाबामहाराजांबद्दल कुतुहल वाटत गेले, कधी तरी त्यांचे कीर्तन प्रत्यक्षात ऐकावे अशी एक अंधुक इच्छाही मनाच्या कोप-यात कुठे तरी उगम पावली. पुढे त्या कार्यक्रमाचे टीव्हीवर प्रक्षेपण होणे थांबले किंवा मला तो पहायला वेळ मिळेनासा झाला आणि ती गोष्ट पार विस्मरणात गेली. गेली दहा बारा वर्षे बाबामहाराजाच्या नावाचा उल्लेखही इतर कोणाच्या बोलण्यातून माझ्या कानावर आला नाही.

आमच्या घराजवळ असलेल्या शंकराच्या देवळात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो. आमच्या पोस्टबॉक्समध्ये येऊन पडलेले या वर्षीच्या कार्यक्रमाचे पत्रक पाहिले, तर त्यात पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याचे वाचले. माझ्या जुन्या आठवणींवर पडलेली विस्मृतीची धूळ थोडी पुसली गेली आणि कधीकाळी मनात उठलेली इच्छा पुन्हा जागी झाली. तिची पूर्ती होण्याची संधी आता आयती माझ्यासमोर चालत आली होती. रात्रीचे जेवण जरा आधीच उरकून घेतले आणि बाबामहाराजांना एकदा प्रत्यक्षात पहावे, त्यांचे चार मधुर शब्द ऐकावे आणि परत यावे असा विचार करून मी घरातून निघालो. शिवमंदिर नजरेच्या टप्प्यात यायच्या आधीच लाउडस्पीकरवरून येणारे सामूहिक भजनाचे सूर कानावर पडायला लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यातले शब्द कळायला लागले. "शिव हालाहले तापला।" हा एकच चरण आळवून आळवून गायिला जात होता. "नामे तोही शीतल झाला।।" हा पुढचा चरणही अधून मधून त्याच्या सोबतीला ऐकू येऊ लागला.

मंदिराच्या फाटकापाशी जाऊन आत पाहिले. उत्सवातल्या कार्यक्रमांसाठी देवळाजवळ एक तात्पुरते व्यासपीठ उभारले होते. त्यावर दहा बारा टाळकरी उभे राहून भजन गात होते. समोरच्या पटांगणात जाजमे अंथरलेली होती,  त्यातल्या निम्म्याहून जास्त भागात दोनतीनशे श्रोते दाटीवाटीने बसले होते. त्यांच्या मागे थोडी जागा सोडून मागच्या बाजूला शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या मात्र पूर्णपणे भरलेल्या दिसत होत्या. शिवमंदिराच्या परिसराच्या दुस-या गेटमधून आत जाऊन पाहिल्यावर कोप-यातली एक खुर्ची रिकामी दिसली. मी तत्परतेने जाऊन तिचा ताबा घेतला. स्टेजवरचे तेच भजन अजून सुरूच होते. तो अभंग संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी या नामाचा घोष सुरू झाला. त्याला श्रोत्यांनीही साथ दिली. दहा बारा मिनिटे हरीनामाचा गजर झाल्यानंतर तो थांबला. बाबामहाराजांचा धीरगंभीर आवाज कानावर पडायला लागला.

सुरुवातीला त्यांनी त्या जागी जमलेल्या श्रोत्यांचे या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल स्वागत केले म्हणण्यापेक्षा त्यांचे अभिनंदन केले. त्यातले बरेचसे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या इतर भागांमधून वाशीला आले होते. डोक्यावर पागोटे किंवा पांढरी टोपी घालून फिरणारे मराठी लोक आमच्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत इतक्या मोठ्या संख्येने रहात असतील असे मला वाटत नव्हतेच. श्रोत्यांमधली त्यांची सोठी संख्या पाहून मला जरा नवलच वाटत होते. बाबामहाराजांच्या सांगण्यातून त्याचा उलगडा झाला. काल, परवा, तेरवा कुठे कुठे त्यांचे कीर्तन होऊन गेले आणि उद्या, परवा, तेरवा ते आणखी कुठे कुठे कीर्तन करणार आहेत याची माहितीही त्यांनी दिली. आजही त्यांचे किती भरगच्च कार्यक्रम असतात याची कल्पना त्यावरून आली. त्यांच्याकडे गडगंज वडिलोपार्जित मालमत्ता आहे, आपल्या कीर्तनासाठी ते कुणाकडेही बिदागी मागत नाहीत, हेसुद्धा त्यांनी सांगितले, ऐंशीचे वय झाले असल्यामुळे आता त्यांच्या पायात शक्ती उरली नाही, चालण्यासाठी आधाराची गरज पडते, पण त्यांना व्यासपीठावर नेऊन बसवले की मग तासन् तास अस्खलितपणे अव्याहत बोलायला मात्र काही अडचण येत नाही. त्यांना मिळालेले तल्लख बुद्धी आणि अस्खलित वाणी यांचे वरदान त्यांनी हे धार्मिक कार्य पुढे चालू ठेवावे यासाठीच देवाने अद्याप शाबूत ठेवले आहे. त्याचा उपयोग देवाच्या कामासाठी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे या भावनेने ते हा ज्ञानयज्ञ करत आहेत असेही त्यांनी सांगितले. देवाविषयी असलेल्या भक्तीभावानेच सारे श्रोते जमलेले असल्यामुळे त्यांनीही शांत राहून मनोभावे या कीर्तनाचे श्रवण करावे, गडबड गोंधळ किंवा हालचाली करून त्यात व्यत्यय आणू नये, मध्येच उठून जागा बदलू नयेत किंवा बाहेर जाऊ नये वगैरे सूचना केल्या. शिवाय असे केल्यास तो बाबामहाराजांचा नव्हे तर प्रत्यक्ष देवाचा अपमान केल्यासारखे होईल अशी भीतीही घातली. लहान मुलांना हे समजण्यासारखे नसल्यामुळे त्यांची चुळबुळ चालली होती. त्यांनी यापेक्षा घरी जाऊन टीव्ही पहावा, भारत पाकिस्तानची मॅच पुन्हा दाखवत आहेत ती पहावी असेही त्यांनी गंमतीने सांगितले.

 . . . . . .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . (पूर्वार्ध)

No comments: