हा ब्लॉग दोन वर्षांपूर्वी सुरू केला असला तरी पहिल्या वर्षभरानंतर काय झाले कोणास ठाउक, माझ्याच्याने तो उघडतच नव्हता. ब्लॉगस्पॉट आणि गूगल यांच्या एकीकरणानंतर कुठे तरी कसला तरी गोंधळ झाला होता. या वर्षी सहज प्रयत्न करून पाहिला तर हा ब्लॉग अजून जीवंत दिसला. मध्यंतरीच्या काळात माझ्या संगणकाचे नूतनीकरण झाले होते, त्यात पूर्वी निर्माण झालेला दोष निघून गेला असावा. या काळात मी मुख्यतः याहू ३६० वर लिहीत होतो आणि त्याला चांगला वाचकवर्ग लाभला होता. अलीकडे याहूबद्दल वेगवेगळ्या अफवा उठत होत्या आणि ती सेवा थोडी बेभरंवशाची झाल्यासारखा अनुभव येऊ लागल्यामुळे या ब्लॉगचे पुनरुज्जीवन करायचे मी ठरवले. पण मी चार ओळी लिहिल्या तरी त्या कोणीतरी वाचते की नाही हा मुळातला प्रश्न पुन्हा समोर उभा राहिल्यामुळे उत्साह येत नव्हता. हे कळावे म्हणून मी मे महिन्यापासून वाचनांचा काउंटर लावला. मे च्या मध्याला मैसूरला गेल्यावर पुन्हा या ब्लॉगवर लिहिणे बंद पडले. नवे लिखाणच नसतांना वाचक कुठून येणार? तरीही वाचनसंख्या हळूहळू पुढे सरकत होती. मुंबईला परत आल्यावर नव्या जोमाने लिहायला सुरुवात केली आणि मीटर थोड्या
वेगाने पुढे सरकू लागले. त्याने हजारांचा आंकडा पार केल्याचे आताच पाहिले आणि हुश्श्श sss वाटले.
वाचकांना सादर प्रणाम करून आणि त्यांचे आभार मानून या ब्लॉगला असाच आधार पुढे देत रहावा अशी विनंती करीत आहे.
Friday, July 04, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment